देवा परमेश्वरा,
आज सकाळीच ते अत्यवस्थ असल्याची बातमी कानावर आली..!
देवा, आता पुरे झालं. ने त्यांना आता तुझ्या घरी. अगदी शांतपणे, त्रास न होता डोळे मिटू देत..!
ते वयोवृद्ध आहेत, गलितगात्र आहेत, खूप आजारी आहेत. गेल्या बर्याच काळापासून अक्षरश: अंथरुणातच आहेत.
माझ्यासारखे त्यांचे सामन्य भक्त, प्रशंसक, सगेसोयरे, हितचिंतक सारे त्यांच्या भोवती आहेत रे, पण तरीही ते मात्र पूर्णत: परावलंबी आहेत, असहाय्य आहेत..
आता अश्या अवस्थेत नाही पाहावत त्यांना..!
याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा..!
त्यांच्या या अभंगाचे स्वर कानी घोळताहेत..!
दहा वर्षाचा एक मुलगा कलेचं वेड घेऊन घरातून पळाला. खूप खस्ता खाल्या, अपार कष्ट केले. पुढे त्याचं फळ मिळालं, त्याचा वेलू गगनावेरी गेला. अक्षरश: न्हाऊ घातलं सर्वांना त्या अलौकिक सुरांनी.
'भारतरत्न..' या पदवीचा सन्मान झाला..!
'एकामेवाद्वितिय..', 'परंतु या सम हा..' ही सारी बिरुदं रोजचीच झाली, सवयीची झाली..!
या वेदशास्त्रसंपन्न महामहोपाध्यायांनी 'सवाईगंधर्व संगीत महोत्सव..' हा संगीताचा महायज्ञ सुरू ठेवला. पन्नास वर्षांहून अधिक काळ..!
लौकिकार्थाने आयुष्यभर एखाद्या बादशहासारखे, सम्राटासारखे वावरले ते...! परंतु व्यक्तिगत जीवनात मात्र तेवढेच साधे आणि सादगीभरे राहिले..!
परंतु आता मात्र नको हा वनवास, नकोत त्या अंथरुणातल्या हालअपेष्टा..!
काहीच दिसांपूर्वी त्यांच्या दर्शनाकरता गेलो होतो त्यांच्या घरी..!
देवा, विश्वास ठेव, मला काय म्हणाले माहित्ये?
" परमेश्वराने माझी क्रूर थट्टा चालवली आहे...!"
देवा, थांबव आता ही क्रूर थट्टा..!
देवा, लोकांना कदाचित माझी ही प्रार्थना आवडणार नाही. दुषणं देतील मला लोकं..! परंतु पर्वा नाही. कारण माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे अन् त्याहूनही अधिक निस्सीम अशी डोळस श्रद्धा आहे...!
"अणुरणिया थोकडा.." लिहिंणार्या तुकोबांकरता देवा तू विमान पाठवलं होतंस..
त्याच ओळीतल्या भावार्थात आणि त्यातल्या मालकंसाच्या दैवी सुरात कोट्यावधीच्या जनसमुदायाला डोलायला लावणार्या, समाधीस्त करणार्या भूतलावरच्या एका योग्याकरताही विमान पाठव..
येऊ देत आता अजून एक विमान...!
-- तात्या.
प्रतिक्रिया
16 Jan 2011 - 5:27 pm | गवि
तात्या.. भावना एकदम खर्या आहेत आणि खूप भिडल्या. पटल्याही..
16 Jan 2011 - 5:33 pm | मितान
आमेन ! :(
16 Jan 2011 - 6:30 pm | बिपिन कार्यकर्ते
हेच!
16 Jan 2011 - 6:53 pm | मेघवेडा
आमेन!
:(
16 Jan 2011 - 6:56 pm | विनायक पाचलग
काल सुबक च्या प्रयोगला देखील हीच चर्चा सुरु होती ...
काय बोलावे आपण पामराने ???
16 Jan 2011 - 8:07 pm | गणपा
आजच सकाळी ती बातमी वाचली.
:(
सार्या कष्टांतुन मोकळ कर देवा असच म्हणेन.
16 Jan 2011 - 6:07 pm | डावखुरा
"जो भजे हरि को सदा....सो ही परम पद पावेगा..!!"
16 Jan 2011 - 6:31 pm | नरेशकुमार
स्तब्ध.
16 Jan 2011 - 6:42 pm | यशोधरा
:(
16 Jan 2011 - 7:04 pm | वेताळ
तात्या आपल्याला खुप वाटते पण तसे होत नसते.
शेवटी ते एक शापित गंधर्व आहेत.
16 Jan 2011 - 9:32 pm | आदिजोशी
त्यांची स्वतःची इच्छा काय आहे हे आपल्याला माहिती आहे का? परमेश्वराने माझी क्रूर थट्टा चालवली आहे...! ह्याचा अर्थ आपण आपल्या सोयी प्रमाणे लाऊन देवाकडे असे काव्यमय मागणे मागणे जरा अति होतंय. प्रेम, डोळस श्रद्धा, वैयक्तिक जवळीक इत्यादि सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण त्या दाखवण्याच्या नादात त्यांच्यासाठी विमान पाठवायला सांगणे ही पंडितजींची क्रूर थट्टा आहे. त्यांचं लेखकाशी जर काही बोलणं झालं असेल तर ते पूर्णत: वैयक्तिक आहे. एखाद्या हळव्या क्षणी ते असं म्हणून गेले असतीलही. पण ते बोलणं इथे चव्हाट्यावर कशाला मांडायचे?
आज पं. भिमसेन जोशी आज ८८ वर्षांचे आहेत. प्रकॄती नाजूक आहे. पण आम्हाला ते अजूनही हवे आहेत. अजून अनेक वर्ष त्यांचं नुसतं आमच्यात असणं आम्हाला हवं आहे.
त्यामुळे देवाकडे मागणं मागायचंच झालं तर त्यांच्यासाठी डायरेक्ट विमानच पाठवायला सांगण्यापेक्षा त्यांच्या प्रकॄतीला आराम पडू दे हेच मागणं देवाकडे मागेन.
(आणि त्यासाठी लेख तर नक्कीच लिहिणार नाही. ही भावना माझी खूप खाजगी बाब आहे, ती खाजगीच ठेवीन)
16 Jan 2011 - 9:44 pm | विसोबा खेचर
आपल्या मताचा आदर आहे..!
आम्हालाही हवं आहे. परंतु त्यांनी अंथरुणात हाल सोसून आमच्याकरता राहावं असं वाटत नाही.
आपली इच्छा निश्चितच पूर्ण होवो. परंतु इतकंच वाटतं की आराम पडावा तो ते पुन्हा हिंडाफिरायला लागण्याइतपत पडावा. पुन्हा अंथरुणात खिचपत पडायला नको..
असो..
तात्या.
16 Jan 2011 - 11:17 pm | भय्या
मनाच्या एका हळव्या क्षणी अशी इच्छा होणे अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. आपल्या अत्यंत जवळच्या माणसावर अशी वेळ येउ नये, आणि त्यातून त्यानी सुटावे असे वाटण्यात गैर काहीच नाही. हे भारतरत्न सर्वानाच जवळचे आहे, त्यासाठी त्यानी प्रत्यक्ष भेटल्यावरच काही भाष्य करावे याची आवश्यकता नाही . अशी भावना अदरवाइज पण येउ शकते. कदाचित आपणा सर्वांच्या मनात हा विचार चमकून गेला असेच तात्यांनी फक्त व्यक्त करण्याचे धाडस दाखवले.
तात्यांना भावना व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अर्थातच ते म्हणतात ते गैर वाटले तर ते व्यक्त करण्याचा अधिकार इतराना पण आहेच की.
खरं म्हणजे प्रामाणिक मत व्यक्त करायला सभ्य पणाच्या मर्यादा येतात हे खरे, पण त्यानी व्यक्त केलेले भाष्य कुठेही असभ्य नाही हे ही तितकेच खरे. दुर्गा भागवतांचे काय झाले?
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे.
आता देवच काय योग्य ते करो. (देव खरेच योग्य तेच करतो का? शंकेला प्रचंड वाव आहे)
16 Jan 2011 - 11:57 pm | रमेश आठवले
असा भीमसेन आता होणार नाही. मी आदीजोशीनशी सहमत आहे.आम्हाला ते आणखी खूप काळ हवे आहेत.
17 Jan 2011 - 4:13 am | प्राजु
शब्द नाहीयेत.
देवा, जे काही करशील ते पंडीतजींच्या तब्बेतीला मानवेल आणि चांगले असेल तेच कर. इतकंच म्हणेन.
17 Jan 2011 - 8:01 am | मदनबाण
:(
17 Jan 2011 - 10:29 am | दाद
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!
17 Jan 2011 - 10:40 am | नन्दादीप
च्या मायला...
२०११ काय नुस्त धक्के द्यायच काम करतय वाटत,,,
आधी रंगकर्मी गेले....आता पंडीत्जी अत्यवस्थ...
काय खर नाय बॉ....
>>'भारतरत्न..' या पदवीचा सन्मान झाला..!
१००% सहमत.
17 Jan 2011 - 1:32 pm | रोमना
देवा, विश्वास ठेव, मला काय म्हणाले माहित्ये?
" परमेश्वराने माझी क्रूर थट्टा चालवली आहे...!"
देवा, थांबव आता ही क्रूर थट्टा..!
कोणी आपल्याला सांगितलेली अतिशय खाजगीतली गोष्ट अशाप्रकारे सर्वांना सांगणं.
पटत नाही !
17 Jan 2011 - 9:25 pm | चिगो
तुमच्या प्रेमाचा, श्रद्धेचा आणि भावनांचा आदर ठेवूनही हेच मागेन की
"देवा, पंडीतजींना उदंड आणि निरोगी आरोग्य दे. ज्यांचे दैवी सुर एखाद्या अश्रद्ध, नास्तिक माणसाच्या मनातही भक्तिभाव जागृत करु शकतात, त्याला असं गलितगात्र, परावलंबी बनवणं तुलाच लाजिरवाणं आहे रे देवा.."