कोणास दोष देऊ..?
मी ही गर्दीतला ..
जात्यातला कधी ,
तर कधी सुपातला .
माझ्याच सोबत्याची ,
अंत्ययात्रा हो निघाली ,
सण्डे होता म्हणुनी ,
मी ही अटेण्ड केली .
दूरुनच जरा घेतले ,
दर्शन पार्थिवाचे ,
उपचार जरासे केले ,
अंत्ययात्रेत चालण्याचे .
दुरुन उपचार सारे ,
मग आंघोळ तरी कशाला..?
मी करुनी विचार ऐसा ,
बाजार सण्डेचा केला .
सारे असेच होते ,
जे भेटले तिथेही ,
हायसे वाटले मलाही
कि त्यांच्यातलाच मी ही
घरे कसली आमुची ..?
हे अड्डे संभावितांचे ..!
भेटतील इथे मुखवटे ..
प्रत्येक चेह-याचे..!!
प्रतिक्रिया
27 Apr 2009 - 8:34 pm | प्राजु
आपल्या भावना खरंच बोथट झाल्या आहेत का? असा प्रश्न स्वतःला विचारला तर उत्तर "हो" आलं.. काय बोलणार?
कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Apr 2009 - 9:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कविता आणि प्राजुची प्रतिक्रिया दोन्ही पटल्या म्हणून आवडल्या.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
27 Apr 2009 - 11:16 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
27 Apr 2009 - 11:32 pm | लिखाळ
इतकी भावनाशून्य माणसे असतीलही पण बरीच असतील असे वाटत नाही.
सध्या खर्या चेहर्यांतच वावरतो असे वाटते. (किमान खर्या चेहर्याने वावरतो.)
सारे असेच होते ,
जे भेटले तिथेही ,
हायसे वाटले मलाही
कि त्यांच्यातलाच मी ही
कविता छान आहे.
-- लिखाळ.
28 Apr 2009 - 1:35 am | विसोबा खेचर
दुरुन उपचार सारे ,
मग अंघोळ तरी कशाला..?
मी करुनी विचार ऐसा ,
बाजार सण्डेचा केला .
!!!
गोखलेसाहेब,
कविता नेहमीप्रमाणे उत्तमच आहे हे प्रथम नमूद करून एक नम्र सूचना कराविशी वाटते.
सामजिक आशयच्या, आपण बोथट, मुर्दाड बनलो आहोत, अश्या आशयाच्या आपण ज्या कविता करता त्या उत्तमच असतात, अंतर्मुख करायला लावतात जे कबूल. मी त्या कवितांना वेळोवेळी दादही दिली आहे.
अहो पण अधनंमधनं केव्हातरी छान निसर्गकविता, जीव ओवाळून टाकावा अश्या प्रेमकविताही करत जा की प्लीज! आयला, आजकाल आपली कुठली नवी कविता दिसली की आता काहितरी डोळ्यात अंजन घालणारं जळजळीत वाचायला मिळणार या भावनेने अलिकडे मला प्रथम धडकीच भरते! :)
तेव्हा जमल्यास माझ्या सूचनेचा अवश्य विचार व्हावा!
काय म्हणता?
(फ्यॅन) तात्या.
28 Apr 2009 - 8:31 am | चन्द्रशेखर गोखले
आपण माझ्या प्रत्येक कवितेचे कौतुक केले आहे..मी आपला आभारी आहे .. हे खर आहे कि माझ्या बहुतेक कविता
सामाजिक आशयाच्या असतात. त्यात कधी कधी वास्तवतेचे अतिरंजित वर्णन ही कदाचित होत असेल्..पण माझ्या सारख्या
असंवेदनशील माणसाला प्रेम कविता, निसर्गकविता कशा सुचणार..? ती जबाबदारी प्राजुताई, क्रांति यांच्याकडे आहे..
असो.. पण तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो..!!