ब्राह्मणद्वेष
=====
प्रत्येक व्यक्ती लहान वयात जास्तीतजास्त संस्कारक्षम असते, त्याप्रमाणे लहान आकारातला समूह हा बदलांना पटकन सामोरा जाऊ शकतो. त्यात ब्राह्मण मूळात एक नसल्याने (सोलापूरकरसारख्या प्रकरणात ते ठळक दिसते.), त्यात ब्राह्मणत्व निश्चित काय हे आज सांगता येत नाही, त्यामुळे आता ब्राह्मणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत. दे हॅव लॉस्ट देअर पोझिशन इन सोसायटी...आज ब्राह्मणेतर समाज जसा "घटनेवर" निष्ठा ठेवतो (कारणे स्पष्ट आहेत), तसे ब्राह्मण "घटने"बद्दल आत्मीयतेने बोलताना दिसत नाहीत...
ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता. जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे.
पण मराठा समाजाने जसे हुंडाबळीनंतर मोठे निर्णय घेतले तसे ब्राह्मणांनी समाजाच्या ऐक्यासाठी/स्वास्थ्यासाठी मोठे निर्णय घेतल्याचे माझ्या आठवणीत नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करूनही क्षत्रिय संपले नाहीत - हा परशुरामाचा पराभव आहे. ब्राह्मणेतरांचे आयकॉन त्यांना जी ताकद देतात, तशी ताकद परशुराम आजच्या ब्राह्मणांना देतो का? माझे उत्तर नाही असे आहे.
सध्या गोत्र, सनातन सारख्या निरर्थक/व्याख्यारहित कल्पनांच्या ओझ्याखाली दबलेला ब्राह्मण नवा विचार करण्यास असमर्थ आहे. तो आपल्याच समाजाला दिशा देण्यास, ब्राह्मणद्वेष संपविण्यास असमर्थ आहे.
सध्याच्या काळात जुन्या कालबाह्य कल्पनांची पुनर्स्थापना अशक्य आहेच, पण ते न समजल्यामुळे नव्या कल्पना पण रूजणे कठीण आहे.
नुकतेच माझ्या घराचे वॉटरप्रुफींगचे काम केले तेव्हा मी ब्राह्मण व्यावसायिकाना प्राधान्य द्यायचे ठरवले होते. एकाही ब्राह्मण व्यक्तीने मला योग्य मोजमाप, दर आवश्यक ती माहिती पुरवली नाही. शेवटी मोठ्या अनिच्छेने ते काम ब्राह्मणेतराकडून करू घेतले. त्याने मोजमाप किती प्रामाणिकपणे घेतले हा माझा महत्त्वाचा निकष होता. मग मी त्याला खुष होऊन कबूल केलेल्या रकमेशिवाय बक्षिस पण दिले.
असो. पण यातून ब्राह्मण काही बोध घेतील असे वाटत नाही.
--राजीव उपाध्ये
संदर्भ - https://www.youtube.com/watch?si=YrVrFrbDk1B3M_aH&v=gIh594r5sZM&feature=...
प्रतिक्रिया
7 Jun 2025 - 9:59 am | सुबोध खरे
बराचसा दिशाहीन आणि हुकलेला लेख आहे.
आजमितीस सर्वात जास्त सुधारणा या ब्राम्हण समाजातच दिसून येतात.
ब्राम्हणात जातपंचायत /खाप नाही. कुणी सुधारणा केल्यास त्याला वाळीत टाकणे हे गेल्या ५० वर्षात निदान ब्राम्हण समाजात दिसलेले नाही.
लग्न समारंभात सर्वात जास्त सुधारणा ब्राम्हण समाजातच दिसते. स्त्रीशिक्षण आणि स्त्रीमुक्तीचे प्रमाण सुद्धा ब्राम्हण समाजात सर्वात जास्त दिसते.
कुळकायद्यात जमिनी गेल्या गांधीहत्ये नंतरच्या दंगलीत स्थावर मिळकत धुळीस मिळाली असे असून सर्वात जास्त आर्थिक उन्नती ब्राम्हण समाजाने केली.
शिक्षणाबद्दलची सर्वात जास्त कळकळ हि याच समाजात दिसते.
बाकी चालू द्या
7 Jun 2025 - 10:16 am | युयुत्सु
ब्राह्मणांमधले सुधारक हे व्यक्तीगतपातळीवर प्रयत्न करत राहीले. समाजाने एकत्र येऊन ठोस निर्णय कधीही घेतले नाहीत. सर्वच सुधारकांना ब्राह्मणांनी भरपूर त्रास दिला आहे.
फक्त लग्न संमारंभातील सुधारणा म्हणजे पुढारलेपण नव्हे. आणि त्याला प्राथमिकता द्यायची असेल तर बरेच लिहीण्यासारखे आहे. विशेषतः ब्राह्मणद्वेष संपुष्टात आणण्यास ब्राह्मण असमर्थ ठरले आहेत.
7 Jun 2025 - 10:30 am | सुबोध खरे
फक्त लग्न संमारंभातील सुधारणा म्हणजे पुढारलेपण नव्हे.
तेवढंच वाचलं का?
स्त्रीशिक्षण आणि स्त्रीमुक्ती आर्थिक उन्नती शिक्षणाबद्दलची सर्वात जास्त कळकळ हे मुद्दे वाचलेच नाही का?
कुटुंब नियोजन, आर्थिक स्थिरता, आणि एकंदर नियोजन ब्राम्हण समाजात नक्कीच चांगले आहे.
वायफळ खर्च उधळेपणा ऋण काढून सण करणे हे एकंदर ब्राम्हण समाजात जवळ जवळ नाहीच
समाजाने एकत्र येऊन ठोस निर्णय कधीही घेतले नाहीत.मुळात ब्राम्हणात जातपंचायत नाहीच परंतु एकंदर देश आणि समाज कुठे चाललाय याची सर्वात उत्तम जाणीव ब्राम्हण समाजाला आहेच त्यामुळे कोणताही अधिकारीक निर्णय न घेता त्याची अंमलबजावणी करण्यात ब्राम्हण समाज पुढे आहे.
आपल्यापेक्षा जास्त सुंदर हुशार श्रीमंत सुधारलेला कोणी असल्यास त्याबद्दल द्वेष वाटणे हा स्था यीभाव आहे
बाकी जी व्यक्ती/जात /समाज सर्वात प्रगती करते तिच्याबद्दल द्वेष करणे हा मानवी स्वभाव आहे. या द्वेषाला जाणीवपूर्वक खतपाणी देऊन आपला स्वार्थ साधणारे राजकारणी महाराष्ट्र्र कमी आहेत का?
असे असताना केवळ ब्राम्हण समाजास दूषणे देण्यात या लेखाने नक्की काय साधले?
7 Jun 2025 - 10:42 am | प्रकाश घाटपांडे
धर्मांतर करणे कायदेशीर आहे. तशी सोय आहे पण जात्यांतर करता येत नाही.लेदर इंडस्ट्री मधील अभ्यंकरांनी मला आता जात बदलायची आहे व मला हिंदू ब्राह्मण ऐवजी हिंदू चांभार अशी जात लावायची आहे असे ठरवले तरी सोय नाही. बाकी वृत्तीने ब्राह्मण असलेले अनेक ब्राह्मणेतर सुसंस्कृत समाजात दिसतात. उलट चित्रही दिसते
7 Jun 2025 - 10:59 am | युयुत्सु
<लेदर इंडस्ट्री मधील अभ्यंकरांनी मला आता जात बदलायची आहे व मला हिंदू ब्राह्मण ऐवजी हिंदू चांभार अशी जात लावायची आहे असे ठरवले तरी सोय नाही.>
हे सर्व मानसिक बेड्यांचे परिणाम आहेत.
स्वगत - मानसिक बेड्या फक्त उपाग्रखण्डाची पकड ढिली झाली की सुटतात, त्याला हायपोफ्रंटॅलिटी अशी वैज्ञानिक संज्ञा आहे. उपाग्रखण्डाची पकड ढिली झाली की कायदे मोडणे दिसते तसेच समाजाचे जोखड झुगारून देणे पण दिसते. ध्यानाने उपाग्रखण्डाची पकड ढिली होते
7 Jun 2025 - 11:22 am | युयुत्सु
<पण जात्यांतर करता येत नाही.>
या मुळमुळीत विधानाशिवाय कोणताही भक्कम युक्तीवाद मला आजवर बघायला मिळालेला नाही. प्रथम जात म्हणजे काय हे वस्तूनिष्ठ पणे मांडावे आणि मग ते का बदलता येत नाही हे सांगावे. ब्राह्मण म्हणजे काय हे आज कुणालाही सांगता येणार नाही. नेमके त्याचमुळे कुणालाही ब्राह्मण होणे शक्य आहे.
7 Jun 2025 - 11:32 am | प्रकाश घाटपांडे
जात ही अंधश्रद्धा आहे ही अंनिसची स्पष्ट भूमिका आहे.मग तिचे निर्मूलन व्हायचे असेल तर प्रथम ती शासकीय कागदपत्रावरुन हटवली पाहिजे.यासाठी अंनिस काय करते? असा प्रश्न मी कैक वर्षे विचारतो. जात ही जन्माधिष्टित असलेली बाब आहे. ब्राह्मण कुणाला म्हणावे हा वाद सांस्कृतिक आहे. कायदा फक्त असे मानतो कि ब्राह्मण कुटुंबात जन्मला तो जातीने ब्राह्मण. आतातर देश मागे मागे चालला आहे. जातीनिर्मूलना ऐवजी जातीआधारे जनगणना होत आहे.
7 Jun 2025 - 11:41 am | युयुत्सु
<यासाठी अंनिस काय करते? असा प्रश्न मी कैक वर्षे विचारतो.>
मनःपूर्वक अभिनंदन!
<कायदा फक्त असे मानतो कि ब्राह्मण कुटुंबात जन्मला तो जातीने ब्राह्मण. >
कायदा समाजातील चालीरितींवर आधारीत असतो. त्याशिवाय लोक रस्त्यावर आले की कायदा बदलतो. नव्या चालीरीती सतत जन्माला येतच असतात. त्याचा आधार घेऊन कायदे पण बदलत राहतात. त्यामुळे "जात्यंतर" विषयक चालीरीती बदलल्या की कायदे आपोआप बदलतील.
7 Jun 2025 - 10:52 am | युयुत्सु
मुळात ब्राम्हणात जातपंचायत नाहीच
वेगवेगळ्या ज्ञातींचे संघ अस्तित्वात आहेत आणि ते मह्त्त्वाची भूमिका बजावू शकले असते. याशिवाय फतवे काढणार्या अनेक मठांचे अधिपती ब्राह्मणच आहेत. त्यांचे पण दात पडून गेले आहेत.
<आपल्यापेक्षा जास्त सुंदर हुशार श्रीमंत सुधारलेला कोणी असल्यास त्याबद्दल द्वेष वाटणे हा स्था यीभाव आहे>
म्हणून आय्०आय्०टी० चा इथे सर्रास द्वेष चालतो असा निष्कर्ष काढायला वाव आहे.
7 Jun 2025 - 12:46 pm | सुबोध खरे
आय्०आय्०टी० चा इथे सर्रास द्वेष चालतो
हा हा हा
आपण इतर सर्वाना आपल्यापेक्षा कुरूप, ढ आणि गरीब समजताय यात केवळ आपला अहंगंड आणि आत्मकेंद्रितता दिसते आहे.
बाकी जगातील सर्व ज्ञान केवळ काही संस्थांची मक्तेदारी असते हा गैरसमज असणाऱ्या संस्थांमध्ये आय आय टी चा क्रमांक वर लागतो आणि हा अहंगंड असणाऱ्या माणसांचा हा इगो तेथे जाणीवपूर्वक पोसला जातो हे मी कित्येक वेळेस पाहिले आहे.
तेंव्हा तुमची स्वलालधन्यता चालू द्या
7 Jun 2025 - 12:49 pm | सुबोध खरे
आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत.
7 Jun 2025 - 12:56 pm | कर्नलतपस्वी
आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत.
हा हा हा....
भन्नाट.
7 Jun 2025 - 12:24 pm | कर्नलतपस्वी
डाॅ खरे यांच्याबरोबर सहमत.
ब्राम्हणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत. दे हॅव लॉस्ट देअर पोझिशन इन सोसायटी
कसले प्रश्न, कुठले प्रश्न?
कुठली पोझिशन?
आजही ब्राह्मण पुर्वी प्रमाणेच बदलत्या समाज रचनेनुसार सक्षम आहेत.
समाज रचना फक्त नावापुरतीच राहिलेली आहे. चातुर्वर्ण्य केव्हाच मोडीत निघालेत. कुलगुरू,उपाध्ये फक्त आडनावापुरतेच शिल्लक आहेत.
ब्राह्मणांनी आरक्षण फाट्यावर मारले आहे.शिक्षणाला प्राधान्य देवून आपला मार्ग सुकर केला आहे.
इतर समाज काय करतो यावर मला भाष्य करणे संयुक्तिक वाटत नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.
ब्राह्मण सुरवातीपासून जहालमतवादी, इंग्रजांनी त्यानां किनाऱ्यावर ठेवले. सावरकर, टिळक, चाफेकर, रानडे,राजगुरू ,मंगल पांडे आणी अनेक ब्राह्मण जहालमतवादी असल्याने त्यानां फाशी दिले किंवा तुरूंगात डांबले. मवाळ नेत्यांना इंग्रजानी कुरवाळले व मोठे केले.
संपुर्ण समाज व्यवस्था औद्योगिक क्रांतीनंतर बदलली. बलुतेदार संपले,गुरुकुल जाऊन शाळा आल्या. गावगाड्याचे रूप बदलले. शिक्षित समाज वाढल्याने व संतानी प्रचार केलेल्या भक्तीपंथाने यज्ञ,याग पुजा मर्यादित झाल्या पुढे त्याचे स्वरूप बदलले. पौरोहित्य व्यवसाय संपुष्टात आला किंवा नाममात्र राहीला. आजही ज्ञानेश्वर माऊली,एक ब्राह्मण, समाज बाधंणीत महत्वपूर्ण योगदान देत आहे.
भुतकाळात जे काही घडले त्याचे खापर वर्तमान पिढीवर फोडले. तथाकथित समाज सुधारकांनी ब्राह्मणद्वेषावर आपली पोळी भाजली व आजही भाजत आहेत.
तथाकथित सुधारक ब्राह्मण सुद्धा ब्राह्मण द्वेषाचे समर्थन करून त्यांनी आपला उल्लू सिधा केला/करत आहेत.
ब्राह्मणद्वेष संपुष्टात आणण्यास ब्राह्मण असमर्थ ठरले आहेत.
ब्राह्मण समाज इतर समाजाच्या तुलनेत , संख्याबळात नगण्य. इंग्रज आपली सत्ता वाढवण्यात इन्टरेस्टेड होते त्यांना जाती व्यवस्थेशी काही घेणेदेणे नव्हते. बरोबरच धर्मप्रसार हा ही एजंडा असल्याने त्यांच्या उदेश्यात ब्राह्मण मुख्य अडथळा होता. त्यांनी इतर समाजाला कुरवाळत ब्राह्मण द्वेषातून धर्मप्रचार केला असे माझे मत आहे. त्यात रेव्हरंड सारख्यांनी भर घातली.
संख्याबळाने कमी असलेले कितीही ओरडले तरी काही उपयोग नसतो. त्यांचा आवाज सहज दाबता येतो.
ब्राह्मणद्वेषावर लक्ष न देता ब्राह्मणांनी आपला मार्ग चोखाळला.
मुळात लेख पूर्वग्रह दूषित ,त्यामुळेच कितीही प्रयत्न केला तरी मत परिवर्तन होणे शक्यच नाही. तो माझा प्रयत्न नाही.
यातून ब्राह्मण काही बोध घेतील असे वाटत नाही.
यातून बोध घेण्यासारखे काहीच नाही.
सदर लेख हा ब्राह्मणांना डिमीन करण्याचा प्रयत्न आहे तो संपादकांनी उडवून टाकावा.
बादवे, लेखकाच्या नावावरून ते स्वता ब्राह्मण असावेत असे वाटते. त्यांनी ब्राह्मण द्वेषातून उत्पन्न झालेल्या परिस्थीतीवर कही काम केले आहे का? केले असल्यास जरूर लिंक देणे. सुचवलेले उपाय मी इतर ब्राह्मण मित्रांना सांगेन त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न करेन. कदाचित द्वेष कमी होईल. जरी झाला नाही तरी काही फरक पडणार नाही.
7 Jun 2025 - 2:48 pm | कॉमी
लेख पटला नाही.
मराठा जातीतल्या लोकांनी अमुक केलं आणि ब्राम्हण जातीने काहीही केले नाही ही सरसकट विधाने चुकीची आहेत.
परशुरामाला आयकॉन बनवले हे देखील काही "कार्यकर्ते "लोकांपूरते मर्यादित असते. इतर कोणी असले उद्योग करायच्या फंदात पडत नाही.
बाकी तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?
7 Jun 2025 - 3:31 pm | युयुत्सु
<मराठा जातीतल्या लोकांनी अमुक केलं आणि ब्राम्हण जातीने काहीही केले नाही ही सरसकट विधाने चुकीची आहेत.>
मुळात मी जे लिहीले आहे ते तुम्ही वाचत नसून तुम्ही तुम्हाला हवं ते (सोईनुसार) वाचत आहात. ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, असा मुद्दा आहे. "ब्राह्मणद्वेष" हा मुद्दा सध्या कळीचा आहे.
< तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?>
आर्थिक, बौद्धिक, भावनिक इ० गरजा पूर्ण होणे हे स्वस्थ नातेसंबंधांसाठी आवश्यक असते. जी कुटुंबे, समूह एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात ती घट्टपणे बांधलेली राहतात. त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघू शकत नाही.
9 Jun 2025 - 4:41 pm | स्वधर्म
जात कशी काम करते याचे उत्कृष्ट उदाहरणः
< तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?>
आर्थिक, बौद्धिक, भावनिक इ० गरजा पूर्ण होणे हे स्वस्थ नातेसंबंधांसाठी आवश्यक असते. जी कुटुंबे, समूह एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात ती घट्टपणे बांधलेली राहतात. त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघू शकत नाही.
टीपः हे फक्त ब्राम्हण याच जातीकडून होते असे नाही. भारतीय उपखंडातील प्रत्येकाच्या डी एन ए मध्ये ती भिनलेली आहे. ती जाणे खूप खूप कठीण आहे.
7 Jun 2025 - 6:42 pm | मारवा
1
ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता.
2
जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे.
आपणाला या दोन विधानातून नेमकं काय म्हणायचं आहे ? कृपया आपण थोडे विस्तारपूर्वक मांडले तर आपली भूमिका अचूक कळण्यास मदत होईल.
7 Jun 2025 - 8:44 pm | युयुत्सु
श्री० मारवा
प्रथम थयथयाट न करता नेमके प्रश्न विचारल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद!
खुलासा १ - तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे "शूद्र पूर्वी कोण होते?" हे पुस्तक जर वाचले, तर ब्राह्मण/ब्राह्मणेतर दरीचे *खरे आणि विश्वासार्ह* कारण समजायला मदत होते. मला बाबासाहेबांच्या विद्वतेबद्दल नितांत आदर आहे.
ब्राह्मणांनी शूद्राना "जानव्याचा अधिकार" नाकारून तसेच सोवळ्या/ओवळ्याद्वारे अपमानकारक वागणूक देऊन नाकारले, हे ढळढळीत सत्य आहे. तुम्ही आमच्यातले नाही, तसेच तुम्ही आमच्यात येऊ शकत नाही (तुम्ही ब्राह्मण होऊ शकत नाही) असा संदेश देऊन एक अभेद्य पण मानसिक आणि सामाजिक दरी निर्माण केली, जी आजही अस्तित्वात आहे. ब्राह्मणांच्या समाजमाध्यमातील वेगवेगळ्या समूहातून आजही अनेक कडवे वेडगळ कल्पनांचा पाठपुरावा करताना दिसतात.
खुलासा २ - जात म्हणजे काय या प्रश्नाचा मी शोध घेतला तेव्हा मला उमजलेली जात म्हणजे - भाषा, चालीरीती (उभ्या गौरी/खड्याच्या गौरी), वर्तन-व्यवहार (हिशेबीपणा, अघळ-पघळपणा), अस्मितेची प्रतिके (पूर्वजांचा पराक्रम), काही प्रमाणात आहार (उदा० ज्यात-त्यात साखर घालणे किंवा लसूण घालणे वगैरे) इ०च्या अजब मिश्रणाने तयार होणारे संकल्पनात्मक रसायन, जे वंशपरंपरागत चालू राहते! हे रसायन त्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीने, कुटुंबाने किंवा समूहाने जाणीवपूर्वक प्यायचे ठरवले तर जात्यंतर झाले असे मानायला मला तरी अडचण वाटत नाही.
त्यात जात फक्त वडिलांच्याकडून येते आणि आईकडून येऊ शकत नाही ही धारणा हास्यास्पद नाहीतर, स्त्रियांचा अपमान करणारी आहे! आजचे ब्राह्मण कितीही पुढारलेले दाखवत असले तरी अशा प्रश्नाना भिडायचे टाळतात.
आता माझ्या मूळ विधानाकडे येऊ - वेदांचा रक्षण करणारा जर ब्राह्मण असेल आणि एखाद्या ब्राह्मणेतर व्यक्तीने जर हे करण्याची उत्सूकता दाखवली तर त्याला ते करू देण्याचे औदार्य ब्राह्मणांनी दाखवायला हवे (त्याला जानवे बहाल करण्यात यावे). दक्षिणेत दलिताना पौरोहित्याचे अधिकार दिल्याचे काही माहितीपट बघून कळले. आज महाराष्ट्रात कदाचित एखाद्या पाठशाळेत एखाद्या दलिताला प्रवेश दिला असेलही तरी पण याला पुरेशी प्रतिष्ठा आणि सातत्य मिळवून देण्यात आले्ले नाही. यात समाजाने एकत्र येऊन (मराठ्यांसारखे) धोरण स्वीकारणे आवश्यक आहे.
गंमत म्हणजे आज माणसे देश, धर्म, दैवत, अन्न, भाषा, लिंग, आडनाव काहीही बदलू शकतात पण जात बदलू शकत नाहीत, ये बात हजम नही होती. मग वर उपस्थित झालेला प्रश्न सतावत राहतो - जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही?
मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केला आहे अशी आशा करतो...
8 Jun 2025 - 9:34 am | कर्नलतपस्वी
थयथयाट न करता नेमके प्रश्न
लेखकाने आपले मत मांडले,प्रतिसादकांनी त्यांचे मत मांडले. यात थयथयाट कुठे आला.
तुम करें तो रासलिला, हम करे तो थयथयाट.
कुछ भी......
7 Jun 2025 - 11:46 pm | कपिलमुनी
काहीही डेटा न देता असा लेख लिहावा याचे वाईट वाटले.
बाकी लेखात फक्त महाराष्ट्रातील ब्राह्मण विचारत घेतलेले दिसत आहेत.
9 Jun 2025 - 3:49 pm | शाम भागवत
एकदम 🎯"
माझे वैयक्तिक मत असे आहे.
जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. त्यामुळे जन्म कुठे झाला ते महत्वाचे नसून, जन्म झाल्यावर काय केले हे महत्वाचे.
पण ही व्याख्या फारच उच्च दर्जाची आहे असे मला वाटते. त्यामुळे मी माझ्यापुरती ही व्याख्या थोडीशी सैल केलीय. त्यानुसार ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले धेय्य आहे, असे जो मानतो तो ब्राह्मण होय.
या व्याख्येनुसार, ब्राह्मण असणे ही अभिमानाने मिरवायची गोष्ट वाटत नाही. त्याचा गर्व वगैरे असणे ही तर खूपच दूरची बात.
मला ती एक मोठी जबाबदारी वाटते. सर्व संत सज्जनांमधे ही जबाबदारीची जाणीव दिसून येते.
9 Jun 2025 - 4:47 pm | स्वधर्म
एक विशिष्ट जातीचा द्वेष का केला जात आहे असा आपला प्रश्न आहे.
ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि सगळे मात्र त्यांचा द्वेष करतात असे मानायला काय आधार आहे, हे स्पष्ट केले तर चर्चा करता येईल.
खरे तर सगळ्या जातीच एकमेकांचा द्वेष करत आल्यात.
जन्मावर आधारित आपआपला समूह बनवायचा आणि इतरांना 'परके' मानायला सुरूवात करायची याचेच नांव जात. त्याच्या व्याख्येतच इतरांचा द्वेष करणं येतं.
9 Jun 2025 - 5:35 pm | युयुत्सु
<ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि सगळे मात्र त्यांचा द्वेष करतात असे मानायला काय आधार आहे, हे स्पष्ट केले तर चर्चा करता येईल.>
नावं घेऊन उदा० दिली तर गहजब होईल पण ब्राह्मण पण इतरांचा द्वेष करतात आणि त्यापेक्षा इतरांबद्दल तुच्छता जास्त बाळगतात.
13 Jun 2025 - 10:41 am | विवेकपटाईत
भारतात सर्वात जास्त सुधारलेला जो समाज आहे तो ब्राम्हण आहे. महाराष्ट्रात ब्राम्हण द्वेष फक्त राजनीति पुरता आहे. सामान्य जनता ब्राह्मणांचा आदर करते. त्यांचे उदाहरण देते. आरक्षण नसल्याने जवळ पास सर्वच घराण्यात एक तरी अपत्य अमेरिकेत आहे.
बाकी ब्राह्मण विरोधक नेता ही त्यांच्या संस्थेत उच्चपदीय नौकरीसाठी ब्राह्मणांना प्राधान्य देतात. आज जर सैन्यात ही मराठी कमिशन प्राप्त अधिकारी पहाल तर अनुपात अनुसार ब्राह्मण सर्वात जास्त आहेत.
13 Jun 2025 - 11:09 am | युयुत्सु
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं तरी एक गोष्ट विसरता कामा नये की सध्याची राजनीति कधी नव्हे इतकी गलीच्छ आहे. अशा गलीच्छ राजनितीचे सामाजिक परिणाम दूरगामी असतात. माझा एक जुना हिंदुत्ववादी मित्र म्हणायचा की आर्य पूर्वी बाहेरून हिंदुस्थानात आले आणि आता हिंदुस्थानातून परत बाहेर चालले आहेत. प्रत्येक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते.
14 Jun 2025 - 9:54 am | विवेकपटाईत
आर्य शब्दांचा जाती समूहाशी काहीही घेणे देणे नाही. फक्त कोरी कल्पना आहे. बाबा साहेबांच्या मते जे लोक इथल्या नद्या पर्वत तलावांना तीर्थ मानतात ते इथलेच मूल निवासी.ब्राह्मण ते शूद्र इथलेच. मोहन जदोडो असो की ऋग्वेद ऋषभ हा पवित्र पशू आहे. बाहेरून जे धर्म आले त्यांचे भक्ति स्थळे आज ही वेटिकन किंवा मक्का आहे.
13 Jun 2025 - 11:10 am | युयुत्सु
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं तरी एक गोष्ट विसरता कामा नये की सध्याची राजनीति कधी नव्हे इतकी गलीच्छ आहे. अशा गलीच्छ राजनितीचे सामाजिक परिणाम दूरगामी असतात. माझा एक जुना हिंदुत्ववादी मित्र म्हणायचा की आर्य पूर्वी बाहेरून हिंदुस्थानात आले आणि आता हिंदुस्थानातून परत बाहेर चालले आहेत. प्रत्येक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते.
13 Jun 2025 - 11:13 am | युयुत्सु
प्रत्येक घरातील एक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते.
असे वाचावे
13 Jun 2025 - 2:43 pm | अप्पा जोगळेकर
लेखाचे शीर्षक आणि मजकूर अगदी मिळता जुळता आहे.
13 Jun 2025 - 3:55 pm | युयुत्सु
<लेखाचे शीर्षक आणि मजकूर अगदी मिळता जुळता आहे.>
आत्मविरोधी कुतूहल धरा...!
13 Jun 2025 - 3:15 pm | अभ्या..
हे नॉर्मल झाले आहे सध्या. कुठल्याच जातीला साधा बुध्दीजीवी, विचारवंत किंवा कलासंपन्न आयकॉन नको आहे. म्हणजे आयकॉन लढाऊ शस्त्रधारी पाहिजे, त्याच्यात आधीचे गुण कला, शास्त्र असले तर उत्तम पण मुख्य म्हन्जे शस्त्रधारी पाहिजे. हाता शिवलिंग घेतलेली शांत सोज्ज्वळ अहिल्यादेवी कालबाह्य झाली, आता घोड्यावर बसून तलवार घेतलेलल्या राजमाता अहिल्यादेवींचा बोलबाला आहे. सो रक्त ओघळणारा परशुधारी सिक्सपॅकायुक्त परशुराम आयकॉन बनावा ह्यात नवल नाही.
13 Jun 2025 - 3:57 pm | युयुत्सु
तुमच्या ब्लॉगवरच्या कथा आवडल्या! फकत टंकताना थोडी व्हाईट-स्पेस सोडली तर वाचन-सौख्य जास्त मिळेल.