ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे.. !

सुहास झेले's picture
सुहास झेले in दिवाळी अंक
31 Oct 2015 - 7:03 am

.
.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.

महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.

महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना - म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.

1
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे 'पुरंदरचा तह'!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या - म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते - “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.

स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना - म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

2
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर - म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.

हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा... अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.

संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.

3
तुळापूर - संभाजी महाराजांचे स्मारक

केशव पंडितांनी लिहिलेल्या 'राजारामचरितम्' ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे -

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||

अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम..
-----------------------------------------
लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विले-पारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ आणि ३ साभार विकिपीडिया आणि प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे (http://www.kaustubhkasture.in/)

-----------------------------------------
मला कल्पना आहे, हा लेख प्रमाणाबाहेर मोठा झालेला आहे, पण हात आखडता घेणे जमले नाही. मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिव इतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :

~ सुझे !!
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

10 Nov 2015 - 8:53 am | विशाल कुलकर्णी

जियो अण्णा ! अप्रतिम झालाय रे लेख ...
शंभुराजांबरोबर तुझ्या लेखनाला सुद्धा मानाचा मुजरा रे भावा _/\_

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2015 - 1:05 am | अत्रुप्त आत्मा

+१
पूर्ण सहमत

खटपट्या's picture

10 Nov 2015 - 12:38 pm | खटपट्या

खूप छान आढावा...

नूतन सावंत's picture

10 Nov 2015 - 3:34 pm | नूतन सावंत

अतिशय अभ्यासपूर्ण सुरेख लेख.तुमचे आभार.

पैसा's picture

10 Nov 2015 - 11:27 pm | पैसा

अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात पराक्रमी पित्याने मिळवलेले राज्य केवळ राखलेच नव्हे तर त्यात बरीच भरही घालणार्‍या आणि एकाच वेळी चार चार आघाड्यांवर लढून शत्रूला नामोहरम करणार्‍या या तेजस्वी राजाचे खरे मूल्यमापन इतिहासात फारसे झालेच नाही.

गोव्याच्या संदर्भात तर त्यांना थोडी सवड मिळाली असती तर पोर्तुगीजांचे दुकान तेव्हाच बंद झाले असते. पोर्तुगीजांनी संभाजी राजांचा डिचोलीत असलेला वाडा हातात पडताच जाळून राख करून टाकला, आणि फोंड्याच्या मर्दनगडाचा एक दगडही शिल्लक राहू दिला नाही. यावरून त्यांना या मराठी राजाची आणि त्याच्या प्रेरणेने उभ्या रहाणार्‍या लोकांची किती भीती होती हे सिद्ध व्हावे.

लेख आवडलाच! एका अलौकिक राजाबद्दल अतिशय सुरेख लेख!

प्रचेतस's picture

11 Nov 2015 - 11:25 am | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.

कमल गोखले ह्यांनी लिहिलेल्या 'छत्रपती संभाजी' ह्या चरित्रामधेही राजांवरील बरेच आक्षेप साधार पुराव्यांनिशी खोडून काढले आहेत.

मुघल, सिद्दी, इंग्रज आणि पुर्तुगेज ह्या चार सत्तांना सतत ९ वर्षे झुंज देउन स्वत:च्या हयातीत आपला प्रदेश शत्रूच्या हाती न जाऊ देता त्याचा कांकणभर अधिक विस्तारच करणे हे कोणा येरागबाळ्याचे काम निश्चितच नव्हे.

अभ्या..'s picture

11 Nov 2015 - 12:19 pm | अभ्या..

+१
सुरेख लेखन सुहास.
शंभूराजांना मानाचा मुजरा

पण का कुणास ठाऊक, (तसा उल्लेख होणं योग्य की अयोग्य, चूक की बरोबर, माहिती नाही. पण) संभाजीमहाराजांच्या नावासमोर लावलेली धर्मवीर पदवी उगाचच खटकते.
आणि त्या पदवीच्या आधाराने संभाजीराजांचं नाव घेत चालू असणारा उन्मादही.

धर्मवीर ही पदवी चुकीची वाटते.
ऐतिहासिक दस्तावेजांमधे औरंगजेबाने इस्लाम स्वीकारण्याची अट घातलेली दिसत नाही. त्याच्या मुख्य अटी दोन होत्या- स्वराज्यातील सर्व किल्ल्यांचा ताबा आणि औरंगजेबाकडील जे लोक राजांना फितूर झाले होते त्यांची नावे सांगणे.

तसाही राजांचा मृत्यु निश्चित होता कारण बर्हाणपुर,नगर इत्यादि ठिकाणच्या लुटींमधे काही मुसलमान, मौलवींचाही राजांच्या सैन्याकडून वध झाला होता त्यामुळे संभाजीराजांना मृत्युदंड देण्यासाठी औरंगजेबावर मुल्ला मौलवींचा जबरदस्त दबाव होता.

राजांनी मृत्यु स्वीकारला तो केवळ स्वराज्यासाठीच ह्यात काहीच शंका नाही.

तुषार काळभोर's picture

11 Nov 2015 - 1:23 pm | तुषार काळभोर

हे नक्कीच व्यावहारिक वाटतं.
(विश्वास पाटलांच्या संभाजीमध्ये औरंगजेबाची 'स्वराज्याचा खजिना' ही पण एक मागणी आहे. पण ते वाचताना पटलं नव्हतं. तत्कालीन स्वराज्याच्या कैकपट विस्तार, वसूली व खजिना असणार्‍या व जगात पहिल्या तीन सम्राटांत गणल्या जाणार्‍या औरंगजेबाकडून खजिन्यासाठी त्यांचा छळ होईल असे वाटत नाही)

मोगा's picture

11 Nov 2015 - 6:13 pm | मोगा

दोन्ही पक्षाचे राजे स्वतःचे राज्य , पैसा यासाठीच लढले व पुढे ती सर्व स्थावरजंगम इस्टेट त्यांच्या वारसांची प्रॉपर्टी बनली.

त्यामुळे दोन्ही पक्षांबद्दल सारखाच आदर आहे , रादर , मोघलांबद्दल कणभर जास्त आदर आहे.

काळा पहाड's picture

13 Nov 2015 - 12:51 am | काळा पहाड

हाड तुज्यायला...

विशाल कुलकर्णी's picture

13 Nov 2015 - 2:02 pm | विशाल कुलकर्णी

हाड तुज्यायला...
+१००

मोगा's picture

13 Nov 2015 - 10:26 pm | मोगा

देव देस अन धर्म हे त्याकाळचे चुनावी जुमले होते.

याॅर्कर's picture

14 Nov 2015 - 8:21 pm | याॅर्कर

वरचे तीन प्रतिसाद हे आजपर्यंतचे सर्वात दर्जेदार प्रतिसाद आहेत.

सुबोध खरे's picture

14 Nov 2015 - 8:22 pm | सुबोध खरे

हितेसराव
मुघल कोणत्या "देस" साठी लढत होते?
इस्लामला "मातृभूमी" मान्य नाही

DEADPOOL's picture

4 Dec 2015 - 2:49 pm | DEADPOOL

हाड तुज्यायला...-+++++++१
अत्यंत काळजापासून!

Sanjay Uwach's picture

11 Nov 2015 - 11:54 am | Sanjay Uwach

एक ऐतिहासिक सुंदर लेख. मनापासुन आवडला

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 12:11 pm | टवाळ कार्टा

_/\_

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Nov 2015 - 12:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

अण्णा लेका!! शब्द संपले!! अंगावरले केस ताठ उभे झालेत सरारुन काटा आलाय अंगावर! मराठी जिद्द

_________/\_________

अन आपले शंभुराजे

_____________/\_________________

औरंग्यानं कितीही भीती घातली , हाल केले तरी संभाजी राजांनी धर्म राखला म्हणून आपल्याला फार कौतुक वाटतं . त्याबद्दल त्यांना सलाम . पण हि वेळ संभाजी राजांनीच आणली होती . त्यांनी जे उद्योग चालवले होते त्यामुळे रयतेची आणि सैनिकांचीच संभाजी राजपदावरून पायउतार व्हावा अशी इच्छा होती . माझ्याकडे एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे . थोडा वेळ द्या शोधायला . सापडला कि पुढचं टाईपिन. मला तरी शिवाजी महाराजांचा जेवढा आदर वाटतो तेवढा संभाजीचा मुळीच वाटत नाही .

कुणास कोणत्या फाट्याने कोणत्या वळणावर वळून कोणता रस्ता पकडावयाचा आहे, ते सूज्ञपणे ज्याचे त्याने
ठरवावे.
.
.
.
.
.
अभ्यासपूर्ण लेख आम्हीही वाचलेत बरं,
थोडक्यात काय मत-मतांतरे ही असणारच.

सुहास झेले's picture

11 Nov 2015 - 2:20 pm | सुहास झेले

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्या दोघांची तुलना करणेच मुळात चूक आहे.

त्यांनी जे उद्योग चालवले होते त्यामुळे रयतेची आणि सैनिकांचीच संभाजी राजपदावरून पायउतार व्हावा अशी इच्छा होती

वाचायला आणि चर्चा करायला नक्कीच आवडेल. आशा आहे त्या लेखकाने सोबत पुरावेही दिले असतील प्रमाण म्हणून :)

भंकस बाबा's picture

11 Nov 2015 - 3:03 pm | भंकस बाबा

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारसरणीत जमीन आसमान चा फरक होता. शिवाजी राजांनी एकावेळी एकाच शत्रुशी लढने ही नीती वापरली. संभाजीनी मात्र एकाचवेळी अनेक आघाड्या उघडल्या. नेमका हाच मुद्दा संभाजी राजाच्या सैन्याच्या पचनी पडला नसावा. सतत नऊ वर्षे एकाच नव्हे तर अनेक आघाडीवर लढने हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे. त्यामुळे संभाजी राजाची व् शिवाजी राजाची तुलना करणे चुकीचे आहे. मुत्सदीपणात शिवाजिमहाराजाच्या जवळपास कोणी पोहचु शकत नाही तसेच प्रखर धर्माभिमानात संभाजी राजे महान आहेत.
जाता जाता एक माझे मत
जर संभाजी राजानी गनिमि काव्याचा एक भाग म्हणून इस्लाम स्वीकारला असता तर काय उभ्या महाराष्ट्राने त्यांचा स्विकार केला असता?
उदा. मोजमापात मोजायचे झाले तर पहिल्या बाजीरावाने गाजवलेला पराक्रम हां सर्वोत्तम मानला पाहिजे पण त्याला आपल्या इतिहासात अनुल्लेखाने मारले जाते.कारण काय तर त्याने मस्तानीशी केलेला विवाह. जगातील सर्वोत्तम पाच लढाईत बाजीरावाने केलेल्या निजामाच्या लढाईचा समावेश आहे. आज आपल्या पिढीला नेपोलियन माहीत असतो पण बाजीराव नाही . टीपू सुलतान वर इतिहासाची पाने खर्च केली जातात बाजीरावावर नाही

मालोजीराव's picture

12 Nov 2015 - 2:01 pm | मालोजीराव

हि वेळ संभाजी राजांनीच आणली होती . त्यांनी जे उद्योग चालवले होते त्यामुळे रयतेची आणि सैनिकांचीच संभाजी राजपदावरून पायउतार व्हावा अशी इच्छा होती .

१६८३ साल पासून महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला होता,प्रजेला खायला अन्न नव्हते. संभाजी महाराजांनी जिंजी हून धान्य मागवले, फ्रेंचांकडून कर्ज घेतले, दक्षिण स्वारी करून १ कोट होन उभे केले.प्रजेसाठी एव्हड कोण करत.

फार लांब कशाला जा महाराष्ट्रात दुष्काळ असताना जुन्या सरकारने आणि आताच्या सरकारने काय दिवे लावलेत ते लोकांसमोर आहेच.

सुहास झेले's picture

12 Nov 2015 - 4:12 pm | सुहास झेले

अगदी अगदी...पण हल्ली स्वघोषित इतिहासकार खूप वाढले आहेत, त्यामुळे इतिहास नव्याने लिहला जातोय ... वर म्हटल्याप्रमाणे जो लेख आहे तो मी वाचला आहे.. इमेलमध्ये आलेला, तरी तो लेख आणि पुरावे आल्यास आपण खातरजमा करूच की :)

म्हणजे मराठा साम्राज्य अगदीच गरीब नव्हते हे नक्की.

शिवाय इतकी वर्षे लोकांचे कर , स्वार्‍या यातून कलेक्शन केले असेलच ना ?

मग अचानक दुष्काळ पडला तर पुन्हा कर्ज कशाला ?

मालोजीराव's picture

13 Nov 2015 - 3:08 pm | मालोजीराव

५-६ लाखांच्या सैन्याशी भारत सरकार तरी कधी लढल्य का ओ?

कारगिल युद्धाच्या वेळीच नाकी नऊ आलेले खर्चानी...

होबासराव's picture

4 Dec 2015 - 3:31 pm | होबासराव

ए हाssssssड बाटग्या..हाssड

DEADPOOL's picture

4 Dec 2015 - 2:50 pm | DEADPOOL

हाड तुज्यायला...again

एस's picture

11 Nov 2015 - 2:27 pm | एस

अनेक अर्थांनी जबरदस्त लेख! संभाजीराजे आणि राजाराममहाराजांच्या राजमुद्रांचे वाचन आणि अर्थ सांगितला तर आभारी असेन.

मालोजीराव's picture

11 Nov 2015 - 2:57 pm | मालोजीराव

अण्णा लेख एकदम जबरी झालाय, एका लेखात संभाजी राजांची कारकीर्द उलगडून दाखवणे सर्वांनाच जमत नाही…मुजरा स्वीकार करा !

प्रची १ च्या संभाजीराजेंच्या चित्राचं १४ मे २०१३ साली आपणच लोकार्पण केलेलं आहे _/\_ , मूळ चित्र ब्रिटीश लायब्ररी येथे आहे. (मूळ चित्राची स्थिती अत्यंत वाईट असल्याने हे नव्याने पेंटिंग तयार केले )

'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा' हे आतापर्यंतच सर्वोत्कृष्ठ शंभूचरित्र आहे,कवी कलश हा भाग वगळता हे पुस्तक हायली रेकमेंडेड आहे. कलशाला यात वाममार्गी रंगवण्यात आलेल आहे आणि त्याच्यामुळे संभाजी राजेंवर विपरीत परिणाम झाले असे दर्शवण्यात आलय…हा भाग काही पटला नाही.

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा — राजमुद्रा

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

मराठी मध्ये अर्थ:
शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे,तिच्या प्रभावामुळे सर्व सत्ता तिच्यासमोर झुकल्या आहेत. अशी हि राजमुद्रा सर्व प्रजेवर संरक्षणाचे छत्र बनून आहे.

Shambhumudra English -
The power of this royal seal of 'Sambhaji-Son of Shivaji' is immeasurable like sky, Its prevalence acting as protection for 'Swarajya' and its glory forced other empires to kneel down (show respect)

सुहास झेले's picture

11 Nov 2015 - 6:00 pm | सुहास झेले

बातमी पेपरात वाचली होतीच... त्याबद्दल कितीही कौतुक केले तरी शब्द कमी पडतील. पुन्हा एकदा आभार रे !!

उगा काहितरीच's picture

11 Nov 2015 - 6:16 pm | उगा काहितरीच

अतिशय उत्कृष्ट लेख ! प्रचंड आवडला .

स्वाती दिनेश's picture

11 Nov 2015 - 11:31 pm | स्वाती दिनेश

शंभूराजांवरचा लेख फार छान झाला आहे,
स्वाती

सातारकर's picture

12 Nov 2015 - 9:28 am | सातारकर

झकास शैली आहे अण्णा.
प्रस्तुत काळातिल भावनांच्या पलिकड जाउन उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अत्यंत स्त्युत्य आहे.

मुक्त विहारि's picture

12 Nov 2015 - 9:39 am | मुक्त विहारि

तुमचे लेख नेहमीच वाचनीय असतात..

हा पण लेख त्याला अपवाद नाही...

Sabhajiraje

मालोजीराजे,
मूळ चित्र काही खराब झालेले नाहीये, अगदी छान दिसतेय (स्वतः पाहिले आहे)

अजून काही माहिती इथे सापडेल
http://britishlibrary.typepad.co.uk/asian-and-african/2014/04/an-album-o...

मालोजीराव's picture

12 Nov 2015 - 1:29 pm | मालोजीराव

मालक, मूळ चित्रामध्ये संभाजीराजांच्या चेहऱ्यावर १५ पेक्षा जास्त patches आहेत आणि पूर्ण चित्रावर ५० पेक्षा जास्त.
चित्रासंदर्भात ब्रिटीश लायब्ररीशी बोलणं झालेलं त्यांच्या म्हणण्यानुसार हि हे चित्र 'रेडी तो डाय' परिस्थितीत होतं.
डॉ.जेरेमी लोस्टी यांनी १९८६ साली हे चित्र प्रथम प्रसिद्ध केलेल. माझ्या मते तरी नव्याने मूळ चित्राची प्रतिकृती निर्माण करणं योग्य निर्णय होता.

सुमीत भातखंडे's picture

12 Nov 2015 - 2:18 pm | सुमीत भातखंडे

वर दिलेल्या दुव्यामधे दोन चित्रांचा उल्लेख आलाय.

"Portraits of Sambhaji are very rare, but two formerly in the royal Satara collection are now in the History Museum of Marathwada University, Aurangabad (Deshmukh 1992, pls. I. IIIA). The former is a standard Golconda/Hyderabad sort of portrait, but the second showing him seated with his young son Sahu (pl. IIIA), painted probably in the early 18th century by a Maratha artist"

ह्या दुसर्या चित्राची फोटो कॉपी आहे का कुणाकडे? बघायला आवडेल.

मालोजीराव's picture

12 Nov 2015 - 4:23 pm | मालोजीराव

sambhaji painting 2

सुमीत भातखंडे's picture

12 Nov 2015 - 4:46 pm | सुमीत भातखंडे

.

सुमीत भातखंडे's picture

12 Nov 2015 - 11:21 am | सुमीत भातखंडे

अत्यंत अभ्यासपूर्ण लेख.

संभाजीराजांच्या कारकिर्दीमधली सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे जेव्हा ते पकडले गेले तेव्हापासून ते त्यांना औरंगजेबासमोर उभं करेपर्यंत त्यांना वाचवण्याचा एकही प्रयत्न कसा नाही झाला. मधे काही दिवस गेले असतीलच ना? वाटेत कुठे अचानक हल्ला करून राजांना सोडवता आलं नसतं का?

शृंगारपुरात राजांना पकडले ते मळे घाटातून त्यांना घाटमाथ्यावर आणि तिथून थेट पेडगावपर्यंत नेईस्तोवर मुघल फौजांना वाटेत ठिकठिकाणी मराठा सैन्याच्या तुकड्यांचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. मळे घाटातून मराठा सैन्याने लगेच पाठलाग करण्याचाही प्रयत्न चालू केला होता. पण मुघल फौजांपुढे हे प्रयत्न तोकडे पडले असावेत. संगमेश्वराच्या आसपास तेव्हा मराठी फौजाही संख्येने जास्त नसाव्यात असा कयास आहे. गणोजी शिर्के हा शृंगारपुरातलाच मूळचा असल्याने त्याला मळे घाटाची खडानखडा माहिती होती. आजही तुम्ही मळे घाटाने जाऊन पहा. शृंगारपूर ते मळे घाट ते वरती पाथरपुंज इत्यादी सर्व रस्ता आजही प्रचंड घनदाट जंगलातून जाणारा आहे.

प्रचेतस's picture

12 Nov 2015 - 2:13 pm | प्रचेतस

अगदी सहमत.
मुकर्रबखानाने संभाजीराजांना मळेघाटातून अगदी झपाट्याने नेले. विशाळगडावर महाराजांचे मोर्चे लागलेले होते पण खानाच्या वेगापुढे तेही थिटे पडले. पुढे कोल्हापूरला मुघलांची छावणी होतीच त्यामुळे कोल्हापूरहून पेडगावपर्यंतचा मुघलांचा मार्ग खूपच सुलभ होता.

असंका's picture

12 Nov 2015 - 12:43 pm | असंका

अत्यंत सुरेख लेख.
आपल्याला अनेक धन्यवाद.

(पण आपण म्हणलात त्याच्या पूर्ण उलट, लेख फारच छोटा झाला आहे. अजून वाचायला आवडेल.)

संदीप डांगे's picture

12 Nov 2015 - 3:33 pm | संदीप डांगे

तुडतुडींनी वेगळाच इतिहास वाचलेला दिसतोय. अर्थातच नेहमीप्रमाणे पुरावे तर मिळणार नाहीतच, फक्त आपल्या मनातली भडास इथे मोकळी केली की झाले.

अद्द्या's picture

12 Nov 2015 - 10:46 pm | अद्द्या

सुंदर लेख . .

संभाजी राजांबद्दल वाचताना कायम काटा येतो अंगावर . .

बाकी त्यांना व्यसनी बाईलवेडा थिल्लर म्हणणाऱ्या लोकांना देण्या इतक्या शिव्या हि येत नाहीत . असो .

मस्तच लेख

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2015 - 11:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम लेख ! इतिहासाची आपल्या स्वार्थाकरिता मोडतोड करणार्‍यांची कीव येते.

सुबोध खरे's picture

14 Nov 2015 - 8:26 pm | सुबोध खरे

+१००