"मराठी अमेरिकन्स" हा लेख/चर्चा वाचत असताना एक लिहायचा ठरवलेला पण बाकी व्यस्तपणामुळे लिहायचा राहीलेला चर्चा प्रस्ताव परत डोक्यात आला.
दोन एक आठवड्यांपुर्वी मी ५-६ दिवसांसाठी भारतात गेलो होतो. या वेळेस काँटीनेंटल एअरलाईनचे नॉनस्टॉप न्यू अर्क (नेवार्क) न्यू जर्सी ते मुंबई असे विमान पकडायचे होते. बॉस्टन ते न्यू अर्क हे पण काँटीनेंटलने प्रवास केला त्यात काही विशेष आढळले नाही. म्हणजे "कस्टमर सर्व्हीस" वगैरे नेहमीप्रमाणे होती. वेगळे काहीच नव्हते. वरकरणी का होईना पण मैत्रीपूर्ण आणि मदत करणारी सेवा होती.
मुंबईला येणार्या विमानाच्या गेट जवळ मी जेंव्हा आलो, तेंव्हा अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सोडल्यास बाकी भारतीयच होते. सगळा गजबजाट चालू होता, जसा कुठल्याही जागा भरलेल्या विमानाच्या बोर्डींगपाशी असेल असाच. मात्र बोर्डींगची वेळ आली आणि ती बाई (अभारतीय, कदाचीत साउथ अमेरिकेतील असावी) निवेदन करू लागली. निवेदन कसले, गर्जनाच होत्या त्या! त्यात कधीही ऐकल्या नाहीत अशा सुचना ती देत होती. उ.दा.
- "गडबड करू नका, सर्वांना जागा आहे."
- "कॅरीऑन बॅग फक्त एकच घेऊन जाता येईल, मी परत सांगते एकच घेऊन जाता येईल हे लक्षात ठेवा, परत सांगते, एकच घेऊन जाता येईल..."
- " आता मी बोर्डींग करायला नंबरप्रमाणे बोलावणार आहे, प्रत्येकास जागा आहे तेंव्हा गर्दी करायची नाही, जेंव्हा तुमचा नंबर येईल तेंव्हाच येयचे. परत सांगते तुमचा नंबर आलाकीच... तर आता सीट क्रमांक ३५ ते ४५ मधील प्रवासी, म्हणजे ३५,३६,३७,...४५ मधील प्रवासी. परत सांगते बाकी कोणी नाही..."
हे सगळे ऐकताना माझे डोके फिरले. माझ्याजवळ दोन गोरे अमेरिकन्स उभे होते ते पण हसत होते. मी त्यांना म्हणले देखील की मला एकदम किंडर्गार्टनमधे असल्यासारखे वाटत आहे...माझी काही चूक नसताना असले बोलणे मी का ऐकायचे असा प्रश्न पडला होता आणि म्हणूनच मला नंतर त्यासंदर्भात तक्रार कराविशी वाटली आणि करणार आहे.
मात्र नंतर जेंव्हा मी पाहीले तेंव्हा लक्षात काय आले? इतके सांगूनही काही देशबंधू त्याच चुका करत होते. एका पेक्षा जास्त बॅग घेणे, मधे घुसणे मग तेथील स्टाफने तिकीट सीट क्रमांक पाहून मागे जायला सांगितले की मग ऐकणे इत्यादी. अगदी माझ्यापुढेपण घुसले, तेच भारतात आल्यावर कस्टमच्या तेथे.
मग विमानातपण तेच पट्टे बांधायला , टेकऑफ/लँडींगच्या वेळेस खुर्च्या रेललेल्याच, आणि हवेत टर्ब्युलन्स आहे म्हणून तात्पुरते जागीच बसा म्हणले की उठून तेंव्हाच रेस्टरूम/टॉयलेट वापरयला जाणार...
मग वाटले की ही बाई कदाचीत असे दरोज बघत असावी आणि त्यामुळे तसे बोलायला लागली तर त्यात काय चूक? अर्थात माझ्या लेखी तरी देखील चूक होतीच कारण जर कोणी नीट वागत नसेल तर त्यांना शक्यतोवर तसे नक्की झाल्यावर व्यक्तीगत सांगणे महत्वाचे (उ.दा. सीट नंबर जाहीर होण्याआधी कोणी घुसले तर त्यांना बाजूस होयला सांगता येते आणि ते ते करत होतेच). जेंव्हा एक विमान ज्यात सुमारे चारशे सीट्स आहेत ज्या केवळ भारतीयांनी भरून त्या विमानास जवळपास अर्धामिलीयन्स डॉल्सर्सच्या वर रेव्हेन्यू मिळवून दिला त्यांना असे सुनवण्याचा हक्क कोणाला आणि का? त्यात जे माझ्यासारखे इतरही होते जे नियमाप्रमाणे वागत होते त्यांनी असले का ऐकायचे?असे जर इतर कुणाबद्दल झाले तर ते ऐकून घेतील असे वाटते का? तरी देखील कुणालाच काही वाटत होते असे वाटले नाही..
तर यात आता मी कुणाची तक्रार करणे बरोबर आहे? आगाऊपणे सुचना देणार्या काँटीनेंटलच्या कर्माचारी महीलेबद्दल, किमान नियम न पाळणार्या भारतीयांबद्दल का तसे नियम पाळणार्या अथवा न पाळणार्या भारतीयांना या वागणूकीसंदर्भात काहीच न वाटणार्या मनोवृत्तीबद्दल?
प्रतिक्रिया
18 Feb 2009 - 10:21 pm | अवलिया
कधी कधी शांत बसुन सोडुन देणे हाच चांगला उपाय असतो. करुन बघा.
--अवलिया
18 Feb 2009 - 10:29 pm | सुक्या
शांत बसुन गंमत बघावी. बेशिस्ती ही आपल्या अंगातच आहे.
अवांतरः ज्या टर्मीनल वरुन भारताची फ्लाइट सुटते तिथले बाथरुम पाहीलेत का?
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
18 Feb 2009 - 10:43 pm | रेवती
बाथरूम आहे ना... मग झाले तर.
माझ्या बोटात दाराच्या कडीचे टोक घुसले होते एकदा.
रेवती
18 Feb 2009 - 10:44 pm | नाटक्या
मागे एकदा शरद पवारांनी घोषणा केली होती कि सगळे एस. टी. स्टँड विमानतळा सारखे करू म्हणून.. एस. टी. स्टँड विमानतळासारखे करणे सोडाच पण विमानतळ एस. टी. स्टँड सारखे झालेत. म्हणजे एकंदरीत बरोबरच म्हणाले होते आपले साहेब.. काय? झालेत की नाही एस. टी. स्टँड आणि विमानतळ एक सारखे?
- नाटक्या
18 Feb 2009 - 10:49 pm | प्रभाकर पेठकर
नाही सर! आता परिस्थिती बदलली आहे.
मुंबई विमानतळ एस. टी. स्टँड वाटत असेल तर दिल्ली विमानतळाचा ४-५ तास अनुभव घ्या.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
18 Feb 2009 - 11:01 pm | विकास
>>>मुंबई विमानतळ एस. टी. स्टँड वाटत असेल तर..
वास्तवीक आता मुंबई विमानतळ बराच सुधारला आहे आणि अजूनही सुधारेल अशी आशा आता आहे! आज पर्यंत एक वेळ सोडल्यास कधी तेथे कुणाचा वाईट अनुभव आलेला नाही. तेथील रेस्टरूम या वेळेस मी मुद्दामून जाउन पाहील्या त्या देखील स्वच्छ होत्या.
19 Feb 2009 - 12:26 am | अनामिक
हेच म्हणावेसे वाटते. मुंबईचं डोमेस्टिक विमानतळ खुप चांगलं आणि स्वच्छं आहे. अंतरराष्ट्रीय विमानतळावर रिनोवेशन सुरु असलेलं मागच्या वर्षी दिसलं होतं. तिथेही सुधारणा होत आहेत हे बघुन चांगले वाटले.
अनामिक
19 Feb 2009 - 12:44 am | प्राजु
गेल्या वर्षी.. खूप बांधकाम आणि रिन्युएशन चालू होतं. यावेळी जाऊ तेव्हा चांगलं झालेलं असेल अशी आशा करायला हरकत नाही. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Feb 2009 - 11:00 pm | टिउ
अगदी अगदी...मुंबई आंतरराष्ट्रिय विमानतळापेक्षा तर एस्.टी. स्टँड सुद्धा बरे वाटतात...कुठेही ट्रॉलीज सोडुन दिलेल्या, विमानातनं उतरल्या उतरल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद पॅसेज मधे फेकुन दिलेल्या बघितल्यात...तिथल्या (बाहेरच्या) बाथरुम मधे तर पाय ठेवणं पण अशक्य आहे.
रांगेत मधेच घुसणे, चार चार रांगा (एकच काउंटर असतांना) तयार करणं हे तर नेहमीचंच...
19 Feb 2009 - 12:43 am | अनामिक
नाही हो... मागच्या वर्षीचा अनुभव बघता विमानतळ बर्यापैकी स्वच्छं वाटलं (पॅसेजमधे कुठेही कचरा दिसला नाही). विमानतळावरचे कर्मचारीसुद्धा (कामवाल्या बाया) वरचेवर येवून कचरा उचलताना किंवा झाडू-पोछा मारताना पाहिलेत. सुधारणा होत आहेत आणि ती चांगली गोष्ट आहे, सर्व प्रवाश्यांमधे सुद्धा स्वच्छतेची जागरुकता असायला नको का? कर्मचार्यांच्या कामाच्यापण काही मर्यादा असू शकतात. मिडल ईस्टला जाणारे बरेच प्रवासी सुशिक्षित नसतात, त्यावेळी त्यांना कोणत्या गेटवर कसे जायचे तेच कळत नाही. मग बिचारे विमानतळावरचे कर्मचारी अनाउन्स्मेंट तर करतातच पण जातीने शोधत बसतात. तसे पाहिले तर शोधा-शोध करण्याची कर्मचार्यांची जबाबदारी नाही, पण तरिही ते एवढे कष्ट घेतात हे नक्कीच स्तुत्य आहे.
19 Feb 2009 - 1:20 am | टिउ
माझा रोख प्रवाश्यांवरच होता. परदेशातली स्वच्छता बघुन भारताला शिव्या घालायच्या आणी परत आल्यावर विमानातनं उतरल्या उतरल्या कचरा खाली टाकुन द्यायचा, बाहेर आल्यावर पचकन थुंकायचं...चांगली सुशिक्षित दिसणारी माणसं पण असं वागतांना बघितली की इतकी चीडचीड होते ना...
कर्मचार्यांचं कौतुकच आहे. ते बिचारे त्यांना दिसेल तसा कचरा साफ करत असतात. पण लोकांना कसं वागावं ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणं अवघडच आहे.
18 Feb 2009 - 10:38 pm | प्रभाकर पेठकर
आपल्या देशबांधवांना वेळोवेळी प्रेमाने, रागवून, देशाभिमान जागवून, ओरडून शिस्त पाळायला लावून एअर लाईनला मदत करावी. त्यांचे काही चुकले नाही. सुशिक्षितही अशिक्षितांसारखे वागायला लागले तर बालवाडीला शोभणार्या सुचना द्याव्याच लागतात. आपलेच देशबांधव मुर्खा सारखे वागून इतरांसमोर स्वतःचे आणि स्वतःच्या देशाचे 'हसे' करवून घेतात.
मस्कत मध्ये मीही असाच अनुभव घेतला होता. प्रवासी जास्त करून अशिक्षित कामगार वर्गातले होते. त्यांना प्रेमाने समजावून, थोडे रागावून, 'भारताची लाज घालवू नका' असे आवाहन करून समजावले. प्रसंग निभवून नेला. पण असे दृश्य पाहून मनाला क्लेष होतात हे बाकी खरे.
'विमानात मोबाईल वापरू नका' अशी हवाईसुंदरीने स्पष्ट सुचना देऊनही कित्येक सो-कॉल्ड सुशिक्षित प्रवासी, विमान उड्डाण प्रसंगी आणि उतरण्यापुर्वी, मोबाईलचा उपयोग करतात. असे दिसले असता त्यांना स्वच्छ शब्दात पण प्रेमाने सांगावे. न ऐकल्यास हवाईसुंदरीस बोलवून सांगावे. त्या प्रवाशाला राग आला तरी हरकत नाही.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
18 Feb 2009 - 10:40 pm | रेवती
आम्हालाही असाच अनुभव आला होता मुंबईला.
एकतर आधी लहान मुले असणार्यांना आधी जाऊ देण्याची पद्धत असतानाही
ते कमी वेळा पाळले जाते (माझा अनुभव), पण आता सांगितले आहे ना की
लहान मुलांना घेऊन जाणार्यांनी आधी जावा म्हणून.... तर खूपजण लहान मुलं बरोबर नसतानाही जात होते.
एकदोघे पॅसेंजर तर लहान मुले असणार्यांवरच ओरडत होते की तुम्हा परदेशी राहणार्यांना कळतच नाही की मोठ्यांचा मान ठेवायचा व त्यांना आधी जाऊ द्यायचे(अरे देवा!).
त्या गर्दीत स्ट्रोलरसकट जाण्यापेक्षा सगळ्यात शेवटी बाळांना घेऊन जाणारे आमच्यासारखे बरेच जण होते.
मुंबईलाही तिकिट नं. ओरडून ओरडून कर्मचारी हैराण झाले होते. वयस्कर लोकांचे एकवेळ ठीक आहे पण बाकीच्यांना आपापले तिकिट नं. वाचता येतात की नाही?
असे रोज रोज झाल्यावर रेव्हेन्यू किंवा बाकीच्या समजूतदार लोकांसाठी सेवा असे विचार मनाला शिवणारही नाहीत.
आपल्याला अशी वागणूक मिळतीये हे जर लोकांना समजते तर किती चांगले झाले असते. त्यांना तिकिटाचे नं. ही ऐकू येत नसतात.
रेवती
18 Feb 2009 - 11:05 pm | विकास
माझा अनुभव हा या विशिष्ठ विमानाशी आणि कदाचीत न्यूजर्सीशी निगडीत आहे. कारण जेंव्हा बॉस्टन ते युरोप आणि युरोप ते मुंबई असे येतो तेंव्हा कुठल्याच विमानसेवेत असे अनुभव आलेले नाहीत.
या वेळेस पुण्यातील औंधच्या भागात जेथे जास्त तरूण व्यावसायीक तेही "फॉरीन रीटर्न्ड" ;) असतात तेथे मोठे स्ट्रीट साईनबरोबरचे फलक वाचले: "जर परदेशात असताना रस्त्यावर घाण/कचरा करत नाहीत तर मग स्वतःच्या देशात का करता?" :-)
18 Feb 2009 - 11:17 pm | रेवती
अरेच्च्या! मी लिहिलेच नाही.
माझा अनुभव मुंबईहून सुटणार्या विमानाबाबत होता.
सॉरी, विसरले लिहायला.
आणि कचर्याबद्दल बोलायचे तर, युरोपपर्यंत स्वच्छता सगळे पाळतात.
तिथून पुढे काय होतं कळत नाही पण विमानात सगळीकडे कागदांचा सडा असतो.
रेवती
18 Feb 2009 - 11:16 pm | लंबूटांग
काँटीनेंटल च्या त्याच विमानाने मी भारतात गेलो होतो. नु आर्क विमानतळावर बोर्डींग करताना अक्षरशः एस.टी. पकडताना करतो तशी धावपळ आणि गर्दी. तरी बरे खिडकीची जागा पकडायची आहे त्यांना न घेताच विमान उडणार आहे असेही काही नाही. बोर्डींग करण्याआधी I 94 फॉर्म परत करावा लागतो आणि पासपोर्ट वर स्टँप मारून घ्यावा लागतो. माझ्या पुढील एका माणसाला इतकी घाई झाली होती की तो हे सगळे न करता बोर्डींग पास घेउन तसाच आत जात होता. तेथील बाईने बोर्डींग पास स्कॅन करताना त्याला नम्रपणे सांगितले की तुम्हाला I 94 परत करून, पासपोर्ट वर स्टँप मारून घ्यावा लागेल आणि मग तुम्ही विमानात जाऊ शकता. त्या माणसाला याचा प्रचंड राग आला, सगळे सोपस्कार करून परत आला आणि मग तिला बोर्डींग पास स्कॅन करायला दिला. तिने हसून त्याच्या पुढे करताच तिच्या हातातून हिसकावून घेतला. मग बराच तमाशा झाल तिथे. शेवटी सिक्युरीटी ला बोलावून त्याला समज दिली गेली आणि सांगितले की आम्ही तुम्हाला विमानात बोर्डींग करण्यापासून थांबवू शकतो.
कशाचा ऍटिट्यूड इतका?
आतमधे तर अजूनच गोंधळ. अमेरिकेतून जाताना २ कॅरी ऑन बॅग्स नेता येत असल्याने प्रत्येकाच्या बॅग्स स्वतःच्याच डोक्यावरील जागेत मावणे शक्य नव्हते. त्यावरून परत भांडाभांडी. ह्या सगळ्यामुळे विमान निघायला अर्धा तास उशीर झाला.
पट्टे बांधायला , टेकऑफ/लँडींगच्या वेळेस खुर्च्या रेललेल्याच, आणि हवेत टर्ब्युलन्स आहे म्हणून तात्पुरते जागीच बसा म्हणले की उठून तेंव्हाच रेस्टरूम/टॉयलेट वापरयला जाणार... अगदी बरोबर. माझी सीट exit row मधील असल्याने त्या air hostess च्या चेहर्यावरील "कितीही सांगितले तरीही हे लोक असेच" हे भाव स्पष्ट दिसून आले. :(
ह्यात कुठेही भारतीयांना नावे ठेवण्याचा उद्देश नाही. आपण भारतीयच आपल्या वागण्याने देशाचे नाव कसे बदनाम करतो हे पाहून वाईट वाटते इतकेच.
अवांतरः काँटीनेंटल पेक्षा air india ची सर्विस चांगली वाटली मला तरी. खाणे आणि पिणे पण (५ $/ ड्रिंक (alcoholic beverages) घेतात काँटीनेंटल मध्ये वेगळे) आणि air hostess पण ;). आजपर्यंत air india च्या air hostess म्हातार्या असतात असे ऐकून होतो. पण मला अगदी उलट अनुभव आला. काँटीनेंटल मधील air hostess ला बोलावून coffee मागितली तर मला म्हणाली 'You are a young guy, why dont you come n get it'. तिच्या वयाकडे बघून मी पण म्हटले जाऊ देत आज्जींना त्रास नको आपणच जाउन घेऊन यावी.
18 Feb 2009 - 11:22 pm | रेवती
आणि air hostess पण ;)
थांब,आता पुढच्या वेळेस तुला पेश्शल हवाईआज्जीच असलेल्या विमानातून पाठवू.
रेवती
18 Feb 2009 - 11:36 pm | मुक्तसुनीत
मला "एअर होस्टेस" दिसायला सुस्वरूप हव्यात अशी इच्छा असणार्या , आणि एअर होस्टेसकडे डोळे भरून पाहाणार्या प्रौढ माणसांची थोडी मौज वाटते. हा सर्व प्रकार मानवी आहे हे खरेच. स्त्रीबद्दलचे आकर्षण आपल्या सर्वांच्या जेनेटिक कोडमधेच आहे. परंतु त्याचे असे प्रदर्शन - त्यात थोडी विसंगती आहे असे मला वाटते. आठ तासांचा जेमतेम प्रवास. त्यात वेळ झोपेत , खाण्यापिण्यात , सिनिमे पहाण्यात आणि मुख्य म्हणजे तुम्ही कुटुंबास घेऊन जात असाल तर आपापल्या मुलांना त्या सांदीकोपरेवजा जागेत बसवण्यात नि सांभाळण्यात निघून जातो. या सर्व प्रकारात हवाई ही कितपत "सुंदरी" आहे आणि आपल्याकडे ती जातीने लक्ष देते आहे किंवा कसे याबद्दल - ज्याला किंचित रंगेलपणे म्हणता येईल अशा पद्धतीने - विचार करणे गमतीदार आहे.
18 Feb 2009 - 11:59 pm | लंबूटांग
मी सहज एक observation म्हणून लिहीले होते. ह्यात काहीही प्रदर्शन करायचे नव्हते.
डोळे भरून पहायला एअर होस्टेसच कशाला पाहिजेत?
बाकी प्रवास कितीही तासांचा असेल तरी तरूण अथवा म्हातार्या कोणत्याच सुंदर्या काही मनोरंजन करत नाहीत त्यामुळे त्यांच्या सुंदरतेमुळे अथवा वयामुळे फरक काहीच पडत नाही. आपल्याकडे ती जातीने लक्ष देते आहे किंवा कसे याबद्दल ही माझे काहीच म्हणणे नाही. पण काही पाहिजे आहे म्हणून बोलावल्यावर सेल्फ सर्विस करायला लावणे मला खटकले.
19 Feb 2009 - 12:12 am | मुक्तसुनीत
माझेही म्हणणे तुम्हाला उद्देशून नव्हते. माझ्या परिचयात मला काही व्यक्ती अशा भेटल्या की हवाईसुंदर्यांबद्दल मी वर उल्लेखलेल्या गोष्टींच्या संदर्भातली लक्षणे त्यांना लागू होतात. यातील काही मुलाबाळांचे बाप असणारे , चाळीशी लोटलेलेही होते. असो. याबद्दल तुम्ही अभावितपणे दुखावले गेलेले असल्यास दिलगीर आहे.
18 Feb 2009 - 11:49 pm | त्रास
हे अमेरिकेला जाणारे मराठी लोक असे वागतात हे वाचून खूप खूप मजा आली.
19 Feb 2009 - 12:23 am | अनामिक
मराठी लोक नाही भारतिय लोक असे म्हणा... त्यातल्या त्यात दाक्षिणात्य भारतिय गोंधळ घालण्यात (मुख्य म्हणजे मोठ्या आवाजात बोलणे) पुढे आहेत असे म्हणायला हरकत नाही.
अनामिक
19 Feb 2009 - 1:07 am | llपुण्याचे पेशवेll
अगदी खरे. जर कनेक्टींग फ्लाईट असेल तर ठीक आहे घाई करणे. मागे भारतात परत येताना लंडनला कनेक्टिंग फ्लाईट घ्यायची होती. तेव्हा विमानकंपनीच्या कर्मचार्यानी कनेक्टिंग फ्लाईट असलेल्या लोकाना आधी उतरू द्या असे म्हटल्यावर इतर गोरे लोक व्यवस्थित बसून राहीले होते. शेवटी उतरले सगळ्यात.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
19 Feb 2009 - 12:15 am | विकास
अजून एक निरीक्षण मी करमणूक म्हणून नेहमी करतो: विमान एकदा का जमिनीवर आले की लागलीच तमाम पब्लीक उठून उभे रहाते. वास्तवीक ते गेट लागण्यावरपण कधी कधी दरवाजा नीट लागला नाही तर वेळ लागू शकतो. तसा तो या वेळेसही लागला आणि मग काहीजणांना ताटकळत उभे रहावे लागले....
19 Feb 2009 - 4:32 am | शाहरुख
जर कुणीच कचरा टाकत नाहीय, प्रत्येकजण रांगेतुन जातोय तर मग अशी परिस्थिती का व्हावी हेच मला समजत नाहीय... :-)
बी द चेंज यु वाँट टु सी - गांधी
19 Feb 2009 - 6:10 am | वैशाली हसमनीस
दोन महिन्यांपूर्वीच मलेशियातून भारतात गेले तेव्हां पायदुखीमुळे असिस्टंट घेतला होता.मलेशियात सर्व्हिस खूपच चांगली मिळाली.अत्यंत प्रेमळ व सौजन्याची.आपल्या भारतभूमिवर पाय ठेवताच वेगळा अनुभव !विमानतळाबहेर पडताना असिस्टंची पैशाची मागणी.पैसे घेतल्यावरच टॅक्सीपर्यंत सोडले. ह्याला काय म्हणावे?
19 Feb 2009 - 6:27 am | मराठी_माणूस
एका गोष्टीचे खुप आश्चर्य वाटते. इथे बरेच आयुष्य घालवुन परदेशी जाउन आल्यावर इथल्या सर्व गोष्टी एकदम नाक मुरडण्या सारख्या का वाटतात. परदेशातल्या चांगल्या गोष्टी साठी आपले स्वतःचे कर्तुत्व शुन्य असते पण इथल्या गोष्टी साठी आपण काही प्रमाणात जबाबदार असतो हे लक्षात असु द्यावे.
19 Feb 2009 - 8:11 am | विकास
>>>परदेशातल्या चांगल्या गोष्टी साठी आपले स्वतःचे कर्तुत्व शुन्य असते पण इथल्या गोष्टी साठी आपण काही प्रमाणात जबाबदार असतो हे लक्षात असु द्यावे.
एकदम बरोबर बोललात. मात्र माझ्या मूळ चर्चेचा मुद्दा हा नव्हताच कारण वर इतरत्र म्हणल्याप्रमाणे मला कधी भारतात उतरल्यावर वाईट अनुभव आले नाहीत. (जाताना मात्र सिक्युरीटीच्या आत गेल्यावर जेंव्हा कॉफी घेतली आणी त्या छोट्याशा ग्लासला त्याने ९० रुपये मागितले तेंव्हा मात्र लुबाडणूक वाटली! :) ) .
माझा मुद्दा हा एकंदरीत भारतीय माणसासंदर्भात होता. कारण काँटीनेंटल मधे असलेला भारतीय हा निवासी-अनिवासी असा दोन्ही होता.
19 Feb 2009 - 1:01 pm | सेवेसि
मी पण प्रवास केला सुचाना ऐकल्या. या ला कारण आपण आहोत. आपली तीच लायकी आहे.