आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे - सत्यमेव जयते. या ब्रीदवाक्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा अवमान मला सोसवत नाही हे प्रथम नोंदवतो. आजपावेतो लोकांनी माझ्या विधानाचा असा अर्थ घ्यावा, तसा घेऊ नये असं डिस्क्लेमर मी कधी टाकलं नाही, पण इथे विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन लेखातील चिकित्सेचा अर्थ राष्ट्रद्रोह इ इ नाही असे पुन्हा नमूद करतो.
==============================================================
सत्यमेव जयते चं शब्दशः भाषांतर "सत्यच जिंकते" असे आहे. सत्यम् = सत्य, एव = च जयते = जिंकते. च वर जोर. आपण जर या ब्रह्मांडाकडे (विश्व वा यूनिवर्स या शब्दांत भारतीय भावजगतातल्या अनेक संकल्पना नसतात म्हणून ब्रह्मांड) पाहिले तर जाणिव असलेले मानव ही स्पेसिस वा तत्सम इतर सजीव वा इतर काहीही आणि ब्रह्मांडातल्या कोठल्याही जागेतले तत्सम "प्रकार" सोडले तर, म्हणजे त्यांना ब्रह्मांडातून वगळले तर, असत्य नावाचा प्रकार कुठे उरत नाही. उरायला स्कोपच नाही. सगळं असत्य या सजीवांच्या विचारांत, मनांत, मेंदूंत, आणि कंच्या, इ इ आढळून येईल. याच्याबाहेर सांडलेलं असेल कोरडंफटक, रख्ख, मृत, नियमबद्ध वा कसं, अस्ताव्यस्त, अनिरीक्षित वास्तव विश्व. हे वास्तव म्हणजेच सत्य. हे जिंकते म्हणजे काय? कोणाशी त्याची लढाई चालू असते? कोणाशीही नाही! मग सत्यमेव जयते कशाला म्हणायचे? सत्यमेव वसते म्हणा किंवा सत्यमेव अस्ते म्हणा किंवा मराठीत सत्यच असते असे म्हणा!!!
आता हे गडबड गोंधळ करणारे सजीव सिच्यूएशन मधे घेऊन पाहू. त्यांच्या मनांत, मेंदूत अनंत सत्य, असत्य संकल्पना आहेत. परंतु सत्य संकल्पनांची नेहमी एक युद्धशील खुमखुमी आढळते. त्यांना असत्याचं पृथ्वीतलावरचं, ब्रह्मांडातलं नामोनिशान मिटवून टाकायचं असतं. या खुमखुमीतच सत्यमेव जयते चा जन्म होतो. मानवाने सत्याला अवाजवी महत्त्व देऊन ठेवलं आहे. सत्य हे साध्य तर नाहीच, पण मार्ग देखील नाही. ते फक्त एक टूल,परिमाण आहे आपल्या मानवजातीच्या उद्दिष्टांच्या पूर्तींतल्या मार्गांमधलं. म्हणजे विधान सत्य नसेल तर नीट वापरता येत नाही, मग त्या विधानाचा काय उपयोग असं काहीसं सत्याचं स्थान आहे. म्हणून ती एक आवश्यक बाब आहे, किचनमधे मीठ असल्यासारखं. तसं पाहिलं तर जीवनात गंतव्य सत्य "एवढंच" नाही, जायचा तो मार्ग सत्य "एवढाच" नाही. मार्गात वाटेल तेवढ्या असत्याच्या कुबड्या चालाव्यात. एक उदाहरण देतो. एका माणसाला मोठा उद्योग प्रस्थापित करून धनसंचय करायचा आहे आणि समाजासाठी रोजगार उत्पन्न करायचा आहे. हा एक सद्दुदेश मानू यात. मात्र या प्रक्रियेत त्याला कितीतरी प्रकारचा अनावश्यक सरकारी कंप्लायन्स करावा लागतो. सत्य असं आहे कि त्या व्यक्तिसाठी कंप्लायन्स अनावश्यक आहे. पण अन्य लोक गैरफायदा घेतात म्हणून तशी कायदेशीर तरतूद करणं देखील सरकारला आवश्यक आहे. या एकाच माणसाला सहुलियत दिली तर अन्य लोकांच्या मनातील संशय आणि त्यांच्या निराकरणाची आवश्यकता देखील सत्य आहे. अशी अनेक सत्यं या उद्दीष्टात, त्याच्या मार्गात कामाला येतात. पण आपण अशी अनेक चांगली कंप्लायन्स मॉनिटरींग अनावश्यक असलेली माणसं दुर्लक्षून काटेकोर कंप्लायन्सचे कायदे बनवले आहेत. इथे वेगवेगळ्या लोकांचं सत्य काय काय आहे, ते कसं कसं जाणायचं, कुठे कुठे मांडायचं आणि निर्दोषांना त्रास कसा होणार नाही हे कसं ठरवायचं याचं पूर्ण फ्रेमवर्क बनवायचं आणि सत्याचं अचूक पालन करायचं असंभव आहे. असलं फ्रेमवर्क लोकमान्य नसेल हे वेगळं आलंच. म्हणून सगळेच खोटारडे असू शकतात असा सर्वजनपतनन्याय लावायचा!
सत्याविना जग चालतं. आणि व्यवस्थित चालतं. तुमच्या मनातलं सगळं, सगळं सगळं, सग्गळ्ळं कधी सांगीतलंय कोणाला? चार सत्य फक्त आपल्यालाच माहित असतात. कोणतं सत्य कोणासाठी आणि दुसरं कोणतं सत्य कोणासाठी याचे हिशेब असतात. तरीही "मोकळी नाती" जुडतात, "मोकळ्या मैत्र्या" होतात. मग सत्याचा अट्टाहास का? कि चारचौघांना अलाईन होणारी ऑफिशियल पोझिशन म्हणून उगाच? माणसाचं स्वतःचं असं एक असत्य जग असतं. त्यात तो बर्याच गोष्टींत मुद्दाम असत्यपणे वागत असतो. हे अचाट आहे पण कधीकधी स्वतःशीही बराच खोटारडेपणा चालू असतो. आणि अज्ञान हा तर असत्यांचा महासागर. या महासागरात वाट हरवलेली लोकं देखील सुखेनैव संसार करत असतात. बरीच सत्यं भीषण असतात आणि लपून असतात. ती तशी लपून नसली तर कल्लोळ होइल. मग सत्याचा अट्टाहास का?
विश्वाचं, पृथ्वीचं, मानवजातीचं सत्य काय आहे हे कोणालाही माहित नाही. आपण का आहोत, आपण कुठे जात आहोत, कसे जावे इ इ प्रश्न अनुत्तरीत आहेत. सत्यवादी लोकांना विश्वाचं संपूर्ण ज्ञान हवं आहे. (कल्याणवाद्यांना ब्रह्मांडाचं कल्याण हवं आहे.). सध्याला हे ज्ञान घेण्याकरिता खूप श्रम घेतले जात आहेत, खूप पैसे ओतले जात आहेत. त्यात मानवाच्या कल्याणकारणाकडे दुर्लक्ष होत आहे. मंगलयान मंगळावर जातं आणि तिथेच शेजारी ओरिसातल्या आदिवास्यांना शेजारचं, भरून वाहणारं पाणी मिळत नाही. सत्यवाद्यांचा असा दावा आहे असा होणारा खर्च ही एक उद्याची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूकीची जाहिरात बरेच दिवसापासून चालू आहे आणि त्याचा परिणाम काय आहे तर अजून गुंतवणूकीची मागणी. समजात दोन वर्ग आहेत. या सत्यवाद्यांच्या जवळचा आणि लाभार्थी. खूप पावरफूल. सत्ताधारी. दुसरा आहे कल्याणवाद्यांचा. निर्बल. दुर्लक्षित. आपलं सरकार देखील तोंडदेखलं कल्याणवादी आहे. त्याची जास्तीत जास्त संसाधनं सत्यवाद्यांच्या सेवेतच जातात.
सत्यवाद्यांनी नवे फॉर्म्यूले बसवले आहेत. कायद्यांचे. म्हणून कायदा हेच सत्य झाले आहे. कल्याण करायचं काम कायद्याचं आहे तर आपण मधे का पडा अशी वृत्ती निर्माण झालेली आहे. कायदे एकतर जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करत नाहीत. तिथे सत्य काय ते प्रत्येकजण आपापला रँडमली ठरवत आहे आणि समाजात दुह्या, दुफळ्या निर्माण होत आगे. दुसरं म्हणजे कायदे जिथे स्पर्श करतात तिथे ते नीट राबवले जात नाहीत. प्रशासन असो वा लोक असो वा सरकार असो वा माध्यमे असो - कायदा कसा कमीत कमी पाळायचा याच्याच पळवाटा शोधत असतात. म्हणून कल्याणवाद्यांना फ्रस्टेशन आलं आहे. कायदा हा त्याच्या स्पिरिटनुसार पाळला पाहिजे पण सांगतो कोण?
आता कायद्याच्या बाजूनं विज्ञान आहे. कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करायची विज्ञानानं चिक्कार शस्त्रास्त्रांची निर्मिती करू ठेवली आहे. म्हणून आहे ती व्यवस्था कल्याणकारी आहे असं समजून चालायचं आणि कायद्यात बदल करायचे. पण कायद्यात बदल संसदेत निवडून दिलेले लोक करतात; लोक थेट करत नाहीत. म्हणजे लोक विषयवार मतदान करत नाहीत, उमेदवारवार मतदान करतात. आणि प्रत्येक विषयात उमेदवारांत आणि लोकांत दुमतं असतात. हे सगळं सत्य मानायचं आणि चालायचं. या आणि सामाजिक गदारोळातल्या प्रत्येक विधानावर सांगोपांग चर्चा करायची, चिकित्सा करायची जे होत आहे ते कल्याणच होत आहे असं सत्य मानायचं. हा बराच विचित्र प्रकार आहे.
सत्याचं अजून एक प्रकरण आहे, ते म्हणजे सत्य ढोबळ असू शकत नाहीत. खणखणीत पुरावा आणि वाटरटाईट वाक्यरचना पाहिजे. मी जर म्हणालो कि मी थकलोय नि ते सत्य असेल तर आणि दुसर्याला तसे मानायचे नसेल तर मला मी थकलो असल्याचे त्याला पटतील असे पुरावे गोळा करावे लागतील. हे कठीण आणि अशक्य कर्म आहे. समोरचा दुराग्रही असेल तर अजूनच कठीण. मग मोजमापं आली. प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवणं आलं. त्यातून बनणारी गणितीय मानसिकता - आयुष्य म्हणजे गणित- आली.
जीवनाकडे पाहण्याचा, जीवन जगण्याचा दृष्टीकोन वैज्ञानिक बैज्ञानिक नसतो. नसावा. तो मूलतः कल्याणवादी हवा. माझं तुझं, सर्वाचं भलं होऊ दे, मग सत्य काही का असेना. उद्या जर सत्य असं निघालं कि सजीव सगळे निसर्गनियमांच्या कळसूत्री बाहुल्या आहेत (काहींना ते आजच वाटतं) त्या सत्याला पोचल्यानंतर काय? मृत बाहुल्यांचं काय करतात? इथे कोणीतरी कर्ता लागतो म्हणून मृत बाहुल्यांचं काय करतात ऐवजी काय होतं असं म्हणा. राहतात त्या पडून. ते निरर्थक पडून राहणं म्हणजे जीवन का? या असल्या अंतिम सत्यावर पोचल्यावर कसला जीवनविषयक दृष्टीकोन असणार आहे? आणि का म्हणे मानवी जीवनाचं सातत्य अबाधित राहावं आणि का म्हणे मंगळावर वस्ती कराणे?
सध्याला सत्य आणि कल्याण या संकल्पनांचं द्वंद्व चालू आहे. ट्रूथ वर्सेस बेनेव्होलेन्स!! बख्खळ सारी गृहितकं केली तर समाजात विवाद सत्यवादी नास्तिक आणि कल्याणवादी अस्तिक असा संघर्ष काही काळाने दिसून येईल असं मला वाटतं. सत्यवादी लोकांना पुरावा हवा असतो. पण पुराव्याला देखील त्याचा स्वतःचा पुरावा हवाच ना? मग ही साखळी कुठेच संपत नाही. शेवटी काहीतरी मानावं लागतं. निसर्ग वा वैश्विक अस्तित्व हे असम्यक आहे, त्यात ईश्वर नाही, ईश्वरीयता नाही, त्याचा कोणी कर्ता नाही, त्याचे काही उद्दीष्ट नाही, चांगुलपण आणि वाईटपण समानच आहे, आपण भौतिकशास्त्राच्या नियमांनी बद्ध आहोत, सगळ्या क्रिया, प्रक्रिया, भाव, भावना, मूल्ये ही भौतिकशास्त्रातल्या कणांच्या रिअॅक्शनचा परिपाक आहेत अशी विचारसरणी बळावत चालली. त्यात आपलं इतरांशी सदवर्तनाचं दायित्व प्रश्नांकित होण्याचा संभव आहे. "मी लोकांच्या कल्याणाची चिंता का करू?", "लोकांच्या कल्याणात माझं देणं घेणं काय?", "चांगलं आणि वाईट यापैकी चांगलं निवडावं असा शोध कधी लागला आहे??, "आपण मृत तर नाहीत ना?", "हे जग नाहीच असे नाही ना?", "कुटुंब, नाती, देश, धर्म , इ इ मूर्ख लोकांनी पुरातन काळात बनवलेली अनावश्यक ठिगळं आहेत.", "मानवाला बुद्धी गेल्या १०० वर्षांत आलीय आणि त्यामागचा सगळा काही अंधार होता (म्हणजे आता माझ्यासारखे चार आहेत म्हणून सिच्यूएशन कंट्रोल मधे आहे.) म्हणून तिथलं सरसकट सगळं भलंबुरं न पाहता टाकावं" इ इ विचार करणारी मंडळी फोफावली आहेत.
मानवकल्याणाचा विचार हा शेवटी सामान्य माणसानंच करायचा असतो नि त्यात सत्याचा विजय होईपर्यंत ताटकळत बसायची गरज नाही.
प्रतिक्रिया
14 Apr 2017 - 8:26 pm | संजय क्षीरसागर
पण लिहीतोच :
सत्य म्हणजे जनसामन्यांच्या मनात असलेलं
ट्रूथ
नाही आणि त्याच अर्थानं ते भारतीय ब्रीदवाक्य झालंय, त्यामुळे सगळा घोळ आहे.सत्य म्हणजे
अॅबसल्यूट !
त्याचं यथार्थ वर्णन कृष्णानं असं केलंय :नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२३।।
थोडक्यात, सत्य ही स्थिती आहे. ते बरोबर-चूक असं मानसिक द्वंद्व नाही. ते एकमेव आहे म्हणून तिथे पराजयाचा प्रश्नच नाही.
14 Apr 2017 - 8:30 pm | arunjoshi123
आरामात लिहा ना सर.
=================================
मला तुमचा प्रतिसाद १००% मान्य आहे. पण अबसॉल्यूट सत्य तेही जीवनातल्या प्रत्येक बाबीत शोधायला वेळ कुणाला आहे?
14 Apr 2017 - 8:48 pm | संजय क्षीरसागर
पण अबसॉल्यूट सत्य तेही जीवनातल्या प्रत्येक बाबीत शोधायला वेळ कुणाला आहे?
नाही हो, त्या अब्सल्यूटनंच सगळं अस्तित्व बनलंय ! ते शोधायचं नाहीये, ते आपण स्वतःच आहोत. जय-पराजय मानसिक आहे, आपल्याला काहीही होत नाही, आपण कायम विजयी आहोत, असा त्या विधानाचा अर्थ आहे. आणि शस्त्र, अग्नी, पाणी, वारा देहाला नष्ट करु शकतील पण सत्याला नाही असा तो अध्यात्मिक उद्घोष आहे.
ते विधान योग्य-अयोग्य किंवा बरोबर असेल त्याची कायम सरशी होईल या अर्थाचं नाहीये. द वेरी काँटेक्स्ट इज मिस्ड.
16 Apr 2017 - 2:50 pm | arunjoshi123
अतिशय सुंदर विवेचन.
मात्र माझा लेख सत्य आणि कल्याण या जनरल संकल्पनांबद्दल आहे. जनरली म्हणाल तर सत्य असते, विजय पावत नसते, लढत देखील नसते.
16 Apr 2017 - 2:54 pm | arunjoshi123
हे विधान, किंवा जिंकते ते सत्य असा चित्रगुप्ती पावित्रा हे या लेखाचे विषय नाही. मी स्वतः सत्यमेव न जयते असं टायटल देऊन चूक केली आहे. ते सत्य आणि कल्याण असं असायला पाहिजे होतं.
16 Apr 2017 - 4:59 pm | arunjoshi123
सहमत.
16 Apr 2017 - 5:01 pm | arunjoshi123
पुन्हा एकदा, लेखाचा आणि ब्रीदवाक्याचा तसा काडीमात्र संबंध नाही. एक ओपनिंग डायलॉग म्हणून वापरला.
16 Apr 2017 - 5:55 pm | संजय क्षीरसागर
लेखाचा आणि ब्रीदवाक्याचा तसा काडीमात्र संबंध नाही.
असं असेल, तर माझा या पोस्टमधला इंटरेस्ट संपलायं.
16 Apr 2017 - 7:09 pm | arunjoshi123
मला तुमच्या कडून भारतीय ब्रीदवाक्य, त्यातलं सत्याला प्राधान्य यावर ऐकायला आवडेल. (अहो, लेख जर ब्रीदवाक्यावर असता तर मी न जयते असं म्हटलं असतं का?)
भारताचं ब्रीदवाक्य कल्याणमस्तु असं असतं तर मला अधिक बरं वाटलं असतं.
16 Apr 2017 - 8:15 pm | संजय क्षीरसागर
सत्याचा बोध कल्याणकारीच आहे.
सत्यमेव जयते
म्हणजे ज्याला सत्याचा उलगडा झाला त्याला जीवनातले प्रसंगच काय, मृत्यू सुद्धा पराभूत करु शकत नाही. हा त्या विधानाचा अर्थ आहे.तुमचा लॉजिकचा धागा वैचारिक द्वंद्वावर आणि हा धागा नैतिक द्वंद्वावर आहे.
१) माझ्या दृष्टीनं जे वैचारिक निर्द्वंद्वता आणतं ते लॉजिक . म्हणून मी तिथे म्हटलं होतं `सांप्रत क्षणी जे मनाला निष्प्रश्न करतं किंवा निरुत्तर करतं ते लॉजिक'
उदा.
देव ही मानवी कल्पना आहे
हे विधान देवाच्या सर्वच्या सर्व विचारांना एका क्षणात खालसा करतं. आणि त्या विधानाचा प्रतिवाद होऊ शकत नाही म्हणून ते कमालीचं उपयोगी लॉजिक आहे. ज्याला ते लॉजिक मान्य होईल त्याच्या जीवनात कर्मकांड, पूजा-अर्चा, धार्मिक पर्यटन, पदयात्रा, देवाची भीती, तदनुषंगिक खर्च, वेळ आणि स्वतःची उर्जा वाचेल.२) नैतिकता हा व्यक्तिगत संस्कारांचा भाग आहे. उदा. `भ्रष्टाचार न करणं ' ही व्यक्तिगत नैतिकता आहे. याचा अर्थ तसं वागणारा कायम कल्याणात राहील आणि त्याच्या जीवनात कोणताही बिकट प्रसंग येणार नाही असं नाही. त्याचं मन त्याला कधीही शरमिंदं करणार नाही आणि तो कायम स्थिर राहील इतकंच.
14 Apr 2017 - 8:53 pm | संजय क्षीरसागर
पण अबसॉल्यूट सत्य तेही जीवनातल्या प्रत्येक बाबीत शोधायला वेळ कुणाला आहे?
नाही हो, त्या अब्सल्यूटनंच सगळं अस्तित्व बनलंय ! ते शोधायचं नाहीये, ते आपण स्वतःच आहोत. जय-पराजय मानसिक आहे, आपल्याला काहीही होत नाही, आपण कायम विजयी आहोत, असा त्या विधानाचा अर्थ आहे. आणि शस्त्र, अग्नी, पाणी, वारा देहाला नष्ट करु शकतील पण सत्याला नाही असा तो अध्यात्मिक उद्घोष आहे.
ते विधान योग्य-अयोग्य किंवा बरोबर असेल त्याची कायम सरशी होईल या अर्थाचं नाहीये. द वेरी काँटेक्स्ट इज मिस्ड. म्हणजे या पोस्टबाबतीतच म्हणत नाहीये, तो सार्वत्रिक गैरसमज आहे.
16 Apr 2017 - 5:04 pm | arunjoshi123
अवांतरः आपल्या ब्रीदवाक्याबद्दल लिहिलेलं हे एक अतिशय सुंदर वचन आहे.
14 Apr 2017 - 9:23 pm | सतिश गावडे
खुप दिवसांनी मराठीत असं चांगलं वाचायला मिळालं.
15 Apr 2017 - 5:24 am | अर्धवटराव
छानच झालाय लेख.
अवांतरः
फॅक्ट्स आणि ट्रुथ यात फरक आहेच. फॅक्ट्स म्हणजे सबुत, गवाह, वगैरे कि रोशनीमे बघतात ते. ट्रुथ म्हणजे आपल्याला जे कन्व्हिन्स झालय ते. "सत्यमेव जयते" हे खरच आहे. आपल्या प्रत्येक अॅक्शनमागे कन्व्हिक्शन असतं. तोच सत्याचा विजय असतो.
16 Apr 2017 - 2:05 pm | सतिश गावडे
मला वाटतं जगात फक्त फॅक्ट्स असतात. ते सत्य की असत्य हे आपण त्याकडे कसे पाहतो यावर अवलंबून आहे.
16 Apr 2017 - 5:06 pm | arunjoshi123
यू सेड इट राईट. इथे मी ते दृष्टा आणि दृष्टाहिन परिस्थिती अशा शब्दांत मांडलं आहे.
16 Apr 2017 - 2:46 pm | arunjoshi123
ट्रुथ म्हणजे सत्य. फॅक्ट म्हणजे सत्य ज्यावर अवलंबून आहे ते उपसत्य. जसे मानवाचे चिरंजीव मानव तसे. आपल्याला जे कन्व्हिन्स झालय ते म्हणजे आपलं मानणं, श्रद्धा, विश्वास, मत, बिलिफ, इ इ
16 Apr 2017 - 3:00 pm | अर्धवटराव
फॅक्टच्या आधारे ट्रुथबद्दल इन्फरन्स काढता येतात.
केवळ विश्वास, मत इ. नाहि. सत्य म्हणजे आपण स्विकारलेल्या फॅक्ट्स म्हणा हवं तर. या स्विकारण्यामागे, कन्व्हिक्शनमागे रीतसर फॅक्टची चीरफाड असेल, किंवा 'इट मेक्स सेन्स टु मी' असा अगदी प्रथम चरणातला मनाचा कौल असेल, किंवा श्रद्धा वगैरे असेल. कशाही पद्धतीने का होईना, एखादी गोष्ट आपल्यासाठी सत्य तेंव्हाच बनते जेंव्हा समस्त किंतु-परंतुचे दरवाजे बंद झाले असतात व आपण त्याबद्दल कन्व्हिन्स झालेलो असतो. ट्रुथ इज व्हॉट वि हॅव अॅक्सेप्टेड.
16 Apr 2017 - 2:55 pm | arunjoshi123
माझ्या ललित नसलेल्या लेखनास असे शब्द वापरणारे आपण पहिलेच आहात. चलो, हमें भी किसी का साथ है। शुक्रिया.
15 Apr 2017 - 6:03 am | जयंत कुलकर्णी
मला माणसाची मोठी गंमत वाटते. त्याची रेफरन्स फ्रेम ती केवढी...त्यात तो असला विचार करतो.... या फ्रेमच्या बाहेर "सत्य" नसते का ?
15 Apr 2017 - 10:18 am | अभ्या..
मला फ्रेममध्ये हळूच राशोमान डोकावून गेल्यासारखा वाटला
15 Apr 2017 - 6:09 am | जयंत कुलकर्णी
जोशी, हे तुम्हाला उद्देशून नाही... तुम्ही छान लिहिलय.... हा आपला मनात आलेला एक विचार...
16 Apr 2017 - 2:47 pm | arunjoshi123
धन्यवाद.
15 Apr 2017 - 10:49 am | राही
बराच गोधळ आहे. सत्य हे बाय डेफिनेशन असतेच, आहेच. आपण जगतो हे सत्य आहे. कसाई गायीला मारतो हे सत्य आहे. वाघ गायीला खातो हे सत्य आहे. शेतकरी आत्महत्या करतात हे सत्य आहे. जे आहे ते सत्यच आहे. 'सत्'' हे व्याख्येनेच 'असणारे' असे आहे. जे जे आहे , ते ते सत् . सो कसाबाने माणसे मारली हा भूतकाळ. म्हणून ते वर्तमानात सत्य नाही. कसाब माणसे मारेल हे आत्ता सत्य नाही. क्लिशे उदाहरण म्हणजे 'कोलंबसाने अमेरिका शोधली' हे सत्य नाही.(तसेही ते सत्य नाही कारण त्याने pacific मधली काही बेटे पाहिली, अमेरिका नव्हे.) अमेरिका होती, आहे, राहील. कदाचित वेगळ्या नावाने. हे चिरंतन सत्य. कोलंबसाला त्या सत्याची जाणीव झाली. व्यापक अर्थाने, त्याची भौगोलिक जाणीव विस्तारली. अशा जाणीवा विस्तारणे म्हणजे सत्याचा प्रत्यय येणे. जे आधीपासून म्हणजे आपल्या जाणीवेच्या आधीपासून आहे, ते स्वच्छ दिसणे.
डोस पहिला.
सध्या पुरे. कदाचित क्रमश:
16 Apr 2017 - 1:15 am | संजय क्षीरसागर
तुम्ही जवळ पोहोचता पोहोचता रिवर्स घेतला !
अमेरिका होती, आहे, राहील. कदाचित वेगळ्या नावाने. हे चिरंतन सत्य. कोलंबसाला त्या सत्याची जाणीव झाली. व्यापक अर्थाने, त्याची भौगोलिक जाणीव विस्तारली. अशा जाणीवा विस्तारणे म्हणजे सत्याचा प्रत्यय येणे.
एखाद्या गोष्टीची जाणीव होणं (उदा. अमेरिका) म्हणजे 'सत्य' नाही. कारण ज्याला अमेरिका माहितीच नाही त्याच्यासाठी ती `असत्य' आहे.
त्यामुळे :
जे आधीपासून म्हणजे आपल्या जाणीवेच्या आधीपासून आहे, ते स्वच्छ दिसणे.
ही `इन्फर्मेशनची' व्याख्या आहे. त्याला फार तर वेरिफिकेशन म्हणता येईल. म्हणजे ज्याला अमेरिका माहिती नव्हती तो अमेरिकेत गेल्यावर, त्याला अमेरिका आहे हे कन्फर्म झालं. पण अशाप्रकारे जाणीवेत माहिती किंवा अनुभव गोळा होणं म्हणजे सत्य नव्हे.
खुद्द जाणीव हेच सत्य आहे. जाणीवेच्या क्षेत्रात येणारी गोष्ट त्या व्यक्ती पुरती सत्य (वास्तविक) होते. पण जाणीव माहिती, घटना, अनुभव यापेक्षा वेगळी आहे.
जाणीव आरश्यासारखी आहे. तुम्ही प्रतिबिंबाविषयी बोलतायं आणि आरश्याचं विस्मरण झालंय.
16 Apr 2017 - 3:38 am | अर्धवटराव
.
16 Apr 2017 - 10:00 am | संजय क्षीरसागर
हे नक्की कोणाच्या प्रतिसादालाये ?
16 Apr 2017 - 10:27 am | अर्धवटराव
.
16 Apr 2017 - 10:45 am | संजय क्षीरसागर
आता त्यांचा प्रतिसाद काय येतो ते बघा !
16 Apr 2017 - 10:57 am | अर्धवटराव
तुमच्या शाबासकीवर त्यांचा प्रतिसाद अवलंबुन आहे कि काय ?
16 Apr 2017 - 1:35 pm | संजय क्षीरसागर
त्यांचा प्रतिसाद स्वतःची चूक समजण्यावर अवलंबून आहे आणि तो आला की तुम्हाला ही मुद्दा कळेल.
16 Apr 2017 - 2:49 pm | अर्धवटराव
तसे बरेच मुद्दे कळले म्हणा... उदा.
१) राही मॅडम चुक आहेत(च)
२) त्यांना आपल्या ओपिनियनमधे काहि चुक वाटलं नाहि, मुख्य म्हणजे त्यांनी तसं कबुल केलं नाहि तर त्यांची आकलन शक्ती संशयास्पद आहे.
३) विचारांच्या आशयाव्यतिरीक्त आपल्याला एखाद्याची विचार करायची, विचार मांडण्याची पद्धत आवडणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
४) राही मॅडमनी आपली चुक कबुल केल्याचं शपथपत्र जाहिर केलं कि त्याला अनुमोदन देऊन विषय संपवणं हि एकच फॉर्मॅलिटी शिल्लक राहाते.
अवांतरः
राहीजींनी आपला डोज क्र. दोन लवकर द्यावा अशी विनंती.
16 Apr 2017 - 3:03 pm | संजय क्षीरसागर
तर उत्तर देण्यात गडबड झाली नसती. ज्याला अमेरिका माहिती नाही त्याच्यासाठी ती असत्य आहे. आणि ज्याला माहितीये त्याच्यासाठी सत्य ! सत्य अविभाज्य आहे हे बहुदा त्यांना माहिती असेल.
एनी वे, लेट अस सी.
16 Apr 2017 - 3:09 pm | अर्धवटराव
बघुया. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे त्या स्वतः इलॅबोरेट करु शकतील.
16 Apr 2017 - 9:26 pm | राही
जाणीव ही सापेक्ष आहे. सत्य नाही. सत्याची जाणीव होत नाही तोपर्यंत ते सत्य नाही हे विधान रास्त नाही. जाणीव व्यक्तिगत आहे. सत्य तसे नाही. ते व्यक्तिनिरपेक्ष आहे. 'ते आहेच.' कोणाला त्याची जाणीव होवो अथवा न होवो.
अंधारात दोरीला साप समजणे हा आकलनात्मक भ्रम आहे. त्यात वस्तूचे अयथार्थ आकलन आहे. उलट पाण्यात बुडवलेली काठी वाकडी दिसणे हा इंद्रियभ्रम आहे. ज्ञात्याला माहीत आहे की काठी वाकडी नाही, सरळ आहे. पण नेत्र या इंद्रियाची अनुभूती ती वाकडी असण्याची आहे. वस्तू आहे याचा बोध होणे हा निर्विकल्प प्रत्यक्ष, इंद्रियानुभवाचा पहिला क्षण. यामध्ये वस्तूचे इंद्रियांना फक्त सादरीकरण होते. ज्नेय वस्तूला संकल्पनात्मक आकार देणे हे काम बुद्धी करते.
लौकिक पातळीवर सविकल्प ज्ञआनाच्या आधारेच सर्व व्यवहार चालतो. पण हे ज्नान संकल्पनायुक्त असल्याने ते अंतिम सत्यापासून दूर असते. तरीही, ते काल्पनिक नव्हे.....दिग्नाग(दिन्नाग.)
नागार्जुन, दिन्नाग आणि धर्मकीर्ती यांनी नैयायिकांनी मांडलेल्या चार प्रमाणान्ची (प्रत्यक्ष,अनुमान, शब्द, उपमान) चिकित्सा करून काही वेगळी मते मांडताना'प्रत्यक्षाचे नेमके स्वरूप काय?' याचा उहापोह केला आहे.
पण अर्थात प्रस्तुत धाग्यासंदर्भात हे सर्व अवांतर आहे. कारण, मला असे जाणवले की या धाग्यापुरता आम्हां दोघांचा विचारप्रवाह वेगवेगळ्या पातळ्यांवर चालला आहे. त्यामुळे इथेच थांबलेले बरे.
17 Apr 2017 - 12:20 am | संजय क्षीरसागर
तुमचा पहिला डोस चुकला आहे. त्यात तुम्ही म्हटलं होतं :
अमेरिका होती, आहे, राहील. कदाचित वेगळ्या नावाने. हे चिरंतन सत्य. कोलंबसाला त्या सत्याची जाणीव झाली. व्यापक अर्थाने, त्याची भौगोलिक जाणीव विस्तारली. अशा जाणीवा विस्तारणे म्हणजे सत्याचा प्रत्यय येणे.
आणि मी म्हटलंय : खुद्द जाणीव हेच सत्य आहे. जाणीवेच्या क्षेत्रात येणारी गोष्ट त्या व्यक्ती पुरती सत्य (वास्तविक) होते. पण जाणीव माहिती, घटना, अनुभव यापेक्षा वेगळी आहे.
थोडक्यात, कोलंबस सत्य आहे, त्याची जाणीव सत्य आहे, त्यामुळे त्याला दिसलेल्या प्रदेशाला अमेरिका म्हटलं काय की लंका काही फरक पडत नाही. जाणीव आरसा आहे आणि दृश्य प्रतिबींब आहे. तस्मात, तुम्ही म्हणता तसा `जाणीवेचा विस्तार' म्हणजे सत्य नाही.
__________________________
आता तुम्ही स्टँड बदलला आहे आणि रोख जाणीवेच्या सापेक्षतेकडे वळवलांय.
१) ज्याची जाणीव होते ते (उदा. पाण्यात बुडवलेली काठी) सापेक्ष असू शकते पण खुद्द जाणीव (दि अॅबिलीटी टू नो) कायम अलिप्त आहे . झालेल्या जाणीवेची मेंदूत होणारी प्रक्रिया भ्रम निर्माण करु शकते पण तो जाणीवेचा दोष नाही. हा प्रथम चरण झाला !
२) त्याही पुढे जाऊन, ज्याला जाणीव होते तो कायम सत्यच आहे कारण ताच्याशिवाय जाणीव व्यर्थ आहे.
३) सत्यमेव जयते म्हणजे ज्याला जाणीव होतेयं तो सत्य आहे आणि तो जाणीव स्वरुपच आहे. झालेल्या जाणीवेचं इंटर्पिटेशन व्यक्तिगत आहे (म्हणजे काठी वाकडी दिसणं वगैरे) पण तो दोष मेंदूतल्या प्रक्रियेचा आहे.
असा प्रकारे तुम्ही पुन्हा एकदा आरसा हुकवला आहे.
17 Apr 2017 - 1:42 pm | संजय क्षीरसागर
अशा प्रकारे तुम्ही पुन्हा एकदा आरसा हुकवला आहे
16 Apr 2017 - 2:58 pm | arunjoshi123
असं आपण मानतो. ही सत्ये नव्हेत. ही आपली मानणी आहेत.
16 Apr 2017 - 3:03 pm | arunjoshi123
जगणे म्हणजे नक्की काय? मी म्हणजे नक्की काय? तर जीवन व मी यांबद्दलचे सारे प्रश्न उत्तरित झाले, सार्या व्याख्या निश्चित झाल्या, सारे अस्पेक्ट्स कळाले, सारी परिमाणं कळाली, त्यांची सगळी मूल्य कळाली, एककं कळाली तर ते सत्य विधान गावले. नाहीतर एका रोबोटच्या दृष्टीनं मी मेलो काय नि एक मुंगी चिरडली काय, मी जगतो आणि ती जगते चा अर्थ एकच असेल.
16 Apr 2017 - 3:57 pm | arunjoshi123
असणे एक ऑक्झिलरी क्रियापद आहे. म्हणून दुसरा कोणतातरी पदार्थ वा प्रक्रिया त्याच्यासोबत जोडली जात नाही तोपर्यंत असणे शब्द अर्थहिन आहे. आणि जेव्हा काही असण्याशी जोडलं जातं तेव्हा त्याची संपूर्ण सुसूत्र शास्त्रीय छाननी होतेय का हे पाहणं गरजेचं आहे.
=============================
कल्याण हे मानण्यावर आहे. त्यासाठी विज्ञानाच्या लॅबोरेटरीत क्वचितच जायाला लागतं. सत्याचं तसं नाही. मांडणी व्यवस्थित पाहिजे, नियम, गृहितके, संदर्भ सगळं व्यवस्थित देणं आलं.
उदा. "शेतकरी आत्महत्या करतात"? कि काही शेतकरी आत्महत्या करतात?
काही म्हणजे कोण एक फाफटपसारा घेऊन येईल. शेतकरी म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? हत्या म्हणजे काय? त्यांचे विधानाच्या संदर्भात आंतर्संदर्भ काय? हे पूर्ण अभासून जे वचन येईल ते सत्य असेल. लॉजिक म्हणजे काय या लेखात मी असं सत्य शोधणं कसं अशक्य आहे ते लिहिलं आहे. मानणं हा एकच पर्याय आपल्याला उरतो.
15 Apr 2017 - 11:01 am | पैसा
सत्याबद्दलची काही काही आकर्षक वाक्यं आठवली. उदा. "There are three sides to every story: your side, my side, and the truth. And no one is lying. Memories shared serve each differently."
पुन्हा आपण ज्याला सत्य म्हणतो ते आणि पाश्चात्यांचे truth या दोन्ही एकच गोष्टी आहेत असे वाटत नाही.
देव, सत्य अशा काही गोष्टी सामान्य माणसाला जगण्यासाठी आवश्यक असतात. असे काही विश्वास आणि गृहीतके यावर सगळी जबाबदारी सोपवून तो निर्धास्त जगू शकतो. असे काही आधार नसतील तर सामान्य माणसाला जगणे फार कठीण असते.
हे पटण्यासारखं आहेच. पण सर्वांचे कल्याण व्हावे ही आदर्श परिस्थिती झाली. माझे कल्याण होता होता इतर चारजणांचे भले झाले तर उत्तम असाच बहुजन विचार करतात. पण आपल्या कल्याणाचा बळी देऊन चारजणांचे कल्याण करायला कितीजण तयार असतात? प्रत्येकजण फक्त आपल्या कल्याणाचा विचार करत सुटला तर काय होईल? म्हणून मग सत्याचा आधार घ्यावा लागतो. की ते निदान बहुसंख्यांना मान्य होईल.
16 Apr 2017 - 5:15 pm | arunjoshi123
यातलं "द ट्रुथ" जगात असतं, असू शकतं पण मानवाला त्याची "सिद्धता देता येणं" अशक्य आहे असं लेखात लिहिलं आहे. सिद्धता देण्याची प्रक्रिया फार तर फार गणीतातल्या लिमिटप्रमाणे अत्यंत जवळ जाऊ शकते.
खाली संज्ञांचा उहापोह केला आहे.
यात एक गृहितक आहे ते म्हणजे आत्मकल्याण आणि आत्मेतरकल्याण या संकल्पना परस्परविरोधी आहेत. असं नाही. जास्तीत जास्त आत्मकल्याणवादी विचार हे परकल्याणवादी असतात. देवानं जग तसं बनवलं आहे. उदा. मत्सर करण्याला एक वेगळ्या प्रकारची दाद म्हणून पाहिलं जाऊ शकतं.
19 Apr 2017 - 1:50 pm | पैसा
१००% वेळा नाही पण अनेकदा, कदाचित ५०% वेळा असेल तसे नक्कीच होते. म्हणजे काही उदाहरणे बघू. एका चोराने आत्मकल्याण व्हावे म्हणून काही लोकांची घरे धुवून नेली, ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांचे अकल्याण नक्कीच झाले. अतिरेक्यांना मारले की देशाचे कल्याण होते पण शत्रूचे अकल्याण होते. सरकारने वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवले की शेतकर्यांचे काही प्रमाणात तरी अकल्याण होते. म्हणजे आत्मकल्याण आणि परकल्याण या दोन विरोधी गोष्टी नसल्या तरी अनेकदा तशा स्वरूपात समोर येतात.
16 Apr 2017 - 7:25 am | कंजूस
तुम्हाला काय म्हणायचय ते कळलं.
प्रत्येक योजनेचं,कंपनीचं ,देशाचं एक ब्रीदवाक्य असतं तसं आपलं सत्यमेव जयते.
ब्रीदवाक्य म्हणजे अनंत अडचणी आहेत पण त्या दूर करून आम्हाला तिथे पोहोचायचं आहे आणि आम्ही तुम्हा सर्वांना आश्वस्त करतो की ते साध्य करणारच. लेखाच्या शेवटची वाक्ये हेच सांगतात.
सध्याची परिस्थिती मात्र एकूण ब्रीदवाक्यातल्या अर्थावर साशंकता उत्पन्न करत आहे. सत्यमेव जयते पण कधी किती युगांनी असे विचारायची वेळ आली आहे. खोटं बोलला की आला रथ खाली व्हायला महाभारताचा काल थोडीच आहे?
16 Apr 2017 - 2:41 pm | arunjoshi123
सदर लेख सत्य आणि कल्याण या संकल्पनांचा तौलनिक अभ्यास आहे. माणसाचा अलिकडच्या काळात भर हा सत्यावर वाढत आले नि कल्याण दुर्लक्षित होत आहे. दोघांची बरीच अलाइनमेंट आहे पण एक्सक्लूजन्स देखील खूप आहे. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य इ इ आहे हा भाग लेखासाठी गौण आहे.
16 Apr 2017 - 12:05 pm | चित्रगुप्त
भारताचे ब्रीदवाक्य, झेंडा, राष्ट्रगीत वगैरे गोष्टी नेमक्या केंव्हा, कोणी निवडल्या ? याबद्दल माहिती उपलब्ध आहे का ? मी दिल्लीत दहा वर्षे केंद्रीय शासनाच्या संग्रहालयात काम केलेले आहे. तिथला माझा अनुभव असा, की वर्षानुवर्षे झोपा काढायच्या, आणि अगदी कंठाशी आले कि हालचाल सुरु करून कसेतरी काहीतरी थातुर मातुर करून वेळ मारून न्यायची. संग्रहालयाने आयोजित केलेल्या एका मोठ्या महत्वाच्या प्रदर्शनाचे वेळी इंदिरा गांधी उद्घाटनाला आलेल्या होत्या, त्यांनी अगदी अल्प वेळेत प्रदर्शनातील मोठमोठ्या चुका निदर्शनास आणून दिल्या होत्या. (या चुका वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र याबद्दलच्या होत्या) मग त्याबद्दल जबाबदार कोण वगैरे चक्रे चालू झाली. हे इथे एवढ्यासाठी लिहीले, की आपला झेंडा, ब्रीदवाक्य, राष्ट्रगीत विचारपूर्वक, योजनापूर्वक निवडलेले गेले असण्याची शक्यता फारच थोडी वाटते, 'जन गण मन' हे पंचम जॉर्ज ला उद्देशून लिहिले गेलेले काव्य थोडी काटछाट करून काव्य भारताचे राष्ट्रगीत म्हणून फिट केले गेले, तसेच सर्व बाबतीत झाले असावे.
'सत्याचा विजय होतो' त्याअर्थी 'ज्याचा विजय झाला, त्याची बाजू सत्याची' म्हणून राम हा सत्याचा पुतळा, पांडवांची बाजू सत्याची अशा रीतीने रामायण महाभारत लिहीले गेले... वगैरे...
16 Apr 2017 - 2:37 pm | arunjoshi123
हे सत्य देखील सदासर्वकाळ माहित असावं, नै का? मग कशाला दुष्ट राम , कृष्ण आपल्या यशाची कथा लिहितील? लिहून घेतील? लिहू देतील.
ज्याचा विजय झाला, त्याची बाजू सत्याची असा इतिहास लिहिलेला असतो म्हणणं म्हणजे इतिहासलेखनावर बंदीच कि हो?
16 Apr 2017 - 1:12 pm | कंजूस
चित्रगुप्ता बरोब्बर आहे.
16 Apr 2017 - 3:04 pm | arunjoshi123
लॉजिक म्हणजे काय वरचे काही प्रतिसाद उरलेत. ते देतो नि परततो.
16 Apr 2017 - 4:09 pm | arunjoshi123
लेखात फॅक्ट आणि ट्रुथ यांच्यावर चर्चा झाली आहे. फॅक्ट म्हणजे वास्तव. यास दृष्टा नसलेला चालतो, नसतो. हे भौतिक असतं. त्याची जाणिव माणसांनी कशी करून घ्यायची हे दुय्यम असतं. खाली वास्तवाचं वर्णन आहे:
सत्य म्हणजे एक शब्द नव्हे. म्हणजे डोंगर हे सत्य नाही. ते एक संपूर्ण विधान असते. ते मानवी जाणिवेची अभिव्यक्ति असते. राम ने सांगीतले - "डोंगरावर एक वाट आहे." हे विधान सत्य झाले.
=====================
अर्थातच भेद करायचा नसेल तर दोन्ही शब्द आलटून पालटून वापरलेले चालतात.
17 Apr 2017 - 10:27 am | बॅटमॅन
सत्याचा शोध जगायला पुरेसा नाही म्हणून सत्य हे मूल्यच कचर्यात टाकू अशी मिलिटंट मांडणी आहे ही. जर काही करून जगल्याशी मतलब आहे तर बाकी कल्याण बिल्याण तरी कशाला पाहिजे? आहारनिद्राभयमैथुनादि सहजप्रेरणांच्या आधारे कोट्यवधी वर्षे कैक प्राणी आणि लाखभर वर्षांपासून माणूस हे जगत आलेलेच आहेत. सबब, त्या तथाकथित कल्याणाची काय एवढी मातब्बरी लागून गेलीय? आणि सर्वांचे भले व्हावे म्हणजे नक्की कुणाचे? माण्साचे भले झाले तर किडामुंगी, गायी, कोंबड्या, बोकड, इ. चे भले होत नाही. हे समर्थनीय का असावे याबद्दल लेखक काहीच बोलत नाही. तेव्हा या मांडणीत बराच तार्किक घोळ आहे. सध्याच्या परिस्थितीतला प्रॉब्लेम दाखवण्याच्या अभिनिवेशी थाटात लेखक बाकीचे विसरलेला दिसतो. अर्थात तेही "सत्य यूसलेस" या मांडणीला धरून आहे म्हणा, पण मग कल्याण म्हणजे काय, ते कुणाचे, ते का समर्थनीय असावे याबद्दल काहीच हातात येत नसेल तर लोकांचे तथाकथित कल्याण या मांडणीत आहे हे कशावरून?
17 Apr 2017 - 1:35 pm | arunjoshi123
असं नाहीये. सत्य कचर्यात वैगेरे टाकायचं नाहीय. फक्त प्राधान्यात बदल आहे. मिलिटंट इ अजिबात नाही. असलेल्या व्यवस्थांतील चू़का काढणं स्वागतार्ह असावं. बाकी कल्याण या विषयावर नंतर लिहिणार आहे.
17 Apr 2017 - 1:21 pm | चित्रगुप्त
तथाकथित 'कल्याण' ही संकल्पनाच मुळात लई घोळाची आहे.
वाट चुकलेल्या बापड्या अज्ञानी कोकरांना आकाशातील बाप आणि त्याच्या लाडक्या प्रेषिताचे कल्याणकारी शुभवर्तमान देणारे, एकमेव- सर्वशक्तिमान- परम दयाळू देव आणि त्याचा शेवटला प्रेषित यांद्वारेच खरे कल्याण साधावे यासाठी जगभरात हैदोस घालणार्या झुंडी, जन्मभरासाठी औषधांवर अवलंबून रहायला लावणारे आधुनिक डागतर आणि औषध कंपन्या ... आणि असे अनेक लोक, धंदे, सिद्धांत, विचारसरणी हे सर्व त्यांच्या त्यांच्या मते लोकांच्या कल्याणासाठीच झटत असतात ना ?
17 Apr 2017 - 1:37 pm | arunjoshi123
सवडीप्रमाणे उत्तर देईन. मुद्दा मान्यआहे.
17 Apr 2017 - 3:00 pm | प्रसाद गोडबोले
परवाच कर्दे बीच वरुन येताना दापोलीला वृंदावन हॉटेल च्या शेजारच्या पान शॉप वर पान खल्ले , पानामध्ये गुलकंद , खोवरे , कात , चुना , किशमिश , गुंजेची पाने अशे सतराशे साठ पदार्थ टाकले होते पण पानाला अक्षरशः काडीमात्र चव नव्हती . बेक्कार ! नुसता चोथा ! तेव्हा लक्षात आले की पानाचा खरा आस्वाद घायचा असेल तर नुसते पान खाता आले पाहिजे , नुसत्या पानाची चव अॅप्रीशियेट करता आली पाहिजे , अगदी जास्तीत जास्त म्हणजे त्यावर टिचभर चुना कात बारीक सुपारी किंव्वा बडीशेप बस्स ! तर तुम्हाला पानाची खरी चव कळेल , तर तुम्हाल पानाची खरी मजा घेता येईल !!
हां तर हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे वरील लेख म्हणजे निव्वळ त्या चोथ्याच्या पाना सारखा झालेला आहे , इतक्या सराशे साठ मुद्द्यांना स्पर्श करुनही काही मजा नाही आला !
तुम्हाला सत्यमेव जयते चा खरा अर्थ समजुन आस्वाद घ्यायचा असेल तर एकदम बेसीक मध्ये जायला पाहिजेल , जसे पानाचा आस्वाद स्घ्यायला नुसत्या पानाचा आनंद घेता आला पाहिजे !
हे घ्या नुसते पान : मुंडकोपनिषद , तृतीय मुण्डक प्रथम खंड श्लोक क्रमांक सहा http://sanskritdocuments.org/doc_upanishhat/mundaka.pdf
आणि हा घ्या चुना कात आणि सुपारी http://www.wisdomlib.org/hinduism/book/mundaka-upanishad-shankara-bhashy...
मार्कस ऑरेलियस
वैदिक पान शॉप (AC) आणि स्टॉईस सोडा पब
17 Apr 2017 - 5:37 pm | arunjoshi123
मूळात लेख चोथ्याबद्दलच आहे, पानाबद्दल नाही.
17 Apr 2017 - 5:42 pm | arunjoshi123
याचा नि लेखाचा काही संबंध नाही.
17 Apr 2017 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले
अरेरे , आम्हाला वाटले की तुम्हाला सत्यमेव जयते मधील सत्य म्हणजे काय हे तरी किमान समजुन घ्याय्चही इच्छा असेल , पण तसा लेखाचा उद्देश नसेल तर सोडुन द्या !
अवांतर : प्रतिसादाचा विषय आणि प्रतिसाद ह्यांचा काही संबंध नाही =))))
18 Apr 2017 - 11:22 pm | बॅटमॅन
बायदवे पान खाणे व पूजेत वापरणे हा प्रकार वेदोत्तर काळात हिंदू धर्मात शिरला असे दिसते. त्यामुळे वैदिक पानशॉप हे खाण्याच्या पानांचे नसून सप्तर्षी पॉलिवल्कल लि. असे होते हा एक तपशील वगळता बाकी सहमत.
ब्रूस वेन
(हस्तलिखित पानशॉपवाले)
18 Apr 2017 - 11:43 pm | प्रसाद गोडबोले
वैदिक काळात पान नव्हते ? काय सांगता काय?
आम्हाला वाटत होते असे २ ४ पेग सोमरस पिऊन , नंतर तुडुंब पुराडोष खाल्ल्यावर,, असे तक्क्याला टेकुन बसुन मस्त कच्ची पक्की न कत्रीवाली सुपारी घातलेले पान खात अथातो ब्रह्मजिज्ञासा करायला मजा आली असती राव !
हा हा हा :)
18 Apr 2017 - 2:20 pm | पुंबा
'सत्य' ही संकल्पना नैतिकदृष्ट्या अतिउदात्त अशी मुल्ये असा संदर्भ 'सत्यमेव जयते' ह्या वाक्यात असावा असे वाटते. सत्य म्हणजे सर्वात ऑप्टिमम आयडियल. तुम्ही सत्य विरूद्ध कल्याण अशी dichotomy मांडता आहात, तिच्यामध्ये सत्यशोधन म्हणजे ह्या आयडियल्सच्या प्रस्थापनेसाठी झगडणे (at the cost of welfare) अपेक्षीत आहेत काय?
19 Apr 2017 - 5:53 am | arunjoshi123
होय.
19 Apr 2017 - 3:01 pm | पुंबा
अजो, तुम्ही जी सत्याची व्याख्या मानता आहात ती खुप व्यापक आहे. तिच्यामध्ये सर्वात आदर्श अशी नैतिक मुल्याची समाजात प्रतिष्ठापना करण्यापासून ते अगदी वैज्ञानिक तथ्ये शोधून काढून आपल्या अस्तित्वाचा अर्थ लावणे इथपर्यंत अनेक गोष्टी तुम्ही आणल्या आहेत.
आता केवळ 'कायदा' ह्या एकाच सत्यान्वेशनाच्या मार्गाचे उदाहरण घेऊयात. मानव कळप करून राहत होता तेव्हादेखील काही नियमांद्वारेच त्याच्या जिवनाचे संचालन होत होते. त्यातील निसर्गाचे नियम(law of nature) तर अपरिवर्तनियच होते, मात्र हजारो वर्षाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात मानवाला हळुहळू त्या नियमांचा अन्वयार्थ लावणे शक्य झाले. कालांतराने त्या नियमांना स्वतःच्या फायद्यासाठी वापरून, कुठे कुठे वाकवून, जगणे सुसह्य करणे त्याला शक्य झाले. आधीचे निसर्गाधीन जगणे सोडून देऊन बर्याच प्रमाणात चांगले, दीर्घकाळ आणि निरोगी जगणे त्याला शक्य झाले. हे सारे सत्यान्वेशनाच्या प्रक्रियेचेच फलित नव्हते काय? दुसरे नियम म्हणजे मानवसमुहाचे कायदे/ संविधान. सुरुवातीला हे कायदे अतिशय ढोबळ होते, अन्नासाठी सतत संघर्ष, क्रुर, कमी आणि घाणेरडे आयुष्य(हॉब्जच्या शब्दात) या सगळ्यामुळे social contract करून नागरी समाज निर्माण करणे त्याला आवश्यक झाले. या समाजाचे निती-नियम ठरत गेले, बदलत गेले, त्या नियमांचे चालन करण्यासाठी सरकार ही व्यवस्था आली. राज्य अणि राज्याशी निगडीत सार्या संकल्पना(स्वातंत्र्य, समता, लोकशाही, न्याय: Rawl's Primary Goods), मानवाचे आयुष्य सुसुत्रपणे चालावे या उद्देशानेच निर्माण झाल्या, कल्याण हे त्यांचे उद्दिष्ट्य कधीच नव्हते. मात्र, संविधानाधारीत राज्याने कल्याणकारी व्यवस्थेसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली. जे एरव्ही शक्यच झाले नसते. त्यामुळे सत्याचा शोध हा सर्वांचे कल्याण हे उद्दिष्ट्य घेऊन कधीही झालेला नसला तरीही, या व्यवस्थेतून बर्यापैकी कल्याण होऊ शकले.
विशुद्ध सत्य प्रस्थापीत असलेली व्यवस्था पूर्ण कल्याणकारी नसेल कारण 'संपूर्ण कल्याण' अस्तित्वात आणणेच अशक्य आहे.
त्यामुळे कल्याण साधण्यासाठी विशुद्ध सत्य म्हणजे काय याची पुन:पुन्हा खातरजमा करणे, नव्या काळाच्या समस्यांनुसार नविन मुल्ये समाजाचा मुलाधार मानणे आवश्यक असते.
19 Apr 2017 - 12:24 am | गामा पैलवान
च्यायला, काय तो लेख आणि काय ते एकसेएक प्रतिसाद! च्यामारी, आपलं तर सालं डोस्कं ज्यामंच भंजाळून गेलंय. म्हणून म्हंटलं की उलट विचार करूया.
त्याचं काय आहे की हा देह जिवंत ठेवण्यासाठी अन्नं खावं लागतं आणि विष्ठा टाकावी लागते. टाकलेल्या विष्ठेत शरीरातल्या चयापचयातून निर्माण झालेल्या मृत पेशी असतात. म्हणजे शरीर जिवंत ठेवण्यासाठी जिवंत शरीराचा एक छोटासा भाग मरण पावावाच लागतो. ही दैहिक जीवनातली मूलभूत विसंगती आहे.
ही विसंगती जर नाहीशी झाली तर देह मृत समजला जातो. आपलं सर्वांचं जे काही सत्याचं आकलन आहे ते केवळ या विसंगतीमुळेच शक्य झालं आहे. सांगण्याचा मुद्दा काये की सत्य जरी विसंगतीच्या पल्याड असलं, तरी ते आकळण्यासाठी विसंगतीशिवाय तरणोपाय नाही. याचा दुसरा अर्थ म्हणजे त्याग ही एक नैसर्गिक अवस्था आहे. विष्ठेचा त्याग केला नाही तर तिचं विष होतं आणि ते विष मग दैहिक जीवन संपुष्टात आणतं.
अशा रीतीने सत्याचा सलग अनुभव घ्यायचा असेल तर त्याग हा हवाच. तर पहिला त्याग विष्ठेचा म्हणजे शारीरिक आहे. दुसरा त्याग मानसिक असतो. मनात अनावश्यक विचारांची गर्दी न उसळू देणं, हाच तो मानसिक त्याग. तिसरा त्याग कर्मफळांचा असतो. यावर अनेकांनी भरपूर लिहिलं आहे. मी जास्त लिहित नाही. सांगण्याचा मुद्दा असा की सत्य आकळून घ्यायचं असेल तर तिहेरी त्याग हवाच.
आता असा त्याग केल्यावर सत्य कशा प्रकारे प्रगट होतं? ते जाणीवेच्या स्वरूपात स्वत:मध्येच दिसू लागतं. तत् त्वम् असि = तो तूच आहेस याची प्रचीती येते. यालाच सत्यं एव जयते म्हणतात. सत्य बाहेर नाही. बस, इतकंच.
आ.न.,
-गा.पै.
19 Apr 2017 - 5:57 am | arunjoshi123
कोणतेही विधान, हायओइथेसिस सत्य वा असत्य सिद्ध करताना प्रयोगकर्त्याने त्याग करावाच लागतो हे विधान अपटनीय वाटतं.
19 Apr 2017 - 1:27 pm | गामा पैलवान
अरुण जोशी,
विधान वा प्रमेय (हायपोथिसीस) म्हणजे सत्य नव्हे. त्यांना तथ्य अथवा ऋत म्हणता येईल.
शिवाय कुठलंही तथ्य शोधून प्रस्थापित करतांना अनावश्यक विचारांचा त्याग गृहीत धरलेला असतोच.
आ.न.,
-गा.पै.
19 Apr 2017 - 12:44 pm | चित्रगुप्त
अपटनीय की आपटनीय ?