गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात. सध्या जांभूळ सुमारे १०० ते १२० रुपये किलो आहे. दररोज हजार रुपयांची जांभळे घेऊन ते शहरात येतात, बँका, दुकाने, लोकांची एकत्र बसण्याची ठिकाणे येथे जाऊन गप्पा मारत बसलेल्या लोकांना ते मोफत जांभळे देतात. त्यांनी सोबत कॅरी बॅगही ठेवल्या आहेत. जांभळे खाणाऱ्याला त्या देऊन त्यात बिया संकलित करतात. लोक जांभळे खात असताना गुरूजी त्यांना जलसंधरणाचे महत्त्व सांगतात. लोकांनाही ही कल्पना आवडते. या वयातही गुरूजी करीत असलेल्या धडपडीचे कौतुक करीत लोक जांभळांवर ताव मारतात. तर काही आणखी फुकटे भेटतात. मिळालेली जांभळे पार्सल बनवून घरी नेण्याचाही प्रयत्न करतात, असा अनुभवही गुरूजींनी सांगितला.
आता या बिया भापकर गुरूजी वनविभागाकडे देणार आहेत. उपवनसंरक्षक डी. टी. चव्हाण यांनी या बियांपासून रोपे करून देण्याचे आश्वासन गुरुजींना दिले आहे. रोपे तयार होण्यासाठी साधारणपणे वर्ष लागले. पुढील पावसाळ्यात ती गुंडेगाव येथील नदी नाल्यांच्या किनारी लावण्यात येणार आहेत.
'बिया दान करा'
यासंबंधी भापकर गुरूजी म्हणाले की, सध्या आपण पेन्शनच्या पैशातून हा उपक्रम राबवित आहोत. एक हजार रुपयांची जांभळे घेतल्यानंतर दोन ते तीन किलो बिया पडतात. मात्र आणखी बियांची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी जांभळे खाऊन बिया दान कराव्यात. अधिक माहितीसाठी ९४२०६४२९८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
साभार : जांभूळ खा, जलसंधारण वाढवा!
मी आत्ताच भापकर गुरूजींशी बोललो आहे. त्यांनी आपल्याला गुंडेगाव (ता.नगर) भेटी साठी बोलवले आहे.
एकूण ५ लाख बिया हव्यात. देतांना जांभूळ खाल्यानंतर ८ दिवसात पोचत्या केल्यासच त्यापासुन (जास्तित जास्त १५ दिवसात)रोप तयार होउ शकते आहेत. त्यासाठी सर्वांना नम्र विनंति की पूढच्या आठवड्यांत बियांसोबत गुंडेगाव (ता.नगर) ला कट्टा कसा करता येईल हे पहावे.जी मिपाकर मंडळी येतील त्यांना माझ्याकडुन अजुन एक सरप्राईझ मिळेल.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
चांगला उपक्रम. श्री. भापकर गुरुजींचे कौतुक वाटले. मुंबई-पुण्यात असतो तर नक्कीच आलो असतो कांही बिया घेऊन. असो.
छान उपक्रम.. काही करता येती का ते पहाते.. चेपु वर शेअर करुन पाहु का हा लेख?
लगेच करावा, ही विनंति.
कसा करावा आम्हालाही सांगा,म्हणजे आम्हीपण करु.
खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही .
मी आंब्याच्या कोयी वाळवुन ठेवल्या होत्या , पावसाळ्यात रोपे करुन अजिंक्यतार्यावर लावायचा विचार होता . पण घरच्यांनी न सांगताच फेकुन दिल्या (थोड्याफार उरल्यात त्यांची रोपे करायचा प्लॅन आहे ) :( असो.
घरी फणसाचे झाड आहे पण त्याच्या बिया सुध्दा आम्ही ठेवत नाही *biggrin*
बाकी झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही ! (आमच्या घरात वड पिंपळ औदुंबर तिन्ही आहेत !! )
मी हनिवेल मध्ये असतांना, दर वेळेला(वेगवेगळ्या)गडांवर ट्रेकिन्गला जातांना वेगवेगळ्या बिया पेरुन यायचो.
बाकी झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही !एकदम सहमत. आम्हीही वृक्षारोपणाला ह्याच झाडांच्या रोपांना प्राधान्य देतो. तसेच लावल्यानंतरच्या उन्हाळ्यातही ती रोपे तग धरतात. जांभळाचे झाड पाणी धरून ठेवत असावे असे लेखात म्हटलेले आहे. त्यामुळे जांभूळ लावायचा संकल्प सोडला आहे असे वाटते. जांभळाचा लाकूड म्हणून किंवा सरपण म्हणूनही तितका उपयोग नसतो, पण वन्यप्राण्यांना जांभूळबनाचा आसरा चांगला होतो.
फळदार झाडे लावलीत तर मनूष्यांबरोबर पशूपक्षांनाही फळे खायला मिळतिल. त्यांमूळे कोणतीही फळदार झाडे लावावीत.
शक्यतो नदिच्या कडेला लावलीत तर चांगली वाढतील व मातीची धुपही होणार नाही, असे म्हणणे आहे गुरुजींचे!
फळझाडे लावल्यामुळे अजून हा फायदा हा कि पक्षी फळे खावून लांब जावून विष्ठा विसर्जन करतात ज्यात फळांच्या बिया असतात त्यामुळे परत वनीकरणाचा प्रसार होतो.
>>घरी फणसाचे झाड आहे पण त्याच्या बिया सुध्दा आम्ही ठेवत नाही
फणसाच्या आठळ्या ठेवत नाही? असली मस्त भाजी होते त्या आठळ्यांची. फक्त काप्या फणसाच्या हव्या, बरक्याच्या का नको हे सुज्ञांस सांगणे न लगे. ;)
असा का दिसतोय प्रतिसाद?
=))
झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही !विशेष सहमती. इतरही कारणे आहेतः १. ही झाडे रात्रीसुद्धा ऑक्सीजनच उत्सर्जित करतात २. या झाडांवर अनेक पक्षी विसावा घेऊ शकतात. काहिशा पापुद्रा असलेल्या खोडांमुळे अधिक किटकांचीही सोय होते. या झाडांना फळे आली की बरेच पक्षी यावर घरटी बांधतात. (ही झाडे असलेल्या ठिकाणी पक्षांची बरीच विविधता दिसते) बाकी वरील जांभुळ-प्रकल्पालाही शुभेच्छा!
http://misalpav.com/node/2820४
अतिशय स्पृहणिय उपक्रम आहे.
खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही.
याला +१.
जांभळाबरोबर इतरही फळझाडे अथवा इतर उपयोगी झाडे (वड, पिंपळ, इ) जलसंधारणास उपयोगी झाडे लावण्यास हरकत नसावी. पण निदान कोणी हे काम पदरमोड करून करतो आहे हेच कितीतरी असाधारण आहे !!!स्तुत्य उपक्रम. अन्य फळझाडेही लावली असती तरी उत्तम होते, पण ठीके, जांभूळ तर जांभूळ. शुभेच्छा!
मला आवडेल या उपक्रमात सहभागी व्हायला. पण नगर खूपच दूर आहे.
इथे मीच असा एखादा उपक्रम काढेन कदाचित...
आलात तर सरप्राईझ मिळेल की हो!
आणि नाही आलात तर स्थानिक वनविभागाच्या अधिकार्याची मदती मदत घेवुन रोपे बनवुन घ्यावीत आणि त्याज कडुनच लावून घ्यावित, असा सल्ला आहे गुरुजींचा!
स्तुत्य उपक्रम.
बिया द्यायला जमणार नाही म्हणुन भरपुर शुभेच्छा घ्या. *i-m_so_happy*
पाणी अडणार आहे का पण? :)
पाणी अडणार आहे का पण?पाणी अडवण्यासाठी बि कुठे पेरावे लागेल ह्याविषयी सविस्तर मार्गदर्शन मा.पजित अवार करतील *biggrin*
बी पेरण्याबद्दल की पाणी अडवण्याबद्दल, याबद्दल अंमळ गफलत होतेय का? बहुधा पाण्याशी संबंधित असावं, चूभूद्याघ्या ;)
अतिशय स्तुत्य उपक्रम. आयुर्हित माहिती बद्द्ल धन्यवाद. गुरूजींना नक्की भेटणार...मी माझ्या बागेत आठवड्या पुर्वी जांभळाच्या जवळपास दोनतिनशे बिया पुरल्या आहेत रोप तयार झाले की इथल्या परिसरात लावणार आहे. गुरूजींच्या कार्यातुन प्रेरणा घेवुन प्रत्येकाने वृक्षरोपण नक्की करायला पाहीजे.
मी पण हा उपक्रम २००९ पासून करत आहे. मी फक्त मोठी झाडे लावतो. आत्ता पर्यंत तशी ६० मोठी झाडे लावली गेली आहेत. यात काही नवीन उपक्रम पण केले आहेत. उदा. अनेकदा आपण एखाद्या जुनाट भिंतीवर वडाचे, पिंपळाचे छोटे झाड उगवलेले पाहतो ते तिथून काढून जमिनीत "ग्राफ़्ट" करणे, अथवा उन्हाळ्यात नक्की फुलणारे गुलमोहोराचे झाड लावल्याने उन्हात मोठे रक्षण होते....सहसा कोणत्याही बागेत अशा झाडांच्या खाली त्याच्या बिया पडलेल्या असतात. जून महिन्यात आंबा घाटात सुमारे ४० मोठे वृक्ष अशा पद्धतीने ग्राफ़्ट केले आहेत...पण पाउस कमी झालाय ...बघू कसे जगतात आता..मोठी ५ प्रकारची झाडे फार उत्तम उदा. आंबा, वड, पिंपळ, उंबर, नारळ ..या झाडांना आपल्या संस्कृती मध्ये मनाचे स्थान आहे.
१)ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. स्वातंत्र्यानंतर आपण भारतियांनी त्याचा पुर्ण र्हास केलाय,हे गुरुजींनी पाहिलेले आहे. जांभळाचे लाकुड हे वॉटर रेझिस्टंट असते, त्यामूळे नदी-नाल्यांच्या किनारी लावायला चांगली असतात.
२)जांभळामध्ये लोह आणि विटॅमिन क भरपुर प्रमाणात असते, जे आरोग्यदायी जीवन जगण्यास उपयुक्त असते.
३)जांभळामध्ये मॅग्नेशियम भरपुर प्रमाणात असते, जे जठरातील आम्लतेवर, हृदयदाहावर आणि आम्लाच्या विषारी परिणामांवर आणि दात निरोगी ठेवणे यासाठी हे खनिज उपयुक्त असते. आहारात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास उच्च रक्तदाब,मधुमेह, कर्करोग,मायग्रेन, अस्थमा आणि ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात.
४)ग्लानी किंवा शीण येणाऱ्या लोकांना जांभुळ लोह व मॅग्नेशियमची पुर्तता करुन स्वास्थ दुरुस्त करते.
४)जांभळामध्ये गॅलिक अॅसिड, ऑक्झॅलिक अॅसिड, स्टेरोल्स, एलॅगिक अॅसिड व अॅन्टीऑक्सिडंट असतात, जे कॉलेस्ट्रोल कमी करुन रक्तशर्करा प्रमाणात ठेवायला मदत करते. अशा प्रकारे मधुमेह आटोक्यात आणायला जांभुळ मदतच करते. जरी भारतदेश हा मधुमेहि रुग्णांची राजधानी मानला गेलाय पण निसर्गाने आपल्याला जांभुळ हे फळही दिले आहे. भारतिय उपखंडाचे नाव जंबूद्वीप असे आहे.याचा अर्थ येथे जांभळाची भरपुर झाडी होती. (चोच देण्याआधि दाण्याची सोय केलेली असते हे माझे एक विधान आठवले.)
५)जांभळा रंग हा रंग प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो. वांगी, जांभळे, काळी द्राक्षे, करवंदे वगैरेच्या सेवनाने शरीरात या रंगाची गरज पूर्ण होते.
६)जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
७)जांभूळ हे मोठमोठे कवी यांना स्फूरण देवुन गाणी व कविता करायला मदतच करतो.
उदा: जैत रे जैत मधिल 
तुमचा प्रतिसाद वाचून बर्याच दिवसांनी हा निबंध आठवला:
आवडता पक्षी--बदक !!....
बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते !!..मी पण
पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..गांधीजी मोट्ठे नेते होते!!..त्यांच्या हातात काठी पण असते
हा हा हा!
भापकर गुरूजींचा हा चांगला उपक्रम आहे. त्यांना ह्या उपक्रमात अपेक्षित यश मिळावे हि सदिच्छा!
मला वाटते ठाण्यातल्या हरियाली या संस्थेने किंवा/आणि पुण्यातल्या वनराई या संस्थेने असे उपक्रम पूर्वी राबवलेले आहेत. सध्या मुंबईतले अनेक ट्रेकिन्ग ग्रूप्स, समाजसंस्था, लायन, रोटरी आदि क्लब हा उपक्रम राबवीत असतात. 'अनाम प्रेम' चे लोक जिथे जिथे जातात तिथे बिया उधळतात. वर्षभर खाल्लेल्या फळांतल्या बिया जपून ठेवणे आणि पावसाळ्यात दूर कुठेतरी उघड्याबोडक्या टेकड्यांवर जाऊन त्या उधळणे हे काम अनेक कुटुंबे वैयक्तिक पातळीवर करत असतात. आम्हीसुद्धा. हा आपला खारीचा सहभाग, कारण टेकड्यांवर खड्दे खोदून त्यात रोपलावणी करणे सर्वांनाच जमते असे नाही. पण आता बहरलेली काही वने पहाताना यात आपण पूर्वी रोवलेली रोपेही असतील या विचाराने ऊर भरून येतो.
अशा असंख्य वेड्या प्रयत्नांची आवष्यकता आहे. मात्र त्यांना एवढा पैसा खर्च करावा लागू नये. सरकारने लागेल ती मदत करावी ही अपेक्षा.
चांगल्या उपक्रमाच्या माहितीबद्दल धन्यवाद, आयुर्हित. आणि भापकर गुरूजींना आणि त्यांना मदत करणार्या सर्वांनाच शुभेच्छा!
नदीकाठच्या मातीची झीज थांबवण्यासाठी सुगंधासाठी आपणां सर्वांच्या ओळखीच्या वाळा (खस/vetiver) या वनस्पतीचाही पूर्वापार वापर केला जातो. या रोपांची मुळं जमिनीखाली सरळ उभी अशी २००-४०० सेंटीमीटर इतकी खोल जाऊन माती धरून ठेवतात. कोकण रेल्वेने उतारावर पावसाने रूळाखालची माती घसरू नये म्हणून या रोपांची खुबीने लागवड केली आहे. त्याची रोपे कोठे मिळतात याची माहिती वाळे विकणार्यांकडून मिळू शकेल असं वाटतं.
फारच छान उपक्रम. शुभेच्छा. आमच्या झाडाखाली बिया पडूनही बरीच रोपे उगवतात पावसामध्ये.
चांगला उपक्रम...