पूर्वनियोजीत : भाग २

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Jun 2010 - 3:01 pm

पूर्वनियोजीत : भाग १

"गर्दनच उडवलीया धाकल्या राजांनी ... वैनीसायबांची.....! त्येंच्यासाठी खायाला खिर करत व्हत्या वैनीसायेब, अचानक माणिकरावराजांनी कोपर्‍यातली इळी उचलली आन वैनीसायबांच्या मानंवरच घाव घातला की..........! वैनीसायेब जागच्या जागेवर ..............!"

सुभेदार वेगाने आतल्या खोलीत धावले.

त्यांच्या पत्नी, वाड्याच्या वैनीसाहेब रक्तबंबाळ अवस्थेत स्वयंपाकघरात पडल्या होत्या, त्यांची अर्धवट तुटलेली मान एका बाजुला लोंबत होती. आणि अकरा-बारा वर्षाचे माणिकराव त्यांच्या मृत कलेवराला मिठी मारुन टाहो फोडीत होते................

"माणिकराव...., राजा काय केलंसा हे?"

"मी काय केलं? मी पाहयलं तेव्हा आज्जी अशा हितं पडली व्हती. त्यांच्या मानेतून रगत येत व्हतं. त्ये बगिटलं आन मला भोवळच आली. आसं कसं झालं वो आबासाहेब? आज्जीला काय झालं?"

समोरचं अकरा वर्षाचं लेकरू निरागसपणे विचारत होतं, ते बघून सुभानरावांच्या काळजात तटकन तुटलं. एकीकडे बायको गमावलेली आणि दुसरीकडं हे निरागस लेकरू...

"मगापास्नं आसंच इच्यारत्याती धाकलं राजं. माज्या डोल्यासमुर त्येनीच..."

घाबरीघुबरी झालेली गंगी सांगत होती.

"गप ए, थोबाड बंद ठिव तुझं. पर काय झालया त्याला? लागीर तर न्हवं?"

सुभानराव स्वतःशीच पुटपुटले.

"मलाबी तसंच वाटतया, सरकार. आवो माज्या डोल्यासमोर धाकल्या राजांनी इळी...............!"

"चुप म्हणलं ना, थोबाड बंद कर तुझं...! यातलं कायबी भायेर कुणालाबी कळलं नाय पायजे. जा त्या शिरप्याला पाठवून द्ये आमच्याकडं. कोण आहे रे तिकडं?"

सुभेदार परत सदरेवर आले. शिरपा सदरेवर खालमानेनं हात जोडून उभा होता.

"शिरप्या, हितं काय झालं त्ये भायेर कुणालाबी कळायला नाय पायजेल. गुमान जावून त्या जगन्नाथ गुरवाला बलवून आणजा मागल्या दारानं. ह्ये कायतरी भयानक हाय. भायेरचं हाय. आन त्या गुरवाला सांगावा दिवून तसाच फुडं म्हारवड्यावर जा. ततं ती शांतू म्हारीण आसंल. तिला सांग आमी बलिवलय लगुलग म्हणुन. न्हायतर आसं करंनास का, तिला पाठीशी घालुनच घिवून ये. आमाला नाय वाटत, ह्ये एकट्या गुरवाच्यान व्हईल म्हुन. जा बिगीबिगी घिवुन ये शांतूला."

"सरकार... शांतू...?" शिरप्या क्षणभर घुटमळला आणि लगेच घोडीकडे पळाला. त्याला माहित होतं कि सुभेदारांनी असा आदेश दिलाय म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी विचार केला असणार. नाहीतर ज्या शांतूला गावाबाहेर काढलं तिलाच वाड्यावर आणण्याचा आदेश दिला नसता त्यांनी.

सुभेदारांचा अंदाज बरोबर ठरला, जगन्नाथाला काहीच बोध झाला नाही. तो नुसता भांबावल्यासारख्या वैनीसाहेबांच्या प्रेताकडे पाहतच राहीला.

"जोहार मायबाप्..जोहार...............!"

दिंडी दरवाज्यातून आवाज आला तसा सुभेदारांनी तिकडे पाहीलं. दिंडी दरवाज्यात शांतू महारीण उभी होती. सुभेदारांनी तिच्याकडे बघताच तिने तिथुनच जमीनीला डोकं टेकवून नमस्कार केला.

"शिरप्या, तिला आत घेवून ये."

"सरकार, माजी हिच जागा हाय. मी हितंच बरी हाय, आवो म्हार हाय म्या."

"शांतू, तुला गावाबाहेर काढली ती तु म्हार हायीस म्हुन नाय, तर तु ते चेटूक्-बिटूक करतीस म्हुन. महाराजांच्या राज्यात आमी फकस्त मान्साची जात मानतो, बाकी कुटलीबी न्हाय. आज तुला बलिवलय त्ये हितं तुजंच काम हाये म्हुन. आत ये आन बघ तुला काय कळतय का त्ये?"

सुभेदारांनी तिला जाणीव दिली तशी शांतू दबकत दबकतच वाड्याच्या दरवाज्यातून आत आली.

आत आली आणि.....

सहस्त्र इंगळ्या डसल्यासारख्या वेदना झाल्या तिला. मस्तकातुन कळ उठली. चेहरा वेडावाकडा झाला. सुभेदार आश्चर्याने तिच्या चेहर्‍यावर होणारे बदल बघत होते. तेवढ्यात माजघराचा दरवाजा धाडकन उघडला गेला आणि तणतणत माणिकराव बाहेर आले. त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि सुभेदार चरकलेच. माणिकरावांचा चेहरा विस्तवासारखा धगधगत होता.

"शांते, तु यामध्ये पडु नगं. मरायचं नसंल तर आली तशीच परत जा. फुकाट मरशील."

शांतु कमालीची घाबरली.

"सरकार, ह्ये लै मोटं हाय. माज्या ताकदीभायेरचं हाये. पर तुमी हक्कानं बलिवलं हाय तर मी अशी परत जानार न्हाय. आज हितंच आविष्य सपलं तरी चालंल पर ही शांतु आपली समदी ताकद लावल. माजं सामान त्येवडं उंबर्‍यापाशी ठिवलं हाये, तेवडं घिवून येते. "

असं म्हणुन शांतु मागे वळली आणि वळता वळता दारात येवुन उभ्या राहीलेल्या माणसाशी तिची टक्कर होता होता वाचली. पण त्याला तिचा पुसटसा स्पर्ष झालाच तशी ती घाबरली.

"मापी करा म्हाराज. चुकून लागला ढका. म्या मुद्दाम न्हायी शिवले तुमास्नी."

अंगणात एक सहा फुटी, काशाय वस्त्रे घातलेला संन्यासी उभा होता. अंगात कफनी, काखेत दंड, पायात खडावा, कपाळावर गंधाचा टिळा आणि ओठांवर प्रसन्न हास्य.

"आणि जर लावलाच असेल मुद्दाम हात तरी काय झालं माऊली. अहो, तुम्ही, मी सगळे त्या परमेश्वराचीच लेकरे आहोत. माऊलीच्या स्पर्शाचा लेकराला कसला आलाय त्रास? अहो प्रभु रामचंद्रानं जिथं कुठला भेद केला नाही तिथं तुम्ही आम्ही कोण लागुन गेलो? पण तुम्ही त्रस्त दिसता माऊली. काही समस्या?"

शांतुने वळुन सुभेदारांकडे पाहिलं. तोवर सुभेदार पुढे दारापर्यंत आले होते.

"कुटनं आले म्हणायचे म्हाराज. या आत या ना?"

"आम्ही सज्जनगडाचे रहिवासी. समर्थांचा आदेश आहे की महाराष्ट्री फिरत राहा, लोक जागृती करत राहा... माऊलींचा आदेश म्हणजे ब्रह्मवाक्य. सदगुरू नेतील तिथे फिरत असतो. आज आपल्या ग्रामी यायचा आदेश झाला आणि पावले इकडे वळली, असो..., या क्षुद्र देहाला सदानंद रामदासी म्हणतात...! समर्थ रामदास स्वामींचे शिष्य श्री कल्याणस्वामींच्या शिष्यगणापैकी एक. आपण चिंतेत दिसता सुभेदार. अहो सगळी चिंता त्या रामरायावर सोडा आणि निर्धास्तपणे म्हणा...

"जय जय रघुवीर समर्थ!"

बोलता बोलता सदानंद रामदासी उंबरठा ओलांडून आत आले, आत येताच त्यांना ती जाणीव झाली.

"अच्छा म्हणजे असं आहे तर. म्हणुन आमची माऊली चिंतीत होती तर......, तरीच म्हणलं आज सकाळी सकाळी मारुतीरायानं दासाला या गावात यायची कशी बुद्धी दिली. जय जय रघूवीर समर्थ."

"खबरदार गोसावड्या, एक पाऊल पुढं आलास तर राख करुन टाकीन." माणिकराव ओरडले. सदानंद तसेच पुढे सरकले....

तसे माणिकरावांनी त्यांच्याकडे रोखुन पाहीले, सदानंदांच्या पायापासुन डोक्यापर्यंत एकच वेदनेची तिणिक उठली, तसे क्षणभर सदानंदही चमकले.

"मारुतीराया, हे काय आहे ? तुझ्या भक्ताला सुद्धा त्रास द्यायची ताकद कुणामध्ये आहे?"

"अरे हट क्षुद्र मानवा, तुझ्यासारखे क्षुद्र मांत्रिक माझ्यासाठी किड्या-किटकांसारखे आहेत. तुला चिरडायला मला एक क्षणही लागणार नाही. मध्ये पडु नकोस, नाहीतर संपवून टाकेन."

माणिकरावांनी किंवा त्यांच्या देहात जे काही होते त्याने डोळे बंद केले आणि तो काहीतरी पुटपुटायला लागला. सदानंदांच्या मस्तकातील वेदना वाढायला लागली. तसे त्यांनी मनोमन रामनामाचा जप सुरू केला. हळुहळू त्यांनी आपल्या मनाची द्वारे बंद करायला सुरूवात केली. समर्थांचे स्मरण केले आणि दिशाबंधने घातली. प्रभुच्या नावाची गंमत असते मोठी. त्याचे नाव श्रद्धेने उच्चाराल तर ते तुमच्या भोवती आपल्या सामर्थ्याचे कोट उभे करते पण श्रद्धा नसेल तरीही वाल्या कोळ्यासारख्या खलवृत्तीच्या मनात देखील ती निर्माण करते. त्याच्या मरा मरा तुन देखील रामनामाची निर्मीती होती. इथे तर सदानंद रामदासींचे अखंड जिवनच रामनामावर पोसलेले होते. जस जसा रामनामाचा घोष वाढायला लागला, तसतसे इतका वेळ मनोमन चाललेले रामनाम सदानंदांच्या तोंडुन उच्चरवाने बाहेर पडायला लागले. तसा माणिकराव अस्वस्थ व्हायला लागला. तसा तो प्रचंड शक्तिशाली होता. एकटे सदानंद रामदासी त्याचे काहीही बिघडवू शकत नव्हते. पण इथे त्याच्यावर दुहेरी वार व्हायला लागले होते. त्याच्या सदानंदांबरोबरच्या युद्धात त्याचे क्षणभर शांतूकडे दुर्लक्षच झाले होते. आणि ती संधी साधून शांतूने आपल्या थैलीतून दोन तीन लिंबे आणि एक कणकेची बाहुली बाहेर काढून त्याच्या माध्यमातून त्याच्यावर वार करायला सुरूवात केली होती. हा दुहेरी प्रकार त्याच्यासाठी नवीनच होता.

तसा तोही काहीशे वर्षाच्या निद्रेनंतर जागा झाला होता. अजुन त्याच्या शक्ती पुर्णपणे जागृतही झाल्या नव्हत्या तोवर एकाच वेळी अशा दोन्ही शक्तींशी लढायची त्याच्यावर वेळ आली होती. एका शक्तीशी एका वेळी लढणे एकवेळ सोपे होते त्याच्यासाठी, पण सदानंदांची 'धन' उर्जा आणि शांतुची 'ऋण' उर्जा एकत्रीत येवूनही वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याच्यावर वार करत होत्या. शांतुकडुन असा प्रतिहल्ला होइल याची त्याने कल्पनाच केली नव्हती. आता त्याच्यापुढे एकच मार्ग होता. एकतर शेवटपर्यंत त्यांच्याशी दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत राहणे अन्यथा तात्पुरता पराभव स्विकारुन पळ काढणे व सगळ्या शक्ती एकवटून पुन्हा परत येणे. सध्यातरी त्याने दुसरा पर्याय स्विकारला. पण जाता जाता त्याने आपला हिसका दाखवलाच.

रामनामाची अभेद्य भिंत तोडणे त्याच्या मर्यादेबाहेरचे होते पण शांतुची काळी विद्या तोडणे 'त्या' च्यासाठी सहज साध्य होते. त्याच्या सुदैवाने अजुनही तो गोसावी फक्त रामनामच घेत होता, त्या रामदाश्याने अजुनही 'त्या' च्यावर हल्ला चढवलेला नव्हता. त्यामुळे 'त्या' ने आपल्या अमर्यादित अमानवी शक्तीचा झोत शांतूवर सोडला....

तशी शांतू धडपडली, वेगाने मागे फेकली गेली. त्या हल्ल्याची जाणिव होताच सदानंद वेगाने तिच्याकडे धावले...

"माऊली, सावरा स्वतःला. भिंतीवर आदळलेल्या शांतूला त्यांनी सावरुन धरले. आपल्या हातातला अंगारा तिच्या कपाळाला चोळला...

"जय जय रघुवीर समर्थ......!"

शांतु, त्यांच्याकडे पाहातच राहीली. इतकावेळ आपल्या काळ्या जादुने मस्तकातली कळ थांबवण्याचा ती प्रयत्न करत होती, पण सदानंदांनी लावलेल्या नसत्या अंगार्‍याने ती वेदना थंडावली. तीने सदानंदांकडे पाहात हात जोडले....

सदानंद हळूच हसले....

"आबासाहेब... आमचं डोकं लै दुखतया...."

माणिकराव डोकं दाबत रडत रडत म्हणले तसे त्यांच्या आतल्या 'त्या' ला आपली शक्ती क्षिणावत असल्याची जाणीव झाली. तसा 'त्या' ने पळ काढायला सुरूवात केली..

"मी जातोय रे गोसावड्या, पण परत येइन, नक्की येइन आणि जेव्हा येइन तेव्हा सर्व जग माझे असेल, तू गुलाम असशील माझा.....!"

"जा मित्रा, जा आम्ही तुझी वाट पाहू. मागच्या वेळीही तू असेच म्हणाला होतास, जेव्ह्या चैतन्यानंदांनी तूला बंदीस्त करण्यात यश मिळवले होते. त्यावेळीही तुझी शंभर पापे भरली नव्हती, अजुनही तुझा घडा पुर्णपणे भरलेला नाही. जा कधीही ये.. आम्ही रामदासी, प्रभु रामचंद्राचे दास, माझा राम समर्थ आहे माझं आणि या विश्वाचं रक्षण करायला. ये कधीही ये... आम्ही सज्ज असु तुझ्या स्वागताला. जय जय रघुवीर समर्थ !"

आपल्या हातातला अंगारा सदानंदांनी माणिकरावांच्या कपाळाला लावला आणि माणिकरावांची शुद्ध हरपली. सदानंदांनी सुभानरावांकडे बघत हात जोडले आणि सुभानरावांच्या प्रतिसादाची अपेक्षाही न करता रामनामाचा घोष करत तो रामदासी पुढच्या दाराकडे आपली भिक्षा मागायला निघाला...

सुभानरावांच्या मनातला प्रश्न त्यांच्या मनातच राहीला...

"अवो महाराज, हे चैतन्यानंद स्वामी कोण? आन माणिकरावास्नी हे काय झालं हुतं?"

पुढे जाता, जाता तसेच मागे न बघताच सदानंदांनी आपले दोन्ही हात वर केले आणि पुन्हा एकदा रामनामाचा घोष केला.

"जय जय रघुवीर समर्थ!"

जणु ते सांगु पाहत होते की कधी कधी एखाद्या गोष्टीबद्दल अज्ञान असणेच हिताचे असते.

"शिरप्या, या शांतूला तिच्या घराकडं सोडून ये बाबा. शांते उंद्याच्याला सदरंवर ये, कारभारी आमच्या खाजगीतनं शांतूला चोळी-बांगडी करा. आजपासनं आमची भन हाये ती."

ते शब्द ऐकले आणि कृतकृत्य झाल्याप्रमाणे शांतुने हात जोडले....

******************************************************************************************************************************

"आणि तो आता पुन्हा आपल्या दुनियेत येवु पाहतोय, त्याला अडवायचय, या दुनियेत त्याला त्याचं साम्राज्य तयार करण्यापासुन रोखायचय." आण्णा त्या तिघांकडे म्हणजे विशाल, चाफा आणि कौतुक यांच्याकडे पाहात सांगत होते.

"आण्णा, आता आम्ही स्वतः हे अनुभवतोय म्हणुन विश्वास ठेवणं भाग आहे, नाहीतर जे काही तुम्ही सांगताय त्यावर विश्वास ठेवणं खरंच कठिण आहे. आणि सुभानरावांना पडला होता तोच प्रश्न मलाही थोड्या वेगळ्या प्रकारे पडलाय.... म्हणजे सुभानरावांचा किस्सा तर तुम्ही सांगितलात, पण हा "तो" म्हणजे नक्की काय आहे? कोण आहे? आणि त्या कुंतलानगरीच्या युवराजाचं काय झालं? चैतन्यानंदांनी 'त्या' च्याबरोबर कसा लढा दिला होता? हे सगळे प्रश्न अजुनही अनुत्तरितच आहेत."

क्रमशः

विशाल कुलकर्णी

कथा

प्रतिक्रिया

अस्मी's picture

22 Jun 2010 - 5:02 pm | अस्मी

इंटरेस्टिंग....लवकर येऊदे पुढचा भाग :)

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

आंबोळी's picture

22 Jun 2010 - 5:51 pm | आंबोळी

विशालराव,
जबरी लिहिलय.... मजा येतेय वाचताना...
पुढचे भाग लवकर येउदेत.

आंबोळी

प्रभो's picture

22 Jun 2010 - 6:42 pm | प्रभो

जबरा रे विशालभौ....

शिल्पा ब's picture

23 Jun 2010 - 5:27 am | शिल्पा ब

पकड घेणारे लिखाण...पुढचा भाग लवकर येउ द्या...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

आंबोळी's picture

15 Jul 2010 - 3:49 pm | आंबोळी

पुढचा भाग कधी?

आंबोळी

diggi12's picture

19 Feb 2022 - 1:41 pm | diggi12

पुढचा भाग कधी