महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या मित्रांशी गेल्या आठवड्यात मुद्दाम एक विषय काढुन संवाद साधला - त्या त्या ठिकाणी असणा-या पाण्याच्या उपलब्धतेचा विषय ! पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा !!! अंगावर शहरा आणणारी माहिती मिळाली. महाराष्ट्रातला दुष्काळ किती भीषण आहे याची कल्पना फक्त बोलण्यातून मला समजली. रोज अनुभवत असतील त्यांची परिस्थिती किती भयाण असेल याची कल्पना करवत नाही. आमच्या नाशिक मध्ये किंवा पुण्या मुंबईत आज पाणी उपलब्ध आहे. आणखीही काही भागात महारIष्ट्रात असेल. त्यामुळे आम्हाला पाणी नसण्याची परिस्थिती लक्षात येत नाही. माणसाना पाणी प्यायची मारामारी आहे. खायचे वांदे आहेत मग गुरांना कोण विचारणार ? रात्री हळूच माणसे गुरे रस्त्यावर सोडून देतात. एका रात्रीत त्यांना बेवारस ठरवतात. माणसे अशी वागतात हे मी स्वत: अनुभवलंय. नाशकात झालेल्या कुंभमेळ्यात. गेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली. कित्येक चेंगरून मेले. बरेच जखमी झाले. बातमी समजताच आपल्याकडून काही मदत व्हावी म्हणून सिव्हिल इस्पितळ गाठलं. हाहाकार उडाला होता. बहुतेक सगळे वयोवृद्ध. मेलेल्यांकडे फारसे लक्ष देणं शक्यच नव्हतं. जखमींना काही हवे नको बघणं. त्यांच्या खाण्याची व्यवस्था. पांघरायची व्यवस्था. वगैरे. एक व्यवस्था अचानक उद्भवलि. लाखोंच्या त्या बाजारात नाशिक बहुतेकांना नविनच. ताटातूट झालेल्या आप्ताना एकमेकांना जोडून द्यायची व्यवस्था. सगळ्यात अवघड व्यवस्था होती ती. घरचा फोन नंबर माहिती नाही. बरोबर आलेल्या आप्तांचा मोबाईल नंबर माहिती नाही. जवळपास छदाम नाही. असे काही होते ज्यांना हिंदी येत नव्हते आणि त्यांची भाषा कोणती हे समजत नव्हते. त्यांची स्थिती केविलवाणी होती. बऱ्याच जोड्या जमविल्या. पण काहींच्या शेवट पर्यंत जुळल्या नाहीत. त्या दोनचार दिवसात एक भीषण अमानवी, अत्यंत पाशवी सत्य समजलं आणि हादरलोच !!!! काहींच्या जोड्या जमत होत्या पण जमू दिल्या जात नव्हत्या. कुंभमेळा हे काही लोकांसाठी आपल्याला नको असलेल्या घरच्या वृद्धांना गर्दीत बेवारस टाकून देण्याचेही ठिकाण आहे याचा मी पुरावा आहे. देवदर्शनाचे आमिष दाखवुन घरातले तरुण आपल्या अत्यंत अडाणी म्हाता-यांना कुंभमेळ्यात घेऊन येतात आणि त्या लाखोंच्या गर्दीत सोडून देतात. आयुष्यभर घरचा उंबरठा न ओलांडलेल्या त्या माईला तिचे गांव कुठल्या राज्यात आहे हे ही सांगता येत नव्हतं !!!!!! गुरांना रात्रीतून बेघर करणारे जरा कमी निर्दयी ! या बेवारस गुरांची व्यवस्था काही ठिकाणी सरकार करते आहे. गुरांसाठी महाराष्ट्र सरकारने छावण्यांची व्यवस्था केली आहे. छावण्यांमध्ये पाणी आणि चा-याची व्यवस्था सरकारने केली आहे. …… पण छावण्यात तरी प्यायला पाणी मिळेल या भरवशाने आता काही ठिकाणच्या छावण्यांमध्ये माणसे चोरून राहत आहेत ……….!
महाराष्ट्रातल्या कित्येक गावात आज आठ दहा दिवसातून येणारी पाण्याची गाडी तिथल्या जनतेला तडफडण्या पासून आज दूर ठेवते आहे. गाडी आली की घागरी बरोबर झिंज्या आणि झुंबड असे चित्र हमखास आहे. काही ठिकाणी पंधरा दिवसांनी एकदा तास दोनतास नळाला पाणी येते…! आमच्यासाठी दुष्काळ ही अनेकापैकी एक टीवीवरली फक्त सनसनाटी बातमी आहे, Channel बदलले की संपून जाणारी. किमान शंभर मित्रांचे वा परिचितांचे फार्म हॉउस असतील. माझ्या एकट्याच्या संबंधितांचे सरासरी एक एकरचे फार्म तरी नक्की असेल. म्हणजे एकूण किमान शंभर एकर तरी नक्की जमिनीवर मजेसाठी गुलाब फुलताहेत, शोभेची झाडे लावली आहेत. शोभेचे गवत आहे. उन्हाळ्यातही हे सारे हिरवे गार आणि रंगी बेरंगी आहे. विकेंडला -सुट्टीच्या दिवशी मजा करायची, पार्टी करायची एव्हढाच त्याचा वापर आहे. त्यासाठी किती पाणी वापरले जात असेल ? हे सगळं पाणी, गाडी धुण्याचे पाणी, शॉवरमध्ये अंघोळ न करता बादलीने आंघोळ केल्यामुळे वाचणारे पाणी, संडासात पांढ-या टाकीतल्या पाण्याने फ्लश न करता टमरेल वापरून आवश्यक तेव्हढेच फ्लश केल्यामुळे वाचलेले पाणी …. जर वाचवलं तर किती माणसं गुरांच्या वाटणीचे पाणी पीत छावणीत न राहता आपल्या घरी राहतील ? आणि, बाय द वे, नाशिकपासून दुष्काळ किती किलोमीटर म्हंजे छावणी किती दिवस दूर असेल……?
प्रतिक्रिया
22 Mar 2013 - 7:12 pm | अर्धवटराव
परिस्थितीची भीषणता व्यवस्थीत पोचवली दादा... पण हातावत हात ठेऊन गप्प न बसता काहितरी उपाय शोधणारे, विचार करणारे तुमच्यासारखे लोक बघुन एक आशा देखील जाणवली.
काहि प्लॅन असेल डोक्यात तर नक्की शेअर करा, आम्हालाही काहि सहभाग देता येईल...
अर्धवटराव
22 Mar 2013 - 7:14 pm | रेवती
लेखातील प्रसंग वाईट वाटायला लावणारे असले तरी हा एकाच बाजूने केलेला विचार वाटला. वरवर पाहता हे भिषण वाटतेच! बाकी पाण्याचे नियोजन हा वेगळा विषय आहे.
22 Mar 2013 - 7:22 pm | कपिलमुनी
दुसरी बाजू वाचण्यास उत्सुक !
22 Mar 2013 - 7:30 pm | रेवती
अज्याबात नाही.
22 Mar 2013 - 7:46 pm | रेवती
म्हातार्या माणसांबद्दल काही म्हणायचे नाहीये मला. पाणी नियोजनाबद्दल म्हटले आहे तसे.
22 Mar 2013 - 9:31 pm | मराठी_माणूस
पाण्या बाबत दुसरि बाजु वाचण्यास उत्सुक
22 Mar 2013 - 9:35 pm | रेवती
नाय बा! लै मोठा विषय आहे तो! शिवाय धाग्याचा विषय तो नाही ना! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काही तज्ञ नाही त्यातली. जे काय इकडचं तिकडचं वाचून, टिव्हीवर पाहून वाट्टय ते ल्हिणार. ;)
22 Mar 2013 - 11:50 pm | कपिलमुनी
आमाला वाटला , तुमास्नी बी म्हातार पनाची काल्जी लागून राह्यली ?
23 Mar 2013 - 12:29 am | रेवती
नाय वो, म्हातारबुवा आणि बायांना आसं सोडून देत्यात हे पयल्यांदाच आयकलं ना भौ!
24 Mar 2013 - 2:03 am | कपिलमुनी
मथुरा, काशी ला यापेक्षा भयानक अवस्था आहे..
विधवा स्त्रिया , म्हातार्या , रोगी असे अनेक जण आणून सोडतात..
हजारोंची संख्या आहे..
काशी मधे असे कोणी बेवारस मेले की गंगामैयाला अर्पण करतात..अंत्यविधीचा खर्च नको म्हणून..
24 Mar 2013 - 8:27 pm | रेवती
काशीबद्दल माहित होतं पण इतर ठिकाणांबद्दल विचार नव्हता केला. एकंदरीतच नकोसा विषय आहे.
22 Mar 2013 - 7:28 pm | आतिवास
कुंभमेळ्यात नकोशा झालेल्या म्हाता-या माणसांना सोडून देतात हे मीही पाहिले आहे - प्रयागच्या कुंभामध्ये!
प्रसारमाध्यमांचा सभोवताली इतका भडिमार असताना, जग जवळ आले आहे असं पदोपदी लोक सांगत असताना आपल्याच घराबाहेरच्या चित्राकडे आपण दुर्लक्ष करतो - कारण ते आता नेहमीचचं झालंय म्हणून?
या परिसरात राहणा-या आणि काम करणा-या लोकांना आपण (दुरुन!) काय मदत करु शकतो? काही शक्यता असतील तर अवश्य सांगा.
23 Mar 2013 - 1:01 am | दादा कोंडके
कुंभच काय, हे आपल्या पंढरपुरच्या वारीत मी नेहमीच बघायचो. वार्यांच आणि कुंभमेळ्यांच हजारो मैल लांब बसून कौतुक करणार्यांच नवल वाटतं.
बाकी लेख छानच.
23 Mar 2013 - 1:04 am | अभ्या..
+१ दादा. एकदम बराबर हाय.
22 Mar 2013 - 9:59 pm | शिल्पा ब
आमच्या नगर जिल्ह्यात तर कायमच पाण्याची वानवा असते.
झाडं लावली अन जगवली तर फायदा होतो पन सरपणासाठी म्हणुन ती तोडुन टाकायची, अण्णा हजार्यांनी पाणी सिंचन करुन त्यांचं गाव सुधारलं म्हणतात..मग इतर ठीकाणी लोकं का काहीच करत नाही. सरकारकडेच का सारखी भिक मागत राहायची?
पाण्याचा प्रश्न भीषण आहे हे खरं आहे पण त्यावर स्वत:साठी म्हणुनसुद्धा गावचे लोकं उपाययोजना करीत नाही हे विचित्र आहे.
22 Mar 2013 - 10:14 pm | रेवती
अगदी सहमत. मलाही हेच सांगायचं होतं. पोपटराव पवार यांनी त्यांच्या हिवरे बाजार गावात, असाच प्रयोग केलाय, शिवाय दक्षिण भारतात शहरांमध्येही पावसाळ्यात गच्चीवर पडणार्या पाण्याचा उपयोग अशी माहिती वाचनात आली होती. निदान स्वत:पुरते पाणी तरी यामुळे आपापल्या घराच्या टाक्यांमध्ये /विहिरींमध्ये जमा होते.
23 Mar 2013 - 10:10 am | आशु जोग
नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात लोकांनी शेततळ्यासारखे उपाय केले आहेत
अशा उपायांनी पाणीटंचाईची तीव्रता निश्चित कमी होत असणार.
25 Mar 2013 - 2:11 pm | मालोजीराव
जोग साहेब नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुका सुपर एक्सेप्शन आहे , एका दिवसात तिथे ५०० ते ७०० मिली पाऊस पडतो.
22 Mar 2013 - 11:53 pm | प्यारे१
किमान पश्चिम महाराष्ट्रात जनरली दर पावसाळ्यात धरणं भरतात नि मार्च संपायच्या आत ठणठणाट.
मग टँकर सुरु होतात.
कुणाचे असतात हो टँकर? कुणाला काही कल्पना आहे?
इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे? बिकट परिस्थिती निर्माण खरंच होते आहे पण तिच्यावर उपाययोजना करण्याऐवजी ती अधिकाधिक भीषण कशी होईल हे पाहिलं जात आहे असं वाटतंय!
23 Mar 2013 - 12:15 am | काळा पहाड
या विषयावर बोलणे म्हणजे मूर्खपणा आहे. हीच गाढव माणसे भुजबळ आणि पवार सारख्यांना मत द्यायला आघाडीवर असतात. जाती वर मत देतात. जाती साठी माती खातात. पाऊस पडला कि सर्व काही विसरून जातात. पंढरपूर च्या वारी मधे वगैरे वेळ घालवतात. राजकारण वगैरे मधे नको तितका इंटरेस्ट घेतात. तलाव खोदणे, रस्ते बांधणे वगैरे गोष्टी सरकारनेच करायच्या असतात असे समजतात. विद्वानांची खिल्ली उडवतात. बिल्डर्स ना जमीन विकायला धावत जातात. लग्नात अवास्तव खर्च करतात. स्वत्:च्या मुलींचा खोट्या प्रतिष्ठेपायी बळी देतात. गावात पारावर बसून तर शहरात कट्ट्यावर बसून टाईम्पास करतात. जाति वर आधारीत आरक्शण हवे म्हणून बसेस जाळतात. हायवे जाम करतात. कॉप्या करून पास होतात. वशिल्याने नोकर्या मिळवतात. दलितांना तुच्छतेने वागवतात तर ब्राम्हणांचा हेवा करतात. काम करणे म्हणजे अपमानास्पद समजतात. सणासूदी वर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. नदीतले पिण्याचे पाणी उपसून उसाला देतात. खोलच खोल बोअरींग मारतात. सरकारी अधिकार्यां पासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांना पैसे चारतात. पैसे आले की स्कॉर्पीओ व बुलेट घेतात. कर्ज काढून बुडवतात. आता दुशकाळ आला म्हणून वैतागलेत. परत पाऊस आला की सगळे विसरून पुन्हा राष्ट्रवादी झिंदाबाद असणारच आहे.
23 Mar 2013 - 12:25 am | बॅटमॅन
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११.
एक एक वाक्य बोचरे पण तितकेच खरेही आहे. :(
23 Mar 2013 - 12:29 am | रेवती
सहमत.
23 Mar 2013 - 12:40 am | अभ्या..
अजून एक राहिलं पहाडराव.
आमच्या सारख्या डिझायनर लोकांचं आणि फ्लेक्सवाल्याचं पोट हेच लोक भरतात. ;)
कुजबूज वाल्यांनी काय डोंबलं छपाई करावी.
23 Mar 2013 - 1:17 am | आशु जोग
शहरी लोक अज्ञानीपणा करतात तो हा असा ...
ऐकीव माहितीवर मते बनवायची.
23 Mar 2013 - 9:08 pm | यशोधरा
दुर्दैवाने खरं आहे.
25 Mar 2013 - 9:44 am | प्रसाद१९७१
फक्त इतकेच नाही, प्रचंड पैदास करुन ह्या पृथ्वी वरचे load पण वाढवतात. १२६ कोटींना कसे पाणी पुरेल?
2 Apr 2013 - 2:30 pm | सस्नेह
हेच लोक वृक्षतोड करतात किंवा करू देतात.
हेच लोक सर्वजनिक नळांचे टॅप चोरतात अन पाणी धोधो वाहून वाया घालवतात.
हेच लोक रेन-वॉटर वाहताना कडेने वाट काढतात.
आमच्या गावात गल्लोगल्ली दोनतीन बोअर आहेत. ते रोज तीन तास सुरू असतात. त्यांना टॅपच नाहीत.
आता बोला !
2 Apr 2013 - 3:45 pm | lakhu risbud
अत्यंत generalised statement असणारा प्रतिसाद. उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न.दुष्काळाच्या पार्श्वभूमी वर यांच्या मनातील मळमळ बाहेर आली,नेत्यांच्या दोष आहेच परंतु त्यासाठी generalised statement करून पूर्ण ग्रामीण समाजाला आरोपी करण्याची यांची क्षुद्र मानसिकता कीव करावी अशीच आहे. तिकडे दुष्काळाने सामान्य लोकांचे हाल होणार आणि हे असे लोक फुकाची तोंडाची वाफ दवडत आणि कळफलक बडवत वातावरण प्रदूषित करणार.यांच्या म्हणन्या नुसार या अश्या लोकांनी असेच मरावे कारण त्यांचे वरती उल्लेख केलेले श्री काळा पहाड यांच्या दृष्टीने चुकीचे वागणे. त्या लोकांची हि मानसिकता चूकच आहे त्याबद्दल वाद नाही पण दुष्काळ त्यांच्या या अशाच कर्माने आला आहे आणि त्यामुळे त्यांनी आता असेच सहन करत राहावे हा विचार घातकी आहे
4 Apr 2013 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> अत्यंत generalised statement असणारा प्रतिसाद.
सहमत.
-दिलीप बिरुटे
23 Mar 2013 - 1:14 am | आशु जोग
दुष्काळाबद्दल लिहिलय ते ठीक आहे.
पण
कुंभमेळ्याबद्दल जे लिहिलय त्याचे भांडवल करून कुणी
हिंदू धर्मावर टीका करण्याची संधी साधू नये.
मागे बेनी हीन हा ख्रिश्चन भारतात आला होता.
त्याचा हेतू साफ होता. ख्रिश्चनिटीची जाहीरात करणे आणि आपले प्रॉडक्ट लोकांच्या गळ्यात
बांधणे.
बंगलोरात त्याने काही कार्यक्रम केले ज्यात त्याने काही चमत्कारही केले.
असाध्य रोगाने ग्रासलेला, कंबरेत पूर्ण वाकलेला कुणी रुग्ण त्याच्याकडे येई
याने नुसता स्पर्श करताच तो बरा होई.
हा चमत्कार त्याने दोन तीन ठिकाणी केला. त्याला मार्गारेट अल्वा, देवीगौडा उपस्थित होते.
पुढे बिंग फुटले. कालचाच बरा झालेला पेशंट पुन्हा लोकांसमोर येत होत होता आणि बरा होऊन जात होता.
बाकी भीषण दुष्काळ चिंताजनक आहे.
जनकल्याण समिती सारख्या संस्था कामाला लागल्या आहेत.
आपल्याला तन मन धन जे जमेल ते द्यावे.
या दुष्काळाचा फायदा मिशनर्यांनी उठवला नाही म्हणजे मिळवले.
23 Mar 2013 - 5:47 pm | श्री गावसेना प्रमुख
जमीनीवर पडनारा पाण्याचा प्रत्येक थेंब जो पर्यंत अडवत नाही तो पर्यंत ह्या चर्चा वांझोट्या राहणार्,सरकार दरवर्षी लाखो करोडो रुपये जलसंधारणावर खर्च करते,पन सत्ताधार्यांचे बगल बच्चे हा पैसा वापरतच नाही,आता ह्यात सत्ताधारी हा पंचायतीचा असो की पंचायत समीतीचा त्याने घर भरले की झाली जलसंधारणाची कामे.आता एक दुष्काळामुळे त्यांना खायची एक आयडीया सापडलीये,प्रत्येक की ग्रुप करुन प्रत्येक ग्रामपंचायत किंवा ग्रुपला एक कोटी देणार आहेत(कसले तरी सेवक पद निर्माण केलेय त्यासाठी) जल संधारणा साठी,बघुया काय बोंब पाड्तात,
पाण्याचे जुने श्रोत जे की बुजवले गेले ते जर मोकळे केले तर खुपच फरक पडु शकतो,पन तिथेही खायला कमी नाही करीत,
हा लोकप्रभा २२ मार्च च्या अंकातला उतारा
आता बोला
23 Mar 2013 - 6:54 pm | पिशी अबोली
नळांमधे कली शिरलाय सगळ्या.. गळत असतात तेव्हा होणारी अधोगती कळत नाही आणि कोरडे पडल्यावर काही उपाय करता येत नाहीत..
23 Mar 2013 - 7:01 pm | बिपिन कार्यकर्ते
जाऊ द्या हो! असं काय काय़ आणि किती किती मनावर घेत बसाल! ऐश करो यार!
23 Mar 2013 - 7:16 pm | यशोधरा
कालच सोलापूरला जायचा योग आला. एका खेड्यात गेलो होतो. पाण्याचं दुर्भिक्ष्य आहेच. ८ दिवसांनी पाणी आलं होतं. पण त्याचा वापर घरासमोरचा रस्ता धुवायला अणि घर धुवायला आणि माणसं एकमेकांवर फवारुन लिटरली वाया घालवत होते. घरासमोरच्या अंगणात घोट्याइतकं पाणी साचलं होतं. एक शब्द खोटा नाहीये. त्यांना विचारल्याशिवाय रहावलं नाही. :( पदरात टिंगलीशिवाय काही पडलं नाही. जाऊद्या ताई म्हणून रि़क्षादादाने तिथून आणलं.
कोणालाही पाण्याची चिंता नाही, कोणालाही काहीही पडलेली नाही.
23 Mar 2013 - 9:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येत्या काही दिवसात आमच्या मराठवाड्यात पाण्याचे हाल होणार आहेत असे दिसते. गुरांसाठी छावण्या दिसू लागल्या आहेत. आणि आमच्या शेतात असणार्या जनावरांसाठी पाणी सोडा असे म्हणनारे शेतकरी पाहिले आणि त्याच पाण्याचा प्रचंड उपसा करुन असलेली शेती वाचविण्याचे प्रयत्नही दिसत आहे. आमच्या गोदाकाठावर आत्ताच शेतकर्यांनी पाण्यासाठी मोठे आंदोलन केले. गोदाकाठच्या सर्व वीजपंप जवळजवळ बंद झाले आहेत. काहींचे चालूही असतील परंतु काळ मोठा कठीन आला आहे, हे मात्र खरं आहे.
बाणाने दिलेला व्हिडियो बराच बोलका आहे.
25 Mar 2013 - 9:55 am | इनिगोय
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यावर कळवळण्यापलीकडे काही करता येत नाही! पण पूर्ण भारतभरात राजस्थानपासून ठिकठिकाणी पाणी अडवून, जिरवून, पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर यशस्वीपणे मात केल्याची उदाहरणं आहेत.
यशोधराच्या प्रतिसादात दिलंय तशा असमंजसपणे वागून जर ही माणसं असे प्रसंग ओढवून घेत असतील तर सहानुभूती तरी कशी वाटावी?
25 Mar 2013 - 9:56 am | नानबा
सरकारदरबारी अनास्था आहे, नेत्यांना जनतेच्या प्रश्नांचे सोयरसुतक नाही, हा मानवनिर्मित दुष्काळ आहे इत्यादी इत्यादी आरोपांबद्दल एक गोष्ट सांगाविशी वाटते.
एकदा १०० वाघ आणि १०० गाढवांमध्ये युद्ध झालं, आणि आश्चर्य म्हणजे त्यात गाढवांचा विजय झाला... तो कसा काय? कारण असं, की १०० वाघांचा सेनापती होता एक गाढव, आणि १०० गाढवांचा सेनापती होता एक वाघ..
आपल्याकडे आहेत त्या परिस्थितीत काम करणार्या प्रामाणिक सरकारी अधिकार्यांची कमतरता नाही. कित्येक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तहसिलदार अधिकारी असे उच्चविद्याविभूषित UPSC ऑफिसर्स खूप प्रयत्न करताना दिसतायत. पण वरील गोष्टीप्रमाणे आज्ञा देणारा सेनापतीच गाढव असला तर काय करणार?
25 Mar 2013 - 10:00 am | शिल्पा ब
<<<कित्येक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तहसिलदार अधिकारी असे उच्चविद्याविभूषित UPSC ऑफिसर्स खूप प्रयत्न करताना दिसतायत. पण वरील गोष्टीप्रमाणे आज्ञा देणारा सेनापतीच गाढव असला तर काय करणार?
खरी गोष्ट आहे. पण लोकंसुद्धा अशा ऑफिसर्सना दाद देत नाहीत हेसुद्ध तितकंच खरं आहे अन मी प्रत्यक्ष पाहीलेलं आहे. त्यामुळे फक्त सरकारला दोष देण्यात अर्थ नाही.
25 Mar 2013 - 10:06 am | नानबा
आपल्या इथे मुळातच अशी परिस्थिती आहे की लोकांच्या लेखी सरकार आणि सरकारी कचेर्या यांच्याबद्दल मनात एक दुराग्रह असतो. सध्या सगळीकडे प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार पाहिला की त्यात काही वावगं आहे असंही वाटत नाही. पण त्यामुळे चांगलं काम करणारे अधिकारी मात्र झाकोळले जातात. ओल्याबरोबर सुकंही जळतं त्यातलाच हा प्रकार.
26 Mar 2013 - 5:47 pm | दिपस्तंभ
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे "लोकशाही"..........
2 Apr 2013 - 2:33 pm | सस्नेह
लोकशाही इतकेच ठोस कारण लोकसंख्या !
26 Mar 2013 - 6:00 pm | पैसा
हिवरेगाव सारखे यश इच्छाशक्ती असेल तर मिळवणे शक्य आहे. पण योजकस्तत्र दुर्लभः
2 Apr 2013 - 1:23 pm | मदनबाण
सगळच भीषण !
======================================================================
2 Apr 2013 - 11:25 pm | शिल्पा ब
लोकांना पण एक फार खाज क्रिकेटची. खेळाडु अन राजकारणी/ उद्योगपती यांचा हा धंदा आहे. बघणार्यांनीसुद्धा जरा डोकं लावायला नको का?
4 Apr 2013 - 4:31 pm | सुधीर मुतालीक
बरोबर आहे. क्रिकेटची एवढी खाज का आहे जनतेला हे गूढ काही उलगडत नाही. पवार आदी मंडळींचा हा धंदा आहे, खेळाचे प्रेम नाही, हे समजण्या इतपत ही जनतेला अक्कल नसावी याचे आश्चर्य वाटते. हा नंगा नाच आता दोन महिने चालणार आहे. बाबानो, हा खेळ नाही, तो तमाशा आहे. इथे दुष्काळ वगैरे परिस्थितीची जाणीव नाही. दुष्काळाची करणे सांगून पवारांनी भास्कर जाधव आणि इद्रिस नायकवडी या त्यांच्याच पक्षाच्या माणसाना धडा शिकविण्याची भाषा केली, या दोघांनी त्यांच्या घराच्या लग्नांमध्ये बेसुमार खर्च केला म्हणे. पण पवार स्वत: आयपीएल दुष्काळा साठी थांबवायला तयार नाहीत. ही दादागिरी नाही का ?
4 Apr 2013 - 8:03 pm | प्यारे१
>>>ही दादागिरी नाही का ?
नक्की कुठल्या दादा बद्दल बोलताय? सगळ्याच पक्षात आहेत. राष्ट्रवादीत तर अजित दादा आहेतच!