पावसात २- ४ दिवस निवांत भटकायला अंतरजालावर कोल्हापुर - रत्नागिरी मार्गावरील अंबा घाटाविषयी वाचले.
हुल्लाड्बाज दारुड़े अणि गोंधळी पर्यटक यांच्या नजरेत हा भाग अजुन आला नाही असे वाटते.
मागच्या वर्षी अंबोली घाटात गेलो होतो, पण स्वतःची गाडी न न्हेता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचे ठरवले त्यामुळ राती १० वाजता मुंबईतुन रेलवे पकडली आणि कणकवलीला उतरून यष्टि पकडून संध्याकाळी ४ वाजता अंबोलीला पोहोचलो. पण नुसताच २४ तास पाउस अणि धुके त्यामुळ अंबोली फिरता आली नाही. तिथल्या स्थानिक होटलवाल्याने गणपतीनंतर येण्याचा सल्ला दिला. तेव्हा तिथल्या माळरानावर खुप सुंदर फुले उगवलेली असतात कास पठारागत. पाउस, धुके आणि पर्यटक तिन्ही कमी झालेल असतात असे तो सांगत होता. त्यात तिथल्या त्या प्रसिद्ध धबधब्यावर दारूडया लोकांची नुसती जत्रा पाहून माघारी फिरलो. परत येताना पुन्हा येष्टिने कणकवली, तिथून दुसर्या यष्टीने मडगाव तिथुन टेक्सिने गोवा विमानतल अणि विमानाने मुंबई असा गजब प्रवास केलय. ( विमान प्रवासाची मला फार भीती वाटते, त्यामुळ कधीच त्यात बसलो न्हव्तो, अणि बायको मला याच कारणावरून चिडवायची. गोवा मुंबई हा फ़क्त ५५ मिनिटांचा प्रवास अणि ५५ मिनिटे ही अशीच निघून जातील, शिवाय तिकिटदेखील कमी, अणि आमच्या पोरीला जावयाने विमानात बसून फिरवले, असे जेव्हा सासरची लोंक गावात बोम्ब ठोकतील तेव्हा त्यांना किती भरून आल्यागत होइल आणि आपली कोलर अजुन टाईट होइल ,याच सर्व गोष्टींचा विचार करुण " हे विमानात बसायला घाबरतात " या आपल्या माथ्यावरील लांछन पुसण्याच्या संधीचा फायदा करुण घेण्याचा निर्णय घेतला होता. विमानात चढताच पुन्हा कधीच बसणार नाही अशी माँ कसम खाऊन टाकली. पण हाय रे किस्मत.
४ महिन्याने कंपनीच्या एका अतिमहत्वाच्या कामासाठी विमानानेच दिल्लीला जाण्याची वेळ आली. भीती नष्ट व्हावी म्हणून खिडकीची तिकिट काढली होती, पण उदार मनाने ती एका बाईला दिली. नवरा अणि मुलगा एका बाजूला अणि ही दुसरीकडे असे काहीतरी झाले होते. मला सिट मिळाली आयिल. दोघांच्या मधेच. आजुबाजुच्या २ देव माणसानी मला पूर्ण वेळ धीर दिला.अणि माझी समजूत घातली.दिल्लीला उतरताच परतीची विमान तिकिटे रद्द करुण ऑगस्ट क्रांतीची केली. घरी आल्यावर बायकोने विचारले तेव्हा " मी का्य घाबरलो नैय का्य.." असे खोटेच परंतु आत्मविश्वासाने सांगितले. नवरा माझा एकटाच न घाबरता विमानात बसून आला याचे किती कौतुक वाटले होते बायकोला.
असो...
लोणावला किंवा महाबलेश्वर असे काही अजुन झाले नाहीये अंबाघाटाचे असे तरी सध्या दिसतेय . तिथे अजुन सो क्वाल्ड मार्केट देखील नाहीये . महाबलेश्वर एवढे मोठ नसले तरी २ दिवस शांत पडून राहता येइल अशी निसर्गसंपन्न जागा वाटतीये.
इथे मोजकीच होटल्स आहेत अणि ती सुद्धा प्रशस्त आणि बरीच स्वस्त. एक छोटे धरण जिथे पोहोण्याची परवानगी आहे, एक धबधबा आहे, शिवाय जंगल सफारी अणि पावनखिंड देखील..
एक होटेलची वेबसाईट पहिली, ज्या पद्धतीने अंबा घाट अणि होटेलची वैशिष्ट्ये सांगितले आहेत ते वाचून एकदा तिथे जावेच असे वाटू लागलय.
पावनखिंड होलीडे रिसोर्ट.
या होटेलचा मालक हा नक्कीच पुणेकर आहे असा दाट संशय येतोय. कारण त्याने बऱ्याच ठिकाणी धमकीवजा सुचना केलेल्या दिसत आहेत. अणि यावेळी मात्र स्वतःची गाडी घेउन जाण्याचा विचार आहे.
तर आपल्यापैकी जर कुणी अंबा घाटची सहल पूर्वी केली असल्यास सुचना अणि मार्गदर्शन करावे.
प्रतिक्रिया
22 Jun 2017 - 6:25 pm | मंदार कात्रे
अम्बा रिसॉर्ट नावाचे हॉटेल आहे तिकडे
http://www.jungleresortamba.in/
http://www.theambaresort.com/
http://www.vanvisavaresort.com/
22 Jun 2017 - 6:30 pm | प्रचेतस
http://misalpav.com/node/29544
22 Jun 2017 - 9:14 pm | कंजूस
विमानप्रवासाची झलक आवडली. त्यात घाबरण्यापेक्षा आपला उद्विग्नतांक फारच हाइ असावा लागतो. आपले खिसेकुल्ले न तपासता कोणे एकेकाळी जाता येत होते ते दिवस रम्य असावेत. तर असो. आपले अनुभव आल्यावर जरूर लिहा.
22 Jun 2017 - 9:17 pm | गॅरी ट्रुमन
मी अंबाघाटला गेलेलो आहे. कोल्हापूरपासून तास-दिडतासाचा रस्ता आहे. त्यावेळी वनश्री रिझॉर्टमध्ये राहिलो होतो ( http://www.vanashreeresortamba.com/ ). रिझॉर्ट हे नाव ऐकल्यावर गोव्यातील किंवा राजस्थानातील झकपक रिझॉर्टचे चित्र कदाचित डोळ्यापुढे उभे राहिल. तशाप्रकारचे हे रिझॉर्ट नाही. तर बर्यापैकी साधे रिझॉर्ट आहे. पण तिथली सेवा आणि खाणे या दोन्ही गोष्टी आवडल्या.त्यावेळी पावनखिंड रिझॉर्टची वेबसाईट बघितली होती पण तो प्रकार पुणेरी पाट्यांसारखा वाटल्यामुळे तिथे जायचा विचार केला नाही.
रात्रीच्या वेळी जीपच्या टपावर बसून वन्य प्राणी बघायला घेऊन जातात. तिथल्या जवळच्या जंगलात अस्वले, चित्ते (की त्याच प्रजातीचा कुठलातरी प्राणी) वगैरे रात्रीच्या वेळी पाणी प्यायला येतात असे ऐकले होते. आम्ही गेलो होतो तेव्हा एकही प्राणी दिसला नाही. पण ती जीपच्या टपावरून केलेली सैर खूप म्हणजे खूपच आवडली. शहरी वातावरणात राहिलेल्या आपल्यासारख्यांना तिथली हवा, रात्रीच्या वेळची निवळशंख शांतता (आपल्या जीपचा काय तो आवाज. बाकी रातकिडे किंवा इतर किड्यांचे आवाज पण कृत्रिम यंत्रांचा अजिबात आवाज नाही) या गोष्टी नक्कीच आवडतात. प्राणी दिसत नाहीत म्हटल्यावर परत येताना जीपच्या टपावर चक्क आडवा झालो होतो (टपावर गादी असते). त्यावेळी आकाशात शेकडो नाही हजारो तारे दिसले होते. मुंबईत प्रदूषण इतके असते की चंद्र सोडल्यास इतर तारे फारसे दिसत नाहीत. अंबाघाटला बघितले तितके तारे मी कित्येक वर्षात बघितले नव्हते. मला तार्यांमध्ये आणि त्यांच्या नावांमध्ये आणि नक्षत्र किंवा आकाशगंगा आणि तत्सम कुठल्याही प्रकारात अजिबात रस नाही. तरीही इतके तारे बघायला मिळणे हा अनुभवही आवडला होता. खाली दिलेल्या चित्रात बाजूला ती जीप बघायला मिळेल.
अंबाघाटात पूर्वाश्रमीच्या हिलरीसह मी
अंबाघाटावरून पावनखिंडीतही गेलो होतो. तिथे बाजीप्रभू आणि छत्रपतींचे आणि स्वराज्याचे प्राण वाचविणार्या हिरडस खोर्यातल्या त्या अनामिक मावळ्यांची समाधी अशी छोटेखानी आहे. हा भाग ३५० वर्षांनंतरही बर्यापैकी बिकट आहे. महाराजांच्या पालखीला घेऊन अनेक तास चालत जाऊन नंतर ५-६ तास ताज्या दमाच्या शत्रूसैन्याला खिळवून ठेवणे किती कठिण होते याची कल्पना तिथे गेल्याशिवाय यायची नाही. आपोआप आपण त्या समाधीपुढे नतमस्तक होतो.
विशाळगड लांब असल्यामुळे तिथे जायला मिळाले नाही.
अंबाघाट कोकणला जवळ असल्यामुळे तिथे पाऊसही धुवांधार पडत असेल. तेव्हा तिथे पाऊस संपल्यावर गेल्यास बरे.
रच्याकने, या लेखात सुरवातीला दिलेल्या भागाचे (विमानप्रवास वगैरे) प्रयोजन समजले नाही.
22 Jun 2017 - 10:15 pm | प्रचेतस
मागच्या वर्षीपासून रात्रीची सफारी वनखात्याने बंद केली आहे. त्यामुळे रात्री त्या रस्त्यावर फिरायचे असेल तर स्वात:च्या गाडीशिवाय पर्याय नाही. तिथल्या जंगलात अगदी सहज दिसणारा प्राणी म्हणजे गवा.
23 Jun 2017 - 2:37 pm | गॅरी ट्रुमन
या माहितीबद्दल धन्यवाद. मी तिथे ५ वर्षांपूर्वी गेलो होतो. बरं झालं रात्रीची सफारी बंद व्हायच्या आत जाऊन आलो :)
23 Jun 2017 - 2:34 pm | स्मिता श्रीपाद
पावनखिंड होलीडे रिसोर्ट ला नुकतेच मे महिन्यात जाउन आले.आम्हा सगळ्याना खुप आवडले रीसॉर्ट.
१.शांत सुंदर व स्वच्छ जागा.३ बेड , ४ बेड , ६ बेड अशा मोठ्या मोठ्या आणि एकमेकांना जोडलेल्या खोल्या आहेत.
मोठा ग्रुप साठे अतिशय मस्त.
२.पूर्ण रीसोर्ट सौर उर्जेवर चालते.रुम मधे पंखे, दिवे ई सौर उर्जेवर चालतात.रुमसमोर मोठी प्रशस्त जागा, झोपाळे, भरपुर खुर्च्या.गप्पा टाकत बसायला बेस्ट.
३.रीसॉर्ट वर एक छोटे स्टेज, कराओके सिस्टीम, बाके ईतर वाद्ये ई पण आहेत.स्विमिंग पूल मस्त आणी स्वच्छ होता.तिथे एक छोटीशी लायब्ररी पण आहे.
४. मालक शिरगावकर काका अस्सल पुणेकर आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक व्यवस्था अतिशय चोख आहे.पुणेरी पाट्या जागोजागी दिसतील पण त्या गरजेच्या ठीकाणीच आहेत.रीसॉर्ट चा सगळा स्टाफ खुप मस्त मदतीला सदैव तयार.
५.जेवण अत्यंत सुंदर आहे.तिथे खाल्लेले अनेक पदार्थ जसे की फणसाची भाजी, कैरीची कढी,खावापोळी विथ दाट मसाला दुध.( ही पोळी मसाला दुधासोबत आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली आणि प्रचंड आवडली.),चिकन अप्रतिम होते.आमच्या आग्रहाखातर आम्हाला जायच्या दिवशी काकांनी परत एकदा फणस भाजी आणी कैरी कढी खाउ घातली.
धरणावरची सहल, पावनखिंड सहल, ओपन जिप्स वर बसुन केलेली जंगल सफारी, जंगलातले जेवण सगळाच अनुभव मस्त आणि व्यवस्था चोख होती.
आंबा घाटात जायचे असेल तर नक्की जावे असे ठीकाण.
27 Jun 2017 - 7:53 pm | केडी
पावनखिंड रिसॉर्ट मध्ये असंख्य वेळेला जाऊन राहिलेलो आहे...शिरगावकर काका आणि काकू हे व्यवसाय म्हणून न्हवे तर अगदी घरच्या माणसांसारखी सगळी व्यवस्था करतात....तिथले जेवण तर अप्रतिम आणि मौसाहारी असाल तर रात्री तिथे तांबडा/पंधरा आणि मटण मला खूप आवडते. आणि हो, ती पावनखिंड टूर विसरू नका, आणि त्यानंतर जंगलात बसून केलेले वनभोजन सुद्धा! सध्या जोरात पाऊस असेल, त्यामुळे ते बहुदा त्यांच्या एकदा शेतात बांधलेल्या ठिकाणी जेवण देतील...
पण ओव्हरऑल लाजवाब एक्सपीरिअन्स.....
23 Jun 2017 - 7:47 pm | Ranapratap
जवळच बर्कि चा धबधबा आहे. एका वेळी 5 धबधबे दिसतात, 3 धबधब्या जवळ जात येते. फक्त पावसाचा अंदाज घ्या, ओढ्या वरील पूल छोटा आहे, पुलावर पाणी आल्यास अडकून पडावे लागेल.
28 Jun 2017 - 11:06 am | सतिश पाटील
सूचना आणि प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद.
आता जाऊनच अनुभव घेतो. ऑगस्टमधे जाण्याचा विचार आहे.
28 Jun 2017 - 4:28 pm | Ramesh Kamble
आंबा घाट पासुन २० कि मी अंतरावर मार्लेश्वर हे प्रसिद्ध देवालय आहे. ऑगस्ट मधे जाताय तर आवश्य भेट द्द्या. इथले सुन्दर धबधबे पाहायला मिळतील. बऱ्यापैकी, बाहुबली सिनेमातले ऍनिमेटेड सीन्स वास्तवात पाहायला मिळतील.
फक्त येणाऱ्या भाविकांनी आणि तिथल्या हॉटेल, दुकानदारांनी प्लास्टिक कचरा करण्यावर खूपच भर दिला आहे आणि तिथल्या सुंदर निसर्गाची चांगलीच वाट लावली आहे.
ऑड डेस ना जाणे सोयीचे ठरेल.
28 Jun 2017 - 4:52 pm | सतिश पाटील
मार्लेश्वरला ३ वेळा जाऊन आलो आहे. जमल्यास या वेळीही जाइन
28 Jun 2017 - 11:36 pm | एस
पावनखिंड रिसॉर्टला नक्कीच जायला पाहिजे. तिथल्या सगळ्या सूचना अगदी घरातल्यासारख्या वाटल्या! ;-) धन्यवाद मंडळी या रिसॉर्टच्या माहितीबद्दल.
7 Jul 2017 - 3:05 pm | सतिश पाटील
पावनखिंड रिसोर्ट खुप अगोदरच फुल झाले आहे.त्यामुळ मँगो हॉलिडे रिसोर्ट बुक केलय
शाकाहारी ८५० रुपये प्रति माणशी प्रति दिवस ( नाश्ता + दुपारचे जेवण + संध्याकाळच चहा + रात्रीचे जेवण + खोलीचे भाड़े )
मांसाहारी १०५० रुपये प्रति माणशी प्रति दिवस ( नाश्ता + दुपारचे जेवण + संध्याकाळच चहा + रात्रीचे जेवण + खोलीचे भाड़े )
या दराने ८ जोडप्यांसाठी बुक केलय.
ईतर होटल्सवाल्याने तेवढा चांगला रिस्पोंस दिला नाही.