लोक्स चारोळीचे धागे बनवताहेत.
म्हटले आपण पण न लाजता (कोण हसतोय रे तो? आहे. आहे मला थोडीशी का होईना लाज) जे काही आहे ते प्रकाशावे.
वादसंवाद करताना निर्मिती झालेली आहे त्यामुळे श्रेय अर्थातच मला नाहीये.
प्रस्तावना पुरे झाली.
तर सादर आहे माझे शेरोशायरीतले पहिले अपत्य.
घाव तो होता जुना पण वर्मी नव्याने लागला
पुसटल्या जखमांना जणू आज स्पर्श कुणाचा जाहला
आली अशी कळ उरी, आली उरी कळ अशी
जणू अंत मी स्वतःचा, आज जवळ पाहिला
प्रतिक्रिया
10 Jun 2011 - 9:26 am | सामान्य वाचक
छान
10 Jun 2011 - 10:31 am | पिवळा डांबिस
घाव तो होता जुना पण वर्मी नव्याने लागला
पुसटल्या जखमांना जणू आज स्पर्श कुणाचा जाहला
आली अशी कळ उरी, आली उरी कळ अशी
जणू अंत मी स्वतःचा, आज जवळ पाहिला
तुमची कल्पना तर मस्तच आहे. मी असं केलं असतं...
घाव वर्मीचा जुना पण सुरा नव्याने लागला
साकळल्या जखमांना जो वरदान देता जाहला
आली उरी कळ अशी की गात्रांनी प्राण सोडला
जणू अंत माझा स्वतःचा आज मीच पाहिला
बघा पटतंय का...
:)
10 Jun 2011 - 2:52 pm | प्यारे१
थोडी पार्श्वभूमी देतो...
तो आणि ती.
एकमेकांना बर्याच दिवसांपासून, वर्षांपासून ओळखतात. तिला त्याच्याबद्द्ल सगळं ठाऊक आहे. तो काय खातो, काय पितो, त्याचा स्वभाव कसा आहे, कुठली गोष्ट त्याला आवडते, तो काय केल्यावर खुश होईल, काय केलं तर नाराज सगळं सग्गळं....!!!
तिच्या भावविश्वात तो आणि तोच. सातत्यानं. जागेपणी आणि स्वप्नातही...!
स्वतःच्याही नकळत ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली. अगदी 'टीन एज' पासून साठवलेले ते क्षण, आठवणी जपत जपत ती पुढं जात आहे.
याउलट तो...! स्वतःच्या ध्येयापाठी धावणारा. एकच लक्ष्य. आपलं ध्येय साध्य करायचंय. त्याला तिची मैत्री अगदी कबूल आहे. तिचं प्रेम मात्र खटकतंय. दोघंही या बाबतीत अबोल आहेत. बोलत नाहीये तो काही. नकार होकार अजून काही ठाऊक नाहीए. पण तो अजूनही शोधातच. ध्येयाच्या आणि त्याच्या स्वप्नसुंदरीच्याही. त्याला नाही अडकायचं तिच्यात. ध्येयपूर्तीसाठी तो मात्र एकनिष्ठ. चालतोय.बर्याच अंशी यशस्वी देखील होतोय.
या वाटचालीत त्याला त्याची स्वप्नसुंदरी भेटते. दोघांचं एकमेकांशी भेटणं, बोलणं सगळं हिला माहिती. त्याच्यामार्फत हिची तिची ओळख देखील. दोघे लग्न देखील करतात. कामानिमित्त दोघे दूर जातात.
ही समजूतदार पणे मनाला समजावून सांगून सावरते. जीवन जगू लागते. बोलणं सुरु आहे, कधीमधी सामोरं येणं आहे. समोर आल्यावर एखाद क्षण जुन्या गोष्टी डोळ्यात तरळतात पण तेवढंच. घाव भरत आलेला आहे. जखमा पुसट झालेल्या आहेत. तेवढ्यात कधी तरी एका बेसावध क्षणी तो तिला म्हणून जातो....
'तुझ्याबरोबर मी जास्त सुखी झालो असतो असं वाटू लागलंय हल्ली'
ऐकल्याबरोबर तिच्या मनात आलंय ....
घाव तो होता जुना पण वर्मी नव्याने लागला
पुसटल्या जखमांना जणू आज स्पर्श कुणाचा जाहला
आली अशी कळ उरी, आली उरी कळ अशी
जणू अंत मी स्वतःचा, आज जवळ पाहिला
11 Jun 2011 - 11:22 am | पिवळा डांबिस
मी वर म्हटल्याप्रमाणे कल्पना तर छानच आहे...
मी फक्त त्या चार ओळींना गेय करायचा प्रयत्न केला इतकंच...
चूभूध्याघ्या...
:)
11 Jun 2011 - 8:45 pm | धन्या
काय भयानक अनुभव असेल हा "ती" च्या साठी.
नुकत्याच वाचलेल्या सुशिंच्या दुनियादारीची सारी पात्रं नजरेसमोर उभी राहीली...
- धनाजीराव वाकडे
12 Jun 2011 - 9:17 am | पाषाणभेद
प्यारे, कुठल्याही काव्याचे व्यक्तीगणीक कित्येक अर्थ निघू शकतात. शक्यतो पार्श्वभूमी न घेता त्या काव्याचा आस्वाद रसीकाने घ्यायचा असतो. कविता तर सगळेच वाचतात. पण त्यातील भावना केवळ एखाद्याच रसीकाला समजते. याचाच अर्थ, त्या कवितेतील भावनांशी रसीक तद्रूप झाला तरच त्या काव्याची अर्थगर्भीदता रसीक जाणू शकतो अन त्या काव्यातील आनंद उपभोगू शकतो.
तसलाच तुझ्या काव्यातून मला आनंद मिळाला.
11 Jun 2011 - 12:43 am | आत्मशून्य
.
11 Jun 2011 - 8:49 pm | धन्या
त्यांची ओसंडून वाहणारी प्रतिभा पाहून
मीही माझी अगाध प्रतिभा झाडली होती
फार नाही, र ला र आणि ट ला ट जोडून
अशीच एक अप्रतिम चारोळी पाडली होती
- धनाजीराव वाकडे
12 Jun 2011 - 3:04 am | आबा
आवडली !