श्री. विश्वास भिडे यांच्या एकोहम या ब्लॉगवरती "आदि शंकराचार्यांवरचा कल्याणी विशेषांक" वाचत होते. "सौंदर्यलहरी" या रचनेचे रसग्रहण वाचतेवेळी फार सुरेख उपमा वाचनात आल्या. डॉ प्रमोद ग लाळे यांनी हे रसग्रहण केले आहे. मी केवळ त्या रसग्रहणातील काही भाग मिपाकरांकरता जसाच्यातसा येथे उधृत करत आहे. संपादकांना अयोग्य वाटल्यास हा धागा उडवावा.
____________________________________________________
सुंदर शब्दरचनेबरोबरच सर्व श्लोकांत शांत, शृंगार, करुण, अद्भुत यांचे सौंदर्यलहरी माहेरघरच आहे. या स्तोत्रात ओज आहे कारण ते पराशक्तीचे वर्णन आहे. प्रसाद आहे कारण ती शंकराचार्यांची रचना आहे, माधुर्य आहे कारण त्या स्तोत्रात देवीच्या सुरम्य देहसौष्ठवाचे वर्णन आहे.
एका श्लोकात असे सांगीतले आहे की देवीच्या चरणांवरचा धूलिकण, अज्ञानांच्या अंतःकरणातील अंधाराचा नाश करणार्या सूर्याची नगरी आहे. जडबुद्धीच्या लोकांसाठी चैतन्यपुण्यांच्या गुच्छातून सतत वाहणारा असा पुष्परसाचा किंवा मधाचा झरा आहे. दरीद्री लोकांच्या इच्छा पूर्ण करणारी, चिंतामणी रत्नांची एक माळा आहे व तो रजकण म्हणजे, भवसागरात बुडणार्या लोकांना वर काढणारी विष्णूस्वरूप वराहाची दाढच आहे.
आचार्य एका श्लोकात सांगतात की चारही वेद देवीच्या पादपीठाजवळ हात जोडून ऊभे असतात, ते जेव्हा आपले हात मुकुटाला लावून, नम्रभावाने देवीला नमस्कार करतात, त्यावेळी त्यांचे मुकुट तुरे लावल्याप्रमाणे दिसतात.
आचार्य दीनतेने देवीला विचारतात, "आई मी तुझी पूजा काय करणार? कारण माझ्या निसर्गाने किंवा इच्छेने होणार्या हालचाली, तेच सर्व पूजाद्रव्य रूपाने तुझ्या चरणीच अर्पीत होतात.
देवीचे कटाक्ष बाणाच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण असून ते शंकरांच्या वैराग्यमूलक शांतरसाचा भेद करणारे आहेत.
आकाशातील चंद्रापेक्षा देवीच्या मुखचंद्राचे आस्वायत अधिक आहे हे सांगताना आचार्यांनी व्यतिरेकाचे एक उत्तम उदहरण दिले आहे.- चकोरपक्षी देवीच्या मुखाचे "स्मितज्योत्स्नाजल" नित्य पीत असतात. त्या माधुर्यातिरेकाने, त्यांच्या तोंडात जडत्व येते. त्यांना काहीतरी आंबट खावेसे वाटते. तेव्हा ते चंद्राच्या चांदण्याचे ती आंबट कांजी आहे असे समजून सेवन करीत असतात.
देवीचे वक्ष हे जणू काही अमृत रसाने भरलेल्यामाणिक रत्नाच्या कुप्याच आहेत.
देवीचे दोन्ही चरण लाक्षारसामुळे रक्तवर्ण झाले आहेत. प्रमदवनकंकेलित म्हणजे अशोकवृक्ष फुलाफळांचा बहर यावा या इच्छेने तुझ्या चरणाच्या आघाताची नेहमी आकांक्षा बाळगून असतो. त्यमुळे शंकर त्या अशोक वृक्षाची फार असूया करतात.
एका श्लोकात- शंकरांनी चुकून गंगेचे नाव घेतले, शंकरांना देवीच्या पादप्रहाराचा प्रसाद लाभला, व त्यामुळे मदनाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असे गमतीचे वर्णन आले आहे.
साध्या कमळात आणि देवीच्या चरण कमळात किती फरक आहे त्याचे वर्णन आचार्यांनी सूक्ष्म दृष्टीने केले आहे. निसर्ग कमलांना थंडी सहन होत नाही तर तुझे चरण हिमालयात निवास करतात. निसर्ग कमळे रात्री मिटून जातत, तर तुझे चरण अहोरात्र प्रसन्न असतात. साध्या कमळात फक्त लक्ष्मीच वास करते पण निष्ठेने उपासना करणार्या "समयी" जनांना तुझे चरण लक्ष्मी किंवा अतिस्पृहणीय निजानंदरुपी ऐश्वर्य स्मर्पित करतात. देवांगना ज्यावेळी तुझ्या चरणांना नमस्कार करतात त्यावेळी त्यांची करकमळे कळ्यांसारखी मुकुलित होतात. खरेच आहे, दिनविकासी कमळांवर चंद्रकिरणे पडली की ती मिटणारच. असा महीमा असणारे तुझे चरण कल्पवृक्षांना पाहून हसतात. कल्पवृक्ष स्वर्गात राहणार्या देवांचीच इच्छा पूर्ण करतो, पण तुझी चरणकमळे पृथ्वीवरच्या दरिद्री लोकांना देखील रात्रंदिवस समृद्धी देत असतात. तुझे चरण रत्नखचित नुपूरांनी सुशोभित झाले आहेत. त्यांची छुमछुम म्हणजे राजहंसांना सुंदर चालीचे धडे देत असताना त्यांनी केलेला मधुर ध्वनीच होय.
आचार्यांनी चंद्राचा देवीशी कसा अद्भुत संबंध जोडला आहे पहा. चंद्र हा एक पाचूचा करंडा आहे त्यात देवी आपली प्रसाधने ठेवीत असते. चंद्राचा कलंक ही कस्तुरी, जलांश म्हणजे गुलाबजल, पांढरा कलात्मक भाग हा कापूर आहे. जेव्हा देवी त्या वस्तूंचा उपयोग करते, तेव्हा त्या कमी होत जातात म्हणजे कृष्णपक्षात चंद्रकलांचा क्षय होतो. ब्रह्मदेव पुनः तो भरतात व शुक्लपक्षात पुनः चंद्रकलांची वृद्धी होत जाते.
शेवटी आचार्य म्हणतात की देवी जरी ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती, विष्णूची पत्नी लक्ष्मी व रुद्राची सहचारिणी पार्वती असली तरी तिचे यथार्थ स्वरूप या तिन्ही देवतांच्या पलीकडचे आहे.
प्रतिक्रिया
1 Aug 2012 - 8:04 pm | एस
जरी मी वैयक्तिक चार्वाक मताचा असलो आणि आदिशंकराचार्यांशी त्यामुळे कितीही भांडण असले तरी त्यांची प्रतिभा वादातीत होती. आणि रसग्रहण फार आवडले. धन्यवाद...!
1 Aug 2012 - 8:54 pm | इरसाल
आवडले धन्यवाद.
2 Aug 2012 - 3:24 pm | नाना चेंगट
मस्त !
3 Aug 2012 - 9:23 am | मूकवाचक
+१
3 Aug 2012 - 10:43 am | कवितानागेश
:)
3 Aug 2012 - 11:24 am | चैतन्य दीक्षित
चंद्र हा एक पाचूचा करंडा आहे त्यात देवी आपली प्रसाधने ठेवीत असते. चंद्राचा कलंक ही कस्तुरी, जलांश म्हणजे गुलाबजल, पांढरा कलात्मक भाग हा कापूर आहे. जेव्हा देवी त्या वस्तूंचा उपयोग करते, तेव्हा त्या कमी होत जातात म्हणजे कृष्णपक्षात चंद्रकलांचा क्षय होतो. ब्रह्मदेव पुनः तो भरतात व शुक्लपक्षात पुनः चंद्रकलांची वृद्धी होत जाते.
>>>>
ह्या उपमेला जगात तोड नाही असे म्हणावेसे वाटते.
मूळ संस्कृत श्लोक देऊ शकाल काय?
लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद :)