लघुकथा
अलक 1
आजोबांपासून चालत आलेला गाण्याचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेतोय याबद्दल गायत्रीताईना समाधान होते. एवढंच नव्हे तर पंतांची मुलगी अशी ओळख संपून गायत्री दांडेकर अशी ओळख निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो याचा त्यांना अभिमानच होता. पण एक खंत मात्र होती. प्रेमाने ज्याच नाव त्यांनी गंधार ठेवलं होतं, दुर्दैवाने तो मुलगा मुका होता. आपला कलेचा वारसा इथेच संपला या जाणीवेने त्या अस्वस्थ होत. पण वयाच्या तिसर्या वर्षापासून गंधार आई रियाजाला बसली कि समोर बसायचा. खरं तर गायत्रीताईना ते आवडायचं नाही. पण आधीच व्यंग असलेल्या मुलाला आणखी काय बोलणार म्हणून सोडून द्यायच्या.
गंधार बारा वर्षाचा झाला. एकदा ताई कार्यक्रमाहून परतल्या नि दारातच थबकल्या. त्या रियाज करायच्या तीच गाणी पेटीवर सुंदररितीने वाजवत होतं. कोण आलंय हे बघण्यासाठी अधीरतेने आत गेल्या आणि थक्क झाल्या.
देवाने त्यांच्या गायनकलेचा वारसा गळ्यातून नसला तरी बोटातून पुढे चालू ठेवला होता.
गंधार तल्लीन होऊन सुरावट वाजवत होता.
--धनश्रीनिवास
अलक 2
किती महिने झाले त्याला भेटून. शेवटची कधी भेटले तेही आठवत नाही. जळ्ळा तो लाॅकडाऊन! कधी संपेल नि कधी एकदा त्या ठराविक ठिकाणी जातेय असं झालंय. अर्थात त्याला भेटायला असे अनेकजण आसुसलेले असतील, कल्पना आहे मला. तो तर कायम माणसांच्या गराड्यातच असतो. त्याच्यापाशी पोहोचायला नि नंबर लावायला क्वचित धक्काबुक्की पण केलेय मी . पण इलाजच नसतो. त्याच्या अवतीभवती स्पर्धा करायला किती जण असतात. पण जास्त पसंती यालाच. हल्ली फोन केल्यावर त्याच्या घराजवळ भेटतो म्हणे. कोण काय मागेल ते देतो. पण मी म्हणते स्थानमहात्म्य काही आहे कि नाही? तिथे जाण्यात जी मजा आहे ती घरी नाही.
आता बातम्या येतायत, लाॅकडाऊन उठणार, सगळं सुरू होणार. बासच. एकदा त्याची गाडी सुरु होऊ दे. पोटभर पाणीपुरी खाणार त्या भैय्याच्या हातची!
--धनश्रीनिवास
प्रतिक्रिया
13 Sep 2022 - 7:22 pm | मुक्त विहारि
छान लिहिल्या आहेत