नक्की किती पैसे पुरेसे?

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
30 Dec 2014 - 11:49 am
गाभा: 

नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो.

तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे

प्रतिक्रिया

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 11:59 am | काळा पहाड

तुम्हाला १०% व्याज कुठे मिळते? तुम्ही हे पैसे एखाद्या पतसंस्थेत ठेवले आहेत का? असल्यास त्वरित काढून घ्यावेत व नॅशनलाईज्ड बँकेत ठेवावेत हा माझा सल्ला आहे.

मृत्युन्जय's picture

30 Dec 2014 - 12:02 pm | मृत्युन्जय

२० लाखावर १६.५ हजार व्याज मिळत असेल तर ते ८.२५% नी मिळ्ळत असावे. म्हणजे बहुधा राष्ट्रीयकृत बॅंकच असावी.

क्लिंटन's picture

30 Dec 2014 - 3:22 pm | क्लिंटन

नाही. व्याज दर महिन्याला १६,५०० असेल तर ते दरवर्षाला २ लाख रूपये झाले. म्हणजे १०% व्याजाचा दर झाला.माझ्या माहितीत तरी कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक (किंवा आय.सी.आय.सी.आय, एच.डी.एफ.सी सारखी खाजगी बँक) एफ.डी वर १०% व्याज देत नाही. तेव्हा हे पैसे पतपेढीमध्ये ठेवले असायची शक्यता जास्त.

प्यारे१'s picture

30 Dec 2014 - 3:36 pm | प्यारे१

सहकारी बँका ९.५ % द.सा.द.शे. देतात. ज्येष्ठ नागरीकांना अर्धा टक्का वाढीव.

सुनील's picture

30 Dec 2014 - 12:05 pm | सुनील

तुमचे सध्याचे वय पाहता हे पुरेसे नाही असे सांगावेसे वाटते. कारण खर्च वाढत जाईल आणि एफडीवरील व्याज तेवढेच (वा कमी) होईल.

प्रसाद१९७१'s picture

30 Dec 2014 - 12:08 pm | प्रसाद१९७१

@उ.ख - तुमच्यावर जबाब्दारी काय आहे ते महत्वाचे आहे. त्याचा काही उल्लेख नाही त्यामुळे काहीही जबाबदारी नाही असे धरुन चालू.
पहील्या प्रथम करायची गोष्ट म्हणजे आरोग्य विमा काढा. नाहीतर एका दुखण्यात तुमची गंगाजळी काही लाखानी कमी होइल. आरोग्य विम्याच्या हप्र्याचे पैसे तुमच्या महीन्याच्या खर्चात पकडा.

आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर - तुमची मिळकत १६५०० आणि आत्ताचा खर्च १००००. ४-५ वर्षात तुमचा खर्च तुमच्या मिळकती पेक्षा जास्त होइल. त्यामुळे २० लाखाची गंगाजळी कमी आहे.
८० वर्षाचे आयुष्य धरले तर ५० लाखापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Dec 2014 - 12:13 pm | प्रकाश घाटपांडे

तुमचा प्रश्न फार अवघड आहे.कारण पुरेसे म्हणजे नेमके किती याचे उत्तर कुणाला देता येत नाही. आपली जीवनशैली व मानसिकता यावर बरच काही अवलंबून आहे.
आपला नम्र
स्वेच्छानिवृत्त

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 12:20 pm | काळा पहाड

१. कुठेही अरबट चरबट ठिकाणी गुंतवणूक करू नका. एफ.डी. तच ठेवा.
२. "पाना"चा खर्च बंद करा.
३. अजून तुम्ही नॉर्मल रिटायर्मेंट वयापेक्षा दहा वर्षे तरी दूर आहात. दुसरी नोकरी मिळते का ते पहा.
४. त्याशिवाय शेती फायदेशीर होईल का ते पहा. त्याशिवायएखादा साईड बिझनेस (एजन्सी, दुकान वगैरे) सुरू करता आले तर पहा.

योगी९००'s picture

30 Dec 2014 - 12:27 pm | योगी९००

तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे पण तरीही असे सांगावे वाटते की "अजून तुम्ही नॉर्मल रिटायर्मेंट वयापेक्षा दहा वर्षे तरी दूर आहात. दुसरी नोकरी मिळते का ते पहा.". किंवा एखाद्या दुकानात/ऑफिसमध्ये तरी नोकरी मिळते का ते पहा म्हणजे निदान वेळ जाईल आणि utility bills भरता येईल तेवढातरी पैसा मिळेल.

नाहीतर घरच्या घरी शिकवण्या घ्या. (पैसे घेऊनच..). त्यामुळे निदान आजुबाजूची खेड्यातली मुले काहीतरी का होईना शिकतील. पैसे घेऊन शिकवणी घेतल्याने व्यवसायिक द्रुष्टीकोन राहील आणि शिकणारेही मन गुंतवतील.

पैसा's picture

30 Dec 2014 - 12:25 pm | पैसा

मी आणि माझ्या नवर्‍यानेही स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. मात्र आमचे सेव्हिंग आणि २ फ्लॅट्स याव्यतिरिक्त आम्हाला डीए - लिंक्ड पेन्शन असल्याने वाढणार्‍या खर्चाची आपोआप काळजी घेतली गेली आहे. तसेच इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी सक्तीचे सेव्हिंग करावे लागते. त्यामुळे आता आहेत ते पैसे तसेच राहतील आणि खर्च वाढतील अशी चिंता नाही. तुमची शेती कसली आहे ते लिहिले नाही. पण कोकणातके खेडेगाव म्हणजे आंबे, काजू, फणस, मिरी इ उत्पन्न घेणे शक्य आहे त्यातून तुम्ही बिझी रहाल शिवाय अधिक उत्पन्न नक्की मिळेल.

चौकटराजा's picture

30 Dec 2014 - 12:29 pm | चौकटराजा

आरोग्यावरचा व शिक्षणावरचा खर्च सोडल्यास जीवन म्हणजे फक्त अन्न वस्त्र व निवारा . त्यामुळे या पाच गरजांचा विचार जर तुमच्या १६ हजारात होत असेल तर काहीच समस्या नाही. पण भारत देशात आता पुन्हा काही स्वस्त होणे कठीण खास करून अन्न व उर्जा.
अर्थशास्त्रात गरज ,आराम व चैन अशा तीन पायर्‍या खर्चाच्या सांगितलेल्या आहेत.
जास्त खादाडी करू नका.
कपडे सण आला म्हणून घेउ नका तर फाटले की घ्या. कपडे खरेदीत निसर्गाशी संबंधित वस्तू खरेदी ला प्राधान्य द्या.
उदा. रेमंडची प्यान्ट न घेता त्यांचे ब्लँकेट घ्या.
आवश्यक तेवढीच जागा पुरेशी असते. सेकंड होम चा भानगडीत पडू नका. आहे त्या जागेचा वापर घनफुटाचा विचार करून करा चौरस फुटाचा नव्हे.
येता जाता देणे घेणे करण्याची फॅशन बोकाळली आहे. तिला आवर घाला. देणे घेणे म्हणचे एकमेकांच्या अर्थ व्ययवस्थेत लुडबूड करणे. त्यापेक्षा तुला केमेरा घ्यायचा तर तो तुझ्या पसंतीचा तू घे. मी एकाच्या जागी मला आवडतात म्हणून डझनभर कपडे घेतो. ही पॉलिसी अधिक योग्य.

पेँशन नसणाऱ्यांना 'पैसे पुरतील का?' हा प्रश्न नेहमीच सतावतो. ९५टक्के जनता विनापेंशनवालीच आहे त्यामुळे उगाच डोक्याचा भुसा पाडण्यात काही अर्थ नाही. १)मेडिक्लेम ताबडतोब चालू करा एक लाखासाठी २८००रू अंदाजे वार्षिक हप्ता बसेल. २)स्टेट बैंक अकाउंट धारकांना १००रू भरून एक लाखाचा {फक्त}अपघात विमा मिळतो २००रूपयात २लाखाचा.

hitesh's picture

30 Dec 2014 - 1:20 pm | hitesh

अपघात विमा म्हणजे विमा घेणारा अपघातात मेला तर वारसाला पैसे असे असणार. त्याचा काय फायदा ?

अनुप ढेरे's picture

30 Dec 2014 - 1:42 pm | अनुप ढेरे

अक्सिडेंट इन्शुरन्समध्ये पूर्ण/पार्शल डिसेबिलिटी देखील कव्हर होते असं जालावर आढळलं...

http://www.policybazaar.com/health-insurance/personal-accident-insurance/

hitesh's picture

30 Dec 2014 - 9:00 pm | hitesh

दोनशे रु. मासिक हप्त्यात जी पॉलिसी येते त्यात बहुतेक फक्त अपघाती मृत्यु कव्हर होतो असे वाटते. दवाखान्याचा खर्च , डिसॅबिलिटी वगैरे पॉलिश्या दोनशे रुपयात येत नसाव्यात.

अगदी साधासुधा विमा आहे. एका फॉर्मवर सही करून द्यायची. खात्यातून १००/२०० एकदा डेबिट होतात. मडिकल टेस्ट वगैरे काही नाही. पोस्टाने पॉलिसि घरी येते . त्या एका वर्षात अपघात झाल्यास फ्रैक्चर वगैरेचा झालेला खर्च मिळतो. मृत्यु होण्याशी काही संबंध नाही.

नेहमीचे LIC ,TATA वगैरेचे विमा एजंट हे सांगत नाहीत कारण त्यात काही त्यांना मलई मिळत नाही.

खटपट्या's picture

31 Dec 2014 - 3:15 am | खटपट्या

अतिशय उपयुक्त माहीती !!

कंजूस's picture

31 Dec 2014 - 6:34 am | कंजूस

वारसाला नाही हो.
अपघातात हात पाय मोडले त्याचा उपचाराचा खर्च मिळतो. दोन वर्षाँपूर्वी योजना सुरू झाली तेव्हा २लाखांसाठी १००रू होते नंतर १लाख झाले. आता १, २, ४ लाखांचे असे वेगवेगळे पर्याय आहेत. शंभर रुपयात फक्त दीड किलो तुरडाळ मिळते आणि १ लाखाचा विमा एक राषट्रीय बैंक देते आहे. तुम्हीच ठरवा किती कीस पाडायचा ते.आणखी एक विचाराल रेल्वेचा रूळ ओलांडतांना पाय गेला तर पैसे मिळतील का (नाही मिळणार).
दुसरा कोणी असता तर नेटवर सर्च न करता लगेच बैंकेत जाऊन फॉर्म भरून आला असता.

रुस्तम's picture

31 Dec 2014 - 10:45 am | रुस्तम

मी गेल्या २ वर्ष पासून हा विमा घेतोय.

चुकीची दुरूस्ती: अपघातातल्या मृत्युचाच विमा आहे १००/२००/५००/१०००/रू प्रिमिअम साठी २/४/१०/२०/लाख भरपाई आहे.

hitesh's picture

1 Jan 2015 - 1:47 am | hitesh

म्या तेच बोलत होतो.. इतक्या कमी पैशात फक्त अपघाती मरणाचाच विमा होतो.

अपंगत्व , दवाखान्याचा खर्च यांचे विमे फार फार फार महाग असतात.

अर्धवटराव's picture

30 Dec 2014 - 1:33 pm | अर्धवटराव

तुम्ही पैशाचे आराखडे बांधल्याशिवाय अर्ली रिटायरमेण्ट घेतलच कशाला ? काहि खास कारण असेल तर गोष्ट वेगळी. पण साधारणपणे माणुस गरजेपुरता पैसा जमल्याची खात्री झाल्याशिवाय रिटायनेण्टच्या भानगडीत पडत नाहि.

प्रसाद१९७१'s picture

30 Dec 2014 - 2:01 pm | प्रसाद१९७१

घेतली ना त्यांनी अर्ली रिटायरमेण्ट, आता "कशाला" आणि "का" वगैरे विचारताय?
काय सल्ला द्यायचा असला तर द्या त्यांची प्रश्नावर. :-)

अर्धवटराव's picture

30 Dec 2014 - 11:15 pm | अर्धवटराव

आर्थीक तरतुदींची पुरेशी शाश्वती नसताना निवृत्ती स्विकारली असेल तर त्याचं कारण देखील तसं महत्वाचं असावं. निवृत्तीपश्चात आयुष्यात या कारणाने काहि मेजर आर्थीक डिमांड ठेवली तर काय याचा विचार करायला हवा. नसल्यास ते कारण जगायला पुरेसं असावं व आर्थीक बाबी दुय्यम महत्वाच्या ठराव्यात.

vikramaditya's picture

30 Dec 2014 - 2:39 pm | vikramaditya

तुम्ही रीटायरमेंट घेतलीत ती काही विचार करुनच घेतली असेल त्यामुळे तो विषय आता जावु द्या.

मुख्य म्हणजे अपघात , आरोग्य विमा ताबडतोब काढुन घ्या. तुम्ही एमएनसी कंपनीत काम केल्यामुळे विमा कंपनीच्या अटी वगैरे वाचुन मग स्वःताला योग्य असा विमा काढावा हे तुम्हाला सहज शक्य होईल. एजंट वर डोळे झाकुन विश्वास टाकु नका.
आणि कृपया अगदी कितिही जवळच्या माणसाने कुठलीही 'झटपट फायदा' देणारी स्कीम आणली तरी त्या फंदात पडु नका ही सुचना. नंतर लोक हात वर करतात.
तसेच मिळालेली फंडाची रक्कम ही बोनस मानुन सध्याचा मासिक खर्च भागवण्यासाठी नवा उत्पन्नचा पर्याय शोधा. शिकवण्या घेणे उत्तम. अजुन १० वर्षे तरी तुम्ही स्वतःचा मासिक खर्च स्वतः कमवावा आणि फंडाच्या रकमेला शक्यतो वापरु नये. मिळणारे व्याज पुन्हा गुंतवावे.

एक व्यक्ती एकदा मला म्हणाली " अगर ईनकमिंग रेवेन्यु न हो तो बडे बडे खजाने खाली हो जाते है..."

मिपावर हा विषय मांडलात म्हणुन आपुलकीने लिहिले. कृपया राग मानु नका. तुम्ही चुकुनही आर्थिक हाल अपेष्टा
भोगु नये म्हणुन हे लिहिले.

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2014 - 2:46 pm | श्रीगुरुजी

तुम्हाला मुले किती आहेत? त्यांचे शिक्षण, लग्न, कर्ज इ. जबाबदार्‍या आहेत का? सद्यपरिस्थितीत तुम्ही फक्त दोघेच असला तरी महिना रू. १६,५०० खूपच कमी आहेत. सद्या सुरक्षित गुंतवणूक फक्त मुदत ठेवीतच आहे. एचडीएफसी सारख्या बँका ८.७५% इतके व्याज देतात. त्यामुळे महिना रू. १६,५०० ऐवजी रू. १७,५०० व्याज मिळू शकेल. शेतीतून काही उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करा. जर एखाद्या विषयाचे चांगले ज्ञान असेल (इंग्लिश, गणित, संस्कृत इ.) किंवा एखादी कला ज्ञात असेल तर शिकविण्याचे क्लासेस सुरू करण्याचा प्रयत्न करा.

उडन खटोला's picture

30 Dec 2014 - 6:49 pm | उडन खटोला

मुले , त्यांचे शिक्षण, लग्न, कर्ज इ. जबाबदार्‍या नाहीत

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Dec 2014 - 3:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मिपाकर भरवशाचे आहेतचं. पन कॄपया अश्या खासगी आर्थिक गोष्टी मिपासारख्या ऑनलाईन फोरम ला टाकणं टाळा. मिपावरचे लेख अकाऊंट नसतानाही वाचता येतात. त्यामधुन पुढे काही गैरप्रकार घडायची शक्यता असते.

पतसंस्थांच्या नादाला लागु नका. झक्कास राष्ट्रीयकृत बॅंकेत एफ डी करा. व्याज कमी मिळेल पण साठवलेला पैसा सुरक्षित राहिल ह्याची हमी. मिळालेल्या पैश्यामधल्या रक्कमेतुन एखादा छोटा व्यवसाय सुरु करता येतोय का पहा. जसं की स्टेशनरी, किराणा माल वगैरे. कुठल्याही भामट्यावर विश्वास ठेऊन पैसे भिशी वगैरे मधे गुंतवु नका.

उडन खटोला's picture

30 Dec 2014 - 6:50 pm | उडन खटोला

सल्ल्या बद्दल आभार - कॅप्टन जॅक स्पॅरो

मराठी_माणूस's picture

31 Dec 2014 - 11:44 am | मराठी_माणूस

व्याज कमी मिळेल पण साठवलेला पैसा सुरक्षित राहिल ह्याची हमी.

ह्याला मर्यादा आहेत.
http://www.rbi.org.in/scripts/FAQView.aspx?Id=64

vikramaditya's picture

30 Dec 2014 - 3:48 pm | vikramaditya

करायचाच तर त्यात फार आर्थिक गुंतवणुक नसावी. यशस्वी व्यवसाय करण्यासाठी ' व्यावहारिक चातुर्य' खास करुन लागते. कधी कधी आहेत ते पैसे पण जातात. मिपाकरांनी केलेल्या ईतर सुचना लो रिस्क कॅटॅगरीतील आहेत. त्याचा जरुर विचार करावा. शुभेछा.

सुनील's picture

30 Dec 2014 - 3:52 pm | सुनील

एक जनरल प्रश्न विचारतो -

समजा एखाद्या व्यक्तीचा/कुटुंबाचा मासिक खर्च क्ष रुपये आहे (ज्यात दरवर्षी १०% वाढ अपेक्षित आहे). अन्य कुठल्याही जबाबदार्‍या नाहीत.

सदर व्यक्ती/कुटुंब फक्त आणि फक्त मुदत ठेवींवरच (त्याही राष्ट्रीयकृत बँकांच्याच) विश्वास ठेवते. अन्य स्त्रोत त्यांना जोखमीचे वाटतात.

तर, सदर व्यक्ती/कुटुंब यांना पुढील ३० वर्षांपर्यंत पुरेल इतके व्याज सुटायचे असल्यास किती रक्कम FD त ठेवावी लागेल.

आकस्मिक आपत्ती खर्च यात समाविष्ट नाही.

माझ्या तोंडी हिशोबानुसार जर क्ष = रुपये २०००० असतील तर, एक कोटी तरी असायला हवेत. कुणी काटेखोर हिशोब दाखवेल काय?

मुक्त विहारि's picture

30 Dec 2014 - 4:06 pm | मुक्त विहारि

त्याचा साधारण आराखडा डोक्यात आहे, कागदावर उतरवायचा प्रयत्न करतो.

कारण मी पण ह्याच ध्येयाच्या मागे आहे.

१ कोटीच्या व्याजातून २०,०००रु.त घरखर्च चालवायचा. (आत्ताच्या घटकेला)

आणि उरलेले पैसे परत गुंतवायचे.

===================================

"आकस्मिक आपत्ती खर्च यात समाविष्ट नाही."

ते तर ठेवायलाच लागतील.

वेळ-काळ सांगून येत नाही.आणि ऐनवेळी सगळेच काखा वर करतात.

क्लिंटन's picture

30 Dec 2014 - 4:14 pm | क्लिंटन

माझ्या तोंडी हिशोबानुसार जर क्ष = रुपये २०००० असतील तर, एक कोटी तरी असायला हवेत. कुणी काटेखोर हिशोब दाखवेल काय?

समजा भाववाढीचा दर दरवर्षी १०% असेल आणि एफ.डी च्या व्याजाचा दर ८% असेल तर सध्याच्या वार्षिक खर्चाच्या ५७ पटींनी पैसे एफ.डी मध्ये ठेवायला हवेत.तसेच सुरवातीच्या काळात जी शिल्लक पडेल ती पण ८% ने परत एफ.डी मध्येच गुंतवायला लागेल. एक्सेल शीट लवकरच गुगल ड्राईव्हमध्ये अपलोड करून लिंक देतो.

तेव्हा क्ष=महिन्याला २० हजार असेल तर १ कोटी ३६ लाख ८० हजार रूपयांचे एफ.डी असेल तर नुसत्या व्याजावर ३० वर्षांपर्यंत आरामात राहता येईल. या केसमध्ये तिसाव्या वर्षाच्या शेवटी ४ कोटी ८९ लाखाचे एफ.डी मध्ये मुद्दल असेल. त्यावर आणखी ८ वर्षे अगदी ०% व्याज मिळाले तरी नक्कीच राहता येईल.

सुनील's picture

30 Dec 2014 - 4:18 pm | सुनील

धन्यवाद!

प्रसाद१९७१'s picture

30 Dec 2014 - 4:21 pm | प्रसाद१९७१

@क्लिंटन - ह्या गणितात हा पण ऑप्शन करुन बघा. एफ डी चे पैसे ही वापरले जात आहेत व्याजा बरोबर. आपण मेल्यावर त्या एफ डी मधे असलेल्या पैश्याचा काय उपयोग?

क्लिंटन's picture

30 Dec 2014 - 4:40 pm | क्लिंटन

हो बरोबर. एक्सेल शीटमधून कळेल की १६ व्या वर्षाच्या शेवटी एफ.डी मध्ये ३ कोटी १३ लाख ३४ हजारांचे मुद्दल शिल्लक असेल. त्यावेळी एफ.डी चे मुद्दल काढून घेतले तर त्यापुढील १४ वर्षे अगदी ०% व्याज मिळाले तरी राहता येऊ शकेल.

क्लिंटन's picture

30 Dec 2014 - 4:32 pm | क्लिंटन

माझी एक्सेल फाईल https://drive.google.com/file/d/0B6zmjn8OL9vnQjBmeTlvLUhTX1U/view?usp=sh... वर अपलोड केली आहे. ही फाईल डाऊनलोड करता येईल.त्यातील आकड्यांशी खेळून नक्की किती रकमेचे एफ.डी हवे हे समजेल. यात गृहितक आहे की संबंधित कुटुंब एफ.डी वरील केवळ व्याजावर राहणार आहे आणि मुद्दलास हात लावणार नाही. तसेच दरवर्षी शिल्लक राहिलेले पैसे ८% ने एफ.डी मध्ये गुंतवले जातील आणि एफ.डी चे मुद्दल वाढेल.

त्यात 'मल्टीप्लायर' या आकड्यात खेळून वार्षिक खर्चाच्या ५७ पट इतक्या रकमेचे एफ.डी हवे हे समजेल (जर महागाईचा दर १०% आणि एफ.डी वरील व्याज ८% असेल तर). विविध सिनॅरिओमध्ये (वेगळे महागाईचे दर आणि एफ.डी वरील व्याजाचे वेगळे दर) नक्की किती मल्टीप्लायर हवा हे डेटा टेबलच्या सहाय्याने शोधून काढता येईल पण ते मी अजून केलेले नाही.

खटपट्या's picture

31 Dec 2014 - 3:17 am | खटपट्या

खूप छान एक्ष्सल शीट दील्याबद्दल धन्यवाद

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 5:01 pm | काळा पहाड

याच्या रिटर्न मध्ये तुम्ही इंटरेस्ट वरचा टॅक्स पण धरला आहे का? कारण मग रिटर्न कमी मिळतील.

क्लिंटन's picture

30 Dec 2014 - 5:05 pm | क्लिंटन

नाही यात रिटर्नवरचा आयकर धरलेला नाही.करामुळे रिटर्न कमी मिळतील आणि एफ.डी करायला लागणारी रक्कम वाढेल. हा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 5:17 pm | काळा पहाड

आम्ही (प्रथम पुरुषी एक वचनी) सुद्धा त्या एक्सेल ची वाट पाहत आहोत. तेव्हा कृपया लवकर टाकावी.

याच धाग्यात त्या एक्सेल शीटचा पत्ता दिला आहे. तरी परत एकदा देतो: https://drive.google.com/file/d/0B6zmjn8OL9vnQjBmeTlvLUhTX1U/view?usp=sh...

त्यात एफ.डी वरील व्याजाच्या दरात फेरफार करून (कर कापून मिळणार्‍या एफेक्टिव्ह व्याजाचा वापर करून) तीच आकडेमोड करता येईल. २०% कर धरला तर सध्याच्या वार्षिक खर्चाच्या ८७ पट इतके एफ.डी लागेल. आणि १२ व्या वर्षानंतर एफ.डी काढून घेतले आणि ०% व्याज मिळत असेल तरीही उरलेली १८ वर्षे त्यावर राहता येईल.

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 5:29 pm | काळा पहाड

आवो आमाला तेवडं टकुरं आस्तं तर मामलेदार नस्तो का जहालो? वाईच त्या शीट मदी ट्याक्स घालून बदलून पुन्ना टाका राव.

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 5:49 pm | प्रसाद गोडबोले

वाईच त्या शीट मदी ट्याक्स घालून बदलून पुन्ना टाका

त्यासाठी तुम्हाला त्यांना फायनाशीयल अ‍ॅडव्हायजरी कन्सल्टींग फी द्यावी लागेल =))

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 5:57 pm | काळा पहाड

अच्छा म्हणजे ते 'फ्री' व्हर्जन होतं. आणि आम्हाला 'प्लस' व्हर्जन घ्यावं लागेल. ठिकाय, देवू एक शेंगदाण्याचं पोतं. हाकानाका.

सध्याच्या वार्षिक खर्चाच्या ५७ पटींनी पैसे एफ.डी मध्ये ठेवायला हवेत.

वार्षिक की मासिक?

क्लिंटन's picture

2 Jan 2015 - 3:57 pm | क्लिंटन

वार्षिक की मासिक?

वार्षिक. समजा दरमहा २० हजार रूपये खर्च असेल आणि त्याच्या ५७ पट म्हणजे ११ लाख ४० हजारांची एफ.डी असेल तर त्यावर येणार्‍या व्याजातून नक्कीच राहता येणार नाही.जर केवळ व्याजावरच राहायचे आणि मुद्दलाला हात लावायचा नसेल तर मात्र वार्षिक खर्चाच्या ५७ पटींने एफ.डी करायला हवे आणि सुरवातीला शिल्लक पडलेले पैसे परत एफ.डी मध्ये लावायला हवेत. यातही एफ.डी वर पूर्ण ३० वर्षे ८% व्याज असेल हे बर्‍यापैकी ढोबळ गृहितक घेतले आहे. तसे होणे अर्थातच शक्य नाही.तेव्हा व्याजाचे दर भविष्यात कमी असतील तर अजून जास्त एफ.डी करावे लागेल :(

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की काही कामधंदा न करता आरामात नुसते व्याजावर रहायचे असेल तर त्यासाठी एफ.डी हा योग्य मार्ग नाही.विशेषतः व्याजाचे दर कमी व्हायची शक्यता असलेल्या कालावधीत.

क्लिंटन's picture

30 Dec 2014 - 4:01 pm | क्लिंटन

एफ.डी वरच पूर्ण विसंबून राहणे धोक्याचे ठरेल. बरोबर काहीतरी जोडधंदा व्यवसाय हवाच.

आज समजा एफ.डी वर दर महिन्याला १६,५०० व्याज येत असले आणि खर्च १०,००० असला तर सध्या महिन्याला ६,५०० रूपये शिल्लक येतील.एफ.डी दर वर्षी रिन्यू करत असाल तर पुढच्या वर्षी व्याजाचे दर कमी झाले असल्याची शक्यता बरीच जास्त असल्याने दर महिन्याला १६,५०० पेक्षा कमी व्याज येईल आणि याउलट खर्च दर वर्षी वाढतच जातील. तेव्हा पुढच्या वर्षी दर महिन्याला शिल्लक कमी पडेल.

एक उदाहरण द्यायचे झाले तर १९९२-९३ च्या सुमारास बँकेत ५ लाख रूपये एफ.डी मध्ये असणे हे नक्कीच बर्‍यापैकी सुखवस्तू असल्याचे लक्षण होते.समजा त्यावेळी १०% व्याजाने दर वर्षी ५०,००० व्याज येत असेल तर पहिली २-३ वर्षे व्याजावर आरामात राहता येणे शक्य होते. जर खूपच काटकसर केली तर १९९८-९९ पर्यंतही दर वर्षी ५०,००० मध्ये राहता येणे शक्य होते.पण नंतर ते नक्कीच कठिण झाले.

तेव्हा कोणत्याही काळात भरपूर पैसे एफ.डी मध्ये असणे समाधानाची गोष्ट असली तरी नुसत्या व्याजावर फार काळ राहता येत नाही.एक्सेलमध्ये थोडी आकडेमोड करून समजले की ६% भाववाढीचा दर आणि ८% व्याजाचा दर असेल तर पुढील ३० वर्षांपर्यंत नुसत्या व्याजावर राहण्याची तरतूद करण्यासाठी सध्याच्या वार्षिक खर्चाच्या किमान २९ पट इतके पैसे एफ.डी मध्ये हवेत (आणि दरवर्षी शिल्लक राहिलेले पैसे परत ८% ने एफ.डी मध्ये गुंतविले पाहिजेत). तेव्हा इतर अनेक सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे जोड उत्पन्न मिळेल असा काहीतरी व्यवसाय/शेती इत्यादी बघाच.

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 4:52 pm | प्रसाद गोडबोले

एफ.डी वरच पूर्ण विसंबून राहणे धोक्याचे ठरेल. बरोबर काहीतरी जोडधंदा व्यवसाय हवाच.

ह्याला जोरदार अनुमोदन !

माणसाची सर्वात मोठ्ठी इन्वेस्टमेन्ट असते त्याचे स्किल सेट ! मग अचानकच रीटायर्ड होवुन स्किलसेट वाया का घालवा ? त्यावरचे ही "रीटर्न" घेतलेच पाहिजेत .

प्रसाद१९७१'s picture

30 Dec 2014 - 4:24 pm | प्रसाद१९७१

ह्यात एक महत्वाचा मुद्दा सुटला आहे तो डेप्रिसिएशन चा.
तुम्ही जी Capital Goods वापरता ती थोड्या वर्षानी बदलावी लागणार आहेत. तो खर्च महीन्याच्या खर्चात येत नाही.
जसे की कार, मोटरसायकल ७ वर्षानी, टीव्ही, लॅपटॉप ५ वर्षानी. घराचा रंग ७ वर्षानी असे अनेक अनेक

प्रसाद१९७१'s picture

30 Dec 2014 - 4:31 pm | प्रसाद१९७१

हे टेबल बघा
जर तुमच्या कडे आत्ता १ कोटी असतील तर ते कीती दिवस पुरतील ते मिळेल. ह्यात वार्षिक घसारा पण धरला आहे. ह्यात तुमची १ कोटीची एफ डी पण संपुन जाणार

महागाई ८% आणि बचती वर करपश्चात व्याज ७.५%

Yearly Running Expense Depreciation 1 Cr Will last for
240000 200000 22 Years
240000 150000 25 Years
240000 100000 28 Years
300000 200000 20 Years
300000 150000 22 Years
300000 100000 24 Years

१- २ लाख प्रत्येक वर्षी घसारा जरी जास्त वाटत असेल तरी ५-७ वर्षात प्रत्येक गोष्ट बदलायची वेळ येते.

प्रसाद१९७१'s picture

30 Dec 2014 - 4:32 pm | प्रसाद१९७१

वरच्या टेबल चा फोर्मॅट गंडला आहे. थोडे समजुन घ्या

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 4:40 pm | प्रसाद गोडबोले

हेच म्हणनार होतो

ही आकडे मोड कळाली नाही ...जरा अजुन एक्ष्प्लेन करता का ?

अवांतर : मी स्वतः फायनाशीयल मॉडेलींग मधे काम करत आहे आणि फायनाशीयल फ्रीडम अ‍ॅशुअर करेल इतकी फिक्स्ड इन्कम असेट्स बनवायचे स्वप्न बाळगुन आहे . आपल्या वरील आकडेमोडीचा खुप फायदा होईल :)

प्रसाद१९७१'s picture

30 Dec 2014 - 5:01 pm | प्रसाद१९७१

समजा आत्ता तुमच्या कडे १ कोटी आहेत आणि ते तुम्ही ७.५% ( करपश्च्यात ) एफ डी मधे टाकले आहेत. महागाई ८% आहे.
तुम्ही जर पहीली रो बघितलीत तर महीना २०,००० ( वर्षाला २.४ लाख ) हा नेहमीचा खर्च, वर्षाला २ लाख डेप्रीसिएशन जर पकडले तर तुमचे पैसे २२ वर्ष पुरतील. २२ वर्षानंतर तुमच्याकडे काहीही नसेल.

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 5:47 pm | प्रसाद गोडबोले

ओके . आत्ता थोडे फार लक्षात आले .
अजुन थोडी चर्चा करु ह्या विषयावर :

समजा १ कोटी एकरमी फ्द न करता २५ * ४ अशा फ्द केल्या तर ८% रेट ने २ लाख व्याज येईल प्रत्येकीवर . चार जर वेगळ्या व्यक्तींच्या नावे असतील तर , २ लाख पर्यंतच्या उत्पन्नाला करातुन सुट असल्याने कर भरावा लागणार नाही .

टोटल ८ लाख वार्शिक व्याज ( म्हणजे महिन्याला जवळपास ६५००० झाले . )

आता एका छोट्या गावात ( फॉर दॅट सेक सातारा पकडु ) दोन वेळच्या मेस चा खर्च ३००० रुपये माणशी आहे अजुन दोन वेळच्या नाष्ट्याचा खर्च २००० पकडु . सो खाण्या वर माणशी ५००० पेक्षा जास्त खर्च होत नाही . वर्शाला चार शर्ट चार प्यँट चार चड्ड्या चार बंड्या लेंगे , चार धोतरं , २ स्वेटर कान्टोपी , एक रेनकोट / छत्री , एक बुट , २ चप्पल , वगैरे निव्वळ खरेदीचा खर्च वर्षाला २४००० अर्थात महिन्याला २००० च्या वर जाणार नाही असा अंदाज आहे .

निवारा घरखर्चात , सध्या आम्हाला महिन्याला २०० रु अपर्टमेन्ट मेन्टेनन्स , १००-१५० रु वीज बील , घरपट्टी पाणीपट्टी वर्शाला ६००० रु महिन्या ५०० रु इतर किरकोण खर्च २००-२५० पकडला तरी टोटल १००० रु महिना

रीटायर्ड झाल्यावर मी दोन पायाची गाडी चालवायचा विचार करत असल्याने पेट्रोलचा खर्च डिस्काउंट करतोय .

सो टोटल खर्च ८००० रु अक्षरी आठहजार च्या वर जात नाही . दोन माणसांना मिळुन महिन्याला १५००० पुरतात असा माझा हिशेब आहे . उललेले ५०००० हजार जर परत फ्द मधे री इन्व्हेस्ट करत राहिले तर इन्फ्लेशन रिस्क , मेडीकल रिस्क मीटीगेट करता येईल असा अंदाज आहे .

थोडक्यात १ कोटी रुपये हे २२ पेक्षा किती तरी जास्त वर्ष टिकतील असे माझे गणित आहे .

ह्यात हिशेबात / अंदाजात काही फ्लॉज आहेत का ?

प्रसाद१९७१'s picture

30 Dec 2014 - 6:34 pm | प्रसाद१९७१

तुम्ही खर्च फारच कमी च्या बाजुला पकडले आहेत. पण तो प्रत्येकाचा भाग झाला. नेट, केबल टीव्ही , फोन, रिक्षा, गिफ्ट असल्या गोष्टी राहील्या. कामवाली बाई चा पगार राहीला. पण ते ठीक आहे.
माझ्या मते २० हजार तरी लागतील हे सर्व धरुन. अधिक मेडीकल रिस्क साठी २ माणसांना महीना ५ हजार धरुन ठेवलेले चांगले, त्याचा तुम्ही आरोग्य विमा काढा किंवा नुस्ते बाजुला ठेवा.
म्हणजे महीना २५००० लागतीलच.

महत्वाचे म्हणजे तुम्ही डेप्रिसिएअशन चा मुद्दा मिसला आहात. तुम्ही तुमची सध्याची Life Style कमी करावी असे अपेक्षीत नाहीये. तुमच्या घराला ७ वर्षानी रंग तर लावायला लागेल, ५-७ वर्षानी पडदे तरी बदलायला लागतील. लॅपटॉप, टीव्ही तर ५ वर्षात नक्कीच बदलायला लागेल. मोबाईल फोन तर दर २-३ वर्षानी. प्लंबींग, वायरींग ह्याचे खर्च ही होत च असतात. ह्या बदलाला लागणार्‍या खर्चाची सोय तुमच्या गणितात नाहीये. आणि हा खर्च खुप असतो.
ह्यासाठी तुमच्या Capital Goods आणि Capital expenses ची यादी करा. प्रत्येकासमोर हा खर्च कीती वर्षानी पुन्हा पुन्हा करायला लागतो ते लिहा.
माझ्या मते कार जरी धरली नाही तरी वर्षाला १.० ते १.२५ लाख डीप्रीसिअशन म्हणुन पकडले पाहीजेत.

मी जे टेबल दिले होते त्यात टॅक्स दिल्यावर ७.५% रीटर्न पकडला होता जो सहज शक्य आहे. महागाई ८ टक्के पकडली होती.

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 6:51 pm | प्रसाद गोडबोले

गॉट द पॉइंट .

मी रीटायरमेन्ट नंतर एकदमच लो लेव्हल लाईफ जगायचा प्लॅन करतोय . नेट, केबल टीव्ही , फोन, रिक्षा, गिफ्ट , कामवाली बाई , घराचा रंग , प्लंबिंग , वायरिंग , मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही हे सारे लक्झरी मधे येत असल्याने ह्या पैकी कोणताच खर्च होणार नाही :)

झालाच तर पुस्तकांचा भरमसाठ खर्च होईल असा माझा अंदाज आहे .

हां , मेडिक्लेम इन्शुरन्श आणि डीप्रीसीयेशन चा विचार आणि गणित करुन ठेवतो .

मनःपुर्वक धन्यवाद :)

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 4:36 pm | प्रसाद गोडबोले

१६५०० लय झाले

उडनखटोला , आय एन्व्ही यु ! तुम्ही माझे ड्रीम लाईफ जगत आहात :)

आमच्या सातारसारख्या गावात १५००० दोन माणसांसाठी म्हणजे डोक्यावरुन पाणी जाते , माझे तरी आरामात भागेल येवढ्या पैशात ... फक्त पुस्तकांचा ( अन इन्टरनेट चा ) खर्च तेवढा भागणार नाही ;)

वरच्या १५०० मधे ओल्ड मॉन्कचे ३ खंबे सुध्दा येतील =))

खुष राव्हा . एन्जोय !!

कपिलमुनी's picture

30 Dec 2014 - 4:50 pm | कपिलमुनी

आजारपणाचा खर्चाची तरतूद यातच आहे का ?
१ अँजिओप्लास्टी १ ब्लॉक साठी २ लाख ( ईंडियन स्टेंट वापरून)
आणि याचप्रमाणे इतर आजारांच्या महागड्या उपचारांची तरतूद १६५०० मधेच आहे का?

नाहीतर आजारपणामध्ये मुद्दल संपते आणि व्याज कमी येते व खर्च तर वाढलेले असतात.

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 4:59 pm | प्रसाद गोडबोले

नाही . हे आणि आजारांचे खर्च गृहीत धरले नाहीयेत .
पण मी स्वतः , रीटायर्ड माणसाने स्वतःच्या आजारपणावर अव्वाच्या सव्वा खर्च करु नये ह्या टोकाच्या मताचा आहे . कारण आजारपणावर खर्च करुन तंदुरुस्त होणे म्हणजे परत स्वतः मध्ये इन्वेस्टमेन्ट करणे झाले , मग त्यावरचे रीटर्न्स घ्ययचे असतील तर परत रीटायर्डमेन्ट सोडुन भवसागरात उडी मारणे आले ( आमच्या बुवांसारखे ;) )
( मुलांनी आजारपणावर खर्च केला तर ती गोष्ट और आहे , तिथे ते भावनिक इन्वेस्टमेन्ट करत असतात अन आई वडीलांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हेच त्यांच्या साठी रीट्र्न्स असतात :) अर्थात मी चांगल्या आई वडील आणि मुलांविषयी बोलत आहे ! )

साती's picture

31 Dec 2014 - 11:12 am | साती

हा प्रतिसाद आवडला.
अगदी विचार करण्यासारखा आहे.

पिलीयन रायडर's picture

31 Dec 2014 - 2:52 pm | पिलीयन रायडर

अगदी हेच मत आहे...
म्हातारपणी काही असाध्य रोग झाला किंवा अचानक अटॅक वगरे येऊन ICU मध्ये मुक्काम टाकावा लागला तर सर्व औषधोपचार बंद करुन मला सुखाने पटकन मरु द्यावे हीच माझी शेवटची इच्छा असेल. आपल्या पोरांची (किंवा आपली) मेहनतीची कमाई भावनिक होऊन उधळु नये असं मला वाटतं.. कारण अशानी माणूस मरायचं ते मरतच..फार तर एका ऐवजी दोन महिने जगुन.. पण गेलेला पैसा मागे रहाणार्‍या कुटुंबाची कंबर मोडुन जातो..
जे जगणारेत त्यांनी सुखानी जगावं ना.. जो मरणारच आहे त्याला पटकन मोकळं करावं....

(अर्थात स्वतःबद्द्ल हे बोलणं सोप्पय.. पण उद्या माझ्या आई वडीलांवर / सासु सासर्‍यांवर ही वेळ आली तर मी पैशाकडे पहाणार नाही हे ही खरंय..)

उडन खटोलाजी .

कोणतीही बचत / गुंतवणूक सुरक्षित नसते आणि जोखीम पत्करल्याशिवाय परतावा मिळत नाही. तेंव्हा आपण आपला अर्थसल्लागार नेमावा.( आपण स्वत:अर्थसाक्षर नसाल असे प्रश्नावरून गृहीत धरतो आहे )

चांगला अर्थ सल्लागार नेहमी aset allocation करत असतो. आपल्या जोखीम पत्करण्याच्या क्षमतेवर तो सोने , रोखे , डेट मार्केट , स्थावर मालमत्ता यामध्ये तुमची गुंतवणूक करून देतो.

गरज वाटल्यास व्य.नी. करावा.

उडन खटोला's picture

30 Dec 2014 - 7:33 pm | उडन खटोला

आरोग्य विमा २ लाखापुरता मर्यादित आहे .शेतीचे उत्पन्न फारसे नाही ,पण लक्ष घातल्यास मिळू शकेल. गायी-म्हशी पाळाव्या म्हनतोय

hitesh's picture

30 Dec 2014 - 10:46 pm | hitesh

गायी म्हशी हा बेस्ट पर्याय आहे.

गायींचा विमा काढुन गायी मेल्या असे दाखवुन विम्याची रक्कम खातायेते... दुधापेक्षा हाच धंदा बेस्ट चालतो... आमचा सासरा यात तज्ञ आहे म्हणे.

खटपट्या's picture

31 Dec 2014 - 3:14 am | खटपट्या

चांगलाय हो सल्ला,

hitesh's picture

30 Dec 2014 - 10:42 pm | hitesh

पोस्टात पैसे ठेवावेत
. सुंदर व सुरक्षित पर्याय

जेपी's picture

30 Dec 2014 - 5:09 pm | जेपी

प्रतिसाद आवडले.
पण मुद्दलात लेख पटला नाही.
कुठल्याही mnc मध्ये executive पदावरील व्यक्ती भविष्याबद्दल ऐवढा निष्काळजी असेल समजण अवघड आहे.
उखो यांचा इतिहास पाहता टिपी करत आहेत.

उखो यांचा इतिहास पाहता टिपी करत आहेत.
सहमत व्हावेसे वाटत आहे... कारण त्यांच्या प्रोफाइल मधे शाळा/महाविद्यालय/विद्यापीठ :- YZ College आणि व्यवसाय :- भिन्तीस तुम्बड्या लावणे व व्यावसायिक कौशल्ये (Career skills) :- अतिशहाणा. अशी दिलेली आहेत. ;)
त्यामुळे त्यांनी हा टिपी साठी धागा विणला असावा असे म्हणण्यास बरीच जागा आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09
The U.S. Debt Continues To Climb

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 5:18 pm | काळा पहाड

तसं असेल कदाचित पण या धाग्याचा उपयोग आमच्यासारख्या गरीबांसाठी नक्कीच होईल.

उडन खटोला's picture

30 Dec 2014 - 7:04 pm | उडन खटोला

mnc मध्ये executive पदावरील व्यक्ती भविष्याबद्दल ऐवढा निष्काळजी >> तसे नाही हो, पण काही अपरिहार्य कारणास्तव डिटेल्स जाहिर करता येत नाहीयेत , परन्तु एका मोठ्या विवन्चने मुळे पैसे साठवने व तत्सम इन्व्हेस्ट्मेन्ट इ. करता आले नव्हते

तर्री's picture

30 Dec 2014 - 5:23 pm | तर्री

धागा कर्त्याच्या आय.डी.वरून जे.पी आणि मदनबाण व्यक्त केलेली रास्त वाटते आहे. असो.

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 5:26 pm | काळा पहाड

>माई मोड ऑन>
अरे तर्री, व्यक्त केलेली काय हे ही लिहित जावं असं हे म्हणतात.
>माई मोड ऑफ>

वाह! फार उपयुक्त माहीती मिळतेय.

हापशेंच्युरी बद्दल श्री.उडनखटोला आणी तमाम प्रतिसादकर्त्यांचा सत्कार, काहीच न देता करण्यात येत आहे.
शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2014 - 7:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

यामुळे वाचलेले पैसे ताबडतोप एफ्डी मध्ये टाका ;) :)

मनिमौ's picture

30 Dec 2014 - 6:16 pm | मनिमौ

दर सोमवारी गुंतवणूक संबंधीत सल्ला असतो. जर तुम्हाला वाटत असेल तर तयाचा सल्ला घ्या.Investment specialist आहेत.

रीव्हर्स मॉर्टगेज चा एक उत्तम ऑप्शन उपलब्ध आहे.
स्टेट बँकेत चौकशी करून बघा. भाड्याने न देताही गावाकडल्या घराचे उत्पन्न मिळू शकते तेही तुमची गम्गाजळी शाबूत ठेवून. त्या शिवाय काही छोटा उद्योग ( स्टेशनरीचे दुकान / स्नॅक शॉप वगैरे सारखा) केलात तर ते उत्पन्न आणि वेळ घालवायचे साधन होईल

hitesh's picture

30 Dec 2014 - 10:40 pm | hitesh

रिवर्स मॉर्गेज म्हणजे समजा एखाद्याकडे मोठी स्थावर्‍ मालमत्ता आहे व खिशात पैसा नाही तर ब्यान्केकडे ते घर मॉर्गेज ठेऊन ब्यान्केकडुन नियमितपणे पेन्शन खात जगणे... माणुस मेला की घर ब्यान्केला मिळते.

असला पर्याय कशाला सुचवताय ?

विषयी ही फार टोकाची प्रतिक्रिया आहे.

अपत्यहीन दांपत्याचा किंवा असलेले अपत्य विचारत नसलेल्या (हजारो आढळतील) केसीस चा विचार करा.

रिवर्स मॉर्गेज च्या बदल्यात बँक महिन्याला काही ठरावीक रक्कम देते. पती-पत्नी दोहोंच्या मृत्युनंतर वारसदार अथवा नॉमिनी बँकेचे कर्ज (सगळे ड्युज) फेडून प्रॉपर्टी मॉर्गेज मधुन मोकळी करु शकतो.

जर तुम्ही राहत असलेले घर हे "अ‍ॅज अ‍ॅन अ‍ॅसेट" , काही रिटर्न देत असेल तर गैर काय?

जिवंतपणी जे सक्खे विचारत नाहीत त्यांची काळजी करण्यापेक्षा स्वतःचे शेवटचे दिवस नीट जातील ह्याची काळजी घेतलेली बरी.

सुबोध खरे's picture

31 Dec 2014 - 6:43 pm | सुबोध खरे

@ vikramaditya + १००
बाडीस
अगदी अपत्य विचारत असेल तरीही त्याला खर्चात पाडण्यापेक्षा आता आपल्या स्वतःच्या घराचा "इ एम आय" परत मिळणार असेल तर त्यात काय वाईट आहे. मुलांपुढे हात पसरण्यापेक्षा सन्मानाने जगणे जास्त चांगले. जर मुलांची इच्छा असेल तर ते पैसे परत भरून बँकेकडून ते घर परत मिळवू शकतात. अन्यथा आपल्या मृत्युनंतर बँक राहिलेले पैसे आपल्या वारसाला देऊन घर ताब्यात घेऊ शकते.

श्रीगुरुजी's picture

31 Dec 2014 - 8:46 pm | श्रीगुरुजी

>>> बाडीस

"बाडीस" म्हणजे काय? कोठून निर्माण झाला हा शब्द?

बाडीस म्हणजे ''बाय डिफोल्ट सहमत ''
कधी सुरु झाला माहीत नाय पण फक्त मिपावरच वाचलंय !!

बहुगुणी's picture

31 Dec 2014 - 9:05 pm | बहुगुणी

मला वाटतं बाडीस म्हणजे बाय डिफॉल्ट सहमत. आधिक मिपा-खास लघुरुपांसाठी हा धागा वाचा :-)

श्रीगुरुजी's picture

1 Jan 2015 - 1:00 pm | श्रीगुरुजी

खेडूत, बहुगुणी,

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद!

प्रदीप's picture

1 Jan 2015 - 7:39 pm | प्रदीप

'बाय डीफॉल्ट सहमत' ह्या शब्दाचे निर्माते बिपीन कार्यकर्त (तूर्तास येथे लिहीतांना दिसत नाहीत).

hitesh's picture

1 Jan 2015 - 1:55 am | hitesh

ब्यान्क काहीही फुकट देत नाही.. व्याज घेते.

शिवाय घर मोर्गेज करायला घर किमती व खिसा मोकळा अशी स्थिती हवी. जी नक्कीच दुर्दैवी आहे.

यांच्या केसमध्ये पुरेसा पैसा खिशात आहे.. शिवाय घर कोकणात म्हणजे कदाचित ब्यान्क कर्ज देइल इतके मुल्यवान नसावे.

असल्या योजना शहरात चालतात. फ्लॅट , बंगलो ब्यान्क ऑक्शन करुन पैसा मिळवु शकते... ओसाडवाडीतल्या घरावर रिवर्स मॉर्गेजचे कर्ज देऊन ब्यान्क त्या घराचे करणार काय ?

आनंदी गोपाळ's picture

1 Jan 2015 - 11:07 pm | आनंदी गोपाळ

तो ब्यांकेचा प्राब्लेम आहे असं वाटत नाही का?
एक स्टेटमेंट केल्यानंतर त्यातली 'फॅलसी' जर लक्षात आली, तरीही ते ओरिजिनल स्टेटमेंट डिफेंड करीतच राहिले पाहिजे का?

hitesh's picture

4 Jan 2015 - 8:41 am | hitesh

फॅलसीचा प्रश्नच नाही.

खेड्यातील घराला कमर्शियल व्यालु नसल्याने ब्यान्क रिवर्स मॉर्गेज मंजुरच करणार नाही.

हितेस दादा, हे आपले म्ह्णणे बरोबर नाही. रीवर्स मॉर्टगेज ही सरकारी योजना असून तिचे मुख उद्दिष्ट जनकल्याण हे आहे. कर्ज मंजुरीचे सगळे निकष हे ऑब्जेक्टीव असून त्या निकषात बसणार्‍या प्रत्येकाला कर्ज मिळायलाच हवे. घर खेड्यात असावे की आणि कुठे हे निकष असू शकत नाही आणि नाही.

या योजनेला अर्जदार सिनिअर सिटीझन अस्णे आवश्यक असावे.

(बँकेनुसार स्किम थोडीफार बदलू शकते, पण थोडीच.)

आनंदी गोपाळ's picture

11 Jan 2015 - 11:43 pm | आनंदी गोपाळ

खेड्यात घरे फुकट मिळतात की काय?
परत तेच.

मुक्त विहारि's picture

30 Dec 2014 - 6:46 pm | मुक्त विहारि

पानाची टपरी टाका.आम्ही पण रिटायर झालो की तेच करणार.

आमच्या तंबाखूचा आणि बियरचा खर्च निघाला तरी बास.

आमच्या गावांत बरेच जण रिटायर नंतर हेच करतात.

निदान रोजचा खर्च तरी नक्कीच सुटतो.

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 6:54 pm | प्रसाद गोडबोले

नको .

तुम्ही तिथे कट्टे भरवाल अन सारे कट्टेकरी काढा पान ,काढा १२०३०० असे म्हणत तुमची टपरी बसवतील जागच्याजागी =))

त्यापेक्षा तुम्ही इवेन्ट/कट्टा मॅनेज्मेन्ट चा बिझीनेस सुरु करा ;)

मुक्त विहारि's picture

30 Dec 2014 - 11:34 pm | मुक्त विहारि

अरेच्चा, ही गोष्ट आमच्या लक्षांतच आली नाही.

"त्यापेक्षा तुम्ही इवेन्ट/कट्टा मॅनेज्मेन्ट चा बिझीनेस सुरु करा...."

ये हो सकता है.

खटपट्या's picture

31 Dec 2014 - 5:13 am | खटपट्या

रोजचा १००० रूपयांचा गल्ला जमवणारे पानवाले पाहीले आहेत. त्यामुळे पानटपरी चालू करण्याचा बेत अगदीच टाकाउ नाहीये. आपण उगाच व्हाईट कॉलर जॉबच्या मागे लागतो.
२००० रुपय दीवसाचा गल्ला जमवणारे भाजीवाले देखील बघीतले आहेत.
"भारतात कष्टाच्या कामाला प्रतिष्ठा नाही" असे माझे निरिक्षण सांगते..

असे माझे निरिक्षण सांगते...

+१

आम्चे रिटायरमेंट नंतरचे प्लॅनिंग

१. रद्दीवाला
२. पान टपरी
३. गाड्या पुसून देणे.(दर शनिवार आणि रविवार.)

साठवलेल्या पैशाला आणि त्याच्या व्याजाला अजिबात धक्का लावायचा नाही.

दुपारी १२ आणि रात्री ८ ची वेळ आपली आपल्यालाच सांभाळावी लागते.

खटपट्या's picture

31 Dec 2014 - 11:25 am | खटपट्या

खेचा आमची :)

मुक्त विहारि's picture

31 Dec 2014 - 4:32 pm | मुक्त विहारि

हे भय्या लोकं, हाच धंदा करतात आणि चार पैसे गाठीला मारतात.

मी मुलांना पण हेच सांगून ठेवलंय,

नापास झालात तर अगदी उत्तम, काम करा आणि चार पैसे जोडा.

जो कामाला लाजला तो संपला.

कधीतरी माझ्या एका निर्लज्ज मित्राची गोष्ट सांगीन.

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2014 - 4:34 pm | टवाळ कार्टा

निर्लज्ज मित्राची???
काय "धंदा" करायचा ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Dec 2014 - 5:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

निर्लज्ज मित्राची गोष्ट सांगा...!

चहावाल्यांचा व्यवसायही तेजीत असल्यासारखा दिसतोय सध्या! जर तुम्ही तो व्यवसाय सुरु करणार असाल तर माझ्याकडे मोठे गाळणे आहे स्टीलचे! ते देते.

अनुप ढेरे's picture

31 Dec 2014 - 5:48 pm | अनुप ढेरे

हे बघा... गुंतवणूकदारदेखील मिळाले...

वैभव जाधव's picture

31 Dec 2014 - 8:21 pm | वैभव जाधव

च्यावाले कुठं गाळणं वापरत असतेत का? फडकं लागतय त्यांना.
मी देतो ते. :) (फुल्ल लाईफटाइम)

अभिजित - १'s picture

31 Dec 2014 - 7:54 pm | अभिजित - १

रद्दीवाला हा एक सोल्लिड धंदा आहे. जबरी फायदा असलेला. आमचा इथे ३/४ रद्दीवाले बघितले. पैसेवाले आहेत. एकाचा १० माजली tower मध्ये व्यापारी गळा आहे. भाड्यावर दिलेला. स्वताचे दुकान वेगळे. एकाचा मसाला धंदा आहे . एकाचा गाड्या पुरवण्याचा धंदा आहे. आणि हे सगळे धंदे यांनी फक्त राद्दीवर सुरु केले आहेत. जेव्हा रद्दी १० /११ किलो असते तेव्हा हे फक्त ६/७ किलो दाखवतात. उपाय म्हणून मी त्यांना माझ्या काट्यावर वजन करायला लावतो , मी रद्दी विकतो तेव्हा ..

उडन खटोला's picture

30 Dec 2014 - 7:00 pm | उडन खटोला

प्रोफाईल मध्ये दिलेली माहिती टीपी म्हणून दिली होती ,पण हा धागा मी सीरियसली काढलेला आहे .

माझा प्रश्न जेन्युइन असून चर्चेतून इतरानाही मार्गदर्शन होईलच!

सुबोध खरे's picture

30 Dec 2014 - 7:37 pm | सुबोध खरे

उडन खटोला साहेब
आपले आयुर्मान जर ८० वर्षे धरले तर अजून आपले ३० वर्षे खर्च होणार हे गृहीत धरावे लागेल.
औषधोपचारावर वयाच्या चाळीस वर्षापर्यंत जेवढा खर्च होतो तेवढा पुढच्या वीस वर्षात होतो तेवढाच पुढच्या दहा वर्षात होतो तेवढाच पुढच्या पाच वर्सःत होईल हे आपल्याला गृहीत धरावे लागेल. शिवाय वैद्यकीय खर्च केवळ आपल्यावर नाही तर आपल्या पत्नीसाठी सुद्धा करावा लागेल. आणी हा खर्च दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.
आप मेलं आणी जग बुडलं हे आपल्या पत्नीला चालणार आहे काय हे विचारून घ्यावे.( वाटेल ते झाले तरी पैसे खर्च करणार नाही असे आपण स्वतः बद्दल म्हणू शकाल परंतु असे आपल्याला आपल्या पत्नीबाबत करता येईल काय?)
बरेच वरिष्ठ नागरिक एकदाच मेलो म्हणजे सुटलो असे म्हणतात परंतु आपले हाड मोडले, गुडघे धरले, पक्षाघात झाला इ तर्हेच्या तर आपण जिवंत राहता आणी परावलंबी होता याचा ते विचार करीत नाहीत. तो लक्षात आणून दिल्यावर आपली विचारसरणी भुसभुशीत पायावर आहे हे त्यांच्या लक्षात येते.
आपले मांडीचे हाड मोडले तर त्याची शल्य क्रिय़ा आपल्याला करावीच लागेल. तेंव्हा शिल्लक रकमेवर आयुष्य काढता येईल हे गृहीत धरणे बरोबर नाही.
माझ्या अनुभवात तीन वरिष्ठ नागरिक असे आहेत कि जे व्याजाच्या रकमेत भागत होते तेंव्हा आनंदात होते.यातील एक नागरिक - एक मोठा वैद्यकीय खर्च आला कि शिल्केतून पैसे काढावे लागले आणी हे गणित फसले. पुढे रोजचा खर्च भागेना म्हणून मुंबईतील आपली जागा विकून ७२ व्या वर्षी पुण्याला राहायला गेले आणी वर मिळालेल्या रकमेतून हा खर्चाचा मेळ बसविता आला. आपल्याकडे अशी कोणती स्थावर मालमत्ता असेल तर गोष्ट वेगळी.
मुले जरी अतिशय गुणी असतील तरीही वृद्धापकाळात त्यांच्या पुढे पैश्याच्या साठी हात पसरणे हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय पुरुषाला अत्यंत क्लेशदायक असते.
यावर अधिक काही अनावश्यक पण टाळता न येणारे खर्च आपल्याला करावे लागतील ते बर्याच वेळेस गृहीत धरलेले नसतात. यात जवळच्या नातेवाईकातील समारंभ (लग्न साखरपुडा इ) यासाठीचा जाण्यायेण्याचा आणी आहेराचा खर्च. दर वर्ष किंवा अगदीच काही नाही तरी दोन तीन वर्षातून एखादा प्रवास यात्रा याचा खर्च आणी तेथे होणारी आपल्या पत्नीची खरेदी हे आपला अर्थसंकल्प कोलमडवू शकतो.
वरील गोष्टी गृहीत धरून मला आपल्याला एक सल्ला द्य्वासा वाटतो. जोवर आपले हात पाय चालते आहेत तोवर किंवा वयाच्या ६५ वर्षपर्यंत आपला रोजचा खर्च निघेल इतपत मिळकत असेल अशी नोकरी व्यवसाय ई चालू ठेवावा. म्हणजे आपली जीवन शैली दोन पायर्या खाली आणायला लागणार नाही. अन्यथा नाचणीची भाकरी आणी आंबील खाऊनहि लोक जगतातच कि.

vikramaditya's picture

30 Dec 2014 - 9:39 pm | vikramaditya

नुसत्या व्याजावर जगण्याची जीवनशैली माणसाला निश्र्क्रिय बनवते. नस्ती रिस्क आणि उठाठेवी (/स्ट्रेस) नसलेले काम करावे, अ‍ॅक्टीव रहावे आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी.

रमेश भिडे's picture

31 Dec 2014 - 2:10 am | रमेश भिडे

अतिशय उद्बोधक अन माहितीपूर्ण चर्चा सुरू आहे. धागाकर्ते व प्रतिसादकांचे आभार!

पहाटवारा's picture

31 Dec 2014 - 4:44 am | पहाटवारा

अवघड प्रश्न आहे ..
कारण, फक्त जेवण्-खाण, कपडे-लत्ते अशा प्राथमिक गरजा पूर्ण करुन रहाणे अशीच तुमची निवॄत्त झाल्यानंतरच्या आयुश्याची कल्पना असेल, तर ऊत्तर मिळवणे शक्य आहे..पण मला वाटते, असेच जगत रहाणे.. फार अवघड आहे. तेव्हा जर तुम्ही याव्यतीरिक्त काय करायचे ते ठरवले असेल तर त्याचा हि हिशेब या जमा-खर्चात येणे आवश्यक आहे.. अन ते जर ठरवले नसेल, तर व्यक्तीशः मला तर तोच प्रश्न आधी सोडवला पाहिजे असे वाटते.
अवांतर :मागे एकदा कुठल्याश्या म्यानेजमेंट वाल्या एका वर्कशोप मधे, त्याच्या सूत्रधाराने एक प्रश्न सर्वांना विचारला:
"समजा - कुठल्याश्या अचाट नशीबाच्या पलटण्याने तुम्च्या सर्व आर्थिक गरजा भागतील अशी मिळकत तुम्च्या ऊरलेल्या आयुश्यात मिळत राहिल आणी वर पुढ्च्या पीढ्यांसाठीहि भरपूर तरतूद होईल अशी परीस्थीती जर झाली, तर तुम्हि सध्या जे काम करता आहात तेच कराल कि अजून काहि कराल ?"
ऊपस्थीत एकानेहि , हेच काम कराल असे म्हण्ट्ले नाहि.. मला निव्रुतीचा विचार मनात आला कि नेह्मी हेच वाटते.. जेव्हा-केव्हा ती वेळ येईल तेव्हा आर्थिक बाजू-बरोबर, ह्या प्रश्नाचे ऊत्तरहि तयार ठेवायला हवे, अन त्यासाठी जर काहि पूर्व-तयारी करायची असेल, तर तीहि आर्थिक पूर्वतयारी ईतकीच गरजेची असेल..
असो.. आपल्याला शुभेच्छा !
-पहाटवारा

सर्व प्रतिसाद वाचले. यांत एकच मुद्दा आहे महिना सोळा हजार रु पुढे पुरणार नाहीत काहीतरी करा आणि आणखी दहा वर्षे कमवा. परंतू समजा एखाद्याने ठरवले असेल आता यापुढे काहीच हातपायडोके हलवायचे नाही तर या सोळा हजाराचे काय करायचे ते त्यांना सांगावे.

hitesh's picture

31 Dec 2014 - 7:49 am | hitesh

१६ हजार खाऊ पिऊ मध्येच संपतात

पैसा's picture

31 Dec 2014 - 10:52 am | पैसा

पण त्यांची कोकणातली शेती आहे. म्हणजे भात, उडीद आणि भाज्या ते घरीच पिकवू शकतात. तेही करायचे नसेल तर दोघांना काटकसरीने रहायला ५००० रुपये महिना लै झाले.

महाराष्ट्रातले माहीत नाही. पण आमचे गोव्यातले रेशन कार्ड हल्लीच रिन्यु केले. रेशनवर काय आहे बघू तरी म्हणून गेले तर १०० रुपयात ८ किलो तांदूळ आणि २ किलो गहू सरकार कृपेने मिळाले. पूर्वी तेल साखर इ मिळत असे. आताचे माहीत नाही. कोणत्याही उपचारासाठी सरकारी रुग्णालये, तिथले डॉक्टर्स, औषधे मोफत असतात. फक्त जरा जास्त वेळ थांबावे लागते. कोणत्याही प्रकारचे तज्ञ लागले तर उपलब्ध असतात. मांजर चावल्यावर घ्यायचे इंजेक्शन खाजगी डॉक्टर्सकडे नव्हते म्हणून मला हे कळले. आपण हुच्चभ्रू झाल्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीतही नसतात.

सहमत...

बर्‍याच वेळा आम्ही पण रेशनचे धान्य वापरतो.

तसे ते थोडे वेळखावू काम आहे, पण ४ पैसे वाचवायचे असतील, तर वेळेचा त्याग करणे भाग आहे.

आपलेच टॅक्स म्हणून भरलेले पैसे सरकार रेशनसाठी वापरते. रेशनचे धान्य आणण्यात कमीपणा काय? बरे चांगले सोनामसुरी तांदूळ ८-९ रुपये किलोने मिळत असतील तर का घेऊ नयेत?

एस's picture

31 Dec 2014 - 12:27 pm | एस

रेशनचे धान्य म्हणजे टाकाऊबिकाऊ नसते. बर्‍याचदा चांगले असते. थोडे साफबिफ केले की वापरता येते. या गव्हाच्या पोळ्या छान मऊ बनतात आणि तांदळाचा भातही मोकळाढाकळा नाही झाला तरी चवीला तितकाच चांगला असतो असा अनुभव आहे. साखरही मिळते रेशनवर.

योग्य, कायदेशीर मार्गाने पैसे वाचवणे आणि ते चांगल्या कार्यासाठी वापरणे - अगदी स्वत:च्या मौजमजेसाठी, हौसेसाठीही वापरणे यात काही गैर नाही.

प्रसाद१९७१'s picture

31 Dec 2014 - 12:40 pm | प्रसाद१९७१

@ पैसाताई आणि स्वॅप्स - वर कोणीच रेशनचे धान्य का वापरले असा प्रश्न विचारला नाहीये. तुम्हीच का एकदम डीफेन्सीव आणि जस्टीफाइंग मोड मधे जाताय.

एस's picture

31 Dec 2014 - 12:43 pm | एस

मै तब नहीं था, बट अब्भी उस मोड में जाके मी माघार घेता हय. स्वॉरी ७१साहेब! :-)

पैसा's picture

31 Dec 2014 - 12:51 pm | पैसा

असे तुमच्यासारखे कोणीतरी बोलेल याचा विचार मी केला होता. पण काहीजणांना रेशनचे धान्य वापरणे डाऊन मार्केट वाटते. किंवा माझ्या केसमधे रेशनवर किंवा सरकारी हॉस्पिटल्समधे बरे काही मिळत असेल हेच मला माहीत नव्हते. कमी दराचे धान्य गरीब लोकांसाठी असते ते आपल्याला बाजारभावाने घेणे परवडत असताना आपण का घ्यावे असाही काही जण विचार करू शकतात, म्हणून लिहिले आहे.

रेशनच्या तांदळाच्या इडल्या छान होतात म्हणे! ;)

हो का पैसाताई? ;-)

पैसा's picture

31 Dec 2014 - 1:54 pm | पैसा

मी आणले ते रोज वापरायचे सोनामसुरी होते. बाजारात ५० रुपये किलोने मिळतात, बारीक तांदूळ. पण इडलीसाठी फार चांगले नाहीत. इडलीसाठी जरा जाड, थोडेफार फोलपट शिल्लक असलेले तांदूळ चांगले.

कपिलमुनी's picture

31 Dec 2014 - 1:34 pm | कपिलमुनी

इडल्या छान होतात

हो !

काळा पहाड's picture

31 Dec 2014 - 6:06 pm | काळा पहाड

आमचं रेशन कार्ड पांढरं आहे. त्यावर काही मिळत नाही ना?

hitesh's picture

1 Jan 2015 - 2:02 am | hitesh

काळ्या पहाडाचं पांढरं कार्ड !

विलासराव's picture

10 Jan 2015 - 11:33 am | विलासराव

कोणत्याही उपचारासाठी सरकारी रुग्णालये, तिथले डॉक्टर्स, औषधे मोफत असतात. फक्त जरा जास्त वेळ थांबावे लागते. कोणत्याही प्रकारचे तज्ञ लागले तर उपलब्ध असतात. मांजर चावल्यावर घ्यायचे इंजेक्शन खाजगी डॉक्टर्सकडे नव्हते म्हणून मला हे कळले. आपण हुच्चभ्रू झाल्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीतही नसतात.

माझ्या कानाचे नोव्हेंबर २०१३ ला ऑपरेशन झाले. बाहेर खर्च जवळपास ५०००० सांगीतला. मेडिकल विमाही होता. पास झाला असता की नाही या भानगडीत न पडता सरळ पालीकेच्या दवाखान्यात भरती झालो. ऑपरेशन खर्च ५०० रुपये . काही बाहेरची औषधे मीलुन ३००० खर्च झाले. दिवसातुन दोनदा चहा, दुध -ब्रेड, दोनदा गरमागरम साधे जेवण दवाखान्याकडुन. ८ दिवसाने घरी आलो.

मी वयाच्या ३५ व्या वर्षी काम करायचे बंद केले ते ३१ डिसेंबर २००५ साली. गरजा अतिशय कमी. रेग्यूलर मेडिटेशन करतो.एक फ्लॅट आहे १३ लाख आजची किंमत. ज्याला कामधांदा शिकवला तो चुलतभाउ आजपर्यंत पैसे देतोय खर्चायला. ज्यादिवशी नाय देणार तेंव्हाच तेंव्हा ( एकतर परत काम कारायच नाही तर नर्मदे हर!!).
वरती सर्व गृहीतके इतके वर्ष जगु यावर आधारीत आहेत. जगुच याची काय शाश्वती? मलाही भरपुर सल्ले मिळतात तेही न विचारता. पण आम्ही आपल्या निर्णयावर ठाम. जे काय समोर येईल त्याला तयार.

आता हा धागा उडनटोला यांनी तीन मातब्बर (संस्थळे)ठिकाणी उघडून मिळालेल्या सल्ल्याने काळजीपूर्वक नदी ओलांडणार आहेत. काही ठिकाणी पाचसहा वर्षाँपूर्वी झालेल्या अशाच चर्चेचे संदर्भही सभासदांनी दिले आहेत. त्यामुळे सोळा हजार रू/महीना पुरतील का? चे उत्तर आताच्या काळातील नवीन गुंतवणूक/मौजमजा वगैरे पर्यायांपुरते सिमित ठेवायला हवे असे वाटते.

मंदार कात्रे's picture

1 Jan 2015 - 1:44 pm | मंदार कात्रे

बँक ऑफ महाराष्ट्र होणार विलीन?
प्रसाद पानसे, पुणे
देशातील बँकिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करताना स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, सेंट्रल बँक आणि कॅनरा बँक या सात बँकांमध्ये इतर सर्व सरकारी बँका विलीन केल्या जाण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामध्ये पुण्यात मुख्यालय असलेली महाराष्ट्र बँक (बँक ऑफ महाराष्ट्र) ही सेंट्रल बँक ऑफ इंडियात विलीन केली जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुण्यात शुक्रवार आणि शनिवारी 'ज्ञान संगम' ही बँकिंग परिषद होत आहे. मोदी हे फक्त शनिवारी उपस्थित असतील. अर्थमंत्री अरुण जेटली, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्यासह सर्व राष्ट्रीय व खासगी बँकांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आदी उच्चाधिकारी या मंथनामध्ये सहभागी होणार आहेत.
बँकांच्या विलिनीकरणासाठी मोदी यांनी याबाबत राजकीय इच्छाशक्ती दाखवून पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. 'विलिनीकरण करताना बँकिंगप्रणाली (सॉफ्टवेअर) आणि प्रादेशिक विस्तार विचारात घेतले जाणार आहेत. त्यानुसार सात प्रमुख बँकांमध्ये (मेगा बँक) इतर १९ बँकांचा समावेश करण्यात येणार आहे,' अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला दिली.
या विलिनीकरणानंतर मेगा बँकेत 'बासल ३' या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आवश्यक भांडवल उपलब्ध होईल; तसेच खासगी बँकाबरोबरच या राष्ट्रीय बँकादेखील आंतरराष्ट्रीय बँकांशी स्पर्धा करू शकतील, अशी आशा धोरणकर्त्यांना असल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे.
किफायतशीर पर्याय
बँकांना कोणतीही देशव्यापी प्रणाली विकसित करताना सॉफ्टवेअरसाठी कोट्यवधी रुपये खर्ची पाडावे लागतात. हा अनावश्यक खर्च टाळून सर्वसाधारणपणे एकाच कंपनीचे, एकाच प्रकारचे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या बँकांचे एकमेकांमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. विशिष्ट भागात एखाद्या बँकेच्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या शाखा बंद करण्याची वेळ येऊ नये, यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचे समजते.
विलिनीकरणाचा 'रोडमॅप'...
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांच्या विलिनीकरणाचा 'रोडमॅप' पुढीलप्रमाणे असू शकतो. ('मेगा बँक' आणि त्यात विलीन होणाऱ्या संभाव्य बँकांची नावे या क्रमाने)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, अलाहाबाद बँक
कॅनरा बँक : सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक
स्टेट बँक ऑफ इंडिया : या बँकेच्या पाच संलग्न बँका. उदा. स्टेट बँक जयपूर अँड बिकानेर
पंजाब नॅशनल बँक : विजया बँक, देना बँक
बँक ऑफ बडोदा : आयडीबीआय बँक, युनायडेट कमर्शियल बँक
बँक ऑफ इंडिया : ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक

क्लिंटन's picture

1 Jan 2015 - 1:55 pm | क्लिंटन

ही बातमी पेपरमध्येही वाचली पण या चर्चेशी त्याचा संबंध आणि ती बातमी इथे द्यायचे प्रयोजन नक्की काय हे समजले नाही.

नाखु's picture

1 Jan 2015 - 3:16 pm | नाखु

कदाचित यापैकी कुठल्या बँकेत धागाकर्त्याची ठेव तर नाहीना ? याची उठा"ठेव" असावी *SCRATCH*
(ह्.घ्या)

यातून सामान्य माणसाला काही फायदा होईल का ?

देशपांडे विनायक's picture

2 Jan 2015 - 6:32 am | देशपांडे विनायक

माझे वय ७२ पूर्ण
२०१० साली मी रिक्षासाठी रोज १०० रुपये खर्च होणार नाही असे गृहीत धरले
नन्तर आठवड्यात ७०० झाला का खर्च रिक्षावर असा विचार करू लागलो
आता महिन्यात ३००० झाला का खर्च असा विचार करताना घाबरत आहे
कारण आता तेवढा खर्च सहज होऊ शकतो असे जाणवू लागले आहे
आपले खर्चाचे अंदाज चुकले कि धडधड वाढते
साठवलेले पैसे खर्च करताना विचार करावा लागतो याचे वाईट वाटते
१६५०० रुपयात जगणे शक्य आहे
पण यापुढे जगताना जगण्याची पातळी बदलणे भाग पडेल
तुमचे शरीर ही पातळी स्वीकारेल एकवेळ पण मन ?
तुमचे मन जर स्विकारणार असे वाटत असेल तर तुम्हाला हा प्रश्न का पडला हे मी समजू शकत नाही
१६५०० रुपयात जगण्यासाठी सगळा दृष्टिकोन बदलणे मला गरजेचे वाटते

आयुर्हित's picture

2 Jan 2015 - 3:08 pm | आयुर्हित

काय ठरले मग शेवटी?
उडन खटोला यांना नक्की किती पैसे पुरेसे आहेत? कोणते तांदूळ वापरावे व कोणता खर्च टाळावा?

विटेकर's picture

5 Jan 2015 - 10:18 am | विटेकर

फार सुरेख आणि मोलाची चर्चा या निमित्तने झाली आहे.
मला एक जाणवते आहे की बर्‍याच जणांना वेळेआधी निवृत्त व्हायचे आहे( त्यात मी देखील आलो! ) आणि म्हणूनच या धाग्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पण असे का ? अधिकाधिक कर्तृत्व दाखवून विजिगिषु वृत्तीने जगण्याची भारतीयांची उमेद खचत चालली आहे का ? गेल्या आठवड्यात अश्या दोन बातम्या ऐकल्या की ज्यांनी वेळेआधी निवृत्ती स्व
वीस वर्षापूर्वी स्वीडन मध्ये काम करत असताना तिथले कर्माचारी मला प्रमोशन नको असे म्हणत तेव्हा मला फार आश्चर्य वाटे. मला वाटे , या लोकांकडे विजिगिषु वृत्ती नाहीच. पण खरे कारण होते , कितीही सामान्य पातळीवर काम्करणारा कामगार असला तरी त्याच्याकडे गाडी / घर आणि खाण्यापिण्याची चंगळ असे ! वरच्या पातळीवर जाऊन अधिक काम करावे अधिक पैसे मिळवावेत असे सामान्य स्वीडीश कामागाराला वाटत नसे, काही मोट्व्हेशनच नसे !
आज आम्हा भारतीयांची ही स्थिती आली आहे का ?
आणि असे असेल तर भारत म्हणून ही स्थिती चिंताजनक वाटते ! व्याजावर जगणारी नोन- प्रोडक्टीव लोकांची अधिकाधिक संख्या म्हणजे समाजावरील वाढ्णारा भार ! शिवाय समाजाच्या पैशाने मिळवलेली स्किल सेट्स वाया जाणार हे ही एक नुकसानच !

आपल्याला काय वाटते ?

क्लिंटन's picture

5 Jan 2015 - 10:22 am | क्लिंटन

व्याजावर जगणारी नोन- प्रोडक्टीव लोकांची अधिकाधिक संख्या म्हणजे समाजावरील वाढ्णारा भार ! शिवाय समाजाच्या पैशाने मिळवलेली स्किल सेट्स वाया जाणार हे ही एक नुकसानच

१००% सहमत आहे.सगळेच व्याजावर जगायचे ही 'महत्वाकांक्षा' बाळगून असतील तर त्या समाजाचे कठिण आहे.

मराठी_माणूस's picture

5 Jan 2015 - 2:08 pm | मराठी_माणूस

१००% असहमत.

लोकांच्या मुलभुत जगण्याच्यी हक्कावर आघात केल्यासारखे वाटते.

मराठी_माणूस's picture

5 Jan 2015 - 2:09 pm | मराठी_माणूस

सुधारणा:

जगण्याच्या

वाचावे

सुबोध खरे's picture

7 Jan 2015 - 1:00 pm | सुबोध खरे

@क्लिंटन
१०० % सहमत
माणूस वयाच्या ५८ किंवा ६० व्या वर्षी एकदम निरुपयोगी होतो हे मुळातच मला अमान्य आहे. अगदी एका बँकेच्या कारकूनाबाबत सुद्धा हे सत्य आहे( आमच्या माहितीतील एका कारकुनाने केलेल्या तक्रारीला उत्तर देताना मी हे म्हटले होते. कोणत्याही कामाला कमी लेखणे हा हेतू नाही)
याच माणसाने रडारड केली अहोआम्हाला कोण विचारतो? तीच खर्डेघाशी करीत आयुष्य काढले. मी त्यांना फक्त थोडासा प्रयत्न करण्यास सांगितले. काही काळानंतर हाच माणूस मुथूट फायनान्स मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाला. मी त्याला विचारले असता तो म्हणाला बँकेत सोन्यावर कर्ज देताना आलेल्या अनुभवाचा फायदा झाला आणि येथे नोकरी मिळाली. नाहीतरी दिवसभर घरी बसून बायकोच्या डोक्याशी कटकट करण्यात काय फायदा आहे? तेवढेच चार पैसे मिळतात आणि थोडी हौस मौज करता येते. ( अर्थात हे माझ्या सांगण्याने झाले असे मी मुळीच म्हणत नाही बहुधा घरी बसण्याचा कंटाळा आल्यामुळे झाले असावे).
माझ्या सारखा माणूस ज्याने बारावी नंतर दहा वर्षे शिक्षण घेतले आणि आता २१ वर्षे अनुभव जमा झाला आहे. एके दिवशी मी पूर्ण निवृत्त होणे म्हणजे मिळवलेल्या ज्ञानाचा आणी अनुभवाचा अपव्यय आहे. जेंव्हा माझी आर्थिक गरज संपेल तेंव्हा मी आठ तास मानेवर खडा ठेवून काम करू नये हे ठीक आहे पण नुसतेच काहीही न करणे हा ज्ञानाचा आणी अनुभवाचा शुद्ध अपव्यय आहे. मी ते काम माझ्या सोयीनुसार चार तास विना मोबदला/ मोबाद्ल्यासहित करत राहणे आवश्यक आहे असे माझे म्हणणे आहे.
ज्याने अगदी चपराशाची नोकरी केली आहे तो सुद्धा बरेच काही विधायक काम करू शकतो. वीस वर्षे नोकरी करायची आणी तीस वर्षे फुकट बसून खायचे हा शिद्ध अपव्यय आहे जो आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्राला परवडणारा नाही.

प्रसाद१९७१'s picture

7 Jan 2015 - 1:34 pm | प्रसाद१९७१

खरे साहेब - आमच्या सारख्या ४ ते ६ वर्ष इंजिनीरींग शिकलेल्या आणि नंतर आयटी मधे हमाली करणार्‍या माणसांबद्दल काय मत आहे. माझ्या सारख्या सरकारी कॉलेज मधल्या माणसानी तर सरकारचे चांगलेच नुकसान केले आहे.

किंवा आयआयटी मधे शिकुन नंतर भिकार कादंबर्‍या पाडणार्‍या किंवा फक्त गुरे हाकणार्‍या माणसांचे काय करायचे?

पैसा's picture

7 Jan 2015 - 2:01 pm | पैसा

याच मुद्द्यावर विरुद्ध बाजूने लिहायला आले होते. बसून खाणे म्हणजे काय? फक्त शारिरीक गरजा पुर्‍या करणे म्हणजे बसून खाणे म्हटले तर ठीक. पण एखादी बाई स्वतःच्या मुलांना नीट खायला प्यायला घालून त्यांच्यासाठी क्वालिटी वेळ देत असेल, एखादा माणूस शेती करायला जात असेल (यात तुमची गुरे वळणे सुद्धा आले), किंवा एखादा माणूस स्वतःच्या कला, छंद यासाठी वेळ देत असेल तर तेही अनुत्पादक समजायचे का?

आयायटीत शिकून २० वर्षात आपण समाजाचे देणे फेडले आहे आता स्वतःसाठी जगावे असे कोणाला वाटले तर काही चूक नाही. अनेक नोकर्‍यांमधे खरे स्किल, क्रिएटिव्हिटी यांची अजिबात आवश्यकता नसते. बँकेतले कारकुनापासून ते अगदी जनरल मॅनेजरपर्यंत, काही प्रमाणात शिक्षक, सरकारी नोकर, आयटीवाले लोक वगैरे लोक निव्वळ पाट्या टाकतात. अ च्या जागी ब आला म्हणून काही फरक पडणार नसतो. उलट ५०००० पगार घेणार्‍या कारकुनाबदली १०००० पगार घेणारा नवा कारकून आणि निवृत्त माणसाला २०००० पेन्शन देणे एम्प्लॉयरला नक्कीच परवडते. बरे कंटाळत काम करणार्‍या एका माणसाऐवजी दोन माणसे खूश रहातात. घरात वेळ जात नाही म्हणून बँकेत चकाट्या पिटायला जाणारे लोक कमी पाहिले नाहीत. त्यांना एखाद्या कामाला जितका वेळ लागतो त्याच्या अर्ध्याहून कमी वेळात एखादा एफिशियंट माणूस तेच काम संपवतो. अशां निव्वळ टैमपास करणार्‍यानी घरी बसलेले बरे.

विटेकर's picture

7 Jan 2015 - 3:57 pm | विटेकर

काही प्रमाणात असहमत !
१.प्रॉदक्टीव काम म्हणजे मूल्यवर्धन ! केवळ अर्थार्जन हा उद्देश असू नये तसेच केवळ स्वान्त सुखाय ही असो नये. माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत आता मी बसून खाणार , मला हवे तेच करणार किंवा काहीच करणर नाही , आपण कुणाच्या बापाचे देणे लागत नाही ! ही वृती घातक आहे ! अशा वृत्तीमुळे समाजाचे नक्की नुकसान होते . धर्मो रक्षिती रक्षितः ! तेच समाजाचे ही ! तुम्ही समाजासाठी असाल तरच समाज तुमच्यासाठी असेल.
२. मुले संभाळणे हे अतिउच्च कोटीचे मूल्यवर्धन आहे.
३. डॉक्टरसाहेब म्हणाले तसे ... अगदी मानेवर खडा ठेऊन आठ तास काम करण्याची आवश्यकता नाही , कदाचित ४ तास/२ तास , आपली शरीर प्रकृती साथ देईल इतपत करावे पण मूल्यवर्धन होईल असे कोणते तरी काम करावे. असुदे अन्न सेवू नये वडिलांचे ही !
४. आप्ले शिक्षण सोडून अन्य काम करुच नये हे चुकीचे आहे. आय आय टी मधून बाहेर पडल्यावर कादंबरी लिहून समाजाची साहित्यिक/ सांस्कृतिक अभिवृद्धीमध्ये भर घालणे हे मूल्यवर्धनच !
५. कोणीही मनुष्य समाजाच्या कामासाठी निरुपयोगी नाही... प्रत्येकाला सोयीचे आणि करता येण्याजोगे काम समाजात असते. नाक्षरं मंत्ररहीतं नमूलंनौषधिम् | अयोग्य पुरुषं नास्ति योजकस्तत्रदुर्लभ : | |

आयायटीत शिकून २० वर्षात आपण समाजाचे देणे फेडले आहे आता स्वतःसाठी जगावे असे कोणाला वाटले तर काही चूक नाही.

समाजाचं देणं? ते कसं मोजायचं ब्वा?

पैसा's picture

9 Jan 2015 - 10:55 am | पैसा

एका मुलाला आयायटीत शिकवायला सरकारला किती खर्च येतो. आणि त्या शिक्षणाचा उपयोग तो कसा करतो.

सुबोध खरे's picture

9 Jan 2015 - 10:13 am | सुबोध खरे

पैसा ताई
अगदी सरकारी खात्यात कारकून असेल तरी तो एखाद्या समाजसेवी संस्थेचे हिशेब लिहिण्यासाठी आपले दोन तास देऊ शकेल मग त्यात तो पैसा घेऊ शकेल किंवा सेवा म्हणून निःशुल्क काम करू शकेल.
सकाळी लवकर उठून बायकोला कटकट करायची. वरिष्ठ नागरिकांबरोबर प्रभातफेरी मध्ये नवी पिढी कशी वाया चालली आहे आणि एकंदर सगळे कसे कठीण होत आहे यावर चर्चा करीत रहायचे, अथ पासून इति पर्यंत वर्तमान पत्र वाचायचे नंतर २५ रुपयाच्या व्याजाची एन्ट्री मिळवण्यासाठी बँकेत जाऊन इतर लोकांचा खोळंबा करायचा किंवा पेन्शन जमा झाले कि नाही याचा एक तारखेपासून बँकेत धोशा लावायचा.पाव टक्का जास्त व्याज मिळते म्हणून जवळच्या बँकेतून पैसे लांबच्या बँकेत भरायचे. दुपारी झोप येत नाही मग घरच्यांवर आणि बायकोवर चिडचिड करायची. आठवड्यात एखादे नाटक पहायचे बाकीचे दिवस फुकट असतील ते सर्व कार्यक्रमाला हजेरी लावायची. संध्याकाळी परत मित्रांबरोबर चकाट्या पिटायच्या आणि रात्री परत किरकिर करायची. यापेक्षा आपण काहीतरी सृजनशील काम करावे नुसते निवृत्त झालो म्हणून काहीच करायचे नाही हे बरोबर नाही.
आपल्याला गायनाचा छंद असेल (किंवा चित्रकलेचा छंद) तरी आपण फार तर एक तास घालवू शकाल. आपण मल्लिकार्जुन मन्सूर नव्हे कि त्यात आपले आठ तास जातील. समाजसेवा करतो हे म्हणणे सोपे आहे त्यासाठी आपला पिंड तसा असावा लागतो. सरकारी कारकुनी करणार्याचा पिंड अशाकाही मुशीतून घडतो कि बायकोने वाण्याकडून साधी लसुण घेऊन या सांगितले तरी ते माझे काम नाही या विचाराने यांच्या कपाळावर आठ्या पडतात मग समाजसेवा तर लांबच राहिली.
उत्पादक काम म्हणजे त्यातून पैसेच मिळाले पाहिजेत असे नाही. कारकूनसुद्धा जर एखाद्या संस्थेचा जमाखर्च व्यवस्थित करून देत असेल तर त्याचा नक्कीच उपयोग आहे.
माझ्या पुरते बोलायचे झाले तर मला डॉक्टरी शिवाय दुसरे काहीच येत नाही. उगाच गाणी ऐकेन फोटोग्राफी करेन वगैरे गोष्टी काही २ तासांच्या वर करता येतील असे वाटत नाही. मग पैश्याची गरज संपेल तेंव्हा कोणत्याही धर्मादायी रुग्णालयात फुकट काम करता येईल किंवा वैद्यकीय विद्यार्थ्यांना फुकट शिकवता येईल.
समाजसेवा हा आपला पिंड नाही. बाबा किंवा प्रकाश आमटे यांसारखी माणसे फार थोर आहेत त्यांच्या चपलेशी सुद्धा बसण्याची आमची लायकी नाही हे जाणून आहे. पण पूर्ण निवृत्त होऊन हात पाय चालत असताना काहीच न करणे हा राष्ट्राच्या साधन संपत्तीचा अपव्यय आहे असे मी समजतो.राम नाही पण वानरसेनेतील एक वानर किंवा खार तरी होऊ शकतो.

अर्धवटराव's picture

9 Jan 2015 - 10:49 am | अर्धवटराव

राम नाही पण वानरसेनेतील एक वानर किंवा खार तरी होऊ शकतो.

+१

पैसा's picture

9 Jan 2015 - 10:52 am | पैसा

हेच म्हटले मी! प्रसाद यांच्या प्रतिक्रियेत लिखाण, किंवा गुरे सांभाळणे याबद्दल हेटाळणीचा सूर दिसला म्हणून मुद्दाम विचारले की घरी बसणे म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे?

प्रसाद१९७१'s picture

12 Jan 2015 - 12:43 pm | प्रसाद१९७१

मी स्पेसिफिक होतो पैसा ताई. -आयाआय्टी सारखे शिक्षण घेउन गुरे ( म्हणजे ऑफिसमधली माणसे ) राखणे म्हणजे त्या शिक्षणाचा उपयोग न करणे असे नाही का?

डॉक्टर साहेबांच्या उदा मधला कारकुन , कारकुनाचीच कामे करत होता. पण इंजिनीयरींग करुन मग आयटी मधे हमाली करणे हा त्या शिक्षणाचा उपयोग करणे नाही.

रेवती's picture

11 Jan 2015 - 3:57 am | रेवती

अगदी मस्त! हेच म्हणते..........म्हणजे इथे मिपावर म्हणते. प्रत्यक्ष त्या त्या माणसांना जाऊन म्हटले तर काय होईल हा विचार केलेला बरा.

प्रसाद१९७१'s picture

12 Jan 2015 - 12:45 pm | प्रसाद१९७१

राम नाही पण वानरसेनेतील एक वानर किंवा खार तरी होऊ शकतो.

खारीनी खार झाले तर अपव्यय नाही पण रामानेच खार व्हायचे ठरवले तर नक्कीच अपव्यय आहे. माझे उदाहरण ह्या बाजूने बघा