गणपती बाप्पा मोरया!
गेल्या वर्षी गणपतीला जाता आल नाही अन रुखरुख वाटत राहिली म्हणून मनातल्यामनात कोकणात गणपतीला जाउन आले. तेव्हा लिहिलेली ही भटकंती.
या वर्षीपण मनातली सैरच आहे नशिबात.
काल गप्पांच्या पानावर सहज कोकणातल्या गणेशोत्सवाचा विषय निघाला , आणि मी एक सैर करून आले मनातल्या मनातच. ह्या वेळी घरच्या गणापतीला कोकणात हजेरी लावता येणार नाहीये ह्याचा सल होताच मनात , तो ह्या सफरीनी जरा हलका झाला.
कोकणातल्या गणपती बद्दल ऐकल बरच होतं पण अनुभवल ते लग्न करून मालवणकरीण झाल्यावरच . आम्ही चाकरमानी गटातले, शहरात वावरलो तरी हॄदय कोकणातल्या वाडीत तिथल्या लाल मातीत सांभाळून ठेवायला दिलेल. दसरा दिवाळी च नाही एवढ महत्व कोकणातल्या लोकाना गणपतीचं ( गणेशोत्सव इथे पुण्यामुंबैकडे असतो , कोकणात गणपती च :) )
चाकरमान्याना जेष्ठापासून वेध लागतात . कोकणकन्या, लाल डबे, बुकिंग केल की पहिली थाप पडते ढोलावर.
कोकणातल्या मुळ घरी पण लगबग असतेच. कारखान्यात/रंगशाळेत घरचा पाट विधीवत नेउन द्यायचा. रवळानाथाच्या मंडपात . ह्या खेपेचा गणोबा कस हवाय त्याच वर्णन , बाल गणेश हवाय का लवंडलेला, का सिंहासनावर बसलेला, मुकुट कसा हवाय? सोवळ्याचा रंग कसा? उपरण्याचा कसा? सिहासन सोन्याच का लोड तक्के वाल? एक ना दोन . उपस्थित बाल्गोपाळ मग येता जाता हजेरी लावत कामकाजाची पहाणी करणार . आपला आणि शेजारच्या वाडीतल्याची तुलना करणार, ओ मी जरा शिंवासनाला रंग मारू का चा लकडा लावणार. रंगार्याच्या मागे गुडघ्यावर हात ठेउन त्याच्याच एकाग्रतेत जणू सामील होत डोळे रंगवताना पाहणार.
इकडे चाकरमान्यानी सणाची तयारी सुरू केलेली असते. कोकणात रोजचे अपडेट देत घेत ठरवाठरवी चालू असते. ह्या खेपेला दागिना कोणता ? येणारी मंडळी कोण कोण, शहरातून न्यायच्या अप्रूपाच्या गोष्टी कोणत्या ? रिझर्वेशन असेल तर वेटिंग वर पुढे सरकलात का नै? गाडीघोडे वाले असाल तर ' कुठे हातान उचलून न्यायचय, गाडीत काय ओझं' म्हणत झालेली डिक्कीभर बोचकी . एक एक सामान गोळा करताना ढोलाचा रिदम वेग घ्यायला लागतो. आणि गाडीसमोर नारळ फोडून गणपती बाप्पा SS मोsssरया चा गजर करत निघालात की बाप्पा फिवर पूर्ण चढलेला असतो. :)
चाकरमानी एक एक करून 'घरी ' यायला लागतात. कोप्भर चहा मारून , माटवी, त्याला टांगायची फळ, लोकल रानफुलं , फळ्भाज्या यांची जमवाजमव सुरू होते. शुद्ध मराठी पुणेरी बोलणारे , हेल काढून मायबोलीत बोलायला लागतात. बायकांची फराळ , पुढच्या काही दिवसांचे मेन्यु, त्यासाठी लागणारी पुर्वतयारी, पुजेच्या उपकरणींची घासपुस अशी लगबग सुरू होते.
चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणूच्या आईची पुजा. परसातुन गोळा केलेली पिवळी धम्म फुलं आणि त्याला बांधलेली काळी पोत! ही आमची पार्वती. तिच्या नावानी उपास तिला पातोळ्यांचा अन पाच भाज्यांचा नैवेद्य अन तोवर शेवटाच्या मिनीटापर्यंत चालू असलेली मखराची सजावट. ह्या खेपेक माळ आणूक नाय ? झुरमुळ्या बर्या दिसतायत! मागच्या पडाद्यावर पण दोन लावा रे! चौरंग ठेवलात काय? त्यावर अंथरायला ही रेशमी घडी घ्या! ढोल घुमायला लागलेला असतो.
आमच्या घरात देवाची शेपरेट खोली आहे. तिला स्वैपाक घरातून एक अन बाहेरच्या खोलीतून असे दोन दरवाजे आहेत. गुरुजींच बुकिंग , मग ते यायच्या आधी घरातले थोर अन चाकर्मानी हौशीनी गाडी घेउन रवळ्नाथाच्या देवळात जातात. आपला बाप्पा , घेउन येतात, बाप्पाच्या नावाचा गजर बाल गोपाळांच्या उत्साहावर अवलंबून . घरी सगळ्या मालवणकर्णी, रेशमी साड्यांत तैय्यार. आधी बाप्पा येउन समोरच्या खोलीत टेकतो. मग ताम्हणात हळद अन चुन्यानी लाल केलेल्या पाण्यात पहायच बाप्पाला. मग औक्षण करून बाप्पा चौरंगावर . तेवढ्यात एका काका ना आठवत अरे उंदीर खंय गेला, का आणलातच नाय? मग पळत जाउन कोनीतरी उंदीर आणणार .
मग त्याला सालागणीक घडवले गेलेले दागिने घालायचे , तोवर भटजी येतातच, 'हातात काकणां नाय काय गो तुझ्या?' म्हणून शहरातल्या सुनेला दटावणार.
साग्रसंगीत पुजा होईपर्यंत , सिनियर मालवण्कर्णींची फळी नैवेद्याच्या स्वैपाकात. केळी ची पान मांडून पंगत. त्या आधी पाच पानं कुलदेवता, गणुची आई , ते परसातली गाय सगळ्यांच्या नावानी बाजूला काढायची , उजवी डावी बाजू नीटच वाढली आहे ना ह्या बद्दल पाहणी करून कोणीतरी सिनियर काकी ओक्के म्हणाल्या की नैवेद्य दाखवायचा.
तेवढ्यात हळूच आम्च्या मोठ्या काकी सांगणार , ते रायत्यातले चार अंबाडे सलीलाक (घरातला एखादा फेवरेट नातु/पुतण्या :) )काढून ठेवा हां, तुमच्या पुण्यात कैय्येक मिळणत नाय, आमच्या सुन्बाय्नी केलेले मोदक ग णपती समोर ठेवा हां , वेंगुर्ल्याच्या काकींना कोरीव काम जमत नै , आमची सुन्बाय काय सुबक एक साssर्खे करते मोदक. ( थोडीफार उणीदुणी , शालजोडीतले नसतील तर स्वैपाकघरात मजा नै ;) ) इथे स्वैपाकघरातली काम सिनियॉरीटीनी वाटलेली असतात. नविन सुना चिरणे ,कातणे, मदत करणे, त्यांच्या वरच्या रायती, भाज्याना फोडण्या वगैरे, आणि संगितीकेच सुत्र संचालन करणार्या सगळ्यात जेष्ठ !! उकड, तीच प्रमाण, वाटपातल प्रमाण, काम करतानाची क्रमवारी, शेजारून देवघरातून येणार्या मागण्या ( अहो पंचामृत पाठवा!! नैवेद्याला किती वेळ आहे अजून?भटाला कोपभर चा आणि फराळ !!) पुरवण . एखाद्या चुकार सुनेला दटावण, हे करत असतानाच खाउन पिउन घेतलय ना सगळ्या कामकर्यांनी, पोरांची खाण्याची व्यवस्था झालीये ना? चौफेर लक्ष. भल्या मोठ्या स्वैपाकघरात त्या एखाद्या स्टूलावर नाहीतर खुर्चीवर बसून रितसर काम करवून घेणार :)
नैवेद्य ! मग जेवण ३-४ पंगती आटोपल्या की संध्याकाळाच्या आरती आधी रांगोळ्या! , जमेल तसे /तिथे डुलक्या काढत नैतर पसरून , चाकर्मानी , जेवण मस्तच होतं याची साक्ष देतात. बायका , लग्नाळू मुल मुली, नवीन सुन, कर्तॄत्ववान (?) भौबंद, लेकरं, झालस तर गार्हाण काय घालायच याच्या चर्चा करत टेकतात.
फुलांच्या रांगोळ्या घालून देवघर आणि माटवी खालचा बाप्पा रिसेप्शन्ला रेडी. :)
आवाठातल्या सामंतीण, कामतीण, कुठाळे, जवळपासच्या गावांतून येणारे नातलग, मित्र मंडळी ! चहाचे टोपच्या टोप अन बश्यांमधून प्रेमाने दिलेला फराळ. मग गप्पा, तु कुठे असतोस? लेक? लग्न करून कुठे गेली आता?झील काय करतो? तब्येती, न आलेल्या ज्ये नांची चौकशी , फार शीक असलेल्यां च्या बद्दल कळवळून बाप्पाला हात जोडणे. तेवढ्यातून आतून आवाज, ओ धडमाकडून वस्तू हव्यात , जा कोण तरी( धडाम हा स्टॅन्ड जवळचा वाणसामान / दुध/ पुजे निमीत्त लागणार्या सामानाच दुकान)
सगळी चिल्लर पार्टी त्या दादा बरोबर बाजारात. ( लिंबू सोडा नैतर दुध कोड्रींक वसूली !!) झालच तर येताना फटाक्यांची तजवीज ही .
तोवर दिवे लागणीची वेळ झाली की आरती, त्यात टिपेला सुर लाउन तास दिड तास १५-२० आरत्या. मग गार्हाणी, हा एपिसोड एकदम इंट्रेस्टिंग असतो ,महाराजा!
तोवर भजनी मंडळ / ढोल ताशे मंडळ वाडीत आल्याच दुरून ऐकायला यायला लागत. सगळे अंगणात जमा होउन , तोही एक कार्यक्रम पार पडतो .
रात्रीची जेवण आटोपली की आजचा दिवस कसा पार पडला, स्वैपाकाच्या चवी याचा आढावा घेत , उद्याची तयारी ,कामाची वाटणी करत मंडळी पाठ टेकतात.
दुसर्या दिवशीच स्पेशल म्हणजे काळ्या वाटाण्याची शिवराक आमटी, वडे, आणि कंदमुळ/ॠषीची भाजी. गोड आमच्या घरी साखरभात करतात. सकाळ्ची आरती , अन फुलांची आरास. सोनटक्का अन जास्वंदाचे हार. आणि मुळातच एक प्रकारच प्रसन्न वातावरण या स्पेशल पाहुण्यामुळे. मनातल्या मनात माझ त्याच्याशी हितगुज चालू असत. वर्षाच्या सणाला आलेली लेक , बाबाशी बोलेल तस. :)
कंदमुळातली फक्त कणस मिळाणार नाहीत हां, सगळ खायच म्हणत कौतुक भरला दम बालगोपाळाना देत, आग्रहानी साखर्भात खा अजून थोडासा, तुमच डायट अन फायट पुण्याला ठेवायच हां अस म्हणत खायला लावणार्या काकी .
परत एक संथ दुपार. अर्धवट निजानिज, कालच्या उरलेल्या गप्पा , बाहेर बागेत एक फेरफटाका, नवीन रोपं, पायाला मातीचा लाल रंग , लेक लहान असताना त्याला घेउन शोधलेली लाजाळूची पानं, तबक भरून गोळा केलेल्या पत्री, फुलं , झुपकन पळालेला सरडा, खारू ताई ,शंखातली शेंबडी गोगल गाय.
उशिरा दुपारी आरती आणि बाप्पा च्या विसर्जनाची तयारी, पंचखाद्य, मोदकाच्या आकाराचे पेढे, नेवर्या, रव्याचे लाडू. आरती झाली की हुरहुर वाटायला सुरवात होते अगदी. मंत्रपुष्पांजली म्हटली की , चाल्लास तु ? इतक्यातच ? अस वाटायला लागत. बाप्पा चौरंगावरून परत पुढच्या खोलीत येतो. ह्या वेळी तोंड बाहेरच्या दिशेनी. घरातले सगळे त्याच्या हातावर दही घालून , ये हो परत, वाट पाहतो अस सांगतात. दागिने उतरवून फुलांचे हार लेउन बाप्प्पा घरी जायला निघतो . नदीवर जाइपर्यंत , पोरानो आवाज मोठा काढा रे , पुजेची पिशवी कोणाकडे आहे? मोठ्या काकी अन आजीला गाडीतुन आण रे तू, फटाक्यांच बघतोयस ना रे, करत मिरवणूक नदिवर पोचते देखिल.
तिथे एक आरती अन मंत्रपुष्पांजली झाली की नेहेमीचा गडी पाट नेउ का विचारत येतो, डोळे ओलसर झालेलेच असतात तोवर. थोड आतपर्यंत, खोल पाण्यात नेउन गणपतीला पाण्याखाली नेउन परत वर काढून दाखवतात. एकटक पापणी ही न लवता त्याच्याकडे पहात एकजात सगळ्यांचे डोळे झरतात .
आला आला म्हणता हा गेलाही ?
मी फार देवभोळी आस्तिक नाही, हा गणोबा देवधर्म वाटतच नाही मला.
प्रतिक्रिया
14 Sep 2015 - 12:24 pm | एस
चित्रदर्शी वर्णन.
14 Sep 2015 - 12:28 pm | स्वाती दिनेश
वर्णन आवडलं,
माझी मनातलीच सफर ह्या वर्षी..
स्वाती
14 Sep 2015 - 12:38 pm | प्रभाकर पेठकर
पुण्या मुंबईतही 'गणपती आगमन' असेच म्हणतात. घरच्या गणपतीला कोणी 'गणेशोत्सव' म्हणत नाहीत.
बाकी लेख चांगला आहे. जरा धावतपळत झाला. पण वाचनिय आहे.
14 Sep 2015 - 12:48 pm | प्यारे१
लेख वाचनीय आहे.
पण दीड दिवसाचा गणपती आहे काय हा? काय कारण असतं एवढं शॉर्ट मध्ये निपटवायचं?
14 Sep 2015 - 2:36 pm | सूड
साहजिक आहे प्यारेकाका!!
गणपतिबाप्पा बुद्धीची देवता आहे की नै?
14 Sep 2015 - 2:51 pm | प्यारे१
त्या हिशोबानं तू गणपतीच्या घरी जायला हवंस.
मुद्दा तो नाही.
वर्षभर गणेशाच्या आगमनाची वाट चाकरमानी बघतात नि दीड दिवसात विसर्जन?
आल्यासारखं चार आठ दिवस राहू द्यायचं की. आमच्या घरी गौरीबरोबर गणपती विसर्जन असतं.
विसर्जनानंतर मूर्तीजागी ठेवलेले खडे घरातलं कुणी गेल्याची जाणीव करुन देतात. फार ओकं बोकं वाटतं.
सध्या आगमनाची तयारी करत असतील घरात. :(
14 Sep 2015 - 3:12 pm | सूड
छे छे, मऊ लागलं म्हणून मूळासकट खाऊ नये, हे कळतं आम्हाला. आम्ही गणपतीला आणतो आणि तो देईल तेवढी बुद्धी पुरवून पुरवून वापरतो.
"अतिपरिचयात् अवज्ञा" हे कोकणातला लोकांना व्यवस्थित कळतं. आणि तेच या समारंभांतून दाखवून देत असतात. आणि बाकी विसर्जन होतं ते मूर्तीचं; देव आहे तिथेच असतो. मूर्ती असते ती आपल्या डोळ्यांसाठी, जे त्याचं निराकार रुप बघू शकत नाहीत.
संत रामदासांचे आपण इतके थोर अनुयायी असताना आपली अशी प्रतिक्रिया वाचून मिपाकर म्हणून शरम वाटली.
धागा चांगला आहे, त्याचा खरडफळा करायची इच्छा नसल्याने याउपर काही बोलायचे असल्यास खरडफळ्यावर यावे. (खरडवहीत नाही.)
14 Sep 2015 - 3:28 pm | प्यारे१
कोकणात सरसकट दीड दिवसात गणेशविसर्जन करतात? की काही घरातच असं होतं? की काही घरात जास्त दिवसही असतो?
14 Sep 2015 - 3:37 pm | इन्ना
पाच दिवसाचा गणपती ही असतो काही घरात. काही वेळा नवस ( लग्न , नोकरी, जिवावरची दुखणी) म्हणून एखाद वर्ष पाच दिवस पण असतो. आमच्या घरी नेहेमी दिड दिवसाचा पाहिलाय .
14 Sep 2015 - 3:40 pm | प्यारे१
धन्यवाद.
बाप्पानं दिलेली 'स्व'बुद्धी वापरणार्या इच्छुकांनी वाचावं आणि हो ते व्हत्सप्प वरचे फॉरवर्ड्स मिपावर खपवू नयेत. ;)
14 Sep 2015 - 3:58 pm | रातराणी
अस म्हणतात की प्राण प्रतिष्ठा केल्यावर दीड दिवस खरोखर मूर्तीमधे बाप्पा येतो. दीड दिवस झाला की तो जातो.म्हणून बरेच लोक दीड दिवसानंतर विसर्जन करतात. दहा दिवस गणपती बसवणे हे लोक जाग्रूतीसाठी टिळकांनी आणलेली प्रथा असावी.
16 Sep 2015 - 7:23 pm | पैसा
प्रत्येक घराप्रमाणे वेगवेगळे असते. काही घरी दीड दिवस, काही घरी तीन दिवस, काही घरी ५ दिवस, काही घरी ७ दिवस, काही घरी गौरी विसर्जनाला, काही घरी अनंत चतुर्दशीपर्यंत असे गणपती ठेवतात. कारणपरत्वे ही मुदत बदलू शकते. काही सोयर/सुतक वगैरे आले तर शेजार्यांना सांगून विसर्जन करतात. किंवा सुतक फिटल्यावर तिथी कोणतीही असो, त्या दिवशी आणून घरच्या प्रथेप्रमाणे दीड/३/५ दिवस ठेवतात.
सगळ्यात कमी मुदत म्हणजे मंगलोरला. तिथे सकाळी गणपती आणून संध्याकाळी विसर्जन करतात.
16 Sep 2015 - 7:52 pm | प्यारे१
>>>> सगळ्यात कमी मुदत म्हणजे मंगलोरला. तिथे सकाळी गणपती आणून संध्याकाळी विसर्जन करतात.
हे तर नवरदेवापेक्षा वाईट.
नवरदेवाचा किमान दीड दिवसाचा तरी गणपती असतो. रात्री साखरपुडा दुसर्या दिवशी हळदी आणि ३-४ वाजेस्तोवर विसर्जन. ;) नवर्याकडं कुण्णीकुण्णी बघत नाही हो नंतर! आणि नंतर तर काय आयुष्यभर आहेच्च मग.
16 Sep 2015 - 8:24 pm | मुक्त विहारि
+१
14 Sep 2015 - 3:48 pm | प्यारे१
बाय द वे रामदासांचं नाव घेतलं म्हणून सांगतो, रामदास स्वामीनी १६८२ ला देह ठेवला. शिवाजी महाराज १६८० ला गेले ही बातमी ऐकून रामदास स्वामींनी दु:ख झाल्यानंतर एका खोलीत स्वतःला बंद करुन घेतलं आणि ३ दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही.
ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची शिळा नामदेवांनी लोटल्यावर ते रडले होते.
या लोकांनाही भावना असतात नि ते त्या सकारण व्यक्त देखील करतात.
असो!
14 Sep 2015 - 3:09 pm | इन्ना
गोव्यात , तळकोकणात बर्याच सारस्वत घरात दिड दिवसाचाच असतो गणपती. गौरी नसतात. आणि शॉर्ट नाही हो , चांगलेच एलॅबोरेट दिड दिवस असतात. ५०-६० पानं सहज होतात पहिल्या दिवशी.
14 Sep 2015 - 2:36 pm | सूड
सुंदर वर्णन!!
14 Sep 2015 - 3:34 pm | पद्मावति
खूप सुंदर वर्णन. मस्तं प्रसन्न वाटलं वाचून.
14 Sep 2015 - 4:00 pm | रातराणी
खूप सुरेख लिहलय!
14 Sep 2015 - 6:17 pm | pradnya deshpande
भक्ती आणि भावनेचा सुरेख संगम असलेला लेख आहे.
15 Sep 2015 - 9:14 am | प्रीत-मोहर
आमच्या घरी दरवर्षी माझे सासरे गणपती (मुर्ती) करतात . हरितालिका पुजली जाते आधल्या दिवशी. चवथीच्या दिवशी सक्काळी देवीच विसर्जन आणि नंतर बाप्पा पुजला जातो. घरात समाराधना असतात .चांगली १०० पान भरतात दुपारची घरची मंडळी त्यानंतर!!! स्वैपाकघरात घरच्या १२-१५ बायका राबतात, पुरुष मंडळीं आणि चिल्लर पार्टीवर गणोबाची आरास सोपवलेली दरवर्षीचीच. आणि आमच्या गावात नेहमी इको फ्रेंडली डेको. च असत सगळ्यांकडे. नव्या सुनांचे खूप लाड असतात. संध्याकाळी सगळ्या वाड्यावर गणपती बघायला म्हणुन जातो ती पण गंमतच. आमच्याही घरी दरवर्षी दिड दिवसाचाच असतो गणपती. कधी कुणाच लग्नकार्य , नवस वगैरे असेल तरच पाच किंवा सात दिवस नवसाप्रमाणे.
चवथीत भरपूssssssर अणि तर्हेतर्हेची जाईसारखी सुगंधी फुल , किंवा निरपणस, करांदे, रान करांदे, माडी , सुरण इ. कंदमुळांची भाजी नसेल तर चवथ चवथ वाटत नाही. आम्ही सगळ्या सुना सकाळी गणपतीला घातलेल्या जाया संध्याकाळी धुपारती नंतर माळतो. मग चवथ अजुन सुगंधी होउन जाते.
15 Sep 2015 - 2:32 pm | इन्ना
हो हो. एको फ्रेन्डली शब्द कॉइन व्हायच्या आधीपासून कोकणात गणपती, आरास , सजावट , जेवण, सगळ एकोफ्रेन्डली. :)
15 Sep 2015 - 2:33 pm | इन्ना
*इको फ्रेन्डली
15 Sep 2015 - 9:17 am | प्रीत-मोहर
बाकी इन्ना लेख मस्तच :) सार दृश्य येउन गेल डोळ्यांसमोर.
15 Sep 2015 - 9:30 am | मांत्रिक
काय सुंदर लिहिलात हो! शेवट तर अप्रतिम! डोळ्यात पाणीच आलं एकदम!
15 Sep 2015 - 11:41 am | भिंगरी
मस्त!!!
आम्हाला गणपतीसाठी कोकणात जाणे शक्य नाही
पण ही सफर मस्त झाली.
16 Sep 2015 - 4:28 pm | विशाल कुलकर्णी
सुरेख झालाय गं हा लेख....
16 Sep 2015 - 7:24 pm | पैसा
अप्रतिम!
16 Sep 2015 - 7:44 pm | मुक्त विहारि
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.
16 Sep 2015 - 8:25 pm | सौन्दर्य
खूप सुंदर आणि ओघवत्या भाषेत वर्णन केले आहे. अगदी तुमच्या बरोबर कोकणात जाऊन आलो असे वाटले. विसर्जनाच्या वेळी डोळ्यात येणारे पाणी अगदी मन हेलावून गेले. आमच्या घरच्या गणपती विसर्जनाला दरवर्षी हा अनुभव येतो. नमस्कार.
16 Sep 2015 - 10:16 pm | रेवती
वर्णन छान झालेय. मनाने फिरून आले. आमच्याकडेही दीड दिवसाचाच गणपती असतो. खड्यांच्या गौरी असतात. दीड दिवसात सगळे कार्यक्रम बसवल्याने सतत बिझी असते.
माहेरी मात्र पाच दिवसांचा गणपती व उभ्या गौरी.