माझी आई नेहमी म्हणत असते, "काय हल्लीची मुलं हुशार झाली आहेत, आम्ही ऐकल्या नाहीत आणी पहिल्या नाहीत अश्या गोष्टी काय सहजपणाने वापरतात, आदित्य जो खेळ खेळतो फोनवर तो खेळायचा मी विचार सुद्धा करू शकत नाहीं.”
असं काही ऐकलं कि मला मात्र खूप गोंधळून जायला होतं, कि हल्लीच्या मुलांचं कौतुक करावं कि ते जगत असलेल्या परिस्थितीची कीव करावी? मला तर कधी कधी वाटतं कि आईवडील मुलांना वेळ देण्याच्या कटकटीतुन सुटका करून घेण्यासाठी त्यांना हि सगळी खेळणी देत असावेत किंवा मुलाच्या मित्रा कडे आहे, म्हणजे त्याच्या कडे असलेच पाहिजे, ह्या भावनेतून देत असावेत, ह्याला पियर प्रेशर असं म्हणतात.
पूर्वी आम्ही लहान असताना आम्हाला टी. व्ही. पाहण्याचं वेड होतं. अचानक घरी कोणी पाहुणे आले कि मोठी माणसं ओरडायची आम्हाला. "तो टी. व्ही बंद करा आधी… जरा बोलुदे शांतपणे आम्हाला…" तेंव्हा राग यायचा पण आता वाटतं किती बरोबर होता त्यांचं. जिवंत माणसाशी बोलणं त्या निर्जीव वस्तूपेक्षा नक्कीच महत्वाचं. आता अचानक पाहुणेच येत नाहीत. आधी फोने वर दहा MESSAGE करून मगच येतात.
आम्ही लहान असताना आलेल्या माणसाने प्रश्न विचारला तर त्याचं त्याच उत्तर आम्ही मुकाट्याने द्यायचो आणि खेळायला जायचो किंवा आपल्या आईच्या मदतीला लागायचो. आता तसं नाही. मुलांना MANNERS असावे लागतात. त्यामुळे ते आलेल्या पाहुण्यांना 'हेलो अंकल' किंवा 'आंटी' असं म्हणून स्वतःच्या खोलीत जातात व त्यांच्या खोलीतला टी.व्ही. पहातात. तो चालू असतानाच हातात फोन वर गेम खेळतात.
टी व्ही आणि गेम मुळे मुलं बोलणं विसरली.
शाळेत कॅलक्यूलेटर वापरायची परवानगी मिळाल्या मुळे पाढे विसरली. (IGCSE पद्धतीत CALCULATER वापरायची मुभा आहे.)
ई मेल आल्या पासून पत्र लिहिणे विसरली, आता तर WHATS APP मुळे ई मेलही विसरली.
घरात असलेल्या कार मुळे चालणं विसरली.
विसाव्या मजल्यावरच्या घरामुळे पाऊस पडल्यावर येणारा मातीचा वासही विसरली. मैदानावर जाऊन खेळायला विसरली.
स्कुल बस मुळे मित्रांबरोबर शाळेत जाण्याचा आनंद विसरली.
रीसोर्ट मध्ये व्हेकेशन स्पेंड करताना मामाच्या गावाला जायला विसरली.
हल्ली लोकांना पाहुणे आले कि खूप ADJUST करावं लागतं म्हणे, म्हणून नातेवाईकांना विसरली.
परदेशात राहिल्या मुळे आपली भाषा विसरली, आणि आई वडिलांना ह्याबद्दल वाईट वाटणे तर सोडा आनंदच होताना दिसतो.
माणूस माणसाला विसरत चाललाय आणि यंत्रांना मित्र मानू लागलाय.
कदाचित भारतात चित्र वेगळं असू शकेलही पण मी परदेशात राहत असल्यामुळे मला हे सगळं खूप प्रकर्षाने जाणवत रहातं.
तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यात कसलीच चूक नाही. पण मला वाटतं माणूस आता तंत्रज्ञानाचा गुलाम बनत चाललाय. आधुनिक उपकरणांचा वापर केल्या शिवाय त्याला कुठलीच गोष्ट करता येईनाशी झाली आहे. मी महाविद्यालयात ३ तासाचं लेक्चर देते त्याकरता power point चा वापर करून प्रेझेन्टेशन बनवते. ह्या कुबडी शिवाय मी समर्थपणे ३ तास बोलू शकेन????
आम्ही कॉलेज मधे असताना आमचे शिक्षक फक्त खडू आणि फळा ह्याचा वापर करून शिकवत होतेच ना ? मग मला का शक्य नाही ते?
कदाचित खूप प्रयत्न केला तर जमेल सुद्धा, पण समोर बसून ऐकणार्यांना चालेल ते???? प्रश्नच आहे.
असो ....
पण कोणीतरी म्हणून ठेवला आहे बदलाची सुरुवात स्वतः पासून करायची असते म्हणून हा प्रपंच…मला नाही वाटत जे चाललंय ते योग्य आहे. पण ह्या बदलाची वाट सोपी नाही, कारण हा बदल समोरच्याला तितकासा मान्य नाही. त्यांना हे सगळं 'टु मच' वाटतं.
माझी लढाई सुरु आहे. माझी मुलं ह्या चक्रात अडकू नाहीत म्हणून मी सतत प्रयत्नात असते.
मराठीतच बोलते. मुलांना मैदानावर खेळायला लावते. परवचा म्हणून घेण्याचाही प्रयत्न केला. थोडाफार सफलही झाला.
आपली स्तोत्र, गीत रामायण, म्हणी, सण समारंभांची माहिती इत्यादी सतत त्यांना देत राहते. पण त्यामुळे त्यांना मी COOL वाटत नाही.
माझ्यासारखा विचार करणारी मंडळी तरी आता उरली आहेत का नाही कोण जाणे?
पण कुठे तरी सारखं वाटतं प्रगतीच्या मागे धावताना स्वत्वच विसरून उपयोग नाही म्हणून म्हणावसं वाटतंय शेवटचा करी विचार फिरून एकदा!!!!
प्रतिक्रिया
22 Nov 2013 - 6:10 am | सोनाली मुखर्जी
बदल्ते विश्व
22 Nov 2013 - 6:13 am | निनाद
स्वत्व म्हणजे नक्की काय असते?
22 Nov 2013 - 6:24 am | सोनाली मुखर्जी
स्वत्व म्हणजे व्यक्तित्व…… माझ्यातली मी!!!!
22 Nov 2013 - 6:55 am | निनाद
मग ते मुलांना का द्यायचे?
त्यांचे स्वत्व त्यांच्याकडे असेलच ना? आणि त्यांच्यासाठी हेच 'खरं' जग आहे ना?
भूतकाळात गुंतून काय मिळणार?
तसे तर मग कार चा प्रवासपण नको. बैलगाडीनेच जायला हवे. घुंगरांचा आवाज ऐकत ऐकत. किंवा इ.स.१२०० मधली मराठी हीच शुद्ध म्हणून तीच वापरून कसे चालेल?
अशी अनेक उदाहरणे घेता येतील.
आमच्यावेळी 'नव्हते हो असले'
किंवा
आपण 'हे जपायला हवे' हे तरी किती काळ आळवत बसणार?
22 Nov 2013 - 6:59 am | यशोधरा
+१
22 Nov 2013 - 2:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
मग ते मुलांना का द्यायचे?
त्यांचे स्वत्व त्यांच्याकडे असेलच ना? आणि त्यांच्यासाठी हेच 'खरं' जग आहे ना?
+१००
"मुलांनी आपण जगलेल्या जगापेक्षा वेगळ्या (जास्त चांगल्या) जगात जगावे"
पण तरीही ते
"आपण जगलो त्या जगापेक्षा वेगळे नसावे"
या दोन विचारांतला प्रचंड विरोधाभास सहज विसरला जातो हे एक प्राचीन काळापासून चालत आलेले वैश्विक आश्चर्य असावे :)
22 Nov 2013 - 8:46 am | मुक्त विहारि
आभारी आहे.
22 Nov 2013 - 9:27 am | ग्रेटथिन्कर
व्वा छान, असाही विचार करणारी माणसे जगात आहेत तर .पुढील कार्यास शुभेच्छा.
शहरीकरणाने देशाची वाट लावली या विचाराचा -ग्रेटसंस्कारी
22 Nov 2013 - 9:54 am | चावटमेला
अच्छा, म्हणजे तुम्ही परदेशात राहता.
22 Nov 2013 - 12:42 pm | उद्दाम
त्या परदेशातच रहातात, हे लेख वाचता वाचताच जाणवले होते.
भारतीय संस्कृती / परवचा / स्तोत्रे याबद्दल रडारड करणारे अमेरिकेत रहातात.
मुघलानी कसे लुबाडले / हिंदुनो जागे व्हा असे संगणारे सौदीत राहून पैसे मिळवतात.
आणि मराठी भषा जगलीच पाहिजे वगैरे लेख लिहिणारे आपल्या पोरान्ना डॉन बॉस्कोत घालतात.
इंटरनेटावरचा हा आता न्हेमीचाच अनुभव झालेला आहे.
22 Nov 2013 - 1:01 pm | ग्रेटथिन्कर
एकदम राईट.
पिझ्झा खाणारेच भाकरीचा नॉस्टॅलजिया येऊन इवळतात.
22 Nov 2013 - 1:28 pm | प्रभाकर पेठकर
खरं आहे. आई-वडील निवर्तल्यावरंच त्यांच्या आठवणीने जीव व्याकुळ होतो.
22 Nov 2013 - 10:17 am | पिवळा डांबिस
प्र. का. टा. आ.
22 Nov 2013 - 10:22 am | विशाल सोनवणे
Albert Einstein ने एक वाक्य लिहिल होत...
"I fear the day that technology will surpass our human interaction.
The world will have a generation of idiots."
22 Nov 2013 - 10:25 am | अग्निकोल्हा
हां लेख वाचुन एकदम सायफाय भारत समोर उभा केलात. तुमच्या तोंडात साखर पड़ो
22 Nov 2013 - 10:36 am | सुहास..
जुन्या बाटलीत नवीन दारू
22 Nov 2013 - 10:39 am | पिवळा डांबिस
प्र. का. टा. का. काय उगीच दिलाय काय?
22 Nov 2013 - 10:42 am | सुहास..
कान धरलेली स्मायली >>> मापी ..एक डाव मापी << ;)
22 Nov 2013 - 10:46 am | पिवळा डांबिस
:)
22 Nov 2013 - 4:35 pm | यशोधरा
बाकी काही असूदेत, ह्या धाग्याच्या मिषाने पिडांकाका मिपावर येऊन प्रतिसाद देते झाले! :) मधे बरेच दिवस कुठे दिसले नव्हते!
22 Nov 2013 - 10:51 am | पिवळा डांबिस
बाकी सोनालीताई, तुम्ही कुठल्या महाविद्यालयात सलग तीन तासांचं लेक्चर नेहमी देता?
नाय जरा नांव सांगा म्हंजे तिथल्या लेक्चरर्सची युनियन करता येते का ते पाहू!!!
पोटेंशियल युनियन लीडर,
पिवळा डांबिस
22 Nov 2013 - 11:30 am | पैसा
त्या परदेशात रहातात आणि तिथल्या कालिजात ३ तास लेक्चर देतात. तुमच्या भूतमहाविद्यालयात नै कै!
22 Nov 2013 - 11:44 am | सुहास..
शिवाय स्त्री आयडी असल्याने सलग तीनच काय पण .....तास लेक्चर देवु शकतात यावर आमचा खंमंग विश्वास आहे ;)
गणीताच्या पांडे मॅडम चा फॅन
वाश्या
22 Nov 2013 - 11:47 am | पैसा
स्त्री आयड्यांबद्दल बोलून जीव धोक्यात घातलाच पाहिजे का?
22 Nov 2013 - 11:51 am | सुहास..
शिर्षक ! शिर्षक !!
22 Nov 2013 - 11:46 am | मृत्युन्जय
त्यात ३ तासाचे लेक्चर म्हणताहेत. "सलग" ३ तासाचे म्हणताहेत का? तुमी बी ना पिडा काका ;)
22 Nov 2013 - 4:02 pm | ग्रेटथिन्कर
सलग तीन तास आमी कालीजात पण थांबत नव्हतो...
22 Nov 2013 - 4:09 pm | सुहास..
तीन तास कॉलेजात नसायचो ? मग कॅन्टीन मध्ये आणि कॅम्पस मध्ये कोण असायचे रे थिन्क्या ;)
22 Nov 2013 - 11:10 am | प्रभाकर पेठकर
बदल हे जिवंतपणाचे लक्षण आहे. जे बदल सोयीचे असतात ते टिकतात. गैरसोयीचे पण एक फॅशनम्हणून अंगिकारले जातात ते कालांतराने गळून पडतात. (नविन फॅशन आल्यावर.).
प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये विचारांत तफावत आढळतेच. आज आपल्या मुलांचे वागणे आपल्याला 'वेगळे' वाटत असेल तर आपण लहान असताना आपल्या आई-वडीलांचे त्या काळातील 'वाटणे' सुद्धा वेगळेच असायचे. कांही बदल सावकाश झाले (जसे आपल्या बालपणी) तर हल्ली यांत्रिकीकरणाच्या युगात आयुष्य वेगवान झाले आहे त्यामुळे बदलही फार झटकन होत आहेत. इतके की आपल्याला (सावकाश बदलांच्या सवयीच्या पिढीस) ते बदल स्विकारणे अंमळ कठीण जाते आहे.
आपले मुल ज्या जगात जन्मलेले आहे ते जग आपल्या बालपणाच्या काळापेक्षा खूप खूप वेगळे आहे. ह्या वेगळ्या जगानेच आपल्या मुलांवर 'वेगळे' संस्कार केले आहेत. हे 'वेगळेपण' आपल्याला स्विकारण्यास त्रास होतो कारण आपण सतत 'त्यांच' आणि 'आपलं' आयुष्य ह्यांची तुलना करण्याची गल्लत करीत राहतो. ह्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची 'आपल्याला' गरज आहे. आहे ह्याच (त्यांच्या) जगात जे चांगले आहे ते त्यांनी आत्मसात करावं ह्या बद्दल जागरूक राहावं. आज मिपावर (आणि इतर संस्थळांवर) आपण जेवढे सहज आणि तत्परतेने व्यक्त होतो ती सुविधा आपल्या लहानपणी होती का? संवाद हरवलेला नाही, संवादाचं स्वरूप बदललं आहे.
संस्कार म्हंणजे काय? एखाद्या वस्तुमानाचे एका स्थितीतून दुसर्या स्थितीत स्थित्यंतर होण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया. सोन्यावर 'संस्कार' करून दागिने घडवितात. हिर्यांवर पैलू पाडण्याचे 'संस्कार' करतात. तसेच, मुलांमधून एक जबाबदार व्यक्ती घडविण्याचे 'संस्कार' करावेत. पाढे, परवचा, श्लोक, सण-वार इत्यादी गोष्टी मर्यादित स्वरूपात महत्त्वाच्या आहेत पण ते म्हणजे संस्कार नव्हेत. मुलांना आजच्या जगातही वागण्यातील सुचिता, विचारातील स्वच्छता आणि परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्याची गरज ह्या मार्गाने संस्कार केले पाहिजेत. बाकी त्यांना कॉम्प्यूटर, वॉट्स अप, मोबाईलवरील गेम्स खेळू द्या लक्ष देऊ नका.
22 Nov 2013 - 2:21 pm | मी_आहे_ना
पेठकर काकांच्या संयत प्रतिसादाशी सहमत. शिवाय 'तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही' हे भान ठेवलं की झालं.
22 Nov 2013 - 3:13 pm | अनिरुद्ध प
+१ पेठकरकाकांशी सहमत
22 Nov 2013 - 4:07 pm | हरवलेला
समंजस आणि संतुलित
22 Nov 2013 - 12:07 pm | विटेकर
पेठकर काकांशी सहमत !
कोअर किंवा व्हॅल्यु सिस्टम असणे महत्वाचे , बाह्य बदल अपरिहार्य आणि आवश्यक ही आहेत. त्याचा फार बाऊ नसावा. म्हणजे कॉम्पुटर गेम खेळताना हिंसक होत नाही ना हे पाहणे महत्वाचे. आणि त्यासाठी मुलांशी सतत संपर्कात राहणे महत्वाचे ! संस्कार कसे करावेत हा खरेच मिलियन डोलर चा प्रश्न आहेच पण त्याचे सोपे उत्तर , जे मुलांनी करावे असे वाटते ते आपण स्वत: करणे ! म्हणजे मुलांनी सोशल व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर प्रथम आपण सोशल असले पाहीजे. आपण मित्र मंड्ळी - नातेवाईकांना घरी बोलावले पाहीजे. फोन न करता ही जाता यावे अशी ४-२ घरे आपल्यासाठीपण असली पाहीजेत. आपण वॉतस अप अथवा चेपु वर सतत असू तर मुले ही असणारच !
या दोन वर्षातील जाणवणारा फरक सांगतो..दर शनिवारी मुलाला शाळेत सोडण्या- आणण्याचे काम माझे असते. त्यावेळी शाळेबाहेर अनेक आया उभ्या असतात.परवा-परवा पर्यंत या कोंडाळे करुन गप्पा मारत उभ्या असायच्या. पण आता मोबाईल मध्ये डोके घालून बसलेल्या असतात. आणि हा बदल सार्वत्रिक आहे. हे मी भारतातील - पुण्यातील सांगतोय. लोक आता फोन करण्याऐवजी स्टेट्स अपडेट करतात.गप्पा मारायला वेळ कुणाला आहे?. बदलांचा वेग इतका सुपर फास्ट आहे.
( परवा एक स्टेट्स अपडेट पाहीला .. वैकुंठात पोचलोय .. बॉडी अजून आली नाही ..! ही अतिशयोक्ती नाही , खरेच असा स्टेट्स आला होता आणि त्याखाली श्रद्धांजली च्या कॉमेंट . नशीब कोणी " लाईक " केल नव्ह्ते.)
मग अशा वातावरणात मुले तेच नाही का करणार ?
आणि त्याचा मर्यादित वापर त्यांनी करायलाच हवा हे त्याना कळायला हवे असेल तर त्यातील सारासार विवेक संभाळण्याचे भान पालकांना हवे ! यंत्रे - सुविधा आपल्यासाठी आहेत , आपण त्यांच्यासाठी नाही याची स्पष्ट जाणीव आपल्या " वागणुकीतून" मुलांना करुन द्यायला हवी. म्हणजे बदल आपण आपल्यात केला की तो आपोआप मुलांच्यात उतरतो. याला शॉर्ट्कट नाही
एका मुलाखतीतील रजनी तेंडुलकरांचे वाक्य आठवले - "संस्कार करायचे म्हणून काही असत नाही , ते घरातील वातावरणामुळे आपोआप होत असतात."
22 Nov 2013 - 12:53 pm | आदूबाळ
मुक्तपीठीय लेख. फोरम चुकल्याला आहे...
मुलांना सो कॉल्ड संस्कृतीचे ढोस पाजत रहायचं, आणि खडू-फळा वापरून शिकवायचा विचार "ऐकणार्याला चालेल का?" म्हणून मुदलातच रद्द करून टाकायचा - हा विरोधाभास भारी आहे.
22 Nov 2013 - 4:20 pm | शिद
22 Nov 2013 - 1:06 pm | आशु जोग
>> शाळेत कॅलक्यूलेटर वापरायची परवानगी मिळाल्या मुळे पाढे विसरली
इज इट सो ? खरच आहे असं
22 Nov 2013 - 1:35 pm | प्यारे१
अबे का शाला मस्करी हाय का काय? शाला ते षोनाली डिक्रा काय तरी चांगलं सांगटे ते टुमी शांत र्हाऊन आयकू नाय शकते काय?
हे तुमी जुने मिपाकर लोक्स. शाला मॉनिटरबी चा हिकडं टायमपास करु र्हायला काय?
काय रे कुनी नवा डिकरा आला सालेमंदी तर तेला तुमी बोलून पन नाय देत काय?
- ते मॅथ्स मदला टेबल कंदी बाय्हार्ट न झालेला प्यारमुझ 'चप्पल'वाला. :)
22 Nov 2013 - 4:37 pm | यशोधरा
टुमी शांत र्हाऊन आयकू नाय शकते काय? - नाय.
हिकडं टायमपास करु र्हायला काय? - होय.
तेला तुमी बोलून पन नाय देत काय? - नाय.
22 Nov 2013 - 4:42 pm | प्यारे१
=)) =))
22 Nov 2013 - 3:00 pm | बॅटमॅन
नवीन सदस्यांवर जिलबी न टाकण्याचे संस्कारवर्ग घेतल्या जावेत अशी या निमित्ताने शिफारस करीत आहे.
22 Nov 2013 - 3:22 pm | यसवायजी
मर्हाटीतच बोला पन सुद्द बोला... दॅटीज- नयेत.
आनी
असलं हैब्रीड पन बोलु नगसा..
(गावठी)
22 Nov 2013 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा
22 Nov 2013 - 6:22 pm | जेपी
नवीन लेखकांची रॅगींग करणार्या मिपाकरांचा निषेध .
22 Nov 2013 - 7:19 pm | अत्रुप्त आत्मा
@नवीन लेखकांची रॅगींग करणार्या मिपाकरांचा निषेध .>>>
22 Nov 2013 - 6:30 pm | साती
फक्त मराठीत बोलता?
मुखर्जींकडे हे कसे चालते म्हणते मी?
चालबे नॉय!
;)
16 Nov 2014 - 3:19 pm | जेपी
धागा वर काढत आहे.