एकदा अंगाला, (मेंदूला म्हणू या हवं तर) चिकटलेली 'मास्तरकी' जाता जात नाही याचा अनुभव आज आला.
आता काही वेळापूर्वी 'धमाल' बघत होतो आणि सिनेमा बघता बघता मला माझ्या क्षेत्रातला 'W' डोळ्यासमोर दिसायला लागला.
***
मुलगा किंवा मुलगी दहावी मस्त पर्सेंटेज मिळवून पास झाल्यावर शुभेच्छा द्यायला येणार्यांपैकी कोणीतरी ही 'W' ची फ्रेम भेट म्हणून देतो.
या 'W'चा अर्थ युपीएससी-एमपीएससी- आयआयटी-नीट-जेइइ -टोफेल जीआरइ -अशा क्रमाने जसा घ्याल तसा असतो.
पण टार्गेट 'W' नसते. टार्गेट असते 'W' च्या खाली असलेले १० कोटी!!
त्यानंतर धमाल' चित्रपटात दाखवली तशी पुढची दोन वर्षं घरातल्या सगळ्यांची म्हणजे कबीर-आदी-बोमन -मानव-बाबुभाई यांची 'W' गाठण्यासाठी धावपळ सुरु होते !
*****
'W' गाठण्याची पहिली धावपळ एकदम बेष्ट क्लास शोधण्यापासून होते. आता या क्लासवाल्यांची एक गम्मत असते . दरवर्षी बोर्डात किंवा जेइइ मेन्सच्या यादीत येणारे पहिले दहा चेहेरे 'आमचेच' असा त्यांचा दावा असतो. याच वर्षीचे उदाहरण बघा.
ज्या दिवशी रात्री जेइइचा निकाल जाहीर झाला त्या रात्रीची गोष्ट ! एक नंबरचा म्हणजे (AIR-1) विद्यार्थी राजस्थानच्या एका क्लासचा विद्यार्थी असल्याचं त्या रात्री कळलं .
१२ तासांनी म्हणजे सकाळ्च्या पेपरमध्ये वाचलं की तो दिल्लीच्या एका क्लासचा विद्यार्थी आहे.
दुसर्या दिवशी सकाळपर्यंत "तो आमचाच आहे" अशी घोषणा आणखी चार कोचींग क्लासवाल्यांनी केली होती.
*****
पण हे सगळं क्लासवाल्यांना माफ आहे कारण ते धंदा करतात. त्यांच्याकडे काम करणारे शिक्षक आणि इतर कर्मचार्यांची फौज सांभाळण्यासाठी त्यांना सांभाळण्यासाठी हे 'हार्वेस्टींग' करावंच लागतं. नाहीतर त्यांचा गल्ला भरणार कसा ?
तर मग चांगला क्लास कोणता हे समजायचं तरी कसं ?
म्युच्युअल फंडाची कोणती स्कीम बेष्ट आहे हे शोधण्याइतकंच चांगला क्लास शोधणं कठीण असतं. जाहिराती आणि रँकरची लिस्ट बघून-वाचून क्लासची निवड करणं म्हणजे पॅकींग बघून माल घेण्यासारखं आहे. 'उत्तम क्लासची लक्षणं ' हा एक लांबलचक मोठ्या व्याप्तीचा विषय आहे. तो समजून घेण्यासाठी सध्याच्या बोर्डाच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांचा संबंध शोधून बघू या !
*****
ज्युनीअर कॉलेजं बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवतात पण स्पर्धा परीक्षांचा सराव करून घेत नाहीत. क्लासवाल्यांचा गल्ला स्पर्धा परीक्षांवर अवलंबून असतो म्हणून ते स्पर्धा परीक्षांकडे लक्ष ठेवून स्वतःचा पॅटर्न बनवतात. घरातल्या एका मुलाला उच्च शिक्षण मिळालं की त्या कुटुंबाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावतो.या अपेक्षेतून ते क्लासकडे धाव घेतात. ही अपेक्षा व्यावहारिक आणि स्वाभाविक असते. पण गेल्या काही वर्षात स्पर्धा वाढली आहे.स्पर्धा परीक्षांची तयारी कॉलेज करून घेत नाही म्हणून तयारी करून घेणारी समांतर व्यवस्था म्हणजे कोचींग क्लास गेल्या १० वर्षात फोफावत गेले. आता या कोचींग क्लासचं अस्तित्व 'टॉपर'च्या लिस्टवर अवलंबून असतं. त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम आणि शिकवण्याची पद्धत ही 'टॉपर' पैदा करण्यासाठी तयार केलेली असते . परिणामी ३०० पैकी जेमतेम १० विद्यार्थ्यांना झेपणार्या ह्या पद्धतीत २९० भरडले जातात. हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो.
***
काही क्लासवाल्यांनी तर त्यांच्या क्लासचं 'स्टड-फार्म'मध्ये रुपांतर केलं आहे . स्टड-फार्म म्हणजे फक्त आणि फक्त रेस जिंकण्यार्या घोड्यांची पैदास करणं. काही घोडे रेस जिंकतात तर काही डर्बी पण जिंकतात. पण काही घोडे रेसमध्ये धावतात पण रेस जिंकत नाहीत त्यांचं पुढे काय होतं ? त्यांची दखल या शिक्षणपध्दतीत घेतली जात नाही. याचा अर्थ त्यांचे करियर संपले असा होत नाही हे खरे आहे पण म्हणूनच एखादा क्लास निवडताना तो 'स्टड-फार्म' तर नाही ना याची खात्री करुण घ्या असं मी पालकांना सांगत असतो.
****
आता पुढे काय तर दोन वर्षं त्या 'W' चा पाठलाग आणि शेवटी ही धावपळ केल्यावरही'W' तर राहूच द्या , 'यवतमाळ' कुठे आहे या प्रश्नाचं उत्तरही कोणालाच सापडत नाही.
प्रतिक्रिया
17 Dec 2020 - 6:31 pm | कंजूस
पाहिला आहे.
18 Dec 2020 - 11:52 am | राजाभाउ
मस्त !!! सर पण खरच क्लासची निवड कशी करावी या बद्दल डिटेल मध्ये लिहा सर.
18 Dec 2020 - 8:18 pm | तुषार काळभोर
खरं तर आजकाल यवतमाळ कुठे आहे असा प्रश्नच मुळात कुणाला पडत नाही!
19 Dec 2020 - 10:15 pm | आंद्रे वडापाव
अर्धं यवतमाळ पुण्यात शिफ्ट झाल्यानें,
खरं तर आजकाल यवतमाळ कुठे आहे असा प्रश्नच मुळात कुणाला पडत नाही!