मित्रहो आणि इतर वाचक मंडळी
आज मी आपण सर्वास इथे या मंचावर एक प्रश्न विचारणार आहे .
अर्थात मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहेच पण ते जर जसच्या तसं अजून एखाद्याकडून मिळालं तर मी स्वतःला भाग्यवान समजेन .
खाली मी मला पडलेल्या प्रश्नाचा थोडा पूर्वार्ध सांगत आहे , फ्लॅशबॅक म्हणा हवं तर , एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे . तर पूर्वार्ध खाली आहे तो असा
पूर्वार्ध
मला लहानपणापासून जादूची /अद्भुत /सत्यकथा /ऐतिहासिक पुस्तके वाचायला आवडायची . ती छोटी असली तर अजूनच मजा यायची . मी बरीच पुस्तके अक्षरशः चाळून काढली . हळहळू माझा काळ देवादिधर्माकडे वाढू लागला . आणि हे आपोआप झाले बरं का . कुणाची जोरजबरदस्ती नाही इथे . मग सुरु झाले स्तोत्र वाचन नि पठाणाचे कार्यक्रम . हळूहळू स्वतःहून त्यामध्ये प्राविण्य मिळवले . अर्थात त्याला शाळेतील बाईंची जोड होतीच . त्या माझ्याकडुन शाळेत आल्याआल्या सर्वांसमोर स्तोत्रे वाचून घेत आणि उच्चारावर जोर देत . नंतर माझा कल " हे असे का ? " नि धार्मिक गोष्टी का आणि कशा पाळतात . त्यामागील उद्देश नक्की काय ? तो पटण्याजोगा असेल तरच ते मान्य अथवा सरळ गंगेला सोडून द्यायचो . मग सांगणारी माझी आई असली तरीही मी मला जे पटेल तेच करायचो .
मी आणि माझा पवित्रा याने हळूहळू संपूर्ण घरावर ताबा घ्यायला सुरुवात केली होती . बाबांना वाटलं पोरगं वाया जातंय म्हणून त्यांनी पण काहीतरी नवस बोलला असेल आणि एक शेंडी सरळ धारण करून टाकली . आजही ती शेंडी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून मोठ्या दिमाखात मिरवत आहे .त्या शेंडीने माझ्या मनात बरीच उलथापालथ माजवली . कित्येक प्रश्न निर्माण झाले . भरपूर देवदेवळे झाली . पंडितांबरोबर चर्चा झाली . पण तो प्रश्न " शेंडी का धारण करावी किंवा ठेवावी ?" याचे समाधानकारक उत्तर कुणीच दिले नाही . बराच काळ लोटला पण तो प्रश्न मनात घर करून उभा होता जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष . अर्थात मी त्याचा प्रामाणिक पाठपुरावा कदाचित नंतर केला नसेल जसा त्यावेळी केला होता . नाहीतर मला त्याचे उत्तर थोड्या अवधीतच मिळाले असते . पण देवाचे ( माफ करा , त्या अनामिक शक्तीचे मनापासून आभार ) कि ज्याने ते उत्तर द्यायला वेळ निवडली होती ती अगदी सार्थच होती . ती वेळ त्याचे अस्तित्व दाखवून देत होती याबदल किंचितही शंका नाही माझ्या मनात .
२६ जुलै ला जो पाऊस मी मुंबईत झाला त्याने थैमान माजवले होते मुंबईत हे सर्वश्रुत आहे . असाच पाऊस मला वाटत एक दोन तीन वर्षांनी मुंबईत झाला होता . तेव्हाही थोडाफार हाहाकार मजला होता . तो पाऊस झाला तेव्हा मी लॅबमध्ये जायला निघत होतो आणि इतक्यात माझ्या मुलाच्या शाळेतून मेसेज आला " पाऊस जास्त असल्याने शाळेतील बस मुलांना घेऊन येऊ शकत नाही तर आपापल्या मुलांना पालकांनी स्वतः घेऊन जावे ". नशीब बलवत्तर म्हणून मी त्यादिवशी घरीच होतो आणि नुकताच बाहेर पडणार होतो . कारण एकदा का बाहेर पडलो असतो तर मग मी सरळ बॅगेतला मोबाईल लॅब मध्येच पोहोचल्यावरच बघतो . ठरलं , मी पहिलं सोहमला ( माझ्या मोठ्या मुलाला ) आणणार आणि मग वेळ असेल तरच कामाला जाणार.
तिथून उलट्या रस्त्याला जायचे म्हणजे गाडी ना घेऊन जाणे कधीही योग्य . मी सरळ तिथे टॅक्सिने पोहोचलो . जाताना इतरत्र पाणी जमले होते ते बघून पुढचा अंदाज बांधलेला खरा ठरला ,कि येताना टॅक्सी मिळणे अवघड काम आहे हा .
मग मी आणि सोहमतिथेच बाहेर रस्त्यावर काही सोया होतेय का ते वाट बघत होतो . रस्ता पूर्णपणे सुनसान झाला होता थोड्याच अवधीत . पाऊस मी म्हणत होता . शाळेतील द्वारपालाने मला आत येऊन बसण्यास सांगितले पण मी ती विनंती नम्रपणे नाकारली . मी म्हणालो " आत आलो तर टॅक्सी कशी मिळेल परत जायला ". त्यालाही ते बहुधा पटले असावे म्हणून तो आतूनच लक्ष ठेवून होता आमच्यावर . पारशी कॉलनीत मोठी झाडं भरपूर असल्याने त्याला आमची काळजी वाटणं रास्त होत . त्यात सकाळीच त्याच्या सांगण्यानुसार कळले होते कि एक मोठी फांदी खाली उभ्या असलेल्या गाडीवर येऊन आदळली होती .
बराच वेळ लोटल्यानंतर एक टॅक्सी जणू आमच्यासाठीच पाठवली आहे अशी देवदूताप्रमाणे समोर उभी राहिली . आहे कि नाही काहीतरी चांगलं घडण्याची वेळ . लक्षात असू द्या , इथे तुम्हाला जेव्हा न मागता काही मिळते तेव्हा त्याची कृपा झाली असं समजावं . मी कितीतरी वेळ जी पण गाडीघोडा जात होतो त्याला हात दाखवून दाखवून थांबवत होतो पण साल कुणी थांबायलाच तयार नाही आणि इथे बघा न हात दाखवता टॅक्सी हजर.
आत कोणीतरी तेजपुंज पुरुष " गोरापान पण थोडासा वयोवृद्ध " आमचे हसून आदरातिथ्य करत त्याने आम्हाला आत बसायची सूचना केली . मी जरा दबकतच सांगितले कि मला सायनला जायचेय म्हणून कारण मला भीती वाटत होती कि गांधीमार्केटला पाणी साचत असल्याने बहुतेक टॅक्सिवाले सरळ नकारच देतात म्हणून . पण हे साहेब त्वरित उत्तरले कि कि मला आदेश आलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सोडायला आलेलो आहे . मी फारवेळ टॅक्सी चालवत नाही पण विधात्याने हे काम जेव्हाजेव्हा मला करायला सांगितले आहे तेव्हा तेव्हा मी ते केलेलं आहे अगदी मनापासून . अर्थात सर्व संवाद हिंदी भाषेतूनच चालू होता . मी पण त्या उत्तराने जरा चपापलोच . कारण त्याने नकळत मला छेडले होते . मला आधीपासूनच त्या गूढ वातावरणाचा अंदाज मनापासून घ्यायला आवडते . मीही मग त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली .
ट्राफिक असल्याने मलाही पूर्ण खात्री होती कि आपण काही चाळीस मिनिटांच्या आत घरी पोहोचत नाही म्हणून मीदेखील गप्पा मारायला सुरुवात केली . आधीच मला त्यांच्याबद्दल एक उत्कट भाव निर्माण झालाच होता कि त्यांनी मला आशा वेळेला मदत केली होती जजिथे पैशाचे मोलच नाही .त्यामध्ये एक गोष्ट सारखं लक्ष वेधून घेत होती ती म्हणजे त्यांची लांबलचक गाठ मारलेली शेंडी .
एकंदरीत त्यांचा अवतार पहिला कि असं वाटत होत कि ते स्वतः कुणीतरी योगीपुरुष आहेत . माझा तो पण अंदाज खरंच ठरला होता . कारण त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होती . इथे मुंबईला ते स्वतः आणि त्यांची सुना नातवंड गुण्यागोविंदानं राहत होती . त्यांचं दिनक्रम हाच कि लवकर उठणे आणि भजन कीर्तनात दंग राहणे . अध्यात्मिक विचारविमर्श करणे. त्यांच्या समाजात त्यांना भरपूर मान होता . अरे हो हे सर्व सांगण्याच्या नादात मी त्यांचे नाव जे मी आजपर्यंत विसरलो नाही आहे ते सांगायचे राहूनच गेलं . त्यांचं नाव होत " राजपाल शुक्ला " . मी हळूच बोलता बोलता त्यांच्या ज्ञानाचा अंदाज घेतला आणि सरळ माझ्या प्रश्नाच्या भात्यातून तो रामबाण बाहेर काढला " चाचा हं चोटी क्यू रखते है ? " ते संहारक अस्त्र त्यांच्यावर आदळले खरे पण त्यांच्या त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिलेल्या उत्तराने माझ्या आत्तापर्यंतच्या सहनशीलतेचे सार्थक झाले होते . मी भरून पावलो होतो . मला त्या उत्तराने द्विगुणित आनंद झाला होता .
तोच प्रश्न आज मला या ओघवत्या मंचावर विचारावासा वाटतोय आणि पहिले उत्तर जे मला अपेक्षित आहे त्याला माझ्यातर्फे बक्षीस द्यावेसे वाटतेय .
अजून एक आज संध्याकाळपासून मी गायब होत आहे . एका अनवट जागी सहकुटुंब चाललो आहे . तेव्हा मी सरळ सोमवारीच उगवेन. तोपर्यंत आशा आहे कि मला उत्तर मिळालेलं असेल आणि जर नाही मिळालं तर हरकत नाही . मी इथे परत आल्यावर ते आपल्या सर्वाना जरूर कळवेन .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
11 May 2018 - 6:27 pm | गामा पैलवान
सिविपा,
मला माहित असलेली काही कारणे :
१. ब्रह्मरंध्र झाकायचं असतं.
२. शेंडी ही ब्रह्मनाडीचं प्रतीक आहे.
३. कुंडलिनी शक्ती केंव्हाही जागी होऊ शकते. अशी जागी झाली तर तिला मार्गदर्शन म्हणून शेंडीची गरज लागते.
अधिक माहिती : https://www.sanatan.org/mr/a/36001.html
आ.न.,
-गा.पै.
11 May 2018 - 7:38 pm | माहितगार
ज्ञानकोशीय उल्लेखा नुसार शेंडी, चूडा, शिखा लिखीत उल्लेख परंपरा मार्गे यजुर्वेद व्हाया मनुस्मृती येत असावी .
पण इतर ज्ञानकोशीय उल्लेख हा कल्टीक अस्पेक्ट वैदीकांपर्यंत मर्यादीत नसावा.
कदाचित चांगल्या कात्र्या उपलब्ना होण्या पुर्वी वस्तरा हाच एकमेव उपलब्ध असताना , पुरुषांन लांब केस तर चांगले दिसत नाही , वैदीक पुरुषमध्ये स्वच्छतेचे प्रस्थामुळे टक्कल करणे आवश्यक झाले असावे.
शेंडी अटेंशन सिकिंग किंवा लहानपणी केस कापताना लहान मुलांचे सहकार्य मिळवणे अथवा अंधश्रद्ध्हा चे कल्टीक ग्रूप आयडेंटीटी प्रवास शक्य असावा
11 May 2018 - 7:53 pm | खिलजि
मी येतो साहेब सोमवारी परत . शेंडी आणि उत्तर घेऊन . सध्या व्यस्त आहे . क्षमस्व
12 May 2018 - 8:26 am | चामुंडराय
वेगवेगळ्या धर्मांमध्ये हेड कव्हरिंग्ज - किप्पा, कुफी, तक्कियः, हॅट, पगडी, शेंडी, हिजाब इ. का सांगितले असावेत??
12 May 2018 - 9:44 am | आनन्दा
शेंडी हे हेड कव्हरिंग नाही..
अवांतर, पूर्वी डोक्याला तेल लावायची पद्धत होती. त्याचा आणि याचा काही संबंध असेल का?
12 May 2018 - 10:01 am | प्रकाश घाटपांडे
आमच्या जीवन शिक्षण मंदिरात बांगरवाडीची प्वॉर डोकी केल्याव शेंडी ठेवायची. तो जीवनाचा भाग होता. डोक्याव टोपी व आतमधे डोकी केल्याव शेंडी. शेंडी फक्त वैदिकांनीच ठेवावी असे काही नाही.
14 May 2018 - 12:56 pm | खिलजि
काय मग वाचक मंडळी , काही उत्तर मिळाले का यावर . गा पै आपण जवळ येता येता राहिलात बरं का . पण आपले उत्तर थोडे समर्पक आहे पण ते नव्हे जे मला मिळाले आहे . मी अजून थोडा वेळ इतर धाग्यावर गुंतण्यामध्ये घेतो आणि मग उत्तराकडे येईन म्हणतोय .
14 May 2018 - 3:54 pm | खिलजि
शेंडी का असावी ? या शंकेचे उत्तर मला मिळाले ते खालील प्रमाणे आहे .
हे विश्व नियंत्रित करणारी शक्ती ज्याच्याशी जोडून घ्यायला या पृथ्वीवरील प्रत्येक जीव येनकेन प्रकारे आटापिटा करत असतो , त्या दैवी शक्तीला अध्यत्माद्वारे समीप आणणारा रस्ता म्हणजे " शेंडी " होय . जिला आपण शिखा असेही म्हणतो .
शेंडी हि एका संवेदनाग्र ( अँटेना ) प्रमाणे कार्य करते . अँटेना मध्ये जसे पॉसिटीव्ह निगेटिव्ह आणि न्यूट्रल हवे असते त्याप्रमाणे शेंडीच्या जागेतही ते केस असतात जे पॉसिटीव्ह , निगेटिव्ह आणि न्यूट्रल चे कार्य करतात . आता ते केस कुठले आणि कसे ओळखायचे ? ते ओळखणे फार कठीण काम आहे . ते फक्त त्या विधात्यालाच माहित .
भोवऱ्याच्या सभोवतालचा भाग आणि त्या भागात वाढणारे केस , यापैकी कुठलेतरी तीन केस हा अँटेनाचा कार्यभाग साधतात . म्हणून शेंडी ठेवताना , भोवऱ्याचा भाग निवडतात . जेणेकरून एका अध्यात्मिक साधकाला ते सर्व वैश्विक ज्ञान प्राप्त होते ज्याचं त्याला आणि समाजाला खरी गरज असते .
तर मित्रहो , या मला आवडलेल्या आणि पटलेल्या उत्तरासाठी मी एव्हढी वर्ष वाट बघत होतो .
14 May 2018 - 5:04 pm | माहितगार
मला (नं) समजल्यासारख वाटतय (ह. घ्या.)
14 May 2018 - 7:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
एव्हढे म्हटले तरी चालले/संपले असते की. बाकी असो.
14 May 2018 - 8:55 pm | शब्दानुज
खिलजीकाका प्रतिसाद काही पटला नाही बुवा..
आता बघा एखादा अॅंटेनाच्या जागी ज्याद्या वायरी लावल्या तर अॅंटेना चालायचा बंद होईल का ? तसेच डोक्यावर ज्यादा केस असले तर ते तथाकथित तीन केस सिग्नल घेणारच ना. ते तीन केस काम करणारच.
तरीही तसे होते असे मानू आपण. आता जर शेंडीमुळे आपण कनेक्ट होऊन वैश्विक ज्ञान प्राप्त होत असेल तर एखाद्या अॅंटीनाधारकाने चातुर्वर्णीय पद्धतीस विरोध का केला नाही ? पुढे पानिपतात आपले अॅंटीने सिग्नल सोडत होते आणि समोरचे शत्रूसेना मात्र वायफाय सारखे आधूनिक तंत्रज्ञान वापरत होती का ?
एकामागोमाग एकजण येऊन इथले राज्यकर्ते बनत होते याचा अर्थ आपण वैश्विक ज्ञान मिळवून स्वयं संरक्षणार्थ सिद्ध नव्हतो असा घ्यायचा का ?
बर तरीही मान्य करु तुम्ही म्हणता तशी शेंडी काम करते. सर्वांनाच जर वैश्विक शक्तीशी जोडायचे असेल वा तो सिग्नल पाहिजे असेल तर ती पद्धती भारताबाहेर का गेली नाही ? त्यांनी कोणत्या वायरलेस पद्धतीने कनेक्ट होऊन ज्ञान मिळवले आणि आपले अॅंटीने सिग्नल का सोडत राहिले ?
अवांतर -
श्यामची आईमद्धे त्या माऊलीचे वाक्य आहे ,"मोह सोडणे म्हणजे धर्म. केसांमद्धेही मोह नको म्हणून ते काढावेत." हे पटण्याजोगे आहे. तुम्हास पटते का बघा.
पुढेपुढे शेंडी त्यावेळेची हेअर स्टाईल बनली असावी.(ह.घ्या)
बाकी तुमचे हे श्रद्धास्थान असेल तर विषय संपला. पण चुकीच्या ग्रुहितकावर आधारलेली श्रद्धा नसावी ही अपेक्षा. शेंडी राखण्याचे ह्याहून काही वेगळे स्पष्टीकरण कळालेले असल्यास जरूर सांगा.
15 May 2018 - 12:45 am | manguu@mail.com
अभ्यास करताना शेंडी व खुंटी यात दोरा बांधत म्हणे, अभ्यास करताना झोप लागली तर शेंडीला हिरडा बसून झोप जायची,
हा उपयोग माहीत होता,
ज्यांचे antena powerful नाहीत व पुस्तके वाचल्याशिवाय गत्यंतर नाही , अशा अबोध लोकांना हा उपयोग होता,
15 May 2018 - 12:46 am | manguu@mail.com
हिसडा
15 May 2018 - 4:49 am | चित्रगुप्त
.... हे तर एकदम काहीतरी लई भारी पारलौकिक वगैरे प्रकरण दिसतंय.
कृपया त्यांची एकदा परत भेट घ्या आणि त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिलेल्या उत्तराला शास्त्राधार काय आहे, म्हणजे गीता किंवा कोणतातरी वेद किंवा उपनिषद वा ब्रम्हसूत्र, पातंजलयोग वगैरे कोणतातरी ग्रंथ, यातील नेमका संस्कृत श्लोक वा ऋचा वगैरे कोणती, ते अवश्य जाणून घ्या आणि आम्हालाही सांगा. तेवढीच ज्ञानात भर पडेल म्हणतो.
आणि हा जर आधुनिक वैज्ञानिक शोध असेल तर कोणी, केंव्हा, कुठे, कोणते प्रयोग करून ते सिद्ध केले आहे, हेही जाणून घ्या. हे त्यांना विचारल्यावर ते कोणते उत्तर देतात, ते सुद्धा इथे लिहा, म्हणजे या धाग्यात मांडलेल्या सिद्धांताला पूर्णत्व येईल.
हल्लीच्या सुशिक्षित, आधुनिक वगैरे मडळींना एकादी जुनी प्रथा वगैरे पटवून द्यायची, तर त्यात काहीतरी भारी सायंटिफिक वगैरे फंडा आहे, असे भासवणे गरजेचे असते (असे 'ह्यांचे' मत. -- बाईसाहेब फुरसुंगीकर).
15 May 2018 - 5:07 am | चामुंडराय
टकल्यांचा अँटेना कोठे असतो म्हणे? :)
जे पूर्ण टकले असतात किंवा ज्यांना बरोबर शेंडीच्या जागी टक्कल असते त्यांचा अँटेना कोठे असतो म्हणे?
आणि अँटेनाच नाही म्हटल्यावर विश्व नियंत्रित करणाऱ्या शक्ती बरोबर जोडून घ्यायला नील-दंत वापरायचा का टकल्याने ?
15 May 2018 - 8:08 am | अरविंद कोल्हटकर
म.म.काणे ह्यांच्या History of Dharmashastra V II ह्या ग्रन्थामध्ये चौथ्या भागात ’चौलकर्म’ (मुलाचे केस कापणे) ह्या संस्काराच्या वर्णनामध्ये ’शिखा’ म्हणजे शेंडी विषयी बरेच विवेचन आहे. शिखा ठेवणे हा आवश्यक रीतिरिवाज होता. मुद्राराक्षसातील चाणक्य आपल्या शिखेविषयी असे म्हणतो (नन्दकुलाचा पूर्ण नाश केल्याशिवाय मी शिखाबन्ध करणार नाही अशी त्याची प्रतिज्ञा आहे):
नन्दकुलकालभुजगीं कोपानलबहलधूमलताम् ।
अद्यापि बध्यमानां वध्य: को नेच्छति शिखां मे॥
(नन्दकुलाचा कृष्णसर्पच जणू, क्रोधाच्या अग्नीची धूमलताच, अशी माझी शिखा बांधली जाऊ नये असे मरणाच्या रस्त्याला लागलेला कोण इच्छित आहे?)
शिखा कापण्यास पुढील प्रायश्चित्त सुनावण्यात आले आहे. ’शिखां छिन्दन्ति ये मोहाद् द्वेषादज्ञानतोऽपि वा । तप्तकृछ्रेण शुध्यन्ति त्रयो वर्णा द्विजातय:॥ (हारीत)
(जे चुकीने, द्वेषातून वा अज्ञानाने शिखा कापतील त्या त्रैवर्णिकांना ’तप्तकृछ्र’ प्रायश्चित्त घ्यावे लागेल.)
15 May 2018 - 1:47 pm | माहितगार
@ अरविंद कोल्हटकर
History of Dharmashastra चे लेखक पांडुरंग वामन काणे असावेत, आपण म्हणत असलेले म.म.काणे या सदगृहस्थांचे याच नावाचे आणखी वेगळे पुस्तक आहे की नामोल्लेखातील गल्लत अनवधानाने झालेई आहे.
बाकी पांडुरंग वामन काणे यांचे History of Dharmashastra V II अर्काईव्हड डॉट ऑर्गवरुन डाउनलोड करुन चाळले पण पहिल्या चाळण्यात तरी चौलकर्म चे उल्लेख मिळाले नाही . पृष्ठ क्रमांक नमुद करणे शक्य होईल का . अन्यथा पावणे दोन हजार पृष्ठातून शोधणे तसे कठीणच.
एनी वे History of Dharmashastra V II ला असलेली सर्वपल्ली राधाकृष्णनाम्ची प्रस्तावना , आणि पां. वा काणे यांचा य ग्रंथात व्यक्त पुरोगामी दृष्टीकोण समस्त पुरोगामी हिंदूंना प्रेरणादायी असावा , म्हणून वाचनीय ग्रंथ माले कडे लक्ष वेधल्या बद्दल अनेक आभर.
15 May 2018 - 4:04 pm | राही
म. म. हे 'महामहोपाध्याय ' या पदवीचे लघुरूप आहे.
म. म. श्री. पां. वा. काणे हे भारतरत्न होते. रत्नागिरी जिल्ह्याने तीन भारतरत्ने दिली आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे आणि पां. वा. काणे.
15 May 2018 - 4:04 pm | राही
म. म. हे 'महामहोपाध्याय ' या पदवीचे लघुरूप आहे.
म. म. श्री. पां. वा. काणे हे भारतरत्न होते. रत्नागिरी जिल्ह्याने तीन भारतरत्ने दिली आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे आणि पां. वा. काणे.
15 May 2018 - 4:24 pm | राही
हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र हा एक पंचखंडात्मक भव्य आणि अतुल्य असा ग्रंथराज आहे. गिरगावातल्या चाळीतल्या एका छोट्याशा जागेत त्यांनी हे प्रचंड काम केले. यातले नुसते संदर्भ पाहिले तरी छाती दडपून जाते. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर एस (सर्वपळ्ळी) राधाकृष्णन यांना या कार्याविषयी कळल्यावर त्यांनी श्री काणे यांची भेट घेतली. डॉ. राधाकृष्णन हे स्वत: प्रकांडपंडित. त्या छोट्याशा जागेतून चाललेल्या या महान कार्याचे मोल त्यांनी जाणले नसते तरच नवल. त्यांनी ' भारतरत्न' साठी डॉ. काणे यांची शिफारस केली.
15 May 2018 - 4:24 pm | राही
हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र हा एक पंचखंडात्मक भव्य आणि अतुल्य असा ग्रंथराज आहे. गिरगावातल्या चाळीतल्या एका छोट्याशा जागेत त्यांनी हे प्रचंड काम केले. यातले नुसते संदर्भ पाहिले तरी छाती दडपून जाते. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर एस (सर्वपळ्ळी) राधाकृष्णन यांना या कार्याविषयी कळल्यावर त्यांनी श्री काणे यांची भेट घेतली. डॉ. राधाकृष्णन हे स्वत: प्रकांडपंडित. त्या छोट्याशा जागेतून चाललेल्या या महान कार्याचे मोल त्यांनी जाणले नसते तरच नवल. त्यांनी ' भारतरत्न' साठी डॉ. काणे यांची शिफारस केली.
16 May 2018 - 3:07 pm | माहितगार
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार
15 May 2018 - 10:04 am | वकील साहेब
जियो शब्दानुज जियो. सही पकडे हो.
खिलजी यांनी सांगितलेले कारण काही शास्त्रीय नाही म्हणून पटत नाही. म्हणजे सिद्धच करायची नसेल तर दुसरी एखादी थिअरी वापरली असती तरी चालले असते. म्हणजे शेंडी चे केस एकूण डोक्याच्या आकाराच्या मध्यभागी असल्याने आणि शेंडी वाढवून ती उर्वरित टकलावर रुळत ठेवल्याने पृथ्वीच्या अंतर्गत असलेल्या दिव्य शक्तींचा मेंदूस लाभ होऊन मेंदू कुशाग्र होतो वैगरे वैगरे वैगरे
अशा थिअरीजची यादी बरीच मोठी वाढवता येईल. पण ती सिद्ध कशी करणार ?
रच्याकने, हल्ली अनेक बाबा बुवांचे मठ, आश्रम याचं प्रस्थ वाढत आहे. येथे एका गोष्टीच निट निरीक्षण केल तर अस लक्षात येत कि तिथल्या आराध्य प्रतिमेला वंदन करण्याची बर्याच जणांची पद्धत वेग वेगळी आहे. काही ठिकाणी साधा नमस्कार केला तरी चालतो, काही ठिकाणी मुजराच करावा लागतो, काही ठिकाणी गुडघ्यावर बसून नमस्कार करावा लागतो,
अनेक राजकीय अन सामाजिक पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकमेकांना भेटल्यावर अभिवादन करण्याची स्वतंत्र अशी शैली असते कुणी जय महाराष्ट्र करतो कुणी लाल सलाम करतो कुणी जय शिवराय म्हणतो वैगरे याचा लसावी काय तर प्रत्येक जण आपल्या आचार अन कृतीतून आपल्या अस्तित्वाच वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो.
शब्दानुज यांच्या प्रतिसादा नुसार शेंडी न राखणारे बुद्धिमान कसे हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून शेंडी राखणे म्हणजे आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करण्याची एक कृती या व्यतिरिक्त अन्य काही कारण असेल असे तूर्तास तरी वाटत नाही. म्हणजे उद्या त्याच कारण सप्रमाण सिद्ध करणारी एखादी भरीव थियरी आली तर स्वीकारायची तयारी आहे.
बाकी या निमित्ताने पुलंच एक वाक्य आठवलं.
"देवाला जर जातीपातीच निर्माण करायच्या असत्या तर त्याने ब्राह्मणाला मुंडण करून अन जाणव घालून अन मुसलमानाला सुंता करूनच जन्माला घातलं नसत का ?"
15 May 2018 - 11:50 am | गामा पैलवान
वकील साहेब,
गुड क्वेश्चन! शेंडी ठेवण्याचे फायदे ज्याला साधना करायची आहे केवळ त्याच्यासाठीच उपयोगाचे आहेत. इतरांनी लक्ष घालायची गरज नाही.
आ.न.,
-गा.पै.
15 May 2018 - 2:14 pm | माहितगार
@ गा. पै. आणि खिलजी जी
मी या क्षणी अरविंद कोल्हटकरांनी सुचवलेल्या History of Dharmashastra V II ह्या अर्काईव्ह्ज डॉट ऑर्ग वरुन डाउन लोड केलेल्या पिडीएफच्या पृश्ठ १०९४-१०९५ आणि मूळ ग्रंथातील पृष्ठ १७०९-१७१० वर आहे. ह्याचे लेखक महामोपाध्याय पां . वा काणे यांचा हा (इंग्रजी विपी) परिचय त्यांच्या संस्कृत आणि धर्मशास्त्रावरील अभ्यास आणि आधिकार या दोन्ही बाबी उल्लेखनीय असाव्यात.
पिडीएफच्या पृश्ठ १०९४-१०९५ आणि मूळ ग्रंथातील पृष्ठ १७०९-१७१० वर ते काय काय म्हणतात पहा
15 May 2018 - 2:16 pm | माहितगार
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.49709
15 May 2018 - 1:01 pm | माहितगार
:)
15 May 2018 - 12:05 pm | जेम्स वांड
खिलजि काकांनी अवतार सिनेमाची थेअरी अध्यात्मात मांडलेली दिसते, अवतार मध्ये नाही का ती निळी माणसे घोड्याच्या शेंडीला आपली शेंडी जोडून घोडं वाटेल तसं पळताना दाखवले आहे तसेच.
15 May 2018 - 12:36 pm | खिलजि
ह्या ह्या ह्या
अच्छा तो अवतार होय
मला वाटलं आपला राजेश खन्नाचा कि काय
दोन्ही शेमटूशेमच होते
तिकडे ती निळी माणसे
आणि इकडे भारतीय कणसे
अर्रे हाय काय नि नाय काय
खरा अवतार कुणी बघितलाय काय
15 May 2018 - 12:46 pm | खिलजि
शब्दानुज भाऊ , अहो शेंडी आणि पानिपतचा काय संबंध . आपण किती बदललोय बघा . कुठलीही प्रथा आपल्याला थेट युद्धभूमीवर नेऊन उभं करते . पानिपत झाले ते बरेच झाले . निदान एक तरी कळले कि शत्रूला माफ कधीही करू नये . त्याला थेट यमसदनी धाडावे.
15 May 2018 - 1:14 pm | खिलजि
मागासाहेब , त्या शुक्ला काकांनी मला जे उत्तर दिले ते मला तंतोतंत पटले . याआधीही उत्तर दिलीच होती कित्येकांनी पण ती मला पटली नव्हती कारण मला ते नव्हते मिळाले ज्याला साध्याच वैज्ञानिक दृष्टिकोन असेल . इथे जर दूरदर्शनला अँटेनाच नसेल तर तो कसा दिसेल ? बरे अँटेनात जी कार्यप्रणाली आहे तीच बहुधा शिखेमध्येही असावी . त्यांचे उत्तर मला तंतोतंत पटले म्हणूनच मी त्यांचे पाय धरले . जो आपल्याला समजेल त्या भाषेत सांगतो त्याला नेहेमी मी दंडवत करतो .
15 May 2018 - 4:19 pm | माहितगार
तसे त्या शुक्लाजींना आमचेही दंडवत सांगण्यास हरकत नाही. पण तार्कीक समस्या नुसत्या दंडवताने सूटतीलच असे नसावे
शब्दानुजांनी पहिल्या परिच्छेदात जी मांडणी केली त्यात वाक्य क्रमात फेर बदल करतो
आणि आपल्या उत्तराची प्रतिक्षा करतो
15 May 2018 - 1:34 pm | वकील साहेब
गामा पैलवानजी,
खिलजिंनी हा धागा काढला नसता तर हा क्वेश्चन विचारून मला त्यात लक्ष घालण्याची गरजही पडली नसती. नाही का ?
15 May 2018 - 5:56 pm | गामा पैलवान
वकील साहेब,
एका अर्थी तुमचं बरोबर आहे. आता खिलजी यांनी कोणत्या उद्देशाने धागा काढला ते बघायला हवं.
माझ्या म्हणण्याचा उद्देश असा की ज्याला शेंडी ठेवायची आहे त्याने स्वत:च स्वत:वर प्रयोग करून पाहणं इष्टं. इतरांनी लक्ष घातलं तरी जिज्ञासूस फायदा नाही.
आ.न.,
-गा.पै.
15 May 2018 - 3:52 pm | विजुभाऊ
सगळे वाचले तरीही मी जिवंत कसा आहे हे जाणून घ्यावंसं वाटतंय.
मुमुक्षु ला कोण मार्गदर्षन करायला शिल्लक आहे का
15 May 2018 - 9:46 pm | झेन
पूर्वी मोबाईल हँडसेटला एक्सर्टनल अँटेना असायचे आता इंटरनल असतात. त्याप्रमाणे माणसामधे उत्क्रांती होवून इंटरनल अँटेना तयार झाला असेल काय?
शुक्लाजी माझा प्रश्न असतील तिथून रिसिव्ह करतील काय?
15 May 2018 - 10:20 pm | शब्दानुज
प्रतिसाद जरासा मोठा आहे तरीही तो शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.
आपण विद्यूत वहनाचे काही मुलभुत नियम लहान असताना शिकलो होतो. ते जरा पुन्हा आठवून पाहूया. विद्यूत प्रवाह तारेतून वाहताना वाहताना तारेची लांबी वाढत नेली की विद्यूत हानी वाढत जाते आणि तिची तिव्रता कमी होत जाते. तसेच जर तुम्ही तारेला गाठी मारुन विद्युत प्रवाह सोडला तरीही अवरोध तयार होतो.
आता तुम्ही केसांना वायरच्या रुपात पहात आहात. शेंडीमद्धे आपण केसांची लांबी वाढवतो आणि गाठीसुद्धा बांधतो. म्हणजेच तुम्ही वैश्विक शक्ती वाहण्यात मुद्दाम अवरोध निर्माण करत आहात.
म्हणजे तुम्ही जो सिद्धांत मांडलात त्याच्या नेमक उलट काम शेंडी करत आहे. डोक्यात बाहेरुन काही आत येताना शेंडी चक्क अवरोध करेल.
म्हणजे शेंडीचा उपयोग बाहेरून आत काहीतरी पाठवण्यापेक्षा डोक्यातले काही तरी बाहेर जाऊ नये यासाठी असावा. हिजाब , पगडी , हॅट हेही अवरोध निर्माण करण्यासाठीच वापरले जात असतील का असा विचार करून बघा.
पण माझे उत्तर हे नव्हे. त्या उत्तरापुर्वी आपण ह्या लेखाची थोडी पार्श्वभूमी बघू.
आपणास एक प्रश्न पडला आणि त्याचे उत्तरही भेटले.
मग मात्र हेच उत्तर बरोबर असे तुमचे ठाम मत बनले. जेव्हा तुम्ही लेख प्रकाशित केला तेव्हा तुमचा हेतू तुमच्याहून उत्तम उत्तर मिळते का हा पाहण्याचा नसून कोणते उत्तर तुमच्या उत्तराशी मिळते हे पाहण्याचा होता.
ज्ञान मिळवण्यासाठी शेंडीऐवजी आवश्यक असते ती ज्ञानलालसा. जेव्हा आपण कोणत्याही वस्तूशी , विचाराशी 'कनेक्ट' होतो तेव्हा आपण सहज त्यापासून ज्ञान मिळवू शकतो. पण येनकेनप्रकारे आपण आपल्या पुर्वग्रहांच्या , ठाम कल्पनेच्या गाठी मारून अवरोध निर्माण करतो.
माझ्यासाठी शेंडी हे अश्या अनावश्यक गाठींचे प्रतिक आहे. अशा गाठी डोक्याबाहेर ठेवा आणि ज्ञान मिळावा असा माझ्यापुरता मी शेंडीचा अर्थ लावून ठेवला आहे.
तुमचा अर्थ तुम्ही शोधा.!
15 May 2018 - 11:54 pm | वीणा३
प्रतिसाद आवडला. मला कितीतरी गोष्टी मध्ये असं जाणवतं कि ज्या बऱ्याच गोष्टींना आपण संस्कार म्हणतो ते त्या त्या वेळच्या गरजा होत्या. त्यामुळे जे यात शास्त्र शोधायला जातात ते खूप गोंधळ असलेलं शास्त्र मांडतात. अर्थात हि माझी मतं आहेत, माझा काही अभ्यास नाही.
संध्याकाळच्या सगळ्या गोष्टी - निरंजन लावणं (लाईट नाही), पाढे म्हणणं, देवाची स्तोत्र म्हणणं ( टीव्ही, वॉट्सअँप नाही).
सगळे सण वार शेतीच्या कामा प्रमाणे लावलेले. देव धर्म हे माणसं रिकामी राहू नयेत, काही ना काही कामं चालू राहावीत यामुळे चालू केले.
मुंज - मुलगा गुरु कडे राहायला जायच्या आधी केलेलं मोठं गेट टुगेदर.
होळी, संक्रांत - हवा बदल / ऋतू बदल प्रमाणे साजरे केलेले सण
सुतक - सुवेर - काही संसर्गजन्य आजार टाळण्याचा उपाय ई ई.
आज मी कोणालाही घरी जेवायला विकेंड ला का बोलावते - साधं कारण म्हणजे सगळ्यांना तेव्हाच वेळ असतो (मला सुद्धा), यात मी (किंवा कोणीही) कसला शास्त्रिय विचार करतो नक्की? याच न्यायाने ते लोक सुद्धा शास्त्रिय विचारापेक्षा सोय बघत असणार असं वाटतं.
मला एक मैत्रीण म्हणाली - पूर्वीचे लोक सकाळी जेवायला बोलवायचे (सवाष्ण ई ), त्यांना आरोग्याचं किती ज्ञान होतं. म्हंटल अग त्यांच्याकडे संध्याकाळी लाईट होते का. सकाळी जेवायला बोलावलं हि सोय होती.
16 May 2018 - 8:07 am | जेम्स वांड
पण आता एक सांगा
.
आजकाल काही बहुसंख्य मुले गुरुगृही जात नाहीत, मग? मौंज संस्कार मोडीत काढावा का?
लॉजिक शोधणे एक चांगली अन तर्कसुसंगत सवय आहे, पण आपण काही संस्कारांचे अतिसुलभीकरण किंवा अतिउदात्तीकरण करतोय का हे जोखत केलेलं इष्ट.
तसं तर हळदीकुंकू हा कधीही घराबाहेर न पडणाऱ्या स्त्रियांना हक्काचा दिवस, हक्काचा कोपरा अन एक गेट टुगेदर म्हणून आयोजित केलेलं असायचं न? आजकाल तर पोरी सातासमुद्रापार जातात, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामे करतात, मग हळदीकुंकू पण मोडीत काढावे काय?
16 May 2018 - 2:30 pm | पिलीयन रायडर
ज्याला हवं त्याने अगदी जरूर मोडीत काढावं. मुंजीला आता काही अर्थ नाही. हळदीकुंकू वगैरे सुद्धा आवश्यक नाही, आता बायका आपल्या हिशोबाने भिशी वगैरे करतात.
अमेरिकेत जाऊन तिथे श्रावण पाळणारे येडे पण आहेत. श्रावण का पाळतात ह्या मागे तर लॉजिक पण आहे. पण आम्हाला लॉजिक माहिती करून घ्यायचे नाही. म्हणून भारतात धो धो पावसात श्रावण लागला की आम्ही अमेरिकेत कडक समर मध्ये श्रावण सुरू करणार. करणाऱ्याला त्यात काहीतरी समाधान मिळतं त्यामुळे आपण आक्षेप घेणारे कोण म्हणा!
ज्याचा अर्थ आपल्याला कळत नाही, पटत नाही वा कालसुसंगत वाटत नाही ते सगळं करणं सोडून द्यायला मला काहीच हरकत वाटत नाही. असं करताना अजिबात बिचकू नये.
माणसानं आनंद मिळतो ते काहीही करावं, भले लॉजिक सापडत नसलं तरी. तो अखेर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त हे करताना चुकूनही दुसऱ्याच्या डोक्याला ताप होत नाही ना हे पहाणे महत्वाचे. मग हळदीकुंकू करा वा भिशी.. हू केअर्स!
16 May 2018 - 3:29 pm | जेम्स वांड
पण खणखणीत सत्य!. प्रतिसाद आवडला.
16 May 2018 - 10:19 pm | वीणा३
मुंज आताच्या का करावी हा प्रश्न मी ५-१० लोकांना विचारलाय, त्यात २ गुरुजी पण होते. माझे प्रश्न आणि त्यांची उत्तर :
मुंज का करायची असते?
लहानपण संपून विद्यार्थीदशेत प्रवेश करायचा संस्कार म्हणून मुंज करायची असते. या विधी नंतर पूर्वी मुलगा गुरुगृही जात असे.
माझा मुलगा ३ वर्षांपासून शाळेत जातोय, आणि मी त्याला तो कमावता होई पर्यंत कधीही बाहेर पाठवणार नाहीये, तर हा विधी मला लागू होतो का?
हो हा एक आवश्यक विधी आहे, या विधी नंतर मुलगा विद्यार्थीदशेत प्रवेश करतो (परत तेच उत्तर), आणि लग्नाआधी सोडमुंज करायला लागते, त्यासाठी मुंज झालेली लागते.
पूर्वी तो मुलगा बाहेर राहायला जायचा / आई पासून लांब राहायचा / जेवणासाठी माधुकरी मागायचा. मुळात माझा मुलगा आधीच विद्यार्थी झालाय आणि आयुष्यभर त्याच प्रकारे तो शिक्षण घेणार आहे (काही तास शाळेत जाणार बाकी घरी). मी जिवंत असे पर्यंत त्याला माधुकरी मागायची वेळ कधीही येऊ देणार नाहीये. असं असताना मी एखादा कार्यक्रम करून त्याला "ओम भवती भिक्षांदेही " का म्हणायला लावू? का त्याला सांगू कि यापुढे आई तुला कधीही भरवणार नाहीये ? - हे पुढचे प्रश्न विचारले कि "अली मोठी शिकलेली, या पिढीला आपल्या संस्कारांचा आदर नाही इ.इ.इ . मला मुलांची मुंज करायला लागली तर मी ती गेट टुगेदर म्हणूनच करेन.
हळदी कुंकू :
कदाचित हे एक गेट टुगेदर + बाहेर जाण्याचं कारण याच बरोबर अजून एका गोष्टीसाठी आहे. ते म्हणजे बाई ला तू सवाष्ण आहेस म्हणून तुला हे मिळतंय, हे आडून सांगण्यासाठी केलेल्या विविध पद्धतींपैकी एक. जर फक्त गेट-टुगेदर + बाहेर जायच कारण असतं तर ते सगळ्यांना मिळालं असतं.
माझ्या एका मैत्रिणीला मुलं नकोयत, दोघांचा निर्णय आहे कि मुलं नकोत. ती माझ्या अजून काही मैत्रिणी, शेजारच्या आणि जवळ राहणाऱ्या १-२ नातेवाईक बायका असे बोलावले. माझ्या शेजारच्या आणि माझ्याच वयाच्या बाई ने त्या मैत्रिणी ला मुलांवरून भंडावून सोडलं. दोघीही माझ्या घरी पाहुण्या म्हणून मला पण ताडकन काही बोलता येईना. नातेवाईक बाई ची प्रतिक्रिया सुद्धा हिला का बोलावलं अशी होती. तरी नशीब ओळखीत कोणी विधवा / घटस्फोटी नव्हत्या, नायतर तो वेगळाच गोंधळ. कितीतरी घरामध्ये विधवा आई सासू हळदी कुंकू च्या वेळी आतल्या खोलीत जाऊन बसतात. त्यापेक्षा खरंच भिशी परवडली.
धार्मिक कार्यात तुम्ही सवाष्ण + मुलं असलेली असणं हे अजूनही कितीतरी "बायकांसाठी" अतिशय महत्वाचं आहे, तो एक वेगळाच विषय आहे.
बऱ्याच लोकांना अजूनही हे कळत नाही कि जर आपल्या पद्धती जर पुढच्या पिढीत करायच्या असतील तर या लेखाप्रमाणे कायतरी गमतीशीर सांगून कोण ऐकणार नाहीये. काहीतरी पटेल असं सांगा, म्हणजे पुढच्या पिढ्या पण काही उपयोगी असेल तर घ्यायचा प्रयत्न करतील.
17 May 2018 - 8:55 am | माहितगार
अगदी सहमत, तथ्य विहीन आणि तर्कसुसंगत नसलेली काल्पनिक पतंग विधाने कुणितरी खोडून काढे पर्यंतचा तात्कालीक फायदा देतात तो विश्वासार्ह उपाय नाही .
मानवी प्रवृत्ती धार्मिक गोष्टी एकवेळ मोडीत काढू पण सुधारणा करणार नाही अशी का असते ते अनाकलनीय आहे. हळदी कुंकू असो वा सवाष्णिचे जेवण / ओटी; जेवण्यास बोलावलेली स्त्री सवाष्ण आणि मुल असलेली असेल तर आपणही सवाष्ण राहू आणि आपण ही मूले असलेली असू हि एक अंधश्रद्धा ( सवाष्ण आणि मूल असलेली स्त्री स्पर्धक म्हणून उभी रहाण्याची शक्यता कमी असणे असे अप्रत्यक्ष कारण विधवा आणि मुले नसलेल्या स्त्रीयांना टाळण्या मागे असू शकेल का हा सामाजिक मानस शास्त्रिय अभ्यासाचा विषय असावा) , आयुष्य (नवर्याचे ही) आरोग्य आणि सुरक्षेवर अवलंबून असते; आरोग्य आणि मुले होण्यातल्या अडचणी संबंधीत समस्यांचे सोल्यूशन आधूनिक विज्ञानाने उपलब्ध होत चाललेल्या सुविधात आहे हे लक्षात आले कि अंधश्रद्धेचा भाग कमी होईल.
वर्षातून चार वेळा जात/धर्म/ वैवाहिक स्टेटस न पहाता शिक्षक, शिक्षीका , उच्च विद्या विभूषित व्यक्तींना जेवणास बोलावण्यास हरकत नसावी किंवा अजून काही वेगळ्या प्रकारे आधूनिक सुधारीत प्रयोगास हरकत नसावी. पण परंपराग्रस्त मने आहे तसे पाळू अथवा पूर्ण मोडीत काढू वृत्तीत असतात .
17 May 2018 - 9:13 am | माहितगार
वैवाहीक स्टेटस महत्वाचे रहात नाही हे खरे हा प्लस पॉइंट नक्कीच, वातावरणानुसार जाती धर्मही गळून पडू शकतात पण क्लासची एंट्री नाही म्हटले तरी जराशी होते. अनुपस्थितांच्या निंदा नालस्तीत बर्यापैकी वेळ जाण्याची परंपरा कितपत पाळली जाते ते भिशीला जाणरे सांगू शकतील .
हौशी भिशी समूहांना (व्यावसायिक नव्हे) अल्पबचत गटात सामील करुन घेण्या बद्दल महिला नेतृत्वाने शासनावर दबाव आणला पाहीजे कारण सध्या च्या भिशी पद्धतीत असलेल्या पण बँकींग न करणार्ञा महिलांच्या मोठ्या गटास बँकींग सपोर्टला -पर्यायाने व्यावसायिक वृद्धीच्या संधींना -मुकावे लागत असावे असे वाटते.
अंधश्रद्धा विरहीत वैवाहीक स्टेटस वर अवलंबून नसलेले हळदी कुंकू , शेक हँड प्रमाणे पर्सनल टच निर्माण करण्यास मदत करते का ? हा मानसशास्त्रिय अभ्यासाचा विषय असावा. दुसरे महत्वाचे असे की विधवांना सामिल होता यावे इतर जाती धर्माच्या स्त्रीयांनाही सामिल होता यावे - म्हणून हळदी कुंकूचा कार्यक्रम न करणे पेक्षा सोशली इन्फ्लूएंशीअल स्त्रीयांनी विधवांना जाणिवपूर्वक सामिल करुन घेऊन अंधश्रद्धा विरहीत सांस्कृतिक म्हणून हळदी कुंकवाचे कार्यक्रम काही प्रमाणात तरी व्हावयास हवेत .
मुख्य म्हणजे कुंकू ह्या प्रकार मुख्यत्वे सांस्कृतिक आहे आणि स्वरुप विशीष्ट धर्मापर्यंत मर्यादीत असण्याचे कारण नाही -कुंकू लावले म्हणजे नवर्याला परमेश्वर मानलेच पाहिजे असे नाही - हा संदेश इतर धर्मियांपर्यंतही पोहोचवणे गरजेचे असावे असे वाटते.
17 May 2018 - 9:35 am | माहितगार
आताच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना एकच युनिफॉर्म देण्या मागे शीस्त जसे तत्व आहे तसे आर्थिक कारणावरुन विद्यार्जनाच्या वेळी भेद असू नये असे कारण असावे (चुभू देघे) तसे काहीसे
विद्यार्जन करणारी मुले राजाची अथवा श्रीमंत व्यापार्याची असली आणि अन्नधान्याचा मुबलक पुरवठा करणे त्यांच्या पालकांना शक्य असले तरीही परंपरा त्यांनाही "ओम भवती भिक्षांदेही " म्हणून इतर विद्यार्थ्यांप्रमाणे भिक्षा मागावी लागण्या मागे हेतु अहंकार गळून पडावा असा होता. यात समर्थ रामदासांनी मांडलेले अंशतः सुधारणेचे प्रयत्न रोचक असावेत . आजच्या काळात विद्यार्जन केलेल्यांना जातीच्या नव्हे पण 'आर्थिक-क्लास'च्या अहंकाराची बाधा होते आहे, त्यांच्यासाठी हा नव्हे पण असाच काही उपाय शोधण्याची गरज असावी असे वाटते .
मुंज प्रकाराचे मॉडर्नायझेशन करुन त्यामध्ये सर्व जाती धर्मियांना सामिल करुन घेण्यास हरकत नसावी. आजही कायदा वयाच्या १८व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालनाची अपेक्षा करतोच आहे मग त्या संबंधी संस्कार मुले आणि मुली दोघांनाही करण्यास हरकत नसावी. खरेतर त्या त्या वयात लागणारी स्वसुरक्षा अभ्यास कसा कगोष्टी, आणि इतर संस्कार मुल्यांचे आधुनिक समाजशास्त्रिय आणि मानसशास्त्रिय , आरोग्य विषयक दखल घेऊन वयानुरुप एक पेक्षा अधिक वेळा मौंजी बंधने करण्यास हरकत नसावी.
संस्काराचे दोन स्तर एक पालक, दुसरे शिक्षक , हे आजून चालू आहेत, समुपदेशकांचा नवा स्तर जोडला जातो आहे पण तो सहसा गोष्टी घडून गेल्यावर येतोय म्हणजे पालक, आणि शिक्षक हे दोन स्तर संस्कारांसाठी पुरेसे पडतीलच याची खात्री देता येत नाही तेथे सुधारणावाद अंगिकारलेल्या (जन्माधारित नसलेल्या) पौरोहित्याचा स्तर (हवेतर आधूनिक मानसशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या समुपदेशकांनाच पुरोहित बनवावे) संस्कारात भर घालण्यास उपयूक्त ठरु शकावा.
एवढेच नाही घरी जेवण देण्याच्या पद्धतीत सुधारणा करुन जन्माधारीत ब्राह्मणांएवजी स्मुपदेशक, शिक्षक , उच्च विद्या विभूषित यांना घरी जेवण्यास बोलवण्यास हरकत नसावी. त्यामुळे संस्काराची अजून एक लेव्हल मेंटेन होऊ शकावी.
पण पुन्हा एकदा सुधारणापेक्षा एकतर परंपरा आहे तशी उणीवांसहीत पाळू किंवा पूर्ण मोडीत काढू हा मानवी पवित्रा अनाकलनीयच
17 May 2018 - 10:33 am | वीणा३
तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला नीट कळत नाहीये (का देव जाणे तुमच्या बऱ्याच प्रतिसादाबद्दल हे होतं खरं )
संस्काराचे दोन स्तर एक पालक, दुसरे शिक्षक , हे आजून चालू आहेत, समुपदेशकांचा नवा स्तर जोडला जातो आहे पण तो सहसा गोष्टी घडून गेल्यावर येतोय म्हणजे पालक, आणि शिक्षक हे दोन स्तर संस्कारांसाठी पुरेसे पडतीलच याची खात्री देता येत नाही तेथे सुधारणावाद अंगिकारलेल्या (जन्माधारित नसलेल्या) पौरोहित्याचा स्तर (हवेतर आधूनिक मानसशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या समुपदेशकांनाच पुरोहित बनवावे) संस्कारात भर घालण्यास उपयूक्त ठरु शकावा.
पण पुन्हा एकदा सुधारणापेक्षा एकतर परंपरा आहे तशी उणीवांसहीत पाळू किंवा पूर्ण मोडीत काढू हा मानवी पवित्रा अनाकलनीयच
या दोन्ही वाक्यावरून तुम्हाला असं म्हणायचंय का "कि मुंज पुरोहित ऐवजी समुपदेशकाकडून करून घ्या "??
माझी नवीन मुंजी ची कल्पना सुद्धा आहे. ८ वर्षांच्या मुलाला मुंजीत - आता तुला आई कधीच भरवणार नाही, यापेक्षा - आता तुझी रोजची कामं तू करायचीस
१. स्वतःच ताट वाटी घासून ठेवणे
२. स्वतःच्या कपड्यांच्या घड्या करून नीट ठेवणे
३. स्वतःचे छोटे कपडे (चड्डी मोजे ) धुवून वाळत घालणे
४. स्वतःची नख स्वतः कापणे (जमेल का ते माहित नाही :प )
ई ई
भिक्षावळीच्या जागी त्या मुलाकडून काहीतरी असं काम करून घेणे कि आणि आलेल्या माणसांनी त्याबद्दल त्याला थोडेसे पैसे देणे (हे पैसेच असावेत असाही नाही, आणि त्या लोकांनी द्यावेत असं हि नाही, पण त्या मुलाला कामाचा काहीतरी मोबदला मिळेल हे कलण्यापुरते)
उदाहरणार्थ :
१. एक लादी ब्रेड + काकडी + टोमॅटो + चटणी चा स्टॉल लावून त्या मुलाला १० लोकांना सँडविच बनवून द्यायला सांगायचं (कापाकापी च काम कोणीतरी आधीच करून ठेवेल )
२. मुंजी च्या आधी १०-१५ दिवस त्याला धने पेरायला लावायचे छोट्या पॉट मध्ये, त्याला पाणी देणं, त्यावर लक्ष ठेवणं ई कामं करायला लावायची, आणि भिक्षावळी च्या वेळी ते छोटे पॉट्स किंवा कोथिंबीर लोकांना द्यायला लावायची.
आता प्रॉब्लेम असा आहे कि हे सगळं कल्पना कुणाला म्हणून चांगलं वाटेलही. पण प्रत्यक्ष राबवायचं म्हटलं तर घरातच किती लोकांशी वाद होतील, त्यामुळे एकतर करायचीच नाही, सरळ पैसे वाचवून कुठेतरी दान करायचे किंवा मज्जा म्हणून करायची, डोकं बाजूला ठेवून.
17 May 2018 - 10:50 am | माहितगार
आपण परंपरेच्या आधूनिकीकरणाचा मुद्दा तसा बरोबर पकडला आहे.
* "कि मुंज पुरोहित ऐवजी समुपदेशकाकडून करून घ्या "??
होय तसेच काहीसे, कदाचित पुरोहितांना आधुनिक दृष्टिकोणाचे समुपदेशक बनण्याची संधी देण्याचा पर्याय असू शकेल
माझे बाकी मुद्दे पुन्हा एकदा मांडणी करून बघतो
* संस्कार करण्यास शिक्षक आणि पालक असूनही काही वेळा पाल्य पुरेसे प्रभावित होत नाही किंवा अपेक्षीत रिझल्ट प्रत्येक वेळी मिळत नाही तेव्हा संस्कार करु शकणारी अजून एक लेव्हल ऊपयूक्त असू शकते आणि ते कार्य धार्मिक पुरोहीतशाही सुधारण केल्यास अजूनही करु शकेल किंवा आधुनिक समुपदेशकांनाच पुरोहीतांची जागा द्यावी पण संस्कार करणारी शिक्षक पालकां व्यतरीक्त अजून एक स्तर उपयूक्त ठरावा.
* लैंगिक विषयात स्वसंरक्षण, परलिंगीय व्यक्तीचा आदर, आणि वयाच्या १८व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालनाची अपेक्षा मुलांना सांगण्यासाठी प्रत्येकवेळेस शिक्षक आणि पालक पुरेसे पडतात असे नाही तेव्हा मुंजीच्या प्रयोजनात त्याचा समावेश असावा.
* इतर चांगल्या कालानुरुप संस्कारांचा अंतर्भाव मुंजीत असावा.
तसे आजकाल वेगवेगळ्या वयोगटांसाठी संस्कार वर्ग होतात , वेगळ्या अर्थाने असे क्लासेस आधुनिक उपनयन आहेत का असाही विचार येऊन गेला. असो.
16 May 2018 - 12:22 am | पिवळा डांबिस
नेमकं!
16 May 2018 - 6:55 am | उपाशी बोका
अँटेना म्हणून बोका समाजात आम्ही मिशा ठेवतो, शेंडी नाही.
16 May 2018 - 8:16 am | माहितगार
:)
16 May 2018 - 12:10 pm | प्रसाद_१९८२
एकाद्याला "शेडी लावणे" ह्या वाक्प्रचारचा उगम कसा काय झाला?
16 May 2018 - 12:33 pm | तिमा
अगदी ओढून ताणून शास्त्रीय अर्थ लावायचा तर, कुटुंबप्रमुखाची जबाबदारी कुटुंबाचे रक्षण ही होती. शेंंडी ठेवल्याने, तो बाकीच्या कुटुंबाचे विजेपासून(लाईटनिंग) संरक्षण करत असे. त्याची शेंडी म्हणजेच लाईटनिंग प्रोटेक्टर!!! आहाहा, काय तो स्वार्थत्याग! स्वतः विजेचे वाहक होऊन जळून जायचे, पण कुटुंबाला वाचवायचे.
16 May 2018 - 1:24 pm | manguu@mail.com
शेंडीचा उपयोग काय , याचे उत्तर शेंडी ठेवलेल्याला आपोआप शेंडीनेच द्यायला हवे, इतरांना विचारावे लागते , म्हणजे शेंडीच्य कार्यात बाधा आहे का ?
16 May 2018 - 2:28 pm | अकिलिज
एखादी गोष्ट जर सतत लक्षात ठेवायची असेल तर बरेच जण काही ना काही उपाय करतात. जसे फेंगशूई मध्ये घरात दर्शनी ठिकाणी एक पुतळा ठेवला तर घरी राहणार्याला सतत काहीतरी चांगले होणार आहे असे वाटत राहते. तसे शेंडी ठेवणार्याला सतत आपण विश्व नियंत्रण करणार्या शक्तीला जोडत बसावयाचे आहे याची जाणिव करून देत असावेत.
16 May 2018 - 7:44 pm | वकील साहेब
वीणा३ व पिलियन रायडर यांनी मांडलेले मुद्दे अधिक पटतात
संध्याकाळच्या सगळ्या गोष्टी, सगळे सण वार, मुंज, होळी, संक्रांत, सुतक याही व्यतिरिक्त अनेक गोष्टी अशा आहेत की त्या कधीकाळी त्या वेळेची गरज होत्या. पण आज सोपस्कार म्हणून उरल्या आहेत.
वीणा ताई याची यादी बनवण्या साठी एखादा नवीन धागा तुम्हीच काढावा असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते.
20 May 2018 - 10:22 pm | सुबोध खरे
आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे.
"मला सांगितले गेले होते की शेंडीत वीज असते.
हे 100% सत्य आहे
कारण
जेंव्हा मी शेंडी काढून टाकली तेंव्हा
आमच्या वडिलांना जोरदार धक्का बसला होता".
22 May 2018 - 4:08 pm | माहितगार
मिपा मित्रांनो, तमिळ प्राच्य लिपी संशोधक इरावथम महादेवन यांच्या Dravidian Proof of the Indus Script via the Rig Veda: A Case Study या २०१४ च्या संशोधन निबंधात सिंधू लिपीतील चार चिन्हांवर अभ्यसनीय रोचक लेखन आहे. योगा योगाने तो लेख आज वाचनात् आला , योगा योगाने एका चिन्हातील शेंडी बद्दलही चर्चा आहे. अर्थात हि चर्चा फक्त शेंडी बद्दल आहे समजून लेख दुर्लक्षीत करु नका कारण अजून बरेच काही वाचनीय आहे आणि सर्व माहिती इथे देऊन तुमचा वाचनांनंद घालवत नाही . त्यांनी त्यांच्या निबंधात वापरलेले आर्य द्रविड हे शब्द तात्पुरते बाजूस ठेऊन वाचले तरी , सिंधू लिपीतील चिन्ह तमीळ भाषा आणि ऋग्वेदातील एक देवता यांचा संबंध दाखवण्याचा एक महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून पहाण्या सारखा वाटतो. एखाद्या संशोधन प्रयत्नाची दखल पाश्चात्यांनी घेतल्यावरच आपण घ्यावी असा आग्रह नसेल तर आवर्जून वाचावे.
* Dravidian Proof of the Indus Script via the Rig Veda: A Case Study चा सरळ पिडीएफ दुवा जो मी हरप्पा डॉट कॉम या संस्थळावरुन या दुव्यावरुन मिळवला .
बाकी चर्चा वाचना नंतर आलेल्या प्रतिसादांवर करुया .
25 May 2018 - 4:57 pm | खिलजि
शेंडीवरून इतकी उलथापालथ झाली हे आम्हास ठाऊकच नव्हते . शेंडी ना धारण करताही इतके ज्ञान तर शेंडी धारण करून किती मिळेल याचा आम्ही सध्या विचार करतोय . धन्यवाद सर्व प्रतिसादकांना आणि वाचकांना , माझ्या स्वतःच्या वैयक्तिक ज्ञानात भर टाकल्यामुळे .
सिद्धेश्वर विलास पाटणकर