(या लेखाचा उद्देश्य घटनेची सत्य/ असत्यता पडताळणे नव्हे तर लोकांच्या मनोवृतीवर प्रकाश टाकण्याचा आहे)
मागासलेली गरीब अनाडी जनता आपल्या समस्या सोडविण्यासाठी गावातल्या सयाना (मांत्रिक म्हणा, ओझा म्हणा ) कडे जाते. या सयानाचे सरळ देवा सोबत कॅनेक्शन असते. भूत, प्रेत, हडळ, चुड़ैल या सर्वाना काबूत ठेवण्यात तो समर्थ असतो. गावात किंवा पंचक्रोशीत काहीही वाईट घडले असेल, कुणाचा अकाल मृत्यू झाला असेल किंवा कुणाचे नवजात मुल दगावले असेल. तर कुणाच्या करणी मुळे असे झाले हे सयाना बरोबर हुडकून काढतो. एकदा जादू टोना, करणी करणार्या हडळ / चुड़ैल कोण आहे हे कळले कि मग काय विचारावे. लोक त्या हडळीला पकडून आणतात, तिची गावातून धिंड काढली जाते, त्या स्त्रीला हाल हाल करून मारले जाते. कुणी हि त्या स्त्रीची बाजू ऐकून घेण्याच्या भानगडीत पडत नाही.
आता फेसबुक वर येऊ या. फेसबुक हा जागतिक महासागर आहे, त्याच्या पुढे सयानाला 'कुएं का मेंढकच' म्हणावे लागेल. फेसबुक वर येणारे लोक सुशिक्षित अतिविद्वान आणि विचारवंत असतात, असे समजले जाते. पण या फेसबुक वर कुणाला ही जगातून उठविण्यासाठी फ़क्त एक पोस्ट प्रकाशित करायची गरज आहे. एक फोटो टाकला की त्या व्यक्तीच्या अब्रूचे धिंडवडे सुशिक्षित लोक उडवू लागतील. सत्य शोधण्याचा किंवा दूसरी बाजू पहाण्याचा प्रयत्न कुणी ही करणार नाही.
उदाः आत्ताच दिल्लीत घडलेली एक घटना. इथे फेसबुक वर पोस्ट टाकणारी आणि पोलिसात शिकायत करणारी एक तरुण, सुंदर स्त्री होती. आता शिकायत करणारी जर स्त्री त्यात हि तरुण स्त्री असेल तर तपास करायची काय गरज. पहिल्या २४ तासांत फेसबुक आणि मिडिया वर सर्वांनी त्या मुलाच्या अब्रूची लक्तरे उडविली. पोलीसने हि एकीकडे शिकायत दर्ज केली आणि दुसरीकडे पुरस्कार घोषित केला. पोलिसांना ही पुरस्कार देण्याच्या आधी घटनास्थली असलेल्या लोकांची विचारपूस करून सत्यता तपासायची गरज वाटली नाही. मग मुख्यमंत्री ही मागे का राहणार त्यानी पोलिसपेक्षा जास्त पुरस्कार घोषित करून टाकला. थोडक्यात फेसबुक, मिडिया, पोलीस आणि नेता सर्वांनीच वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले.
हे सर्व पाहताना एकच विचार मनात आला एकीकडे सयाना आणि दुसरीकडे फेसबुक व मिडिया. माणसाला जगातून उठविण्याचे कार्य दोघेही व्यवस्थित बजावतात. एका पक्षाला दोषी ठरवून त्याच्या आयुष्याची राख रांगोळी करतात. फरक एकच आहे सयाना वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आपण अडाणी, अंधविश्वासी इत्यादी म्हणतो. फेसबुक व मिडीयावर होणार्या चर्चांवर विश्वास करणार्याना काय म्हणावे .....
प्रतिक्रिया
27 Aug 2015 - 9:27 pm | मांत्रिक
पहिल्यांदा वाटलं माझीच चेष्टा केलेय काय? मग लेखकाचं नाव वाचून वाटलं, नाही पटाईत साहेब तरी असं करणार नाहीत. असो मुद्दा चांगला आहे. पण दिल्लीतली घटना काही समजली नाही. सांगताना काहीतरी गोंधळ झालाय.
27 Aug 2015 - 11:22 pm | जव्हेरगंज
मलाही असचं वाटलं.... :-D :-D :-D
27 Aug 2015 - 10:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम मुद्दा. सोशल मेडिया व्यक्तीगत चारित्र्यहनन करण्यासाठी वापरणे म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे. असे करणार्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे.
27 Aug 2015 - 10:52 pm | स्रुजा
हे फार अवघड आहे पण. एकुण च फेसबुक काय किंवा मेडिया काय ते आपापल्या माहिती स्त्रोतांना व्यासपीठ मिळवुन देण्याचं (!) काम करतात. यामध्ये जर कुणी कायदेशीर कारवाई केली तर त्यांना मेडियावाल्यांना मिळालेल्या माहितीचा खोटेपणा माहिती होता हे आधी सिद्ध करावं लागेल. म्हणजे कुणी "आग आग" म्हणुन ओरडलं तर उसळणार्या गर्दीत चेंगरलेल्या लोकांचं पाप ओरडणार्याच्या माथी मारणं जेवढं अवघड तेवढंच हे पण अवघड होणार . अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे असं डोकेदुखी ठरलंय आणि धूर्त मेडियाला हे चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्याचा फायदा फार हुषारीने उठवला जातो.
28 Aug 2015 - 11:40 am | नाव आडनाव
लई वेळा सहमत. थोडा वेगळा मुद्दा - व्यक्तिगत चारित्र्यहनन हा जसा प्रॉब्लेम आहे तसाच / तितकाच प्रॉब्लेम एखाद्या ग्रूपवर गाळ उडवणं हा सुध्धा आहे.
असे लोक बघितले आहेत जे दुसर्यांवर (दुसर्याची जात, धर्म, एखादी श्रध्धा ठेवणारे) मनात येईल तितका गाळ उडवतील, पण त्यांच्या बद्दल कोणि काही प्रश्न विचारला तर "व्यक्तिगत का होता" असं म्हणून अंगावर धावून येतील. वर अजून विचारवंतांचं कातडं पांघरणार आणि मोठमोठ्या गप्पा मारणार.
या गाळ फेकण्याचा फायदा कोणाला होत नाही, लाँग टर्म मधे तोटा मात्र मोठा आहे. पण या गोष्टींचं यांना काही पडलेलं नसतं. फेसबुक / मिसळपाव किंवा अजून एखाद्या साईट वर येणार्या लोकांची संख्या बघता अश्या प्रत्येक कमेंट वर लक्ष ठेवणं हे अॅडमीन साठी फक्त अशक्य आहे. एक गोष्ट मात्र चांगली - बरेच लोक या चिखलफेकी पासून लांबच राहतात.
27 Aug 2015 - 10:54 pm | पद्मावति
खरंय. उत्तम मुद्दा मांडलाय. दुर्दैवी प्रकार आहे.
27 Aug 2015 - 11:39 pm | दिव्यश्री
नक्की काय म्हणायचं आहे? तो मुलगा अगदीच निर्दोष आहे का?
28 Aug 2015 - 12:53 am | उगा काहितरीच
माझ्या मते असेलही थोडी चुक त्याची , पण शिक्षा जास्त मिळालेली आहे. नॉर्मली अशा प्रकरणात लोकांना मुलीचा पक्ष बरोबर वाटत असतो. पण जसजसा तपास पुढे सरकतोय तसे मुलीची पण चुक होती हे सिद्ध होत आहे. पाहूया शेवटी पारदर्शक तपास व्हावा व दोषीला योग्य शिक्षा व्हावी अशी इच्छा आहे !
28 Aug 2015 - 1:08 pm | प्यारे१
सोडा ओ!
पुरुष म्हटलं की दोष त्याचाच असतो.
बायका सती सावित्रीच् असतात.
गावभरचं गॉसिप करत असल्या तरी, फुकटच्या दारवा पित असल्या तरी, कांगावा करत असल्या तरी आणि डोक्यात शेण भरलेलं असल्या तरी.
बाकी पटाईत काकांचा लेख भारी नेहमीप्रमाणं....
28 Aug 2015 - 3:13 pm | तुडतुडी
कोणाला काही समजलं असेल तर मला पण सांगा . काय कळलं नाय ब्वा . .
कृपया मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करावा
28 Aug 2015 - 7:27 pm | विवेकपटाईत
तुडतुडी ताई, दिल्लीतल्या घटना सांगताना मराठीत हिंदी मिसळावी लागते. तसेच जसे गंगेत यमुनेचे पाणी येऊन मिळते तरी गंगा गंगाच राहते. असो.
बाकी इथे दोषी कोण आणि निर्दोष कोण याचे विवेचन केलेले नाही आहे. पण तपास पूर्ण होण्याची वाट पाहण्याचा संयम न दाखविता. कुणाला दोषी म्हणून तुडवीणे किंवा कुणा हडळीचा प्राण घेणे दोन्ही बाब सारख्याच. हे फक्त उदाहरण आहे, असे अनेक प्रकार फेसबुक आणि मिडिया निरंतर करते आहे.
बाकी तिलक नगरची लाल बत्ती (red light) जास्तीस्जास्त २ मिनिटांची असेल. विवाद एखाद मिनिटाचा असेल. तो मुलगा बाईक वरून उतरलेला हि नाही हे चित्रावरून कळते. बाकी प्रत्यक्षदर्शीच खर काय ते सांगू शकतील. पण बाईकचा नंबर आणि मुलाचा फोटो दोन्ही पोलिसांना दिल्यावर आणि शिकायत दर्ज केल्यानंतर. फेसबुकवर त्या मुलाचा फोटो टाकण्याचे कारण काय? फेसबुक वर न्याय मिळत नाही. त्या मुलाची बदनामी करणे हाच हेतू.
मुलगा निर्दोष असेल तरी हि आता त्याला चांगल्या ठिकाणी नौकरी मिळणे अशक्यच. शिवाय चौकशी पूर्ण होण्याआधीच पुरस्कार वैगरेह घोषित करणने याला काय म्हणावे.