अंधश्रद्धेचा उगम
काही दिवसांपूर्वी मुंबईची एक बातमी आली होती. नवरा-बायको, त्यांची दोन लहान मुले व मुलांच्या दोन आत्या एका ठिकाणी रहात होत्या. दोन आत्यांपैकी एकीच्या अंगात दैवी तर दुसरीच्या अंगात आसूरी शक्ती वावरत होती.. सगळ्यांचा यावर विश्वास. यावर उपाय म्हणून आत्याने त्या दोन लहान मुलांना आई-वडिलांच्या समोर मारले, ठार मारले! त्यावेळी आई-वडिलांनी विरोध केला नाही. अविश्वसनीय पण सत्य घटना. अंधश्रद्धा सारासार विवेकावर मात करतेच पण आई-वडिलांचे मुलांवर असलेले प्रेमही तिच्यापुढे हतबुद्ध ? अंधश्रद्धा जगभर आहे, सर्व धर्मांत आहे, अशिक्षित-सुशिक्षित दोघांतही आहे. किती पुराणी आहे ही अंधश्रद्धा ? तशी ती मानव जमातीच्या सुरवातीपासून असणारच, पण लेखी स्वरूपात ?महाभारतातील एक गोष्ट आज पाहू. (महाभारत, वनपर्व,तीर्थयात्रापर्व, अ. १२७-१२८.)
सोमक नावाचा एक धर्मनिष्ट राजा होता. त्याला सारख्या अशा शंभर भार्या होत्या. पुष्कळ काळ लोटला पण त्याला मुल झाले नाही. त्याने देवताराधनादिक मोठेमोठी प्रयत्न केले. नंतर त्याला जंतू नावाचा एक पुत्र झाला. सर्व बायका मुला सभोवतीच वेळ घालवू लागल्या. सर्वांचे पुत्रावर अतिशय प्रेम होते. एके दिवशी जंतूला बरगडीच्या खालच्या बाजूस एल मुंगी चावली. त्याने दु:खाने किंकाळी फोडली. त्या सर्व माता त्याच्या भोवती उभ्या राहून मोठ्याने आक्रोश करू लागल्या. तो ध्वनी राजदरबारापर्यंत पोचला. राजाने तातडीने अंत:पुरात जाऊन सर्वांचे सांत्वन केले. पुढे दरबारात येऊन तो ऋत्विज व अमात्य यांच्यासमोर म्हणाला " धिक्कार असो या एकपुत्रपणाला ! त्यापेक्षा निपुत्रिकपणाच परवडला. आता या स्त्रीयांचे आणि माझेही वय निघून गेले आहे. तेव्हा असे एखादे कर्म असेल तर सांगा की ज्या योगाने मला १०० पुत्र होतील. मग ते कर्म लहान, मोठे, दुर्धर कसेही असो." ऋत्विज म्हणाला :- "असे कर्म आहे. ते करण्यास तू समर्थ असशील तर तुला सांगतो. "
राजा म्हणला,"मला शंभर पुत्र होणार असतील तर ते मी केलेच असे समजा."
ऋत्विज म्हणाला :- " हे राजा, मी एक यज्ञ करितो आणि त्यामध्ये तू या जंतूचा होम कर.जंतूच्या वपेचा होम होऊ लागला असता त्याच्या मातांनी त्या धूम्राचे अवघ्राण करावे म्हणजे त्यांना शंभर पुत्र होतील. जंतूच्या सांप्रत मातेपासून तो पुनरपि उत्पन्न होईल व त्याच्या बरगडीखाली सुवर्ण चिन्ह असेल."
राजाने त्याप्रमाणे यज्ञ केला. ऋत्विज जंतूचा बळी देण्यकरिता त्याचा हात धरून त्याला घेऊन चालला तेव्हा मातांनी आक्रोश करत त्याचा दुसरा हात धरून खेचाखेची केली पण त्याचा उपयोग झाला नाही. ऋत्विजाने जंतूचा वध करून त्याच्या वपेचा होम केला. त्या गंधाचे अवघ्राण करून त्या स्त्रीयांचे ठिकाणी गर्भ राहिला व दहा महिन्यांनी सोमकाला शंभर पुत्रांची प्राप्ती झाली. त्यापैकी जंतू हा ज्येष्ट; पूर्वीच्याच आपल्या मातेच्या उदरी त्याचा जन्म झाला व त्याच्या बरगडीच्या खाली एक सुवर्ण चिन्ह होते.
पुढे सोमकाचा गुरू परलोकवासी झाला व काही कालाने सोमकही परलोकास गेला. त्याला आपला गुरू नरकात अग्नीत शिजत असलेला दिसला. त्याने कारण विचारले तेव्हा गुरू म्हणाला "मी तुझ्याकरिता यज्ञ केला त्याचे हे फळ भोगत आहे." तेव्हा सोमक यमधर्माला म्हणाला "माझ्याकरिता याने यज्ञ केला, मी फळ भोगतो, त्याला सोडून द्या ." यम म्हणाला, " तसे नाही, एकाच्या कर्माकरिता दुसर्याला फळ मिळणार नाही." सोमक म्हणाला, "ठीक आहे, मलाही गुरूशिवाय पुण्यसंपन्न लोकाची इच्छा नाही. मीही कर्म केले आहे, मी त्याच्याबरोबर फळ भोगतो." त्याप्रमाणे दोघांनीही नरकयातना भोगल्या व नंतरच त्यांची तेथून सुटका झाली.
या अन्निसवाल्यांना किती जुनाट व चिवट अंधश्रद्देशी सामना करावयाचा आहे कळले कां ?
शरद
प्रतिक्रिया
3 Dec 2010 - 12:49 pm | अवलिया
कथेतुन मिळालेला संदेश - पोटच्या पुत्राचा बळी दिल्यास भयानक नरकयातना भोगाव्या लागतात, म्हणुन असे कृत्य करु नये. ज्या काळात अशा रुपक कथा तयार झाल्या त्या काळात काही जमाती अशा प्रकारे पुत्राचा बळी देत असाव्यात. अनेक रानटी जमाती अजुनही नरबळी देतात. त्याचेच अनुकरण अनेकांनी करु नये म्हणुन नरकाची भिती घालुन परावृत्त केले असावे. असा मी संदेश घेतला.
बाकी श्रद्धा अंधश्रद्धा दळण विचारवंतांसाठी सोडलेले आहे.
3 Dec 2010 - 2:19 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत.
धन्यवाद शरदजी. कथा नविनच माहिती झाली.
3 Dec 2010 - 7:43 pm | आळश्यांचा राजा
कथेतील संदेशाविषयी शब्दशः सहमत.
3 Dec 2010 - 9:16 pm | प्रियाली
प्रतिसादाशी सहमत आहे.
लोककथा निर्माण होण्यास तत्कालीन समाजाच्या चालीरीती किंवा समज कारणीभूत असतात. बहुतांश लोककथा या बोधकथा असून त्यातून योग्य तो बोध घ्यायचा असतो.
बायदवे, शरदकाका कधीपासून अंनिसच्या कार्याची चिंता करू लागले? त्यांच्या उपक्रमावरील कार्यामुळेच त्यांनी मिपावर धाव घेतली असे माझे निरीक्षण आहे. ;)
3 Dec 2010 - 1:04 pm | शिल्पा ब
बापरे!!! ती मुंबईची बातमी माहिती नव्हती.
आजच्या काळातही लोक असे विश्वास ठेवतात यावरच विश्वास बसत नाही.
कदाचित "त्या " आत्याचे लग्न झाले नाही त्यामुळे यांचा दुस्वास करूनही हे कृत्य तिने केले असू शकते...आणि तिच्या अंगात कसलीशी शक्ती आहे हे पटल्याने कोणी विरोध केला नाही....दुर्दैवी !!
3 Dec 2010 - 2:28 pm | गवि
सुन्नबधिर करणारी गोष्ट.
असंच काहीसं.
थंड पिंप:
http://gnachiket.wordpress.com/2009/12/08/%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1-%E...
3 Dec 2010 - 5:38 pm | योगी९००
ही बातमी वाचली होती. बहुतेक नालासोपार्याला ही घटना घडली होती. फार भयानक प्रकार होता तो..असल्या माणसांना रस्तात दगडांनी ठेचले पाहिजे.
तसेच मला चिलया बाळाची गोष्ट पण ह्याच प्रकारची वाटते. जरी देव आपल्याकडे पाहुणा म्हणून आला आणि त्याने बाळाचे मांस खाण्यास मागितले तर तो देव कसला? लहानपणी या गोष्टीमुळेच मला घरी कोण पाहुणा जेवायला आला तर भिती वाटायची.
3 Dec 2010 - 7:05 pm | डिजेबॉय
अन्धश्रद्धा बाळगणारे सुशिक्षित लोकही फार आहेत, ही गोष्ट मनाला जास्त खटकते. हे लोक अनिस चे आव्हान का स्वीकारत नाहीत, यदाकदाचित भुत दिसलाच तर पैसे मिळतिल, भुताचे अस्तित्व सिद्ध करणार्या "महाभागा" ला :hat:
3 Dec 2010 - 10:34 pm | शिल्पा ब
आपण कोण?
29 Jan 2014 - 8:21 pm | डिजेबॉय
मी डिजेबॉय