ओह माय गॉड.. अरे देवा ... असे आपण कितीतरी वेळा, कितीतरी ठिकाणी, कितीतरी गोष्टीत सतत वापरत असतो.
आता या मागील किंतु, हेतू, परंतु हा विविधांगी, माणसानुरूप, कालानुरूप बदलत असतो, हा भाग निराळा. अमुक काही झालं , कि हे देवा, अस्सं झालंच कसं? काय करणार देवाची करणी.. याच देवाच्या करणीवर आक्षेप घेणारा असा अभिनय मांडलाय 'परेश रावल' यांनी वरील "ओह माय गॉड" या चित्रपटात.
उत्तम सादरीकरण, दिग्दर्शन, सर्वांचा आपापल्या वाटेला अभिनय. पण मूळ खांब म्हणजे परेश रावल. देवाची भूमिका साकारलीय दस्तुरखुद्द 'अक्की" म्हणजे आपला अक्षय कुमार याने.
तर हि कथा एक हिंदी नाटक " किशन वि. कन्हैया" आणि एक इंराजी चित्रपट "The man who saved God" यावर आधारित आहे.
'कानजी लालजी मेहता' (परेश रावल) हा पक्का व्यापारी दाखवलाय. मुळात देवाच्या मूर्ती विकण्याचा 'धंदा'. आता धंदा म्हटला कि होत्याचं नव्हतं करून सांगायचं असतंच कि नाहीतर यांचा धंदा होणार कसा ? नाही का. रु. २५० ची मूर्ती हा पट्ट्या रु. १०,००० मध्ये गुंडाळतो ती कशी तर कुठल्याश्या धार्मिक स्थळाच्या उत्खननात सापडली म्हणे. काय नफा आहे हो याचा, तब्बल ३९००% नफा, अबब. असो हा मुद्दा मुळात इथे नाहीये. जरा आपलं आजच्या पिढीला असल्या गणिती रुपात आकडे मांडले कि बरं वाटतं म्हणून, असो.
कथानकाच्या सुरुवातीलाच कानजीच्या व्यापारी वृत्तीचा प्रत्यय येतो, गंगाजालाच्या बाटलीत हा पट्ट्या बेसिनच्या नळाचा पाणी टाकून सरळ धोपट विकतो (नफा, का तर सरळ आहे गंगेकाठी सारखा जायला नको ना. आता हे काही चित्रपटात सांगितलं नाही, पण आपण सुज्ञ आहात सर्व जाणू शकता, वेगळं सांगावयास नको, एवढंच). पुढे जेव्हा एका इसमाच्या आईची शेवटची इच्छा म्हणून तिच्या भजनी मंडळाला तो इसम धार्मिक स्थानाच्या दर्शनासाठी घेऊन जातो तेव्हा आपले कानजीभाई जातात कि सोबत आपल्या कुटुंबाबरोबर. का ते सांगा पाहू...... अहो मूर्ती विकण्याचा धंदा आहे त्यांचा, सांगितला नाही का तुम्हाला, त्याच साठी तो तिथे गेला आणि वर सांगितल्याप्रमाणे रु. २५० च्या मूर्ती विकत घेऊन आला, आणि त्यातही साईबाबांच्या ४ मुर्त्या फुकटात घेऊन आलाच, का तर एवढ्या खरेदीवर डिसकाउंट नको का ? आणि हो साईबाबांची आजकाल म्हणे भारी चालती आहे बाजारात. बाकी नफा कसा कमावतो त्यांवर हे तुम्ही वर दिलेल्या आकड्यांवरून ओळखलं असेलच, पुन्हा सांगावयास नको.
प्रथम दर्शनी 'नास्तिक' भासणारा कानजी, नंतर जसजसं चित्रपटाच कथानक पुढे पुढे सरकत जात, तसतसं त्याचे सरळ धोपट विचार पटत जातात.
पण आजकालची पिढी वाहवत चालली आहे, देवाधर्माच्या नावाखाली. (उदा: गणपती दुध पितो, कृष्ण, शंकर दुध पितो असा ऐकलं कि लागले मागे धावायला. कोट्यावधी लिटरच दुध गटारात वाहून जात. 'नशीब आमचं ते गटारात जातं', नाहीतर जसे नारळ देवळाबाहेर पुन्हा विक्रीसाठी येतात, तसं दुध नाही पुन्हा विकत यात आला. पण म्हणून काय मूळ मुद्दा खोडून काढता येत नाही. नाश हा नाशच.)
कथानक पुढे सरकताना, गोविंदाचा उत्सव येतो आणि गो गो गोविंदा....गाणं येत (नाचावसं वाटतं कि नाहीं त्या तालावर, असो सुंदर संगीत आहे या गाण्याचा आणि सोनाक्षी सिंघ चा आयटम डान्स, तोही दस्तुरखुद्द प्रभुदेवा बरोबर). आता हे गाणं नसतं तर चाललं असतं असा वाटतंय तोच कथा पुढे सुंदर वळण घेते. कानजीभाई सरळ माईक हातात घेऊन सर्व भक्तांना हाकलतो, का तर त्याच्या मुलाची परीक्षा तोंडावर असताना तो मटकी फोडायला जातो म्हणून. मूळ मुद्दा हा नाहीच आहे मुळी या कथेचा, कथा इथून वळण घेते कारण. तिथे कुणी स्वामी आलेला असतो आणि गर्दी जमा झालेली असते दहीहंडी पाहण्यासाठी आणि याचा मुलगाही मटकी फोडायला. कानाजीची सटकते आणि सर्वांना हा पट्ट्या सांगतो माईकवरून कि कृष्ण दुध आणि लोणी खातोय आज तुम्हा सर्वांची गर्दी, भक्ती पाहून. (वर तुम्ही वाचलेला असेलच, ती इथे अनुभवायला मिळते, वाहवत चाललेली भक्ती). या प्रसंगावरून स्वामी भडकतो आणि त्याला सांगतो देव तुला स्वतः दंड करेल या कृत्त्यावरून. आता कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक क्षण म्हणतात तसं, भूकंप होतो आणि नेमका बाजारातील एकाच दुकान पडतं, कोणाच असेल हो ते, एनी गेसेस ? कांजीभाईच. आता यावरून हे सिद्ध होत नाही कि तो स्वामी धुतल्या तांदळाचा आहे ते. तो एक निराळा विषय आहे जो पुढे कथेत अनायासे येतोय.
झालं, नेमकं एकट्या कान्जीच दुकान उध्वस्थ होतं . झालं देवाधर्माच करणारी माणसे म्हणतील कि देवाच्या विरुद्ध बोलत असतो म्हणून हे झालं. एवढा भूकंप झाला आणि नेमका एक दुकान पडावं तेही या कांजीचाच का ?, आता हे जरी खरं असलं कि तो देव जेव्हा शिक्षा करतो तेव्हा आवाजही होत नाही, पण हे त्या कांजीला काळात नाही. जातो लेक आपलं विमा वाल्यांकडे नुकसान भरपाई मागायला, आणि ते नेहमीप्रमाणे कायद्यावर बोट दाखवून भरपाई नाकारतात. कारण काय तर विमा हा देवाच्या लीलांवर म्हणजे भूकंप, त्सुनामी वगैरे गोष्टींवर लागू होत नाही. हे पाहून मनातून उध्वस्थ झालेला कांजी सरळ त्या देवावर 'दावा' ठोकतो नुकसान भरपायीचा.
इथे खरी कहाणी वळण घ्यायला सुरुवात होते. वकील शोधून शोधून दमतो बिचारा कांजी, आणि शेवटी एक वकील (ओम पुरी) तयार होतो दावा ठोकायला देवावर. आणि नंतर इथे एन्ट्री होते कन्हैयाची, कृष्ण वासुदेव यादव, आपला अक्की, 'अक्षय कुमार'. पुढे कथा सरकताना कशी मजा येते ते प्रत्यक्षच पाहण्यातच आणि अनुभवण्यात मजा आहे. जेव्हा तरतऱ्हेचे, निरनिराळे तात्विक विचार, जे तुम्हा आम्हा सर्व सामान्यांना पटतील असे मांडून कांजी आपला मोर्चा देवस्थानातल्या अवैध पैशाकडे वळवतो. आता देव नुकसान भरपाई करणार म्हणजेच हि देवस्थाने, कारण खरं देव कोणी पाहिलेला नाही म्हणून.
आता देवाने सांगितला नाहीं कि मला येऊन पैसा, सोनं-नाणं वहा, चादर चढवा. आता जो सर्व या सृष्टीला जगवतो, त्याला तुम्ही आम्ही पामर काय देणार ? पण हेच या समाजाला कळत नाही आणि देवाधर्माच्या नावाखाली चालणा-या स्तोमाला नकळतपणे पाठींबा देतात, हे असं करून. हेच जर आपण एखाद्या गरिबाला चादर दिलीत थंडीत, त्यांना खाऊ पिऊ घातलं, किंवा कोणा सज्जनाला पैशांची गरज असताना मदत केली तर तोच देव प्रसन्न होईल आणि त्याच्या दरबारात आपलं स्थान नितळ होत जाईल, हे त्रिवार सत्य आहे. पण हे या लोकांना समजत नाही.
कथा पुढे सरकताना कसा पैशांचा बाजार मांडलेला आहे आजकाल सर्वत्र मठांच्या नावाखाली, ते प्रदर्शनास येत या चित्रपटात. यात मिधून चक्रवर्ती (एक मठाधीश), महेश मांजरेकर (मिथुनचा आणि इतर माथाधीशांचा वकील, ज्यांवर कान्जीने दावा ठोकलेला असतो) यांचीही सुंदर महत्वाची भूमिका आहे आणि त्यांनी त्यांच्या भूमिका सुंदर वठवल्याहि. पुढे पुढे कान्जीचे तात्विक विचार तो मांडत असताना न्यायाधीशहि प्रभावित होतो (जेव्हा आधी हा खटला दाखल होईल कि नाहीं याची शंका होती, का तर कारण देवावर दावा असूच शकत नाहीं म्हणून), तो न्यायाधीशही हा खटला स्वीकारून पुढे पुढे कान्जीच्या विचारांवर फिदा झालेला वाटतो. पुढे कांजी याच विचारात फसतो, वकील शाब्दिक सकामाकीत पकडतात आणि एका वर्मावर बोट ठेवतात आणि त्यावर अक्षय कुमार कसा कांजीला नकळत गीता, बायबल कुराण वाचायला लावून मदत करतो आणि यातून बाहेत काढतो हे बघण्यासारखं आहे. पण सरतेशेवटी हेच मठाधीश कुटील कारस्थान रचतात आणि आपली डाळ शिजणार नाहीं हे ओळखून कान्जीची आणि त्यासोबत साधारण अन्य 2०० जणांची नुकसान भरपाई द्यायला तयार होतात, तीही तब्बल ४००-५०० कोटी. (अरे हो, हे अनावधानाने सांगायचं राहीलच कि, कि कान्जीसारख्या असंख्य लोकांच्या केसेस विमा कंपन्याकडून नाकारल्या गेल्या आहेत "'Act of God',या नावाखाली, ज्या हा कांजी स्वतःच्या खाताल्यासोबत लढायला तयार होतो त्या गरिबांची अवस्था, केविलवाणी अशा पाहून).
(या खटल्यादरम्यान कांजीला अर्धांगवायूचा झटका येतो)
मूळ हेतू या मठाधीशांचा तुम्हाला इथे कळला तर हादरून जाल तुम्ही ! अहो हे साले, त्या कान्जीलाच देव करतात, दरम्यानच्या महिन्यात, जेव्हा कांजी इस्पितळात असतो. कसं ? तर त्यांचं गणित काय तर या कान्जीच स्तोम माजवून हे ४०० कोटी एका वर्षांत वसूल कसे करायचे हे त्यांना उमगून आहे म्हणून. शेवटी त्या कृष्णदेवाला कान्जीची दया येते आणि तो त्या कांजीला इस्पितळात जाऊन साक्षात्कार घडवतो देवत्वाचा. या देवाला कान्जीचे प्रात्यक्षिक विचार पटतात, पण त्याच्या 'नास्तिक असण्यामुळे त्याला अर्धांगवायू होतो' हेही सांगायला तो विसरत नाहीं. या दरम्यानच्या कान्जीच्या देवत्वाच्या घटना तो कांजीला एका पडद्यावर दर्शन घडवतो आणि कांजीवर यास समूळ उपटून टाकण्यासाठी प्रोत्साहित करतो. शेवटी काय करायचं ते त्याने कांजीवर सोडलेला असतं.
अर्थात कांजी त्याच्या भुमिकेवर ठाम असतो आणि तो ते स्वतःचा माजलेला स्तोम मोडीत काढतो. मुर्तीपुजेत अडकून जाऊ नये, आणि त्या देवाला, त्याच्या देवत्वाला आपल्या मनातून, माणुसकीतून साकारकरा, हा सरळ धोपट संदेश कांजीभाई मांडतो. आणि हे आजकालच्या शिकल्या-सवरलेल्या पिढीला समजेल, उमजेल अशी वेडी आशा माझी, हा चित्रपट पाहून.
उत्तम कथा. आपल्याला आवडली बुवा. ३ नि १/२ स्टार त्याला. (४ हि चालतील. पण मी या समीक्षणातील नवखा, म्हणून १/२ स्टार आखडता हात घेऊन मागे घेतो)
जरूर पहा "ओह माय गॉड"
आपला विनम्र
-- के डी
+९१९९२०५७७८०२
प्रतिक्रिया
28 Oct 2012 - 3:34 pm | अन्या दातार
तुम्ही नवखे आहात म्हणून अर्धा तारा कमी? द्या की भरपूर. कुणाच्या बाचे जातंय?
बाकी आधीच्या कानजीचे पुढे कांजी असे नामकरण बघून डोळे पाणावले
28 Oct 2012 - 3:34 pm | प्रकाश घाटपांडे
यापुर्वी समीर सूर यांनी या चित्रपटाचे परिक्षण केले आहे. त्याची चर्चा इथे वाचायला मिळेल.
28 Oct 2012 - 5:38 pm | आबा
"The man who SUED God" असं मूळ चित्रपटाचं नाव आहे...
http://www.imdb.com/title/tt0268437/
28 Oct 2012 - 5:54 pm | शैलेन्द्र
चांगली लिखन्शैली, आवडली..
28 Oct 2012 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समीरसुरने मागे चित्रपटाबद्दल लिहिलं होतं आणि त्यानंतर चित्रपट बघायलाही मिळाला.
चित्रपट चांगला आहे, फक्त निर्माताही लोकभावनेचा (गल्ल्याचा) विचार करुन द्वंदात अडकलेला दिसला.
-दिलीप बिरुटे
28 Oct 2012 - 7:22 pm | संजय क्षीरसागर
सारंश आणि संदेश एकदम क्लिअर आहे. तुम्ही अक्षय कुमारचे सुरेख डायलॉग्ज नीट ऐका. शेवट तर भारीच आहे, त्या विषयी समीरच्या परिक्षणावर प्रतिसाद देताना मी लिहिलय
28 Oct 2012 - 7:26 pm | संजय क्षीरसागर
इथे
28 Oct 2012 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> अक्षय कुमारचे सुरेख डायलॉग्ज नीट ऐका. शेवट तर भारीच आहे..
चित्रपट काळजीपूर्वक पाहिला आहे. डायलॉग्जही काळजीपूर्वक ऐकले आहेत असे वाटते. अक्षयकुमारचा संदेश असा आहे-
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो-
मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो-
वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५ ॥ (पान नं. आणि कितवा अध्याय माहिती नै)
मी प्रत्येकाच्या -हदयात आहे. माझ्यामुळेच स्मृती, ज्ञान, आणि त्याचा अभावही मीच आहे.
वेदांना जाणनारा आणि वेदांचा कर्ता मीच आहे, मला शोधण्याची गरज नाही.
किंवा....
ममेवंशो जीवलोक जीवभूतः सनातनः........
जीवलोकात सर्वत्र मी आहेच. माझा अंश प्रत्येकात भरलेला आहे. वगैरे इत्यादी..
पण मी आहेच, असा संदेशही आहेच आणि त्याचं अस्तित्त्वही चित्रपट नकळत दाखवतोय या अर्थाने मी द्वंद्व म्हणत आहे.
-दिलीप बिरुटे
29 Oct 2012 - 1:28 am | संजय क्षीरसागर
द्वंद्व म्हणजे तो आणि आपण वेगळे आहोत हा भ्रम आणि त्याच्या प्राप्ती किंवा कृपेसाठी केलेली कर्मकांड. ज्यांची पूर्ण सिनेमात खिल्ली उडवली आहे आणि भक्तीमार्गातल्या गुरूंचा भोंगळपणा उघड केलाय. अर्थात हे इतकं सहज सुटणारं नाहीये (माझं म्हणणं बहुदा तुमच्या लक्षात आलं असेल). त्यामुळे मिथुनचं एक भारी वाक्य आहे. तो कांजीभाईला म्हणतो तू कितीही प्रयत्न केलेस तरी हे लोक पुन्हा आमच्याकडे येतील कारण दे आर नॉट गॉड लवींग पीपल बट दे आर गॉड फिअरिंग पीपल!
तो एकच असल्यानं तो आणि आपण वेगळे नाही त्यामुळे
28 Oct 2012 - 8:50 pm | सचिनपवार
छान चित्रपट आणि छान परीक्षण!
28 Oct 2012 - 10:39 pm | यसवायजी
एवढा अट्टाहास का? कानजी नास्तिक आहे तर ठिक आहे ना.. त्याला आस्तिक बनवण्यासाठी direct अर्धांगवायू?? आणी त्याला झालेला त्रास.. त्याच काय? त्याच्या कुटुम्बियान्च काय??
कदाचित देवाने सुद्धा साम-दाम-दन्ड-भेद वापरयच ठरवलय..
"अस्तित्वाची लढाई"?? :D
30 Oct 2012 - 7:07 am | सांजसंध्या
थेटरात जाऊन पाहिला. उत्तम सुरुवातीनंतर काही तडजोडी केलेल्या वाटल्या. संभाव्य विरोधाचा विचार सिनेमा बनवतानाच केलेला दिसला. हे ठिगळ वाटलं तरी ही काळजी घेणं आवश्यक आहे हे ही पटतं. सिनेमा चांगलं लोकप्रबोधन करतो आणि ते करत असताना कंटाळा येऊ देत नाही हेच विशेष आहे.
3 Nov 2012 - 2:23 pm | केदारविदिवेकर
धन्यवाद @ शैलेंद्र , सचिन
@ टिमकी - अहो म्हणू कि अगं ते नाही कळत तुमच्या आयडी वरून, तरीही भा पो घ्या
दैवी शक्ती कोणी तिला मानीत नाही म्हणून त्यास शिक्षा करीत नसते, तर ते सर्वस्वी त्याच्या कर्मांवर अवलंबून असते हा विचार मनावर पक्का बिंबवा.
@ संजय
मलाही चित्रपट परीक्षण करायला आवडेल. माझी लेखनशैली आवडली असल्यास जरूर लोकांना सांगा. माझा भ्र. ध्व. क्रमांक - ९९२०५७७८०२
-- के डी
3 Nov 2012 - 10:48 pm | संजय क्षीरसागर
सरावानं लेखन सुधारत जाईल.
7 Dec 2012 - 10:18 pm | यसवायजी
"सर्वस्वी त्याच्या कर्मांवर अवलंबून असते". - थोडं पटणेबल.
पण,"त्याच्या नास्तिक असण्यामुळे त्याला अर्धांगवायु होतो"- हे पटलं नाही
23 Dec 2012 - 8:43 pm | केदारविदिवेकर
देवाला आव्हान द्यायच नसतं, तर कृपा वर्षाव असू दे असा आवाहन करायचं असत.
आव्हान आणि आवाहन यातला फरक नास्तिक माणूस समजत नाही आणि घोळ घालून बसतो
3 Nov 2012 - 3:01 pm | श्री गावसेना प्रमुख
टिमकी वाजवा की मग कळेल कोण आहे ते.
7 Dec 2012 - 9:36 pm | यसवायजी
@ श्री गावसेना प्रमुख- वाजवतो 'तो' मी.. वाजते ती टिमकी.. :D
हौस असेल वाजवुन घ्यायची तर सांगा.. लै आवडतं आपल्याला.
8 Dec 2012 - 9:04 am | श्री गावसेना प्रमुख
3 Nov 2012 - 11:11 pm | सुहास..
च्यायला कोण आणि कुठले आयडी आणि क्काय चाललय तेच कळत नाहे :(
जरा कोणी ओळख-पाळख सत्राचे पुनर्वसन करेल काय ?
( त्याला आगावु धन्यवाद )
23 Dec 2012 - 8:52 pm | समयांत
भूकंप होतो कि वीज पडते राया त्या कांजीच्या दुकानावर ? ¨¨¨¨¨^