गाभा:
आपल्याही घरी, शेजारी किंवा नात्यागोत्यात कोणाचातरी 'निकाल' लागलाच असेल. अपेक्षेप्रमाने काही जणांनी पेढे वाटले असतील , काही जणांना अपेक्षेपेक्षा जरा कमी गुण आले असतील.
निकालाच्या निमित्ताने मी देखील १७ वर्ष पूर्वीच्या आठवणीत हरवलो. गणितात नापास झालो होतो मी.
धाग्याचा उद्देश हाच की इथल्या सदस्यांनी देखील त्यांचे १० वीचे खरे मार्क सांगावेत. त्याच सोबत आज ते व्यवसायिक आयुष्यात कुठपर्यंत पोहोचलेत हे ही सांगावे.
इतरांचे निकाल पाहताना बर्याच चर्चा केल्या असतील आता जरा स्वतःच्या निकालाची चर्चा सुद्धा होऊ दे की.
प्रतिक्रिया
15 Jun 2017 - 4:08 pm | अभ्या..
अडोतीस.
हितंच हाव.
15 Jun 2017 - 4:44 pm | गॅरी ट्रुमन
का हो जुन्या जखमा ओल्या करताय? आषाढी-कार्तिकी करत कसाबसा काठावर पास झालो होतो दहावी. खरे तर दहावी कसा पास झालो याचे अजूनपर्यंत आश्चर्य वाटत आहे मला.
10 Jun 2019 - 9:23 am | महासंग्राम
उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या
फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या
येऊ कशा निघोनी पाऊल अडखळे
विरहात वेचिताना घटना सुखातल्या
उठता तरंग देही हळुवार भावनांचे
स्मरतात त्या अजुनी भेटी वनातल्या
हासोनिया खुणावी ती रात रंगलेली
तू मोजिल्यास होत्या तारा नभातल्या
गायिका : शोभा गुर्टू
गाणं खाली लिंक मध्ये
जखम
15 Jun 2017 - 4:47 pm | मुक्त विहारि
आता ६ महिने शेती आणि ६ महिने मिपा-मिपा.
15 Jun 2017 - 4:53 pm | कऊ
86.20% आणि आता second year ला आहे... शिकतेय अजून
15 Jun 2017 - 5:37 pm | मोदक
बीजगणिताच्या पेपरला ७५ पैकी ३० मार्कांचे (क आणि ड गट) आणि भुमितीला असेच १५ / २० मार्कांचे प्रश्न सोडले होते. संस्कृतने तारले आणि कसेबसे ७०% मिळाले. (मराठी मिडीयम)
सध्या माहिती विश्लेशक आहे. ;)
15 Jun 2017 - 5:40 pm | वरुण मोहिते
त्यामुळे १० वि अजूनपर्यंत पास नाही झालो .
15 Jun 2017 - 6:34 pm | अमोल काम्बले
आम्ही चक्क नापास झालोत. कसेबसे बि.ए. करुन आत्ता ब्यन्के काम करतो.
15 Jun 2017 - 6:52 pm | अमर विश्वास
दहावीला ८८% (मराठी माध्यम)
सध्या Customer Account Executive आहे
15 Jun 2017 - 7:10 pm | माम्लेदारचा पन्खा
अर्थातच त्यामुळे काही फरक पडला नाही . . . . !
15 Jun 2017 - 7:55 pm | सप्तरंगी
सगळेच काही मार्कांवर अवलंबून नाहीच पण आजकाल मुलांना १००% कसे पडतात हे कळेल का? भाषा विषयात पण पैकीच्या पैकी? हे काहीच्या काही वाटते.
15 Jun 2017 - 8:37 pm | सूड
आमच्या वेळी भाषा विषयात ८० म्हणजे लई झालं!!
15 Jun 2017 - 8:16 pm | गामा पैलवान
दहावी अस्मादिक ठीकठाक गुण मिळवून पास झाले. हुशार म्हणून शाळेत ख्याती असली तरी परीक्षेत (लोकांच्या) अपेक्षेहून कमीच गुण पडले. मात्र दयानंद बांदोडकर उपाख्य ठाणा कॉलेज येथे विज्ञान शाखेत देणगीशिवाय प्रवेश मिळाला. दहावीनंतर शैक्षणिक कारकीर्द बहरली.
बारावीला जीवशास्त्रात दांडी उडायची शक्यता उत्पन्न झाली होती. तेव्हा कसून अभ्यास करून वनस्पतीशास्त्रात (=बॉटनीत) चाळीसपैकी पस्तीसेक मिळवले. प्राणीशास्त्राचा पेपर फक्त जोड्या जुळवा, गाळलेल्या जागा भरा आणि बेडकाच्या मेंदूची पानभर (फुलस्केप) आकृती काढून सोडून दिला होता.
-गा.पै.
15 Jun 2017 - 8:29 pm | मुक्त विहारि
माझे काही मित्र-मैत्रीण पण त्याच कॉलेज मध्ये शिकत होते.
बारावी १९८३ बॅच.
16 Jun 2017 - 3:21 pm | योगेश लक्ष्मण बोरोले
१९९० मध्ये, दहाव्वीत ८९% मिळवले. मात्र बाराव्वीनंतर, एका गुणाने वैद्यकिय अभ्यासक्रमात प्रवेश हुकला व खाजगी महाविद्यालयात जायची तयारी नसल्याने, जळगावहुन मुंबईला येउन रसायनशास्त्रात डाॅक्टर झालो. त्यानंतर १२ वर्षे आदित्य बिर्लामध्ये शास्त्रज्ञ वगैरे म्हणुन काम केल्यानंतर आता स्वतःचा व्यवसाय सुरु केलाय. सध्या कमाई नसली तरी मजेत चालुय ! परत संघर्ष करतोय, शिकतोय, सुधारतोय व पुढे जातोय.
16 Jun 2017 - 3:38 pm | मुक्त विहारि
+ १
एका गुणाने वैद्यकिय अभ्यासक्रमात प्रवेश हुकला व खाजगी महाविद्यालयात जायची तयारी नसल्याने, =====> हे आर्थिक गणित प्रत्येकालाच परवडेल असे नाही. आमच्या पिताश्रींकडे पैसा होता म्हणून मला शिकवण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली.
पण तुमच्या बाबतीत हे नशीबाचे फास उलटे पडले. त्यामुळे नाराज होवू नका.
बादवे,
"तुम्ही ही तर श्रींची इच्छा" हे पुस्तक वाचले आहे का? वाचले नसल्यास जरूर वाचा असा सल्ला कम विनंती.
16 Jun 2017 - 4:55 pm | योगेश लक्ष्मण बोरोले
धन्यवाद. ऐकलेय या पुस्तकाबद्दल. जरुर वाचतो.
16 Jun 2017 - 7:09 pm | मोदक
https://shrithanedar.com/wp-content/uploads/2017/03/HSI_ST_final.pdf
इथे विनामुल्य मिळेल.
16 Jun 2017 - 3:32 pm | अनन्त्_यात्री
माझ्यावेळी ११वी एस.एस.सी. होत॑.
त्यामुळे १०वी ला किती मार्क पडले होते हा प्रश्न फाऊल आहे :)
16 Jun 2017 - 6:20 pm | arunjoshi123
१९८९ ला दहावीला ८९.१४% होते. हा आकडा दशांशाच्या दुसर्या स्थळापर्यंत आठवण असण्याचं कारण मला ८९% मार्क पडले हे सांगितल्यानंतर शेजार्यांना मी पास झालो आहे का नाही हे सवते सांगावे लागायचे. असो.
===============
उदगीरमधेच बारावीला अॅडमिशनला एवढे मार्क लागायचे नाहित. बारावीचे मार्क्स मात्र कामाला आले. सर्वसाधारणपणे दहावीत चांगले मार्क्स घेणारे बारावितही घेतात असा बोलबाला होता. शिक्षणामुळे बालपण कमी एंजॉय केले का आता शिक्षणामुळेच ओके ओके जगायला मिळतेय याबद्दल संभ्रम आहे. मला अजूनही दहावी बारावीच्या परीक्षांची दु:स्वप्ने पडतात. शिकलो नसतो तर एक मस्तपैकि गावगुंड झालो असतो ही भावना कधी कधी सुखावून जाते.
16 Jun 2017 - 7:10 pm | औरंगजेब
६६.१५%
सर्वात जास्त मार्क गणितात
१२५/१५०
गंमत म्हणजे गणित म्हणजे सर्वात नावडता विषय
:-)
17 Jun 2017 - 12:15 am | ज्योति अळवणी
६३% होते दहावीला. त्यानंतर B. Com. C.S. अस काहीस शिक्षण केल. पण सध्या त्या शिक्षणाचा आणि मी करत असलेल्या कामाचा काहीच संबंध नाही. सामाजिक कामात आहे इतकच सांगता येईल. मात्र काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करते.
मिपा वरच वाचन आणि लिहिण ही एक नशा आहे.... ती enjoy करते आहे. अधून मधून थोडी busy होते त्यामुळे गायब असते.
अर्थात एकूण बर चालल आहे. खुश आहे आयुष्यात मी.
17 Jun 2017 - 11:10 pm | प्रभू-प्रसाद
बीजगणित out of out ; साहेबांची भाषा आवडीची-78/100 ; B A spe. English
पण सध्या कारकुनी करतो.
17 Jun 2017 - 11:49 pm | दा विन्ची
१९८७ साली दहावीला ७६.५७ % होते. सध्या अजून उच्च शिक्षण घेतोय, मास्तर आहे.
18 Jun 2017 - 6:17 pm | शब्दवेडी
दहावीला जेमतेम ६१% मार्क मिळवून बेसबॉलच्या कृपेने स्पोर्ट्स कोट्यातून ११ वी वाणिज्य शाखेत प्रवेश मिळाला. कॉमर्स आवडले आणि जमले नाही म्हणून डिग्री नंतर मास्टर्स इन एन्टरटेन्मेन्ट केलं आणि ३ वर्ष वेगवेगळ्या मासिकांकमधून, संकेतस्थळांसाठी लिखाणाचे काम केल्यानंतर आता पूर्ण वेळ भाषांतरकार आणि मजकूर लेखक (अर्थात फ्रीलांस कन्टेन्ट रायटर आणि ट्रान्सलेटर) म्हणून काम करते आहे.
19 Jun 2017 - 6:57 pm | kulpras
आत्ता हैदराबाद येथे संगणक अभियंता, दहावी पर्यन्त सगळे शिक्षण मराठी मध्ये
10 Jun 2019 - 1:15 pm | हस्तर
कम्पनी?
19 Jun 2017 - 7:29 pm | पिशी अबोली
85%, गोवा बोर्ड. पण मी फार हल्लीची(2006 ची बॅच) आहे. त्यानंतर आर्ट्सला ऍडमिशन घेतली.
सध्या भाषाशास्त्रात पीएचडी करतेय.
19 Jun 2017 - 7:29 pm | पिशी अबोली
85%, गोवा बोर्ड. पण मी फार हल्लीची(2006 ची बॅच) आहे. त्यानंतर आर्ट्सला ऍडमिशन घेतली.
सध्या भाषाशास्त्रात पीएचडी करतेय.
20 Jun 2017 - 1:34 am | संजय क्षीरसागर
ते आता आठवत नाही :) पण आर्टसला जाण्यात अर्थ नाही आणि सायन्स करुन मेडीकलला जाण्याची संधी असूनही, रोगराई आणि पेशंटशी आयुष्यभर संपर्क नको, म्हणून कॉमर्सला आलो !
बिकॉमला त्यावेळी फर्स्ट क्लास म्हणजे अपूर्वाई होती पण बँकेत नोकरी मिळण्याशिवाय त्याचा काही उपयोग नव्हता. अशाप्रकारे ग्रॅज्युएशन पश्चात एमबीए किंवा सीए हे दोनच पर्याय उरले.
एमबीए हा फारच पांचट आणि वरवरचा प्रकार वाटला म्हणून सीएला आलो.
मग लक्षात आलं की आता परतीचे सर्व दोर तुटले आहेत. एकतर सीए किंवा मग अगदी सामान्य आयुष्य जगणं. आता जीव गेला तरी बेहत्तर म्हणून सगळे प्रयत्न पणाला लावले. उमेदीचे दिवस आभ्यासात घालवून सीए झालो !
पोस्ट क्वालिफिकेशननंतर सीएचं एकूण काम बघितल्यावर झक मारली आणि मुंबई पाहिली असं वाटायला लागलं !
मग सायकॉलॉजी आणि अध्यात्माचा तुफान अभ्यास केल्यावर लक्षात आलं मजा कामात नसते, सर्व काम व्यक्तिनिरपेक्ष असतं. मजा आपण कुठलंही काम कसं करतो यावर असते. एका झटक्यात सगळे नको वाटणारे क्लायंटस मित्रांना देऊन टाकले आणि केवळ समविचारी क्लायंटसची काम ठेवून स्वतःच्या मर्जीनं आणि हवं त्या वेळी काम करायला लागलो. (उदा. आता रात्रीचे १.३५ झालेत आणि हा प्रतिसाद लिहीतोयं !)
तदनंतर आयुष्यात आनंदी आनंद झाला !
20 Jun 2017 - 2:17 am | आदूबाळ
I feel you bro...
20 Jun 2017 - 10:37 am | संजय क्षीरसागर
`एका झटक्यात सगळे नको वाटणारे क्लायंटस मित्रांना देऊन टाकले' हे थोडं मॉडिफाय करतो. काम कमी करतोयं असं सांगून क्लायंटसच्या फाईल्स त्यांना परत केल्या. फक्त एका क्लायंटसाठी मित्राला रिक्वेस्ट केली कारण तो क्लायंट जायला तयार नव्हता आणि तुम्हीच दुसरा सीए बघून द्या म्हणून अडून बसला होता.
पण सध्या मनात येईल तेव्हा काम आणि पूर्ण स्वच्छंदी आयुष्य हे सीएचं क्वालिफिकेशन वापरुन जमवलंय हे मात्र नक्की. म्हणजे तो एक शिक्षणाचा फायदा झालायं. अर्थात, सगळे सीए असं जगत नाहीत हे ही तितकंच खरं :)
20 Jun 2017 - 4:56 am | जॅक डनियल्स
दहावी मध्ये ८२ % पडले होते. आभ्यासाची मजा घेत दहावी दिली होती.
मराठी आणि इतिहास-भूगोल आवडते विषय. मराठी मध्ये शाळेत पहिला आलो होतो - ७७ मार्क पाडून. पुण्यातली पहिली शाळा असल्यामुळे (न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड ) इतक्या वर्षात लोकांनी मराठीला खूप बक्षिसे ठेवली आहेत त्यामुळे बोर्डात आलेल्या मुलानंतर सगळ्यात जास्त बक्षिसे मलाच मिळाली होती. काही बक्षिसे तर चार -पाच रुपयांची पण होती.
साप पकडता पकडता - सिंहगड मधून केमिकल इंजिनीरिंग मध्ये पदवी घेतल्यानंतर 1 वर्ष तोरांगल्लू (JSW steel) आणि दुर्गापूर (dsp स्टील) च्या Praxair च्या प्लांट मध्ये नोकरी केली. त्यानंतर टेनसी येऊन केमिकल मध्ये मास्टर आणि phd केले. सिमेंट -काँक्रीट (मध्ये टाकली जाणारी) केमिकलवरती संशोधन केल्यामुळे आता Quikrite नावाच्या सिमेंट -काँक्रीट कंपनी मध्ये संशोधक आहे.
20 Jun 2017 - 8:20 pm | मराठी कथालेखक
दहावी ९०% , बारावी ८४% (एकूण - ग्रुपला ९२%) आणि इजिनिअरिंग संपुर्ण डिस्टिंक्शन, नंतर काही वर्षांनी अर्धवेळ एम बी ए डिस्टिंक्शनमध्ये...
पण म्हणून आयुष्यात खूप मोठे दिवे लावलेत असं नाही. सध्या हिंजवडीत आय टी कंपनीत आहे. .. झालंच तर कधी परदेशी गेलो नाही...किंबहूना टाळतच आलो... हिंमत झाली नाही असंच म्हणता येईल.
रखडत म्हणजे अनेकदा एटीकेटि लागून वा अगदी इयर डाउन (अनुत्तीर्ण) इंजिनिअरिंग झालेले काही सहकारी /मित्र माझ्यापेक्षा जास्त पगार घेत आहेत. असो.
20 Jun 2017 - 8:37 pm | वरुण मोहिते
१० वि बॅच २००३ ८७ % .सेमी इंग्लिश .
21 Jun 2017 - 10:59 am | जेम्स वांड
१०वी वा १२वीत 'खराब संगतीमुळे' एखाद दोन टक्के, दहा पाच टक्क्यांची चाट बसली आहे का?
असे असल्यास मीट मी, आय एम डॅट संगत....बाकी स्वतः उधळलेले गुण सांगण्यालायक नाहीत(च)
21 Jun 2017 - 2:10 pm | mayu4u
नंतर १२वी विज्ञान (२००३ - HSC): ८६ पूर्णांक काही तरी, PCM ९२.
पिताश्री सोडून घरच्या इतर सर्वांचा अभियांत्रिकी ला जावे असा आग्रह होता. मात्र अस्मादिकांना शुद्ध भौतिकशास्त्रात (pure physics) रस असल्याने सगळ्यांना फाट्यावर मारून विज्ञान अधिस्नातक (M Sc) मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. नंतर टाटा मूलभूत संशोधन केंद्राच्या (TIFR) खगोल भौतिक (astrophysics) विभागात काही काळ संशोधन केले. मात्र तेथील स्थायी सरकारी कर्मचाऱ्यांची संशोधनाविषयीची अनास्था आणि काम न करता वेतन घ्यायची वृत्ती याला विटून तिथून बाहेर पडलो.
नंतर काही काळ भौतिकशास्त्रात आणि कॉर्पोरेट जगात इ-लर्निंग क्षेत्रात काम केले. मात्र माहिती तंत्रज्ञान आणि निगडित सेवा (IT & ITeS) मध्ये मन न रमल्याने कौशल्य विकास (स्किल डेव्हलोपमेंट) क्षेत्रात सध्या चाकरी.
अभियांत्रिकी ला गेलेले अनेक मित्र अधिक वेतन आणि/किंवा परदेश वारी कमावत असल्याने आधी असूया वाटायची, मात्र आता प्रयत्नपूर्वक तुलना टाळून आनंदी राहतो.
दहावीचे गुण किंवा एकूणच आपल्याकडच्या शिक्षणाचा पुढे आयुष्यात काही उपयोग होतो असे मला अजिबात वाटत नाही.
21 Jun 2017 - 7:53 pm | सुबोध खरे
आता प्रयत्नपूर्वक तुलना टाळून आनंदी राहतो.
१९८० मध्ये दहावीला ८२. ३ % गुण पडले. तेंव्हा ८० % च्या वर गुण असले कि मुंबईत कोणत्याही कॉलेजात प्रवेश मिळत असे. ठाणे (बी एन बांदोडकर) कॉलेज मध्ये १२ केले. तेथे वैद्यकीय प्रवेशास २ गुण कमी पडले. सेंट जॉर्ज मध्ये दंत वैद्यकीस प्रवेश मिळाला होता पण एम बी बी एस च करायचं होतं. एक वर्ष फार्मसीत केलं. दुसऱ्या वर्षी ए एफ एम सी त प्रवेश मिळाला. नौदलात डॉक्टर म्हणून भरती झालो. माझ्या बरोबरच्या इंजिनियर किंवा इतर लोकांना माझ्यापेक्षा जास्त पगार मिळत होता. त्यांची मुंबईत घरे सुद्धा लवकर झाली. परंतु मला लोकांची असूया कधीच वाटली नाही.
आजही शाळेत, १० किंवा १२ वी ला माझ्यापेक्षा बरेच कमी गुण असलेले वर्गमित्र माझ्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मिळवत आहेत.
पण आनंदी राहण्याचा असा "प्रयत्न" करायची गरज पडली नाही.
आनंदी असणे हि वृत्ती आहे आणि ती आत्मसात करणे हि सोपे आहे एकदा तसे झाले कि मग असुया वाटणे किंवा स्वतः बद्दल खंत वाटणे बंद होते.
एक उदाहरण देतो आहे. विक्रांत वर असताना मला विभागप्रमुख म्हणून वेगळी केबिन होती. ज्यात त्यातल्या त्यात चांगल्या सुविधा होत्या. एका उन्हाळ्याच्या दिवशी फार गरम होत असल्याने आणि वातानुकूलन यंत्रणा बंद होती म्हणून माझी चिडचिड होत होती. चहा घेत होतो तेवढ्यात दवाखान्यात रुग्ण आला म्हणून मला बोलावणे आले. मी वैतागाने दवाखान्याकडे चाललो असताना मध्ये खलाशांच्या मेस मधून जात होतो तेंव्हा एक कनिष्ठ खलाशी तीन टियरच्या बंक असलेल्या खोलीत मधल्या बंकवर आडवा होऊन काही तरी वाचत होता. बाजूने जाणाऱ्या पाईपवर त्याने चहाचा स्टीलचा ग्लास ठेवला होता. एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन तो अशा स्टाईल मध्ये सिगारेटचे झुरके घेत चहा पीत वाचत बसला होता कि जसा काही "बादशहा"च आहे आणि अख्खे जहाज त्याच्या बापाची जहागीर आहे. त्याच्या मेस मध्ये भरपूर गरम होत होते जेमतेम पंख्याचा वारा लागत होता. अशा परिस्थितीत तो ज्या स्टाईलमध्ये चहा पीत होता ते पाहून मला स्वतःची लाज वाटली. सगळं व्यवस्थित होतं तरी चिडचिड करण्यासारखं मला काहीच कारण नव्हतं. रुग्ण पाहून आल्यावर त्या नौसैनिकाला नमस्कार करावास वाटला म्हणून मी परत आलो पण तो तेथून गेला होता.
मला कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसे राहावे हे शिकवले याबद्दल त्या अनाम सैनिकाला प्रणाम.
दुसऱ्याच्या नव्या बुटांचा हेवा करू नका
कारण
ते कुठे चावतात ते तुम्हाला कधीच कळत नाही
count your blessings. --/\--
22 Jun 2017 - 12:37 am | राघवेंद्र
केंव्हा येत आहे पूर्वेच्या समुद्रात चा पुढील भाग ???
तुमचा नौदलतील गोष्टींचा खजिना बऱ्याच दिवस आला नाही.
22 Jun 2017 - 8:52 pm | mayu4u
... इतरांसोबत होणारी तुलना (अनेकदा इतरांकडून) टाळण्यासाठी करावा लागतो...
संपूर्ण सहमत!
21 Jun 2017 - 9:43 pm | दशानन
दहावीला किती मार्क पडले हे पाहायला गेलोच नाही, 40 च्या आत नक्कीच असावेत! कारण जाधव सर पार घरात येऊन गेले होते की झालास पास!
शिक्षणावाचून माझे तसे काही अडले नाही, पण कधी कधी वाटतं की बुद्धी होती, शिकण्याची इचछा होती, चांगले दोस्त होते सोबत... पण हवे तसे शिक्षण नशिबी नव्हते. गरिबी आणि परिस्थती अशी होती की बोलण्यात काही राम नाही.
सध्या चांगले चालू आहे असे काही नाही पण देव दयेने अगदी काचेच्या बिल्डिंगमध्ये एसीत बसून नोकरी करून झाली, चांगला व्यवसाय उभा करून तो यथावकाश बंद करून झाले, शेअर मार्केट ते संगणक व्यवसाय झाल्यावर, वेब सर्व्हिस सुरू करून झाले...
सध्या फक्त हे काय जग आहे ते पाहावे म्हणून "NHAI" मध्ये गेल्या महिन्यापासून हायवे इंस्पेक्ष्ण व ट्रॅफिक कँटोल युनिटवर नोकरी करतोय :D
5 Jul 2017 - 6:22 pm | कर्मदरिद्री
२००६ साली दहावी झाली आता संगणक अभियंता आहे एका बऱ्या कंपनीत नोकरी चालू आहे
माझ्या एकंदरीत शिक्षणाबाबत बोलण्यासारखे काहीच नाही पण कोणत्याही क्लासला न जाता संपूर्ण शिक्षण केले याचे समाधान आहे
5 Jul 2017 - 6:42 pm | जेनी...
८१.५७%
6 Jul 2017 - 11:28 am | अजया
१९९१दहावीला शेवटचे सहा महिने बरीच आजारी होते. हाॅस्पिटलमधुन डिस्चार्ज घेऊन डायरेक्ट परीक्षा दिलेली. ८६.२८% मिळालेले. मी सोडून सर्वांना आश्चर्य वाटलेले पुस्तक हातात न धरता मार्क कसे मिळाले!
अकरावीला आमच्या पेंढारकर काॅलेजला प्रचंड उनाडक्या केल्या. तेव्हा डोंबिवली एमायडिसी अगदी रिकामी होती. वर्गात शिकवलेले इंग्रजीतले सायन्स मॅथ्स कळत नसे. फक्त मराठी तासाला मजा यायची. एक साउथ इंडियन मॅडम मॅथ्स शिकवायच्या. बरेच दिवस त्या क्वॅड्रिलॅथरल सदृश उच्चार करत काहीतरी फळ्यावर लिहून शिकवायच्या. त्या काय म्हणतात त्याचा अर्थ काय हे शोधण्याऐवजी बराच काळ मी नव्या मित्र मैत्रिणींबरोबर कँटीनमध्ये घालवला! ब्लॅक लिस्टमध्ये आले तर त्यांनी अभिनंदन करुन पार्टी मागितली होती हे आठवतंय.
सहा महिन्यात हळूहळू सूर सापडला. अकरावीला ७२% मिळाले. नंतर बारावीला क्लासला स्पेशल बॅच मिळाली. क्लासच्या जीवावर पिसिबी ९३.६६% मिळाले. मॅथ्समद्ये पण खूप मार्क होते कारण गणितं पाठ करुन गेलेले तिच पेपरात आली. घरचे म्हणायला लागले पिसिएम जास्त आहेत. व्हिजेटिआयला इंजिनिअरिंगला मिळेल. मग भोकाड पसरले. मला गणित येत नाही. नापास होऊ का. बायो जीव का प्राण आवडायचे. मग एक मार्काने मेडिकल हुकले आणि सेंट जाॅर्ज डेंटल ला गेले जी माझ्या आयुष्यात चुकून घडलेली सगळ्यात बेस्ट गोष्ट निघाली!
19 Jul 2017 - 3:47 am | विकास...
दहावी १९९८ मध्ये ६३% मिळवून पास झालो, पुढे कॉमर्स ला,
MCOM करून Distribution Business मध्ये JOB
अशाच गप्पा मारताना समजलं कि दोघे (मी आणि ती) एकाच शाळेत आणि क्लास रूम मध्ये (वेगवेगळ्या वर्षांमध्ये) दहावीला होतो . . . . . .
आणि मग . . . . .
आणि मग त्या शाळेच्या आठवणी सांगताना इतकी ओळख झाली कि आम्ही लग्न केलं
20 Jul 2017 - 9:17 pm | दशानन
लकी बॉय ;)
9 Jun 2019 - 5:26 pm | एकुलता एक डॉन
८५
मेरित होल्डर
9 Jun 2019 - 7:00 pm | वरुण मोहिते
मेरिट होल्डर????
9 Jun 2019 - 8:23 pm | कुमार१
पण तेव्हा एवढ्यावर राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली बुवा ! पुढे mbbs ला गेल्यावर होस्टेल घेतल्यावर ती रक्कम दुप्पट झाली होती.
9 Jun 2019 - 11:17 pm | Rajesh188
99% मार्क मिळवणारे कुठे आहेत .
आता दर्जा नाही फक्त सूज आली आहे markanchi.
30 वर्षा पूर्वीचे 60%,आणि आताचे 99.99% एकच दर्जाचे आहेत
9 Jun 2019 - 11:23 pm | अभ्या..
आपणाला किती होते?
आणि पार त्या काळचे ७० टक्के असले तरी सातत्याने असे अधांतरी लिहिण्यामुळेच मिळाले असे आपणास वाटते का?
9 Jun 2019 - 11:37 pm | Rajesh188
माझ्या अगोदरच्या पिढीतील 7 वी पास सुधा व्याकरण शुद्ध इंग्लिश बोलायचे .
आता graduate Sudha
व्याकरण शुद्ध इंग्लिश बोलू शकत नाहीत
10 Jun 2019 - 1:04 pm | प्रलयनाथ गेंडास...
कॉल सेंटर मध्ये शुद्ध इंग्लिश बोलू शकणारे किती ?
परकीय चलन भारतात आणणारे शुद्ध इंग्लिश बोलू शकणारे किती ?
10 Jun 2019 - 5:53 pm | गब्रिएल
खरं हाय तुम्चं. मिपावर बगा. हाल्ली शिकलेल्ये लोकबी दोन मराटी वाक्यबी धड लिवू शकत नाय बर्का. पन त्येच लोक मराटि बुडतिया म्हनून गळा काढाया पुडं पुडं आसत्यात. आता ब्वोला!
9 Jun 2019 - 11:23 pm | एकुलता एक डॉन
२० वर्षा आधीचे ८५% ?
10 Jun 2019 - 11:01 am | बेकार तरुण
मला दहावीला ८३.१४% होते. १९९४ साली.
पुढे कॉमर्सला जाउन (भरपुर उनाडक्या केल्याने) आणी एक दिवस ईन्स्टिट्युटलाच आमचा कंटाळा आल्याने सी ए अन सी एस झालो.
सध्या नोकरी करतो, ईक्वीटी अॅनालिस्ट म्हणुन. बेकारही नाही अन तरुणही नाही :(
10 Jun 2019 - 11:59 am | वामन देशमुख
वामन देशमुख
इसवी सन १९९२
इयत्ता दहावी
७१% गूण
---
10 Jun 2019 - 1:42 pm | समीरसूर
१९९२
दहावीचे मार्क्स ८८.७१%
नंतर अकरावीला नापास झालो. एक वर्ष घरी होतो. मग १९९५ ला बारावी झालो. ८०% मार्क्स मिळाले. बारावीनंतर अभियांत्रिकीला नगरच्या विळद घाटातल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. दोन दिवसांत कंटाळलो. नंतरच्या फेरीत नागपूरला प्रियदर्शिनी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिथे एका आठवड्यात कंटाळलो. मग ते संपूर्ण वर्ष काहीच केलं नाही. १९९६ ला पुन्हा अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी सज्ज झालो. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिथे रमलो. खूप मजा केली. जमेल तसा अभ्यास करून २००० मध्ये पदवी मिळवली. नंतर ३-४ वर्षे भयानक गेली. २००४ पासून स्थिर नोकरी मिळाली. अजून तरी ठीक सुरू आहे. माझ्या कामाचा आणि शिक्षणाचा अजिबातच संबंध नाही. इच्छा आणि वकूब नसतांना अभियांत्रिकीची पदवी घेतली त्यामुळे त्या क्षेत्रात नोकरी मिळवणं खूप कठीण होतं. चार वर्षांच्या शिक्षणानंतर विद्युत अभियांत्रिकी या विषयातलं काहीच येत नव्हतं.
इच्छा, आवड, वकूब, आणि संबंधित विषयांत उपयुक्त गुण नसतांना अभियांत्रिकीचे शिक्षण घेणे हा निर्णय आयुष्याची सोन्यासारखी वर्षे बरबाद करू शकतो हे मात्र शिकलो.
10 Jun 2019 - 11:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
या धाग्याच्या संदर्भात असलेले हे ग्राफिक आजच व्हॉट्सॅपवरून आले. बोलके आहे म्हणून इथे टाकत आहे.
काही दशकांपूर्वीचे आणि सद्याचे गुण यांची तुलना का होऊ शकत नाही हे जराश्या विनोदी अंगाने सांगितले आहे. :)
11 Jun 2019 - 9:00 am | हणमंतअण्णा शंकर...
दहावीला 93%. 2006 ची बॅच. (मार्क न वाटलेली शेवटची बॅच बहुदा)
बारावीला पीसीएमबी ला 94%. बायोलॉजि 100/100.
पीसीएम ला 90%.
सीईटी: मेडिकल : 167/200
इंजि: 129/200
लहानपणापासून उत्तम चित्रकला.
परिस्थिती बेताची त्यामुळे इंजिनिअरिंग केले. करताना पार्टटाईम जॉब केला. इंजिनअरिंग मध्ये मात्र अवांतर गोष्टींकडे लक्ष दिल्याने प्रचंडच गंडलो.
तरीही आतापर्यंत कसातरी एक सॉफ्टवेअर जॉब करतोय.
एक ना धड भाराभर चिंध्या.
कशातही इंटरेस्ट तयार होत असल्याने वाट्टेल ते केलं.
सध्या बृहतसंहिता वाचत आहे. (कारण बुद्धीला अतिताण दिल्याने यकृतावर परिणाम होतोय असं माझ्या वैद्यांचे मत आहे.) खाण्या-पिण्यात खूप रस.
लोकसंग्रह अत्यंत तोकडा आणि तुसडेपणा टोकाचा.
कालच 'भारतीय मूर्तीशास्त्र' हे पुस्तक आलं आहे!
एखादी गोष्ट तडीस नेणे हे कधीही जमले नाही. त्यामुळे गेटसाठी दोन वर्षे घालवूनही मी exam च देऊ शकलो नाही. परीक्षेची प्रचंड भीती बसली आहे. मी सध्या सरासरी तीन मुलाखती प्रत्येक आठवड्याला घेतो, पण मला स्वतःला एकाही मुलाखतीत स्वतःहुन जाण्याचे धाडस होत नाही. त्यामुळे जिथे फक्त कोड हाच इंटरव्ह्यू असतो तिथेच आजवर निवडला गेलोय. तीन जॉब बदलेले ते सगळे ओळखीतून मिळाले आहेत.
मला सर्जन व्हायचं होतं, झालो सर्जनशील!
11 Jun 2019 - 11:25 am | सुबोध खरे
१० वि ला भरमसाट गुण मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मूळ विषय नीट समजलेला नसतो असे अनेक वर्षे पाहत आलो आहे.
१२ वि ला जीवशास्त्रात १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्राची मूलभूत समज नसते हे आढळून येते. उत्क्रांती, नैसर्गिक निवड, सुदृढ तोच जगेल अशा अनेक मूलभूत गोष्टी समजलेल्याच नसतात ज्या पुढे तुम्हाला जीवशास्त्रात करियर करायचे असेल तर फार महत्त्वाच्या ठरतात.
उद्या केवळ २० ते ३० पाढे यावर १०० गुणांची परीक्षा घेतली तर पढिक मुले १००% गुण मिळवतील. पण त्यांना गणिताची मूलभूत समज असेल का?
आज विचारावे त्या मुलाला ९५ % गुण मिळालेले असतात. यामुळे मुलांना आणि त्यांच्या पालकांना आपले मूल "भयंकर हुशार" आहे असा साक्षात्कार होतो. त्यामुळे आपल्या मुलाला "मुंबई आय आय टी च्या खाली कुठलेही अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा एम्स च्या खालचे वैद्यकीय महाविद्यालय" चालणारच नाही असे वाटू लागते.
परंतु हे गुण ना त्याला विषयात काही रस असतो म्हणून मिळालेले असतात कि त्यातील मूलभूत ज्ञान असते म्हणून मिळतात. कोणत्या तरी क्लास ला जाऊन "गिळा आणि ओका" या सूत्रावर एवढे गुण मिळवलेले असतात.
केवळ ९० % वर गुण मिळाले म्हणून शास्त्र विषयात आलेली कित्येक मुले पुढे रखडताना दिसतात. हा "गुण फुगवटा" थांबवला गेला पाहिजे ज्यामुळे मुलांची आणि पालकांची फार दिशाभूल होते आहे.
11 Jun 2019 - 11:39 am | जॉनविक्क
काय केले पाहिजे व कसे केले पाहिजे हे साधार समजावणे अवघड असते व म्हणूनच आवश्यक ते बदल व्यवस्थेमधे होत नाहीत.
11 Jun 2019 - 12:14 pm | सुबोध खरे
करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि त्यावर तज्ज्ञ समित्यांनी बरीच गोष्टी सुचवलेल्या आहेत.
व्यवस्थेत बदल शक्य आहे परंतु झारीतील शुक्राचार्य बरेच आहेत.
राजकीय इच्छा शक्ती, सवंग लोकप्रियतेचे निर्णय (उदा कुणालाच ९ वि पर्यंत नापास करू नका, अभ्यासक्रम सोपा करा). क्लासेस बरोबरचे अर्थपूर्ण संबंध, विकेंद्रीकरणाच्या गरजा सारख्या अनेक गोष्टी आहेत
ज्यामुळे आवश्यक सुधारणा बासनात गुंडाळल्या गेलेल्या आहेत किंवा गोठवल्या गेल्या आहेत.
11 Jun 2019 - 1:02 pm | जॉनविक्क
म्हणूनच वरील प्रतिसाद लिहला होता
11 Jun 2019 - 5:13 pm | हणमंतअण्णा शंकर...
एका एमबीबीएस मुलीशी डेट करतानाचा एक अनुभव : आंबा खाता खाता सहज तिने म्हंटलं, निसर्गाची काय कमाल आहे, समर मध्येच एवढं गोड रसदार फळ आपल्याला मिळतं.
अर्थात मी कपाळावर हात मारून घेतला. तिचे विधान निसर्गाला अॅक्टीव्ह एजंट मानून झालेल्या उत्क्रांतीच्या संकल्पनेला धरून सकृत दर्शनी बरोबर वाटतं, तरीही त्यातली तार्किक चूक तिच्या गावीही नव्हती. आपल्याला/ प्राणीपक्ष्यांना समर मध्ये गोड रसदार फळं खायला आवडतात म्हणून काळाच्या विशाल पटलावर आंबा नावाची स्पेसिज नॅचरली सिलेक्ट होत गेली आहे वगैरे तर तिच्या डोक्याच्या बाहेरचे. संध्याकाळी साईबाबाची आरती केल्याशिवाय घास न घेणारी बीजे मधली डॉक्टर. आणि आम्ही सॅपिओसेक्सुअल इकडे इंजिनिअरिंगला असून डार्विन फिशचा टी शर्ट घालून फिरत होतो. अर्थात सध्या तिच्या करियरला डार्विनची परडी कितपत लागते आहे याबद्दल साशंक आहे, तिचे उत्तम चालले आहे असे कळते.
अर्थात हा ही स्कूलबॉय-अॅथिजमचाच एक प्रकार झाला. तो दिखावूपणा गळाल्यावरदेखील डॉकिन्स ते सॅम हॅरिस हा प्रवास व्हायला वेगळीच बुद्धी लागते. विषय बुद्धीचाच निघाला आहे तेव्हा, चरक सर्व बुद्धींना भाग्यविशेष म्हणतो हे वाचल्यावरच मी उडालो होतो.
असो. तुमचे म्हणणे अतिशय बरोबर आहे, दहावीच्या गुणवाटप स्कीमनंतर ९०% हे अगदीच हॅ मार्क होत. यावर्षी हे गुण नसल्यामुळे गाडी मूळपदावर आली आहे असं वाटत आहे.
बुद्धीच्या जोरावर जास्त मार्क मिळवणाऱ्यांबरोबर, निष्ठेने-व्यवस्थापनाने अतिशय कष्टकरून इतकेच मार्क मिळवणाऱ्यांबद्दल आदर आहे. त्यांना अगदीच टाकाऊ असं मात्र मी अजिबात समजत नाही. मार्क मिळवणे हे देखील एक वेगळं स्किलसेट आहे. एखाद्या निर्बुद्ध मुलाला उद्या गिळा आणि ओका या तत्त्वावर ९०% मार्क मिळाले तरी मी त्यामागच्या शिस्तीला, वेळेच्या व्यवस्थापनाला आणि प्रेरणेला नक्कीच दाद देईन.
नववीच्या परीक्षेत अणू म्हणजे काय हे विचारलं तर तेवढंच रुडीमेंटरी उत्तर अपेक्षित आहे. तो विद्यार्थी अगदी क्वार्क बिर्क सांगून उत्तर लिहायला लागला तर त्याचा पेपर दोन तास सुद्धा संपणार नाही आणि तो नापास होईल. कोणत्या पातळीवर किती मुलभूत ज्ञान अपेक्षित आहे हे ठरवायला मुलभूत म्हणजे काय हे आधी स्पष्ट करावे लागेल.
गिळा आणि ओका या तत्त्वावरच परीक्षेत सर्वोच्च गुण प्राप्त करता येत नाहीत.
अगदी सर्वोच्च नाहीत पण उच्च मार्क मिळवून शास्त्र विषयात पुढे आलेली मंडळी जगातील यच्चयावत विषयांवर आपली मते मराठी संस्थळांवर रेटून मांडत शास्त्रांची सेवा करताना पाहतो तेव्हा मात्र मी धन्य धन्य होतो.
11 Jun 2019 - 5:27 pm | अभ्या..
अत्युच्च प्रतिसाद
अर्थात दाद हि आपल्या डोसक्यालाही आहे. अशी मेंदूची जडणघडण होणे सोपे नाही.
11 Jun 2019 - 7:16 pm | उपेक्षित
आयला अण्णा डोका गरगरलतुमचा प्रतिसाद वाचून, जबरी प्रतिसाद होता हे काय सांगाया पायजे ?
11 Jun 2019 - 9:13 pm | हस्तर
च्च मार्क मिळवून शास्त्र विषयात पुढे आलेली मंडळी जगातील यच्चयावत विषयांवर आपली मते मराठी संस्थळांवर रेटून मांडत शास्त्रांची सेवा करताना पाहतो तेव्हा मात्र मी धन्य धन्य होतो.
आणि काही शुध लेखनाचा आग्रह पण धरतात
11 Jun 2019 - 12:59 pm | Rajesh188
मला 1998 ला एसएससी का 63% मार्क मिळाले होते .
खेडेगाव मधील शाळा ना क्लास ना कोणाचे मार्गदर्शन(शिक्षक सोडून).
पण तेव्हा सुधा शिक्षकांचा भर विषय पूर्ण समजावण्या कडे असायचा.
तेव्हा सुधा २१ अपेक्षित आणि guide होते .
पूर्वीच्या प्रश्न पत्रिकेंचा उपयोग फक्त पॅटर्न समजण्यासाठी केला जायचा .
संभाव्य प्रश्न कोणते येतील ह्याचा विचार करून प्रश्न उत्तरे पाठ करणे हा प्रकार कमी होता .
पूर्ण धडा व्यवस्थित समजला की कोणताही प्रश्न आला तरी उत्तर लिहत येते आणि पुढच्या शिक्षणासाठी पाया मजबुत होतो .
आता फक्त मार्क जास्त मिळवणे पाठांतर करून हेच ध्येय असते त्या मुळे पाया च कमजोर झाला आहे .
11 Jun 2019 - 2:24 pm | चिगो
दहावी - ६०.२%
बारावी - ६३.१७% पण त्यापुर्वी एकदा गणितात आणि भौतिकशास्त्रात, तसेच पुन्हा गणितात नापास.
पदवी - बी. एस्सी.. ५६.६% रसायनशास्त्र/वनस्पतीशास्त्र / पर्यावरणशास्त्र
सद्यपरिस्थिती - सरकारी नोकरी. २००९ बॅच आयएएस..
11 Jun 2019 - 3:31 pm | समीरसूर
आपलं यश स्पॄहणीय आहे. दहावी-बारावीच्या मार्कांवर आयुष्य आणि यश अवलंबून नसतं हेच खरं. आयएएस होणं ही खरोखर खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आपले उदाहरण प्रेरणादायी आहे.
इथे सगळ्यांचीच उदाहरणे प्रेरणादायी आहेत. परिस्थिती, आवड-निवड, स्पर्धा, पालकांचा आणि समाजाचा दबाव, आरोग्यविषयक समस्या, पैशांशी संबंधित समस्या, संगत अशा बर्याच आव्हानांचा आणि खडतर प्रवासाचा सामना करून सगळ्यांनीच कौतुकास्पद यश मिळवले आहे आणि सगळे आयुष्यात स्थिर, समाधानी, आणि आनंदी आहेत. इथले अनुभव वाचूनच इतकं सकारात्मक वाटतं की सकारात्मक अॅटिट्यूड कसा असतो हे समजण्यासाठी पुन्हा दुसरं काही करायची गरजच नाही.
अजून येऊ द्या!
11 Jun 2019 - 4:21 pm | चिगो
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद, समीरसूर.. पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणेच, इथे सगळ्यांचीच उदाहरणे प्रेरणादायी आहे. भूतकाळातील कमतरतेवर, अपयशावर मात करुन किंवा पुर्वी मिळालेल्या यशाला आणखी तेजस्वी करत जी व्यक्ती सुखी आयुष्य जगत आहे, ती प्रत्येक व्यक्ती माझ्यामते यशस्वी आहे. तुम्ही स्वतःदेखील 'वेव्ही बॉब' सारखी कादंबरी लिहीली आहे. आपापले छंद, आवडी सुखनैवः पुर्ण करु शकणे, हा पण एक माईलस्टोन आहे. मुद्दा एवढाच आहे, की अपयशात अडकण्यात आणि अडकून राहण्यात काहीच अर्थ नाही, कारण यश-अपयश हे नेहमीच सापेक्ष असतं.
11 Jun 2019 - 6:15 pm | Rajesh188
शालेय जीवनात काही विषयात नापास होवून सुधा तुम्ही मनाने खचला नाही .
आणि आता काय करायचे ,माझे कसे होणार असल्या निराशावादी विचारणा स्वतः पासून लांब ठेवून आयुष्य यशस्वी करून दाखवलं हे खूप मोठं यश आहे
16 Jun 2019 - 1:43 pm | जेम्स वांड
आयएएस, म्हणजे च्यायला विषयच कट, पुढली कथा प्रशासन विरुद्ध गावकरी लिहिणार होतो, आता काय त्यो विषय घेऊन लिहायची हिम्मत नाय आपली. कॅडर कुठलं चिगो सर? एकेकाळी एमपीएससी करायची प्रचंड इच्छा होती, करंट अफेयर्स वगैरे वाचत असे पण वर्ष वर्ष रिपीट करायचा पेशन्स नव्हता म्हणून सरळ पदरात पडलेली नोकरी करत बसलोय.
19 Jun 2019 - 5:30 pm | चिगो
कृपा करुन लिहाच.. सरकारी नोकरीत असलो, तरी डोळ्यांवर कातडं ओढलेलं नाहीयं मी.. आणि तुमचं लेखन ही सगळ्या मिपाकरांसाठी मेजवानी आहे, तेव्हा लिहाच. विषय कट करायला कारणच नाही ना काही..
मी आसाम-मेघालय कॅडरमध्ये आहे, मेघालयला.
11 Jun 2019 - 4:34 pm | चावटमेला
साल २०००, दहावी - ८७%.
आजूबाजूचे सायन्सला गेले म्हणून मी सुद्धा गेलो. पाठांतर करून १२ वी त पीसीएम ला ९४% मिळाले. आपल्याला ह्यातलं काहीही समजत नाही हे कळत असून सुध्दा बेअक्कलपणे इंजिनिअरिंग ला गेलो. ओ का ठो कळत नसून सुद्धा कसाबसा पास होत गेलो. आता एका सॉफ्ट्वेअर कंपनीत पाट्या टाकतोय...
16 Jun 2019 - 1:29 pm | Nitin Palkar
शाळेत असताना हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्धी(?) होती. अकरावी पर्यंत कधीही खास अभ्यास करावासा वाटला नाही, केलाही नाही. विशेष समजही नव्हती. ४२.६७% एवढ्या प्रचंड गुणांनी मा. शा. परीक्षा उत्तीर्ण झालो. कॉलेजच्या पहिल्या वर्षीच नापास झालो. नापास झाल्यावरही वडलांनी काहीच दम दिला नाही, ओरडले नाहीत त्या मुळे की काय अभ्यास न केल्याचे अतिशय दुःख झाले. ओटीस एलेव्हेटर कम्पनीत अँप्रेंटीस म्हणून लागलो. दोनच महिन्यात एका सहकारी बँकेत कारकुनाची नोकरी मिळाली. पुढे तिथल्या सर्व परीक्षा देत शाखा व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालो.
आत्ता पर्यंतचे आयुष्य नक्की आनंदात गेले ( यात पत्नी आणि मुलाचा मोठा सहभाग आहे).
.... योग्य वयात कान पिचक्या न मिळाल्याने शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत नक्की जाणवते.
16 Jun 2019 - 1:40 pm | यशोधरा
अजूनही बाहेरून परीक्षा देऊन बेसिक ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकाल. :) खरेच सांगतेय.
17 Jun 2019 - 1:15 pm | Nitin Palkar
_/\_
16 Jun 2019 - 9:19 pm | आदेश007
१९८७ साली दहावीत ७६% मिळाले. सगळे मित्र सायन्सला गेले मी मात्र कॉमर्स कॉलेजला ऍडमिशन घेतली. बारावीत ७२% मिळाले.
बी कॉमनंतर लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. एलएल बी फायनलमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पहिला क्रमांक आला. त्यानंतर लॉमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. तेंव्हाही युनिव्हर्सिटीमध्ये पहिला क्रमांक आला.
त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या केल्या. सध्या टॉप 5 मधील एका आयटी कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे.
थोडीफार समाज सेवा करायचा प्रयत्न चालू आहे. बाकी चांगलं चाललं आहे.
17 Jun 2019 - 2:51 am | चामुंडराय
शालेय जीवनात आणि पुढे शिक्षण पूर्ण होईतो सातत्याने अव्वल क्रमांक त्यामुळे स्कॉलर वर्गात गणना परंतु आज सिंहावलोकन करता आणि बेंच मार्किंग (मराठी प्रतिशब्द ?) करता असे दिसते की तेव्हा मार्कांमध्ये माझ्या मागे असणारी काही मित्रमंडळी आज तौलनिक दृष्टया जीवनामध्ये अधिक यशस्वी आहेत. अर्थात त्याचा आनंदच आहे
"सक्सेस इन लाईफ" इज नॉट नेसेसरिली प्रोपोर्शनल टू "मार्क्स ऑन मार्कशीट", हेच खरे.
पुस्तकी हुशार असण्यापेक्षा "स्ट्रीट स्मार्ट" (पुनःश्च मराठी प्रतिशब्द ?) असणे हे जीवनात यशस्वी होण्यासाठी जास्त गरजेचे आहे.
17 Jun 2019 - 9:00 am | भंकस बाबा
1989 बैच, आर.एम.भट हाईस्कूल
हुशार मुलगा म्हणून ओळखत होते शाळेत सर्व शिक्षक!
त्यांना तर धक्काच बसला, खरी गोम अशी होती कि अभ्यासाची पुस्तके सोडून बाकी काहीही वाचायची आवड़ होती, अगदी पाककलेवरील पुस्तके सुद्धा!
एका सर्वेक्षण कंपनीत सुपरवाइजर होतो, अचानक नोकरी सोडून एका फार्महाउसवर देखभालकर्ता म्हणून लागलो.
आता एका डायग्नोस्टिक फर्मकरता मार्केटिंग करतो.
कधी असे वाटते की अभ्यास केला असता तर चांगली नोकरी, पैसा, आराम मिळाला असता. गणित केले तेव्हा समजले की आता पण तेच करत आहे.
माझ्या मुलाला पण जमेल तशी पुस्तके आणून देतो. परदेशी महागड़ी पुस्तके रद्दिमधे स्वस्तात मिळतात. गमतीची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाला पण शाळेमधे हुशार मुलगा म्हणून ओळखले जाते. इतिहासाची पुनरावृत्ती होणार बहुतेक?
17 Jun 2019 - 9:00 am | भंकस बाबा
1989 बैच, आर.एम.भट हाईस्कूल
हुशार मुलगा म्हणून ओळखत होते शाळेत सर्व शिक्षक!
त्यांना तर धक्काच बसला, खरी गोम अशी होती कि अभ्यासाची पुस्तके सोडून बाकी काहीही वाचायची आवड़ होती, अगदी पाककलेवरील पुस्तके सुद्धा!
एका सर्वेक्षण कंपनीत सुपरवाइजर होतो, अचानक नोकरी सोडून एका फार्महाउसवर देखभालकर्ता म्हणून लागलो.
आता एका डायग्नोस्टिक फर्मकरता मार्केटिंग करतो.
कधी असे वाटते की अभ्यास केला असता तर चांगली नोकरी, पैसा, आराम मिळाला असता. गणित केले तेव्हा समजले की आता पण तेच करत आहे.
माझ्या मुलाला पण जमेल तशी पुस्तके आणून देतो. परदेशी महागड़ी पुस्तके रद्दिमधे स्वस्तात मिळतात. गमतीची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाला पण शाळेमधे हुशार मुलगा म्हणून ओळखले जाते. इतिहासाची पुनरावृत्ती होणार बहुतेक?
17 Jun 2019 - 1:41 pm | वरुण मोहिते
बोर्डात. आलेलो . इंजिनिअर झालो त्यात रस नाही वाटला. परत पोलिटिकल सायन्स आणि कंपनी कायदा शिकलो. सध्याचे काम इंजिनिअरिंग सोडून फार वेगळे आहे.
21 Jun 2019 - 6:35 pm | के. सौरभ
१० वी पर्यंत सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाले , ११ वी व नंतर सर्व विषय इंग्रजी माध्यमामधून होते परंतु काही अडले नाही. मातृभाषेतून शिक्षण घ्यावे या मताचा मी आहे पण माझी दोन्ही मुले इंग्रजी शाळेत जातात, असो काळानुरूप बदल आवश्यक (पण खरच गरज आहे का ,या विषयावर वेगळा धागा उघडता येईल.)
दहावीच्या निकालाविषयी चर्चा म्हणून एक आठवण नमूद करावीशी वाटते- बी. एम. जोशी (उत्कर्ष मंदीरचे अतिशय कडक शिक्षक, मुले काय मुलींना पण धोपटून काढायचे चुकले तर. तरीही विद्यार्थीप्रिय) सरांनी माझी गणिते तपासताना म्हटले होते तु ८० टक्क्याच्या आसपास जाणार आणि सरांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले. मी कधी मार नाही खाल्ला पण दुसर्याचा मार बघून फाटायची. मुलांना यावे ही कळकळ मी इतर कोणत्याही शिक्षकामध्ये एवढी पाहिली नाही.
नंतर अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण करून मी आज हिंजवडी येथील एका माहीती तंत्रज्ञान कंपनी मध्ये उच्च प्रबंधक पदावर आहे. ठीक चालू आहे, अजून काही चांगले करता आले असते असे वारंवार वाटते. नोकरी बास असाही विचार डोकावत असतो. बाकी बघू स्वप्रयत्न आणि परमेश्वराची क्रुपा!