प्रतिसादाच्या निमित्ताने....

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
1 Jul 2023 - 4:21 pm
गाभा: 

खरडफळ्यावर एक प्रतिक्रीया आली आहे की मार्गी या मिपाकराने सायकलयात्रा या विषयावर दहा भागांची मालीका लिहीली.
त्यातल्या काही भागांवर अल्प तर काहीम्वर काहीच प्रतिक्रीया मिळाल्या नाहीत. हे असे का झाले असेल?
यावरून एक विचारमंथन करावेसे वाटते.
मिपावर बरेच लिखाण प्रसिद्ध होते.
काही लेखांना वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिलतो तर काहीना अगदीच अल्प मिळतो
काही लेख/ कविता इतके लोकप्रिय होतात की त्यावर विडंबनपर इतर लिखाणही येते.
वस्तुतः लेखाची क्वालिटी आणि प्रतिसादांची संख्या यांचे कसलेही नाते नसते.
एखादा लेख तुमच्या सामाजीत किंवा राजकीय मताप्रदर्शनाची मागणी करणारा असेल तर त्यावर उलटसुलट प्रतिसाद येणे अपेक्षीतच आहे. याचा अर्थ असा नाही की ते लिखाण साहित्यीक मूल्य मांडणारे असेल.
त्याच प्रमाणे एखादी कथा काही भागांत प्रकाशित झाली असेल तर वाचक थेट कथेच्या अंतीएम भागावरच त्याला मत मांडायला वाव असेल तर प्रतिसाद देतो.
मिपावर फार छान / खूप मस्त अशा प्रतिसादांमुळे तसेही फारसे विचारमंथन होत नाहीच.
मग प्रश्न पडतो की लेखनाला आलेला प्रतिसाद महत्वाचा का मांनायचा ?
प्रतिसाद ही लेखकाला वाचकाने थेट दिलेली पावती असते हे आहेच . त्यामुळे लेखकाचा लिहायचा उत्साह दुणावतो.
पण विरोधी प्रतिसाद आला की तो उत्साह मावळतो हे देखील तितकेच खरे.
काही वेळा प्रतिसाद म्हणजे "तु माझी पाठ खाजव, मी तुझी .." असेही असते.
काही लेखक स्वतःच्या लेखनावर आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद देत प्रतिसदांची सम्ख्या वाढवतात.
पण मूळ प्रश्न आहे की प्रतिसाद आणि लेखनाचा दर्जा यांचा संबंध असतो का?

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

1 Jul 2023 - 5:37 pm | अनन्त्_यात्री

(१) काही वेळा प्रतिसाद म्हणजे "तू माझी पाठ खाजव, मी तुझी .." असेही असते.

(२) काही लेखक स्वतःच्या लेखनावर आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद देत प्रतिसादांची संख्या वाढवतात

श्रीगणेशा's picture

1 Jul 2023 - 6:48 pm | श्रीगणेशा

चांगला विषय.

मिपावर फार छान / खूप मस्त अशा प्रतिसादांमुळे तसेही फारसे विचारमंथन होत नाहीच.

अगदी खरं!

प्रतिसादातून विचारमंथन, देवाण घेवाण, संवाद झाला पाहिजे. फक्त मिपाच नाही, पण वैयक्तिक भासणाऱ्या व्हॉट्सॲपवरही सध्या हेच चित्र आहे. त्यामागे, लिहिण्याचा कंटाळा, व्यक्त होण्यास बुजणं, अशी इतरही कारणं असावीत.

मिपावर कायम असणाऱ्या समस्येपैकी हि एक. पंधरा वर्षांपूर्वी वाचनमात्र होतो त्यावेळी हि तीव्र असणाऱ्या समस्येपैकी एक होती. काही सदस्यांनी एकमेकांना अरे तुरे करून विशेष सलगी दाखविणे, “झकास! हेच लिहायला आलो होतो” अशी मधाळ पुस्ती काही ठराविक लोकांच्या धाग्यावरच डकवणं वगैरे गोष्टी उठून दिसतील इतक्या प्रमाणात होत्या.

आत्ता देखील हि समस्या परत डोकं वर काढते कि काय अशी शंका येतीय.

राजकीय धाग्यांवर मात्र “माणूस हा टोळी (पक्षी ट्रोल) करून राहणारा प्राणी आहे” याचा जो अनुभव येतो त्याचं काही विशेष वाटत नाही. सध्या एका ठराविक विचारसरणीची चलती आहे त्यामुळे ते साहजिकच आहे.

बाकी नाउमेद न होता “अच्छे करम कर और दर्यामें डाल” या भावनेने लिहिते राहावे.

काही लेखक स्वतःच्या लेखनावर आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद देत प्रतिसदांची सम्ख्या वाढवतात.
हा मुद्दा मी कोणी तरी मिपावर नवीन लिखाण सुरु केले तेव्हा मांडला होता. प्रत्येकाला वैयक्तीक प्रतिसाद देण्यामुळे प्रतिसादांची संख्या वाढत जाते. मात्र त्यांना प्रत्येकाला वैयक्तीक प्रतिसाद देणे महत्वाचे वाटते. एखाद्या प्रतिसादकाने महत्त्वाचा मुद्दा मांडला असेल तर त्याला प्रतिसाद देणे समजू शकतो पण लेख आवडला एवढ्या एका ओळीसाठी एक वेगळा प्रतिसाद देणे आणी धाग्याची लांबी वाढविणे मला स्वत:ला तरी पटत नाही. लेख प्रकाशित झाल्यावर दिवस भरातून एकदा आढावा घेऊन एकाच प्रतिसादात सगळ्या प्रतिसादकांचा नामोल्लेख करुन त्यांना धन्यवाद / पोचपावती देणे योग्य वाटतो. अर्थात माझी मते तेव्हाही बरेच लोकांना पटली नव्हती आणि मुळातच मला आग्रही प्रतिपादन करण्याचा कंटाळा असल्यामुळे तो मुद्दा मागे पडला.
मिपावर येऊन १४ वर्ष झाली पण मला "पाठ खाजव समिती" चा सदस्य बनता आले नाही. अर्थात हे प्रमाण आता मिपावर कमी झाले आहे. पुर्वी एखाद्या विशिष्ट लेखकाप्रतिसाद/ प्रतिसाद आला की त्यावर त्वरीत प्रतिसाद यायचे. अर्थात याला केवळ पाठ खाजवणे म्हणता येणार नाही. बहुसंख्य मिपाकरांचा एकमेकांशी जुळलेला स्नेह, मिपाचा समान धागा पकडून स्थापन झालेले व्हाटसप ग्रुप, वैयक्तीक ओळखीचा ओलावा यामुळेही काही धाग्यांवर जास्त प्रतिसाद येतात.
प्रतिसाद द्यायला काही नियम लावणे अवघड आहे त्यामुळे उत्स्फुर्तेतेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खरडफळ्यावर एक प्रतिक्रीया आली आहे की मार्गी या मिपाकराने सायकलयात्रा या विषयावर दहा भागांची मालीका लिहीली.
याला एक वेगळी बाजू देखील आहे. मार्गींच्या सुरुवातीच्या लेखांना चांगले प्रतिसाद येत होते मात्र मार्गी ह्यांचे कार्य इतके प्रशंसनीय आहे की सतत प्रशंसा करण्याचा देखील माणसाला नैसर्गीक कंटाळा येतो मात्र त्याचऐवजी राजकारणासारख्या काड्या सारण्यास वाव असलेल्या लेखांना चांगले प्रतिसाद मिळतात कारण खाजवून मिळणारा आनंद क्षणिक पण अवर्णणीय असतो.
मात्र चांगले धागे प्रसवणार्‍यांना प्रोत्साहन देणे हे एक मिपाकर म्हणून आपले कर्तव्य आहे. इपित्तर इतिहासकार यांनी खरडफळ्यावर हा विषय घेतला आणि तुम्ही हा विषय इथे मांडल्याबद्द्ल धन्यवाद !

प्रकाश घाटपांडे's picture

1 Jul 2023 - 7:41 pm | प्रकाश घाटपांडे

प्रतिसाद द्यायला काही नियम लावणे अवघड आहे त्यामुळे उत्स्फुर्तेतेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बरोबर. शिवाय एका विशिष्ट मर्यादेनंतर तोच तोच पणा येतो. मोनोटोनस होत

चांदणे संदीप's picture

4 Jul 2023 - 1:38 pm | चांदणे संदीप

ह्यांचे कार्य इतके प्रशंसनीय आहे की सतत प्रशंसा करण्याचा देखील माणसाला नैसर्गीक कंटाळा येतो

असं बर्‍याचदा होतं.

सं - दी - प

१) वाचने किती झाली हा आकडाही उपयुक्त आहे.
२) आज माझ्या डायरीत लिहून ठेवलेले इतर काही लोकांना कायमचे वाचता येईल हा हेतू. प्रतिसाद आले नाहीत तरी चालेल. कुणीतरी वाचत असेलच.
३)एका धाग्यात "भटकंती लेख शोध २०१६" http://misalpav.com/node/37993
मध्ये सायकलींग धाग्यांचीही वर्गवारी दिली होती. म्हणजे अगदीच दुर्लक्ष नाही केले.

रंगीला रतन's picture

2 Jul 2023 - 12:01 am | रंगीला रतन

शेवटच्या ओळीत प्रश्न विचारलाय
पण मूळ प्रश्न आहे की प्रतिसाद आणि लेखनाचा दर्जा यांचा संबंध असतो का?
आणी ७व्या ओळीत तुम्हिच उत्तर दिलय
वस्तुतः लेखाची क्वालिटी आणि प्रतिसादांची संख्या यांचे कसलेही नाते नसते.
मजेशीर आहे धागा. चालु द्या :=)

कर्नलतपस्वी's picture

2 Jul 2023 - 11:51 am | कर्नलतपस्वी

प्रतिसाद लिहीला पण खुप मोठ्ठा झाला.
या विषयावर थोडेफार आगोदर लिहीले होते ते आज पूर्ण झाले.

वेगळा धागा टंकत आहे.ऑर्फीयस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2023 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

”कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन....” म्हणजे लेखन करीत राहा, प्रतिसादाची अपेक्षा धरु नको. असे असले तरी, कौतुक माणासाला आवड्तं. आणि अशा कौतुकाने माणसं अधिक लिहायला प्रवृत्त होतात. कधी-कधी अवांतर, प्रतिसादाने हिरमोडही होतो. आपण उत्सुकते नवा प्रतिसाद बघायला येतो आणि वेगळंच दळन आलेलं असतं पण असं हे चालायचंच. नवीन-नवीन होतो तेव्हा, आपल्या धाग्यावर प्रतिसाद किती आले, वाचनं किती झालीत ? हे बघायला रात्री अपरात्री उठून हे बघायचो. गेले ते दिवस.

तर,आपण केलेल्या लेखनावर वेळातवेळ काढून वाचक प्रतिसाद लिहितात, तेव्हा आपणही इतर लेखकांचं कौतुक केलं पाहिजे. पण, आता तसे कोणी करीत नसेल, तरी आपला काही त्यावर राग नसावा. आपण आपलं लिहितं राहावं. मला तर, इतक्या वर्षात असेही वाचक भेटले आहेत की ज्यांचा मिपावर आयडीही नाही, पण ते मिपावरचं लेखन वाचतात. आपण अशा वाचकांसाठीच लिहितो असे समजून लिहिते राहीलं पाहिजे.

एवढं बोलून दोन शब्द संपवतो.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

2 Jul 2023 - 12:18 pm | कंजूस

दोन शब्द पटले.

कपिलमुनी's picture

2 Jul 2023 - 12:44 pm | कपिलमुनी

मी बऱ्याच लेखांना प्रतिसाद देतो.
मार्गी यांच्या लेखनाला सुरुवातीला प्रतिसाद दिले होते

माझे स्पष्ट मत ते अत्यंत रटाळ लिहायचे. कोणतीही शैली नाही , लोकांचे , स्थळाचे , संस्कृती चे वर्णन नाही.

मग निगेटिव्ह काही लिहिण्या पेक्षा न लिहिलेले बरे यामुळे प्रतिसाद टाळले

चांदणे संदीप's picture

4 Jul 2023 - 1:41 pm | चांदणे संदीप

मग निगेटिव्ह काही लिहिण्या पेक्षा न लिहिलेले बरे यामुळे प्रतिसाद टाळले

हे ही खरेच आहे.

सं - दी - प

साहना's picture

3 Jul 2023 - 12:48 am | साहना

राजकारण, पोकळ धर्म, पोकळ इतिहास असल्या विषयावर प्रचंड धुराळा उडतो पण अभ्यासपूर्ण किंवा ललित लेखनाला कुणी विचारत नाही. म्हणूनच मी माझे चर्चात्मक लिखाण मिपा वर पण इतर लेखन विविध इतर माध्यमावर टाकते.

ह्यांत तसे पाहता चुकीचे काहीच नाही. विविध लेखन वाचून खूप आवडले तरी "छान लिहिले आहे" असे सोडून आणखीन काय प्रतिक्रिया लिहिणार ?

मुक्त विहारि's picture

3 Jul 2023 - 6:50 pm | मुक्त विहारि

लेख लिहायचा आणि मोकळे व्हायचे...

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, वादे वादे जायते संवादः, असे होत असेल तरच, स्वलेखावर योग्य त्या व्यक्तीला प्रतिसाद द्यायचा...

स्वांतसुखाय लिहिणारा लेखक एखादाच असावा,आपले लेखन इतरांनी वाचावे, त्याला भरभरून प्रतिसाद मिळावेत ही तर जवळपास प्रत्येक लेखकाची सुप्त वा उघड अभिलाषा असते, नपेक्षा ते डायरीत लिहून स्वतःजवळच ठेवते ना, तेव्हा ताकाला जाऊन भांडे कशाला लपवावे. त्यातही चांगले लिहिले तर लोक प्रतिसाद देणारच, मात्र नुसतेच भारंभार लेख टाकून दुसऱ्यांच्या लेखांवर प्रतिसाद न देणाऱ्या लेखकाला शेवटी उपेक्षेचे धनी व्हावे लागणारच.

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 7:28 pm | सुबोध खरे

सत्य वचन

परंतु आपले लेखन इतरांनी वाचावे हे बरोबर

परंतु त्याला भरभरून प्रतिसाद मिळावेत असे मला फारसे वाटत नाही.

कदाचित मी जास्त स्पष्टपणे लिहितो किंवा वैद्यकीय विषय असतात त्याला इतर व्यावसायिक प्रतिसाद काय किंवा कसा द्यायचा म्हणून देत नाहीत यामुळे असेल किंवा लोकांना माझे लेखन आवडत नसेल यामुळे फारसे प्रतिसादही येत नाहीत.

पण मुळात त्याबद्दल माझी अपॆक्षाही नाही.

काही गोष्टी सामाजिक प्रबोधन किंवा चर्चा करून लोकजागृती अशा कारणासाठी मी लिहितो.

प्रतिसाद आला नाही म्हणजे लोक वाचत नाहीत हे सत्य नव्हे

कारण माझे लेख वाचलेले अनेक लोक मला ते आवडले असे सांगतात सुद्धा ( तसे सांगितल्यावर मला आंनद ही होतोच)

आणि ज्यांना आवडले नाहीत ते सांगत नसावेत.

तेंव्हा आपण लिहीत जावे, प्रतिसाद आला तर उत्तम, नाही आला तरी उत्तम

ते तर आहेच, लिहिते तर राहावेच.

प्रतिसादांची संख्या आणि लेखनाचा दर्जा यांच्या संबंधाची तुलना कदाचित कुणी कलावंत्/लेखक/गायक/अभिनेता/अभिनेत्री यांच्या कलेचा दर्जा आणि त्यांना मिळणारी कमी-अधिक प्रसिद्धी यांचेशी करता येईल असे वाटते. अनेक उतमोत्तम कलावंत 'गुमनाम है कोई - बदनाम है कोई - किस को खबर कौन है वो - अंजान है कोई' असे जीवन व्यतीत करतात तर कधीकधी फारशी लायकी नसलेली मंडळीपण प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान झालेली दिसतात.
-- कोणत्याही विषयावर माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, सकस लेखन करायचे म्हणजे लेखकाला आपल्या दैनंदिन कामांमधून मुद्दाम भरपूर वेळ काढावा लागतो. ते लेखन प्रसिद्ध करण्यातून आपले विचार वाचकांपर्यंत पोहोचावेत, त्यातून त्यांना निखळ - कलात्मक आनंद लाभावा, माहिती मिळावी, विचारांना दिशा/चालना मिळावी, विवेकाची-चांगुलपणाची वृद्धी व्हावी, सामाजिक प्रबोधन, लोकजागृती व्हावी या प्रकारचे हेतु बहुतांश लेखकांचे असतात हे उत्तमच. अनुकूल प्रतिसाद मिळाले तर त्याला आपला हेतु साध्य होत असल्याची ग्वाही मिळून समाधान वाटते आणि उत्साह वृद्धिंगत होतो, तर प्रतिकूल प्रतिसादातून आत्मपरिक्षणाची संधी मिळते. त्यामुळे प्रतिसाद लाभावेत ही अपेक्षा गैरवाजवी नाही. मात्र प्रतिसाद येतील त्याप्रमाणे धागे खाली-वर होत असल्याने कमी प्रतिसाद मिळणारे धागे दोन-चार दिवसातच खाली जाऊन विस्मृतीत जातात. मिपावर अगदी रोज येणारे वाचक वगळता अन्य वाचकांना तर त्याबद्दल कळतही नाही, या जाणिवेतून काही लेखक 'धन्यवाद' वाले प्रतिसाद देऊन काही काळ का होईना, धागा वर राहून अधिकाधिक वाचकांच्या नजरेस येईल, वाचला जाईल असा प्रयत्न करतात, तेही मला फारसे वावगे वाटत नाही.
याखेरीज आपल्या वाचनात आलेले (किंवा स्वतःचे सुद्धा) जुने उतमोत्तम धागे अधून-मधून वर काढत रहावेत, हेही वाचकांच्या भल्याचेच.

आपण केलेल्या लेखनावर वेळातवेळ काढून वाचक प्रतिसाद लिहितात, तेव्हा आपणही इतर लेखकांचं कौतुक केलं पाहिजे. पण, आता तसे कोणी करीत नसेल, तरी आपला काही त्यावर राग नसावा. आपण आपलं लिहितं राहावं.

वरती बिरूटे सरांनी लिहीले आहे, त्याचेशी पूर्ण सहमत.

'वाचनसंख्या' बघून आपला लेख वाचला जात आहे हे समजते आणि त्यातून समाधान लाभते ही एक चांगलीच गोष्ट आहे.

हे करणारे फार कमी असतात. कशाला खटाटोप करायचा? थोड्याच पैशात नवी वस्तू मिळते.
परंतू जुनी वस्तू सुधारली तर कचरा कमी होतो.
उदाहरणार्थ डास मारायची रॅकेट अडीचशे रुपयांत नवी येते. पण अशा किती टाकणार? मोडलेली सुधारून वापरात राहाते. असे लेख /विडिओ युट्यूबवर बरेच आहेत. पण इथे लिहिले तर प्रतिसाद येणार नाहीत तरी लिहितो.

काय घेणे,ड्राइविंग शिकणे यातले विनोदी लेखन लोक आवडीने वाचतात आणि प्रतिसाद देतात. कारण त्यांनी याच चुका केलेल्या असतात.

एखादी कथा क्रमशः पद्धतीने येत असेल तर त्यावर वाचक थेट अंतीम भाग वाचल्यानंतर देतात. अधल्यामधल्या भागांवर प्रतिक्रीया देत नाहीत.
शिवाय ही एक कथा आहे यातेल घटनांवर काय प्रतीक्रीया द्यायची हा देखील संभ्रम असतो.

त्यामुळे प्रतिसाद येत नाहीत.
पण वाचनांची संख्या पाहून बरे वाटते

सौन्दर्य's picture

5 Jul 2023 - 11:14 pm | सौन्दर्य

नमस्कार,

माझ्या मते प्रतिसाद हा हवाच. लहान मूल चालायला शिकते तेव्हा आपण त्याला चालायला प्रोत्साहित करण्यासाठी टाळ्या वाजवतो, अगदी हाच प्रकार एखाद्या मोठ्या वक्त्याच्या भाषणाला टाळ्या वाजवून आपण त्याला, आपण त्याच्या विचारांशी सहमत आहोत, त्याने अंगिकारलेले कार्य चांगले आहे व त्याने ते तसेच चालू ठेवावे हे सुचवतो.

मी माझे लेखन पूर्वी फक्त माझ्या मित्रांना पाठवत असे व त्यावर, "छान, सुंदर, बरोबर आहे' अशा प्रकारचे प्रतिसाद यायचे पण चुकूनही कोणी लेखात सुधारणा सुचविल्या नाहीत की परखड परीक्षण केले. मग ठरवले की पूर्णपणे अनोळखी व्यक्तींना लिखाण पाठवायचे व त्यांचे प्रतिसाद आजमावायचे. त्यातूनच एका मित्राने मिपा सुचवले, जे आवडले व त्यावर लिहीत गेलो. काही लेखांना बरा प्रतिसाद मिळाला काही लेखांचे बारा वाजले. तरी देखील अधूनमधून लिहितो.

मिपावरचे काही लेखक खूपच चांगले लिहितात ते न चुकता वाचतो व त्यावर माझा प्रतिसाद देतो. राजकीय, धार्मिक लेख वाचतो पण त्यावर मत प्रदर्शन टाळतो कारण ते लेख इतके आग्रहपूर्ण लिहिलेले असतात की त्यावर विरोधी मत प्रदर्शित केलं की लेखकाला किंवा त्यांच्या सपोर्टर्सना ते आवडत नाही व उगाचच आपला 'उद्धार' होतो. धर्मावर किंवा राजकारणावर बोलणे म्हणजे उगाचच आपापसात वितुष्ट निर्माण करणे कारण त्याला निमित्त झालेली मंडळी पडद्यामागे एकत्रच असतात.

थोडक्यात लिखाणाला प्रतिसाद नक्की द्यावा न जाणो एखाद्या नवोदिताला त्याचा फायदा होऊन मराठी भाषेला एक चांगला लेखक लाभेल.

चित्रगुप्त's picture

6 Jul 2023 - 5:54 am | चित्रगुप्त

सौंदर्य यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे.

येडाफुफाटा's picture

14 Jul 2023 - 11:57 pm | येडाफुफाटा

जवळपास 8-9 वर्षांपूर्वी मी मिसळपाव वर एक मंत्रालयातील ब्रोकर/ liasioning करणाऱ्या एका मुख्य पात्र असलेली एक लेखमाला वाचली होती . कुणाला आठवत आहे का?

मनो's picture

15 Jul 2023 - 10:56 am | मनो

श्रावण मोडक
https://www.misalpav.com/user/640/authored

सतिश गावडे's picture

15 Jul 2023 - 6:17 pm | सतिश गावडे

लेख लिहिणाऱ्यास प्रतिसादाची अपेक्षा असतेच. म्हणून काही वर्षांपूर्वी जेव्हा मित्रमंडळीचे लेखन जोमात होते तेव्हा लेखन वाचले नाही तरी पान स्क्रोल करून लेखनाचा विषय काय असेल याचा अंदाज घेऊन विषयाला साजेसा एक दोन ओळींचा प्रतिसाद न चुकता देत असे.