निवडणूक निकालाची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज ठाकरे त्यांच्या नित्यक्रमाला लागले होते. नाही म्हटलं, तरी प्रचार संपूनही प्रत्यक्ष निकालापर्यंत गडबड कायम होतीच. बेरजा वजाबाक्यांची चर्चा सुरू होती, समीकरणं मांडली जात होती. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी तर मनसेची दिवाळीच साजरी झाली होती. पहिल्याच निवडणुकीत अनेक उमेदवारांनी लाख-दीड लाख मतांपर्यंत बाजी मारली होती. अधिक जोर लावला असता, तर आणखी काही जागा जिंकलोही असतो, अशी परिस्थिती होती. लोकांच्या अगदी "मनसे' प्रतिसादामुळं सगळेच भारावले होते. राजसाहेबांनाही मतदारांनी दाखविलेल्या प्रचंड अभिमानाबद्दल श्रमांचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांतही त्यांच्या कर्तृत्वाचं, पक्षाच्या यशाचं गुणगान आलं होतं. ते वाचतानाही राजसाहेब प्रसन्न हसले. आपल्या लाडक्या कुत्र्याला त्यांनी गोंजारलं. नेहमीप्रमाणं त्याला सकाळी फिरायलाही नेऊन आणलं. शुभेच्छांचे फोन निकालाच्या सकाळी जे सुरू झाले, ते रात्री बारा-साडेबारापर्यंत सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळीही हा "सिलसिला' संपला नव्हता. अनेकांच्या शुभेच्छा झेलत झेलतच राजसाहेबांनी आन्हिके उरकली. तेवढ्यात कुणा नेत्याचाच फोन आला.
""लक्षात ठेवा. एवढ्या यशानं हुरळून जायचं नाही. बाकीचे नालायक पक्ष लोकांना नको आहेत, हे त्यांनी दाखवून दिलंय. आता विधानसभेला अजिबात गाफील राहू नका. विजय आपलाच आहे!'' त्यांनी करड्या आवाजात सुनावलं. आपण अभिनंदन करायला फोन केला, की नेहमीची दटावणी ऐकायला, असाच प्रश्न त्या बिचाऱ्या नेत्याला पडला असावा.
""असो. बोला, तुमचं काय काम होतं ते!'' राजसाहेब म्हणाले.
पलीकडून बोलणाऱ्यानं त्याचं काम सांगितलं.
""सत्कारच ना? मी फार सत्कार-बित्काराच्या फंदात पडणारा माणूस नाही. पण पक्षाची ताकद सिद्ध झालेय. त्यानिमित्तानं मी सत्कार स्वीकारायला तयार आहे. कुठे आहे कार्यक्रम?''
""मुंबईतच आहे साहेब!'' कार्यकर्त्यानं सांगितलं.
""ठीक आहे. येईन मी. पण वेळेत सुरू करा आणि वेळात आटपा. बरीच कामं बाकी आहेत.'' राजसाहेबांनी पुन्हा सुनावलं.
पुढचे काही दिवस शुभेच्छा आणि अभिनंदनं झेलण्यात गेले. इतर पक्षांची संसदीय समितीची बैठक होते, तशी मनसेची लोकसभेतल्या सर्व (पराभूत) उमेदवारांची बैठक झाली. विधानसभेसाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली.
असेच काही दिवस धामधुमीत गेले आणि प्रत्यक्ष सत्काराचा दिवस उजाडला. सगळी तयारी झाली होती. राजसाहेब मोठ्या प्रसन्न मुद्रेनं सत्काराच्या ठिकाणी गेले. कार्यक्रमाची आखणी भव्य स्वरूपाची होती. मात्र, सुरुवातीपासून संजय निरुपम, गुरूदास कामत आणि अन्य काही नेत्यांची छायाचित्रं बघून ते काहीसे अस्वस्थ झाले. उत्तर भारतीय संघटनांच्या नावांच्या पाट्याही ठिकठिकाणी झळकत होत्या. "मनसेची ताकद पाहून उत्तर भारतीयही वठणीवर आले की नाही! माझ्या सत्कारातही त्यांनी अभिनंदनाच्या पाट्या लावल्या आहेत!!' राजसाहेब मनाशीच म्हणाले.
कार्यक्रमाचं स्वरूप थोडं निराळं होतं. आधी राजसाहेबांचं भाषण आणि नंतर सत्कार, अशी रचना होती. बाकीच्या नेत्यांची भाषणं झाल्यावरच राजसाहेब सभास्थळी आले होते. आल्याआल्या काही मिनिटांतच त्यांचं भाषण सुरू झालं. नेहमीप्रमाणे मनसेची गरज, ताकद, मतदारांनी दाखविलेला विश्वास, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं कार्य, याविषयी ते बोलले. मग ओघानंच बिहारी आणि उत्तर भारतीय नेत्यांवर आणि लोकांवर त्यांनी आग ओकायला सुरवात केली. व्यासपीठावरचे अन्य लोक काहीसे अस्वस्थ झालेले आढळले. लोकांमध्येही टाळ्या-शिट्ट्या आणि जल्लोषाऐवजी अस्वस्थता दिसत होती. तेवढ्यात कुणीतरी राजसाहेबांचा शर्ट ओढला. "इन' बाहेर आल्यानं ते थोडेसे संतापलेले दिसले.
""साहेब, उत्तर भारतीयांवर आणि बिहारींवर जास्त टीका करू नका. त्यांनीच हा सत्कार आयोजित केलाय! मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या प्रचंड मतांमुळेच मुंबईत युतीचे उमेदवार पडले ना, म्हणून!'' तो कार्यकर्ता कुजबुजला.
""काय?'' राजसाहेब उडालेच. मग त्यांची नजर व्यासपीठावरच्या फलकांकडे गेली. "उत्तर भारतीय और बिहारी उम्मीदवारों को लोकसभा पर प्रतिनिधित्व देने में मदद के लिये "मनसे' का धन्यवाद' असे लिहिले होते!!
प्रतिक्रिया
18 May 2009 - 11:37 pm | अनामिका
8} शब्द अपुरे पडतायत!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
18 May 2009 - 11:40 pm | llपुण्याचे पेशवेll
हा आता मुंबईच्या सीटा पडल्या तेव्हा बोला असे ढीग राजच्या नावाने. पण च्यायला राज लढत होता तेव्हा त्याला दोन आधाराचे शब्द कोणी ऐकवले असतील का नाही कोणास ठाऊक. जेव्हा राजने पहिल्यांदा छटपूजेविरुद्ध बोंबाबोंब केली तेव्हा शिवसेनेची अवस्था कशी झाली होती हे मी पाहीले. अगदी शिवसेनेने छटपूजा स्वखर्चाने करून द्यायची ठरवल्यासारखे वागत होते. त्यानंतर तर शिवसेनेला कोणती भूमिका घ्यायचे हे कित्येक दिवस उमगतच नव्हते. त्यानंतर देखील राजच्या प्रकरणाने पेट घेतला तरीही शिवसेना दिङमूढ होऊन काय भूमिका घ्यायची याच्या विवंचनेतच होती. आता आलेत मोठे भावनिक ब्लॅकमेल करणारे. बाकी या उत्तरभारतीयानी करूदे सत्कार वगैरे काही पण जास्त आगाऊपण करतील तर त्यांच्या गां*वर २ फटके परत मारायलाही काही कमी करणार नाही.
राजला पैसे देऊन काँग्रेसने उभे केले असं मानल तर काँग्रेसने शिवसेनेच्या संघटनेचाच नव्हे बुद्धिभेदही केला याचे दु:ख अधिक आहे. शिवसेनेच्या संघटनेचा भेद झाला असता तर काही प्रकारे प्रयत्न करून संघटना परत बांधता आली असती पण आत शिवसेनेपुढे झालेला बुद्धिभेद आणि त्यामुळे गेलेली पत या दोन्ही गोष्टीतून वर कसं निघायचे हा मोठा प्रश्न आहे.
शिवसेनेने शेतकर्यांच्या प्रश्नांवर रान उठवून जे कमावले ते त्यानी राजच्या प्रकरणात गमावले हे नक्की.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
19 May 2009 - 1:08 am | विकास
काल एका ठिकाणी असाच आत्ताच्या निवडणूकीचा विषय चालला होता. त्यात एका उत्तर भारतीयाबरोबर माझा संवाद झाला. भाजप-सेनेच्या मुंबईतील हार खाण्याबद्दल अर्थातच राज, कारण असल्याचे त्याचे पण म्हणणे होते. मात्र पुढे तो जे काही बोलला (हिंदीत) ते "इंटरेष्टींग" होते: त्याच्या म्हणण्याप्रमाणे, "राज हा एक चांगला नेता आहे आणि चांगला राज्यकर्ता होऊ शकतो. त्याचे जे काही उत्तर भारतिय आणि हिंदी भाषिकांविरुद्ध चालू आहे, तसे करण्याव्यतिरीक्त त्याच्याकडे (बिचार्याकडे) काही पर्याय नाही. कारण तो राजकारणात नव्याने (स्वतंत्र) येत आहे. काही तरी मुद्दा राजकारण्यांना लागतोच. एकदा सत्ता मिळाल्यावर सगळे नॉर्मल होईल!" :-)
19 May 2009 - 10:44 am | सुनील
शिवसेनेने हिंदुत्व रक्षणाची अतिरीक्त जबाबदारी स्वीकारल्यामुळे निर्माण झालेली "मराठी" पणाची राजकीय पोकळी, राज यांनी चाणाक्षपणे हेरली. मुंबईतील मराठी मते राज यांच्याकडे वळत असताना, उत्तर भारतीय मते मात्र सपा-बसपा कडे न वळता काँग्रेसकडे वळत असतील (लोकसभेच्या निवडणूकीत हे दिसलेच आहे), तर तो राज यांच्या राजकीय भूमिकेचा विजयच ठरेल, असे म्हणायला हरकत नसावी. कारण त्यामुळेच, ह्या उत्तर भारतीय पक्षाच्या नेत्यांना मुंबईत बस्तान बसवणे कठिण होणार आहे - जे राज यांना नेमके हवे होते. कारण भैय्या जे रोजगार करीत होता-आहे, ते रोजगार मराठी तरूण कधिच करणार नव्हता.
थोडक्यात काय, हा उत्तर भारतीयांच्या आर्थिक नव्हे तर, सांस्कृतिक/राजकीय वर्चस्वाविरुद्धचा लढा होता.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 May 2009 - 9:07 am | भडकमकर मास्तर
उत्तम विश्लेषण....
हा अँगल विचार करण्यासरखा आणि इन्ट्रेष्टिंग आहे... :)
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
19 May 2009 - 11:03 am | चिरोटा
एखाद्या समाजाविरुध्ध बोलले की मिडिया पटकन दखल घेतो.गर्दी जमवण्यासाठी असले मुद्दे पटकन चालतात. ३०/३५ वर्षापुर्वीचे शिवसेनेचे 'लुंगी सोडा' आंदोलन असेच होते.हळुहळु सत्तेची उब मिळाली आणि मग सेना शांत झाली.मनसेचे ही तेच धोरण असावे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
19 May 2009 - 11:08 am | नितिन थत्ते
सध्या बेनिफिट ऑफ डाउट
खराटा
(रंग माझा वेगळा)
19 May 2009 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार
तुम्हाला 'बजाओ पुंगी, भगाओ लुंगी' म्हणायचे आहे का ? माझ्या मते तेच आंदोलनाचे नाव होते.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
19 May 2009 - 11:21 am | चिरोटा
की 'लुंगी हटाओ,पुंगी बजाओ' असे काहीतरी होते.खूप जुने मार्मिकचे अंक चाळताना हे वाचले होते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
19 May 2009 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिजिता, राज ठाकरे कोणाबरोबरही गेले तरी आमची हरकत नाही !;)
फक्त उतारवयात श्री बाळासाहेब ठाकरेंना जो त्रास राज ठाकरे देताहेत त्याचे लै वाईट वाटते ;)
आज दै. सकाळमधे एक बातमी वाचून खूप करमणूक झाली. सामनातील संपादकीय तसेच..!
-दिलीप बिरुटे
19 May 2009 - 2:12 pm | मिसळभोक्ता
आणि एक म्हातारा एका उमद्या तरुणाला इतका त्रास देतोय, ते देखील आपल्या उदास मुलाच्या उन्नतीसाठी, ह्याची देखील गंमत वाटली.
पुढच्या वर्षभरात शिवसेनेचे तुकडे होऊन मनसे ला मिळणार, तेव्हा माझी आठवण काढा म्हणजे झाले.
-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
19 May 2009 - 3:07 pm | भोचक
अभिजत लेख छानच. इथेही काही खरडलेलं आहे.
http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/0905/18/109...
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
19 May 2009 - 3:46 pm | अ-मोल
असा लेख लिहिण्याचे धाडस करुन दाखवाच अभिजितराव! राजवर तर हल्ली शेंबडी पोरंही लेखणी चालवून घेतात. या निवडणुकीत खरे थोबाड पवारांचे फुटले आहे. तेव्हा, त्यांच्यावर असे काही लिहिले असते, तर त्याचा मझा घेता आला असता.
19 May 2009 - 4:56 pm | चिरोटा
४२ वर्षे राजकारणात पण १० खासदारपण नाहीत.पण नेहमीप्रमाणे पवारप्रेमी आतापण त्याना 'मुत्सद्दी/परिस्थितीचे अचुक भान असलेला' अशी विशेषणे लावतीलच.मनसेची खरी स्थिती पुढच्या ५ वर्षात कळेल.
राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला काही विधायक कामे हाती घ्यावी लागतील.सारखे भैय्या/मराठी-अमराठी वाद घातले तर लोक कंटाळतील.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
19 May 2009 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभी, विषयांतराबद्दल क्षमस्व रे !
अभिजितराव! राजवर तर हल्ली शेंबडी पोरंही लेखणी चालवून घेतात. या निवडणुकीत खरे थोबाड पवारांचे फुटले आहे. तेव्हा, त्यांच्यावर असे काही लिहिले असते, तर त्याचा मझा घेता आला असता.
अमोलसेठ, राज्यसभेत असलेले विजय दर्डा यांनी लोकमत मधे इथे पवारांवर भर्पूर तोंडसुख घेतले आहे. मला वाटतं तुम्हाला मजा येईल !
19 May 2009 - 7:33 pm | सँडी
राज यांनी परप्रांतियांऐवजी ''बांगलादेशी' घुसखोरांविरुद्ध हेच आंदोलन पुकारले असते तर महाराष्ट्रच नाही अख्खा देश मागे उभा राहिला असता. असो, जनतेला महाराष्ट्रातील परप्रांतिय, हा भारतातील 'बांगलादेशी' घुसखोरांपेक्षा ज्वलंत विषय वाटतोय.
19 May 2009 - 8:59 pm | यन्ना _रास्कला
बांग्लादेशी लोकान्ला इरोध क्येला त कांग्रेसकडन पैका मिलाला आस्ता का? त्ये त कांग्रेस्च वोटर.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
20 May 2009 - 10:42 am | नितिन थत्ते
बांगलादेशी घुसखोरांविषयी १९९३ पासून ऐकत आहोत.
युती शासनाच्या काळात त्यांना हाकलता आले नसेल कदाचित. (केंद्रातही यांचेच शासन होते १९९८ पासून) पण त्यांची यादी तरी करता आली होती काय?
खराटा
(रंग माझा वेगळा)
20 May 2009 - 10:53 am | चिरोटा
मुख्य म्हणजे ते मुंबईत किती आहेत? की प्रत्येक बंगाली मुस्लिम म्हणजे बांगलादेशी मुस्लिम असे तर नाही? :)
काही वर्षापुर्वी काही लोकाना पोलिसानी पकडुन कोलकाट्याच्या ट्रेनमधे बसवले होते. ट्रेन बंगालमध्ये जात असता तिकडच्या स्थानिक लोकानी पकडुन नेणार्या महाराष्ट्राच्या पोलिसाना बदडले होते.त्यांचे म्हणणे ते बान्गलादेशी नव्हतेच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
20 May 2009 - 12:23 pm | mamuvinod
तात्या हा लेख कालच्या सकाळमधिल सिहासन पुरवणिमधुन जसाच्या तसा चोरला आहे. ह्या चोराला शासन करा तात्या
चोरापासुन सावधान
20 May 2009 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
सकाळ मध्ये तो लेख लिहिणारे आणी हे अभिजित एकच आहेत मामु !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
20 May 2009 - 12:31 pm | दशानन
=))
पोपट झाला.
थोडेसं नवीन !
20 May 2009 - 1:54 pm | mamuvinod
चुकि झाली ,चुकि झाली,,चुकि झाल,,,चुकि झा,,,,चुकि ,,,,,चुकि झाली
मला माहित नव्हते,
दिलगिर आहोत
20 May 2009 - 3:16 pm | वेताळ
अभिजित तुम्हा सर्व लोकांचे असे का मत बनले आहे कि राज ठाकरे मुळे मराठी(शिवसेनेचे) उमेदवार पडले. आज मुंबईत २ मराठी उमेदवार निवडुन आले आहेतच की.राज ठाकरे शिवसेनेत असताना जर त्याची योग्य दखल उध्दव ठाकरेनी घेतली असती तर आज ही परिस्थिती त्याच्यावर आली नसती. अजुनही उध्दव ठाकरे राज विषयी मवाळ भुमिका न घेता त्याना संपवायची भाषा करतात ते तुम्हाला योग्य वाटते का?राजकारणात आता दोघाच्या वाटा वेगवेगळ्या आहेत,दोन्ही पक्षाची ध्येयधोरणे वेगळी आहेत. मग एकटा राजच दोषी का? मी असे म्हणतो कि उध्दवच्या हेकेखोर पणा मुळे मनसेचे ६ उमेदवार मुंबईमध्ये पडले.शिवसेनेने किती उमेदवार मुंबईमध्ये उभे केले होते,राज पेक्षा कमीच मग ते तरी का उभे केले? सरळ राजना पाठिंबा दिला असतातर आज सगळे मनसेचे खासदार मुंबईमधुन निवडुन आले असते.शिवसेना भाजपला बरोबर घेवुन ही निवडणुक मुंबई मध्ये लढली. परंतु एकटा राज ठाकरे त्याना भारी ठरला.
संजय निरुपम,दत्त कुटुंबिय ह्याना मुंबई मध्ये मोठे कोणी केले? शिवसेनेनेच ना, मग आता कशाल टाहो फोडता.मागे जे पाप केले ते आज पाण्यावर आले. त्याचा दोष राज ठाकरेच्या माथी मारण्यात काहीच अर्थ नाही. बर राज ठाकरेनी शिवसेनेचे उमेदवार आपल्यामुळे पडतात म्हणुन काय करावे? शिववड्याचा स्टॉल दादर ला काढावा की काय?
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
20 May 2009 - 4:29 pm | प्रशु
स्वतःची पापे राजवर धकलुन उध्धव नामानिराळा होउ पहातो आहे. सोबतीला म. टा. सारखे मित्र आहेतच. आजचा लेख वाचा त्या प्रकाशन सोह्ळ्याचा....
उदध्धव ला म्हणावे जा आता कुपा शंकर कडे गणपतीला...
20 May 2009 - 5:24 pm | आपला अभिजित
माझ्या (कथित) उपहासात्मक लेखावर 25 प्रतिक्रिया आल्याचे पाहून धन्य वाटले. पण त्यातल्या बहुतांश प्रतिक्रिया माझ्या (कथित) लेखनशैलीबद्दल नव्हे, तर राजप्रेमाबद्दलच्या होत्या, हे पाहून पोपट झाला. असो.
मुंबईतल्या युतीचा पराभव मनसेच्या उमेदवारांमुळे झाला, हे तर उघडच आहे. पण राज ठाकरेंच्या मराठीप्रेमाचा बुरखा वगैरे फाडण्यासाठी किंवा त्यांना दोष देण्यासाठीचा हा लेख नव्हता. काही जण बरेच गंभीर झालेले दिसतात. केवळ एक सार्वत्रिक भावना वेगळ्या शैलीत मांडावीशी वाटली, एवढंच! राज ठाकरेंवर टीकाच करायची असती, तर तसा वेगळा राजकीय वगैरे लेख हाणला असता.
तरीही, असो.
प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.
20 May 2009 - 7:48 pm | नितिन थत्ते
अभिजितराव, हे म्हणजे अगदी "तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात दु:खी क्षण" झाले की.
धन्य आहे तुमची
खराटा
(रंग माझा वेगळा)