खालील कविता दि. ४-१२-२००६ रोजी केली आहे... या कवितेतील काही जातीवाचक शब्द कुणाच्याही भावना दु़खावण्याच्या हेतूने वापरले नाहीयेत...
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात नैतिक मूल्यांची होळी होत असताना...
मीही तुमच्यासारखाच निद्रिस्त...
तेव्हा तुमच्या आमच्यातल्याच चार जीवांना
समाज दूर सारत होता |
आणि रिकामं डोकं नसलेला प्राणी म्हणून
आपली ओळख जपणारा...
प्रत्येक माणूस पुरूषार्थाच्या
बोंबा मारत होता ||
मी डोळे उघडणार इतक्यात भैय्यालाल
माझ्या डोळ्यांपुढे आले...
दलित पाहून आम्हा पांढरपेशांच्या
डोक्यात राग जातो |
कैफियत मांडायचीये असे म्हणताच
मी जरा दूर झालो...
पहा २१वं शतक,मी
स्वप्नात सुद्धा जागा होतो ||
ते म्हणाले मला माणुसकीबद्दल बोलायचंय
अस्तित्वात नसलेल्या...
स्वतःला माणूस म्हणावणार्या माझ्यावर
तो पहिला आघात होता |
आणि मला जाणवलं...
खरं बोलणारा एक तरी माणूस
तेव्हा जगात होता ||
त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यातंच वाचले मी
पुरूष-प्रधान संस्कृतीचे पराक्रम...
तुमच्या सारखाच प्रवाहात
वाहात होतो मी |
दुसर्यासाठी माझ्या डोळ्यात
प्रथमच अश्रू पाहात होतो मी ||
खरंच विसरलो आहोत का आपण
थोडंसं दुसर्यासाठी जगणं?
चुकून कधीतरी विचार करणार्या
माझ्यासाठी हे नवं होतं |
पुनर्वसन करायलाही कुटुंब न उरलेले
भैय्यालाल म्हणाले एक विचारू?
मला जरा भावना व्यक्त करायचं
यंत्र हवं होतं ||
'सिम्पथी' आयकॉन भैय्यालाल, चंद्रावर पाय
ठेवलेल्या माणसाला
इतक्या लवकर
जमिनिवर आणतो |
आणि मुंबईचे शांघाय बनविताना मात्र...
आम्ही स्वतःलाच
आधुनिक म्हणतो ||
देवावर तसा विश्वास नाही पण
नियती तरी एखाद्याची किती परिक्षा पाहते |
भैय्यालाल म्हणतात-
''प्रगती होते माणसांची,माणुसकी मात्र तिथेच राहते'' ||
जाताना म्हणाले...अजून जळत असतील त्या चिता...
त्यावर एकदा हात ठेवून म्हणा, असं पुन्हा घडणार नाही...
तेवढयात मी
दोन पावलं मागे आलो |
स्वप्नात सुद्धा माणसाची खात्री देऊ शकलो नाही...
आपण एवढे निष्ठूर
केव्हा झालो??
प्रतिक्रिया
4 Sep 2009 - 5:36 pm | बहुगुणी
आवडली.
खरंच विसरलो आहोत का आपण
थोडंसं दुसर्यासाठी जगणं?
आणि
जाताना म्हणाले...अजून जळत असतील त्या चिता...
त्यावर एकदा हात ठेवून म्हणा, असं पुन्हा घडणार नाही...
या ओळी विशेष आवडल्या. साध्या, पण hard-hitting!
कवितेत 'भय्यालाल' भेटले, 'बाबासाहेब' implied असावेत, पण त्यामुळे कविता थोडी अपूर्ण वाटली.
4 Sep 2009 - 5:54 pm | श्रावण मोडक
आघात करणारी कविता.
4 Sep 2009 - 6:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-(
4 Sep 2009 - 7:26 pm | हृषीकेश पतकी
'बाबासाहेब ते भैय्यालाल' हे नाव लिहिल्यानंतर विषय लिहिण्याची आवश्यकता वाटली नाही...
तरीही हवं असल्यास...
विषय - खैरलांजी हत्याकांड...
धन्यवाद!!
आपला हृषी !!
5 Sep 2009 - 8:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ओह, तुमचा थोडा गैरसमज झालेला आहे. माझ्या प्रतिक्रियेचा विषय दिलेला नाही. तुमचं प्रकटन वाचून वाईट वाटलं, यापुढे काहीही बोलावसं वाटलं नाही म्हणून फक्त एक :-( चेहेरा काढला.
भैय्यालाल हे नाव ऐकल्यावर खैरलांजी प्रकरण आठवतंच आठवतं, हे नाव एवढं 'प्रसिद्ध' नसतं तर बरं झालं असतं वाटतं.
अदिती
6 Sep 2009 - 9:21 pm | हृषीकेश पतकी
माफ करा..
मी नीट वाचलं नव्हतं..
आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे..
खरोखरंच अत्यंत हृदयद्रावक घटना होती..
आपला हृषी !!
5 Sep 2009 - 11:19 am | अमित बेधुन्द मन...
जाताना म्हणाले...अजून जळत असतील त्या चिता...
त्यावर एकदा हात ठेवून म्हणा, असं पुन्हा घडणार नाही...
5 Sep 2009 - 10:41 pm | अजुन कच्चाच आहे
:<
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)