तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-३३

खुशि's picture
खुशि in भटकंती
29 Aug 2012 - 4:48 pm

आज थोडे बरे वाटत नाही;ताप आला आहे, त्यामुळे स्नान आश्रमातच गरम पाण्याने केले. पुजा आरती केली,नास्त्या साठी खाली भोजनकक्षात गेलो.धनन्जय म्हणाला,महाराज रात्री येणार आहेत. म्हणजे आजही येथेच रहावे लागणार.माझी तब्येत बरी नसल्याने मी खोलीत विश्रान्ती घ्यायला गेले आणि हे बाहेर फिरायला बाहेर पडले.मी नामस्मरण करत पडून राहिले.
दुपारी मी भोजनासाठी खाली गेले नाही.देशपान्डेवहिनी माझ्यासाठी पेज घेउन आल्या,छान ओवा,आल्याचे तुकडे घातलेली तान्दुळाच्या रव्याची पेज. अगदी आपल्या घरी आजारी माणसाला घरातील आजी किन्वा आई करुन देते तशीच. आपुलकीने चौकशी करुन वहिनी माझ्याजवळ बसल्या आणि मला पेज घ्यायला लावली,गोळी घेतली.मोरया! बरे वाटू दे.अशी प्रार्थना करुन नामस्मरण करत पडुन राहिले.ह्यानी वाचायला पेपर आणला होता.
रत्नागिरी येथुन करकरे कुटुम्ब आले आहे.सौ. करकरे याना ब्रेन ट्युमर झाला होता,ऑपरेशन झाले होते.त्यान्ची अशी श्रद्धा आहे की श्रीराम महाराजान्च्या आशीर्वादाने त्या या मोठ्या सन्कटातुन बाहेर पडल्या. खरेच.आशीर्वाद लाखमोलाचाच असतो. करकरे यान्चा मुलगा खुप गोड आहे. करकरे दोघेहीजण वयाने तसे लहानच आहेत्.आणि एवढा मोठा कठीण प्रसन्ग त्यान्च्यावर आला होता. श्रद्धेच्या बळावर त्यानी त्यावर मात केली. हे खरोखरच कौतुक करण्या सारखेच आहे.
महाराज रात्री खुप उशिरा आले. सकाळी सर्व आवरुन त्याना भेटायला गेलो. नमस्कार करुन बसलो,बरेच लोक आलेले होते.महाराज प्रत्येकाची हसतमुखाने चौकशी करत होते. आम्हालाही विचारले,मला म्हणाले डॉक्टरान्कडे जाउन औषध घ्या,बरे वाटल्याशिवाय पुढे जाऊ नका.
अकरा वाजता दादा दरबार हॉस्पिटलला गेलो.गोखले सरानी तपासले,औषध लिहुन दिले. समर्थकुटीत येउन तीन दिवस झाले होते,आजची रात्र तिसरी होती म्हणजे परिक्रमेच्या नियमाप्रमाणे उद्या पुढे निघायला हवे होते.
सकाळी थोडे बरे वाटत होते म्हणून महाराजाना नमस्कार करुन निघण्याची परवानगी घेतली आणि निघालो.पण दादादरबार येईपर्यन्तच पाय लटपटायला लागले,परिक्रमेत मागे फिरायचे नसते,आता काय करायचे? गोखले सर म्हणाले,आमच्या घरी रहा,त्यान्ची क्वार्टर चार खोल्याची होती,मग तिथेच राहिलो. नर्मदा मैय्याची क्रुपाच अशी आहे. मदतीला माणसे लगेच हजर असतात.
दोन दिवसानी आणखी थोडे पुढे बडवाह रस्त्याला स्वामी रामानन्द भक्त मालधाम या आश्रमात आलो, या आश्रमात नाशिकच्या आमच्या मित्राचे { विजय महाजन} ओळखीचे श्री. व्यास हे व्यवस्थापक आहेत. काल विजयशी फोनवर बोलणे झाले तेव्हा त्याने येथे जाण्यास सान्गितले होते. हा आश्रम खुप मोठा आहे.सर्व आधुनिक सोयी सुविधा आहेत.दोन दिवस येथे राहिलो.आज ३१ डिसेम्बर आहे.२०११ सम्पले.उद्या २०१२चा प्रारम्भ.
एक आठवडा आजारपणामुळे खेडीघाटमध्येच गेला. आज पुढे निघालो,फक्त पाच कि.मि. चालुन बडवाहला नागेश्वर कुन्डाजवळील श्रीराम मन्दिर धर्मशाळेत उतरलो.श्री.महाजन यान्च्या नानाजीन्चे हे खाजगी मन्दिर आहे.धर्मशाळा आहे. शेतकरी कुटुम्ब आहे.ते परिक्रमावासीना सदाव्रत देतात पण आम्हाला त्यान्च्या घरीच भोजनास बोलावले. तिथे जवळच धर्माधिकारी आजी राहतात,त्यान्चे यजमान येथेच शिक्षक होते.सारे आयुष्य येथेच गेल्यामुळे त्या या म्हातारपणातही महाराष्ट्रात न जाता एकट्या येथेच राहतात. धर्मशाळेत सोय नव्हती म्हणून धर्माधिकारी आजीनी उद्या पहाटे त्यान्च्या घरी स्नानादि साठी बोलावले आहे.धर्मशाळेत आणखी काही परिक्रमावसीही मुक्कामाला होते म्हणुन महाजनानी तिथेच असलेल्या शाळेच्या वर्गात आमची व्यवस्था करुन दिली. नर्मदे हर!
१ जानेवारी २०१२. नवीन वर्षारम्भ. पहाटे ५ वाजता धर्माधिकारी आजीन्च्या घरी गेलो.स्नान करुन चहा घेउन धर्मशाळेत येउन पुजा आरती करुन निघालो. नागेश्वराचे दर्शन घेतले.मन्दिराच्या चारी बाजुना पाण्याचे कुन्ड आहे. नागेश्वराला उजवी घालुन पुढेमहाकाली,दत्त,गोपालक्रुष्ण यान्चे दर्शन घेउन विनोबा एक्स्प्रेस परिक्रमेसाठी सज्ज झाली.
च्यवनाश्रमाला जाण्या साठी चोरलनदी पार करावी लागते आणि तिला बरेच पाणी असते म्हणुन महाजनान्च्या सल्ल्यानुसार आम्ही वनविभागाच्या हद्दीतुन कुन्डी मार्गे पिपरीला जाण्याचे ठरवले होते. कुन्डी नन्तर ५कि.मि. जगत्पुरा फाटा आला. नुकतीच आजारपणातुन उठल्यामुळे, अशक्तपणामुळे मी थकुन गेले होते पिपरी ३०कि.मि. होते .पण आम्हाला काळजी करायचे काय कारण ? मैय्या आहे. एक बस आली ती उदयनगर मार्गे काटकूटला जात होती,कन्डक्टर म्हणाले; उदयनगरला पिपरीला जाणारी बस मिळेल. मग बसलो त्या बसमध्ये तेव्हा सकाळचे दहा वाजले होते.
उदयपुरला जाणारा सर्व रस्ता घनदाट जन्गलातुन जात होता.बरा होता. थन्डगार सावली,पक्षान्चा किलबिलाटात उदयपुर कधी आले समजलेही नाही. उतरलो,तिथे श्री. दुबे भेटले.ते तेथिल गोपालक्रुष्ण मन्दिराचे पुजारी आहेत.दर्शन घेउन त्यानी दिलेला खडीसाखरेचा मोठा पुडा प्रसाद घेउन त्यान्च्या घरी गेलो. चहा घेतला.तिथे मुलुन्डचे ठक्करबाबा भेटले,ते गेली १२ वर्षे परिक्रमेत आहेत. उत्तम मराठी बोलत होते.
१२ वाजता रतनपुरला जाणारी बस आली,ती सीतावन मार्गे जाणारी होती बसलो. गोसावीना फोन करुन मुक्कामाच्या ठिकाणाबद्दल विचारले,ते पिपरीला डॉ. पाटील यान्च्याकडे उतरले होते. मला एकदम आठवले;नाशिकच्या प्रल्हाद भान्ड यानी पाटील डॉक्टरान्चा फोन नम्बर दिलेला आहे.मग त्याना फोन करुन आम्ही दोघे येत असल्याचे कळवले.
एक वाजता पिपरीला पोहोचलो.डॉ. सुरेश पाटील वाटच पहात होते.ते अमळनेरचे राहणारे आहेत. धारसन्स्थानचे राजे आनन्दराव पवार यानी त्याना १९७९ साली या आपल्या सन्स्थानाच्या इलाक्यात वैद्यकीय सेवा देण्यासाठी आणले.त्यान्चा मुलगा पन्कज.सुनबाई सौ. ज्योत्स्ना. नातु चेतन आणि नात तेजस्विनी.आमच्या स्वागताला दारातच उभे होते सौ.पाटील दुसर्‍या मुलाकडे जळगावला गेल्या होत्या. मोठे सेवाभावी कुटुम्ब. लगेच हातपाय धुवुन भोजन केले. आता विश्रान्ती. क्रमशः

प्रतिक्रिया

अमोल खरे's picture

30 Aug 2012 - 10:55 am | अमोल खरे

परिक्रमा चांगली चालली आहे. मध्य प्रदेशात इतकी मराठी लोकं आहेत हे ह्या निमित्तने कळले. पुढील भागास शुभेच्छा.

स्पंदना's picture

31 Aug 2012 - 5:52 am | स्पंदना

नर्मदे हर!