अटलजींना भारतरत्न

क्लिंटन's picture
क्लिंटन in जनातलं, मनातलं
24 Dec 2014 - 10:31 pm

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न दिल्याचे आजच जाहिर झाले आहे.काही व्यक्ती अशा असतात की त्यांना कुठलाही पुरस्कार देऊन त्या व्यक्तींचा नव्हे तर त्या पुरस्काराचा सन्मान वाढवला जातो. अटलजींना भारतरत्न देऊन भारतरत्न पुरस्काराचा सन्मान अशा प्रकारेच वाढवला गेला आहे अशीच भावना बहुसंख्यांची असणार याविषयी शंका नाही.

Atalji

अटलजींची सगळीच धोरणे मला पटत होती असे नाही.पण काहीही असले तरी आजही अटलजींचे नाव ऐकले तर पहिली भावना दाटते ती त्यांच्याविषयीच्या आदराचीच.

अटलजींना वाढत्या वयाबरोबर आलेल्या आजारामुळे आजूबाजूला काय चालू आहे हे कळत असेल असे वाटत नाही.त्यांना हा पुरस्कार यापूर्वीच दिला जायला हवा होता.तरीही उशीरा का होईना त्यांना हा पुरस्कार दिला गेला याचा नक्कीच आनंद आहे.

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

विनोद१८'s picture

24 Dec 2014 - 10:36 pm | विनोद१८

...आदरणीय श्री. अटलबिहारी वाजपेयी यांचे अभिनंदन.

सव्यसाची's picture

24 Dec 2014 - 11:44 pm | सव्यसाची

अटलजींना भारतरत्न जाहीर झाला याचा आनंद तर आहेच. त्यांचे मनापासून अभिनंदन.

जेव्हा थोडेसे कळू लागले होते आणि 'देशाचे पंतप्रधान कोण?' या प्रश्नांचे उत्तर देण्याची समज आली होती तेव्हा अटलजी पंतप्रधान होते. त्याकाळची त्यांची भाषणे दूरदर्शनवर ऐकली आहेत. ती भाषणाची शैली खूपच आवडली होती. त्यांचे दोन शब्दांमधील अंतरही अगदी हवेहवेसे वाटायचे. २००४ च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या कुठल्यातरी जिल्ह्याच्या ठिकाणी भाषणाचा थोडा भाग ते मराठी मधून बोलल्याचे आठवते आहे. तेव्हा मला 'यांना मराठी पण येते' याचे आश्चर्य वाटले होते.
पुढे पुढे त्यांचा रोजच्या राजकारणातील वावर कमी झाला आणि संसदेमधील किंवा एखाद्या सभेतील भाषणे ऐकणे दुर्मिळ झाले. परंतु युट्यूब वर त्यांची जुनी भाषणे खूप ऐकली. जशी जशी भाषणे ऐकत गेलो तसा तसा आदर वाढतच गेला. संसदेमधील पोखरणच्या अणुचाचणी वरचे भाषण, विश्वास प्रस्तावाला उत्तरार्थ केलेले भाषण, संयुक्तराष्ट्र मधील १९७७ साली हिंदी मधून केलेले भाषण, 'अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा' हे कार्यकर्त्यांना उद्देशून केलेले भाषण, त्यांच्या कविता.. अशी अनेक उदाहरणे देता येतील. ५० वर्षापेक्षा जास्त भारतीय राजकारणामध्ये राहून त्यांनी आपली एक वेगळीच छाप पाडली.
पुनरेकवार अटलजींचे अभिनंदन..

बोका-ए-आझम's picture

25 Dec 2014 - 2:48 am | बोका-ए-आझम

आज भाजप जर एक समर्थ राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रस्थापित झाला आहे तर त्याचं श्रेय अटलजींनाच आहे. भारतरत्न मिळालेल्या सर्व पंतप्रधानांमध्ये ख-या अर्थाने काँग्रेसचे नसलेले असे ते पहिलेच पंतप्रधान अाहेत.

तर्री's picture

25 Dec 2014 - 9:30 am | तर्री

क्लिंटन यांच्याशी सर्वस्वी सहमत. मी भा.ज.प. चा स्थापने पासून चाहता आहे अटलजींचे पक्षासाठी आणि देशासाठी मोठे योगदान आहे.तरीही वाजपेयी यांच्या यशाला अडवानीजींचे कर्तुत्व कारणीभूत आहे ( आता कदाचित हे म्हणणे कालसुसंगत होणार नाही ) भा.ज.प.वर १९९६ पर्यंत अडवाणी याची पक्कड होती. आजचे सगळे बिनीचे नेते - नरेंद्र, सुषमा, अरुण आणि प्रमोद महाजन ह्याना अडवाणी यांनी हेरले आणि पुढे आणले. पक्ष मोठा होण्यास अडवाणी यांचे हे शिलेदार कारणीभूत ठरले.संघ आणि संघटना ह्यांचे पूर्ण सामर्थ्य त्यांच्या मागे होते.
असे असतानाही एका निर्णायक क्षणी -अडवाणी यांनी वाजपेयी यांचे नाव-"पंतप्रधान" म्हणून बंगलोर हून घोषित केले आणि वाजपेयी यांचा मोठा होण्याचा मार्ग मोठा झाला. हा मनाचा मोठेपणा अडवाणी यांनी दाखवला नसता तर कदाचित अडवाणी पुढे आले असते.
( हाच मनाचा मोठेपणा मोदींना पंतप्रधान करण्यात त्यांनी दाखवायला हवा होता )

मोहन's picture

25 Dec 2014 - 10:02 am | मोहन

अटलजी माझ्या सर्वात आवडत्या राजकीय नेत्यांपैकी आहेत. अटलजीं सारखे नेते राजकारणात दिसतात म्हणून सामान्यांना राजकारणात काही आशा दिसते.
भारत रत्न देवून त्यांचा गौरव ह्यापूर्वीच व्हायला हवा होता.

क्लिंटनरावांच्या विचारांशी सहमत !
अटलजींची शैलीची संपूर्ण झलक सध्या राजनाथ सिंग यांच्या देह बोलीतुन दिसुन येइल ! त्यांच्या हांतीची प्रत्येक मुव्हमेंट ही अटलजींचीच आहे.
अटलींनी राजिनामा दिला ते भाषण मी पाहिले आणि ऐकलेले आहे,आणि त्यांच्या संभाषणाचा ,त्यांच्या शैलीचा मी चाहता आहे.
आज सेक्युलरिझमच्या नावाखाली जी काही बौद्धिक दिवाळखोरी चालली आहे ते पाहुन उद्वेग येतो... अटलजींचे एक भाषण याच विषयावर आहे,आणि ते ऐकण्यासारखे आहे.

पाकिस्तानात हल्लीच जो हिंसाचार झाला, त्याची एक प्रकारे भविष्यवाणी अटलजींच्या एका भाषणातुन दिसुन येते...

आत्मरक्षा हा विषय आपल्या देशात अतीशय दुर्लक्षित आहे, हे आपल्या सध्याच्या लष्कराच्या अवस्थेतुन सुद्धा स्पष्ट होते ! एव्हढा मोठा देश परंतु स्वतःच्या आत्मरक्षेत आपण इतके उदासिन आणि गाफिल का ? हा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे. डीआरडीओ उत्तम दर्जाची साधी रायफल बनवु शकत नाही हे माहितगार यांनी दिलेल्या दुव्यातुन देखील नजरेस आले !वाजपेयीजींनी देखील या विषयावर आपल्या न्युक्लिअर टेस्ट नंतर केलेल्या भाष्यात याचा विचार प्रकट केलेला दिसतो... आत्मसुरक्षेत पूर्णपणे प्रतिबद्ध असावयास हवे ! हे आजच्या भाजपा सरकारने देखील मनावर घेउन त्या दॄष्टीने योग्य आणि जलद पावले उचलावित... आणि हे त्यांनी श्री. अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणातुन सुद्धा बोध घेउन करावे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyz

आयुर्हित's picture

25 Dec 2014 - 10:26 am | आयुर्हित

अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसाबद्दल व "भारतरत्न" मिळाल्याबद्दल त्रिवार अभिनंदन.

नितिन थत्ते's picture

25 Dec 2014 - 10:51 am | नितिन थत्ते

सहमत. भारतरत्न पुरस्काराचे अभिनंदन.

:).आणि अटलजींचेही अभिनंदन

टवाळ कार्टा's picture

25 Dec 2014 - 5:32 pm | टवाळ कार्टा

खिक :)

अनुप ढेरे's picture

27 Dec 2014 - 2:20 pm | अनुप ढेरे

छ्या, भारतरत्न पुरस्कार तर जेव्हा राजीवजींना भारतरत्न मिळाला होता तेव्हाच धन्य झाला होता.

श्रीगुरुजी's picture

27 Dec 2014 - 2:45 pm | श्रीगुरुजी

छे छे! त्यापूर्वी हा पुरस्कार नेहरू, व्ही. व्ही. गिरी, एमजीआर इ. रत्नांना दिला गेला होता तेव्हाच धन्य होऊन गेला होता. राजीव गांधींना मिळाल्यावर हा पुरस्कार पुनर्धन्य झाला असणार.

मैत्र's picture

25 Dec 2014 - 12:51 pm | मैत्र

कधी नव्हे ते मिपावर या निमित्ताने लिहावे असे वाटले.
आणि क्लिंटनचा धागा पाहून वाटलं की सगळ्यात पर्फेक्ट माणसाने हा धागा टाकला आहे.

फारसं राजकारण कळत नव्हतं तेव्हा रामजन्मभूमी प्रकरण घडलं आणि तेव्हा अडवानींचा जोर होता. काही विशेष आकर्षण वाटलं नाही. कारण माहीत नाही.

जसं वाचन आणि समज वाढली तेव्हा जनता सरकारचे गोंधळ समजत गेले आणि नंतर योग्य विचारी वयात अटलजी समजत गेले. एका सुह्रदाने मेरी इक्यावन कविताएं हा संग्रह दिला आणि या स्टेट्समनचं संवेदनशील कवित्व त्या कॉलेजच्या वयात प्रचंड आवडलं. काहीशी अवघड, अतिशुद्ध हिंदी -- पण ओळी / शेरांचं वजन सांभाळलेली काहीशी आक्रमक कविता.
रग रग हिंदू मेरा परिचय पासून ते आओ फिरसे दिया जलाए
विशेष आवडलेली :

"
टूटे हुए तारों से फूटे वासन्ती स्वर,
पत्थर की छाती में उग आया नव अंकुर,

झरे सब पीले पात,
कोयल की कुहुक रात,

प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हूँ
गीत नया गाता हूँ

टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी?
अन्तर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी

हार नहीं मानूँगा,
रार नई ठानूँगा,
काल के कपाल पर लिखता-मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ"

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी यातल्या काही कविता गायल्या होत्या. सगळ्याच जमल्या नव्हत्या तरी काही चाली सुंदर होत्या. पण अटलजींचा गंभीर थोडा बेसचा आवाज आणि विचारपूर्वक बोलणं यापुढे ते गोड्सर गाणं फारसं रुचलं नाही.

तेव्हा अशाच योगायोगाने एस पी च्या मैदानावर त्यांचं भाषण प्रत्यक्ष ऐकलं आणि त्या मोठ्या पॉज मधनं उलगडणारं एक ठाम तरीही संयमी एक विश्वास निर्माण करणारं व्यक्तिमत्व अनुभवलं. नेता कसा असतो याचं एक उत्तम उदाहरण समजलं. नंतर त्यांचं संसदेतलं राजीनाम्याचं भाषण ऐकलं आणि वाटलं की परत यावेत ते हेच.
त्यामुळे तिसर्‍या वेळी ते पंतप्रधान झाले तेव्हा विलक्षण आनंद झाला होता. २००४ मध्ये भाजपाच्या पराभवापेक्षा इतक्या नेक आणि उमद्या मनुष्याला पुन्हा पंतप्रधानपद मिळालं नाही याचं वैषम्य वाटलं होतं.

पोखरण -२, सुवर्ण चौकोन प्रकल्पामुळे त्यांच्याबद्दलचा आदर वाढत गेला. लाहोर बस प्रकरण वैयक्तिक रित्या पटलं नव्हतं आणि मुशर्र्फ आग्रा भेटही. पण कारगिल मध्ये चूक झाल्यावर अत्यंत ठामपणे उभा राहणारा नेता म्हणून अटलजीच कायम स्वरुपी मनात राहतील. माझ्यासाठी भारतातलं सर्वात अभिमानास्पद आदरणीय राजकीय व्यक्तिमत्व.

त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचा अतिशय आनंद आहेच फक्त ते त्यांना समजत असताना मिळालं असतं तर जास्त योग्य झालं असतं.
भारतरत्न पुरस्काराबद्दल काही वादंग असले तरी तो भारताचा सर्वोच्च सन्मान आहे. त्याचा मान राखणं आत्यंतिक गरजेचं आहे. अटलजींना भारतरत्न मिळाल्याने या पुरस्काराचं स्थान, गांभीर्य आणि महत्त्व थोडं पुनःप्रस्थापित झालंय असं माझं मत आहे.

भारताच्या आदरणीय आणि लोकप्रिय नेत्याचं भारतरत्न पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

क्लिंटन's picture

26 Dec 2014 - 10:44 am | क्लिंटन

प्रतिसाद आवडला. आग्रा परिषद आणि कंदाहार प्रकरणी दहशतवादी सोडणे अजिबात मान्य नव्हते. तसेच संसदभवनावर हल्ला हे त्यांच्या कारिकिर्दीतले मोठे अपयश होते.या काही गोष्टी सोडल्या तर इतर गोष्टींमध्ये वाजपेयींचे धोरण निश्चितपणे उजवे होते.

श्रीगुरुजी's picture

26 Dec 2014 - 1:51 pm | श्रीगुरुजी

>>> आग्रा परिषद आणि कंदाहार प्रकरणी दहशतवादी सोडणे अजिबात मान्य नव्हते.

कंदाहार प्रकरणावर एका धाग्यावर बरीच चर्चा झालेली आहे. त्यावेळी दहशतवादी सोडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. त्या प्रकरणात सुरवातीपासूनच भारताच्या हातात काहीही नव्हते. दहशतवादी सोडले नसते तर १६० निरपराध प्रवाशांचे प्राण गेले असते. त्यांना वाचविण्यासाठी दहशतवादी सोडणे हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला होता.

चौकटराजा's picture

25 Dec 2014 - 6:50 pm | चौकटराजा

भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च असा सन्मान आहे. तो खरे तर अशाच व्यक्तीला अगदी खास करून दिला गेला पाहिजे ज्या
व्यक्तिच्या मोठेपणा मुळे जग भारताला ओळखते. असा निकष न ठेवल्यामुळे हा पुरस्कार आता दुर्मिळ राहिलेला नाही.
पोखरण अणुस्फोटाच्या निर्णय प्रक्रियेची सुरूवात अटलजींच्या अगोदर पासून झाली असेल तर त्याचे श्रेय रावानाही जाते.

वरील मत हे माझे अगदी व्यक्तिगत मत आहे मंडळी.

अटल जी आणि पंडित मालवीय यांना "भारतरत्न " जाहीर झाल्याचे ऐकून मनापासून आनंद झाला !
खऱ्या अर्थाने त्या पुरस्काराचा सन्मान झाला

प्रसाद१९७१'s picture

26 Dec 2014 - 10:30 am | प्रसाद१९७१

बाजपाईंचे ५ वर्षाचे सरकार काँग्रेस च्या आधीच्या सरकार पेक्षा काहीही वेगळे नव्हते.
ह्यांच्या मुळमुळीत पणा मुळे भाजपला संधी असुन १९९९ मधे बहुमत मिळाले नाही.

भ्रष्टाचार्‍यांबद्दल पण ह्यांनी कधी ठाम भुमिका घेतली नाही. कोळसा आणि २ जी घोटाळे ह्यांच्याच काळात चालू झाले.
पाकीस्तान नी चेष्टा केली आग्रा बैठकीत ह्यांची.

सर्वात वाईट म्हणजे २००१ च्या दंगलींसाठी मोदींना त्रास दिला, खरे तर मोदींच्या मागे ठामपणे उभे रहायची गरज होती.

नाखु's picture

26 Dec 2014 - 10:54 am | नाखु

म्हणजे इंदीराजींनी भारताचे शिष्टमंडळाचे प्रमुख आणि विरोधी प़क्षातील एकमेव प्रतिनिधी म्हणून उगीच पाठवले युनोत!!
शिवाय "उत्कृष्ठ संसदपटू" हा बहुमान ही उगाच दिला या कवीला !! *STOP* :stop:
कदाचीत नरसिंहरावांसारखे(जसे कान्ग्रेस्-ममोने केले) यांना अडगळीत टाकावे अशी आपली अपेक्षा होती काय?? *JOKINGLY* 8P 8p
अती अवांतर :दहा वर्षे "पप्पूचेच" सरकार होते ना तेव्हा नरसिंहरावांना भारतरत्न सोडाच खान्ग्रेसच्या पोष्टरवरसुद्धा जागा नव्हती हे मात्र विसरू नका बरे! *wink* ;-) ;) ^_~ :wink:

प्रसाद१९७१'s picture

26 Dec 2014 - 4:31 pm | प्रसाद१९७१

नरसिंहरावांनी सोगांना अडगळीत टाकले होते, पण बाजपाईंनी प्रयत्न करुन त्यांना पुन्हा वर आणले आणी दिल्लीची गादी दिली.

प्रसाद१९७१'s picture

26 Dec 2014 - 10:33 am | प्रसाद१९७१

कोणा पंतप्रधाना पैकी भारतरत्न देण्यासारखे कोणी असेल तर नरसिंह राव हेच होते. अतिशय वाईट परीस्थितीत देश सांभाळला आणि चेहरा मोहरा बदलला.

खरे तर राहुल गांधींना पण भारतरत्न द्यायला पाहीजे. ते नसते तर भाजपला कधीच बहुमत मिळाले नसते.

क्लिंटन's picture

26 Dec 2014 - 10:45 am | क्लिंटन

खरे तर राहुल गांधींना पण भारतरत्न द्यायला पाहीजे. ते नसते तर भाजपला कधीच बहुमत मिळाले नसते.

ठ्ठो.. मग त्या न्यायाने राहुल गांधींना विश्वरत्न द्यायला हवे.

इरसाल's picture

26 Dec 2014 - 11:00 am | इरसाल

विश्वसनीय लोकांकडुन समजलेल्या महितीनुसार अटलजींना लोक ओळखु येणे बंद झालेय. जर कोणी भेटायला आलेच तर काळजीवाहु सांगतात अमुक अमुक आलेत त्यावर ते "आईए" एवढच त्यांच्या भारदस्त आवाजात बोलतात.
त्यामाने उशिरच झाला भारतरत्न द्यायला.

अभिजित - १'s picture

26 Dec 2014 - 12:38 pm | अभिजित - १

१. सत्येंद्र दुबे प्रकरण,
२. पप्पू boston airport वर अडकला असता त्याची सुटका करण्या करता केलेले प्रयत्न .
http://subramanianswamy.blogspot.in/2013/04/dr-subramanian-swamy-explain...
३. कारगिल युद्धात पण आपल्या जास्त सैनिकांचे बळी गेले. कारण POK मधून घुसून कारवाई करणय करता अटलजी तयार नव्हते. तसे केले असते तर जास्त बळी न देत सहज विजय मिळाला असता. POK हा भाग इंडिया आहे ना आपल्या map वर .. मग हरकत काय होती ?

अटलजी एक व्यक्ती एक कवि मनाचा माणुस वक्ता म्हणुन आवडतात.
काल परवा आप कि अदालत मधील त्यांची एक जुनी मुलाखत बघितली
त्यात मात्र एक मोठ विनोदि विधान त्यांनी केल
सत्यार्थ प्रकाश आणि कार्ल मार्क्स मध्ये काहिच फरक नाही.
खुप मौज वाटली या विधानाची

तिमा's picture

27 Dec 2014 - 3:48 pm | तिमा

भारतरत्न हा पुरस्कार इतका सर्वोच्च आहे याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवली नाही. बर्‍याच ऐर्‍यागगैर्‍यांना हा पुरस्कार वाटून त्याचे महत्व कमी झाले आहे. त्यामुळे वाजपेयी हे आदरणीय असले तरी, हा सन्मान देऊन त्यांचा गौरव झालेलाच नाही. पुरस्कार देण्याच्या बाबतीत भारतीय फार भावनाप्रधान वागतात.
एखाद्या रत्नहारात मधेमधे कवड्या गुंफाव्यात तशी काहीकाही नांवे या भारतरत्न यादीत आहेत.