सीपी ते उत्तम नगर, ३५ मिनिटांचा मेट्रो प्रवास. माझ्या जवळ बसलेला एक मेट्रो प्रवासी सहज म्हणाला 'प्याज फिर महंगा हो गया है, सरकार को नतीजा भुगतना पड़ेगा.' 'कोण म्हणतो कांदा महाग झाला' एक पांढरे केस वाला वयस्कर ग्रामीण (चौधरी) उतरला. त्यावर तो प्रवासी म्हणाला, चौधरीजी मालूम है, आज प्याज का भाव ५० रुपया किलो है. कांद्यामुळे सरकार पडते, १९९८ मध्ये दिल्लीत काय घडले होते माहित आहे का?
चौधरी उतरला, चांगले माहित आहे, त्या वेळी हि कांद्याचा भाव ५० रुपये किलो झाला होता. पण त्याला १७ वर्षे झाली. त्या वेळी बसचे भाडे ३ रुपये होते, आज १५ रुपये आहे. मेट्रोत तर आणखीन जास्त लागतात. माझ्या गळ्यात लटकलेले आय कार्ड पाहून, मला उद्देश्यून म्हणाला, या कालावधीत सरकारी बाबूंचे पगार तर ५-७ पट नक्कीच वाढले असतील. मी काय चूक बोलतो आहे. मी म्हणालो चौधरीजी आपले म्हणणे खरे आहे. आपण शेतकरी आहात का?
चौधरी पुढे म्हणाला, माझी राजस्थान मध्ये शेती आहे, कांद्याच्या शेतीत कितीतरी वेळा नुकसान झाले आहे. मी तर शेतात कांदे लावणे सोडून दिले आहे. सरकार कुठली हि आली तरी तिला शेतकर्यांची पर्वा नाही. तुम्हीच सांगा, महागाई शेतकर्याला हि आहे कि नाही, १९९८ च्या हिशोबाने आज सीजनमध्ये कांद्याला एका किलोचा ५०-७० रुपये आणि अगस्त-सेप्टेम्बरमध्ये किमान १००-१५० रुपयांचा भाव मिळाला पाहिजे. पण आज ऑगस्टच्या महिन्यात हि किलोला भाव फक्त ५० रुपये आहे. सीजनमध्ये तर कांद्याचा भाव केवळ १० रुपये होता. आज जर किलोचा भाव २५० रुपये असता तर कांदा महाग झाला म्हणता आले असते. सच तो यही है, गेल्या १७ वर्षांत कांद्याचा भाव १ रुपया वरून २० पैश्यावर आलेला आहे. त्याचा ह्या बोलण्यावरून मेट्रोत जोरदार हशा उमटला. एक प्रवासी उद्गरला, लगता है, बुढापे में चौधरीजी का दिमाग चल गया है.
तेवढ्यात उत्तम नगरचे स्टेशन आले. घरी जाताजाता चौधरीजी जे म्हणाले त्यात किती सत्य आहे याचा विचार करू लागलो. चौधारीजींचे म्हणणे खरेच होते. खरोखरच गेल्या १७ वर्षांत कांद्याची किंमत घसरत घसरत रुपयावरून वीस पैश्यांवर आली आहे.
प्रतिक्रिया
8 Aug 2015 - 8:09 pm | पैसा
खरं आहे.
8 Aug 2015 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरे आहे !
प्रत्येकजण फक्त आपल्या खिश्याचाच विचार करतो आणि त्यालाच खरे अर्थकारण समजतो, हे सार्वकालीक सत्य आहे.
8 Aug 2015 - 8:49 pm | नाव आडनाव
मी तर शेतात कांदे लावणे सोडून दिले आहे.
मी एक-दोन धाग्यांवर दुधाच्या किंमती बद्दल लिहिलं होतं. शेतकर्यांना मिळणारा दुधाचा भाव २७ रुपयांवरून कमी करून १७ रुपये झाला पण विकत घेणार्यांना मात्र आजही ते ५० रुपयांनाच मिळत आहे. माझ्या गावाकडे काही गोठे अर्धे आणि काही तर अख्खे रिकामे झाले आहेत. घरच्यासाठी एखादी गाय्/म्हैस ठेवली आहे लोकांनी. २७ रुपयांचा भाव १७ रुपयांवर आल्यानंतर टाकलेले पैसे, वेळ आणि केलेलं काम हे अजिबात परवडत नाही. आणि हे १७ रुपयांचा भाव दिला तर. तो भाव काही गावांत १४.५० / १५ रुपये आहे. परवडण्याची अजिबात शक्यता नाही. त्यापेक्षा गाया / म्हशी शेतकर्यांनी विकून टाकल्या आहेत.
8 Aug 2015 - 9:13 pm | एस
अन्नधान्याची महागाई लगेच नजरेत भरते, डोळ्यांवर येते. इतर वस्तूंची दरवाढ कुणाला एवढी खपत नाही.
8 Aug 2015 - 9:46 pm | जेपी
हम्मा...
8 Aug 2015 - 11:23 pm | जडभरत
काय बोलू? परखड वास्तव!!!
9 Aug 2015 - 7:20 am | उगा काहितरीच
वास्तव आहे !
10 Aug 2015 - 10:19 am | सुबोध खरे
भारतात ८६ कोटी भ्रमण ध्वनी जोड( connections) आहेत
लोक "माणशी" २०० रुपये दर महिना भ्रमणध्वनीवर खर्च करतात यातील १५० रुपये अनावश्यक असतात पण अन्न आणि धान्याची भाववाढ झाली तर कावकाव करतात. स्वार्थ आणि दांभिकपणा फक्त राजकारण्यात नसून आपल्यातच आहे. (आपले सरकार पडणार असेल तर कोण राजकारणी भाव वाढू देईल)
10 Aug 2015 - 3:45 pm | gogglya
मॉल मधे शेकडो रुपये तिकीट काढुन कोटी कोटी गल्ले भरायला मदत करते, नंतर ट्वीटर वरील मुक्तफळे ऐकुन धन्य होते आणी पिझ्झा कोक खात पीत 'राष्ट्प्रेमाचे' उमाळे दाखवत फिरते...
10 Aug 2015 - 4:03 pm | कपिलमुनी
शेकडो रुपयाचे तिकिट काढणे , पिझ्झा कोक खाणे - पिणे चुकीचे आहे का ?
स्वतः कमावतात आणि उडवतात .. यात काय प्रोब्लेम आहे ?
स्साला , मध्यमवर्गीयांना किंवा श्रीमंताना "गिल्ट" फीलिंग का देतात ??
10 Aug 2015 - 5:13 pm | अभिजित - १
अशी जनता किती टक्के आहे ? काही विदा आहे का ? का नुसत उचलली जीभ लावली टाळ्याला ..
नाही कारण मी स्वत पण यात मोडत नाही आणि माझ्या माहिती तील फार कमी लोक असे आहेत. फार कमी ... २० टक्के पकडा ...
10 Aug 2015 - 11:00 am | माझिया मना
आमचाही अनुभव असाच काहीसा आहे..
कांदा शेतकर्याला पण रडवतो.
10 Aug 2015 - 2:16 pm | अस्वस्थामा
भाजप सरकार आल्याचा हा अजून एक फायदा. आधी सरकारवर टिका करणार्यांना आता "लॉजिक" समजू लागलेय.
चला, हे ही नसे थोडके. ;)
10 Aug 2015 - 2:42 pm | पगला गजोधर
अशे अनेकांच्या नाड्यांना ओढण्यासाठी हात लावू नका... बोवा एकदम….
;)
10 Aug 2015 - 2:21 pm | प्रियाजी
निदान या वाचना नंतर तरी आपण अन्नधान्य महागले तरी आरडाओरडा करायला नको. माझ्या स्वतःपुरते हे करण्यासठी ७/८दिवसांपुर्वी मी ४५ रुपये दराने काहीही कुरकुर न करता कांदे आणले आणि रोज आवश्यक तेवढे खातही आहे.
10 Aug 2015 - 2:35 pm | बबन ताम्बे
ग्रामीण भागात एका सभेत वक्ता बोलत होता.
हातातील बिसलेरीची बाटली लोकांना दाखवून ," हे बघा, हे फक्त पाणी आहे. पण याची किंमत लिटरला २० रुपये आहे. आता एक लिटरच्या दुधाच्या भावाशी याची तुलना करून बघा. एक लिटर दुधामधे शेतक-याची गुंतवणूक बघा. यात जनावरांचा चारा आला, जनावरांची देखभाल, डॉक्टरपाणी आले. कधीकधी कडबा महाग दराने घ्यावा लागतो पण गुरे जगवावी लागतात. एव्ह्ढे करून शेतक-याला भाव मिळतो १४ ते १५ रुपये लिटर ."
10 Aug 2015 - 2:54 pm | कपिलमुनी
सर्वांना लॉजिक पटल्याचे बघून आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कॉलिंग गंमु !
( गंमुनी या धाग्याकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे , आक्रस्ताळेपणा न करता लिहिले तर लोकांपर्यन्त अभिनिवेश न पोचता भावना आणि आकडे पोचतात याचा उत्तम उदाहरण हा धागा आहे)
10 Aug 2015 - 3:01 pm | होबासराव
मुनिवर पटाईत साहेबांनी आणि त्यांच्या सहप्रवाशांनी कुठल्या हि भुमिकेत न शिरता एक सामान्य माणुस म्हणुन त्याना काय वाटत हे दिलखुलास पणे सांगितलय्..पण गंमु नेहमि शेतकर्यांच्या कैवार्याच्या भुमिकेतच असतात.
अवांतरः- जसे केजरीवाल हे अजुनही चळवळ्या भुमिकेतच वावरतात, खुल्ला ऑफर दिया है अभी के हम तिहार से काम करने के लिये तैय्यार है.
10 Aug 2015 - 7:51 pm | विवेकपटाईत
प्रतीसादांबाबत धन्यवाद. हा खरोखर मेट्रोत घडलेला संवाद होता. मी फक्त मांडला एवढेच.
10 Aug 2015 - 11:10 pm | तीरूपुत्र
शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची गरज नाही,पण त्यांच्या मालाला योग्य भाव मिळायला पाहिजे.७-८ वर्षे होत आली वरुण राजा पण शेतकऱ्यांना मदत करत नाही.कधीकधी तर महिना दिड महिना रूसून बसतो.योग्य वेळी वरुण राजा आणि सरकार दोघे पण शेतकऱ्यांची साथ सोडून देतात.