काळाच्या कसोटीला पुरून उरणारी कलाकृती म्हणून आज महाभारताचा उल्लेख करू शकतो. मानवी स्वभावाचे अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे आपल्याला महाभारतात आढळून येतात. प्रत्येक संस्कृतीने महाभारताकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. या कॅलिडोस्कोप ने प्रत्येकाला वेगळे आकार वेगळे रंग दाखवले. असाच एक वेगळा रंग मला दिसला तो भिल्ल भारतामध्ये. हे महाभारत ज्याला रूढार्थाने आदिवासी म्हणता येईल अश्या आदिम संस्कृतीमध्ये स्वतःचा वेगळा बाज धरून उभे राहिले आहे. मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे. काही मोजके अपवाद वगळता मातृसत्ताक असलेली हि संस्कृती प्रामुख्याने स्त्रीप्रधान म्हणजेच स्त्रीला प्रमुख स्थान देत वाटचाल करत आहेत. समाजातील स्त्रियांच्या आवडी निवडीला प्राधान्य देणारा समाज म्हणून आदिवासी जमातीकडे बोट दाखवता येईल. भिल्ल भारताच्या स्त्रिया देखील त्याला अपवाद नाहीत. या महाभारतातली द्रौपदी हि मूळ द्रौपदी पेक्षा जास्त खंबीर आणि आत्मकेंद्रित आहे. त्या द्रौपदीचीच हि काहीशी अज्ञात कथा.
या कथेतली द्रौपदी हि मूळ कथेप्रमाणे पांडवांची सेवा करणारी बायको नसून एक महाराणी आहे. सोबतीला दासींचा लवाजमा ठेवून स्वतःची सेवा करवून घेणारी एक पट्टराणी. या दासींचं प्रमुख काम म्हणजे सतत आपल्या महाराणींचा साज शृंगार करत राहणे. द्रौपदी झोपलेली असताना तिचे केस विंचरण्याचे काम त्या इमाने इतबारे करत. अशाच एका वेळी काहीश्या धसमुसळेपणामुळे द्रौपदी चा एक केस तुटून जातो. घाबरलेली दासी तो सुवर्णपेक्षा तेजस्वी असा केस खिडकीवर ठेवून देते, जेणेकरून वारा तो उडवून लावेल आणि मालकिणीच्या दृष्टीमध्ये तिचा निष्काळजीपणा येणार नाही. लबाड वारा तो केस खोल पाताळात फेकून देतो. नेमका तो केस पडतो पाताळात निद्रा घेत असलेल्या शेषनाग अर्थात वासुकीवर. इतका तेजस्वी केस पाहूनच तो शेष द्रौपदी वर मोहित होऊन तिच्या मागावर येतो. शेषाला आपल्या दारात पाहून द्रौपदी त्याच्याकडे आकर्षित होते. दोघांचा प्रणय सुरु असताना अर्जुन यायची वेळ होते. ती शेषाला परोपरीने तिथून जायची विनंती करते. पण पुरुषार्थाचं प्रतीक असा शेष तिथून जाण्यास नकार देतो. अर्जुनाच्याच केसांनी त्याला त्याच्याच पलंगाशी बांधून तो त्याची मानखंडना करतो. द्रौपदी कडून तो आपली सेवा करून घेतो. तिच्या हातून सुग्रास भोजन चवीने खातो. तिच्याकडून आपले अंग दाबून घेतो आणि अर्जुनाच्याच समोर द्रौपदी चा उपभोग घेतो.
हि झाली कथेची एक बाजू. पण मुळातच भिरभिरणाऱ्या वाऱ्याप्रमाणे स्वछंद असलेली हि संस्कृती तिथल्या लोकगीतांमध्ये असे काही रंग भरते कि लाजेकाजेच्या कोशात गुरफटलेल्या आपल्या समाजाला घेरी यावी. एका आदिवासी लोकगीतानुसार अर्जुनाने सुभद्रेला पळवून आणल्यामुळे झालेल्या अपमानाने द्रौपदी भयंकर क्रोधीत झाली आहे. स्त्रीला पळवून आणण्यामध्ये पुरुषार्थ समजणाऱ्या अर्जुनातल्या क्षत्रियत्वाला ती आता त्याच भाषेत प्रत्युत्तर करणार आहे. वाऱ्याला आपल्या कटात सामील करून तीच आपल्या तेजस्वी केसांचा मोह शेषाला पडेल अशी व्यवस्था करते. कामविव्हळ असा शेष जेव्हा तिच्याकडे प्रणय सुखाची मागणी करतो तेव्हा ती त्याचाही पुरुषार्थ डिवचते. रागाने पेटून उठलेला शेष मग चिडून तिच्या समोर अर्जुनाला बांधून हतबल करून टाकतो. अर्जुनाच्या डोळ्यादेखत तो तिचा उपभोग घेतो खरा पण अपमानाच्या आगीत धगधगत असलेल्या द्रौपदी च्या खेळातला तो निव्वळ एक प्यादा आहे.
अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे. निष्क्रिय अशा अर्जुनाला ती कर्णाची मदत घेण्यास सुचवते. अर्जुन आता दुबळ्या पेक्षा दुबळा आहे. स्वतःची लाज वाचवण्याकरता त्याला आता यःकश्चित अश्या सुतपुत्राची मदत घायला लागणार आहे.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
27 Feb 2017 - 7:30 am | प्राची अश्विनी
वा! आवडलं. खूप आधी हे पुस्तक वाचलंय.
27 Feb 2017 - 7:46 am | जेपी
रोचक आहे.
पु भा प्र.
27 Feb 2017 - 9:35 am | संदीप डांगे
जबरदस्त! लवकर लिहा पुढे!
27 Feb 2017 - 10:44 am | एस
रोचक.
27 Feb 2017 - 10:47 am | संजय क्षीरसागर
मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे.
सूडाचं राजकारण करणारा समाज मग तो स्त्रीसत्ताक असो की पुरुषसत्ताक सुसंस्कृत कसा समजला जातो ?
27 Feb 2017 - 11:10 am | आदूबाळ
हायला! जबरदस्त! कुठलं पुस्तक आहे हे?
27 Feb 2017 - 1:06 pm | पिशी अबोली
जबरदस्त!
27 Feb 2017 - 1:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक आहे. हे माहित नव्हतं. पुभाप्र !
27 Feb 2017 - 4:29 pm | इरसाल कार्टं
मलाही. पुभाप्र.
27 Feb 2017 - 5:39 pm | अभ्या..
जांभूळाअख्यानाच्या जवळपास जाणारी कथा.
पारंपारिक मिथके , लोककथा अन संस्कृती ह्यांची सांगड जब्बरदस्त तितकीच धक्कादायक.
.
माझ्या 'मालकीन' कथेआधी ही वाचनात आली असती तर कदाचित मी शेवट बदलला असता. ;)
27 Feb 2017 - 11:49 pm | चौथा कोनाडा
भारी य !!
28 Feb 2017 - 5:58 pm | बबन ताम्बे
पुढील भागाची प्रतिक्षा .
28 Feb 2017 - 6:05 pm | फेदरवेट साहेब
कॅलिडोस्कोप आहे महाभारात खरेच.
अर्थात काही महापुरुषांना हे भिल्ल भारत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात लिहिल्यासारखे वाटेल, त्याला नाईलाज आहे. =))
28 Feb 2017 - 11:00 pm | गामा पैलवान
ए शाहेब,
तेचा काय जाला ते तुला सांगतो बग! ते जेएन्युवाला पब्लिक हाय ना, तेच्या अंगात लई म्हंजी लईच खाज हाय. प्रॉफेट महमंदचे बायडीला अशाकाय बोल्ते का ते? द्रौपदी च्यांगली सॉफ्ट टार्गेट भेटली हाय तेन्ला. काय बी ठोका भिलच्या नावाने. हिंदू पतिव्रता बाय देखली की तेंची टेम्पर एकदम ओवरशूट होते नी. स्साला सोताची गंदी फ्यांटशी इमेजिन करायला मिडलईस्ट मंदी जावा नी. हिथे इंडियामंदी काय काम तेंचा हां?
महर्षी व्यास अशा उल्टासुल्टा बोल्ते काय द्रौपदीला? मंग हा भिल च्याप्टर कुठून आला? तो बी डायरेक्ट नाईंटीन्थ सेंच्युरीमदी. स्साला काय लफडा हाय? अंग्रेज यायच्या पहले कोनीबी कशा ऐकला नाय भिल महाभारत? बकवास तेच्यामारी.
आ.न.,
-गा.पै.
1 Mar 2017 - 7:16 am | Ram ram
गा मांना अनुमोदन
1 Mar 2017 - 8:20 am | फेदरवेट साहेब
असोच असो! गामा तुमची 'पतिव्रता' ची परिभाषा काय हो?
उत्तर नीट मराठीत दिले तरी चालेल, उगाच फालतू पारशी गुज्जू ऍक्सेन्ट नाही मारला तर बरे, तसेही तुम्हाला जमत नाहीये तो, ते एक परत असो.
2 Mar 2017 - 12:23 am | गामा पैलवान
ए फेदरवेट शाहेब,
स्साला कसला इडियट सवाल पूछते तूबी! द्रौपदीचे आख्खे पांच हजबंड्स स्लेवरीमंदी अटकले होते. तेनला अने खुदला बी रीलीव केला नी. आजून काय पायजे पतिव्रता व्हायला? तू म्हाभारत वाचला नाय? एकदा वाचून बग.
माजा आक्शेंट आसाच हाय. माला नाय जमला तरी चालल. तुला चोक्कस जमतो नी, पछी सूं प्रोब्लेम थयो!
आ.न.,
-गा.पै.
2 Mar 2017 - 8:33 am | फेदरवेट साहेब
वनवास अन अज्ञातवास गुलामी म्हणवतील का? महाभारत तुम्ही तरी नीट वाचले आहेत का? मुख्य म्हणजे व्यासांचे महाभारत वाचले आहेत का रामनाथी आश्रमाचे वाचले आहेत ते स्पष्ट करा, बरं तुमच्या म्हणण्यानुसार द्रौपदीने 'पाच पती' अन सासूला अन स्वतःलाही 'गुलामगिरीतुन' मुक्त केले, हे पुरेसे आहे का पतिव्रता म्हणवून घ्यायला? ह्या हिशोबाने नवऱ्याच्या प्रोमोशन करता जर एखादी स्त्री त्याच्या बॉससोबत गुलुगुलु बोलू लागल्यास जवळीक साधू लागल्यास ती पतिव्रता होईल का? नाही ती पण पतीसाठीच काम करत होती असे म्हणायला वाव आहे ना...
2 Mar 2017 - 1:49 pm | गामा पैलवान
ए शाहेब,
ते द्रौपदीच्या कपडा फाडला नी, तवा मिरेकल जाला. धृतराष्ट्र डरपोक होता. तो घाबरला अने तिला तीन बून दिले. पहेला बूनने तिने समदा पांडवांना स्लेवरीमधून बाहर काढला. दुसरा बून वापरला अने खुदबी स्लेव नाय अशा डीक्लेर केला. तिसरा बून रिफ्युज केला नी. आर्ग्युमेंट करते की क्षत्रिय फकस्त दोनच बून घेतात. अशी जबरदस्त कॅरॅक्टर हाय द्रौपदी. अने तू तिला पायफाकवू स्वैरिणीशी कंपेर करते. स्साला मी पारशी हाय अने इस्क्रू बद्धू तुजा ढिला पडलाय! व्हॉट अॅन आयरनी.
वनवास वगैरे ड्रामा नंतर झाला. तेला अनुद्यूत म्हंतेत. अनुद्यूतमंदी बी युधिष्टिरने गोता खाल्ला नी. मंग वनवास अने अज्ञातवास मदी जायला लागला. फोरेष्ट एक्झाईलचा स्लेवरीशी कायबी संबंद नाय. व्यासांच्या महाभारत मंदी ह्ये सगळा लिवला हाय. पण तू वाचला नाय. जा वाचून ये.
बाकी, ते रामनाथी आश्रमाचा महाभारत कुटे भेटतो? मी ऐकला नाय कंदी.
आ.न.,
-गा.पै.
1 Mar 2017 - 9:34 am | प्राची अश्विनी
मिडास यांनी कुठचं पुस्तक संदर्भ म्हणून वापरलयं माहीत नाही. पण भिलों का भारथ नावाचं भगवानदास पटेल यांच संशोधनात्मक पुस्तक आहे. साहित्य अकादमी तर्फे आदिवासी भाषांच्या साहित्य प्रकल्पांतर्गत हे प्रसिद्ध झालं आहे. भारत नव्हे तर भारथ, कारण भारथ म्हणजे त्यांंच्या भाषेत युद्ध.
आरवली पर्वत रांगांमधील गुजरातच्या खेडब्रम्हा, दांता तसंच राजस्थानच्या कोटडा या तालुक्यात व जवळपास रहाणा-या डोंगरी भिल्लांची ही भाषा, लिपी नसलेली खरं तर बोलीभाषा. जसजसं या समाजात शिक्षण आणि शहरी संस्कृती पोचली तशी ही भाषा देखील extinct होत चालली आहे. ते होऊ नये निदान त्या भाषेतील मौखिक साहित्य, रीतीभाती कुठेतरी लिखीत स्वरूपात रहाव्या म्हणून भगवानदासजींनी हा परीसर पिंजुन काढला. ही ८०च्या दशकातील गोष्ट. आधी त्यांच्यात प्रवेश मिळणं, विश्वासपात्र होणं, योग्य गाईड मिळणं याला देखील खूप वेळ लागला. त्यानंतर त्यांनी त्या जमातीतील गुरू/ साधू यांच्या तोंडून हे सर्व कैसेट्स वर ध्वनी मुद्रीत केले, ऋतूचक्रावर आधारलेलं भिल्लांचं जीवन. त्यांचे सणवार, लग्नं, म्रुत्यू या सा-याला प्रत्यक्ष उपस्थित राहून , भगवानदासजींनी सुमारे ४००कैसेट्सचा खजिना जमा केला, त्यानंतर अत्यंत मेहनतीनं हे पुस्तक लिहिलं.
मिडासजींंनी या लेखात कुठलेही संदर्भ दिलेले नाहीत. पण लेख वाचून तो या पुस्तकावर आधारित आहे असं मला वाटलं. त्या लेखकाच्या मेहनतीचं श्रेय त्याला मिळावं असं मला वाटतं म्हणून हा भलाथोरला प्रतिसाद.:)
1 Mar 2017 - 9:47 am | फेदरवेट साहेब
माहितीपूर्ण प्रतिसाद. त्यांची तळमळ तुमच्या प्रतिसादातून उत्तम पोचली. असे खरेच असेल तर मिडास ह्यांनी श्रेयनिर्देश करायला हरकत नाही.
2 Mar 2017 - 2:27 pm | यशोधरा
अरे वा, पुस्तकाची माहिती दिलीत हे उत्तम केलं. धन्यवाद!
6 Mar 2017 - 9:13 am | पैसा
जानपद कथा आपल्ण ऐकलेल्या प्रचलित कथाहून खूप वेगवेगळ्या असतात. रामायण आणि महाभारताची अशी अनेक रूपे ऐकायला मिळतात.
प्राचीचा प्रतिसाद अतिशय आवडला.