हिरव्या डोंगरावर पांघरलेली पांढ-याशुभ्र ढगांची चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टीचा सहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा अध्यान्माचा स्पर्श ....हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही.समर्थांनीही ज्याचे वर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुती येथे आल्याशिवाय मिळत नाही.दासबोधाची जननी असणारी शिवथरघळ पहावी ती पावसाळ्यातच !.दाट वनराई मध्ये नजीक असणा-या धबधब्याशेजारीच शिवथरघळ आहे .सुंदरमठ असे यथोचित या ठिकाणाला नाव आहे.
घळीकडे घेऊन जाणारा प्रवासही अत्यंत सुखकर.हिरवीगार फुललेली शेती , हिरवेगार डोंगर ,त्यातून कोसळणारे गिरीचे मस्तकी गंगा हे वर्णन सार्थ व्हावे असे असंख्य धबधबे..आपले स्वागत करण्यासाठी तयार असतात.पाऊस पाडून गेलेले ढग अगदी खालपर्यंत आलेले दिसतात.नदीच्या पाण्याचा तो आवाज अंगावर रोमांच उभे करतो.नागमोडी वळणांनी आपण घळीच्या पायथ्याशी येतो आणि दुरुनच दाट हिरवाईत दडलेला मोठा धबधबा आपल्या दृष्टीस पडतो..धबाबा तोय आदळे असे समर्थ याचे वर्णन करतात.घळीत जातांना याचे थंडगार तुषार अंगावर झेलण्याचा मोह आवरता येत नाही.
डोंगराच्या कपारीत १००-१५० माणसे बसू शकतील एवढा घळीचा आकार आहे.याच ठिकाणी दासबोधा सारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली.घळीत मारुतीची मूर्ती आहे.रामदास स्वामी ओव्या सांगत आहेत आणि कल्याणस्वामी त्या लिहित आहेत अशा दोन्ही मूर्ती घळीत आहेत.याशिवाय या परिसरात भोजन मंडप ,सभागृह .गणेश मंदिर ,भक्तनिवास , ग्रंथसंपदा आहे.याठिकाणी धार्मिक विधी सतत सुरू असतात .खिचडीच्या प्रसादाची सोय असते .याशिवाय पावसाचा आनंद घेऊन आल्यावर येथील लहान हाँटेलमध्ये गरमागरम पिठलं-भाकरी ,कांदा-लोणचे पोटपूजेसाठी तयार असतात. शिवथरघळ हे धार्मिक स्थळ आहे पर्यटनस्थळ नाही याचे भान मात्र ठेवावे लागते .येथे राहण्यासाठी भक्तनिवास व सरकारी विश्रामगृह आहे. महाड पासून ३४ कि.मी अंतरावर घळ आहे .महाड -पुणे-पंढरपूर मार्गावरून बारसगाव येथून घळीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे.एस.टी अथवा खासगी वाहनाने येथे जाता येते .कोकण रेल्वे मार्गावरील वीर तसेच माणगाव स्थानक जवळचे रेल्वेस्थानक आहे.
शिवथरघळ येथील दूरध्वनी क्र . ९२२५७८४१२७
नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून शिवथरघळीची वाट धरा आणि तीही पावसाळ्यातच.
..........................................
शिवथरघळची वाट कँमे-यातून ..







प्रतिक्रिया
16 Aug 2011 - 11:02 pm | शुचि
लेख आवडला. सर्व फोटो मस्त. हनुमानाची तस्बीर सुरेख.
17 Aug 2011 - 12:11 am | जाई.
+१
17 Aug 2011 - 12:19 am | अर्धवटराव
छान वाटलं हो फोटु बघुन.
(समर्थभक्त) अर्धवटराव
17 Aug 2011 - 8:13 am | पाषाणभेद
जय जय रघुवीर समर्थ!
17 Aug 2011 - 8:52 am | गणा मास्तर
चिमुरडी पोर बघुन जीवाला बर वाटल.
कस निस्राप वय.
18 Aug 2011 - 11:52 am | प्यारे१
जय जय रघुवीर समर्थ...!!!
अवांतरः १३ ते २० सप्टेंबर या कालावधी मध्ये घळीमध्ये समर्थ रामदास स्वामी, दासबोध आणि तत्सम विचारांची प्राथमिक ओळख करुन देण्याच्या अनुषंगाने एक वर्ग आयोजित केला गेला आहे. ( दरवर्षी असतो)
साधारणपणे ३० वयापासून पुढच्या प्रापंचिक आणि वानप्रस्थी लोकांसाठी असतो. ऐच्छीक देणगी आहे. बाकी शुल्क आकारले जात नाही. (आर्थिक विषय नसल्याने जाहिरात नाही हे लक्षात आले असेल) इच्छुकांनी
(यावर्षी गरज म्हणून मी बहुधा सपत्नीक जाणार आहे).
अधिक माहिती :-
दासबोध अभ्यासवर्गः दि. १३ सप्टें. २०११ ते २० सप्टें.२०११ ( १३ तारखेला दुपारी चार वाजेपर्यंत पोचणे अपेक्षित आहे)
प्रापंचिकः वय ३० ते ५० , वानप्रस्थी गट : वय ५० ते ६५
प्रवेश अर्ज साधारण ११" X ८" (ए४ साईज ) आकारामध्ये 'श्रीसमर्थ विद्यापीठ, शिवथर घळ' या नावे करावा आणि उत्तरासाठी स्वतःचा पत्ता लिहिलेला रु. ५ चे पोस्टेज चा लखोटा पाठवावा.
संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोडसह) दूरध्वनी क्रमांक, जन्मदिनांक, वय, शिक्षण, व्यवसाय, सेवानिवृत्तांनी पूर्वी कुठ ल्या क्षेत्रात ससेवेशोता, यापूर्वी या वर्गाला आला होता का, आल्यास कधी इ.इ. सर्व आनुषंगिक माहिती
वर्ग : सकाळी ६ ते १२, दु. २ ते ३.३० सा. ६.३० ते ८, सायं. उपासना १ ते १.३० तास, रात्री आनंदमेळा अशा स्वरुपात.
भारतीय बैठकीत सलग १-१.३० तास बसणेस सक्षम असावे.
असे एकंदर स्वरुप आहे.
अर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत पाठवायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
श्री. गो.स. तथा आप्पा पाटगावकर
प्लॉट. नं. ४०, सन्मित्र को ऑप हौसिंग सोसा.लि.
राजारामपुरी,कोल्हापूर ४१६००८.
दूरध्वनी ०२३१- २५२२६७३
मोबा. ९९७५९११२३६
(सज्जनगड मासिक पत्रिकेत आलेल्या माहिती/ चौकटीवरुन)
18 Aug 2011 - 12:07 pm | स्वाती दिनेश
फोटो आणि लेख दोन्ही छान!
स्वाती
18 Aug 2011 - 1:31 pm | बिपिन कार्यकर्ते
वा!