प्रकाशयात्रा आठवणींची...

पी महेश००७'s picture
पी महेश००७ in जनातलं, मनातलं
15 Oct 2017 - 5:03 pm

ज्या धुरिणांनी नाशिकचा क्रीडालौकिक वाढवला, ती आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत. क्रीडा क्षेत्रातील अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतींना उजाळा देणारा ‘प्रकाशयात्रा आठवणींची’ हा उपक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सोमवारी, १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे होत आहे. त्यानिमित्त हा लेखप्रपंच. नाशिकसंदर्भातील काही आठवणी तुमच्याकडे असतील तर त्याही शेअर करा.

पी. महेश

नाशिकमध्ये ५० च्या दशकात कबड्डी, कुस्तीबरोबरच मल्लखांबही तितकाच लोकप्रिय होता. अगदी ८०-९० च्या दशकापर्यंत ही समृद्धी टिकून होती. स्वातंत्र्यदिनी जेव्हा शाळेत कार्यक्रम व्हायचे तेव्हा विद्यार्थ्यांचे पिरॅमिड म्हणजे मनोरे रचले जायचे. आता ते अजिबात पाहायला मिळत नाही. मल्लखांबावरील कसरती तर काही मिरवणुकांचे विशेष आकर्षण असायचे. नाशिकमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर किंवा बैलगाडीवरही मल्लखांब खेळायचे. ७०-८० च्या दशकात नाशिकमध्येच अशोकाच्या उंच झाडाच्या शेंड्याएवढ्या उंचीवर मल्लखांबाच्या कसरती होत होत्या. त्या वेळी तर आतासारख्या खाली सुरक्षा मॅटही अंथरलेल्या नसायच्या. आता डोंबाऱ्याचा खेळ जरी बघितला तरी तोंडात बोटे घालतो. अर्थात, त्या वेळी मल्लखांब खेळणारा किती आत्मविश्वासू आणि तयारीचा असेल याची प्रचीती येते. आज अशा जिवावर उदार होणाऱ्या कसरती कोणी मान्य करणार नाही.

मला चांगलं आठवतंय, ९० च्या दशकात आम्ही जेव्हा नाशिक जिमखान्यात बुद्धिबळ स्पर्धा खेळायचो, त्या वेळी एका स्पर्धेत मेहंदळे काकांनी सहभाग घेतला होता. त्या वेळीच त्यांचं वय ८० च्या घरात असेल. साठी बुद्धी नाठी, अशी एक म्हण आहे. पण मेहंदळेकाकांना ही म्हण अजिबात लागू होत नाही. त्या वेळी मी त्यांना खेळताना पाहून थक्कच झालो. कारण इतक्या चुरशीने एका दिग्गज खेळाडूला त्यांनी झुंजवले, की साधारण त्या वेळी ९० चालींपर्यंत त्यांनी ती लढत रंगली होती. शास्त्रशुद्ध चाली करणारा एकीकडे, तर नैसर्गिक बुद्धिमत्तेने झुंज देणारे मेहंदळेकाका दुसरीकडे.

नाशिकचा देदीप्यमान क्रीडा इतिहास असा देखणा आणि विस्मयकारक होता. हाच समृद्ध क्रीडा इतिहास खंगाळून काढताना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या हाती १०६ रत्ने लागली. ही क्रीडारत्ने आज हयात नाहीत. मात्र, त्यांच्या गौरवशाली आठवणींनी आजही नाशिक झळाळून निघते. खेळासाठी वेडात दौडलेल्या या १०६ वीरांच्या आठवणींचे दीप नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकात सोमवारी तेवत राहतील. ही आठवणींची प्रकाशयात्रा आहे. ही क्रीडा इतिहासाची समृद्ध पाने चाळताना ही क्रीडारत्ने नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील. निष्काम कर्मयोग्याप्रमाणे खेळात रममाण होणे काय असते, तल्लीन आणि लीन काय असते याचे धडे या क्रीडारत्नांकडून नव्या पिढीच्या खेळाडूंनी गिरवावे ही अपेक्षा.

नाशिकचा क्रीडासमृद्ध काळ असाही होता, की खेळाडूंमुळे खेळ ‘ग्लॅमरस’ होते. आतासारखी ‘चीअर्सगर्ल’ची कधी गरज पडली नाही. खेळाडूंना ‘भाव’ होता, पण तो पैशांनी नव्हे, तर गुणवत्तेने मोजला जायचा. ज्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या नाशिककरांनी या शहराला क्रीडासमृद्धी दिली, त्यांची आजच्या पिढीला धूसरशी ओळखही नाही, यासारखं दुर्दैव दुसरं नाही.

६०-७० च्या दशकातील क्रीडाप्रेमाची सर आजच्या क्रीडा क्षेत्राला तसुभरही येणार नाही. इडियट बॉक्स नसलेल्या जमान्यात एक क्रिकेटवेडा रेडिओवर मोठ्या आवाजात कॉमेंट्री ऐकायचा आणि दुकानाबाहेर एका फलकावर स्कोअरबोर्ड लिहायचा. आज गंमत वाटेल, पण आप्पा भवाळकर यांच्यासारखे दर्दी खेळाडू या नाशिकमध्ये होऊन गेले आहेत. वेस्ट इंडिजचा ५० च्या दशकातील आघाडीचा क्रिकेटपटू फ्रँक वॉरेलसारख्या दिग्गज खेळाडूची लीलया विकेट घेणारे राजा शेळके यांच्यासारखे क्रिकेटपटूही याच नाशिकमधील. आपल्या फिरकीने त्याने अनेक दिग्गज फलंदाजांची लय बिघडवली. ज्यांनी त्यांची फिरकी गोलंदाजी अनुभवली ते नाशिककर भाग्यवानच म्हणावे लागतील. नाशिकचा क्रिकेटलौकिक वाढविणारे आणखी एक नाव आहे, ते म्हणजे कसोटी सामने खेळलेले जिभाऊ जाधव याच भूमीतले.

शहरातला पहिला मुलींचा खो-खो संघ घडविणाऱ्या सुधाताई दाते किती जणांना माहीत आहेत? विशेष म्हणजे त्यांनी संघ घडविलाच नाही, तर भारतातील सर्वोत्तम खो-खो संघ म्हणून नाशिकला लौकिक मिळवून दिला. त्या काळात कोणतीही सुरक्षा साधने नव्हती. आजही नाहीत. म्हणूनच सूर मारला तर पुन्हा मैदानावर पाऊल ठेवायचं नाही, असं निक्षून सांगणाऱ्या सुधाताई दाते यांना मुलींच्या सुरक्षेची किती काळजी होती याचा प्रत्यय येतो. सुरक्षा साधनांशिवाय मुलींनी सूर मारल्यास भविष्यात मुलींना काय गंभीर समस्या होतात हे आजही पटवून सांगावे लागते. सुधाताई दाते यांनी ते फार पूर्वीच सांगितले होते.

केवळ राजकारणापुरती नाही, तर त्या पलीकडेही ओळख असलेले काही खेळाडू असेही आहेत ज्यांच्यावर नाशिककरांनी भरभरून प्रेम केलं. त्यापैकी तरुण ऐक्य मंडळाचे कबड्डीपटू डॉ. वसंतराव पवार, कबड्डीसह कुस्तीत पारंगत असलेले अॅड. उत्तमराव ढिकले, गुलालवाडी व्यायामशाळेचे कबड्डीपटू बंडोपंत जोशी, क्रिकेटपटू सुरगाण्याचे राजे धैर्यशीलराव पवार अशी किती तरी नावे आहेत ज्यांनी नाशिकचा क्रीडालौकिक वाढवला. ज्यांच्यामुळे क्रीडामानसशास्त्राची दखल जगाने घ्यावी असे भीष्मराज बाम यांनी नाशिकचा लौकिक सातासमुद्रापार नेला. असं म्हणतात, की व्हॉलीबॉलपटू बी. के. शिंत्रे, क्रिकेटपटू जिभाऊ जाधव यांच्यासारखे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी नाशिक सोडले असते तर त्यांचे जगभर नाव झाले असते.

अनेक नावे आता धूसर होत चालली आहेत. या धुरिणांच्या आठवणींशिवाय नाशिकचा भरजरी क्रीडा इतिहास पूर्ण होणार नाही. या कर्तृत्ववान नाशिककरांच्या रोमहर्षक आठवणी सतत तेवत ठेवण्यासाठी पणती जपून ठेवण्याची गरज आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे, कैलास पाटील, सचिन शिंदे यांच्यासह अनेक क्रीडा संघटक, खेळाडूंच्या सहकार्याने ही क्रीडाविश्वातील कीर्तिस्तंभ नाशिककरांसमोर येत आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष. यापूर्वी कला, साहित्य क्षेत्रातील धुरिणांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला होता. या उपक्रमाची संकल्पना अशी आहे, की या प्रत्येक दिवंगत खेळाडूच्या नावाने कुसुमाग्रज स्मारकात आकाशकंदील उभारण्यात येईल. या खेळाडूंच्या कुटुंबातील व्यक्तीने या आकाशकंदिलाजवळ एक पणती लावायची आणि खेळाडूंच्या आठवणींना उजाळा द्यायचा. यात कोणतेही भाषण नाही, कोणाचाही सत्कार नाही. ही केवळ आठवणींची प्रकाशयात्रा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे क्रीडाविश्वाशी दृढ नाते होते. गरुडासम भरारी घेणाऱ्या वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण संस्थेला कुसुमाग्रजांनीच नाव दिलं आहे. कुसुमाग्रजांच्या भूमीत या क्रीडाविभूतींचा गौरव अशा नावीन्यपूर्ण उपक्रमाने व्हावा ही नाशिकसाठी भूषणावह बाब आहे. हा युगायुगांचा प्रवास असाच सुरू राहील. फक्त प्रकाश पेरणारे यात्रेकरू बदलतील...

यांच्या आठवणींना मिळणार उजाळा...

क्रिकेट ः मदन पेंढारकर, सुनील काळे, ऋषिकेश देशपांडे, अविनाश आघारकर, व्ही. पी. बागूल, रवी बागूल, नारायण कोष्टी, वसंत पुणतांबेकर, विजय भोर, राजा शेळके, जिभाऊ जाधव, विलास सातपुते, डॉ. व्ही. एस. पुराणिक, त्र्यंबक वामन शिरुपाल, डॉ. प्रदीप पाटील, रामभाऊ करवल, फिलिक्स, दिनू जोशी, कमरुद्दीन शेख, मस्ताक शेख, सुनील वराडे, चंद्रशेखर शिंदे, विजय तिडके, बाळ दाणी, चंदू गडकरी, कमलाकर (भाई) वडके, धैर्यशीलराव पवार, मधूकाका चुंबळे, अशोक जैन ऊर्फ बंबूशेठ, अशोक कुमार पाटील, दादासाहेब कट्यारे, यार्दी सर, सुधाकर भालेकर, महाडिक, सुरेशचंद्र नाडकर्णी, नंदू गायधनी, अरुण चांदेकर, शशिकांत तिवेरी.

कुस्ती ः पंडितराव बोरस्ते, पिंटू तांबोळी, मोहनप्यारे सेनभक्त, वामनराव चंद्रात्रे, उत्तमराव ढिकले, उत्तमराव चव्हाण, वसंतराव वावरे, छगनराव वावरे, पंडितराव गिते, अशोक वाबळे, प्रकाश भडकमकर, अशोक देव, रवींद्र होते, गणपतराव उदयप्रभू, वसंतराव उदयप्रभू, विठ्ठल सेनभक्त, दत्तात्रेय अष्टपुत्रे.

सायकलिंग ः जसपालसिंग बिर्दी.

कार रेस ः दादासाहेब वाघचौरे, होशी पटेल, दत्तोपंत देशपांडे, विजय देशपांडे, प्रदीप म्हसकर/ अंजली म्हसकर, दादासाहेब वडनगरे.

व्हॉलीबॉल ः बी. के. शिंत्रे, दिवाकर गायकवाड, रऊफ सय्यद, बाळासाहेब देवरे, गणेश अष्टपुत्रे.

खो-खो ः प्रभाकर आटवणे, दिलीप वाडेकर, सुधाताई दाते, य. ह. मोहाडकर.

अॅथलेटिक्स ः बाबा बोकील.

कबड्डी ः चंद्रशेख शिऊरकर, दत्तात्रेय रामचंद्र भट, दशरथ कोकाटे, संपत गोळे, महमत पटेल, दामोदर शुक्ल, बंडोपंत जोशी, गणपतराव कोठुळे, वसंतराव पवार, श्रीकृष्ण कुलकर्णी.

योगदान ः भीष्मराज बाम, कृ. बा. महाबळ, राम मास्तर कुलकर्णी, दत्ता पुणतांबेकर, बापूसाहेब सुकेणकर, प्रभाकर लोणारी, आप्पा भवाळकर, बाबूराव दीक्षित, पंडितराव खैरे, सदूभाऊ भोरे, अरुण गाडगीळ, मु. शं. औरंगाबादकर, डॉ. वि. म. गोगटे, वीरकर.

टेबल टेनिस ः प्रकाशबाबा सैंदाणकर.

बॅडमिंटन ः नारायण जाधव, डॉ. पाटणकर, सुनील नाईक.

बुद्धिबळ ः गोपाळ दामोदर मेहंदळे.

(हा लेखप्रपंच मी मटा आणि माझ्या ब्लॉगवरही प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे वाचनावृत्ती झाली असेल तर ते साहजिक आहे.)

क्रीडाप्रकटन