पावसाच्या सरी येऊन जमिनीला भिडल्या, की बालपणीच्या अनेक जुन्या आठवणी सरींसारख्या बरसू लागतात. पाऊस आणि माझं एक जिव्हाळ्याचं नातं आहे.
मी शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. माझे आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. शेतकरी आणि पावसाचं एक जिवाभावाचं नातं असतं. मे महिना आला की शेतकरी वाट पाहू लागतात ते काळ्या ढगांची, गार गार वार्याची, मातीला सुगंध देणार्या, बी-बियाणांचे मातृत्व स्वीकारणार्या पहिल्या सरीची.
पावसाचे आगमन आपल्या शेतांमध्ये होणार म्हणून आम्ही मे महिन्यापासूनच वर्षाऋतूच्या स्वागताच्या तयारीला लागायचो. मे महिन्याच्या दाहक उन्हात मातीची ढेपळं खडखडीत वाळून शेतातील जमिनीला भेगा पडल्याने आकाशाकडे पाण्याच्या आशेने 'आ' वासून पावसाच्या प्रतिक्षेत असतात. आमच्या शेतात तांदूळ पिकवला जायचा. पाच-सहा शेतांपैकी एक शेत खास म्हणजे बी पेरणीसाठी असे. त्याला आम्ही 'राबाचे शेत' म्हणत असू. राब म्हणजे महिनाभर आधीपासून जमलेला पालापाचोळा ह्या शेतात टाकायचा आणि तो जाळायचा. त्यामुळे शेतातील तणाचे (गवत) बी जळून मातीही भुसभुशीत होते. हा राब जाळताना, जाळलेल्या पाल्याच्या धुराचा एक वेगळाच गंध येतो. रस्त्याने जाताना आजही कुठे तो वास आला की मला पूर्वीची जुनी मैत्रीण भेटल्याप्रमाणे आनंद होतो. राब करताना आम्हा बच्चेकंपनीची त्यात लुडबुड असायचीच. राब लावला की सुकलेलं गवत वगैरे ताडताड आवाज करत पेटायचं, तेव्हा दिवाळीतील फटाके वाजल्याचा आनंद होत असे. ह्या आवाजाने छोटे पक्षीही आवाज करत इकडे तिकडे सैरभैर फिरत असत. मे महिना असल्याने वाडीत जिकडे तिकडे आंब्याचे बाठे पडलेले असत. मग आम्ही बच्चेकंपनी हे बाठे गोळा करायचो आणि त्या आगीमध्ये भाजून ते फोडून त्यातली कोय खायचो. कोय कडवट लागते पण त्याच्यावर पाणी प्यायले की आवळ्याप्रमाणे गोड चव येते. तो कडू रानमेवाही आम्ही चवी-चवीने खायचो.
राब हा मे महिन्याच्या दाहक उन्हात केला जाई. राबासकट सगळ्या शेतांची नांगरणी होत असे. मग प्रतीक्षा असे ती गार गार, हिरवे स्वप्न साकार करणार्या पावसाच्या सरींची. पण तेव्हा पाऊस फसवा नव्हता, वचन दिल्याप्रमाणे अगदी ७ जूनला बरोबर स्टेशनवर उतरायचा. ७ जूनची मी वाढदिवसासारखी वाट बघायचे. कारण पहिल्या सरीत चिंब भिजायला मिळायचे. पहिल्या पावसात भिजल्यावर त्वचेची रोगराई निघून जाते म्हणून आई स्वतः ह्या पहिल्या पावसात मला भिजायला सांगायची. पहिला पाऊस मातीला येऊन भिडला की जो अनोखा सुगंध दरवळतो तो माझ्या मनाला अजून भिडतो. त्या पहिल्या सरी, तो मातीचा सुगंध आणि ते पावसात-
ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
ये गं ये गं सरी, माझे मडके भरी
सर आली धावून, मडके गेले वाहून
हे गाणं गुणगुणत, गुणगुणत कसलं, मोठ्याने ओरडतच मनसोक्त भिजायचे. त्या गार गार सरींनी कधी कधी थंडी पण वाजायची. पण त्या कुडकुडण्याचा आनंद विलक्षण होता.
मी शाळेतून एकदा घरी आले की लगेच शेतात धाव घेत असे. पावसाच्या सरींना सुरुवात झाली, जमीन भिजली की राबाच्या शेतात भात (तांदळाचे बियाणे) पेरला जाई. भात पेरायला मी पण मध्ये मध्ये लुडबुड करत असे. तो मुठीत धरून फेकायला मौज वाटत असे. त्या भातकणांची टोके मुठीत हलकेच आवळून त्यांच्या खुणांची तळहातावर झालेली डिझाइन पाहणे हा तेव्हा छंदच होता. ते भातकणांचे टोचणेही तेव्हा सुखद वाटे.
काही दिवसांतच पेरलेल्या बियांतून कोवळे अंकुर निघत. जर जोरदार पाऊस पडला तर अंकुर पाणी साठल्यामुळे दिसायचे नाहीत. पण हलक्या सरी पडल्या तर अंकुर फुटलेले व हळूहळू नवीन जन्माला आलेली बाळरोपं बाळसं धरताना पाहून फार आनंद होत असे. अनेकदा ह्या कोवळ्या ओल्या रोपांवरून मी अलगद हात फिरवत असे. बाळसं धरलेल्या रोपांच्या शेताचा अगदी हिरवा गालिचाच तयार होत असे. ह्या गालिच्याला म्हणजेच त्या रोपांना आमच्याकडे 'आवण' म्हणतात. हे आवण तयार होईपर्यंत पाऊस चांगलाच जोर धरत असे. आवणाच्या शेतात बांध बांधला जाई त्यामुळे त्या शेतात पाणी साठून रोप चांगले वाढत असे.
एकदा का हे आवण तयार होत आले म्हणजे, ते इतर शेतांमध्ये रुजण्याएवढे वाढले, की इतर नांगरलेल्या शेतांमध्ये आळी फिरविली जात. आळी म्हणजे नांगराला फळी बांधून त्याने नांगरलेले शेत सपाट म्हणजे ढेपळे सारखी केली जात. फळी नसेल तर मोठ्या झाडाची एखादी मजबूत फांदी तोडून ती लावली जात असे. ह्या आळीवरती वजन ठेवणे आवश्यक असे. मग त्यावर एखादा मोठा दगड बांधला जाई किंवा घरातील लहान मुलांना बसविले जाई. आमच्या शेतांमध्ये आळी कधी फिरवायची ह्याची मी वाटच पाहत असे आळीवर बसण्यासाठी. मस्त गाडी गाडी खेळल्याची मजा यायची. सोबत ढवळ्या-पवळ्या व त्यांचा मालक कधी त्यांना ओरडत तर कधी मायेने गोड बोलून त्यांच्याकडून आळी फिरवून घेत. आळी फिरवताना पाऊसही यायचा. नाहीच आला तरी शेतातील चिखलयुक्त पाणी भिजवायचेच मला. पण तेव्हा कुठे त्याची तमा असे?
शेतांना आळी फिरवून झाली की लावणीची लगबग चालू होत असे. लावणी चालू झाली म्हणजे घरात काहीतरी सणवाराची लगबग आहे असे वाटे. लावणीच्या हंगामात आई शाळेला सुट्टी घ्यायची आठवडाभर. कारण शेतावर लावणीसाठी मजूर बायका-माणसे येत. घरातही आई-आजीची कामे उरकण्याची घाई होत असे. त्यांच्या चहा-पाण्याची सोय करावी लागे. आम्ही घरातील सगळेच ह्या माणसांबरोबर शेतात उतरायचो. कोणतेही शेताचे काम चालू करताना पहिला नारळ फोडून 'शेत चांगलं पिकू दे,' म्हणून देवाला प्रार्थना केली जात असे व गोड प्रसाद वाटला जात असे. पहिला आवण खणण्याचा म्हणजे रोपे उपटण्याचा कार्यक्रम असे. आवणाच्या शेतात उतरण्या आधी वडील नारळ फोडत व सगळ्यांना जिलबी किंवा म्हैसूर वाटत. सगळ्यांचे तोंड गोड झाले की आवण उपटून त्यांची हातात मावेल इतकी जुडी बांधली जायची. त्याला आम्ही गुंडी किंवा मूठ म्हणायचो. शेतांमध्ये ढोपरापर्यंत पाणी असे. ह्या गुंड्या बांधून त्याच शेतात टाकायच्या व पुढे आवण उपटत जायचे. मागे राहणार्या गुंड्या पाण्यावर तरंगत असतात. आवण खणताना एक वेगळाच सुगंध येतो भाताच्या रोपाचा. तेव्हा तो नेहमीचा वाटे पण आता कुठे आला तर जुन्या आठवणींनी मन गलबलून जाते. एकदा का आवण खणून झाले की मुठी मोठ्या टोपलीत गोळा केल्या जात व इतर शेतांमध्ये अंतरा-अंतरावर फेकल्या जात. हे फेकाफेकीचे काम करण्यातही मजा यायची. कधी कधी सैल बांधलेली मूठ फेकताना सुटून पसरत असे. मग ती तुझी, ती अमकीने बांधलेली असेल असा बायकांचा आरडाओरडा चालत असे. कोण काम जलद करतं, कोण हळू करतं ह्यावरही कुजबुज होत असे. ह्या दिवसांमध्ये पाऊस दिवसरात्र पडायचाच. मजूर मेणकापडाचे डोक्यावर टोक (टोपीसारखे बांधून) बांधून अंगभर झग्यासारखे सोडायचे. आई-वडील रेनकोट घालायचे. मलाही रेनकोट होता पण मला त्या मजुरांसारखा पोषाख आवडायचा म्हणून मी मिळेल ते प्लॅस्टिकचे कापड घेऊन त्यांच्यासारखे हट्टाने बांधून घ्यायचे. जोराचाच पाऊस आला की आई घरी जायला सांगायची पण मी कुठल्यातरी झाडाखाली जाऊन बसत असे.
मुठी फेकून झाल्या की लावणीला सुरुवात व्हायची. लावणी करायला मला खूप आवडायची. मला लावणी ताला-सुरात केल्या सारखी वाटे. मनोरंजनासाठी बायका गाणी गात तर कुठल्या गोष्टी सांगत, नाहीतर कोणाला भूत दिसले, कोणी कोणाला मारले, कोणाची सासू छळते, कोणाची सून भांडखोर आहे, अशा खबरांची बरसात चालू असे. पण माझे विश्व वेगळेच असे. मी कधी कलात्मक रोपे खोचत असे. मग घरातील, मजूर लोक माझे कोडकौतुक करत की किती भराभर लावते, किती छान लावते, हिनेच अर्धे शेत लावले. तेव्हा मला ते खरेच वाटायचे. ही रोपे जमिनीत रोवताना कधी कधी टणक मातीमुळे बोटे दुखायची. पण कोणाला सांगायचे नाही, नाहीतर ही मौज करायला मिळणार नाही, आपले कौतुक होणार नाही! रोपे लावून कंटाळा आला की शेताच्या बांधावरच्या मातीने भातुकलीची खेळणी बनवायची, तसेच शेतातल्या चिखलात मनसोक्त खेळायचे. कधी त्यात उड्या मारायचे तर कधी थेट शेतात बसून पोहण्याची नक्कलही करायचे. हे पाहून मात्र घरच्यांचा ओरडा मिळायचा. मग तात्पुरते बंद करायचे. त्यांचे लक्ष नसले की परत चालू करायचे. शिवाय शेतात माखून झाल्यावर आमच्या विहिरीला जो थाळा होता त्या थाळ्याच्या स्वच्छ व गार पाण्यात चिखल काढण्यासाठी डुंबायला मिळायचे.
शेतावर काम करणार्या मजुरांसाठी सकाळी व दुपारी चहा व नाश्ता म्हणून टोस्ट किंवा बटर आणायची आई. हा चहा आणि खाऊ पावसापासून बचाव करत शेतावर आणावा लागे. मग एका झाडाखाली बसून सगळ्यांना चहा आणि टोस्ट किंवा बटर वाटले जात. हे वाटताना तसेच खाताना झाडाचे टपोरे थेंब मात्र चहा तसेच टोस्ट बटरांवर पडत. चहात टाकण्याआधीच ते थोडे नरम होत. त्याची एक वेगळीच मजा आणि चव लागायची. मला ती आवडायची.
ही अशी वर्षाऋतूतील लावणी आठवडाभर चाले. पावसातली शेतावरची मौज त्या ८-१० दिवसांत मी अगदी पुरेपूर करून घेत असे. ह्या दिवसांत रात्री जास्त अभ्यास करावा लागे.
शेतीची लावणी झाली तरी वर्षाऋतूचा आनंद त्याच्या समाप्तीपर्यंत मी लुटत असे. आमच्या घरासमोरच मुख्य रस्त्याला लागून विरा (समुद्राला मिळणारा मोठा नाला) आहे. हा विरा धोधो पावसात तुडुंब भरून वाहत असे व त्याचे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असे. हा वाहणारा विरा माझ्या मौजेसाठी वरदानच असे. ह्या तुडुंब वाहणार्या विर्यामुळे शाळेत जाताना त्या डोफाभर पाण्यात डुबुक डुबुक करत चालण्याचा आनंद मिळायचाच शिवाय भिजल्यामुळे शाळेतून शिक्षकही घरी लवकर सोडायचे. कधी कधी तर पावसाने जास्तच जोर धरला तर घरातूनच मला शाळेला सुट्टी मिळे, कारण विर्याच्या पाण्याला लोट येत असे. माणसे विर्याच्या दिशेने खेचली जायची म्हणून आई-वडील मला शाळेत पाठवायचेच नाहीत. मग काय दिवसभर पावसाची मजा अनुभवायची. अंगणासमोरच्या जमलेल्या पाण्यात होड्या सोडायच्या, शेवंती, अबोली, जास्वंदी, मोगरा ह्या सारख्या झाडांची बोखे, फांद्या तोडून पावसात लागवड करायची. आईला सुट्टी असेल तर आई अशा गारेगार वातावरणात गरम गरम बटाटेवडे, कांदाभजी बनवायची. ते खाण्याच्या मजेचे काही वर्णन करायलाच नको.
पाऊस सुरू झाला म्हणजे पावसाची मोठी आठवण म्हणजे बाहेर तसेच घरात फिरणारी जनावरे. आमच्या घरात दरवर्षी न चुकता सूर्यकांडार येत असे. कधी कधी वडील, भाऊ आजूबाजूच्या लोकांना बोलवून त्यांना मारत असत तर कधी त्यांना जीवनदान देत असत. लहान असताना पावसाळ्यातल्या ह्या सूर्यकांडारींची मात्र मला भीती वाटायची. कारण ही चावली तर सूर्य उगवायच्या आत माणूस मरतो, हे मनावर बिंबले होते. तसे इतर सापही असायचे फिरत आजूबाजूला. अजूनही असतात. त्यात नाग, अजगर, फुरशा, धामण, पाणशिरडा, नानेड्या ह्यांचा समावेश असायचा. ह्यांची कधी जास्त भीती वाटली नाही. त्यातले पाणशिरडा आणि नानेड्या हे तर निरुपद्रवीच.
पावसात एक खेळ असायचा तो म्हणजे अंगणात येणार्या खेकड्यांना कोणाकडून तरी पकडून घेऊन त्यांना दोरा लावायचा आणि आपल्याला हवे तिथे फिरवायचा. पाणी डबक्यात, शेतात साठले की बेडकांची डराव-डराव रात्री चालू होत असे. पावसाळ्यात दिवे लागले की पंखवाल्या माश्या घराचा ताबा घेत. ह्या खूप सतावायच्या. ह्यांच्या बंदोबस्तासाठी आई बल्ब/ट्यूब खाली परातीत पाणी ठेवत असे. मग बल्ब/ट्यूबचे प्रतिबिंब पाण्यात पाहून माशा त्या पाण्यात पडून मरायच्या. डासांसाठी धुरी केली जायची. ह्या धुरीत धूर होण्यासाठी ओले गवत टाकले जायचे. त्याचा एक विशिष्ट वास यायचा.
पावसात येणारे सुखद कीटक म्हणजे काजवे. हे काजवे रात्री झाडावर दिवाळीच्या लाइटिंग प्रमाणे झगमगत. त्यांचा तो हिरवा कंदील मला अजून मोहक वाटतो. पूर्वी त्या बिचार्या काजव्यांना पकडून मी काचेच्या छोट्या डबीत ठेवत असे तर कधी त्यांचा प्रकाश पाहण्यासाठी पूर्ण काळोख करत असे.
असा हा वर्षाऋतू. अजूनही आठवणी थांबवायला मन तयार होत नाही. खूप काही लिहावंस वाटतं. पावसाळ्यातला हिरवागार होणारा निसर्ग, चिखलात उगवणारी कमळे, विर्यांतून शेतात येणारे मासे, पावसात हाताने पाणी काढता येईल इथवर भरणारी विहीर, उगवणारी रानफुले व ती गोळा करण्याचा माझा छंद, पावसाळी भाज्यांची लागवड, करांदे, हळदी अशी कंदमुळे खणणे, पावसाळी रानभाज्या, पावसातली ओली प्राजक्ताची फुले, मला घाबरवणारा विजांचा गडगडाट, सोसाट्याचा वादळी वारा, टप टप पडलेल्या गारा, पावसातले सणवार आणि अजून कितीतरी गोष्टी वर्षाऋतूने माझ्या सुखद आठवणींच्या गाठोड्यात जोपासून ठेवल्या आहेत.
मायबोली दिवाळी अंक २०१४ मध्ये प्रकाशीत
प्रतिक्रिया
14 Jul 2016 - 4:12 pm | पिशी अबोली
खूप सुंदर!
14 Jul 2016 - 4:13 pm | अंतरा आनंद
कसलं भन्नाट लहानपण आहे तुमचं! आणि लिहीलयसुद्धा फार छान.
14 Jul 2016 - 4:27 pm | स्मिता श्रीपाद
किती सुरेख लिहिलय्स ग....
खरच नशीबवान आहेस तु..
सूर्यकांडार म्हणजे काय ?
15 Jul 2016 - 12:23 pm | संजय पाटिल
सूर्यकांडार म्हणजे एक प्रकारचा विषारी साप!! कोकणात हे असतात. सूर्यकांडर व चंद्रकांडर असे त्यात दोन प्रकार आहेत.
15 Jul 2016 - 12:30 pm | जागु
चंद्रकांडार पहिल्यांदाच ऐकल. माहीतीत भर. धन्यवाद.
15 Jul 2016 - 12:54 pm | सुबोध खरे
सूर्य कांडार, चंद्र कांडार ही भीतीदायक सापांची नावे आम्ही लहानपाणी आमच्या आजोळी नागाव ( अलिबाग जवळ) येथे ऐकली होती. पुढे डॉक्टर झाल्यावर मी त्याचा शोध घेत असताना एकदा डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांना भेटण्याचा योग्य आला त्यांच्याशी चर्चा करताना हे साप म्हणजे मण्यार हे समजले. दापोली दाभोलकडे हिला कांडोर म्हणतात
पावसात बिळात पाणी शिरले की उंदीर कोरडी जागा शोधायला रात्री घरात घुसतात त्यांच्या मागावर मण्यार घरात घुसते. उंदीर आपले अंथरूण उबदार असते म्हणून त्यात शिरतात आणि त्याच्या मागे मण्यारही. आपण कुशीवर वळलो किंवा तिच्यावर हात किंवा पाय पडला तर मण्यार चावते. दुर्दैवाने तिचे विष हे बधिर करणारे असल्याने झोपेत मण्यार चावली तर माणसाला समजत नाही आणि सकाळ पर्यंत माणूस बेशुद्ध होतो किंवा मरतो. म्हणून ही सूर्य कांडारिची आख्यायिका आहे. दिवसा उजेडी भातशेतीत काम करताना चुकून मण्यारीवर पाय पडला तर ती चावते आणि यामुळे माणूस रात्र होईस्तोवर मरतो म्हणून तिला चंद्र कांडार म्हणतात.
15 Jul 2016 - 12:58 pm | जागु
ओके म्हणजे सापाचा प्रकार तोच. फक्त कधी चावते त्यावर अवलंबून आहे सुर्यकांडार म्हणायचे की चंद्रकांडार.
14 Jul 2016 - 4:29 pm | वटवट
सीनेमे जलन वाला फील येत आहे.
अ फा ट.... लिहिलंय पण भारी...
डोफाभर पाणी.... डोफा म्हणजे काय?
14 Jul 2016 - 4:33 pm | पलाश
एका छोट्या मुलीच्या जगातला पावसाळा अगदी सुंंदर पद्धतीने सामोरा आला आहे. हे लेखन फार फार आवडलंं.
14 Jul 2016 - 4:34 pm | वैदेहिश्री
खूप छान लिहिलं आहे. डोळ्यासमोर चित्र उभं राहील.
14 Jul 2016 - 4:44 pm | अजया
वा! फार सुंदर.नुकतंच इथल्या लावणीच्या कामात चक्कर टाकून आले होते.त्यामुळे अजूनच जवळचं वाटलं.
14 Jul 2016 - 4:45 pm | एस
फारच छान. ढेकळे फोडण्याला देशावर वेगळे नाव आहे. बहुधा तिफणणी की काही. या फळकुटावर बसायला लहानपणी खूपच मौज वाटत असे. सूर्यकांडार म्हणजे निमविषारी असणारा सोनसर्प की घोणस हे समजले नाही.
माझ्याही बालपणीच्या कित्येक आठवणी पुन्हा बहरून आल्या.
14 Jul 2016 - 4:51 pm | कविता१९७८
वाह मी राहते तिथेही असाच नजाराय, हिरवीगार शेते, पर्वतरान्गा
14 Jul 2016 - 6:11 pm | मुक्त विहारि
आमचे लहानपण पाढे एके पाढे गिरवण्यातच गेले.
असो,
14 Jul 2016 - 7:03 pm | अत्रुप्त आत्मा
अतीशय भावुक करून टाकणारे.. पावसाळी शब्दचित्र! आणी पाऊस मातीशी जसा समरस होतो, तीच समरसता त्याच्याशि असणारे लेखन.
14 Jul 2016 - 8:11 pm | केदार-मिसळपाव
बहिणाबाईंनी लिहिल्यासारखे वाटते आहे वाचतांना..
छान लिहीले आहे.
15 Jul 2016 - 1:24 am | एस
सूर्यकांडार ऊर्फ आग्या मण्यार
15 Jul 2016 - 2:33 am | विशाखा राऊत
खुप मस्त वर्णन
15 Jul 2016 - 4:13 am | बहुगुणी
जागुताई, हा लेख वाचून तुमच्याच पूर्वीच्या "बीज अंकुरे अंकुरे" या अशाच नितांतसुंदर लेखाची आठवण झाली.
15 Jul 2016 - 4:17 am | मराठमोळा
फार छान वाटलं वाचून. अतिशय सुंदर लेखन. मनापासून स्वच्छंदीपणे काही लिहिलं की ते मनांना भावतंच. _/\_
15 Jul 2016 - 10:34 am | अनुप ढेरे
छान लिहिलय!
15 Jul 2016 - 11:41 am | जागु
सगळ्यांच्या नितांत सुंदर प्रतिसाठासाठी सगळ्यांचे मनापासून आभार.
15 Jul 2016 - 12:07 pm | मार्मिक गोडसे
छान लिहिलय.
आमच्या आजुबाजुला अजुनही बरीच भातशेती बघायला मिळते, त्यामुळे राबाचा, मातीचा आणि आवणाचा वास अनुभवायला मिळतो.
अवांतर:
आंब्याच्या बाठी भाजून त्यातील कोय खायला छानच लागते. ज्यांना मुळव्याधीचा त्रास आहे त्यांनी भाजलेल्या कोयीची पावडर करून दिवसातून ५-६ वेळा १ चमचा एक ग्लास पाण्याबरोबर घेतल्यास त्वरीत आराम पडतो. पचनही चांगले होते.
15 Jul 2016 - 6:07 pm | अनन्न्या
मीही नशिबवान आहे तुमच्यासारखी! लहानपण खेडेगावात गेल्याने लावणीची मजा अनुभवलीय.
15 Jul 2016 - 7:12 pm | नूतन सावंत
किती सुरेख लिहिलंयस जागु.माहेर अन्नपूर्णा अंकातला लेखही 'बीज अंकुरे अंकुरे'पण असाच सुरेख होता.
आवण तयार होईपर्यंतची प्रक्रिया मीही माझ्या आजोळी अनुभवलेली आहे.परीक्षा संपली की दुसऱ्या दिवशी जे आजोळी जायचे ते जूनच्या मध्यावर शाळा सुरु वहायच्या आदल्या दिवशी परत यायचे.मधल्या काळात हे सगळे अनुभवायला मिळत असे.पार बालपणात फिरवून आणलंस तू.
15 Jul 2016 - 8:44 pm | यशोधरा
मस्त लिहिलं आहे.
15 Jul 2016 - 9:51 pm | दीपा माने
अगदी मनापासून लिहीलेले वर्णन अगदी शब्दचित्रासारखेच उतरले आहे. पनवेलच्या बालपणातल्या आठवणी जाग्या झाल्या.
16 Jul 2016 - 11:24 am | जागु
सगळ्यांना धन्यवाद.
16 Jul 2016 - 1:43 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
छान लिहिले आहे,आवडले .तुमचे बालपण गावात गेल्याने या गोष्टीचा आनंद तुम्ही घेऊ शकलात.मी निमशहरी भागात राहत असल्याने या गोष्टी जवळुण बघितल्या आहेत,आमचेही शेत असल्याने प्रत्येक गोष्ट रिलेट करु शकतोय.