दुष्काळाचा पडला वेढा
रूष्ट जाहले पाऊसपाणी
मात्र भूमीच्या राजपुत्रा तू
नकोस राहु खचल्यावाणी
दुर्दैवाने आजघडीला
आभाळाचा रोष इथे
जिथे डोलली हिरवी राने
उजाड आता शेत तिथे
जिंकायाची आहे लढाई
आपणास ही आज पुन्हा
दुर्भाग्याचे जरी उन्हाळे
तरी न भितो आम्ही उन्हा
जरी कोपली अवघी सृष्टि
समस्त बांधव तुझ्यासवे
लाख हातांनी लढत राहु
घडवाया सुखस्वप्न नवे
संपुन जातील दिवस हेही
इथे बरसतील पाऊसधारा
पुनश्च येईल जुनी सुबत्ता
दुःखाला ना उरेल थारा
नकोच ओझे उपकारांचे
हिमतीने अन् जाऊ पुढे
अशी घेऊया गगनभरारी
गरुडाचीही फिकी पडे
विसरुन जाऊ निराशवाटा
प्रगतीच्या त्या घडवु पथा
आता दाखवु अवघ्या विश्वा
ही बळीराजाची जिद्दकथा
- शार्दुल हातोळकर
प्रतिक्रिया
6 Dec 2015 - 1:30 pm | चांदणे संदीप
मस्त कविता!
कवितेचे स्फूर्तीगीत व्हावे हीच सदिच्छा!
Sandy
6 Dec 2015 - 4:10 pm | पद्मावति
सुंदर!
सहमत.
6 Dec 2015 - 11:24 pm | शार्दुल_हातोळकर
धन्यवाद मंडळी !!
6 Dec 2015 - 11:42 pm | एक एकटा एकटाच
दमदार
7 Dec 2015 - 4:05 pm | अभ्या..
सुरेख हो शार्दूलराव.
छान लिहिलीय.
(अॅक्चुअली ह्या सगळ्या ओळी इरिगेशन प्रॉडक्टला (स्प्रिंकलर, ड्रीप) जिंगल किंवा टॅगलाईन म्हणून वापरता येतील इतक्या मस्त जमल्यात)
7 Dec 2015 - 11:07 pm | शार्दुल_हातोळकर
दुष्काळाने महाराष्ट्रात सध्या फारच विदारक रुप धारण केले आहे. आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांना भौतिक मदतीच्या बरोबरीने जगण्याची नवी उमेद देणे फार गरजेचे आहे आणि आपणा सर्वांवर ही फार मोठी जबाबदारी देखील आहे.
7 Dec 2015 - 4:59 pm | नीलमोहर
प्रभावी आणि प्रेरणादायी.