Skip to main content

दिल्ली विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 09/02/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या धाग्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे अशा स्वरूपाची चर्चा होईल.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास पहिले कल हाती यायला लागतील.जसे कल येतील त्याप्रमाणे ते या धाग्यावरील प्रतिसादात लिहेन. तेव्हा सुरवात करू उद्या सकाळी. धन्यवाद क्लिंटन

वाचने 38092
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल यांच्या तुलनेसाठी खालील अंदाज देत आहे. मतदानोत्तर चाचणीचे विविध वाहिन्यांचे अंदाज (१) इंडिया टीव्ही - सी-व्होटर आआपः ३१-३९, भाजपः २७-३५, काँग्रेसः २-४ (२) इंडिया टुडे - सिसेरो आआपः ३५-४३, भाजपः २७-३५, काँग्रेसः ३-५ (यात आआप व भाजपच्या सरासरी जागांची बेरीज ७० आहे. काँग्रेसला ३-५ जागा कशा मिळणार?) (३) एबीपी-नेल्सन आआपः ३९, भाजपः २८, काँग्रेस: ३ (४) टुडेज चाणक्य आआपः ४२-५४ (४०-४६% मते), भाजपः १६-२८ (३४-४०% मते), काँग्रेसः ०-२ (१०-१६% मते) (५) न्यूज नेशन आआपः ३९-४३, भाजपः २५-२९, काँग्रेसः १-३ (६) इंडिया न्यूज - अ‍ॅक्सिस आआपः ४६-६०, भाजपः १०-२४, काँग्रेसः ०-२ (७) डाटा माईनिरो आआपः ३१, भाजपः ३५, काँग्रेसः ४

In reply to by श्रीगुरुजी

यातला फक्त इंडिया न्यूज-अ‍ॅक्सिस चा अंदाजच प्रत्यक्ष निकालांच्या किंचितसा जवळ आहे. बाकीचे अंदाज मोठ्या फरकाने चुकलेत.

भाजप (४५% शक्यता) किंवा आप (५५% शक्यता) ३६ ते ३७ जागा मिळवुन सरकार बनवणार.

अमित शहा साहेबांनी काय तर ' परचा कार्यकर्ता' प्रयोग केला होता असे एका न्यूज चानेल वर दाखवत होते . म्हणजे प्रत्तेक कार्यकर्ता ला ४०-५० घरे दिली होती आणि ती त्या कार्यकर्ता ची जबादारी कि त्या सगळ्यांनी वोट केलेच पाहिजे . शेवटच्या ४-५ तासात या ' परचा कार्यकर्ता' नि बरेच कष्ट केले , त्याचा फायदा भाजपा मिळणार अशी बातमी होती. अमित शहा नि हा प्रयोग गुजरात मध्ये पण केला होता आधी

किती वेळ उरलारे?

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: १ आआप: ० भाजप: १ कॉंग्रेस: ० भाजपचे विजेन्द्र गुप्ता रोहिणी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. २०१३ मध्ये आआपने रोहिणीची जागा जिंकली होती. बहुदा पहिल्यांदा पोस्टल मते मोजली जात आहेत.

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ४ आआप:४२ भाजप: २ कॉंग्रेस: ० भाजपचे विजेन्द्र गुप्ता रोहिणी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. २०१३ मध्ये आआपने रोहिणीची जागा जिंकली होती. मंगोलपुरीमध्ये आआप आघाडीवर आहे. या दोन्ही जागा २०१३ मध्ये आआपने जिंकल्या होत्या. जनकपुरीमधून भाजपचे जगदीश मुखी आघाडीवर आहेत.

मालवीय नगर मधून आआपचे सोमनाथ भारती आघाडीवर.

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ७ आआप: ३ भाजप: ३ कॉंग्रेस: १ कॉंग्रेसचे ए.के.वालिया लक्ष्मीनगरमधून आघाडीवर.

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: १६ आआप: ७ (-३) भाजप: ६ (+१) कॉंग्रेस: २ (+१) बसपा: १ (+१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: २० आआप: १० (-२) भाजप: ७ (०) कॉंग्रेस: २ (+१) बसपा: १ (+१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. या क्षणी एकदम चुरशीची लढत चालू आहे. आआपचा स्वीप नक्कीच वाटत नाही. मागच्या वेळी जिंकलेल्या दोन जागांवर आआप पिछाडीवर आहे.

:: कल :: आप २६ बीजेपी १५ कॉंग्रेस १ Total TV News (दिल्लीचे लोकल न्युज चॅनल)

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: २२ आआप: १० (-२) भाजप: ९ (+१) कॉंग्रेस: २ (+१) बसपा: १ (+१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आआपचे राखी बिडलान,सोमनाथ भारती,मनीष सिसोदिया आघाडीवर.

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: २६ आआप: १४ (+१) भाजप: ८ (-२) कॉंग्रेस: ३ (+१) बसपा: १ (+१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आतापर्यंतचे चित्र-- १. आआपने आघाडी घेतली आहे. २. कॉंग्रेसची कामगिरी इतकी वाईट नाही.

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: २९ आआप: १६ (+३) भाजप: ९ (-४) कॉंग्रेस: ३ (+१) बसपा: १ (+१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आतापर्यंतचे चित्र-- १. आआपने आता चांगलीच आघाडी घेतली आहे. हे कल चालू राहिले तर आआपला बहुमत मिळायला हरकत नसावी. २. कॉंग्रेसची कामगिरी इतकी वाईट नाही.

In reply to by विकास

काँग्रेस नक्की कोणाच्या जागा घेत आहे हे बघायला हवे.त्यातील एक जागा मातिया महाल आहे. तिथून शोएब इक्बाल आघाडीवर आहेत.कोणत्याही पक्षात असले तरी शोएब इक्बाल जिंकतातच. मागच्या वेळी ते जनता दल (यु) च्या तिकिटावर निवडून आले होते.

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ३६ आआप: २१ (+५) भाजप: ११ (-५) कॉंग्रेस: ५ (+१) इतर: ० (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आतापर्यंतचे चित्र-- १. आआपने आता चांगलीच आघाडी घेतली आहे. हेच कल चालू राहिले तर अरविंद केजरीवालांना पुढचे मुख्यमंत्री व्हायला हरकत नसावी. २. भाजपची कामगिरी निराशाजनक. ३. कॉंग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा बरीच चांगली.

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ४५ आआप: २९ (+८) भाजप: ११ (-८) कॉंग्रेस: ५ (+१) इतर: ० (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आतापर्यंतचे चित्र-- १. आआप ६०% पेक्षा जास्त जागांवर पुढे आहे. बहुमतापासून १० जागा लांब. २. भाजपची कामगिरी निराशाजनक. २०१३ मधील कामगिरीच्या ६०% च जागा पक्ष राखत आहे. पक्षांतर्गत भांडणांचा फटका पक्षाला बसत आहे असे दिसते. ३. कॉंग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा बरीच चांगली.

सगळ्यात ’ट्रस्टेड’ (पण सगळ्यात स्लो) इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर चार कल आले आहेत आत्तापर्यंत. delhi

भाजपला जोरदार झटका बसलेला दिसत आहे.जुनी विधानसभा बरखास्त करायला उशीर लावल्याची किंमत पक्ष नक्कीच भोगत आहे.हेच कल चालू राहिले तर भाजपला २० च्या आसपास जागा मिळतील.लोकसभेत पक्ष ६० जागांवर आघाडीवर होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे गणित वेगळे असले तरी ६० पासून २० म्हणजे जोरदार आपटी पक्षाने खाल्लेली दिसत आहे.

In reply to by क्लिंटन

बरखास्त करायला उशीर करणे आणि किरन बेदी ह्यांना पुढे करणे दोन्ही कारणांचा फटका बसला.

अजूनही बरंच काही घडू शकते. उलटफेर होऊ शकते. पण हा शेर आठवला. सामने तन के जिस दिन खडी हो गई एक पर्वत से राई बडी हो गई -- किशन तिवारी

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ५० आआप: ३५ (+१३) भाजप: ११ (-११) कॉंग्रेस: ४ (-१) इतर: ० (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आतापर्यंतचे चित्र-- १. आआप बहुमताच्या सीमेवर. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री नक्कीच होणार.पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळणार असे दिसते. २. भाजपला प्रचंड मोठा झटका. कामगिरी निराशाजनक. भाजप वीसपेक्षा आत आटपणार असे दिसते. आम आदमी पक्षाचे अभिनंदन आणि अरविंद केजरीवालांना शुभेच्छा. यावेळी आक्रस्ताळेपणा न करता कारभार करावा ही अपेक्षा.

भाजप 09 आप 38 कॉंग्रेस 02 ABP News

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ५६ आआप: ४२ (+१७) भाजप: ११ (-१३) कॉंग्रेस: ३ (-३) इतर: ० (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आम आदमी पक्षाने ३५ चा आकडा पार केला आहे.भाजपने आता मागच्या वेळी जिंकलेल्या अर्ध्यापेक्षाही कमी जागांवर आघाडी आहे. किरण बेदी आणि अजय माकन हे दोघेही पिछाडीवर आहेत. तर अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत. कृष्णानगर हा भाजपचा अगदी सर्वात सुरक्षित मतदारसंघ होता.१९९८ मध्येही भाजपने ही जागा जिंकली होती. या मतदारसंघातून भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच मागे असणे म्हणजे अमेठीतून राजीव गांधी पिछाडीवर असल्यासारखे झाले.भाजपची कामगिरी १९९८ पेक्षा इतकी झाली तरी खूप झाले.

:) केजरीवालांवर खुन्नस खाऊन त्यांना त्रास देण्यापेक्षा केंद्राने, विशेषतः मोदिंनी, केजरीसाहेबांना उत्तम सहकार्य करावं अशी भाबडी इच्छा आहे... चान्सेस कमि आहेत पण :(

टाइम्स नाउ वर भाजपा एक आकडी तर आआप ३० वर आघाडी आहे!!!! याचे पाप मोदींच्या माथी मारता येऊ नये म्हणून बेदींना मध्ये घातल्याची चाल त्या अर्थाचे कदाचित मोदींसाठी फेससेव्हर ठरली तरी पक्षासाठी इतके खासदार, स्वतः मोदी मैदानात प्रचाराला उतरूनही झालेला हा पराभव भयंकर नामुष्कीचा आहे! गुजरात विधानसभेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मोदीं विरूद्ध राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष (राहुल, सोनिया, पंतप्रधान वगैरे)प्रचंड प्रमाणात प्रचारात उतरले असूनही एकटे मोदी हिरो म्हणून राजकीय प्रतलावर उभारले गेले. दिल्लीत त्याचीच पुनरावृत्ती होतेय फक्त भाजपा आता दुसर्‍या बाजूला आहे.

भाजपला ११ जागी आघाडी दिसत आहे त्यापैकी एक जागेवर (राजौरी गार्डन) शिरोमणी अकाली दल आघाडीवर आहे. म्हणजे खुद्द भाजपला १० जागांवरच आघाडी आहे. भाजप १९९८ पेक्षाही मागे पडणार म्हणजे भाजपचा धुव्वा उडाला असे म्हणायला हवे.

मी राजकारण फॉलो करायला सुरवात केली तेव्हापासून (१९८९) मी दिल्ली हा भाजपचा हक्काचा बालेकिल्ला आहे असे समजतच मोठा झालो होतो.१९८९ मध्ये ७ पैकी ४, १९९१ आणि १९९६ मध्ये ७ पैकी ५, १९९८ मध्ये ७ पैकी ६ आणि १९९३ मध्ये विधानसभेत ७० पैकी ४९ जागा अशी पक्षाची कामगिरी होती.नंतर कळले की १९६७ मध्येही जनसंघाने दिल्लीत ७ पैकी ५ जागा जिंकल्या होत्या. एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी नवी दिल्लीतून निवडून गेले होते.या पार्श्वभूमीवर १९९८ च्या विधानसभा निवडणुका म्हणजे भाजपबरोबरच माझ्या या विश्वासालाही बसलेला मोठा धक्का होता. १९९९ मध्ये भाजपने दिल्लीतील ७ पैकी ७ जागा जिंकल्या तेव्हा वाटले की १९९८ च्या विधानसभा निवडणुका म्हणजे एक अपवाद होता.पण नंतरच्या काळात मात्र माझ्या त्या कल्पनेला पूर्ण तडा गेला.तेच अजूनही चालू आहे असे दिसते.

आआपला ५०% हून अधिक मते आहेत असे म्हटले जातेय तसे असेल तर तिरंगी लढतीत अशी मते मिळणे ऐतिहासिक आहे एकूणच भाजपाच्या एकट्या केजरीवालांना टारगेट करणार्‍या पर्सनल, भडक नी आक्रस्ताळ्या भाजपीयांच्या सोशल मिडीयावरील (प्रसंगी बिलो द बेल्ट) प्रचाराला दिल्लीकरांनी धूप घातलेली दिसत नाही

In reply to by ऋषिकेश

तसे असेल तर तिरंगी लढतीत अशी मते मिळणे ऐतिहासिक आहे तिरंगी कसली? काँग्रेस गेल्या विधानसभेपासूनच लांब गेली आहे. तरी देखील ५०% हून अधिक मते मिळणे नक्कीच स्पृहणीय आहे. पण तिरंगी म्हणवत नाही. एकूणच भाजपाच्या एकट्या केजरीवालांना टारगेट करणार्‍या पर्सनल, भडक नी आक्रस्ताळ्या भाजपीयांच्या सोशल मिडीयावरील (प्रसंगी बिलो द बेल्ट) प्रचाराला दिल्लीकरांनी धूप घातलेली दिसत नाही सहमत. यात अजून असे देखील म्हणेन की किरण बेदींना घेण्याचा मास्टरस्ट्रोक ठरला नाही... मागच्या वेळेस हर्ष वर्धन यांची उमेदवारी ठरवण्यात वेळ लावला आता बाहेरून आयात केलेले नेतृत्व आणण्याची चूक दोन्हीचा परीणाम तोच. मेक इन भाजपा पेक्षा आयातीचा दुष्परीणाम अधिक झालेला दिसतोय.

जो काम करेल, लोक त्याला वोट करतील. दिल्लीने हे दाखवून दिले आहे. असभ्य, अभद्र आणि सांप्रदायिक प्रचार करणार्‍यांना जनतेने धडा शिकवला आहे असंच दिसतंय कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली, त्यांना सलाम - संजय सिंह, आप अजय माकन यांनी राजिनामा दिला. - बातमी

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ६५ आआप: ४९ (+२२) भाजप: १३ (-१६) कॉंग्रेस: २ (-५) इतर: १ (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.

In reply to by क्लिंटन

योगेंद्र यादव यांचा अंदाज बरोबर येणार की काय? भारतीय मतदाराला व्यक्तिगत व वैयक्तिक टिका एका मर्यादेपलिकडे आवडत नाही हे २००४ ला काही प्रमाणात सोनियांनी पुन्हा समोर आणलेले सत्य दिल्लीत अधिक प्रकर्षाने जाणवतेय असे म्हणावे काय? भाजपा २००४ पासून फारसा शिकला नाही

In reply to by ऋषिकेश

याचाच व्यत्यास म्हणजे ज्याप्रमाणे मागच्या लोकसभा निवडणुकी पूर्वी ज्याप्रमाणे सोशल मिडिया वर मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध अतिशय किळस येईल अशी बदनामी मोहीम राबवण्यात आली तशीच मोहीम यावेळेस अमित शह आणि मोदी यांच्याविरुद्ध चालवण्यात आली . दोघांची अक्षरशः लक्तर काढली गेली . सोशल मिडिया च हत्यार भाजप वरच उलटल . भाजप न जे पेरल ते उगवलं अस म्हणता येईल

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ६७ आआप: ५२ (+२३) भाजप: १३ (-१७) कॉंग्रेस: १ (-५) इतर: १ (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. सुरवातीला अमित शहांनी दिल्लीसाठी ’मिशन ६०’ लॉंच केले होते.बहुदा आआपने ते मिशन बरेच सिरियसली घेतले असे म्हणायला पाहिजे.

सरकारी कर्मचारी मतदार मोठ्या संख्येने आहेत असे ३ ते ४ मतदारसंघ आहेत तिथे भाजप पिछाडिवर आहे वेळेवर कचेरीत जाणे , उशिरापर्यंत थांबावे लागणे या कारणांनी त्यांचा मोदी सरकारवर रोष होता म्हणे ,.. आता हसावे कि रडावे

संघकार्यकर्त्यांनी कमावले साध्वी-महाराजांनी गमावले. मफ्लरने कमावले महागड्या कोटाने गमावले. संघकामाने कमावले बूथ-बंदोबस्ताने गमावले. रास्वसंने कमावले विहिंपने गमावले. इ.इ.

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ६८ आआप: ५४ (+२७) भाजप: १२ (-१८) कॉंग्रेस: १ (-७) इतर: १ (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.

आआपच्या झंझावातात भाजप पालापाचोळ्यासारखा उडून गेला असे चित्र आहे. या निकालाचे अन्वयार्थ पुढीलप्रमाणे: १. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडगोळी अजिंक्य आहे या कल्पनेच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत. २. एप्रिल-मे २०१४ मध्ये पक्षाला लोकांनी भरभरून मते दिली ती नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान होतील या आशेवर दिली होती. साध्वी निरंजन ज्योती यांच्यासारख्या नेत्यांनी लोकांची मते त्यांच्या विचारांना होती असा त्याचा अर्थ घेऊन कट्टर हिंदुत्वाचा प्रचार केला.नरेंद्र मोदींना ही गोष्ट फारशी आवडलेली नाही अशा बातम्या आहेत पण त्यांनी अशा तत्वांविरूध्द तितक्या प्रमाणावर assertiveness दाखविलेला नाही.यातून असा अर्थ निघू शकेल की एकतर नरेंद्र मोदींचा स्वत:चा त्याला पाठिंबा आहे नाहीतर नरेंद्र मोदी जितके बलदंड नेते आहेत हे चित्र उभे केले होते तितके प्रत्यक्षात ते नाहीत-- शेखर गुप्ता एन.डी.टि.व्ही वर बोलताना म्हणाले. नरेंद्र मोदींना ही परिस्थिती बदलायला हवी. ३. बिहारमध्ये जनता दल (युनायटेड) मध्ये अंतर्गत भांडणे आहेत.अशा बातम्या आहेत की भाजप जीतनराम मांझींना आपल्या कळपात घेऊन निवडणुकांना सामोरे जाणार आहे. दिल्लीचा अनुभव लक्षात घेता अशा बाहेरच्या मंडळींना बरोबर घेणे धोक्याचे आहे हे समजून भाजपने तसे काही करण्यापेक्षा जनता दलात जी काही भांडणे चालू आहेत ती मजा बाहेरून बघावी आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुकांना आपल्याच हक्काच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जावे. ४. आम आदमी पक्षानेही दिल्लीत झाले ते सगळ्या भारतात होईल असे काही समजू नये.त्या अर्थाने दिल्ली बहोत दूर है. पंजाबमध्ये चार लोकसभा जागा जिंकूनही आम आदमी पक्षाने पोटनिवडणुकांमध्ये अनामत रक्कम गमावली होती हे विसरू नये.

एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ७० आआप: ५९ (+३१) भाजप: १० (-२२) कॉंग्रेस: ० (-८) इतर: १ (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. भाजप १९९८ पेक्षाही खाली आटपणार असे दिसते. लोकसभेत भाजपला ६० जागांवर आघाडी तर आआपला १० जागांवर आघाडी असे चित्र होते.हे चित्र बरोबर उलटे होणार असे दिसते.या प्रचंड मोठ्या पराभवानंतर भाजपने कारभारात सुधारणा कराव्या ही अपेक्षा. १९८४ मध्ये लोकसभेत मोठा पराभव झाल्यानंतर तीन महिन्यातच रामकृष्ण हेगडेंनी कर्नाटक विधानसभा निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या.दिल्लीत आम आदमी पक्षाच्या विजयाला हेगडेंच्या १९८५ मधील विजय हेच एक समकक्ष उदाहरण आहे असे दिसते.एन.डी.टी.व्ही वर तेच म्हटले जात आहे. कॉंग्रेसला व्हाईटवॉश मिळताना दिसत आहे. कॉंग्रेस मुख्यालयासमोर "प्रियांका लाओ देश बचाओ" अशा घोषणा चालू आहेत.तसे झाल्यास कॉंग्रेसला तात्पुरती का होईना नवसंजीवनी मिळेल आणि राजकारणाला नवे वळण लागेल असे दिसते.

बहुतांशी लोक अरविंद केजरीवालला वेडा म्हणत होते आज त्यांना नाक नसेल राह्यलं काही बोलायला... अभिनंदन कजरीवाल साहेब. -दिलीप बिरुटे

भाजपने प्रचारात एक मोठी चूक केली.केजरीवालांना टारगेट करून अरविंद केजरीवाल हे नाव कायम प्रकाशझोतात ठेवले.इतकी वर्षे नरेंद्र मोदींना असे टारगेट केल्यामुळे लोक नरेंद्र मोदी हे नाव कधीच विसरणार नाहीत याची तरतूद मोदी विरोधकांनी करून ठेवली होती आणि त्याचा फायदा नरेंद्र मोदींनाही झाला.नेमकी तीच चूक भाजपने केली.म्हणजे आआपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू केजरीवाल आणि भाजपच्या प्रचाराचाही केंद्रबिंदूही केजरीवालच.म्हणजे ही निवडणुक केजरीवालांभोवती फिरत राहिली.आआपला त्याचा फायदा नक्कीच झाला असे दिसते.

या निकालाला लोकसभा निवडणुकांच्या निकालाशेजारी ठेवले तर काही समान मुद्दे दिसतात: १. लोकप्रिय नेता असेल तर त्या नेत्याच्या नावावर मते फिरवता येतात. २. अशा नेत्याने लोकांच्या अपेक्षा खूप उंचावून ठेवल्या तर असा नेता सत्तेत असलेल्या सरकारपेक्षा लोकांना अधिक चांगला वाटतो आणि लोक भरभरून मते देतात. पण त्यानंतर जर नेत्याने स्वत:हून वाढवून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत असे चित्र असेल तर मात्र जनमत ज्या वेगाने त्या नेत्याच्या बाजूने गेले त्याच्या दुप्पट वेगाने त्या नेत्याच्या विरोधात जाऊ शकते.केजरीवालांना काही महिन्यांनी यालाच सामोरे जायचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अशा नेत्यांचा पराभव झाला तर नंतर मात्र राजकारणी पूर्ण करता येतील अशीच आश्वासने देऊन लोकांच्या अपेक्षा कितपत वाढवायच्या यावर स्वत: लगाम घालतील.भारतीय राजकारणासाठी ही एक चांगली गोष्ट असेल.

भाजप का हारल आणि आप का जिंकल - १) दिल्ली च्या निवडणुकी मध्ये स्थानिक मुद्दे शिवाय राष्ट्रीय मुद्दे पण महत्वाचे होते . मोदी सरकारच्या हनिमून पिरीयड मध्ये भाजप ने महाराष्ट्र , हरियाना आणि इतर निवडणुका पण जिंकल्या . पण आता ९ महिन्यानंतर बरीच धूळ बसली आहे . मोदी सरकार अपेक्षे इतक काम करत नाहीये हि भावना आता हळूहळू देशभर मूळ धरू लागली आहे . त्यामुळे त्याचा फटका भाजप ला बसला . २) साध्वी , स्वामी , योगी , घरवापसी , लव जिहाद , हा कोळसा जितका कमी भाजपवाले उगाळतील तितक बर . लोकसभे मध्ये विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी मोदी यांना मत दिली होती . पण मोदी विजयाचा विहिप , बजरंग दल या लोकांनी आता आपल्याला रान मोकळ असा लावला त्यामुळे मध्यममार्गी जनमानस भाजप च्या विरुद्ध गेल . ३) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शाह यांनी भाजप ने काळा पैसा वापस आण्याच जे आश्वासन दिल तो एक प्रचारात वजन आणण्यासाठी वापरलेला एक निव्वळ 'जुमला ' होता अस विधान केल . ते भाजप ला जाम भोवल . सोशल मिडीयावर या विधानावरून अमित शाह आणि मोदी यांची जाम टर उडवण्यात आली . आप ने या मुद्द्याचा वापर कौशल्याने करून भाजप निवडणुकीतली आश्वासन पाळण्यात गंभीर नाही हे लोकांच्या मनावर ठसवल . ४) भारतीय लोकांना underdog च आकर्षण असत . आप ने कौशल्याने असे चित्र उभ केल की एकट्या मफलर मन विरुद्ध पंतप्रधान , अर्ध केंद्रीय मंत्रिमंडळ , ४ मुख्यमंत्री , १२० खासदार दिल्लीच्या गल्लीबोळात प्रचार करत आहेत . त्यामुळे एकहाती लढा देणाऱ्या केजरीवाल च्या बाजूने जनमत एकवटले . ५) सोशल मिडिया जिथे भाजप मजबूत होत तिथे पण आप ने बाजी मारली . पंतप्रधान यांनी घातलेला १० लाखाचा सुट वैगेरे मुद्द्यावरून त्यांनी भाजप हा श्रीमंत लोकांचा पक्ष आहे अशी इमेज व्यवस्थित उभी केली . ६) किरण बेदी यांच parachute नेतृत्व . या बाईनी भाजप च्या स्थानिक नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना चांगली वागणूक दिली नाही . नंतर नंतर तर त्यांची तुलना राहुल गांधी यांच्यासोबत व्हयला लागली . आलिया भट ची आणि किरण बेदी ची तुलना करणाऱ्या क्लिपा मोबाइल वर फिरू लागल्या होत्या . या बाई विधानसभेला पडल्या तर ते त्यांच्यासाठीच बर राहील . कारण १० -१२ भाजप विधायकांसोबत त्या विधानसभेत काय करणार हाच प्रश्न आहे . ७) हा पराभव भाजप च 'स्तालीनग्राद ' ठरू नये . कारण मोदी आणि शाह जोडगोळी अजेय नाही हा संदेश लोकांमध्ये आणि विरोधकांमध्ये गेला आहे .

In reply to by पिंपातला उंदीर

+ १ + दिल्ली भाजपमध्ये--- विशेषतः स्वार्थी राजकारणामुळे--- जितकी अंतर्गत फूट आहे तितकी ती भारतात इतर कुठल्याच ठिकाणी नसावी. यामुळे छुप्या रितीने मते आपकडे वळवून मुख्यमंत्री उमेदवार बेदी आणि तसा उमेदवार लादणार्‍या मध्यवर्ती भाजप नेतृत्वाचे नाक कापण्याचे प्रयत्न झाल्यास आश्चर्य नाही. आपच्या भूकंपी विजयामध्ये या वस्तुस्थितीचा सहभाग नक्की आहे.

अपेक्षीत निकाल. भाजपने आता बोगस गप्पा बंद करुन खरच अच्छे दिन कसे येतील ते पहावे. वाचाळपणा करण्यापेक्षा जे काही चांगले करता येण्यासारखे असेल ते करावे. तुमचे तोंड बंद ठेवा,कामाला बोलु द्या. आंधळ्या समर्थाकांनीही साधक-बाधक विचार करावा. कल्पना आणी वास्तव काय आहे याचा विचार करावा. आपकडुन मलातरी अपेक्षा आहेत. पाहुया प्रत्यक्ष काय होतय ते.

मी राजकारण आकडेवारीच्या माध्यमातून न अभ्यासता वर्तनाच्या माध्यमातून पहातो. त्यानुसार राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मायावती, मुलायम सिंग , लालूप्रसाद ,शरद पवार व गांधी घराणे ,जयललिता याना राजकारणात आणून भारतीय मतदारानी वेळोवेळी फार मोठी चूक केली आहे व किंमत मोजली आहे असे माझे स्पष्ट मत झाले आहे. आता केजरीवाल हे जिकणार. ममतांसारखे जबरदस्त पणे जिकणार , मोदींसारखी लाट आणून जिंकणार हे नक्की. पंण ही माणसे वरील यादीपेक्षा बरी आहेत असे माझे मत झाले आहे. भारतात केमाल पाशांसारखे नेते होणे ही अपेक्षाच नाही. भारतातील राजकारण वर्ग व्यवस्थेकडे वळविण्या ऐवजी ते वर्ण व जातीव्यवथेकडे कसे जाईल याचीच काळजी १९५० च्या सुमाराला घेतली गेली आहे. सबब इथे प्रत्येक धर्माला सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळे वागण्यास वाव मिळाला आहे. हेल्मेट सक्ती सारक्या गोष्टीतही धर्म डोकावलेला आहे तर एकपत्नी पणाची बातच सोडा ! अशा वेळी केजरीवालनी एका समुदायाच्या धर्मगुरूचा पाठिंबा नाकारून इतिहास घडविला आहे. मात्र सिंहासन हे आलीशान असले तरी मुकुट काटेरी असतो याचे भान त्यानाही येईल. त्यावेळी त्यांच्या खरी परीक्षा होईल. मोदी त्या परीक्षेत नापास झाल्याचे दिसत आहे.

In reply to by विलासराव

नुकताच Whats App वर आलेला एक विनोद - मोदी यांनी केजारीवालाना फोन करून त्यांच अभिनंदन केल आणि त्यांना आपल्या टेलर चा पण नंबर दिला *lol*

लेटेस्ट आकडे आहेत आआप: ६२, भाजप: ७ आणि इतर: १. कॉंग्रेसला मागच्या वेळी ८ जागा मिळाल्या होत्या.भाजपा यावेळी आठपेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहेत हा दैवदुर्विलास दिसतो. इतक्या प्रचंड विजयाची अपेक्षा खरोखरच कोणीच केली नसेल. तामिळनाडूत जयललितांच्या अण्णा द्रमुक आणि कॉंग्रेस युतीला १९९१ मध्ये २३४ पैकी २२४ आणि द्रमुक-तामिळ मनीला कॉंग्रेस युतीला २३४ पैकी २११ जागा मिळाल्या होत्या. ही दोन उदाहरणे वगळता खुल्या आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये ९०% पेक्षा जास्त जागा कुठल्याही पक्षाला मिळालेल्या नव्हत्या.आम आदमी पक्ष जवळपास ९०% जागा जिंकताना दिसत आहे.

In reply to by क्लिंटन

>>> तामिळनाडूत जयललितांच्या अण्णा द्रमुक आणि कॉंग्रेस युतीला १९९१ मध्ये २३४ पैकी २२४ आणि द्रमुक-तामिळ मनीला कॉंग्रेस युतीला २३४ पैकी २११ जागा मिळाल्या होत्या. ही दोन उदाहरणे वगळता खुल्या आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये ९०% पेक्षा जास्त जागा कुठल्याही पक्षाला मिळालेल्या नव्हत्या.आम आदमी पक्ष जवळपास ९०% जागा जिंकताना दिसत आहे. १९९१ मध्ये अद्रमुक-काँग्रेस युतीला २३४ पैकी २३३ जागा मिळाल्या होत्या. द्रमुकला मिळालेल्या एकमेव जागेवर करूणानिधी निवडून आला होता. त्या जागेचाही नंतर राजीनामा दिला होता. २०१० मध्ये बिहार विधानसभेत भाजप-संजद युतीला २४३ पैकी २०६ जागा (८४%) मिळाल्या होत्या. काही पूर्वोत्तर राज्यांमध्ये स्थानिक पक्षाला ८०% हून अधिक जागा मिळाल्याची उदाहरणे आहेत.