भारतिय राजकरणाला पडलेलं सुंदर स्वप्न !!!

बिपिन६८'s picture
बिपिन६८ in राजकारण
2 Apr 2014 - 1:32 pm

२०१४ लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत , प्रत्तेक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतोय , एकूणच सगळे वातावरण ढवळून निघतेय .प्रत्तेक पक्षाचे स्टार प्रचारक सभा गाजवत आहेत ….

आणि अशा वेळेस माझ्या सारख्या सामान्य नागरिकाला गेल्या २ दशकातील काही नेत्यांची आठवण येतेय … हे नेते एकतर काळाच्या पडद्या आड गेलेत किंवा प्रकृती अस्वस्था मुळे सक्रिय राजकारणातून निवृत्त झालेत… हा छोटासा प्रयत्न त्या पैकी काही नेत्यांना आठविण्याचा !

"न भितो मरानादास्मी केवलम दुषितो यश:" मी मरणाला भीत नाही जर कशाला घाबरत असेल तर ते फक्त बदनामीला, असा रामायणातला श्लोक आपल्या पहिल्या १३ दिवसाच्या सरकारच्या पतनाच्या वेळेस उधृत करणारे !

" अध्यक्ष महोदाय लोकतंत्र संख्या का खेल है", असे सांगत बेरजेच्या राजकारणा पासून स्वतः ला दूर ठेवणारे!

" हिंदू तन मन , हिंदू जीवन , रग रग हिंदू मेरा परिचय " हि कविता वयाच्या १७ व्या वर्षी करणारे

५० वर्षाहून जास्त काळ सक्रीय राजकारणांत असून चारित्र्यावर कुठलाही शिंतोडा उडू न देणारे, अटल बिहारी वाजपेयी.

२५ डिसेंबर १९२४ सगळी कडे येशु ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद सोहळा चालू होता, आणि त्याच वेळेस ग्वाल्हेर संस्थानात कृष्णा देवी आणि कृष्ण बिहारी वाजपेयी यांच्या पोटी अटल बिहारींचा जन्म झाला.उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे भगवान शंकराचे देवस्थान त्यांचे मूळ गाव

अटलजींचे आजोबा श्यामलाल हे प्रकांड पंडित, वाराणसीला गुरुकुलात राहून शिक्षण घेतले, त्यांना अनेक संस्कृत ग्रंथ मुखोद्गत होते, लग्न मुंजी करिता पौरोहित्य करणे तसेच भागवत पठन करणे हेच उधारनिर्वाहाचे साधन.

आजोबां प्रमाणे अटलजींचे वडील पण पंडित होते , हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाष्यांवर त्यांचे प्रभुत्व, व्यवसायाने शिक्षक आणि वृत्तीने कवी, त्यांनी अनेक कवी संमेलने गाजवली. नोकरीमुळे हे कुटुंब ग्वाल्हेर ला स्थाईक झाले .

अशी प्रचंड विद्वत्ता आणि साहित्य प्रेम असलेल्या कुटुंबात जन्म झालेले अटलजी " शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी" या न्यायाने पुढील आयुष्यात स्वतः पण घराण्याची परंपरा पुढे चालविताना एक पाउल पुढेच गेले .

अटलजी राजकारणात नसते तर नक्कीच एक चांगले शिक्षक झाले असते.

ग्वाल्हेर च्या विक्टोरिया कॉलेज मधून (आताचे लक्ष्मि बाई कॉलेज ) हिंदी ,संस्कृत आणि इंग्रजी विषय घेवून शिक्षण पूर्ण केले, त्या नंतर MA पोलिटिकल सायन्स DAV कॉलेज कानपूर हून पूर्ण केले. वडिलांची इच्छा स्वतः वकील होण्याची होती, त्या मुळे त्यांनी अटलजी ना वकिलीचे शिक्षण घेण्याची गळ घातली आणि वडिलांच्या इच्छेला मान देवून त्यांनीही वकिलीचे शिक्षण सुरु केले , विशेष म्हणजे त्याच वेळेस वडिलांनी पण बरोबरीनी त्यांच्याच वर्गात वकिली करिता प्रवेश घेतला आणि "वडील आणि मुलाचे " एका वर्गात शिक्षण सुरु झाले.

१९४२ ला जेंव्हा गांधीजीं नि चले जाव ची हाक दिली , त्यात असंख्य तरुण ओढले गेले, पैकी एक अटलजी , तिथून पुढे कॉलेज ला विद्यार्थी चळवळीत त्यांना संघटना या शब्दाचा अर्थ उमगला आणि नकळत पूर्ण वेळ रस घेवून काम करू लागले,

पुढे त्यांनी स्वतः ला संघ कार्यात झोकून दिल्या मुळे वकिलीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले हा भाग निराळा पण वडिलांनी ते पूर्ण केले हे विशेष

कॉलेज जीवनात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघा च्या संपर्कात आले होते, डॉ हेडगेवारांच्या विचाराने भारावले होते, डॉ ची तळमळ कळत होती आणि आपण काहीतरी करावे अशी मनात भावना निर्माण झाली होती पण नक्की काय करावे हे कळत नव्हते , त्या वेळे पर्यंत ते ग्वाल्हेर ला नित्य शाखे वर जात होते, संघाची व्याप्ती वाढविण्या करिता डॉ हेडगेवार पण संघ प्रचारक म्हणून सुशिक्षित पदवीधर मुलांच्या शोधात होते आणि योग योगाने अकोल्याच्या श्री नारायण तरटे म्हणून एका व्यक्ती मुळे एके दिवशी अटलजी संघ प्रचारक झाले , श्री तरटे संघाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि त्यांनी अटलजी मधील गुण हेरून त्यांना प्रचारक बनवून नकळत त्यांच्या पुढील यशस्वी राजकीय वाटचालीचा पाया रचला , त्या मुळेच तरटे ना ते राजकीय गुरु मानतात म्हणूनच गुरु शिष्याचे नाते अजूनही कायम आहे, श्री तरटे आयुष्याची संध्याकाळ नागपूर ला संघ कार्यालयात घालवतात.

१९४८ ला गांधी हत्ये नंतर संघावर बंदी आली, संघाचे जवळ पास ६०,००० स्वयंसेवक तुरुंगात होते त्या वेळेस भूमिगत राहून संघाचे काम करत होते,

संघा वरील बंदी उठविण्या करिता गुरुजी दिल्ली मध्ये प्रयत्न करीत होते पण त्याला यश येत नव्हते , पण शेवटी जुलै १९४९ मध्ये संघावरची बंदी उठवली गेली आणि दीनदयाळ उपाध्याय , नानाजी देशमुख आणि इतर स्वयंसेवक तुरुंगातून बाहेर आले .

दीनदयाळ हे अटलजी चे दुसरे राजकीय गुरु , सक्रिय राजकारणाचे धडे त्यांना दीनदयाळजिं कडून मिळाले तसे तर अटलजी त्यांचे मानसपुत्र.

तिथून पुढे या जोडीने जनमानसात संघा बद्दल झालेले शंकाचे मळभ दूर करिण्या करिता जीवाचे रान केले आणि त्यात त्यांना यश आले .

अटलजी च्या आयुष्यातील पुढचा अध्याय राजकारणाचा.

श्याम प्रसाद मुखर्जी नेहरू मंत्री मंडळात उद्योग मंत्री होते, १९५० च्या " नेहरू लियाकत अली " करारातील काही मुद्यावर त्यांचे नेहरूंशी वाद झाले आणि तडक मंत्री मंडळातून बाहेर पडले, आणि सर्व समावेशक राष्ट्रीय पक्ष काढण्याचे ठरविले, सक्रिय पाठींब्या साठी जेंव्हा ते गोळवलकर गुरुजीना भेटले तेंव्हा त्यांनी संघाचे काही कार्यकर्ते दीनदयाळजी ,नानाजी , अटलजी , इतर प्रचारक आणि स्वयंसेवकांना नव्या पक्षाच्या कार्या करिता दिले. …. आणिरे २१ ऑक्टोबर १९५१ ला " भारतीय जनसंघाची स्थापना झाली "

१९५३ ला अटलजी लोकसभेची पहिली निवडणूक लखनौ मधून लढले आणि अपेक्षे प्रमाणे हरले " अपयश हि यशाची पहिली पायरी

जून १९५३ ला श्याम प्रसाद मुखर्जी यांचा गूढ मृत्यू झाला , अटलजी अक्षरशः कोसळून पडले, हळव्या मनाच्या अटलजी वर याचा खोल आघात झाला तो नुसता पक्ष अध्यक्षाचा मृत्यू नव्हता तर श्यामप्रसादजी त्यांच्या करिता Guide , Philospoher असे सर्व काही होते.

या सर्व पार्श्वभूमीवर ते जनसंघाचे सरचिटणीस झाले.

अशातच १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या , तो पर्यंत अटलजी हे व्यक्तिमत्व जनमानसात नावारूपाला आले होते, देशव्यापी दौरे सुरु झाले होते , सभा गाजवते होते , लोक अटलजींचे विचार ऐकण्या करिता गर्दी करू लागले होते, म्हणून पक्षाने त्यांना लोकसभा निवडणूक एक, दोन, नव्हे तर तीन ठिकाणाहून लढविण्याचा आदेश दिला. आणि अटलजी तीन ठिकाणाहून निवडणूक लढले - बलरामपुर , लखनौ आणि मथुरा.

बलरामपुर मधून निवडून आले आणि थेट लोकसभेत प्रवेश झाला …ते साल होते १९५७

वत्कृत्व कले मुळे लोकसभेत त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले.

१९६२ ला परत पराभवाचा सामना करावा लागल्या मुळे , पक्षाने त्यांना राज्यसभेत पाठविले

१९६७ परत बलरामपुर मधून प्रचंड मताधिक्याने निवडून आले

१९६८ साली दिन दयाळ जीचा गूढ मृत्यू झाला …. अटलजी तर त्यांचे मानसपुत्र…. "आज मी अनाथ झालो " असे उद्गार त्यांना श्रद्धांजली वाहताना काढले

१९७१ ला भारत पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तान ला धूळ चारत स्वंतंत्र बांगलादेश ची निर्मिती झाली, इंदिरा गांधीनी घेतलेल्या खंबीर भूमिकेचे कौतुक करिताना त्यांना दुर्गेची उपमा दिली , राजकीय विरोधकाचे जाहीर कौतुक करिण्या करिता नुसते मन मोठे असून चालत नाही तर तसे संस्कार असावे लागतात , त्यांनी आयुष्यात कधीही विरोधा करिता विरोध केला नाही .

अटलजींच्या वात्कृत्वा मुळे लोकसभेत त्यांची छाप पडू लागली , अभ्यास पूर्ण आणि आवेश पूर्ण भाषण , भाषेवर विलक्षण प्रभुत्व , अन्याया विरुद्ध पेटून उठणे , या मुळे फक्त लोकसभेत च नाही तर जाहीर सभेत त्यांची भाषणे ऐकण्या करिता लोक गर्दी करू लागले .

१९७५ च्या आणीबाणीत इतर विरोधी पक्ष नेत्या प्रमाणे अटलजी ना तुरुंगवास घडला , बंगलोर च्या तुरुंगात काही दिवस होते , स्वयपाकाची मूलतः आवड असल्या मुळे तिथे त्यांचा बराचसा वेळ भटारखान्यात जायचा, नंतर प्रकृती अस्वस्था मुळे त्यांना प्रथम बंगलोर च्या इस्पितळात आणि नंतर दिल्ली ला एम्स मध्ये दाखल केले, काही दिवसा नंतर त्यांना घरातच नजर कैदेत ठेवण्यात आले।

१९७७ ला इंदिरा विरोधी लाटेत जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले आणि त्यात परराष्ट्र मंत्री झाले , विदेश नीती हा कायम आवडीचा विषय , त्या मुळे तो कार्यकाळ गाजविला. UNO मध्ये केलेले हिंदी भाषण गाजले.

वेगवेगळ्या पक्षांची बांधलेली मोट , त्यात महत्वाकांकाशी नेते, मोरारजींचा आडमुठेपणा ,चरण सिंघाना झालेली घाई याचे पर्यवसान सरकार कोसळण्यात झाले.

जयप्रकाश नारायणना दिलेला शब्द पाळू शकलो नाही , राजघाटावर घेतलेली शपथ पूर्ण करू शकलो नाही या वेदनेतून त्यांनी कविता लिहिली -

क्षमा करो बापू तुम हमको

वचन भंग के हम अपराधी

राजघाट का किया अपावन

मंजिल भुले यात्रा आधी !

अतिशय हळवे आणि कोमल मन , पण व पु म्हणतात तसे "कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असते , कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे , म्हणूनच पाण्याच्या प्रवाहाने खडक झिजतात”.

याचा अनुभव पुढे जाऊन १९९९ ला कारगिल युद्ध किंवा अणु चाचण्या च्या वेळेस आलाच .

जनता सरकारच्या अयशस्वी प्रयत्ना नंतर १९८० ला भारीतय जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्याचे ते अध्यक्ष झाले , तिथून पुढची काही वर्षे पक्ष वाढविण्यात गेली, १९८४ च्या इंदिरा हत्त्ये नंतरच्या लाटेत पक्षाची धूळधाण उडाली , अटलजी पण निवडणूक हरले . "दिल्ली बहोत दूर थी "

नंतर रथ यात्रा , राम जन्म भूमी , शहाबानो प्रकरण या मुळे पक्ष कायम प्रकाशझोतात होता , त्यात अटलजी इतकाच वाटा अडवानीचा होता यात वाद नाही .

हि ९० च्या दशकातील गोष्ट ,बहुतेक बाळासाहेब भारदे म्हणाले होते -

कॉंग्रेस खुर्ची वाल्यांचा

भाजप पूजा अर्चा वाल्यांचे

समाजवादी चर्चा वाल्यांचे

कम्युनिस्ट मोर्चा वाल्यांचे

त्याच सुमारास अटलजी आणि अडवाणींनी पक्षाचा चेहेरा बदलण्याचे जाणीव पूर्वक प्रयत्न केले त्याचे पर्यवसान, समता , ममता , जयललिता इतर पक्षांना घेवून सत्ता मिळविण्यात झाले.

सर्व समावेशक सरकार बनविताना काही मुद्दे बाजूला ठेवावे लागले , जसे कि समान नागरी कायदा, ३७० कलम , राम मंदिर …. पण त्या वेळेस मुद्दे बाजूला ठेवण्या शिवाय पर्याय नव्हता. विरोधक म्हणून किती दिवस राहणार?

मग १३ दिवस , १३ महिने आणि ५ वर्षे असा ३ वेळेसचा पंतप्रधानाचा कार्यकाल वेगवेगळया गोष्टीनी गाजला.

अणु चाचण्या ,आग्रा सुमिट , लाहोर सुमिट , लाहोर बस प्रवास , कारगिल युद्ध विजय , सुवर्ण चतुष्कोन योजना, कंधार विमान अपहरण, संसदे वरचा हल्ला…. अशा बर्याच चांगल्या वाईट गोष्टीं चा कार्यकाल.

इथे त्यांच्या पंतप्रधान कार्यकालाची चिकित्सा हा हेतू नाही. एक राजकारणी म्हणून अटलजी चे भारतीय राजकारणातील योगदान, आठविण्याचा हा प्रयत्न.

सत्तेत नसलेल्या आणि सत्तेत असलेल्या वाजपेयींच्या देहबोलीत काहीच फरक पडला नव्हता...तेच मंद स्मित चेह-यावर कायम होतं

दुटांगी धोतर, झब्बा , डोळ्यावर जाड काड्यांचा चष्मा, मागे वळविलेले पांढरे केस , बोलताना मधेच घेतला जाणारा जीवेघेणा pause…. आणि एकदा बोलू लागले कि जिभेवर साक्षात सरस्वती !! हे आम्ही कधीच विसरू शकत नाही .

राजकारणी असून पाहताच पायावर डोके ठेवावे असे व्यक्तिमत्व…. पण आपल्या नशिबात तो योग दिसत नाही.

आता त्यांच्या हयातीत "भारत रत्न " मिळावा हि दुसरी इच्छा तरी पूर्ण करो आणि त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

बिपीन कुलकर्णी

प्रतिक्रिया

विनोद१८'s picture

4 Apr 2014 - 2:01 pm | विनोद१८

:biggrin:

पिशी अबोली's picture

5 Apr 2014 - 1:32 pm | पिशी अबोली

__/\__