आशयाच्या अंबरांनी शब्द माझा टंच व्हावा
कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा ..
स्वर टिपेचा बरसुदे त्या भीमसेनी मार्दवाने
सूर शब्दांच्या द्वयाने जीव माझा धन्य व्हावा
सोहिनीच्या आर्जवांनी जीव स्वप्नाळून जावा
जोगिया वा भैरवाने सूर्य गगनी अवतरावा
विभासाच्या त्या सुरांनी नूर दिवसाचा ठरावा
कलिंगडाच्या भैरवाने अंतरात्मा शुद्ध व्हावा ..
मारावा अन सारंगाच्या साक्षीने दिन सार्थ व्हावा
श्री मधुवंती पूर्वी संगे मध्यांन्होत्तर वेळ जावा ...
यमन येऊदे संध्याकाळी साथ घेऊन शंकऱ्याला
हंसध्वनी वा कल्याणाने दिवस रोजचा अंत व्हावा..
रात्रीला मग नंदसंगे मल्हाराने फेर घ्यावा
रागेश्री अन कलावतीने केदाराचा हात घ्यावा ..
दरबारी मग मालकंस अन भूपाळीचा नाद व्हावा ..
तृप्त जीवाला निद्रासमयी दुर्गेचरणी मिळो विसावा..
प्रतिक्रिया
5 Jan 2017 - 10:39 am | वेल्लाभट
वा वा वा वा ! काय सुरेख गुंफलेत राग तुम्ही ! आणि तेही यथोचित प्रसंगवेळांत. क्या बात.
जाणकार दिसता.
5 Jan 2017 - 7:13 pm | खग्या
परन्तु असेच सुचले
5 Jan 2017 - 12:29 pm | पैसा
एकूणच रचना खूप आवडली!
5 Jan 2017 - 12:39 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त प्रयत्न आवडला
पहिल्या दोन ओळी वाचल्यावर सुरेश भटांच्या "एवढे दे पांडुरंगा"ची आठवण झाली
पैजारबुवा,
5 Jan 2017 - 7:09 pm | खग्या
हो त्या ओळी त्यान्च्याच आहेत
5 Jan 2017 - 2:39 pm | चांदणे संदीप
पहिले कडवे आवडले, बाकी सगळे बाऊन्सर!
Sandy
5 Jan 2017 - 3:00 pm | प्राची अश्विनी
सुरेख!
5 Jan 2017 - 4:28 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाह!
वाचताना राग नै आला ! ;)
5 Jan 2017 - 6:40 pm | एस
सुंदर.
10 Jan 2017 - 9:45 pm | कवि मानव
खूपच छान... आवडली