मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हॅमर कल्चर

प्रकाश घाटपांडे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हॅमर कल्चर लेखक :- प्रभाकर नानावटी बाविसाव्या शतकातील बाप-लेकीत घडलेला हा संवाद. "पपा, पपा, तुम्ही सतत माझ्यापासून तो हातोडा का लपवून ठेवता?" "त्याच्यामागे एक फार मोठी गोष्ट आहे." "पपा सांगा की ती गोष्ट मला" "विसाव्या शतकात घडलेली ही गोष्ट आहे. त्याकाळी एक ‘प्रगत’ समाज होता. अचानक एके दिवशी एकमेकांच्या डोक्यावर हातोडा मारण्याची लाट उठली. काही महिन्यातच ही क्रेझ सर्वांच्या अंगवळणी पडू लागली. लोकांना दुसरे काही सुचेनासे झाले. जो उठतो तो हाण दुसऱ्याच्या डोक्यावर हातोडा. हळू हळू हा समाज बदलला. सर्व काही हातोडामय झाले. मागणी तसा पुरवठा या तत्त्वाप्रमाणे काही चाणाक्ष उद्योजकं, लोकांची आवड ओळखून वेगवेगळया प्रकारचे हातोडे बाजारात आणू लागले. घडीचे, क्षणात उघडणारे, उघड-झाप, लांब, आखूड, नक्षीदार, बॅटरीवर चालणारे, रबराचे, प्लॅस्टिकचे, सोन्याचे, जोराने मार बसणारे, मार न बसणारे, पाळण्यातल्या व रांगणाऱ्या बाळासाठी, मुलींसाठी, बायकांसाठी, म्हाताऱ्यांसाठी, सुशिक्षितांसाठी, अशिक्षितांसाठी, तरुणांसाठी, तरुणींसाठी कोमल, असे विविध प्रकारचे, विविध प्रसंगासाठी, विविध वयोगटांसाठी, विविध मानसिकतेसाठी हातोडयांचे उत्पादन, वितरण व विक्री व्यवस्था रूढ झाली. हातोडे बनवण्यासाठी लागणाऱ्या लोखंड, लाकूड, रबर, प्लॅस्टिक इत्यादी कच्च्यामालांचा पुरवठा करणाऱ्यात चढाओढ लागली. काही भूवैज्ञानिक व धातुशास्त्रज्ञ नवीन प्रकारच्या धातूसाठी संशोधन करू लागले. हातोडयांचे वर्गीकरण व प्रमाणीकरण करण्यात आले. इतर अनेक वैज्ञानिक हातोडा मारण्याच्या व मारून घेण्याच्या सिध्दांतावर मूलभूत संशोधन करू लागले. हातोडा कसा मारावा, कुठे मारावा, का मारावा, केव्हा मारावा याचे विश्लेषण करून एक सर्व मान्य आचारसंहिता बनवण्यात आली. अशा प्रकारच्या शोधनिबंधांची मागणी वाढली. प्रयोगशाळेत संशोधन होऊ लागले. लोकांच्या ज्ञानात भर पडू लागली. या ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून हा विषय शाळेत शिकवू लागले. हातोडयासंबंधीचे टयूशन क्लासेस धंदा करू लागल्या. पाठयपुस्तकात याबद्दलची माहिती देण्यात आली. हातोडा-मारच्या परिणामांची गणीतीय समीकरणात मांडणी करण्यात आली. सूक्ष्मात सूक्ष्म व महाकाय हातोडयांच्या इष्ट परिणामासंबंधी चर्चा, शिबिरं, कार्यशाळा, संमेलनं भरविण्यात येवू लागल्या. संपूर्ण शिक्षण व संशोधन पध्दती हातोडयास केंद्रबिंदू समजून विकसित करण्यात आल्या. याच सुमारास हातोडयापासून रक्षण करून घेण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे हेल्मेट्स पण बाजारात येऊ लागले. संरक्षक कवचांची मोठया प्रमाणात विक्री होऊ लागली. हेल्मेट्सचा आकार, वजन, बनवण्याची प्रक्रिया त्याचे प्रमाणीकरण इत्यादीवर संशोधन होऊ लागले. हेल्मेट्सची विक्री जोरदार होवू लागली. काही जण हातोडा मार संबंधीचे क्रीडा आयोजन करू लागले. खुल्या मैदानात, बंदिस्त हॉलमध्ये मुलं-मुली , तरुण-तरुणी, सराव करू लागले. फुटबॉल-क्रिकेट स्पर्धेप्रमाणे एक तास, एक दिवस, पाच दिवसाचे हातोडा-मारचे सामने होऊ लागले. प्रेक्षकांचा फारच चांगला प्रतिसाद मिळू लागला. हातोडा-मार यासंबंधी कथा-कादंबऱ्या, कविता-चारोळया-गझल, वैचारिक-वैज्ञानिक लेखन, शब्दकोश, ज्ञानकोश, अशा साहित्याला प्रचंड मागणी होती. हातोडयाची चित्रकला, शिल्पकला विकसित झाली. हातोडयाचा सार्वजनिक उत्सव साजरा होऊ लागला. हातोडयांचे सवलतीच्या दरातील विक्री व प्रदर्शन भरविण्यात येऊ लागले. त्याच पैशातून ते हातोडयांची खरेदी करू लागले. व ही संस्कृती चांगलीच मूळ धरली. हातोडा-मार संस्कृतीचे काही उपदुष्परिणाम पण जाणवू लागले. हातोडयाचा मार बसल्यामुळे काही जणांना दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार करणारे स्पेशालिटी हॉस्पिटल्स निघाले. उपचार करणाऱ्या विशेषज्ञांची फौज उभारली. रुग्ण डोकेदुखी, पाठदुखी, डोळयांची आग आग होणे, आपस्मार, रक्तस्राव, मेंदूज्वर, ताण तणाव इत्यादींच्या तक्रारीवर इलाज करून घेऊ लागले. काहींच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे, ते बरळू लागले. हातोडा-मार उपचारासाठी वेगवेगळया उपचार पध्दती रूढ झाल्या. काहींना पाला पाचोळा, काहींना ऊद भस्म, व इतर काहींना साबुदाण्याच्या गोळया घेतल्यामुळे बरे वाटू लागले. आपल्याकडेच जास्त रुग्ण यावेत यासाठी त्यांच्या आपापसात चढाओढ सुरु झाली. परंतु रुग्ण निमूटपणे उपचार घेत होते. पूर्ण बरे झाल्यानंतर हातात हातोडा घेवून मारत होते किंवा मारून घेत होते. हातोडयाच्याविरोधात बोलायची हिंमत कुणातही नव्हती. बहुतांश लोकांना हातोडा मार संस्कृतीमुळे भरपूर त्रास होत आहे हे जाणवत होते. परंतु मूठभर लोकांच्या हातोडा-मार संस्कृतीच्या उदात्तीकरणाच्या जाहिरातबाजीमुळे, खरोखरच यात काहीतरी तथ्य असावे म्हणून सहन करत होते. हातोडा-मार संस्कृतीतून भरपूर काही मिळणार आहे यासाठी आपण दिलेली ही छोटी किंमत म्हणून त्रास सहन करत होते. नेमके काय मिळणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. याविषयी विचार करणेच लोकांनी सोडून दिले. शेजारचा करतोय ना मग आपण पण करावे हीच वृत्ती जोपासली जात होती. समाजाच्या परिघाबाहेर असलेले काही सुज्ञ हताशपणे हे सर्व बघत होते. अधोगतीला चाललेल्या समाजाला सावध करावे या हेतूने हातोडा संस्कृती विरुद्ध ते आवाज उठवू लागले. परंतु गुंडागर्दी करून दडपशाही करून त्यांचा आवाज दडपला. त्यातील काही सुज्ञ चिवटपणाने ही हातोडा-संस्कृती समाजघातक व बेकायदेशीर आहे म्हणून आंदोलन करू लागले. समाजातील इतर त्यांना वेडे म्हणून हिणवू लागले. आमच्या मुलाबाळावर या वेडयांच्या वक्तव्याचा वाईट परिणाम होईल म्हणून त्यांना जेलमध्ये ठेवावे किंवा तडीपार करावे ही मागणी जोर धरू लागली. व्यापारी व उत्पादक धंदा कमी होईल या भीतीने विरोध करु लागले. या मूठभर हातोडा-विरोधकाविरुध्द वैद्यकीय तज्ञ, संशोधक, वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ आरडा ओरडा करू लागले. हातोडा-मार अर्थव्यवस्थेला धक्का लावणाऱ्यांचा निषेध होऊ लागला. स्त्रियांना नोकऱ्या मिळणार नाहीत, राजकीय पुढऱ्यांना मतं मिळणार नाहीत, म्हणून हातोडा-मार विरोधकांची हकालपट्टी करावी या मागणीला जोरदार पाठिंबा मिळू लागला. लोकमतापुढे मान झुकवून विरोधक गप्प झाले. हातोडा-मार संस्कृती रक्षकांची सरशी झाली. आता तर हातोडा-मार संस्कृती शिवाय दुसरे कुठलेच विचार सुचेनासे झाले. यामुळे हळू हळू हा समाज विनाशाकडे जावू लागला व एके दिवशी पूर्ण अस्तंगत झाला. उरलेल्या विरोधकांनी कुठे तरी लांब जावून एक नवा समाज निर्माण केला. व आपण त्या नव्या समाजाचे वंशज आहोत. हा समाज मात्र विचारपूर्वकपणे हातोडा मार संस्कृतीच्या अवशेषापासून दूर राहिला. हातोडयावर बंदी घालण्यात आली. म्हणून मी तुला हातोडयांना हात लावू देत नाही." मुलगी सुज्ञ होती. विचार करणारी होती. तिच्या पपाने तिला एक रूपक कथा सांगितल्याचे तिच्या चटकन लक्षात आले. या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता. विसाव्या शतकाचा इतिहास वाचत असताना हा समाज अशा अनेक प्रकारच्या क्रेझी कल्पनांचा बळी झालेला होता हे तिच्या लक्षात होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हातोडयापासून चार हात दूर राहणे हेच शहाणपणाचे लक्षण ठरेल याची तिला खात्री पटली. सुज्ञास सांगणे न लगे! (लेखक निवृत्त वैज्ञानिक असून thought and action या विवेकवादी नियतकालिकाचे संपाद्क आहेत॒. तसेच उपक्रम, ऐसी अक्षरे या आंतर जालावरील संकेतस्थळावर विपुल लेखन केले आहे.)

वाचने 18571 वाचनखूण प्रतिक्रिया 63

लेखकाला मिपावरील सदस्यत्व मिळालेले नाही. बहुतेक तांत्रिक कारण असावे. लेख अर्थातच लेखकाच्या पुर्वानुमतीने टाकण्यात आला आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

पैसा 16/09/2016 - 10:55
ते मिपा सद्स्य आहेत. http://www.misalpav.com/user/22603 हे बघा. खाते अ‍ॅक्टिव्ह सुद्धा आहे. लॉग इन किंवा पासवर्ड प्रॉब्लेम असेल तर प्रशांतला काँटॅक्ट करायला सांगा किंवा संकेताक्षर परत मागवा लिंक वापरा म्हणावे.

अगदि योग्य घाव घातला आहे शेवटच्या परिच्छेदात लेखात उल्लेख केलेले मासिक कूठे मिळेल वर्गणीदार होता येइल का

चित्रगुप्त 09/09/2016 - 15:31
कल्पनाविस्तार म्हणून कथा ठीक असली, तरी शेवटी जो निष्कर्ष काढला आहे, तो वाचून आश्चर्य वाटले. एकाद्याने बंदुकीने खून केला म्हणून त्या बंदुकीलाच फाशी देणे वा तुरुंगात टाकण्यासारखा हा उपाय वाटला. विशेषतः योग, ध्यान (लेखकाच्या मते 'चित्रविचित्र' 'क्रेझी' गोष्ट) यांचा जर मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला तर समाज रसातळाला जाणार हे वाचून तर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले. आजच्या परिस्थितीतील बर्‍याच समस्या (आतंकवाद, ड्रग्स-दारू वगैरे व्यसने, गरिबी, अज्ञान, रोगराई, जंकफूड-बैठी जीवनशैली वगैरेतून निर्माण होणार्‍या व्याधि, व्यर्थ करमणुकीत वेळ घालवणे, परस्पर संबंधातील तणाव, इ.इ.) यांच्या मुळाशी -- अमर्याद स्वार्थ, सत्ता- संपत्ती- कीर्ती यांच्या अनिवार लालसेपायी निर्माण केले जाणारे जगड्व्याळ जाळे -- हे आहे, आणि त्याच्यावर उपायांपैकी एक योगसाधनेतून (यम-नियम-आसन-प्राणायम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी) स्वतःचे उन्नयन घडवून आणणे हा आहे. लेखकाच्या मते समाजाला रसाताळाला नेणार्‍या अन्य काही 'चित्रविचित्र' 'क्रेझि' संकल्पना म्हणजे 'ईश्वर, धर्म, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता' या आहेत. या सर्वांत मुळात गैर काही नाही, उलट या सर्वांचा सृजनशील उपयोग करणारांनी या आधारे शतकानुशतके उत्तमोत्तम काव्य, संगीत, साहित्य, कला, वास्तुकला एवढेच नव्हे तर पृथ्वीचे भौगोलिक सर्वेक्षण, इतिहासाचा अभ्यास वगैरे केलेले आहे. प्राचीन भारतातील ऋषिंचे आश्रम, युरोपातील चर्चच्या आधारे चालणार्‍या युनिवर्सिट्या, मठ वगैरेतून प्रचंड ज्ञानोपासना, संशोधन झालेले आहे. अर्थात अश्या गोष्टींना वेठीशी धरून जो धुमाकूळ जगभर घातला जात आहे, त्यामागे मनुष्याच्या चित्तातील दोष हे कारण आहे. लेखकाने त्याच्या मते 'क्रेझी' गोष्टीत 'राममंदिर' घुसडले आहे, यावरून त्याचा एकूण रोख कुणीकडे आहे हेही उमगते. या 'विवेकवादी वैज्ञानिकांना' मिपाच्या भाषेत "अभ्यास वाढवा" असे सांगावेसे वाटते.

In reply to by चित्रगुप्त

सतिश गावडे 09/09/2016 - 22:17
अर्थात अश्या गोष्टींना वेठीशी धरून जो धुमाकूळ जगभर घातला जात आहे, त्यामागे मनुष्याच्या चित्तातील दोष हे कारण आहे
कथाकारालाही हेच सांगायचं आहे असं वाटतं. शेवटचा परिच्छेद वाचायच्या आधीच हे देव आणि धर्मावरचं रूपक आहे हे लक्षात आलं होतं. :)

गामा पैलवान 09/09/2016 - 20:37
प्रघा, लेखकाने सांगितलेला हातोडामार खेळ सध्या पाकिस्तान व मध्यपूर्वेतल्या देशांत धूमधडाक्याने चाललाय. मात्र शेवटल्या परिच्छेदात याचा उल्लेखही नाही. वर चित्रगुप्त म्हणतात त्याप्रमाणे लेखकाने अभ्यास वाढवायला हवाय खरा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा इत्यादि इत्यादि म्हणावे. खर तर आपल्याला न पटणारी विचारश्रेणी हातोड्याच्या जागी घालता येईल. अवांतर- गापै तुमच्यासाठी खास! राजीव साने यांचा युट्युबरील व्हिडिओ पहा. https://www.youtube.com/watch?v=T60T7bjG36s https://www.youtube.com/watch?v=jCmvZehEn6E

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान 10/09/2016 - 20:25
प्रघा, तुमची कळकळ पोहोचली. त्याबद्दल धन्यवाद. पण कसंय की पहिल्या भागात पहिली दहा मिनिटे काहीच होत नाही. आता कोण बघणार उरलेले ५० मिनिटं! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तो एक निवांत कार्यक्रम आहे.समाजवाद मार्क्सवाद हिंदुत्ववाद अशा सर्व वादांचा समाचार घेतला आहे पहिला भाग फास्ट फॉरवर्ड करुन दुसरा भाग पहा

अरुण मनोहर 10/09/2016 - 05:27
लेखक स्वतः: देखील हातोडा संस्कृतीचा बळी आहे. शेवटी त्यानेही देव आणि धर्मावर हातोडा चालवला आहे!

अरुण मनोहर 10/09/2016 - 05:29
जो तो उठतो, तो फक्त हिंदू संस्कृतीवरच हातोडा मारतो. आता तर कोर्टाने देखील हाच सवाल करून एक याचिका खारीज करून टाकली.

In reply to by अरुण मनोहर

साहना 16/09/2016 - 10:47
हिंदू संस्कृतीवर हातोडा मारला असता आमच्या तुमच्या सारखे लोक सात्विक संतापाचे भयानक आण्विक क्षेपणास्त्र टाकतात. पण शांतीच्या धर्मावर हातोडा मारला असता शांतिदूत घरी येऊन नम्र पणे कानाखाली आवाज काढून शांतीचा संदेश देतात. म्हणून हिंदू धर्मावर हातोडे मारणे गरजेचे आहे. शेवटी भारतीय समाजाची झाली तेव्हडी अधोगती हिंदू धर्मामुळे झालीये पाकिस्तान आणि बांगलादेश पहा कसे प्रगती करताहेत.

चित्रगुप्त 10/09/2016 - 18:43
घाटपांडे साहेब, तुमच्या लेखनाचा मी मोठा चाहता असल्याने बर्‍याच काळानंतर तुमचे नाव बघून मोठ्या अपेक्षेने धागा उघडला, परंतु त्यात दुसर्‍याच कुणाचा लेख वाचून काहीसा विरस झाला. रुपक कथा मजेदार आहे खरी परंतु शेवटी साप म्हणून भुई धोपटण्यासारखा केलेला प्रकार काही पटला नाही. योग, ध्यान वगैरेंना 'क्रेझी कल्पना' समजणे, आणि यांच्यामुळे समाज रसातळाला जाईल हे तुम्हाला तरी पटते का? सदर लेखकाला योगाभ्यासाचा काही अनुभव आहे का ? पातंजलयोगसूत्र या अद्वितीय ग्रंथाचा काही अभ्यास केला आहे का? वैज्ञानिक म्हटला म्हणजे त्याने सतत देव धर्म योग यांचा विरोधच केला पाहिजे का ? मागे एकदा माशेलकरांशी बोलताना मी त्यांचे ज्योतिषविद्येबद्दल काय मत आहे असे विचारले होते, त्यावर ते म्हणाले की एक वैज्ञानिक म्हणून (being a scientist) मी ते मानत नाही. म्हणजे एकदा कोणी आपण म्हणजे अमूक एक असा शिक्का लावून घेतला की मग अन्य सर्व वाटा कायमच्या बंदच करून टाकायच्या का ? जिज्ञासा, कुतुहल, काही नवीन दिशा हुडकणे, आजवर ठाऊक नसलेल्या अनवट वाटांवर मुशाफिरी करणे हे सर्व वर्ज्य? मग कडवा धार्मिक आणि वैज्ञानिक यात फर्क तो काय ? तुम्ही स्वतः फलज्योतिष जातक, फलज्योतिष अभ्यासक , फलज्योतिष समर्थक ते फलज्योतिष टीकाकार अशा सर्व टप्प्यातुन प्रवास केलेला असल्याने तुमचे ज्योतिषाबद्दलचे दीर्घ स्वानुभवातून बनलेले मत ग्राह्य ठरेल, पण वैज्ञानिक म्हणून जन्मभर नोकरी केली म्हणून ठाऊक नसलेल्या विषयांबद्दल मतप्रदर्शन करायचे याला काय अर्थ आहे ? राजीव साने यांची मुलाखत बघणे सुरु केले आहे. शिक्षणाने इंजीनियर असून ते करत असलेली विविध क्षेत्रातील मुशाफिरी अतिशय कौतुकास्पद आहे. असे असले पाहिजे. त्यांचे लोकसत्तामधले गल्ल्त गफलत वाले सदर मी नेमाने वाचत असे आणि अतिशय आवडायचे. या व्हिडियोबद्दल इथे सांगितल्याबद्दल आभार. आणि हॅमर कल्चरच्या निमित्ताने काही विचारमंथन घडून आले, त्याबद्दलही.

In reply to by चित्रगुप्त

योग, ध्यान वगैरेंना 'क्रेझी कल्पना' समजणे, आणि यांच्यामुळे समाज रसातळाला जाईल हे तुम्हाला तरी पटते का?
अतिरेक टाळावा एवढाच मतितार्थ घ्यायचा आपण. तुम्हाला लेखनावरुन यनावालांची आठवण कशी आली नाही?

In reply to by प्रकाश घाटपांडे

गॅरी ट्रुमन 16/09/2016 - 19:43
अतिरेक टाळावा एवढाच मतितार्थ घ्यायचा आपण.
ही गोष्ट काही हजम झाली नाही. एकीकडे योग आणि ध्यान यांना चित्रविचित्र कल्पना म्हणायचे आणि त्याचा मतितार्थ अतिरेक टाळावा असा घ्यायचा? मुळात मुद्दलात योग आणि ध्यान यांना चित्रविचित्र कल्पना म्हणणे हाच प्रकार पटलेला नाही मग त्यावर तुम्ही म्हणतात तो मतितार्थ हे चढलेले व्याज पटणे शक्यच नाही. अर्थाअर्थी काहीच संबंध नसलेल्या दोन गोष्टींना मारून मुटकून एकत्र आणायचे आणि मग त्या एकत्र कशा याचे रिव्हर्स इंजिनिअरींग करायचे याला काय अर्थ आहे? समोर दिसत एक गोष्ट असली तरी त्यामागचा गूढ अर्थ वेगळाच अशा प्रकारचा दावा संस्कृतीरक्षक नेहमीच करत असतात.उदाहरणार्थ गणपतीचे डोळे बारीक म्हणजे ते लक्षपूर्वक बघा याचे प्रतिक आहे, कान मोठे म्हणजे ते लक्षपूर्वक ऐका याचे प्रतिक आहे इत्यादी इत्यादी मारून मुटकून पोस्ट फॅक्टो रिव्हर्स इंजिनरींग चालते तो प्रकार आणि कशाचा कशाशी संबंध नसताना आपल्या कल्पनेतून विविध मतितार्थ शोधून काढून मुळात डामाडौल पायावर उभ्या असलेल्या आर्ग्युमेन्टचे समर्थन करायचा प्रयत्न करणे हा प्रकार यात नक्की फरक काय? अतिरेक टाळावा हाच संदेश द्यायचा असेल तर मुळात काय कमी रूपके/ सुभाषिते आहेत म्हणून ओढूनताणून त्यात योग आणि ध्यानधारणा यांना त्यात ओढले आहे का?

In reply to by गॅरी ट्रुमन

चित्रगुप्त 16/09/2016 - 22:45
अतिरेक टाळावा हाच संदेश द्यायचा असेल तर मुळात काय कमी रूपके/ सुभाषिते आहेत म्हणून ओढूनताणून त्यात योग आणि ध्यानधारणा यांना त्यात ओढले आहे का?
अगदी हेच लिहीणार होतो. वयाच्या चौथ्या वर्षापासून 'अति तिथे माती' 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' वगैरे म्हणी ऐकतच असतो की आपण (म्हणजे आमच्या लहानपणी तरी म्हणींचा विपुल प्रयोग बोलण्यात व्हायचा) ते सांगायला एवढ्या कोलांट्या कशाला मारायला हव्यात वैज्ञानिकांना ? मिपावरील या धाग्यातील प्रतिसादांबद्दल काय म्हणणे आहे म्हणे आदरणीय वैज्ञानिकांचे?

In reply to by गॅरी ट्रुमन

सध्या ऐसी अक्षरे वरील एक प्रतिक्रिया पेस्टवतो स्वप्न

पुण्य: 1

मुलगी सुज्ञ होती. विचार करणारी होती. तिच्या पपाने तिला एक विवेकाची कास सोड्लेल्या समाजाची रूपक कथा सांगितल्याचे तिच्या चटकन लक्षात आले. या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पनेचा अतिरेक वापरला तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता. विसाव्या शतकाचा इतिहास वाचत असताना हा समाज अशा अनेक प्रकारच्या उपयोगी, कल्पक, मूल्याधारीत कल्पनांच्या अतिरेकाचा बळी झालेला होता हे तिच्या लक्षात होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हातोडयापासून चार हात दूर न रहाता अतिरेकापासून दूर रहाणे हेच शहाणपणाचे लक्षण ठरेल याची तिला खात्री पटली. जेवणात मीठ जास्त झाले म्हणुन माणूस मीठावरच बहिष्कार घालत नाही तर विवेक वापरुन मीठाचे प्रमाण ठरवितो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गॅरी ट्रुमन 17/09/2016 - 10:54
यात लाल रंगातील शब्द मुळच्या लेखात नव्हते.म्हणजे या प्रकारालाही पोस्ट फॅक्टो जस्टिफिकेशन करायचा प्रयत्न असे का म्हणू नये? चित्रविचित्र कल्पनांच्या त्या लीस्टमध्ये योग आणि ध्यानधारणा यांना सामील करणे हा प्रकार मुळातच गंडलेला आहे.आणि लाल अक्षरात लिहिलेल्या प्रतिसादातही योग आणि ध्यान यांना मुळात चित्रविचित्र कल्पना म्हटले आहे त्याचा प्रतिवाद काही केलेला नाही. तर त्यापुढे जाऊन मग अतिरेक करू नये वगैरे असे लिहिले आहे. म्हणजे इतरांनी आक्षेप घेतल्यानंतर काहीतरी सारवासारव करायची आहे म्हणून अतिरेक वगैरे गोष्टी नंतर घुसडल्या असे म्हटले तर काय चुकले?गणपतीची प्रतिमा ज्याने कोणी कधीकाळी शोधून काढली त्यामागची जी काही कारणे असतील ती असतील.पण मग त्यात विज्ञान कसे आहे--म्हणजे कान मोठे म्हणजे लक्षपूर्वक ऐका हे प्रतिक वगैरे गोष्टी जसे काहीसे केविलवाणे पोस्ट फॅक्टो जस्टिफिकेशन असते तसलाच हा प्रकार वाटला. विज्ञाननिष्ठ असणे म्हणजे तुम्हाला मान्य नाहीत त्या सगळ्या गोष्टींवर विनाकारण टिका करणे असा अर्थ होत नाही. भानामती-पंचक वगैरे गोष्टींवर टिका करायची असेल तर जरूर करा.तुम्ही अशा गोष्टींना एक वाईट म्हणाल तर मी त्यांना दहा वाईट म्हणेन.पण म्हणून योग आणि ध्यान यासारख्या गोष्टींवर टिका करून पुरोगामी सर्टिफिकिटे मिरवायचा प्रयत्न होत असेल तर तो केविलवाणा आहे एवढेच लिहितो. जे काही भारतीय परंपरेत आहे त्या सगळ्याच गोष्टींवर टिका केली की कसे मोठ्ठे बुध्दीवादी आणि पुरोगामी झाल्याचे समाधान अनेकांना मिळते त्यातला हा प्रकार नसावा अशी आशा आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

अहो ती ऐसी अक्षरे वरील स्वप्न या आयडी ची एक बोलकी प्रतिक्रिया आहे. लेखकाची नव्हे! अथवा माझी नव्हे. पण मला ती पटते. अतिरेक टाळावा हा मला अर्थ अभिप्रेत आहे त्याच्याशी सुसंगत आहे मूळ लिंक http://www.aisiakshare.com/node/5503

In reply to by गॅरी ट्रुमन

अहो ती ऐसी अक्षरे वरील स्वप्न या आयडी ची एक बोलकी प्रतिक्रिया आहे. लेखकाची नव्हे! अथवा माझी नव्हे. पण मला ती पटते. अतिरेक टाळावा हा मला अर्थ अभिप्रेत आहे त्याच्याशी सुसंगत आहे मूळ लिंक http://www.aisiakshare.com/node/5503

In reply to by प्रकाश घाटपांडे

श्रीगुरुजी 17/09/2016 - 13:26
अतिरेक टाळावा एवढाच मतितार्थ घ्यायचा आपण. तुम्हाला लेखनावरुन यनावालांची आठवण कशी आली नाही?
तथाकथित निधर्मी आणि पुरोगामी विचारवंतांनी सुद्धा छद्म धर्मनिरपेक्षतेचा, ढोंगी पुरोगामित्वाचा, भोंदू मानवतावादाचा, दांभिक पुरोगामित्वाचा अतिरेक टाळावा असा पण मथितार्थ घेता येतो.

हेमन्त वाघे 10/09/2016 - 19:28
Stop, Hammer time! Go with the flow, it is said If you can't groove to this then you probably are dead So wave your hands in the air Bust a few moves, run your fingers through your hair This is it, for a winner Dance to this and you're gonna get thinner Move, slide your rump Just for a minute let's all do the bump, bump, bump, bump Yeah... (You can't touch this) Look, man (You can't touch this) You better get hype, boy, because you know you can't (You can't touch this) Ring the bell, school's back in Break it down! Stop, Hammer time!

तसेच उपक्रम, ऐसी अक्षरे या आंतर जालावरील संकेतस्थळावर विपुल लेखन केले आहे.
बरोबर. उपक्रमावर यनावाला आणि नानावटी साहेबांनी विपूल लिखाण केले आहे. बर्‍याच वेळा जर लेखकाचे नाव न वाचताच लेख वाचला तर तो यनावालांचा की नानावटींचा हे ओळखणेही अवघड असे. एकंदरीत दोघांच्याही लिखाणाचा बाज सारखाच होता. अवांतर : मी मागे कोणत्यातरी धाग्यावर विचारलेला प्रश्न परत विचारत आहे. उपक्रमावर समाजाला सुधारण्याचा मक्ता घेतल्यासारखे बुद्धीवाद्यांचे लेख पडत असल्यामुळे ते बंद पडले काय ? असा प्रश्न मला नेहमी पडतो त्याचे उत्तर काही केल्या मिळत नाहिये. बाकी लेख उपक्रमीय टाईपचाच असल्याचे नोंदवून खाली बसतो.

In reply to by गणामास्तर

चंपाबाई 16/09/2016 - 23:00
माझ्या हेतूबद्दलच ते विचारलं. प्रभाकर नाव पारश्याचे असू शकते तर माझे नाव गजानन असेच ठेवुन मी मुसलमान होउ शकतो का , या हेतूने ते विचारले होते.

In reply to by चंपाबाई

राही 16/09/2016 - 23:47
चंपाबाई, ते मूळ नाव नाणावटी असे आहे आणि ते गुजराती नागर ब्राह्मण समाजात आढळते. नाणावटी म्हणजे पैसा वटवणारे. मनीचेंजर्स. हा धंदा करणार्‍या काही पारशांचे नावही नाणावटी पडले. गंभीर प्रतिसादाबद्दल क्षमस्व.

In reply to by राही

ते कानडी आहेत बेळगावचे! अवांतर-अ.रा. कुलकर्णी यांच्या शिवकालीन महाराष्ट्र काही आडनावांचे उगम दिले आहेत. त्यात घाटपांडे हे कोकण व घाट या मधल्या व्यापारी वाटा होत्या तिथे जकात नाक्यावरचे अधिकारी होते असा उल्लेख आढळतो.

In reply to by राही

चंपाबाई 17/09/2016 - 09:00
मलाही गुगलवर हाच संदर्भ मिळाला होता.. नाणे पैसा याच्याशी संबंधित ... पण रुस्तुम षिनेमात नानावटी पारशी दाखवला आहे, म्हणून कुतुहल वाटलं ... तसे तर आडनाव व धर्म यांचा संबंध नाही.

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 18/09/2016 - 12:32
जोशी हेही आडनाव आढळतं. दादर पारशी काॅलनीच्या प्रवेशद्वाराजवळ तिचे संस्थापक मंचेरजी जोशी यांचा पुतळा आहे.त्यामुळे नानावटी हे आडनाव आढळल्यास नवल नाही.

In reply to by डँबिस००७

चित्रगुप्त 16/09/2016 - 22:51
कुणाला कशाचं अन बोडकीला केसाचं
एकदम चपखल म्हण सांगितलीत. (हल्लीच्या तरूण पिढीला मुळात 'बोडकी' म्हणजे काय हेच ठाऊक नसणार). अहो त्या रुस्तुम सिणेमात अशक्य कुमाराचं आडनाव नानावटी आहे ना, म्हणून विचारलंय बाईंनी तसं. इथे याही गोष्टींचा सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या. नानावटी म्हणजे पार्शी का ? याचे वैज्ञानिक उत्तर काय आहे ?

ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर कळलं कळलं कळलं. म्हणजे हे सगळं नसताना मानव, समाज वगैरे अगदी सुखी असेल असा लेखकाचा ग्रह दिसतो. पण तसं होतं का हे वैज्ञानिक लेखकाने एकाग्र चित्ताने मनन करून पहावे.

साहना 16/09/2016 - 10:43
समजा दादोजी कोंडदेवांनी हीच कथा शिवाजी महाराजांना सांगितली असती. आणि खाली तात्पर्य म्हणून हे स्वराज्य, हिंदू रक्षण इत्यादी इत्यादी हातोड्या प्रमाणे आहे उगाचं इतर लोक असे व्हायला पाहिजे म्हणतात म्हणून तू नको करुस बाळा. कशाला उगाच मराठी माणसाचे रक्त सांडायचे. आदिलशाही तुला सरदार करेल नाही तरी. किंवा भगातसिंगच्या वडिलांनी:"हे स्वातंत्र्य वगैरे हातोड्या प्रमाणे आहे पुत्तर, उगाच गांधी, बोस करतात म्हणून तू असल्या फंदात नको पडूस तिकडे पोस्टांत नवीन कारकून पाहिजेत तू अँप्लिकेशन टाक आणि डझनावर मुले तयार कर म्हटले असते तर चालले असते का ?" आपल्या साठी चांगले काय आणि वाईट काय हे समजण्याची ताकत बहुतेक सामान्य लोकांत असते. ह्या उलट इतर लोका साठी चांगले काय आणि वाईट काय हे समजण्याची ताकत अतिशय बुद्धिमान लोकांत सुद्धा नसते. आपण उगाच जज ड्रेड होण्यापेक्षा त्यांना आपले मार्ग चोखाळू देण्यातच शहाणपणा आहे. राम मंदिर आणि हातोड्यातील साम्य मला तरी समजले नाही. राम मंदिर मुद्यामुळे हिंदू समाज एक झाला, एक नवा राजकीय पर्याय निर्माण झाला, सेकुलर ढोंगीपणा उघड पढला, इस्लामिक मूर्तिभंजकांच्या इतिहासाला जास्त लोकांनी वाचले आणि कोर्टाचा निकाल वाचला तर शेवटी मंदिर वाल्यांची बाजू न्याय्य होती असे सुद्धा सिद्ध झाले. किमान डाव्या इतिहासकारांची सपशेल हार झाली ह्यांत शंका नाही. काही वाईट गोष्टी झाल्या तरी समाज नामशेष होईल असले काहीही झाले नाही. उगाच रूपक कथेतील लहान मुलांच्या डोक्यांत भलत्यासलत्या गोष्टी घालू नये हीच कथा आपल्या स्वतःच्या मुलीला सांगून बघा.

पगला गजोधर 16/09/2016 - 18:28
अतिशय छान गाभा असलेले रूपक. लेखकाचे अभिनंदन परंतु लेखकाने, काही लोकांकडून टोमणे आदी गोष्टींसाठी तयार राहावे ही विनन्ती ! उदा. बुबुविपुमाधविंची (बुध्दीजीवी बुध्दीप्रामाण्यवादी विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंत) यापैकी कुठल्याही शब्दाने/ त्याच्या शब्दांपासूनच्या अपभ्रंशाने (उदा फुरोगामी ) टोमणे हिणकस शेरे वाट्याला येतील. थोडक्यात अश्या लोकांकडून शाब्दिक हातोड्याच्या घावांसाठी तयार राहा.....

गॅरी ट्रुमन 16/09/2016 - 19:02
हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता.
रूपक आवडले पण या शेवटच्या अनुमानातील काही गोष्टी खटकल्या. योग आणि ध्यान या चित्रविचित्र कल्पना आणि त्यामुळे समाज रसातळाला जाणार? असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

पगला गजोधर 16/09/2016 - 19:42
योग आणि ध्यान या चित्रविचित्र कल्पना आणि त्यामुळे समाज रसातळाला जाणार?
योग आणि ध्यान या गोष्टी मानवतेला अतिशय पूरक व चांगल्या आहे. वाईट आहे ते, त्याच्या नावाखाली होणारी फसवणूक / धार्मिक तेढ इ इ

वामन देशमुख 16/09/2016 - 22:20
या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता.
हे वाचून हे असले सॉफ्ट पॉइझनिंग टाइप लेख लिहायला प्रकाश घाटपांडे आणि प्रभाकर नानावटी अश्यासारख्यांना किती मोबदला मिळत असेल असा प्रश्न पडला.

In reply to by वामन देशमुख

चंपाबाई 16/09/2016 - 23:04
तुम्ही वामनावतार धारण करुन त्यांच्या डोस्क्यावर पाय द्या. अरे हो ! ओणमच्या शुभेच्छा... साउथवाले लोक ओणमला बळीची पूजा करुन खीर खायला देतात.

In reply to by वामन देशमुख

सगळे मोबदल्यासाठी लिहित नसतात. विचार मंथन होणे महत्वाचे असते. बाकीच्यांनी प्रतिवाद केले. त्यांना हा प्रश्न पडला नसावा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

वामन देशमुख 17/09/2016 - 22:53
सगळे मोबदल्यासाठी लिहित नसतात.
बाकी सगळ्यांचं सोडा, तुम्ही धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारच्या, असंख्य लोकांच्या सकारात्मक श्रद्धेला चित्र-विचित्र कल्पना असं लेबल लावून त्यावर
विचार मंथन होणे महत्वाचे असते.
असं म्हणताय यावरून तुमचा हेतू आणि कृती किती विकृत आहेत हे कळून येते.
बाकीच्यांनी प्रतिवाद केले. त्यांना हा प्रश्न पडला नसावा.
सर्वांना एकाच प्रकारचे प्रश्न पडावेत असा काही नियम आहे का? तुमचे लिखाण हे इन्डायरेक्ट मार्केटींगचं उत्तम उदाहरण आहे आणि मोबदल्याशिवाय मार्केटिंग कशी होईल?

हेमन्त वाघे 17/09/2016 - 13:14
शेफाली वैद्य यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार - केवळ त्यांच्या आडनावामुळे नव्हे तर निव्वळ त्यांच्या उज्ज्वल स्वकर्तृत्वामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सध्याचे सर्वेसर्वा बनलेले थोर विचारवंत श्री हमीद दाभोळकर (कोण रे तो घराणेशाही, घराणेशाही म्हणून ओरडतोय? गप्प करा त्याला. लोकशाहीविरोधी फाशीष्ट कुठला! ). तर असे थोर्थोर विचारवंत श्री हमीद दाभोळकर ह्यांनी 'मातीची बकरी' ह्या मोहिमेवरचे त्यांचे मौलिक विचार नुकतेच व्यक्त केले. सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार बकरी ईदला खरीखुरी जिवंत बकरी कुर्बान न करता त्याऐवजी 'मातीची बकरी' करून ती कुर्बान करावी अशी एक मोहीम काही लोकांनी राबवली होती. थोर्थोर विचारवंत श्री दाभोळकर ह्यांच्या मते ही मोहीम चुकीची असून 'धर्माधर्मात तेढ वाढवण्याच्या खोडसाळ उद्देश्याने चालवलेली आहे'. 'धार्मिक संकल्पनांचे निव्वळ स्वतःला हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा लोकांनी प्रयत्न करायला हवा' असे समंजस, मानवतावादी वगैरे आवाहनही त्यांनी लोकांना केले. हमीद गुर्जींचे म्हणणे आहे की ईदला बकरा कापणे ह्या धार्मिक संकल्पेनाला भावार्थ आहे, पण दसऱ्याला बळी दिला तर ती मात्र अंधश्रद्धा असून त्या अंधश्रद्धेचा कसून विरोध करायला पाहिजे बर्का मुलांनो? आणि हो, ह्याला दुटप्पीपणा म्हणत नाहीत, हा एक थोर पुरोगामी विचार आहे. तेव्हा वाजवा आता जोरदार टाळ्या!

In reply to by हेमन्त वाघे

हा तसा वेगळा विषय आहे. अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे इथे त्याची चर्चा झालेली आहे.

परवा कौशल इनामदार यांचा गणपतीला नैवेद्य गोंगाटाचा हा मटा मधील लेख वाचला आणी मला नानावटींच्या या हॆमर कल्चरची आठवण झाली. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/ganapati-viarjan-in-dance/articleshow/71025185.cms

जॉनविक्क 13/09/2019 - 12:47
निराशा झाली.
ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता.
योग, ज्ञान, राममंदिर याचा उल्लेख खटकला. मुलगी बिंडोक असावी.
या चित्रविचित्र कल्पनांच्या यादीत विज्ञान बसेल काय हो? सहज सुचलं म्हणून विचारलंय. चर्चा व्हावी.
नाही विज्ञान नेमके हॅमरच्या उलट आहे. ते आपणास चिकित्सेची संपुर्ण मुभा देते. ( श्रद्धा/समज/भाव) = (भावनेची एखादी गोष्ट खरी मानायची ताकतवान इंटेसीटी.) (बुद्धीला मात्र पटलेली अनुभवाला न आलेली ती गोष्ट)

गामा पैलवान 14/09/2019 - 12:20
जॉनविक्क,
नाही विज्ञान नेमके हॅमरच्या उलट आहे. ते आपणास चिकित्सेची संपुर्ण मुभा देते.
चुकलो मी. मला तंत्रज्ञान म्हणायचं होतं. माझं सुधारित म्हणणं असं की भल्याबुऱ्याचा विचार न करता दिसेल ते तंत्रज्ञान वापरण्याने रूपककथेतला समाज रसातळास जाईल काय? चर्चा व्हावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जॉनविक्क 14/09/2019 - 15:45
इतर कशाने रसातळास जाओ न जाओ, भल्याबुऱ्याचा विचार न करता दिसेल ते तंत्रज्ञान वापरण्याने रूपककथेतला व कथेबाहेरीलही समाज नक्कीच रसातळाला जाउ शकतो न्हवे कायमचा नाहीसाही होउ शकतो.