राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in काथ्याकूट
29 Mar 2009 - 12:33 pm
गाभा: 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याची फार पुर्वीपासुन इच्छा आहे
तसा तो पुर्वीदेखील साधायचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी माझे स्वतःचेच मत तयार नव्हते,त्यामुळे तो धागा मी उडवला होता
त्याबद्दल आपण बोलुच, पण आज खुप दिवसानी मटात एक उत्तम लेख वाचायला मिळाला तो ही संघपरिवारावर!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4328492.cms
तो जरुर वाचा

आता माझ्या मुद्द्याविषयी
मध्ये जेव्हा मी याच विषयावरचा चर्चा प्रस्ताव येथुन उडवला त्यानंतर या विषयावर खुप विचार केला,काही मते तयार करायचा प्रयत्न केला
पण त्यावरुन मी एवढ्याच निष्कर्शाप्रत येवुन पोहोचलो की संघ ही एक शिस्तप्रीय ,विशिष्ट तत्वांशी बांधली गेलेली एक संस्था आहे.
आणि समाजावर प्रभाव म्हणाल तर मात्र खुप आहे
आज देशातील कोणत्याही भागातील व्यक्ती इतर भागात मी फक्त संघातील म्हणून दुसर्‍याच्या घरी राहु शकतो हे सामाजीक अभिसरणाचे कळत नकळत घडलेले काम म्हणजे संघाचे यश असे मला वाटते
आणि हो या देशातील राजकाराणावर बर्‍यापैकी प्रभाव पाडणारी काँग्रेसेतर संस्था असे मला वाटते
बाकी मी स्वतः संघ परिवारातील असल्याने या विषयावर त्रयस्थपणे विचार करणे माझ्यासाठी अवघड होते
मात्र तरीही हा प्रयत्न केलेला आहे.
बाकी आपण संघ या विषयावर आपली मते ,विचार ,भुत काळ आणि भविष्यकाळ याविंशयी इथे लिहावे हि विनंती
ज्याचा उपयोग माझ्यासारख्या लोकाना होइल आणि उगाचच भरकटत जाण्यापेक्षा वा जळजळीत भाषणाना बळी पडण्यापेक्षा विचार करता येइल

विनायक पाचलग
(मध्यंतरी एका वेगळ्या धाग्यावर नकळत संघ या विषयावर चर्चा झालेली आहे मात्र तो धागा अप्रकाशित करण्यात आल्याचे दिसते)

प्रतिक्रिया

रामोजी's picture

29 Mar 2009 - 4:54 pm | रामोजी

संघाचे कार्य नक्किच चांगले आहे. हिंदूत्वा ची राखण करण्यासाठी त्यांनी आम्हाला मुस्लीम द्वेष शिकवला नाही, किंवा जातपात ही शिकवली नाही. राष्ट्र्कार्याला संघाने नेहमीच प्राधान्य दिले. मात्र हिंदूत्व ,मुस्लीम द्वेषा शिवाय अशक्य आहे अशी धारणा असणार्यांकडून (सुडोसेक्युलर !!) संघावर धर्मद्वेशी, जातीय आणि देशद्रोहाचे ही आरोप झाले.
मात्र संघाची पार्शवभुमी असलेल्या भा़जप कडून मात्र भ्रमनिरास झाला आहे. कॉन्ग्रेस सारखाच हा एक दुसरा पक्ष आहे.
असो..संघाचे भविश्य मात्र उज्वल वाटत नाही. आज संघ शाखा नामशेष होउ लागल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना संघ व त्याच्या कार्या ची माहिती मिळत नाही. हे आपल्या देशाचे दुर्दॅव आहे.

क्लिंटन's picture

29 Mar 2009 - 6:47 pm | क्लिंटन

मी ठाण्यातील एका नामवंत शाळेचा विद्यार्थी होतो.आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर आणि शिक्षकांवर संघ परिवाराच्या विचारांचा पगडा होता.तेव्हा संघ परिवाराशी संबंधित मंडळी मधूनमधून आमच्या शाळेत येत असत.एकदा ठाणे जिल्ह्यातील जव्हार,मोखाडा या आदिवासी भागात शाळा चालवणारे सद्गृहस्थ आले होते.त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना हिंदू धर्माची ओळख करून द्यायला गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा यासारख्या स्तोत्रांची एक पुस्तिका दिली होती. ती पुस्तिका त्यांनी आमच्या वर्गातही वाटली.तसेच आपल्या चालिरितींमध्ये विज्ञान कसे आहे असे बादरायण संबंध लावून एक छोटेसे भाषण दिले.तसेच पूर्वीच्या काळी भारताने विज्ञानात मोठी प्रगती केली होती, आमच्याकडे पुष्पक विमान होते,शंकराची पिंड म्हणजे न्युक्लियर रिऍक्टर, आमच्याकडे अमुक होते तमुक होते या गोष्टी सांगितल्या.उज्वल भूतकाळापासून प्रेरणा घेऊन आज प्रगतीच्या दिशेने पावले टाकली जात आहेत असे तर दिसत नाही.मग या सगळ्या गोष्टींचा आजच्या काळात उपयोग काय?पूर्वी आपल्याकडे पुष्पक विमान असेलही पण आज अमेरिकेतील बोईंग आणि फ्रान्समधील एयरबस वगळता कोणीही प्रवासी वाहतुकीसाठी लागणार्‍या मोठ्या विमानांचे उत्पादन करू शकत नाही आणि आपल्याला आजही त्याच कंपन्यांकडून विमाने खरेदी करावी लागतात त्याचे काय?तेव्हा संघपरिवाराकडे भविष्यासाठी काही ’व्हिजन’ आहे का त्यांना आपल्या चालिरिती, त्यामधील विज्ञान, अथर्वशीर्षादी स्तोत्रे यातच गुरफटून जायचे आहे हा प्रश्न मला तेव्हा तर पडलाच होता आणि आजही पडतो. भारत अनेक शतकांपर्यंत कर्मकांडाच्या जोखडात अडकून पडला होता आणि त्यामुळे आपले अपरिमित नुकसान झाले. पाश्चिमात्य जगतात आईनस्टाईन सापेक्षतावादाचा सिध्दांत मांडत होता आणि राईट बंधूंचे विमानाचे उड्डाण चालू होते त्या काळात महाराष्ट्रात शाहू महाराजांना वेदातील मंत्रांचा अधिकार आहे की त्यांच्यासाठी पुराणातील मंत्र म्हणावेत या क्षुल्लक विषयावर खल चालू होता. संघाकडे असलेल्या निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या फौजेचा वापर करून या जोखडांविरूध्द लढायला मदत होऊ शकते. पण तसे होताना दिसत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.तेव्हा संघाने सावरकरांचा विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक काळाला अनुरूप असा मार्ग आचरला तर ते चांगले होईल.नुसता भारतीय संस्कृतीचा उदोउदो करायचा आणि आपल्या समाजाच्या गळ्याभोवती फास बनून राहिलेल्या रूढीपरंपरांचे एका परिने समर्थन करायचे हे मला तरी अयोग्य वाटते.

दुसरे म्हणजे संघाचे स्वदेशीविषयक आणि बहुराष्ट्र कंपन्यांविरोधी धोरण हे अर्थशास्त्रातील सिध्दांतांच्या विरोधी आहे.भारत आज पाश्चिमात्य देशांपेक्षा गरीब आहे. पण याचा अर्थ पाश्चिमात्य देशांबरोबर भारताला फायदेशीर व्यापार करता येणार नाही हे म्हणणे चुकीचे आहे.समजा दोन देशांमधील एक देश सगळ्या गोष्टी दुसर्‍या देशापेक्षा स्वस्तात बनवू शकत असला तरीही त्यांच्यात दोघांनाही फायदेशीर व्यापार होऊ शकतो हे इंग्लिश अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डोने सप्रमाण सिध्द केले आहे.तसेच परकिय गुंतवणुकीपासून त्यांना फायदा होतो तसाच आपल्यालाही फायदा होतो.निर्यातीला प्रेरणा देणारी धोरणे राबविण्याऐवजी देशातच कमी प्रतीच्या वस्तू तयार करण्यावर (Import substitution) भर दिल्यामुळे अनेक वर्षे भारत आर्थिक प्रगती करू शकला नव्हता.त्याच धोरणांना चिकटून राहून घड्याळाचे काटे मागे नेण्यात आपले हित आहे का?

संघाविषयी माझी ही मते आहेत.जाणकार मिपाकरांनी त्यावर अधिक भाष्य केल्यास आभारी असेन.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

नितिन थत्ते's picture

29 Mar 2009 - 8:47 pm | नितिन थत्ते

क्लिंटनसाहेबांनी लिहिलेले जवळजवळ तंतोतंत माझेही मत आहे.
मी त्याहीपुढे जाऊन संघ हा मनुस्मृतीप्रणित समाजरचना (पुन्हा) अस्तित्वात यावी अशी सुप्त आकांक्षा बाळगणार्‍यांची संघटना आहे असे माझ मत आहे. त्यामुळे तिच्यातील लोक कितीही शिस्तप्रिय, प्रामाणिक वगैरे असले तरी त्यांना उत्तेजन द्यावे असे मला वाटत नाही.

आज ज्याला संघपरिवार म्हटले जाते त्यातील विविध संघटना इतक्या विचित्र प्रकारे एकमेकात गुंफलेल्या आहेत की त्यांनी चालवलेल्या आंदोलनांना संघाचा म्हटले तर पाठिंबा असतो आणि तो नाही असे म्हणून पुन्हा संघ आणि त्याच्या इतर शाखा नामानिराळ्या राहू शकतात. रामजन्मभूमीचे उदाहरण त्यासाठी बोलके आहे. ती विश्व हिंदू परिषदेची चळवळ आहे असे सांगून संघ आणि भाजप त्यापासून वेगळे होऊ शकले आणि मशीद पाडल्याने फार दु:ख झाले असे बाजपेयी आणि अडवाणी म्हणू शकले.

क्लिंटनसाहेबांचे २० व्या शतकातील उदाहरण तितकेसे चपखल नाही. कारण तसल्या प्रकारचे लोक हे पाश्चात्य देशात आजही आहेतच. त्यांच्या आग्रहावरून अमेरिकेत डार्विनच्या सिद्धांताबरोबरच 'इंटेलि़जंट डिझाईन्'चा सिद्धांतही शिकवला जातो. हां तेव्हा समाजरचना आइनस्टाईन व्हायला अनुकूल नव्हती हे खरेच.

स्वदेशी, इंपोर्ट सब्स्टिट्यूशन हे वेगळेच विषय आहेत. परंतु त्यातली सांस्कृतिक छटा मात्र निषेधार्हच आहे. म्हणजे बर्गर खाणे प्रकृतीला वाईट हे म्हणणे वेगळे आणि तो पाश्चात्य संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून त्याला विरोध करणे वेगळे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

उनाड's picture

29 Mar 2009 - 9:39 pm | उनाड

मी त्याहीपुढे जाऊन संघ हा मनुस्मृतीप्रणित समाजरचना (पुन्हा) अस्तित्वात यावी अशी सुप्त आकांक्षा बाळगणार्‍यांची संघटना आहे.
आणी म्हणून साठ वर्षे प्रयत्न करूनही दलित समाजाला सन्घ आपलासा वाटत नाही.
राम जन्मभुमीचा विषय काढून समाजाला शेकडो वर्षे मागे नेण्याचे कार्य ही त्यान्चेच.

विनायक पाचलग's picture

29 Mar 2009 - 9:54 pm | विनायक पाचलग

इतके योग्य आणि विचारपुर्वक प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासुन आभार

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

जागल्या's picture

7 Apr 2009 - 8:52 pm | जागल्या

दलित समाजाला सन्घ आपलासा वाटत नाही.

उनाड भाऊ,
एकदा संघाच्या शाखेवर जा
तेथे बघा किती दलीत आहेत
मगच बोला

जागल्या

कुमार भिडे's picture

31 Mar 2009 - 12:17 am | कुमार भिडे

आजच्या कळात मनुस्म्रुति आणा आसे सगणारा मूर्ख असला पाहीजे

विसोबा खेचर's picture

31 Mar 2009 - 12:24 am | विसोबा खेचर

पण त्यावरुन मी एवढ्याच निष्कर्शाप्रत येवुन पोहोचलो की संघ ही एक शिस्तप्रीय ,विशिष्ट तत्वांशी बांधली गेलेली एक संस्था आहे.

सहमत आहे. क्लिंटनचा प्रतिसाद आवडला...

तात्या.

शशिधर केळकर's picture

31 Mar 2009 - 12:25 am | शशिधर केळकर

संघविषयक साहित्य आजच्या घडीला प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. सर्वसाधारणपणे सर्वच वस्तूंबद्दल सकारात्मक आणि विरोधी मतप्रवाह असायचेच. जितकी मोठी जुनी आणि प्रभावाचे क्षेत्र विशाल असणारी संस्था तितके तिच्याबद्दल उलट सुलट मतप्रवाह जास्त असायचे.

कोणाच्या मताचा आपण किती स्वीकार करावा हे आपण आपले ठरवावे. नाहीतर, संघाचे काम चांगले की वाईट, उपयोगी की घातक, संघ जातीय आहे अथवा नाही, संघ संपला की अजून नाही हे आणि असे अनेक प्रश्न कौल टाकूनही सोडवता येऊ शकतात. त्यातून काय साधेल? तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल का?

तुमच्या मनात जर तुम्ही लिहिलेल्या विषयावर स्पष्ट मत असेल, तर ते मांडणे अधिक चांगले व्हावे. मला विचाराल, तर मटा, लोकसत्ता वगैरे समाजवादी विचारसरणीच्या वृत्तपत्रांची संघाविषयी ठराविक मांडणी आहे. ती तशी त्यांची विचारधारा आणि शैली आहे. वरील प्रतिसादांमधेही हाच विचारप्रवाह दिसतो. या पेक्षा अगदी भिन्न विचार असणारे कोट्यवधी लोक आहेत. तेव्हा या पद्धतीच्या धाग्यातून काही चर्चा न होता काहीच साधणार नाही.

तुम्हाला खरेच इच्छा असेल, तर खूप वाचन करून, प्रत्यक्ष काम पाहून आपले आपण मत बनवा!

संघप्रेमी शशिधर

सुनील's picture

31 Mar 2009 - 12:52 am | सुनील

क्लिंटन यांचा प्रतिसाद आवडला.

उज्ज्वल भूतकाळ असलेला परंतु सद्यपरिस्थितीत पिचत पडलेला जो समाज असतो, त्याला चेतवण्यासाठी त्याला त्याच्या भूतकाळाची आठवण करून देणे इष्ट असले तरी, तेवढे पुरेसे नाही. किंबहुना त्यातून एक पोकळ अभिमानच जागवला जातो.

त्यामुळे, त्याच्या रम्य भूतकाळाची आठवण करून देतानाच त्याच्या सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून देणेही तितकेच गरजेचे असते. त्यातूनच त्याच्यात उज्ज्वल भविष्यकाळ घडवण्याची जिद्द निर्माण होऊ शकते.

आठवण होते ती, लॉर्ड बायरनच्या एका कवितेची.

The isles of Greece! the isles of Greece!
Where burning Sappho loved and sung,
Where grew the arts of war and peace,---
Where Delos rose and Phoebus sprung!
Eternal summer gilds them yet,
But all, except their sun, is set.

शेवटची ओळ पहा कशी डिवचणारी आहे!

असो, हा संघाचा केवळ एक पैलू झाला. संघ याहुनही फार विशाल आहे. त्याचे अनेकानेक पैलू समोर आले तर उत्तम.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिरोटा's picture

31 Mar 2009 - 10:17 am | चिरोटा

संघ एका विशिष्ट विचारसरणी ने बान्धला गेला असला तरी त्यान्चे सामाजिक कार्य उल्लेखनिय होते.लातुर,किल्लारी ,भुज भुकम्प वगैरे सन्कटे आल्यावर सन्घ कार्यकर्त्यान्चे कामात झोकुन देणे कौतुकास्पद होते. इतरही सामाजिक कार्य्-आदिवासी शिक्षण्,शाळा चालवणे,वाजवी दरात शालेय साहित्य उपलब्ध करुन देणे,नविन पिढीला भारतिय सन्स्क्रुतीची ओळख करुन देणे ह्यात ते आघाडीवर असत.चान्गली डिग्री असताना,नोकरी असताना दुर्गम भागात जावुन गरिब विद्यार्थ्याना मोफत शिकवणारे सन्घ कार्यकर्ते असत. आता सगळाच समाज आत्मकेन्द्रित झाल्याने कदाचित अश्या कार्यकर्त्यान्ची सन्ख्या रोडावली असावी.
भेन्डि.

क्लिंटन's picture

31 Mar 2009 - 11:01 am | क्लिंटन

माझ्या प्रतिसादावर अनुकूल प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे.

गझनीच्या महंमदाबरोबर अल-बेरूनी नावाचा एक इतिहासकार आला होता.त्याने म्हटले आहे की भारतीय लोकांना वाटते की आपलीच संस्कृती तेवढी श्रेष्ठ आणि जग कुठे चालले आहे याकडे त्यांचे लक्ष नसते.गेल्या हजार वर्षात त्यात खूप फरक पडला आहे असे वाटत नाही.नव्या विचारांचे स्वागत न करता आम्ही तेवढे शहाणे असे म्हणत आपण आपल्या खोलीचे दरवाजे बंद करून घेतले तर दरम्यानच्या काळात जग पुढे निघून जातेच पण आपल्या खोलीतही वातावरण कधी कुजायला लागते हे समजत नाही.पाणी साचून त्याचे डबके झाले की त्यात मलेरियाचे डास होणारच.

भारतातील सामान्य लोकांच्या राहणीमानात गौतम बुध्दाच्या काळापासून इंग्रज येण्यापूर्वीच्या काळात खूप जास्त फरक पडला नव्हता.बारा बलुतेदारी पध्दत कायमच होती.इतकेच नव्हे तर बलुतेदार वापरत असलेली हत्यारे, शेतकरी वापरत असलेले नांगर यात दोन-अडीच हजार वर्षात फारसा फरक पडला नव्हता.अशा वातावरणात जातीव्यवस्था,सती,बालविवाह,हुंडा यासारख्या प्रथा समाजात कधी आणि कशा रूजल्या हे कोणालाच कळले नाही.अनेक लोक अशा प्रथांचे खापर परकिय आक्रमणांवर फोडतात. ते काही अंशी बरोबर आहे पण १००% बरोबर नाही असे मला वाटते.एक उदाहरण द्यायचे झाले तर संत ज्ञानेश्वरांचा जन्म १२७५ मधला.ते ७-८ वर्षाचे असताना आपला समाज संन्याशाच्या मुलांच्या मुंजी कराव्या की करू नयेत या चर्चेत मश्गूल होता.त्यावेळी महाराष्ट्रावर तरी एकही परकिय आक्रमण झालेले नव्हते.पहिले आक्रमण अल्लाद्दिन खिलजीचे त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे १२९३ चे. याउलट त्यावेळी महाराष्ट्रात श्रीमंती आणि ऐश्वर्य अपरंपार होते.तरीही असल्या चर्चा आपला समाज करतच होता.

भारतात इंग्रज येण्यापूर्वीच्या काळात आपला समाज विविध रूढीपरंपरांनी गांजलेला होता.इंग्रजांचे राज्य भारतात सर्वप्रथम बंगालमध्ये स्थापन झाले. त्यानंतरच्या काळात आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय पासून केशवचंद्र सेन,ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यापर्यंत समाज सुधारकांची मोठी फौज बंगालमध्ये झाली.महाराष्ट्रातील इंग्रज आल्यानंतरच्या काळातील पहिले समाज सुधारक महात्मा फुले.राजा राममोहन रॉय फुल्यांच्या आधीचे.इंग्रज विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.तसेच भगवद्गीता आणि भारतीय संस्कृतीचाही त्यांचा अभ्यास होता.त्यांच्या सारख्या समाज सुधारकांनी बंद झालेले दार उघडले आणि पाश्चिमात्य विचारातीलही चांगले ते घेतले आणि काही वर्षातच बंगाल प्रांत सर्व क्षेत्रात भारतात अग्रेसर झाला.बंगालमध्ये इंग्रज राज्य सर्वप्रथम स्थापन होणे आणि त्यानंतर काही वर्षातच तो प्रांत भारतात अग्रेसर बनणे हा केवळ योगायोग आहे असे मला वाटत नाही.बंगालमध्ये लोकांनी आपल्या प्रतिभेचा वापर केलाच आणि त्याच बरोबर नव्या पाश्चिमात्य विचारांचे स्वागत केले याचा तो परिणाम आहे.यात मी इंग्रज राज्याची भलामण करत आहे असे कृपा करून समजू नका.इंग्रज राज्याचे भारतावर इतर दुष्परिणाम नक्कीच झाले.पण वस्तुनिष्ठ अभ्यास करताना जे आहे ते मान्य करण्यास काहीच अडचण नसावी.काही अंशी असाच चांगला बदल महाराष्ट्रात झाला.पण इतर प्रांत (ओरीसा वगैरे) या बदलापासून दूर राहिले आणि दुर्दैवाने बंगाल-महाराष्ट्रात जे घडले ते तिथे घडले नाही.

भारतीय संस्कृतीत भगवद्गीतेसारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत.त्यातील बहुतांश गोष्टी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत.त्यातल्या सध्याच्या काळास लागू होत असलेल्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात.त्याचबरोबर इतर समाजातून चांगल्या गोष्टी घ्याव्यात आणि आपल्या भविष्यकाळासाठी त्याचा वापर करावा ही अपेक्षा.पण केवळ भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आणि पाश्चिमात्य संस्कृतीत सर्वकाही त्याज्य आहे अशा स्वरूपाची आत्मकेंद्री भावना घातक ठरेल.सध्याच्या पाश्चिमात्य जगतात केवळ स्वैराचार आहे असे नाही तर एम्.आय.टी, प्रिन्सटन सारखी जगप्रसिध्द विद्यापीठे आहेत आणि त्यात अनेक ऋषितुल्य प्राध्यापक संशोधन करतात याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणे योग्य नाही.भारतीय संस्कृतीतही जसा राम आहे तसा रावणही आहेच.तेव्हा सर्व चांगल्या गोष्टींची ठेकेदारी भारतीय संस्कृतीची (आणि तीही हजारो वर्षापूर्वीची) आणि सर्व वाईट गोष्टी इतरांच्या अशी आत्मवंचना करत आपणच आपली कॉलर ताठ करणे योग्य नाही असे मला वाटते. संघ परिवारातील मंडळींकडे बघून ते नेमके हेच करत आहेत असे वाटते.

सध्याच्या जिहादी दहशतवादाच्या काळात हिंदू समाजाचे संघटन करणे ही काळाची गरज आहे आणि संघ ते करत आहे आणि ती चांगली गोष्ट आहे.पण त्याचबरोबर आपली दारे बंद करून जी चूक आपल्या पूर्वजांनी केली तीच चूक संघासारख्या संघटनेने करू नये ही अपेक्षा.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Mar 2009 - 11:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्लिंटन यांचा प्रतिसाद (पुन्हा एकदा) फारच पटला आणि आवडला.

कार्यालयात अनेक बंगाली लोकं असल्यामुळे अनेक बंगाली समवयस्क, त्यांचे आई-वडील, क्वचित आजी-आजोबा यांच्याशी संपर्क येतो आणि पहिले जाणवतं ते बंगाल्यांमधे जात-पात मानणं आपल्यापेक्षा खूपच कमी आहे. अनेक (मराठी) मित्र-मैत्रिणींच्या घरी गेल्यावर त्यांचे आजी-आजोबा नाव विचारायचे. लगेच पुढचा प्रश्न असायचा, "आडनाव काय?" आडून आडून (कधी सरळच) 'तुझी जात, पोटजात, गोत्र काय?' हेच प्रश्न असायचे.

टोनी ब्लेयर हा माजी ब्रिटीश पंतप्रधान किती चांगला वाईट हा स्वतंत्र मुद्दा ठरेल. पण सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून निवडणूकांना सामोरं जात असताना तो भाषणं करायचा आणि त्यात एक प्रमुख मुद्दा होता, "Don't be complacent " (आधीच्या विजयात आणि कामांमधे आत्मसंतुष्ट राहू नका).
आज आपल्याला हेच शिकण्याची गरज आहे. जसं पदवीला प्रवेश मिळाला की दहावी-बारावीचे गुण विसरायचे असतात तसंच इतिहासातलं आपलं(?) कर्तृत्त्व मागे सोडून, नव्याने, नव्या कालखंडातली आव्हानं घ्यायला आपण तयार झालं पाहिजे.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

विसुनाना's picture

31 Mar 2009 - 11:43 am | विसुनाना

संघाने सावरकरांचा विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक काळाला अनुरूप असा मार्ग आचरला तर ते चांगले होईल.नुसता भारतीय संस्कृतीचा उदोउदो करायचा आणि आपल्या समाजाच्या गळ्याभोवती फास बनून राहिलेल्या रूढीपरंपरांचे एका परिने समर्थन करायचे हे मला तरी अयोग्य वाटते.

नव्या विचारांचे स्वागत न करता आम्ही तेवढे शहाणे असे म्हणत आपण आपल्या खोलीचे दरवाजे बंद करून घेतले तर दरम्यानच्या काळात जग पुढे निघून जातेच पण आपल्या खोलीतही वातावरण कधी कुजायला लागते हे समजत नाही.

क्लिंटन यांच्या प्रतिसादातील वरील विधानांशी पूर्णपणे सहमत आहे.
संघाला सावरकर हिंदुत्त्ववादी म्हणून हवेसे असले तरी समाज सुधारक म्हणून नको होते आणि नको असतील.
सर्वसमावेशकता हा संघाचा गुणधर्म आणि 'संघटनेसाठी संघटन' (जसे 'कलेसाठी कला') इतकाच हेतू. त्यामुळे कर्मठ मठाधिपतींपासून ते आयएएस अधिकार्‍यांपर्यंत सर्वांची एकत्र मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
यामुळेच संघाला कोणत्याच बाबतीत निर्णायक भूमिका घेता येत नाही.

दुर्दैवाने आज मात्र संघाचा उपयोग नवे लोक वैयक्तिक फायद्यासाठी करतात, भाजपामार्गे राजकारणात पडण्यासाठी पहिली पायरी म्हणून करतात.
५०+ वर्षे वयाच्या संघ स्वयंसेवकांमध्ये जी समर्पणाची भावना होती ती आता नव्या पिढीत दिसत नाही. (अर्थात ती तशी आता कोणत्यात संघटनेत दिसत नाही.)
त्यामुळे येत्या दशकानंतर 'रास्व संघ' बराच विस्कळित आणि विसविशित झालेला दिसला तर आश्चर्य वाटायला नको. (जसे 'राष्ट्रसेवादल' या संघटनेचे नावही आता चुकूनच ऐकायला मिळते.)

रेझर रेमॉन's picture

2 Apr 2009 - 9:37 pm | रेझर रेमॉन

संघ आणि त्याच्या गणवेशा बाबत लहानपणी खूप कुतुहल वाटायचे. त्यांची शिस्त, शाखा, प्रार्थना, बौद्धिके आणि कवायती आम्ही बाहेरून पहायचो. आमचे काही मित्र पहाटे शाखेत जाऊन केलेल्या कसरती आणि खेळ यांचे वर्णन करायचे. पहाटे कधी रेझर आणि त्याच्या कंपूतल्या कुणाचा बाप ही उठत नसल्याने आपण जाणे शक्यच नव्हते. त्यात मुलांना घरी येऊन आमंत्रण देणारे काका आमचे घर नेमके वगळून पुढे गेले! का न कळे! (पुढे याचे कारण आमचा 'दुर्वास' बाप हे कळले.) नंतर जिथे आपला प्रवेश नाही त्यांना नांवे ठेवा या न्यायाने आम्ही त्यांना हसू लागलो, नांवे ठेऊ लागलो. 'दुर्वास' अखंड मानवतावादी, त्यामुळे पुढे ते संस्कार रूजले. मग चर्चा, विचार आणि मंथनातला बेगडी फोलपणा ही लक्षात यायला लागला. यावर आम्ही, "चोर कसा पकडावा?" ही पुस्तिका ही डीपीत बसून 'छापली' आणि चर्वली! हा ही आमच्या सारखा एक कंपूच... हे लक्षात आले. शेवटी कोणत्या ही विचार सरणीचा एक विशिष्ठ काल असतो, त्या वेळी ती योग्य वाटते. बहुतेक संघटना आपली विचारसरणी कालातीत आहे असे समजतात आणि केविलवाणे पणे तिला धरून रहाण्याचा प्रयत्न करतात. कालानुसार बदलती विचारसरणी हिंदू महासभेला ही शक्य झाली नाहीच. संघाच्या मुंबईतल्या शाखांतील उपस्थिति जशी घटू लागली तशी किलकिली दारे उघडली ही गेली, पण सताड कधीच नाही. कार्य जेव्हा संघटना जोशात असते तेव्हा चांगलेच होत असते. पण जसे उपयुक्तता संपल्यावर बदलावे किंवा बंद व्हावे ते कोणती ही संघटना सहसा करू शकत नाही. तेच संघाचे झालेय. अनेक तल्लख व्यक्तिमत्वे आज ही काम करताहेत, पण बल रोडावते आहे हे ही खरें.
एनी वेज, क्लिंटन छानच लिहिलंय. अदितीचा प्रतिसाद आवडला.
किपिटप चिको!
रेझर

"सरदारांचे राज्य संपल्यावर सरदार बनून फिरणारा डॉन क्विक्झोट होतो."

जागल्या's picture

7 Apr 2009 - 8:55 pm | जागल्या

प्रिय पाचलग
मी स्वयंसेवक आहे.
आपण विचाराना चालना दिलीत हे बरे झाले
आभार

जागल्या

विकास's picture

8 Apr 2009 - 5:03 am | विकास

माझ्या अनुभवावरून थोडीफार असलेली माहीती येथे देत आहे. यात संघ बरोबर्,चूक हे दाखवण्याचा हेतू नाही. मात्र नक्की संघ म्हणजे काय हे मला जे काही थोडेफार समजले आहे त्यावरून सांगत आहे इतकेचः

मला एकदा कोणीतरी म्हणाले की, "संघासारख्या संस्थेची स्वतंत्र भारतास गरज लागावी हे दुर्दैवच आहे. वास्तवीक संघाचे अंतिम उद्दीष्ट हे संघाची गरज देशाला न भासणे असेच आहे." अर्थात तसे उद्दीष्ट लेखी त्यांच्या घटनेत लिहीले आहे असे या व्यक्तीस म्हणायचे होते असा याचा अर्थ नसावा आणि तसा मी काढला देखील नाही. मात्र दर वेळेस कोणाचे तरी बाहेरून आक्रमण येते आणि आपल्याला हैराण करते. आपल्यातील फुटीचा वापर करून अतिंमतः आपल्यावरच राज्य करते... असे एक नाही दोन नाही शेकडोच काय पण हजाराहून जास्त वर्षे भारताच्या बाबतीत होत आले होते. "संभवामी युगेयुगे" म्हणत कोणी देव मदतीला धावणार नसून, "संघशक्ती कलीयुगे" - अर्थात संघटीत रहाणे हीच खरी कलीयुगातील शक्ती आहे.

डॉ. हेडगेवारांची रा.स्व.संघ चालू करण्यामागची भुमिका ही या अर्थाने संघटन करणे ही होती. म्हणूनच त्यांनी चालू केलेल्या संघटनेचे नाव हे "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" असे आहे. त्यात धर्म कुठेच नाही. किंबहूना गोनिदांच्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे, शिवाजीवरून देखील त्यांना काही नावे सुचवण्यात आली होती. पण त्यातील कुठलीच न ठेवता केवळ "हम करे राष्ट्र आराधना" असे कृतीत आणणारे नाव देण्यात आले.

मग पुढचा प्रश्न येतो तो त्यांच्या "हिंदू" पणाचा. त्याला कारण कुणाला पटोत अथवा न पटोत पण देशाच्या हाडामासाशी हिंदू संस्कृती खिळलेली आहे. ती संस्कृती अशी आहे जी कालपरत्वे जो पर्यंत बदलत होती, तो पर्यंत त्यातून भारताला वैभवप्राप्त होत होते. पण जेंव्हा त्यात स्थितीस्थापकत्व आले तेंव्हापासून समाजाचा र्‍हास होत गेला आणि परकीय आक्रमणे येऊ लागली. कुठल्याही देशाची/भूभागाची म्हणून जी संस्कृती असते ती तो देश जपण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर ग्रीस, इटली, इजिप्त अगदी चीन हे आज देखील गतवैभवाच्या गप्पा आणि इतिहास सांगत बसले नसते. तसा भारतात झाला म्हणून काही बिघडत नाही. ह्या अर्थे हिंदू संघटन केले. ते करत असताना सहा उत्सव पण असे निवडले ज्याचा कुठल्याच देवधर्माशी संबंध नाही - पाडवा, हिंदू साम्राज्य दिवस (शिवराज्याभिषेक), गुरू पौर्णिमा, राखी पौर्णिमा, दसरा आणि मकर संक्रात.

जातपात संघात कधी बघितली जात नाही. ज्यांना असे वाटते त्यांनी स्वतःला तसा अनुभव आला असल्यास येथे अवश्य सांगावा. महात्मा गांधी जेंव्हा एकदा डॉ. हेडगेवारांच्या आमंत्रणावरून शाखेत गेले होते तेंव्हा त्यांनी येथे अस्पृश्य कोठे आहेत असा प्रश्न विचारला होता. त्यावेळेस त्यांना हेच उत्तर मिळाले की आम्ही कुणाला जात विचारत नाही अथवा सांगत नाही. (गंमत म्हणजे संघाचे कडवट टिकाकार लोकसत्ता, अगदी सरसंघचालक मोहन भागवतांबद्दल लिहीत असताना त्यांची जात काय हे लिहीतात - आजही, आणि मग संघाला जातीय म्हणतात!)

बरं संघाचे ध्येय तरी काय ठेवले - तर हिंदू संघटन आणि कार्यकर्ता निर्माण. १९२५ च्या दसर्‍यापासून ते आजतागायत संघाने केवळ शाखा चालवल्या असे म्हणता येईल. पण त्यातून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. तसेच त्यातून विविध संस्थांचे जाळेपण तयार झाले. कन्याकुमारीला विवेकानंद केंद्र हे केवळ जनसामान्यांच्या (सरकारच्या नाही) पैशाने उभे करण्याचा प्रकल्प राबवणारे एकनाथजी रानडे हे असेच तयार झाले तसेच एकदाचा सावरकर चित्रपट प्रदर्शित केल्यावर, "आता मी मरायला मोकळा झालो" असे म्हणणारे सुधीर फडके पण त्यातूनच निर्माण झाले. तसेच भारतीय मजदूर संघ तयार करणारे आणि एक दूरदृष्टी असलेले नेतॄत्व (ज्यांना चीन सरकारने चीनमधे तसेच जी-८ च्या बैठकीस पण बोलवले) ते दत्तोपंत ठेंगडी देखील संघाचेच.

संघाना सावरकरांचे हिंदूत्व भावले पण सावरकरांचे सामाजीक जवळ करता आले नाहीत असे ज्यांना वाटते त्यांनी सावरकरांचे हिंदूत्व वाचावे. मग कळेल की या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. संघाने कदाचीत त्यांचा विज्ञानवाद जवळ केला नसेल कारण संघाचा विश्वास हा क्रांती पेक्षा उत्क्रांतीवर अधीक आहे. अर्थात त्यामुळे जनतेला हळू हळू बदलावे असे त्यांचे मत आहे असे वाटते.

अर्थात मी जे काही सांगतो आहे ते संघटने बद्दल जे काही जवळून आणि त्रयस्थ अशा दोन्ही नजरेने पाहू शकलो त्यावरून. मग "पब्लीक" मध्ये जे संघविरोधक असतात त्यांची अशी मते का आहेत? मला वाटते त्याचे एक कारण प्रसार माध्यमे आहेत, दुसरे त्यांचे वैचारीक विरोधक कम्युनिस्ट आणि आत्ताचे (बर्‍याचदा सुडो)सेक्युलर्स आहेत आणि अर्थातच संघाची प्रसिद्धीपासून दूर राहत "सायलेंट वर्क" करायची जी काही टोकाची भूमिका होती ते आहे. "सायलेंट वर्क"चा अर्थ "सिक्रेट वर्क" असा घेतला गेला.

प्रसार माध्यमांनी, राजकीय आणि सामाजीक विरोधकांनी सातत्यांने गांधीहत्येचा ढाली सारखा उपयोग करत संघावर वार केले. जे लोक गांधींहत्येसाठी संघाला जबाबदार धरत आलेत त्यांनी आजतागायत गांधीहत्येनंतर झालेल्या भिषण दंगलीत जे निरपराध मेलेत, जी घरदारे रस्त्यावर आली, जे मालमत्तेचे नुकसान झाले आणि ज्याला राजकीय नेतृत्वाने अबोल रहात पाठींबा दिला, त्याबद्दल अवाक्षर काढलेले पाहीलेले नाही. तीच अवस्था संघाच्या केरळातील कार्यकर्त्यांना भोगावी लागली आहे आणि इतरत्र विशेष करून इशान्येकडील राज्यात.... मात्र त्या संबंधात बोलले जात नाही आणि संघ नावाचा बागुलबुवा उभा केला गेला.

आज गंमत अशी आहे की ८३ वर्षे झाली तरी संघटना अजूनही जोरात आहे. आणि हो वर एका प्रतिसादात उल्लेख आलेला असला तरी याची देही याची डोळा मी तरूण रक्ताला पण संघात पूर्णपणे निस्पृहपणे काम करताना पाहायला मिळाले आहे. त्यामुळे, "आता सगळाच समाज आत्मकेन्द्रित झाल्याने कदाचित अश्या कार्यकर्त्यान्ची सन्ख्या रोडावली असावी." हे वाक्य संघाला जसेच्या तसे लागू होत नाही असे वाटते.

बर्‍याचदा आपण वृत्तपत्रात वाचून मते बनवतो. तसेच काही वेळेस अनेक पिढ्यांपुर्वीच्या गोष्टींचा तौलनीक अभ्यास करण्याऐवजी त्यांना त्या काळाच्या ऐवजी या काळातील गोष्टींशी तोलतो. हे म्हणायचे कारण परत इतकेच की संघाला संस्कृती प्रिय आहे याचा अर्थ अधुनिकीकरणाशी जुळतनाही असा नक्कीच नाही. दत्तोपंत ठेंगडी जेंव्हा स्वदेशी निमित्ताने रालोआच्या अथवा त्या आधी राव सरकारच्या विरोधात होते तेंव्हा त्यांचे म्हणणे, "मॉडर्नायझेशन व्हर्सेस वेस्टर्नायझेशन" संदर्भातच होते. आपली १ अब्ज लोकांची अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ ही आपल्या उद्योगांनी काबीज करायला हवे असे त्यांचे म्हणणे होते. अर्थात त्यांना वेड्यात काढणारे महाभाग होते. पण आज भारत हा सॉफ्टवेअर मधे पुढे पण भारतातील सॉफ्टवेअरचा धंदा अमेरिकन कंपन्यांनी कसा घेतला आणि आता अमेरिकेतील प्रॉजेक्टस रद्द होत असल्याने काय होत आहे हा एक लेखाचा मुद्दा आहे. तशा अर्थी येथे मी एक लेख एका सॉफ्टवेअरच्या मासीकात वाचला देखील होता (हाऊ इंडीयन्स मिस्ड द बस...).

बाकी हे काही मी संघाचा प्रचार करायला लिहीत नाही आहे. तरी देखील एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत अनुभवातून जर संघ म्हणजे त्या व्यक्तीचे वागणे वाटून संघात दोष दिसत असतील तर त्याचा अर्थ संघ आहे असे समजणे बरोबर वाटत नाही. किंबहूना तसे कुठल्याच विचारधारेच्या संघटने संबंधी कोणीच वागू नये असे वाटते. मात्र गेल्या ८३ जाउंदेत पण अगदी स्वातंत्र्यापासून ते आत्तापर्यंत इतर विचारधारांच्या अशा किती संघटना सातत्याने समाजात काम करत आहेत, वृद्धींगत झाल्या आहेत आणि किती प्रतिक्रीयाधारीत राजकारण हेच ध्येय मानत आहेत, हे समजून घेण्यास संशोधनाची गरज नाही. मात्र अशा प्रतिक्रीयाधारीत राजकारणात संघ बसत नाही असे वाटते. म्हणूनच संघावर टिका करत बसण्याऐवजी जसे हवे तसे, वाटते त्या विचारधारेचा आधार घेऊन आपण समाजाला परत काही देतो का, याचा विचार करायला हवा इतकेच म्हणावेसे वाटते.

विनायक पाचलग's picture

14 Apr 2009 - 9:48 pm | विनायक पाचलग

इतका योग्य आणि विचारपुर्वक प्रतिसाद दिल्याबद्द्ल आभार
क्लिंटन यांचा प्रतिसादही आवडला
फक्त काही मुद्यावर काही प्रमाणात मतमतांतरे आहेत पण ती चालायचीच.
आभार

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

अभिज्ञ's picture

18 Apr 2009 - 6:51 pm | अभिज्ञ

=D> =D> =D> =D>
विकासराव ह्यांच्या प्रतिसादाशी पुर्णपणे सहमत.

अभिज्ञ.

नितिन थत्ते's picture

18 Apr 2009 - 7:27 pm | नितिन थत्ते

मात्र अशा प्रतिक्रीयाधारीत राजकारणात संघ बसत नाही असे वाटते.
हे मत राजकारणाच्या संदर्भात सत्य असेलही कारण संघाने आपला अधिकृत चेहरा राजकारणापासून मुक्त ठेवला आहे. पण संघाची समाजकारणातील कार्ये ही प्रतिक्रियाधारितच आहेत. ऊदाहरणार्थ आदिवासी भागात चालवलेले कार्य (आश्रमशाळा वगैरे) हे ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या कार्यास प्रतिक्रिया म्हणून्च आहे. अर्थात हे आवश्यक स्वरूपाचेच काम आहे.

परंतु स्वदेशीच्या नावाखाली जे प्रचारकी अर्थकारण जात आहे ते पाश्चात्य वस्तूंच्या प्रसाराला प्रतिक्रिया म्हणून केले जात आहे आणि ते अनावश्यक आणि अयोग्य आहे. यास अर्थातच देशी उद्योजक आपल्या फायद्यासाठी खतपाणी घालत आहेत. (की त्यांच्याच प्रेरणेने हे चालू आहे?)
खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

19 Apr 2009 - 4:33 pm | विकास

>>>मात्र अशा प्रतिक्रीयाधारीत राजकारणात संघ बसत नाही असे वाटते.

तसेच काहीसे मला म्हणायचे आहे. एक ऐकीव आहे, पण उदाहरण म्हणून सांगतो: भारतीय मजदूर संघाच्या स्थापनेच्या सुमारास, त्या संस्थेचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी ह्यांनी त्यासंदर्भात घेतलेल्या एका सभेत प्रश्न विचारला की येथे कम्युनिस्टांना घालवायला हवे म्हणून कोण कोण आले आहेत? (त्यावेळेस कामगार संघटना म्हणजे काही अपवाद वगळ्यास कम्युनिस्टांच्याच ताब्यात होती). काही जणांनी हात वर केले. दत्तोपंत म्हणाले की तुम्ही जाऊ शकता कारण या संस्थेचे उद्दीष्ट हे कुणाला घालवायचे नसून आपण काम करून कामगार प्रश्न सोडवायचे इतकेच आहे. या शतकाअखेर पर्यंत कम्युनिझम या जगातून जायला लागणार आहे, पण तो त्यांच्या कर्मामुळे. आपण त्यात "प्रतिक्रीयात्मक (निगेटीव्ह या अर्थाने)" शक्ती खर्च करण्याचे कारण नाही. (आज बीएमएस ही भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे)

वरील उदाहरणावरून मला काय म्हणायचे असेल ते समजेल. यात दत्तोपंत बरोबर चूक, बीएमएस चांगली का सीटू हा प्रश्न नाही. तर काम कसे चालू करावे आणि पुढे न्यावे हा आहे. त्यांना जे भरीव करायचे असेल ते त्यांनी केले इतरांना नावे ठेवत न बसता... तसेच जर सर्व वागले तर वेगवेगळे विचार आले म्हणून देशाचे आणि समाजाचे काहीच वाईट होणार नाही. असे कुठेसे वाटते.

>>> परंतु स्वदेशीच्या नावाखाली जे प्रचारकी अर्थकारण जात आहे ते पाश्चात्य वस्तूंच्या प्रसाराला प्रतिक्रिया म्हणून केले जात आहे आणि ते अनावश्यक आणि अयोग्य आहे.

हा एक वेगळा विषय आहे आणि यावर वेगळी चर्चा करूया. मात्र 2005 मध्ये मी स्वदेशी जागरण मंचच्या गुरूमुर्तींची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी काय म्हणले आहे ते अवश्य वाचा.

नितिन थत्ते's picture

19 Apr 2009 - 5:02 pm | नितिन थत्ते

>>>मात्र अशा प्रतिक्रीयाधारीत राजकारणात संघ बसत नाही असे वाटते.

हे माझे वाक्य नाही तुमच्याच आधीच्या प्रतिसादातील वाक्य आहे. त्यावर प्रतिवाद करायचा म्हणून ते उधृत केले होते पण ते वेगळे दर्शवायला विसरलो. बाकी गुरुमूर्तींची मुलाखत वाचतो.

खराटा
(रंग माझा वेगळा)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2009 - 9:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आम्ही काही विरोधक नाही. पण ती एक जातीय संघटना आहे याचे काही विश्लेषण करण्याची गरज राहिलेली नाही, नसावी. प्रत्येकाचे संघटन असते तेव्हा हिंदूचे संघटन झाले तर बिघडले कुठे असे एक त्याचे उत्तर असते. रावसाहेब कसब्यांनी 'झोत' मधे मस्त उदाहरण दिले आहे, ते मला पटते. (तेही विचारधन पृ.क्र. ३१२ वरील गोष्ट ) नियमितपणे शाखेवर जाणे, नियमित 'तोच' विचार सांगणे, आणि शेवटी तो विचार खोलवर बिंबवल्यानंतर त्याला आपल्या स्वभावाचा एक पैलू , आयुष्याचा एक भाग बनवायचा..!

एक श्रीमंत माणूस रोज आपल्या बागेत जाऊन शीतल छायेत बसत असे. एके दिवशी त्या बागेत एक मोर आला आणि आपला रम्य पिसारा पसरुन एका झाडावर बसला. मालकाच्या मनात लगेच विचार आला, 'हा मोर रोज यावेळी या बागेत येऊन बसला तर किती छान होईल ! ' एका खाद्यपदार्थात थोडी अफू मिसळून त्या तो त्या मोरापूढे टाकला. मोराने तो खाऊन टाकला. त्याला जरा तरतरी आली. त्या मादक पदार्थाच्या ओढीने तो मोर दुसर्‍या दिवशीही तिथे आला आणि त्या मालकानेही पून्हा एकदा आदल्या दिवसाप्रमाणे अफूचा आणखी एक डोस त्याला दिला हळूहळू त्या मोराला या गोष्टीची एवढी सवय जडली की मालकाने अफू द्यायचे बंद केले तरीही तो ठरल्या वेळी बागेतील झाडावर हजर होई''

सारांश ; धार्मिक गोष्टींचा, सांस्कृतिक अहंकाराचा अफूसारखा उपयोग करुन लोकशाही विरोधी समाजवादविरोधी संघटना उभी करण्यात संघाला यश मिळत गेले हे मला पटते. कधीतरी विद्यार्थीपरिषदेच्या निमित्ताने चर्चा केल्या,काही कामही केले. शाखेतील शिबिरांना उपस्थित राहिलो. एकदा तरुणांसमोर (तरुण म्हणून ) बोलण्याची संधीही मिळाली आहे. पण आता स्वयंसेवक संघाकडे त्याच्या विचारांकडे पाहिले की इतर काही संघटनाप्रमाणेच तीही वाटते, वेगळे असे काही नाही.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

17 Apr 2009 - 3:17 pm | विकास

>>>पण ती एक जातीय संघटना आहे याचे काही विश्लेषण करण्याची गरज राहिलेली नाही, नसावी.

गरज का नसावी? अनुभव सांगा, अगदी रावसाहेब कसब्यांनी त्यांचा सांगितला असेल तर त्यांचा सांगा. पण तसा नसेल तर किमान प्राध्यापकांनी तरी संदर्भ न देता असे म्हणू नये असे वाटते :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2009 - 6:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'हिंदूचे संघटन' हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय आहे. हिंदू म्हणून ज्या-ज्या जाती त्यात येतात त्यांची ती संघटना ! कधी-कधी त्याला पुरोगामी टच देऊन, हे असे काही नाही असे सांगण्याचा अनेकदा प्रयत्न होतांना दिसतो. हा आता काही संदर्भ नाहीत त्यामुळे जराशी गोची आहे खरी...पण पूढे कधी संदर्भ मिळाल्यावर इथे नक्की टाकीन. ( चर्चा जातीयतेकडे जाईल या भितीने संदर्भ शोधण्याच्या बाबतीतही तितका इंट्रेष्ट सध्या तरी नाही. ) एक ढोबळ मतप्रवाह असा असाही आहे, असे समजावे. तो पर्यंत ते प्राध्यापकाचे मत आहे,असे समजू नये ! धन्यवाद ! :)

-दिलीप बिरुटे

विकास's picture

19 Apr 2009 - 5:27 pm | विकास

>>>हा आता काही संदर्भ नाहीत त्यामुळे जराशी गोची आहे खरी...

त्याला एक म्हण आहे: आडात नाहीतर पोहर्‍यात कुठून येणार? ;)

हा दोष तुमचा नाही, तर वाट्टेल ते करून स्वतःची राजकीय आणि सामाजीक पोळी भाजण्यासाठी संघावर काहीही टिका करणार्‍यांचा आहे. तसेच तो कधी कधी संघातील एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तीक वागण्याचापण असू शकतो. जसे, उ.दा. म्हणून अमेरिकेत जर मी एखाद्या अभारतीय गोर्‍या कळपात असलो तर मी जे काही वागतो, तसेच सर्व भारतीय आहेत असे समजले जाते तसेच काहीसे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2009 - 7:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आडात नाहीतर पोहर्‍यात कुठून येणार?
आडात खूप आहे, पोहर्‍यात फार थोडे येते. :)
सरसंघचालक देवरस यांची मुलाखत रावसाहेब कसब्यांच्या 'झोत' मधे आहे१ त्यात त्यांना एक प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता.

प्रश्न : संघाने आपले दरवाजे सर्वांसाठी उघडले आहेत, अशी घोषणा आपण मुंबईत असताना केली होती ते खरे ना ?
उत्तर : नाही. ती एक वेगळीच गोष्ट होती. संघाने आपले दरवाजे सर्वांसाठी उघडले आहेत असे नाही. उघडण्यासंबधी विचार चालला आहे. दरवाजे उघडले आहेत अशी गोष्ट नाही.

प्रश्न: असा विचार सुरु होण्याचे कारण काय ?
उत्तर: हा प्रश्न गोळवलकर गुरुजींच्या जीवनकाळातच निर्माण झाला होता. त्यांनाही नाना प्रश्न विचारले जात असत. हिंदूव्यतिरिक्त इतरांबद्दल संघाचे विचार काय आहेत, संघ काय करणार आहे, असे लोक विचारीत.

गोळवळकर गुरुजी म्हणत, इतर जे बांधव आहेत त्यांनी राष्ट्रीय जीवनात समरस विचार करायला पाहिजे. त्यांना आणि आम्हाला दोघांनाही यासंबधी विचार करावा लागेल. त्याबाबत त्यांचे मत असे होते की घर नीटनेटके केले पाहिजे. त्यानंतर योग्य वेळी ह्या गोष्टींचा विचार करता येईल. वातावरण असा विचार करायला अनुकूल आहे तर इतर धर्मीयांना संघात प्रवेशदेण्याचा सर्व पैलूंचा विचारकरु. ( पुढे संघातील स्वयंसेवकाशी चर्चा करुन निर्णय घेऊ असा या प्रश्नाच्या उत्तराचा समारोप होतो)

वरील प्रश्नोत्तराच्या निमित्ताने आपल्या लक्षात येईल की, इतर धर्मियांच्या बाबतीत संघाला आपली भुमिका ठरवता आली नाही. त्यांना इतर हवे आहेत, पण आपल्या मूळ विचाराला काही धक्का लागेल. ज्यांच्यासाठी ही संघटना बांधली जात आहे, असे कट्टर लोक यातून बाहेर पडतील अशीही भीती त्यात असावी. इतर धर्मीयांना संघात प्रवेशाच्या पैलूंचा विचार असाच रखडर राहिलाय असे वाटते. आपला हिंदू समाज संघटीत करायचा म्हणजे, आपल्यात जे-जे येतात त्यांचे संघटन करायचे, हे विसरता येत नाही.

संदर्भ : १) झोत : प्रा रावसाहेब कसबे (पृ.क्र.१३० ) [परिशिष्ट :३ मधील सरसंघचालक देवरस यांचे काही विचार ]

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास's picture

20 Apr 2009 - 10:02 am | विकास

आपला मुद्दा हा संघ जातीय आहे का या संदर्भात चालला होता. (आपले वाक्यः पण ती एक जातीय संघटना आहे याचे काही विश्लेषण करण्याची गरज राहिलेली नाही, नसावी.)

माझे उत्तर होते मला संघ जातीय असल्याचा अनुभव नाही, कुणाला असला (अगदी वाचलेला पण) तर तो सांगावा. माझ्या मूळ प्रतिसादात पाहीले तर समजेल की वाचन, निरीक्षण, अनुभव आणि आकलन शक्तीप्रमाणे संघाने हिंदूसंघटन हे ठेवले आहे पण त्यात जात अथवा जातीयता आणलेली नाही. (>>>मग पुढचा प्रश्न येतो तो त्यांच्या "हिंदू" पणाचा. त्याला कारण कुणाला पटोत अथवा न पटोत पण देशाच्या हाडामासाशी हिंदू संस्कृती खिळलेली आहे. ती संस्कृती अशी आहे जी कालपरत्वे जो पर्यंत बदलत होती, तो पर्यंत त्यातून भारताला वैभवप्राप्त होत होते.)

संघाचा "एकात्मता मंत्र" पाहीला तर लक्षात येईल की त्यात संघाने स्वतःचा संबंध हा भारतात तयार झालेल्या सर्व विचारधारांशी लावला आहे.

>>>इतर धर्मीयांना संघात प्रवेशाच्या पैलूंचा विचार असाच रखडर राहिलाय असे वाटते.

बापरे ! माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य आले की नागपूर, दिल्ली, मुंबई, चेन्नई वगैरे ठिकाणि संघकार्यालयाच्या बाहेर इतर धर्मीय रांगा लावून उभे आहेत की कसेही करा आणि आम्हाला संघात घ्या म्हणून! ;) अहो इतर धर्मियांना तसे वाटायची गरज नाही आणि तसे वाटले नाही म्हणून काही बिघडते असे ही नाही. जो पर्यंत धर्म कुठलाही असोत अथवा नसोत सर्वजण आपल्या निष्ठा सर्वप्रथम देशासाठी ठेवतात आणि मग देशांतर्गत अथवा देशाबाहेरील धर्ममार्तंडाना केवळ वैयक्तीक श्रद्धा म्हणून मानतात तो पर्यंत काहीच बिघडणार नाही.

माझ्या तुटपुंज्या माहीतीप्रमाणे संघ आणि इतर धर्मियांच्यातील काही धार्मिक पुढारी यांच्यात संवाद चालू असतो आणि आहे.

>>>आपला हिंदू समाज संघटीत करायचा म्हणजे, आपल्यात जे-जे येतात त्यांचे संघटन करायचे, हे विसरता येत नाही.

सर्वप्रथम संघाचे काम हे हिंदू संघटन जसे आहे तसेच कार्यकर्ता निर्माणपण आहे. एखादी संस्था ८०+ वर्षे नुसती चालत नाही तर वाढते, त्याला काय कारण आहे ह्याचा विचार करायला हवा. संघ आणि कम्युनिस्ट ह्या अशा दोन संघटना/विचारधारा आहेत ज्यात येणारे उगाच टाईमपास म्हणून जाता जाता आले असे होवू शकत नाही (अर्थात नियमाला अपवाद असेलच!).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2009 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऐंशी वर्षात थोर कार्यकर्त्यांनी देशासाठी कोण-कोणते त्यागकेले, विषयांतर होत आहे पण प्रतिसादासाठी (दोनचार दिवस कामाचा व्याप असल्यामुळे )जागा राखून ठेवतो !

-दिलीप बिरुटे

यन्ना _रास्कला's picture

20 Apr 2009 - 10:59 am | यन्ना _रास्कला

संघ जातियवादि नाही प्रल्हाद चेंदवनकरांनी टाच नावाच्या त्यान्च्या स्वतावरच्या पुस्तकात अस लिहिलेले आहे. ते चाम्भार असुनपन त्याना कधी शाखेमधे वेगळि वागनुक दिली गेली नाय.