काही महिन्यांपूर्वी आमच्या एका मित्राने दहावीच्या मुलांसाठी करियर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली. मित्राने माध्यमांशी संपर्क साधला आणि सांगितले की आपण येऊन आमचा कार्यक्रम कव्हर करा. पण टीव्हीवाल्यांनी त्याबाबत उत्साह दाखवला नाही. त्यांचे म्हणणे, अशा कार्यक्रमांमधे कुठलाही व्हिज्युअल कंटेंट मिळत नाही. म्हणजेच कॅमेराने टिपावे अशी कुठली गोष्ट सापडत नाही. दुसरा अर्थ कॅमेरा जे टिपेल तेवढेच आम्ही बातमी म्हणून दाखवतो. कार्यक्रमामधे बसून तो समजावून घेऊन, त्याची बातमी लिहीणे जमत नाही.
दुसरे उदाहरण,
पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. तीन वक्त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे झाली. आधी सांगूनही कुणी बातमीदार आला नाही. कार्यक्रम संपता संपता एक वार्ताहर मुलगी तिथे आली. कार्यक्रम संपल्यानंतर येऊन काय उपयोग होणार होता ?
ashutoshjog@yahoo.com
मग आयोजकांपैकी एकाने कोरा कागद घेतला, कार्यक्रमाची टिपणे लिहून काढली आणि ती त्या मुलीच्या हातावर ठेवली.
यामधे त्या मुलीने एका पोस्टमनच्या पलीकडे कुठली भूमिका बजावली ?
परवा एका मराठी चॅनलवर प्रकाश आंबेडकरांची मुलाखत झाली. त्यामधे २०१९ची निवडणूक, नवी समीकरणे, प्रकाशरावांची पुढची वाटचाल याबद्दल जाणून घेता येइल असे वाटले होते पण त्याऐवजी ५ वर्षांपूर्वी अकबरुद्दीन ओवेसी "१५ मिनिटे पोलिस बाजूला घ्या * * * " असे म्हणाला, हीच कॅसेट ऐकायला मिळत होती. अगदी सेम तेच प्रश्न यापूर्वी असदुद्दीन ओवेसी त्या च्यानलवर आले होते तेव्हाही विचारले गेले होते. चॅनलवाल्यांचा अभ्यास अजूनही पुढे गेलेला नव्हता.
काही काळापूर्वी दोन पक्षांचे अध्यक्ष एका व्यासपीठावर आले. एकाने दुसऱ्याची मुलाखत घेतली. लोकांनी प्रचंड गर्दी केली. समोर व्यासपीठावर दोघेजण एकत्र बसलेले दिसत असताना आमचे पत्रकार सांगत होते की हे दोघे आता राजकारणात एकत्र येणार. वा रे भविष्यवेत्ते !
मुलाखतीच्या आधी जर तुम्हाला बातमीचा वास लागला असता आणि तुम्ही ती बातमी फोडली असती तर पत्रकारितेमधले तुमचे कौशल्य मानले असते. एखादी गोष्ट जेव्हा जगासमोर आल्यानंतर तीच गोष्ट जगाला पुन्हा सांगणे याला बातमी म्हणत नाहीत त्याला वरातीमागून घोडे असे म्हणतात.
आजकाल टीव्हीवर चर्चा सुद्धा कोण काय बोललं यावर घेतल्या जातात. एखाद्याने खून केला यापेक्षा खून करणार अशी वल्गना केली तर चॅनलवाल्यांना ते आवडते. कृतीपेक्षा उक्ती महत्त्वाची ठरते.
कारण एखादा माणूस जेव्हा स्वतःच्या तोंडाने एखादे स्टेटमेंट करतो तेव्हा ते लिहून त्याला शब्दरूप देणे आणि त्याची बातमी करणे सोपे असते. पण त्याच माणसाच्या कृतीबद्दल बातमी द्यायची तर त्याच्यासाठी स्वतःचे डोके वापरून स्वतःचे शब्द लिहावे लागतात पण तिथेच तर सध्या दुष्काळ आहे.
खरं तर पत्रकारांनी समाजाचे कान आणि डोळे होण्याची अपेक्षा असते. समाजाला जे आज दिसत नाही त्या भविष्यातल्या गोष्टी पत्रकारांना दिसायला हव्यात. काल घडलेल्या घटना कॅमेरा जशाच्या तशा आपल्याला दाखवतो पण पत्रकारांनी सर्वसामान्यांना न दिसणारे त्या घटनेचे पैलू ध्यानात आणून द्यावेत. पण तसं होताना दिसत नाही.
काही लोकांचे बाकी काहीही जमत नाही म्हणून निरुपायाने पत्रकारितेमधे भरती होणे हे चिंताजनक आहे.
(शीर्षकामधे म्हटल्याप्रमाणे हा धागा सध्याच्या पत्रकारीतेबद्दल आहे. दहावी मार्गदर्शन, प्रकाश आंबेडकर, ओवेसी या गोष्टी उदाहरण म्हणून घेतलेल्या आहेत. त्यामुळे मूख्य मुद्दा पत्रकारीता हा आहे हे ध्यानात घ्यावे. बाकी आपण स्वतंत्र आहात)
ashutoshjog@yahoo.com
प्रतिक्रिया
16 Oct 2018 - 5:33 pm | गामा पैलवान
आशु जोग,
आजच्या पत्रकारितेस पत्रकारिता म्हणावं का असा प्रश्न पडतो. भाऊ तोरसेकरांच्या शब्दांत सांगायचं झालं तर गळ्यात मालकाचा पट्टा आणि कुणावरही भुंकण्याचं स्वातंत्र्य अशी आजची स्थिती आहे.
माझ्या मते हिला कुत्रंकारिता म्हणायला पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
18 Oct 2018 - 3:00 pm | आशु जोग
अगदी सहमत आहे. अभ्यास नसलेले लोक आहेत सध्या
16 Oct 2018 - 5:40 pm | चित्रगुप्त
अगदी चपखल उपमा.
16 Oct 2018 - 7:46 pm | नाखु
आणि तिकडे ढिंगटाग वाचताना नेमके काय वाटायचे ते आजही याच प्रतिसादात समजले.
अतिसामान्य अज्ञ मूढ अडाणी पक्षीय शिक्कामोर्तब झालेला नाखु
17 Oct 2018 - 3:30 pm | आशु जोग
म्हणजे ?
18 Oct 2018 - 3:18 pm | नाखु
ढिंगटांग हे सदर वाचलंय का आणि इथं ठराविक मिपाकरांनी लै नावाजलेली चावडी वाचली नाही खालिल व्यंगचित्र अगदी समर्पक बसेल असा प्रकार होता तो.
ब्रिटिश नंदी कधीच मालकांवर टिका टिप्पणी करीत नाहीत अगदी तसेच,सतत कमळाबाई आणि राज उद्धव यांच्यावर लेखणीतून फुत्कार , बाकी वेळी शेपूट घालून थेट गाडीखाली जाऊन बसायचं.
रोखठोक वाचक नाखु मिपाकर बिनसुपारीवाला
17 Oct 2018 - 11:04 am | उगा काहितरीच
सहमत!
18 Oct 2018 - 6:14 am | Yesnee
विषय काय आहे हे लक्षात न घेता बोलत सुटण
18 Oct 2018 - 3:02 pm | आशु जोग
हे तर अगदी खरं
काहीही माहिती नसते. अज्ञानातून येणारा उद्धटपणा अनेकदा दिसून येतो.
18 Oct 2018 - 12:27 pm | गामा पैलवान
कुत्रंकारिता म्हणजे काय हे या अर्कचित्रातनं कळून यावं :
-गा.पै.
18 Oct 2018 - 1:44 pm | टर्मीनेटर
चपखल व्यंगचित्र.
18 Oct 2018 - 4:28 pm | मुक्त विहारि
आवडला...
आणि पटला...
25 Oct 2018 - 10:20 pm | आशु जोग
सध्या च्यानलवरच्या पत्रकारांना स्वतःला काहीच माहीत नसते. तुमच्याबद्दल अमकं अस्स म्हणाले आणि तमके तस्सं म्हणाले वगैरे प्रश्न हे लोक विचारतात. आता खालील विडीयो पहा.
मुख्यमंत्री फडणवीसांना मुलाखतकार बाईने विचारले, "तुमच्याबद्दल शरद पवार अस्स म्हणाले"
मग विचारले, "सेना तस्सं म्हणाली ?"
ही एक प्रकारची चुगलीगिरीच झाली. बेसावध माणूस त्यात अडकत जातो. ते काय म्हणाले ते तुम्ही त्यांनाच विचारा असं खमक्या माणसाने म्हणायला हवे. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नये.
पण
आज खेदाने सांगावेसे वाटते. मुख्यमंत्रीही बालवाडी पत्रकारांच्या प्रश्नांना बळी पडले. पत्रकारांनी ज्यांचे ज्यांचे नाव घेतले त्यांना त्यांनी नावे ठेवली.
ही मुलाखत पहा