भोचक यांना कधी प्रत्यक्षात जरी भेटलो नसलो तरी, आज हूरहूर लागली आहे. जो काही थोडाफार संवाद झाला तो आधी पण पुरेसा नव्हता, पण आता अधूराच राहणार याचे वाईट वाटत राहील. हे माझ्याबाबतीतच नाही तर अनेकांच्या बाबतीत खरे आहे असे राहून राहून वाटते.
पण अशा चांगल्या आणि होतकरू व्यक्तीच्या अकाली मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना केवळ श्रद्धांजली म्हणून थांबणे जीवावर येत आहे. अशी शोक व्यक्त करण्याची वेळ का यावी हा प्रश्न टोचत आहे. अशी वेळ कुणावरही येऊ नये हीच प्रार्थना... ई-सकाळमधील त्याच्या अपघाताच्या बातमीच्या बाजूस संबंधीत बातम्यांकडे नजर गेली तर काय दिसले?
* अकोल्याकडे जाणारी बस उलटून २८ प्रवासी जखमी
* कुसुंबा, नेरजवळ अपघातात दोन ठार, ३ जखमी
* क्रेनसह विहिरीत पडून उंभर्टीत मजुराचा अंत
* मोटारसायकलसह दोन तरुण उड्डाणपुलावरून ३० फूट खाली
* सायने शिवारात घर कोसळून महिला ठार
जेंव्हा कोणीतरी ओळखीतले अशा अपघातात असते तेंव्हा जे जाणवते ते अशा इतर बातम्यांकडे जाणे शक्य नसते, त्यात अपराधीपणाची भावना असण्याची गरज नाही. पण खरेच याला दुर्दैव म्हणून सोडून द्यावे का? हा प्रश्न पडला आणि थोडी जालावर शोधाशोध चालू केली. त्यात भारत सरकारच्या "रोड ट्रान्स्पोर्ट अँड हायवेज" मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून अस्वस्थ करणारी माहीती मिळाली: (दुवा)
यातील विदा वापरुन खालील आलेख काढला:
एक २००० सालच्या सुमाराचा अपवाद सोडल्यास रस्त्यावरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढतच चाललेले दिसते. अभिनयच्या अपघाताची बातमी कुठेतरी वाचतानाच असाच अजून एक तरूण पत्रकार गेल्यावर्षी अपघातात गेल्याचे वाचले. जागतिक आरोग्य संघटनेच्या गेल्या वर्षीच्या अहवालाप्रमाणे, भारतात आणि इतरत्र, रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण हे देखील एखाद्या रोगराईसारखे पसरत आहे. भारतात, दर तासाला १३ जणांना अपघातात मृत्यू येतो. शिवाय जाणार्या व्यक्तींबरोबर त्यांचे मागे राहीलेले कुटूंबिय आणि उध्वस्त झालेले संसार लक्षात घेतले तर त्याचे प्रमाण हे अधिकच भयावह आणि अस्वस्थ करणारे आहे...आणि हो, यात रेल्वेचे अपघात धरलेले नाहीतच...
अनेक अपघातात राजकारण्यांचे (काँग्रेस) अथवा त्यांच्या नातेवाईकांचे (शिवसेना) गेल्याचे आपण वेळोवेळी वाचले आहेत. कालानुरूप त्या बातम्या मागे पडतात, त्यात काही गैर नाही, पण परत असे घडू नये अथवा त्याचे प्रमाण हळूहळू कमी व्हावे यावरून सतत लागणारे लोकशिक्षण आणि स्वाध्याय आपण करत असतो का हे पहायची वेळ आधीपण होतीच आणि अजूनही आहेच आणि प्रमाण कमी झाले तरी कायमच रहाणार आहे. यात केवळ सरकारने काय करावे आणि काय करत नाही इतकाच मुद्दा नसून प्रसारमाध्यमे (ज्यांचे पण त्यांच्यातील व्यावसायिकांच्या जाण्याने नुकसान होते) तसेच समाजसेवी संस्था आणि अर्थातच तुम्ही-आम्ही सगळ्यांचाच विविध स्तरांवर सहभाग लागणार आहे.
- गाडीचालकाचा परवाना देताना नक्की काय शिकवले जाते आणि शिकले जाते?
- रस्त्यावर शिस्त पाळली जाते का? - सर्व वाहनचालक, पादचारी, सायकलवाले आदी...
- आता भारतात गाड्या वाढत आहेत - त्याबरोबर गाड्या चालवत फिरणे देखील. कधी कधी डोळ्यावर ताण येतो तर कधी खूप थकव्याने ग्लानी येते अथवा झोप येते. अशावेळेस कुठलाही पुरूषार्थ न समजता आपण बाजूला थांबून किमान ५-१० मिनिटे डोळ्यांना विश्रांती देतो का? अथवा बरोबर दुसरा/री चालक असेल तर गाडी चालवायला त्यांना देतो का? हे खूप महत्त्वाचे आहे.
- मद्य पिऊन गाडी चालवणे हे असेच एक अजून आमंत्रण आहे. त्याच्या मर्यादा सांभाळता येणे महत्त्वाचे आहे. - स्वत:साठी आणि रस्त्यावरील इतरांसाठी देखील.
- ट्रान्स्पोर्ट कंपन्यांनाना त्यांच्या ड्रायव्हर्सना (विशेष करून ट्रक ड्रायव्हर) सक्तीचे शिक्षण आणि "झिरो टॉलरन्स" आमलात आणायला लावणे महत्त्वाचे आहे. तसेच ज्या ट्रान्स्पोर्ट कंपन्यांच्या वाहनांकडून अपघात होतात, त्यांना दंड करणे आणि नावे जाहीर करणे, वगैरे शिक्षांची पण गरज आहे. हे केवळ खाजगीच नाही तर पिएमटी आणि इतर शहरातील तत्सम बस सेवा, एसटी आदींना पण बंधनकारक होणे महत्त्वाचे आहे.
- जर कोणी अपघातात अडकलेले दिसले तर जिथे शक्य आहे तेथे मदत पण किमान पोलीसांना फोन करून मदत करायचे काम आपण केले पाहीजे.
म्हणलं तर गोष्टी अगदी साध्या आहेत पण तरी देखील विचार आणि आचारात येयला अवघड जात आहेत.
आज हे सगळे सुचायचे कारण वर्षातल्या ८७६० तासातील, एका तासात गेलेल्या तेरा दुर्दैवी व्यक्तींपैकी एकास आपण सगळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ओळखत होतो. पण नुसती श्रद्धांजली म्हणत सोडून देण्याऐवजी जर आपण अपघात टाळण्यासाठी स्वतःकडून गाडी चालवत असताना, तसेच इतरांना या संदर्भात सतत सांगून जागे केले तर पुढच्या पाच-दहा वर्षात काहीतरी चांगले परीणाम पहाता येतील असे वाटते.
या धाग्यात या संदर्भात उपाय, अनुभव आदींवरून चर्चा झाली तर सगळ्यांनाच माहीती आणि शिक्षण मिळेल....
-------------
प्रतिक्रिया
21 Jul 2010 - 8:39 pm | रेवती
अस्वस्थ करणारी माहिती आहे हे खरेच!
मी माझ्या तीन नातेवाईक महिला गेल्या वर्षा दीड वर्षात अश्या अपघातात गमावल्या. अनेक परिचीतही गेल्याचे समजले. शिवाय जायबंदी झालेल्यांची मोजदाद नकोच अशी अवस्था पुण्यात तरी झाली आहे. मी व रंगा पुण्यात रहात असताना दोनदा वाहनाच्या धडकेमुळे जोरदार पडून आलेलो (सुदैवाने वाचलेलो) आहे.
जखमी झालेल्या माझ्या मावसबहिणीला वेळेवर योग्य ते उपचार न मिळाल्यामुळे दगावली. दुसर्या नातेवाईक बाई तर जखमी अवस्थेत रस्त्यात तश्याच पडून होत्या पण मदत न मिळाल्यामुळे गेल्या. पावलोपावली अपघात दिसतात. आम्ही एकदा मदत केली पण दुर्दैवाने ते गृहस्थ गेलेच! मग पुढे नातेवाईकांना निरोप वगैरे दिले. त्यातून तुम्हा सावरायला आपल्याला जो वेळ लागतो तो देण्याची तयारी नसते लोकांची! अनेक अपघात तर भिषण असतात व त्यातून वाहनांचे वेग जरूरीपेक्षा जास्त असतील असा अंदाज काढणे सहज शक्य असते. बर्याचदा कॉलेजला जाणारी मुले गाड्या जोरात चालवताना दिसतात. पण फक्त त्यांनाच दोष देत नाहीये. चालणार्यांनीही काळजी घेणे आवश्यक झाले आहे.
रेवती
21 Jul 2010 - 8:47 pm | शिल्पा ब
चिरीमिरी देऊन सुटका करण्यात आणि सुटका करून घेण्यात काहीतरी बाजी जिंकली असे न समजता वाहतूक पोलीस आणि नागरिक यांनी आपापली जबाबदारी ओळखून
सिग्नलला थांबणे, वेग निर्धारीतच ठेवणे इ. नियमांचे पालन केले तरच असे अपघात टळू शकतील.... आपण पश्चिमेकडून बऱ्याच गोष्टी घेतल्या पण नियमांचे पालन, समाजाप्रती जागरूकता इ. अवघड पण चांगल्या गोष्टी आत्मसात करणे काही जमले नाही..अजूनही...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
21 Jul 2010 - 8:51 pm | रेवती
आपण पश्चिमेकडून बऱ्याच गोष्टी घेतल्या पण नियमांचे पालन, समाजाप्रती जागरूकता इ. अवघड पण चांगल्या गोष्टी आत्मसात करणे काही जमले नाही..अजूनही...
सहमत. कायद्याची कडक अंमलबजावणी ही झालीच पाहिजे. त्याशिवाय लोकांना शिस्त लागणार नाही. (जर अशी शिस्त लागलीच त्याला 'हिरवी शिस्त' म्हणावे काय?;))
रेवती
21 Jul 2010 - 8:54 pm | आमोद शिंदे
तुम्ही काढलेला आलेख हा टोटल नंबर ऑफ फॅटॅलिटीजना य अक्षावर ठेवून काढलेला आहे. १९९८ ते २००६ ह्या काळामधे भारतातील लोकसंख्या आणि त्याहीपेक्षा वाहनांची संख्या ही बेसुमार वाढलेली आहे. त्यामुळे अपघातांचा आलेख हा चढता येणारच. पण दर दहा हजार वाहनांमागे किती लोक दगावले हा स्तंभ पाहता तिथले आकडे नक्कीच आशादायी आहेत. भारतातील दर हा पाश्चात्य देशांपेक्षा जास्त असला तरी त्याच्या कल हा कमी होण्याकडे आहे.
उपलब्ध डेट्यावरुन मला तरी हे चित्र काळजी करण्यासारखे दिसत नाही.
21 Jul 2010 - 9:06 pm | रेवती
अमोल साहेब,
वाहनांचा आकडा वाढला तरी ती 'निर्जीव' असतात. गेलेयांचा आकडा पहा ना! ते सगळे 'सजीव' होते! म्हणून तर आपण सुन्न होतो. कोणाची गाडी मोडून पडली तर वाईट वाटण्यापलिकडे काही होत नाही. पण माणूस गेला तर घरच मोडून पडतं......
रेवती
21 Jul 2010 - 9:11 pm | आमोद शिंदे
अशाप्रसंगी भावूक व्हायला हरकत नाही पण हा लेख विकास यांनी मेहनत घेऊन आकडेवारी देऊन लिहिला आहे म्हणून थोडे कोरडे विश्लेषण केले.
गाड्या वाढत आहे तशीच लोकसंख्याही वाढत आहे. (रादर लोकसंख्या वाढत आहे म्हणूनच वाहने वाढत आहेत.) मृत्यूदर काढताना किती लोक दगावले गे न बघता दर हजारी किती दगावले हे बघावे लागते.
21 Jul 2010 - 11:57 pm | विकास
सर्वप्रथम, रस्त्यावरील अपघातासंदर्भात आकडेवारी बघायची ठरवले तर जालावर अनेक संदर्भ सापडतात. मी दिलेला संदर्भ, भारतापुरता अधिकृत समजून दिला, जरी जागतिक आरोग्य संघटनेच्या ("हू") दृष्टीकोनातून ह्या बातमीप्रमाणे खरा आकडा हा बर्याचदा अधिक असू शकतो, कारण बर्याचदा सर्व अपघातांची आणि त्यांच्या परीणामांची नोंदणी होतेच असे नाही.
आमोद शिंदे यांचे निरीक्षण मी देखील केले होते आणि त्यांच्या आकडेवारीच्या विश्लेषणाशी सहमत होता येऊ शकते. मात्र "उपलब्ध डेट्याप्रमाणे काळजी करण्याचे कारण नाही", या त्यांच्या विधानाशी मी सहमत नाही. कारण त्यासाठी हा डेटा पुरेसा नाही. यातून केवळ एक विस्तॄत अंदाज येऊ शकतो आणि तितकाच उद्देश होता. केवळ इतक्याच विदाचा वापर करून खोलामध्ये जाऊन विश्लेषण करता येऊ शकत नाही, अनुमान काढणे (गंभीर आहे का नाही) हे लांब राहील... तसे करायचे झाले तर त्यासाठी राज्य, प्रमुख शहरे, तालुक्याची गावे, गाड्यांची संख्या, रस्त्याची व्यवस्था, लोकसंख्या इत्यादींच्या संदर्भात आकडेवारी घेऊन विश्लेषण करावे लागेल आणि त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा लागेल.
माझा मुद्दा होता तो केवळ (absolute and not relative) प्रत्यक्ष "जीवाचे मोल" या संदर्भात होता, म्हणून तसा आलेख काढला. त्यात भावनांच्या आहारी जाणे हा प्रकार नक्कीच नव्हता. पाश्चात्य राष्ट्रांशी प्रत्यक्ष तुलनेचा उद्देशही नव्हता, जरी तेथे बरेच काही शिकण्यासारखे असले तरी. आपल्या परीस्थितीत आपल्याला योग्य ती उत्तरे आपल्याला शोधावी लागणार आहेत.
एक थोडे वेगळे उदाहरण, विमान कंपन्यांच्या संदर्भात (अमेरिकेत) ऐकलेले/वाचलेले होते: विमान सुरक्षेच्या संदर्भात एकदा विमान कंपन्यांच्या बाजूने असे विधान केले होते की अमेरिकेत रस्त्यावरील अपघाती मृत्यूंची संख्या ही विमान अपघातातील संख्येपेक्षा अधिक असते, फक्त ती एकदम नजरेत भरत नसल्याने लक्षात येत नाही. पण म्हणून विमानांकडून सुरक्षायंत्रणेत अथवा पायलट शिक्षणात सुधारणा होणे थांबत नाही.
जो पर्यंत एक जीव हकनाक बळी पडत आहे, इतर कुणाच्या चुकीमुळे अथवा व्यवस्थेतील तृटीमुळे बळी पडत आहे, तो पर्यंत सुधारणेला वाव आहे. काळजीचे चित्र नाही असे म्हणताना आपण न कळत "चलता है" ची मानसीकता ठेवत पुढे जातो, आणि अक्षरशः, "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे" अशी अवस्था समाजावर ओढवून घेतो असे वाटते.
22 Jul 2010 - 2:54 am | आमोद शिंदे
डेटा पुरेसा नाही म्हणूनच उपलब्ध डेटा असे म्हंटले आहे. तुम्ही दिलेला डेटा हा ट्रेंड डेटा आहे. त्यावरुन दर दहाहजारी अपघातांची आणि मृतांची संख्या प्रतिवर्षी कमी होताना दिसत आहे. हा डाऊनवर्ड ट्रेंड अर्थातच चांगला आहे.
ट्रेंड डेट्यापेक्षा तुम्ही क्रॉससेक्शनल डेटा देऊन त्याची तुलना इतर प्रगत देशातील दराशी केली असतीत तर गांभिर्य अधोरेखित झाले असते. उदा. २००४ साली भारतात दर दहा हजारी १२.४ मृत्यू होतात तर तोच दर अमेरिकेत ३.४ (अंदाजे) इतका आहे.
21 Jul 2010 - 9:02 pm | गणपा
चिंताजनक आवडेवारी आहे.
विकासरावांनी दिलेली आकडेवारी जरी २००४ पर्यंतचीच असली तरी आता पर्यंत (२०१०) हा आकडा भयंकर वाढलेला असणार, नक्कीच.
एखाच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे कित्येक निष्पाप लोकांचे बळी जातात.
शासनही काही नियम करते (जस हेल्मेटच्या सक्तीचा) पण त्यातही पळवाटा शोधल्या जातात. वाहतुक पोलिसांना चिरीमिरी देउन सुटका करुन घेतली जाते. या सगळ्यावर नियंत्रण आलं पाहिजे.
वाहन चालवताना जागरुक असणे, मनावर आणि वेगावर ताबा असणे सगळ्यात गरजेचे. हे साध तंत्र जर सर्व वाहन चालकांनी पाळलं तर ही आकडेवारी निश्चितच खाली येईल.
21 Jul 2010 - 9:15 pm | धनंजय
आकडेवारी विचार करण्यासारखी आहे.
दिलेल्या तक्त्यात/ग्राफमध्ये वाढणार्या मृत्यु-संख्येचा आलेख स्पष्ट आहे. मात्र तक्त्यात विशेष जाणवण्यासारखी गोष्ट ही : शेवटचे दोन रकाने बघावे - दर १०,००० वाहनांमागे होणारे अपघात; आणि दर १०,००० वाहनांमागे होणारे अपघाती मृत्यू
हे दोन्ही आकडे वर्षनुवर्ष कमीकमी होत चालले आहे. म्हणजेच १९७० काळापेक्षा २००४ काळचा वाहनचालक (सरासरी वाहनाचा चालक) १२.७४/१०३.५० = १२.३% इतकेच अपघाती मृत्यू घडवतो. वाहनचालक बहुधा सुधारत आहेत. (श्री. आमोद शिंदे यांनी हे विश्लेषण केलेलेच आहे.)
परंतु दर वाहनामागे कमी मृत्यू होत असतील, तरी वाहनेच बेसुमार वाढत चालत असल्यामुळे एकूण मृत्यू वाढतच चालले आहेत. ही बाब निश्चित काळजी करण्यासारखी आहे.
(१) वाहनांबरोबर त्याच प्रमाणात रस्ते वाढत नाहीत. म्हणजे वाढत आहेत, पण प्रमाणापेक्षा खूप कमी.
(२) वाहनांची गती वाढते आहे, पण रस्त्यांची सुरक्षा-व्यवस्था प्रमाणात वाढत नाही. (हा मुद्दा जरा विस्कळित आहे, क्षमस्व.) मी बघितले आहे, की भरधाव टोल-रोडवर सायकली, बैलगाड्या, वगैरे, सुद्धा जात असतात.
(३) आणखी एक विस्कळित मुद्दा : भर पुण्यात मला (आणि माझ्या पुणेकर नातेवाइकांनाही) लक्ष्मी रस्ता/ ८०-फीट रस्ता वगैरे रस्ते पायी ओलांडायला भीती वाटते. पूर्वी वाटत नसे. काहीतरी बदलले आहे, हे निश्चित.
21 Jul 2010 - 10:06 pm | मिसळभोक्ता
भर पुण्यात मला (आणि माझ्या पुणेकर नातेवाइकांनाही) लक्ष्मी रस्ता/ ८०-फीट रस्ता वगैरे रस्ते पायी ओलांडायला भीती वाटते. पूर्वी वाटत नसे. काहीतरी बदलले आहे, हे निश्चित.
बंगलोरला गोल्फ कोर्स वरून कोरमांगला रस्ता ओलांडायला मला तब्बल अर्धा तास लागला होता. नंतर मी एक किलोमीटर दूर जाऊन पादचारी पूल ओलांडून एक किलोमीटर परत येत असे. २० मिनिटे.
काहीतरी नव्हे, सर्वच खूपच बदलले आहे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
21 Jul 2010 - 10:49 pm | धमाल मुलगा
धनंजय ह्यांनी म्हणल्याप्रमाणे पुण्यातले रस्ते (सवय मोडल्यामुळे वगैरे जास्त असु शकते) ओलांडायला वेळ लागण्याबद्दल सहमत आहेच. पण असे रस्ते रोज फिरायची सवय असणार्या माझ्यासारख्याला बंगळुरात हॉटेल लिला पॅलेसपासुन रस्त्यापलिकडच्या इंटेलच्या इमारतीपाशी जाण्यासाठी रस्ता ओलांडताना फे फे उडत होत असेल तर काय म्हणणार?
नशीब पादचारी पूल जवळच आहे, त्यामुळे मिभोकाकांसारखं किलोमिटरभर दूर जाऊन परत यायची गरज नाही पडली.
21 Jul 2010 - 11:34 pm | क्रेमर
आमोद शिंदे आणि धनंजयच्या आकडेवारीसंदर्भात मुद्द्याशी सहमत आहे.
वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबर पादचार्यांची व सायकलस्वारांची कुचंबणा वाढत आहे. हॉर्न हे एक हत्यार आहे व समस्त वाहनचालक ते पादचार्यांना सळो की पळो करण्यासाठी वापरतात असे माझे स्वानुभवावरून मत झाले आहे. पुणे शहरातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे.
-क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.
22 Jul 2010 - 12:10 am | विकास
वाहनांची गती वाढते आहे, पण रस्त्यांची सुरक्षा-व्यवस्था प्रमाणात वाढत नाही. (हा मुद्दा जरा विस्कळित आहे, क्षमस्व.) मी बघितले आहे, की भरधाव टोल-रोडवर सायकली, बैलगाड्या, वगैरे, सुद्धा जात असतात.
या संदर्भात अजून एक ऐकीव मुद्दा, येथे अनेक जण खात्री करून सांगू शकतीलः पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर जरी रस्ता रूंद आणि मोकळा असला तरी त्यावर अमेरिकन/जर्मन आदी पद्धतीने वेगाने चालवता येणार्या गाड्या आणि टायर्स अजून आपल्याकडे नाहीत. परीणामी रस्त्यावर वेगाने जाणार्या गाड्यांचे टायर्स फुटून मनुष्यहानी होणारे अपघात झाले आहेत.
आणखी एक विस्कळित मुद्दा : भर पुण्यात मला (आणि माझ्या पुणेकर नातेवाइकांनाही) लक्ष्मी रस्ता/ ८०-फीट रस्ता वगैरे रस्ते पायी ओलांडायला भीती वाटते. पूर्वी वाटत नसे. काहीतरी बदलले आहे, हे निश्चित.
अशी भिती नव्हे तर काळजी वाटू नये म्हणूनच, "१२.३% अपघाती मृत्यू घडवतो" असे म्हणताना, "इतकेच" हा शब्द वापरू नये असे वाटते.
21 Jul 2010 - 9:36 pm | मराठमोळा
लेखकाची तळमळ आणी आकडेवारी समजण्याजोगी आहे. वाईट तर खुप वाटतं, पण माझ्या मते हा कधीही न संपणारा प्रश्न आहे. प्रत्येक अपघाताची कारणे वेगवेगळी आणी असंख्य आहेत.
पुणे - मुंबई द्रुतगती रस्त्यावर नव्या गाड्यांचे टायर फुटुन अपघात झाले आहेत.
गरीबांची मुले सायकलवर शाळेत जातात, कितीही शिकवलं तरी लहान मुलंच ती, चुकणारच, शाळेतील मुलांचे अपघात कमी नाही, पादचार्यांना चालण्यासाठी फुटपाथ नाहीत, तिथे पथारी संघटनांचा अधिकार आहे. कितीतरी आजी-आजोबा त्यामुळे देवाघरी गेलेत.
ट्रक/बस ड्रायवर सुद्धा माणसेच, कधी ब्रेक फेल होऊन, कधी खराब रस्त्यांमुळे अपघात होतातच. अतिपैसा असलेले मस्तीखोर तरुण लोकांना चिरडणारच. झोपेतुन उठुन चालणारे पादचारी आहेतच. नवा रस्ता झाला रे झाला की लगेच खोदायला महानगरपालिका किंवा टेलीफोन्/एलेक्ट्रीसिटीवाले आहेतच. भरधाव वेगाची आवड असणारी तरुणाई आहेच.
रेलवे आजसुद्धा बाबा आझमच्या काळातल्या टेक्नोलॉजीवर चालते. अँटी कोलीजन सिस्टम बसवायला खुप काळ जाईल असं तोंड वर करुन एक रेलवे ऑफिसर आज बातम्यांमधे सांगत होता. मुंबैच्या गर्दीत लोकांचा लोकलमधुन पडुन जीव जाणारच.
विकास यांच्या म्हणण्याप्रमाणे जर सर्वच या बाबतीत विचारी झाले आणी अपघातांचे प्रमाण कमी झाले तोच सुदीन म्हणावा लागेल.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
21 Jul 2010 - 9:43 pm | ज्ञानेश...
आकडेवारी चिंताजनक आहे खरी !
भारतात रस्ते अपघातात दगावणार्यांपैकी ८५ टक्के हे पुरूष असतात, आणि त्यातले ७० टक्के हे वर्किंग एज गृप मधले (३०-६०) असतात. हे नुकसान भयावह आहे.
भोचक यांच्या उदाहरणावरून आपण याचे अनुमान लावू शकतो, की किती मोलाचे मनुष्यबळ आपण यात गमावतो आहोत.संपूर्ण जगात रस्ते अपघातात जीव गमावणारा प्रत्येक दहावा माणूस भारतीय आहे- असे जागतिक आरोग्य संघटना सांगते.
काय करता येईल?
21 Jul 2010 - 9:54 pm | सुनिल पाटकर
ई-सकाळ वरील
महाड - मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे ते पोलादपूर यादरम्यान वर्षभरात एकूण 353 अपघातांची नोंद झाली असून, 96 जणांना या अपघातात मरण पत्करावे लागले आहे. यापैकी महाड शहर व परिसरात तब्बल 74 अपघातांची नोंद झाली आहे. 1 जानेवारी 2009 ते 31 डिसेंबर 2009 या काळात हे अपघात झाले आहेत. 1 जानेवारी 2010 पासून 21 व्या रस्ता सुरक्षा मोहिमेस सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने वाहतूक पोलिसांनी हा आढावा घेतला. वाहतूक पोलिस निरीक्षक लाड यांनी वर्षभरात झालेल्या अपघातांची ही माहिती दिली.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हा या वर्षातला चर्चेतील विषय होता. अपघातांच्या या आकडेवारीवरून चौपदरीकरणाची गरज लक्षात येते. परंतु, अतिवेग, मद्य पिऊन वाहन चालविणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष, ओव्हरटेक अशा अनेक बाबीही तितक्याच कारणीभूत आहेत. 31 डिसेंबरला वर्षाच्या शेवटच्या दिवशी महामार्गावर दोन अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. 2009 या वर्षातील अपघात मालिका संपली. महामार्ग पोलिस विभागाच्या आकडेवारीनुसार नागोठणे ते पोलादपूर यादरम्यान 353 अपघात झाले. प्राणांतिक अपघातांची संख्या 69 असून, या अपघातांत 96 जणांना आपले प्राण गमवावे लागले. गंभीर अपघातांची संख्या 105 असून, त्यामध्ये 267 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्याचबरोबर या मार्गावर झालेल्या 45 किरकोळ अपघातांत 104 जण जखमी झाले आहेत. महाड शहर परिसरातही एकूण 74 अपघात झाले. यामध्ये प्राणांतिक अपघात 19 होते. त्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला. गंभीर अपघातांची संख्या 33 असून, त्यामध्ये 62 जण जखमी झाले; तर किरकोळ 22 अपघातांत 40 जण जखमी झाले होते. यावरून या रस्त्याची भयावहता लक्षात यावी. वाहतुकीचे नियम न पाळणे ही बाब अपघाताइतकीच गंभीर आहे. वाहतूक पोलिसांनी 15 ऑगस्टपासून दोन हजार 185 केसेस केल्या असून, त्यातून दोन लाख 34 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 15 ऑगस्टपासून वाहतूक पोलिसांना केसेस करण्याचे अधिकार देण्यात आले. महाड शहर पोलिसांनीही वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्न केले असून, दोन लाख 35 हजार रुपयांचा दंड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून वसूल करण्यात आला आहे. 1 ते 7 जानेवारी या काळात सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूक पोलिस, महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, एसटी महामंडळ अशा विभागांतर्फे विविध कार्यक्रमांद्वारे वाहतुकीविषयी जनजागृती केली जाते; परंतु तरीही वर्षभरात अपघातांचे सत्र मात्र सुरूच होते.
21 Jul 2010 - 10:06 pm | श्रावण मोडक
भोचक यांचा अपघात झाला त्यात त्या बसच्या चालकाचा बेजबाबदारपणा कारणीभूत होता, असे आजच्या 'लोकसत्ता'तील (मुद्रित आवृत्ती, पुणे) बातमीत म्हटले आहे. माझ्या माहितीप्रमाणे, त्या बसचा चालक गाडीतच गाण्यांच्या तालावर डोलत होता. हातवारे करत होता. त्याला प्रवाशांनी अपघाताच्या आधी काही काळच झापले होते. तेव्हा त्याने, "हा आख्खा रस्ता आमच्या मालकाने विकत घेतलाय. इथली सगळी पोलीस स्टेशन आमची आहेत, तुम्हाला काय करायचे ते करा," असे उद्दामपणे सांगितले होते.
विकास यांनी मांडलेल्या १, २, ५ या मुद्यांचा येथे जवळचा संबंध येतोच. हा जबाबदारपणा कधी येईल हे मात्र सांगता येत नाही.
21 Jul 2010 - 10:10 pm | क्रेमर
य चालकाला बेदम मारहाण करण्याची इच्छा होत आहे.
-क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.
21 Jul 2010 - 10:16 pm | मिसळभोक्ता
अपघात झाल्यानंतर चालक स्वतःहून पोलीसांत जातात आणि अटक करवून घेतात. कारण अपघात स्थळी थांबले तर बघ्यांकडून हमखास बेदम मारहाण होते. मी हे दोन-तीन वेळा पाहिले आहे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
21 Jul 2010 - 10:21 pm | मराठमोळा
>>कारण अपघात स्थळी थांबले तर बघ्यांकडून हमखास बेदम मारहाण होते. मी हे दोन-तीन वेळा पाहिले आहे.
हो. आणी त्या मारहाणीत चालकाचा (कधी कधी चुक नसताना देखील) मृत्यु झालेले प्रकारही कमी नाहीत.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
21 Jul 2010 - 10:57 pm | क्रेमर
मारहाण करणे चूकच आहे (चालकाने चूक केली असो अथवा नसो). चालकाने उधळलेली मुक्ताफळे वाचल्यानंतर तसा विचार मनात आला होता.
-क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.
21 Jul 2010 - 10:43 pm | धमाल मुलगा
शिवाय, इंदुरातील सदर सुप्रसिध्द खाजगी बससेवा पुणे ते धुळे व्यवस्थित चालते आणि धुळे ते इंदूर हा ८ तासांचा रस्ता ४ तासांत पार करते हेही आहेच.
'आम्ही सर्वात लवकर इच्छित स्थळी पोहोचवतो' असा प्रचार करुन प्रवासीसंख्या वाढवण्याच्या भानगडीत किती जणांच्या जीवाशी खेळणार आहेत हे ट्रॅव्हल्सवाले असा प्रश्न पडतो.
21 Jul 2010 - 10:52 pm | चिरोटा
आता हापिसातून येतानाच अपघात् पाहिला आणि धागा उघडतोय.!
वर मराठमोळाने म्हंटल्याप्रमाणे मोठ्या शहरातल्या अपघातांचे एक महत्वाचे कारण फूटपाथ् नसणे हे आहे.मुंबईत उपनगरांमध्ये फुटपाथ जवळपास नाहीतच.शहरामध्ये जे आहेत ते फेरीवाल्यानी व्यापलेले आहेत. त्यात नोकरी धंद्यानिमित्त शहरांतल्या ठराविक भागांत जमणारी बेसुमार गर्दी आणि तिला सेवा पुरवणारी वाहने.सिग्नलचे/कायद्याचे पालन न करता बेधुंद होवून गाडी चालवणे,पैसे देऊन सुटण्याची ग्यारंटी हीही कारणे आहेत.
५ क्रमांकावर सुचवलेला उपाय अमलात आणणे गरजेचे आहे.
21 Jul 2010 - 11:05 pm | आनंद
रात्रीचा ट्रवल बसचा, कार प्रवास शक्यतो टाळावा, दिवसा प्रवास करावा,फार फार एखादा दिवस वाया जाइल
22 Jul 2010 - 12:53 am | चतुरंग
आपल्याकडे रस्त्यावर अपघात होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत असे वाटते -
१ - लोकसंख्या आणि वाहने ह्यांच्या प्रमाणात रुंद रस्ते नाहीत.
२ - वाहनांनी आणि पादचार्यांनी नियम न पाळणे
३ - अतिवेगाने वाहन चालवणे
४ - ओवरटेकिंगची घाई
५ - योग्य मेंटेनन्स नसणे
६ - प्रशिक्षित चालक नसणे (हा मुद्दा परवाना वाटपातील भ्रष्टाचाराशी मोठ्याप्रमाणावर निगडित आहे)
७ - दारु पिऊन गाडी हाकणे
८ - अजिबात विश्रांती न घेता किंवा अपुर्या विश्रांतीनंतर लगेच प्रवास सुरु करणे
९ - प्रमाणाबाहेर लोक वाहनात कोंबणे
१० - अतिशय लहान वयात अति ताकदवान गाड्या हातात पडल्याने बेजबाबदारपणे गाड्या हाकल्या जातात त्यामुळे अपघात.
आत्ताच्या पुणे भेटीत मला पादचारी मार्ग बहुतांश ठिकाणी बरे वाटले परंतु लोकच बर्याच वेळा रस्त्यावरुन चालताना दिसले, पादचारी मार्ग मोकळेच होते! अशाने अपघातांचे प्रमाण वाढते हे नक्की.
बाकी हा विषय अतिशय गांभीर्याने विचार आणि तातडीने कृती करण्याचा आहे.
चतुरंग
22 Jul 2010 - 1:20 am | क्रेमर
बर्याचदा पादचारी मार्गावर दुकानांनी, फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले असते किंवा प्रचंड घाण पसरलेली असते. पादचारी मग रस्त्यावरून चालणेच योग्य समजतात.
-क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.
22 Jul 2010 - 1:55 am | विकास
बर्याचदा पादचारी मार्गावर दुकानांनी, फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले असते किंवा प्रचंड घाण पसरलेली असते. पादचारी मग रस्त्यावरून चालणेच योग्य समजतात.
सहमत आहेच, पण या संदर्भात अजून एक मुद्दा आठवला... सलमान सारखे चालक पण पादचारी मार्गावर आक्रमण करतात आणि नंतर उजळ माथ्याने हिंडतात...
22 Jul 2010 - 1:59 am | क्रेमर
तेही आहेच.
-क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.
22 Jul 2010 - 2:01 am | चतुरंग
मार्ग मोकळे होते आणि माणसे रस्त्यावरुन चालत होती. ह्याचे कारण कदाचित पादचार्यांना लागलेली सवय असे असू शकेल.
हे बदलणे गरजेचे आहे.
चतुरंग
22 Jul 2010 - 2:32 pm | बद्दु
तुमच्या खरडवहीत कसे खरडावे?
आम्हाला परवानगी दिसत नाही...? :?
16 Feb 2016 - 8:58 pm | आशु जोग
रुंद रस्ते हे अपघाताचे मोठे कारण आहे. प्लीज नीट समजावून घ्या.
22 Jul 2010 - 4:20 am | बहुगुणी
निदान पुण्यातील वाहतूक तरी सुधारावी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून ही लोक-चळवळ उभी राहिली आहे, या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाला आतापर्यंत दृश्य फळ आलेलं दिसलं आहे, तरीही म्हणावा तसा लोकांच्या सहभागाचा प्रतिसाद मात्र दुर्दैवाने त्यांना अजूनही लाभलेला नाही. आपल्यापैकी जे कुणी पुण्यात असतील (किंवा पुण्याशी संबंधित असतील) त्यांनी मदत करावी, नव्हे सक्रिय सहभाग घ्यावा, अशी विनंती.
22 Jul 2010 - 4:42 am | राजेश घासकडवी
एका महत्त्वाच्या विषयावर खोलवर आकडेवारी देऊन लेख लिहिल्याबद्दल विकास यांचे अभिनंदन. केवळ आकडेवारी आहे म्हणून लेख कोरडा न होऊ देणं हे देखील त्यांनी साधलेलं आहे.
एकंदरीत चित्र कुठच्याही इतर प्रश्नासारखंच आहे.
- गेल्या चाळीस वर्षांत प्रचंड सुधारणा झाल्या : जुने दिवस सोन्याचे होते असं बरेच लोक या ना त्या प्रकारे म्हणताना दिसतात. प्रत्यक्षात जुन्या काळी आजच्यापेक्षा खूपच भयाण प्रश्न होते. जे प्रश्न होते ते आपण पाहिलेले नसून आपल्या पूर्वजांनी पाहिले असल्यामुळे आपल्याला ती कल्पना येत नाही.
- तरीही अजून खूप मोठी मजल गाठायची आहे : अद्ययावत तंत्रज्ञान, वाहतुक व्यवस्थेत सुधारणा, चालकांकडून थोडी अधिक काळजी इ. मुळे हे प्रमाण खूपच कमी होऊ शकतं. (शून्यावर येईल की नाही याबाबत मी साशंक आहे. ) प्रवास योग्य दिशेला चालू आहे, तो अजून वेगाने नेता येईल का हे विचार करण्याजोगं आहे.
22 Jul 2010 - 6:06 am | सन्जोप राव
1. गाडीचालकाचा परवाना देताना नक्की काय शिकवले जाते आणि शिकले जाते?
परवाना देणे हा एक विनोद आहे. एजंटांनी ही पूर्ण सिस्टीम काबीज केली आहे. मला चारचाकी वाहानाचा परवाना देताना संबंधित अधिकारी चहा (नशीबाने चहाच!) पीत बसले होते. 'जावा,एक राऊंड घ्यून या सायेब' असे म्हणून त्यांनी माझ्या कागदपत्रांवर सही केली होती
2. रस्त्यावर शिस्त पाळली जाते का? - सर्व वाहनचालक, पादचारी, सायकलवाले .....
सोडून बोला. शिस्त पाळून वाहन चालवणार्यांकडे 'भेकड' या दृष्टीकोनातून पाहिले जाते. याच चर्चेत उल्लेख झालेल्या 'एसपीटीएम' या संस्थेचा मी सदस्य आहे. 'वाहातूक नियमांचे पालन करण्याचा मला अभिमान आहे' अशा अर्थाचे स्टीकर माझ्या गाडीवर आहे. या स्टीकरकडेही लोक तुच्छतेने बघतात. माझ्याकडे तर बघतातच.
3. आता भारतात गाड्या वाढत आहेत - त्याबरोबर गाड्या चालवत फिरणे देखील. कधी कधी डोळ्यावर ताण येतो तर कधी खूप थकव्याने ग्लानी येते अथवा झोप येते. अशावेळेस कुठलाही पुरूषार्थ न समजता आपण बाजूला थांबून किमान ५-१० मिनिटे डोळ्यांना विश्रांती देतो का? अथवा बरोबर दुसरा/री चालक असेल तर गाडी चालवायला त्यांना देतो का? हे खूप महत्त्वाचे आहे.
हेही बर्याच वेळा होत नाही. दिल्लीहून आग्र्याला जाण्यासाठी मी (खूप आधी बुकिंग करुन) एक टॅक्सी ठरवली होती. स्टेशनवर आलेला ड्रायव्हर वैतागलेला वाटला. मला वाटले, नेहमीचा उत्तर प्रदेशी उद्धटपणा असेल. मग त्याने सांगितले की त्याच दिवशी पहाटे तो सिमल्याहून दिल्लीत पोचला होता. आग्र्यात पोचेपर्यंत माझा रक्तदाब वाढलेलाच होता!
4. मद्य पिऊन गाडी चालवणे हे असेच एक अजून आमंत्रण आहे. त्याच्या मर्यादा सांभाळता येणे महत्त्वाचे आहे. - स्वत:साठी आणि रस्त्यावरील इतरांसाठी देखील.
मद्य पिऊन गाडी चालवणे हे भूषण वाटणार्यांसाठी काय करणार? माझ्या एका मित्राचा मला मे महिन्यात दुपारी बारा वाजता फोन आला. तो पुण्याहून मुंबईला दुचाकीवरुन निघाला होता आणि तळेगावला थांबून व्हिस्की पीत होता. ( मे महिन्यात दुपारी व्हिस्की!) काही तासांनी त्याचा पनवेलहून फोन आला. तो परत व्हिस्की प्यायला थांबला होता. हा एका मोठ्या कंपनीत मोठा अधिकारी आहे!
5. ट्रान्स्पोर्ट कंपन्यांनाना त्यांच्या ड्रायव्हर्सना (विशेष करून ट्रक ड्रायव्हर) सक्तीचे शिक्षण आणि "झिरो टॉलरन्स" आमलात आणायला लावणे महत्त्वाचे आहे. तसेच ज्या ट्रान्स्पोर्ट कंपन्यांच्या वाहनांकडून अपघात होतात, त्यांना दंड करणे आणि नावे जाहीर करणे, वगैरे शिक्षांची पण गरज आहे. हे केवळ खाजगीच नाही तर पिएमटी आणि इतर शहरातील तत्सम बस सेवा, एसटी आदींना पण बंधनकारक होणे महत्त्वाचे आहे.
हे आजवर झाल्याचे ऐकिवातही नाही.
6. जर कोणी अपघातात अडकलेले दिसले तर जिथे शक्य आहे तेथे मदत पण किमान पोलीसांना फोन करून मदत करायचे काम आपण केले पाहीजे.
मानवता या सद्गुणाला विचार करायला लावणारा 'पोलीस' हा घटक जोवर भारतीय समाजात आहे, तोवर हे होणे अवघड दिसते.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने
शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है
22 Jul 2010 - 9:41 am | ऋषिकेश
मला मिळालेले 'लायसन' तर राऊंडही न घेता मिळाले होते. फक्त गाडीला किल्ली लावली गाडी चालु झाली.. "पुरे!.. नेक्स्ट!!!"
मात्र हे ही सांगतो की गेल्या ६ वर्षांत काहि सुधारणा झाल्या आहेत. माझ्या धाकट्या भावाने गेल्या महिन्यात लर्निंग लायसन्स काढले. त्याची आता रीतसर लेखी परिक्षा (कंप्युटराइज्ड) झाली ४० जणांपैकी फक्त ६ उत्तीर्ण झाले. कोणीही अजून तरी (कदाचित लर्निंग असेल म्हणून) पैसे मागितले नाहित (एजंट नसूनही)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
22 Jul 2010 - 11:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला चारचाकीचा लायसन्स मिळण्यासाठी गाडीला किल्लीही लावावी लागली नाही, फक्त नाव विचारलं सही झाली... त्यानंतर गाडी चालवावी लागली नाही हे माझं नशीब.
स्कूटरवरून फिरताना मी नेहेमीच हेल्मेट घालून फिरते याचं कौतुक करणारी अनेक पुणेकर डोकी स्वतः स्कूटरवर बोडकी किंवा रूमाल बांधलेली दिसतात. पुण्यात हेल्मेटची सक्ती का टिकली नाही म्हणे, तर लोकं तक्रारी करत होते, मानेला त्रास होतो, हेल्मेटमुळे दोन्ही बाजूंचं दिसत नाही, इ.इ.
यू-टर्न १०० मीटर "लांब" आहे म्हणून उलट्या बाजूने गाड्या हाकणार्यांचं प्रमाणही कमी नाही. आपण स्वतः उलट्या बाजूने जात असूनही हॉर्न, वेगाचा माज दाखवणारेच जास्त.
चतुरंग यांचा मुद्दा योग्य आहे, पण फुटपाथ बर्याचदा रस्त्यापेक्षा बर्याच जास्त उंचीवर आहेत, प्रत्येक वेळी एखाद्या इमारतीचं प्रवेशद्वार आलं की फुटपाथवरून उतरून पुन्हा चढावं लागतं. बर्याच लोकांच्या गुडघ्यांना दोनेक किलोमीटर चालूनही याचा त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा रस्त्यावरून चालणंच जास्त सोयीस्कर असू शकतं.
अनेक ठिकाणी फुटपाथही अतिशय अरुंद आहेत. सवय होत नाही हाही मुद्दा इथे महत्त्वाचा.
अदिती
22 Jul 2010 - 12:34 pm | विसुनाना
कधी कधी असे वाटते की-
भारतात कोणत्याही गुन्ह्यासाठी मृत्यूदंड ही एकच शिक्षा ठेवावी म्हणजे लोक धाकाने का होईना नियम पाळतील.
"घुसा, घुसा, कोण पुढे घुसे तो..." हा आजच्या युगाचा धर्म झाला आहे. शिस्त पाळणार्याची/शिकवणार्याची टवाळी, त्याला अपमानकारक उत्तरे, वागणूक देणे हे पाहिले की आपण या युगधर्माला नालायक आहोत असे वाटू लागते.
संजोपराव, कदाचित आम्हीच आता जुने झालो असू...
23 Jul 2010 - 1:07 am | राजेश घासकडवी
हे म्हणजे मिपावर एक अवांतर प्रतिसाद दिल्याबद्दल आयडी उडवण्यासारखं झालं...
कायदा सुव्यवस्था नाही म्हणून 'हुकुमशाही हवी, सौदी सारख्या हात तोडण्याच्या वगैरे शिक्षा हव्यात' असं बोलणं सोपं असतं. पण रानटी व्यवस्था घेऊन न्याय वाढत नाही. भोचकांना त्यांची चूक नसताना अपघात झाला तर इतका (रास्त) संताप येतो. पण आपल्या अशा कोणा आप्तस्वकीयाला पिवळा लाईट तोडल्यावर मृत्यूदंड झाला तर काय वाटेल? हा विचार करा.
22 Jul 2010 - 7:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आकडेवारी देऊन लेखन केल्याबद्दल धन्यू. सध्या सर्वत्र चौपदरी रस्ते होत असल्यामुळे पूर्वीपेक्षा अपघाताची संख्या कमी होईल असे वाटते. तरीही रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांना धडकण्याचे प्रमाण काही कमी नाही. चालकांना उभे असलेले वाहन दिसत नाही इतके बेजवाबदारपणे वाहन चालविणे याबाबत वाहन चालकांचे प्रबोधन व्हायला हवे. एस.टी. ड्रायव्हर चे उदाहरण बघा इतरांच्या तुलनेत जवाबदारीने ते वाहन चालवितात असे वाटते. कारण एस.टीचा अपघात झाला तर कोर्ट कचे-या कराव्या लागणार असतात. पगार कमी किंवा बंद होणार असतो त्या सर्वांचा परिणाम लक्षात असल्यामुळे त्यामुळे होता होईल काळजीने ते वाहन चालवत असतात असे वाटते. याचा अर्थ अपघात होत नाहीतच असे काही नाही पण प्रमाण कमी आहे. खासगी वाहन चालकांचा बेदरकारपणे गाडी चालविण्याबद्दल स्वतःची जवाबदारी, शिस्त आणि लोकशिक्षणाची गरज आहे. कायदे आणि पोलिस त्यांना अडवू शकत नाही.
अपघातांच्या बातमीत आपलं कोणी असलं की माणूस दु:खी होतो. नाही तर अशा कितीतरी बातम्यांकडे आपल्याकडे दुर्लक्ष होते. एका सुमो चालकांने संगमनेरहून येतांना बेजवादरपणे गाडी चालवून थेट पूलाला धडक दिली. जोरदार वाहणार्या पाटाच्या पाण्यात गाडी पडली. चालकाने प्राण गमावला आणि माझे सहा मित्र जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. गावकरी धावून आले त्यांच्या मदतीमुळे आणि दैव बलवत्तर होते म्हणून मी आणि काही मित्र वाचले. अनोळखी रस्त्यावरुन अतिशय वेगाने गाडी चालविल्यामुळे गाडीवर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे अपघात झाला त्याचा मी साक्षीदार आहे. अशा अपघाताच्या बातम्या वाचल्या आणि त्यात कोणी ओळखीचे असले की त्या धक्यातून अजूनही मला लवकर बाहेर पडता येत नाही.
-दिलीप बिरुटे
22 Jul 2010 - 8:31 am | Manoj Katwe
भारतात काहीही होणे शक्य नाही, (आम्ही बरचसे प्रयत्न करून पहिले आहेत.)
वेदना होत आहे खालील एकेक वाक्य लिहिताना, पण जर खरे प्रयत्न केले तर काय निष्पन्न होईल ह्याचा एक नमुना
उलट लोकांचेच जोडे पडतात,
फुटपाथ वरील पार्क केलेल्या गाड्या, फेरीवाल्या , फळे, भाज्या विकणाऱ्या गाड्या ह्यांना बर्याचदा समजून सांगण्याच्या प्रयत्न केला
कित्येक वेळा, लोकांना रस्त्यात उभे राहून गाड्या नीट चालवायला सांगितले आहे ,
(कात्रज ते बालाजी नगर मधील जो उतार आहेत तिथे अनेक वेळा अपघात झालेले आहेत, तिथे आम्ही बर्याचदा थांबून लोकांना गाड्या हळू चालवा असे सांगत असतो,)
उपयोग काय लोकांच्याच शिव्या ऐकायला मिळतात, (कामाला उशीर झाला आहे , बाजूला व्हा. मला काय झाले नाही ना? तर मी कशाला ह्या फंदात पडू ?)
लोक उलटंच म्हणतात कि तुम्हाला काय काम धंदा नाही काय, उटसूट अक्कल शिकवायला येता,
काही लोकांनी तर त्यांना चुकीच्या जागेवर गाडी पार्क केली हे सांगितले तर माझ्याच गाडीचे नुकसान केले,
------------------------------------------------------------------------------------------
जाऊद्या हो सोडा, अक्कल शिकवणारे खूप आहेत, पण मोठा प्रश्न आहे अक्कल कोणाला शिकायची आहे.
इथे असे विचार मांडून काहीही निष्पन्न होणार नाही, आणि जर खरच एखादा उपक्रम राबविण्या गेलात तर उलट लोकांचेच जोडे खाल.
ज्याचे माणूस जाते त्याला मात्र काहीतरी नक्की वाटते, एखाद दुसरा दिवस, मग तो सुद्धा पुन्हा पहिल्यासारखा रुळावर.
-------------------------------------------------------------------------------------------
हे भारत आहे, भारत, १२० करोड लोक आहेत इथे, लाख दोन लाख लोक मेली तर काय फरक पडणार आहे ?
अशी आरडा ओरड ऐकू येत असते (लोकांकडूनच)
-------------------------------------------------------------------------------------------
भोचक साहेबां बद्दल नक्कीच दुख: आहे, पण तो जो कोण बेजबाबदार चालक होता तो २-३ महिन्यात बाहेर आलेला असेल, हे सुद्धा नक्की.
22 Jul 2010 - 6:31 pm | sagarparadkar
>> जाऊद्या हो सोडा, अक्कल शिकवणारे खूप आहेत, पण मोठा प्रश्न आहे अक्कल कोणाला शिकायची आहे. <<
हे वाचून पु. लं. च्या एका प्रकट मुलाखतीतील व्यक्त केलेले मत आठवले. तर पु. ल. म्हणाले होते की " पुण्याचं काय आहे की तेथे शिकणारे कमी आणि शिकवणारेच जास्त"
श्री. मनोज कटवे ह्यांनी पुण्याचा संदर्भ दिला म्हणून ही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मोह आवरत नाही. मी स्वतः देखील अस्सल पुणेकर आहे पण पु. लं. च्या ह्या (आणि बहुतेक पुण्याबद्दलच्या सर्वच) मताशी सहमत आहे.
22 Jul 2010 - 10:50 am | बद्दु
आपल्यापैकी कितीजण सिट बेल्ट लावता? सिट बेल्ट लावल्यामुळे अपघातात वाचण्याची शक्यता सिट बेल्ट न लावल्यामुळे वाचण्याच्या शक्यतेपेक्षा नक्किच जास्त असते.
क्रुपया माझ्या मिपाकर बन्धुनो- भगिणींनो आपण चार चाकी चालवत असाल तर स्वत: सीट बेल्ट लावा आणि तुमच्या सोबत जो असेल त्याला सीट बेल्ट लावायला बाध्य करा. आम्ही इकडे परदेशात राहतो, आणि सीट बेल्ट लावला नाही (चालकाने किंवा त्याच्या शेजारी बसणार्याने) तर ७००० रुपये दंड भरतो.
भारतात आल्यावर मी आवर्जून सीट बेल्ट लावतो ( बघणारे हसत असतील तरी सुद्धा).
22 Jul 2010 - 12:06 pm | मन
सिग्नल वर (सिग्नल लाल असताना) गाडी घेउन थांबायला हिंमत लागते.( मुख्यतः लॉ कॉलेज रोडवर)
चुकुन थांबायची हिंमत केलीत तर तुफान वेगानी येणारी मोठी वाहनं तुम्हाला होर्न आणि घाणेरडं मावाजवुन( त्यांचं)थोबाड वाजवुन भंडावुन सोडतात. तरीही तुम्ही बिनडोक सारखे लाल सिग्नल वर थांबले असाल तर बिनदिक्कत सरळ सरळ तुमच्या कफल्लक वाहनाला(आणि कवडीमोल जीवाला) शब्दशः ढकलुन पुढे जातात.
नीट रहायचं असेल तर गपगुमान त्यांच्यासारखच बेधडक चालवणं हाच सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे.
किंवा दुसराअ मार्ग हा की तुम्हीही एक चांगलं ट्रॅक्ष्,टोयोटा वगैरे सारखं भरभक्कम वाहन घेणं.
(पोलिस तक्रार करणं हा वैधानिक रित्या योग्य आणि प्रत्यक्षात जनसामान्यांच्या आवाक्या बाहेरचा प्रकार आहे:- स्वानुभव)
आपलाच,
मनोबा
22 Jul 2010 - 1:16 pm | मैत्र
SPTM ही संघटना खूप मुळाशी जाऊन प्रयत्न करत आहे. त्यांना यश यायला काही वर्षे लागतील. पण तोच एक मार्ग आहे जो काही परिणाम घडवू शकतो.
आर टी ओ हा अशक्य प्रकार आहे. एक एजंट ओळखीचे आहेत त्यांच्याकडून अनेक किस्से कळतात.
वर नुसती सही करून किंवा किल्ली लावून लायसन्स मिळाल्याचा उल्लेख आहे. भर पावसात जर टेस्ट द्यायला गेलात तर त्याहून महान प्रकार असतो.
पण तरीही वाटते की पुण्यात ड्रायव्हिंग शिकवणारे थोडे जबाबदारीने शिकवतात त्यामुळे खूप फरक पडत नाही.
प्रश्न चालवणार्यांच्या बेदरकार मनोवृत्तीचा आहे.
अनेक वर्षे SPTM चा स्टिकर लावून सिग्नल ला लाल दिव्यात आडमुठेपणाने पुढे उभे राहून मागच्यांचे शिव्याशाप खाल्ले आहेत. पूर्वी भांडण्याचे, नंबर लिहून घेऊन ट्रॅफिक पोलिसाकडे तक्रार करण्याचे असंख्य प्रयत्न केले. हिरव्या दिव्यात व्यवस्थित जात असताना स्वतःच्या लाल दिव्यात घूसून आडवे जाणार्यांच्या मागे दोन चौक जाऊन भांडून झाले आहे. पण मुळातला उद्दाम पणा कसा जाणार?
बर्याच वर्षांपूर्वी अत्यंत वेगात आणि धोकादायक पद्धतीने जाणार्या एका सुमोचा नंबर लिहून घेतला तर तो पोरगेलासा ड्रायव्हर म्हणाला - "अमुक तमुक साहेबांची गाडी आहे. त्यांना घ्यायला चाललो आहे. सरकारी गाडीने एक दोन लोक मेले तरी चालतात. मला काही होत नाही. " - गाडी पुणे मनपा ची होती.
हे न संपणारे आहे.
बंगळुरातला अनुभव पुण्याला भारी पडेल असा आहे. अतिशय पॉश लोकवस्तीतले ड्रायव्हिंग स्कूल वाले दहा तासात आरसा पहायला शिकवतच नाहीत! सीट बेल्ट खराबच असतो त्यांचा, लावणार कुठे.
शेवटच्या तासाला आलेल्या भगिनी रिकाम्या रस्त्यावर गाडी रस्ता सोडून झाडे, खड्डे यांचा वेध घेत होत्या किंवा चक्क व्होल्व्होला आलिंगन देण्याचा प्रयत्न करत होत्या. दोन दिवसांनी याच कन्यका त्या ट्रेनरच्या कंट्रोल शिवाय रस्त्यावर आपली मोठी गाडी घेऊन येणार आणि रस्ते अशाच असंख्य लोकांच्या बेधडक गाड्यांनी भरलेले असतात या जाणिवेने अस्वस्थ झालो. धमु व इतरांनी लिहिल्याप्रमाणे इथे पादचारी ही पुण्यातल्या दुकानातल्या गिर्हाइ़कापेक्षाही क्षूद्र वस्तु आहे. मुळात काही सोयच नाही. तीन तीन लेनचे रस्ते ओलांडायला एकही पूल, सिग्नल, भुयारी मार्ग नाहीत. रिंग रोड तर अशक्य. दोन चौक सुद्धा बसने जाऊन परत यावे अशी परिस्थिती. घराजवळ एक रेल्वे चा पूल आहे. तिथून पुला पलिकडे चालत जाण्यासाठी सोयच नाही!! म्हणजे एक माणुस जाईल या आकाराच्या अति उंच (२- ३ फूट)कट्टा वजा फूटपाथ वगळता काही रस्ताच नाही चालत जायला!
हैद्राबादला ज्या पद्धतीने सिग्नल आणी पोलिसाला लोक मान देतात ते पाहून पुण्यातले लोक अति सौजन्यशील वाटतात. तो बिचारा घाबरून कोपर्यात उभा असतो आणि सिग्नल हे उगाच शोभा वाढवायला लावलेले खांब वाटतात. वन वे वगैरे फालतू गोष्टींना इथे अजिबात महत्त्व दिले जात नाही. (सदाशिव पेठ उत्तर दक्षिण रस्ते वन वे आहेत असे अनेक वर्ष ऐकतो आहे. बघण्याचा योग आला नाही. :) )
लक्ष्मी नगर कडून पर्वती कडे जाणारा एक रस्ता वनवे केला आहे. काही वर्षांपूर्वी एका वकील बाईंनी उलटे येणार्या एका स्कॉर्पिओ किंवा तत्सम गाडिला अडवले तर त्यात असलेले नगरसेवक महाशय रागावले आणि ती गाडी तशीच रस्त्यात उलट बाजूला तोंड करून बंद करून निघून गेले. त्या वकील बाईंनी तिथुन चालत दोन पाच मिनिटे असलेल्या चौकीतून फौजदाराला बोलावले तर तो ती गाडी ओळखून तक्रार सुद्धा नोंदवत नव्हता. आणि हे सर्व सकाळ मध्ये छापून आले!
पूर्ण सिस्टीम आणि मनोवृत्ती बदलल्या शिवाय यात काहीही बदल होणे शक्य नाही. उलट वाढत चाललेल्या गुंठामंत्र्यांच्या गाड्या आणि नवश्रीमंतांच्या लहान कार्स ज्या ते स्कूटी सारख्या चालवतात त्यामुळे यात भरच पडते आहे.
अपघातात गेलेल्या माणसाच्या नातेवाईकांना किती त्रास होतो पोलिसांकडून हे प्रत्यक्ष पाहिले आहे. जिथे माणूस गेला त्याची पण सहानुभूती नाही तिथे नियमांच कौतुक कोणाला!
22 Jul 2010 - 1:47 pm | डोमकावळा
ही आकडेवारी चिंताजनक आहे.
आलेख पहाता दरवर्षी ती वाढतेच आहे हे नक्कीच.
खाजगी वाहतूकीचा वापर वाढल्यामुळे, काही लोकांच्या बेजवाबदार वागण्यामूळे अपघाताच्या शक्यता वाढत आहेत.
मात्र हे फक्त भारतातच आहे असे नाही.. जास्त असेल कदाचीत..
उदाहरणाकरता जपान सारख्या प्रगत देशाची अशीच आकडेवारी पहा.
मूळ स्त्रोत
फरक इतकाच आहे की यात मृतांची संख्या कमी आहे.
पण जपान व भारत यांच्यात लोकसंख्या, वाहने वगैरे ची तुलना करता जपान मध्येही अपघातांचे प्रमाण बरेच दिसते.
हेही मात्र तितकच खरं की आपण सावधपणे वाहन चालवलं तरी समोरच्याच्या बेजवाबदार पणा मुळे होणारा अपघात आपण टाळू शकत नाही.
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
22 Jul 2010 - 1:51 pm | भाऊ पाटील
गाडी चालवतांना मोबाईल वर बोलणे हा अजुन एक भयावह प्रकार.
१५ दिवसांपूर्वी हिंजवडी रस्त्यावर एका चारचाकी वाहनाने पार्किंग केलेल्या ४-५ मोटारसायकली धडकेने उडवल्या. तो चारचा़की चालक मोबाईल वर बोलत होता. नशीब की कोणीही पादचारी त्यावेळेस तिथे नव्हता. धडक दिल्यावर तो भानावर आला आणि सुसाट वेगाने निघुन गेला.
त्या वाहनाचा नं पुढ्च्या चौकातल्या पोलिसाला सांगितला तर तो म्हणतो की 'कोणी मेले तर नाहीना, मग कशाला आमचा टायम घालवताय्....आम्हाला लई काम असतात.'
22 Jul 2010 - 2:01 pm | अमित.कुलकर्णी
वाहन चालवायचा परवाना देताना चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्याने कसे अपघात होऊ शकतात याचे व्हीडिओ दाखवायचे - आणि काही भयंकर अपघातांचे फोटोही दाखवावेत. (एखाद्याचा मनावर इतका परिणाम होऊ शकतो, की तो भारतात गाडी चालवण्याचा विचारच सोडून देईल :D )
अवांतर - मला "लायसन" फक्त एक "राऊन" मारून मिळाले होते. उन्हात साहेब थम्स अप पीत बसले होते - थोडे वैतागलेले दिसत होते. आमच्या एजंटने तिथे घोषणा केली, "साहेबांना त्रास होईल असे काही करू नका, सगळ्यांना लायसन मिळणार आहे".
अतिअवांतर - हेल्मेटला विरोध पक्षीय राजकारणातूनही झाला होता.
-अमित
22 Jul 2010 - 3:04 pm | स्वछंदी-पाखरु
माझ्या स्वानुभवानुसार भारतात वाहतुक कायदा नावाची वस्तु प्रत्यक्षात अस्तिवातच नाहिये. तिच्या धन्यांनीच तीला धाब्यावर बसवले आहे मग तुमच्या आमच्या
मधे तीच्या बद्दल काय आणि कसला आदर आसणार???? शेवटी मग तो अपघात घडवणारा चालक असो व मालक,मग अपघात होऊ नये ही आपल्या सर्वांचीच जवाबदारी आहे.
अगदी लाचखोर कायद्याचे रक्षण/भक्षण करणार्यांपासुन ते मद्यपी वाहन चालकांपर्यन्त.ह्या सर्व साखळी मधे आपण पण आहोत ह्या गोष्टीचे भान ठेवून ही साखळी व ह्यातील सर्व घटक हे स्वछ आणि बेडाग ठेवण्याचा प्रयास आपण केलाच पाहीजे. मी स्वतः एक अभियांत्रीक असून मला माझ्या जवळ बाळगत असलेल्या अद्यावत यंत्रणेचा (भ्रमण दूरध्वनीतील व्हीडीयो रेकॅअर्डींग व अॅडीयो रेकॅअर्डींग चा ) पुरेपुर फायदा करुन लाचखोर महाभागांना वठणीवर आणण्याचे कार्य अधुन मधुन करत असतो. आजकाल प्रसार माध्यमे तर अश्या खमंग (त्यांच्या द्रुष्टी कोनातुन) बातम्यासाठी तर सदैव तत्पर आणी मदतगार पण ठरतात.
अर्थात माझी ह्या आपल्या कायदा व्यवस्थेशी काहीही वैर, दुष्मनी अथवा
आ़क्षेप नसून ति फक्त आपल्या समाजाचेच एक अंग असुन तीची प्रतीमा ही नेहमी स्वछ रहावी अशी मनोकामना आहे म्हणुनच त्यातील घाण मी अधुन मधुन काढत असतो.
आज भोचक आपल्यात नाही राहीले (तसा माझा व त्यांचा परीचय झाला नाही) त्यांना सर्व मिपाकरांनी श्रधांजली अर्पण करण्यासाठी ह्या दुव्याद्वारे मला तमाम मि.पा. करांना नम्र विनंती करतो की अपघातग्रस्तांना मदत करा व जमले तर संभाव्य अपघात घडु देउ नका.
एक मेका सहाय्य करु.........
अवघे धरु सुपंथ...........
मला कोणाच्याही मानसीक भावना दुखवायच्या नाहीत. दुव्यातील मजकूर वाचुन दगडफेक, दंगल अथवा जाळपोळ करू नये.....
22 Jul 2010 - 4:10 pm | स्वाती२
वाचत आहे.
22 Jul 2010 - 7:32 pm | विकास
या चर्चेत सहभागी झालेल्यांचे तसेच वाचकांचे आभार. मला कल्पना आहे की कुठल्याही समाजात कुठलाही (चांगला) बदल करण्यासाठी एक चळवळ पुरेशी नाही की एक कायदा... तर एका चर्चेने काय होणार!
पंढरीच्या वारीला जाणारा वारकरी ग्यानबा-तुकाराम म्हणत एक पाउल पुढे एक पाउल मागे असे वरकरणी दिसणारे चालत/नाचत असतो. मात्र एकादशीस तो विठ्ठलाच्या दर्शनास पोचलेला असतोच... तसेच काहीसे लोकशिक्षणाचे असते. एक पाऊल पुढे एक पाऊल मागे होतच असते. नेमके आपण ते मागे बघणारे पाऊल बघतो आणि वाटते, "हम नही सुधरेंगे"! मी आशावादी आहे, सुधारणा नक्की होतील याची खात्री आहे. फक्त सुधारणांची किंमत कमितकमी मोजावी लागावी इतकीच काय ती इच्छा... म्हणून सारखा लोकशिक्षणाचा जप करतो. थोडक्यात, त्या निमित्ताने जरी चार लोकांनी वाचले आणि त्यात आलेला सारांश आचरणात आणला/इतरांपुढे चर्चिला तरी या चर्चेचे इप्सित साध्य झाले. एक प्राण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाचला तर त्यातून एक कुटूंबपण वाचते
आता काही प्रतिसादांना थोडक्यात प्रतिसादः
अमोद शिंद्यांनी सुचवले तसे मी इतर देशांशी त्यातही अमेरिकेशी तुलना केली नाही कारण या संदर्भात कोणीच शहाणे नाही असे वाटते. फक्त प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. आपल्यापुरते बोलायचे तर शिस्तीची मानसिकता आणि दुसर्या मानवी जीवाचे मुल्य समजणे महत्वाचे वाटते. ते ज्या दिवशी येईल त्या दिवशी सुधारणांची सुरवात खर्या अर्थाने होईल.
ज्ञानेश यांनी दिलेली टक्केवारी पण अस्वस्थ करणारी आहे.
सुनील पाटकर म्हणतात तसे विविध सरकारी खात्यांकडून जनजागृतीचे प्रयत्न होत असतात. पण तेच तेच आणि तेही सरकारकडून ऐकून जनतेचे कान बधीर झालेले आहेत. हे प्रयत्न लोकांकडून एकमेकांसाठी होणे महत्वाचे आहे.
याच संदर्भात बहुगुणींनी सांगितलेली आणि संजोप रावांनी अनुभवलेल्या एसपिटीएम सारख्या संघटनांचे काम या संदर्भात मोलाचे ठरणार आहे. मला कल्पना आहे की तुम्हाला तसेच स्वच्छंदी पाखरूंनी सांगितलेल्या अनुभवाप्रमाणे, लोकं थट्टा करतात, कुत्सित बोलतात. अशांकडे दुर्लक्ष करतच काम करावे लागते. असे कुठलेही समाजकार्य नसते ज्यात तसे करणार्या कुणालाही त्रागा होत (फ्रस्ट्रेशन येत) नाही. मात्र एका गोष्टीचा विचार करणे महत्वाचे वाटते, तो म्हणजे - संवाद कसा होत आहे आणि माध्यमे काय तसेच संवादासाठीचे लक्ष (वयोगट) काय. या गोष्टी शक्यतितक्या तरूण पिढीपर्यंत जाणे महत्वाचे आहे. त्यासाठी माध्यमे देखील तशीच हवीत. एसपिटीएमचे संकेतस्थळ जसे आहे तसेच ते फेसबूक, ट्वीटर, ऑर्कूट आदीचा वापरपण करतात का? कुठला तरी प्रायोजक वगैरे गाठून सणावाराच्या वेळेस (गणपती, दिवाळी, नववर्ष वगैरे) मार्केटींग एसएमएस पाठवता येईल का? वगैरेचा विचार केला नसल्यास करता येईल... शाळेतील मुलांना शिकवणे आणि घरी सांगायला सांगणे... मोठमोठ्या कंपन्यांमधे सेफ्टी फर्स्ट वगैरेच्या पाट्या लावून अमूक दिवस अपघाताविना, असे लिहीलेले असते. जिथे जास्त अपघात होतात अशा ठिकाणी अशा पाट्या लावता येतील अथवा तुमच्या संकेतस्थळावर... असेच बरेच काही असू शकते.
संजोपरावांनी म्हणल्याप्रमाणेच पोलीसांच्या भितीने, मदत न करण्यामुळे एका जवळच्या माहीतीतील व्यक्तीला प्राणाला मुकावे लागलेले पाहीलेले आहे. म्हणून जास्तच वाटते...
बाकी परवाना देण्याची पद्धत वगैरे माहीत आहे, ते बदलणे म्हणजे राजकारण आहे. लोकं जर जागृक होऊ लागली तर त्यांना पण झक मारत बदलावे लागेल.
राजेश म्हणतात तसे मला काही हे शुन्यापर्यंत येईल असे म्हणायचे नाही, तशी आंधळी अपेक्षा देखील नाही. पण जेंव्हा संख्या मोठी असते, तेंव्हा ते शब्दशः "अपघात" नसतात तर नेहमीचाच एक प्रसंग (रुटीन) असतो, काल एकावर तर आज, अजून कुणावर, इतकेच काय ते.
भाऊ पाटलांनी म्हणल्याप्रमाणे मोबाईल्स पण घातक आहेत. येथे झालेल्या एका संशोधनाप्रमाणे ब्लू टूथ / हँड्सफ्री वगैरे वापरत गाडी चालवणे पण तितकेच धोकादायक आहे असे लक्षात आले आहे.
विसूनाना म्हणतात की सरळ मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवावी... यावर गंभीर चर्चा (मृत्यूदंडाऐवजी कुठली कडक शिक्षा) करण्याऐवजी, हा प्रतिसाद थोड्या हलक्यापद्धतीने (लाईटर मूडमधे) संपवतो. शिस्त पाळत नाहीत म्हणून लोकांना खरेच घाबरवायचे आहे का? मग खालील चित्रात जसे त्या ठिकाणि स्वच्छता ठेवायला अंधश्रद्धेचा उपयोग केला आहे तसा करा! ;)
From Public Education
10 Feb 2016 - 10:57 pm | मम्बाजी सर्वज्ञ
हि नोटीस वाचून बर्याच बायका मुद्दाम कचरा टाकायला येतील कदाचित.
आणि हे नवर्यांना पण आपलीकेबल आहे (चित्रातला शाप नाव्र्यान्बद्दल लिहिलेला असेल तर).
22 Jul 2010 - 8:29 pm | प्रकाश घाटपांडे
आपण सर्व ही चर्चा करणारे किती लोक वाहतुकीचे नियम पाळतो? वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणारेच किती तरी सापडतील आपल्यातच. मान तिरकी करुन खांदा व कान यात मोबाईल पकडुन दुचाकी चालवणारे पुण्यात दिसतात. मोबाईलवर बोलता बोलता भान न राहिल्याने धोकादायक पद्धतीने गाडी चालवत जातात. रस्त्याच्या कडेला येउन थांबुन बोलावे अथवा त्यावेळी फोन न घेता नंतर फोन आपण करावा. या साध्या गोष्टी करत नाहीत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
22 Jul 2010 - 9:13 pm | शैलेन्द्र
वरील धाग्यात मुख्यता: शहरातील रहदारीची चर्चा केली गेली आहे, पण शहरातील अपघात तुलनेने सौम्य असतात. खर भयानक प्रकार दिसतो तो महामार्गावर..
या अपघातांची काही सामायिक कारणे आहेत,
सगळ्यात महत्वाचे म्हणजे लेनची शिस्त नसणे.
इंडीकेतर लाईट चालू नसणे.
सतत अप्पर लाईट लावून गाडी चालवणे.
अतिशय बेशिस्त दुचाकी स्वार व स्थानिक वाहतूक करणारे जीप / TamTam
चुकीच्या पद्धातीने ओव्हरटेक करणे.
वाहनाच्या व स्वताच्या मर्यादांची जाणीव नसणे
22 Jul 2010 - 9:44 pm | यशोधरा
धागा वाचत आहे..
23 Jul 2010 - 2:55 pm | सहज
चांगली चर्चा
11 Nov 2014 - 3:06 pm | कपिलमुनी
पुण्यामध्ये २ दिवसात १४,००० दुचाकीस्वारांवर हेल्मेट घातले नाही म्हणून कारवाई !
बघू काही फरक पडतो का
10 Feb 2016 - 6:31 pm | आशु जोग
जालावर रस्ते अपघात शोधत असताना इथे पोचलो. महत्त्वाचा विषय आहे. मी स्वतःच एक चर्चा सुरु करणार होतो पण आता गरज नाही.