पुनर्जन्म आणि कर्मविपाक
श्री. रमताराम यांनी लिहलेला लेख मनोरंजक होता. नावच "रमताराम" असल्याने त्यांनी "फिरस्त्या"सारखी "धर्म. समाज, जीवनमान, मौजमजा,.. विरंगुळा " इत्यादि विभागातून आपला लेख फिरवला. मजा आली. पण एक राहिलेच. "माहिती". पुनर्जन्म (व विशेषत: कर्मविपाक ) या विषयी पूर्वासूरींनी काय विचार मांडले आहेत याची माहिती सर्वांना असतेच असे नाही. मग "एक चांगले कृत्य दुसर्या वाईट कृत्याच्या परिणामाला नाहिसे करते का ? " असे प्रश्न मनात उद्भवतात.( मागे या संबंधी लेख आला होता का हे मला माहीत नाही. असल्यास कृपया त्याचा संदर्भ द्यावा.) ही "माहिती" आहे, माझे मत नाही. सगळ्यांना हा विचार पटलाच पाहिजे असे नाही. तसेच सर्व प्रश्नांना उत्तरे मिळतीलच असेही नाही. पण प्रत्येकाला हे प्रश्न पडतातच व पूर्वीच्या विचारवंतांनी , (याचा दुसरा अर्थ धार्मिक विचारवंतांनी) काय मते मांडली ते आता पाहू.
पुनर्जन्म हिन्दू, बौद्ध व जैनांनी स्विकारला आहे. मुसलमान व ख्रिश्चन धर्मांनी नाही. पहिल्या तिघांच्या विचारात थोडेथोडे फरक आहेत. आपण फक्त हिन्दू विचारसरणी बघू. प्रत्येक जण बघत असतो की या जगात काही जण सुखसंपदेत जगतात तर काही जण दु;खविपदेत. सज्जन कष्ट भोगतात तर दुष्ट मजा करतात. हे असे का ? याचे उत्तर सापडत नाही. कोणताही "तर्क" याचे पटणारे उत्तर सांगू शकेल असे नाही. पण प्रयत्न अनेकांनी केला. जेंव्हा या जन्मातील बरीवाईट कृत्ये व या जन्मातील भोगावी लागणारी सुखदु:खे यांचा सुसंगत मेळ जमवता येईना तेंव्हा असे मत मांडले गेले कीं मागे या माणसाचा जन्म होता व त्यावेळी त्याने केलेल्या चांगल्या कृत्यांची चांगली फळे त्याला आज मिळत आहेत मग भले तो आज वाईट वागेना का ! आज सज्जन असणार्या माणसाने मागील जन्मी पाप केले असेल तर त्याला त्याचे फळ आज भोगलेच पाहिजे. मागचा जन्म म्हटले कीं पुनर्जन्म आला व कर्माची फळे चुकत नाहीत हा कर्मविपाक सिद्धांत आला.
ऋग्वेदात पुनर्जन्माचा विचार आला आहे. . ऋ.१०.१६.३ व रु.१.१६४.३१-३२ इथे या कल्पनेचा उगम आहे व नंतर कठोपनिषद, बृहदारण्यक, छांदोग्य व कौषितकी या उपनिषदांमध्ये त्याचा विस्तार झाला. कर्मविपाकाचा विचार याचवेळी वाढला. पुनर्जन्म व श्राद्धकल्पनेत विसंगती आहे कारण मृत पूर्वजांचे आत्मे पुनर्जन्म घेतल्यानंतरही १०० वर्षांनी पिंड ग्रहण कसे करू शकतील ? गीतेत मनुष्य जीर्ण वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो तसे आत्मा जीर्ण शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो असे म्हटले आहे. पुत्र-प्रपौत्र होऊन वंशसातत्य रहात असल्याने पुत्राच्या रुपाने वडील पुनर्जन्म घेतात असेही म्हटले आहे.हल्ली आजोबा नातवाच्या रुपाने परत येतात असेही समजले जाते.
पुनर्जन्म ही कल्पना स्विकारावयाची असेल तर "आत्मा " ही कल्पना प्रथम स्विकारावीच लागते.कारण नाशवंत शरीर दुसरे रूप धारण करू शकणार नाही. पण आत्म्याला अविनाशत्व दिलेले असल्याने तो कुठल्याही शरीरात स्थलकालाबाधित प्रवेश करू शकतो. म्हणजे माणसाचा आत्मा कुत्र्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो व तो कुत्रा मेल्यावर परत माणूसही होऊ शकतो. एक गंम त म्हणजे फक्त मानवच आपली प्रगती करून घेऊन "मोक्ष " मिळवू शकतो, या चक्राच्या बंधनातून सुटका करून घेऊ शकतो.
पण पुन्हा असा प्रश्न पडला कीं पुनर्जन्म तरी का व्हावा ? मागच्या कर्माची फळे मी भोगली, संपले ! इथे " कर्मविपाका " चा संबंध येतो. "विपाक " याचा अर्थ परिणाम, शेवट किंवा फळ. कर्मविपाक म्हणजे तुम्ही केलेल्या कृत्यांची, कर्मांची फळे. ही तुम्हाला भोगावीच लागतात. उदा. मी चोरी केली. मला पकडले व त्या बद्दल शिक्षा झाली. मला कर्माचे फळ मिळाले; संपले. पण मी या ज्न्मात सापडलो नाही, मेलो. तरी ते फळ चुकत नाही. मला पुढील जन्मात त्याचे फळ भोगावे लागते. त्यातून सुटका नाही. प्रत्यक्ष परमेश्वरही त्यात ढवळाढवळ करत नाही.याचा अर्थ तुमचा पुनर्जन्म होतो कारण हिशोब चुकता केल्याशिवाय तुमची सुटका नाही. चांगल्या कर्माची शुभ फळे व वाईट कर्माची अशुभ. कर्माच्या जातीप्रमाणे (Gradation) फळाची जात. हा झाला सिद्धांत. पण या मध्ये बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात. म्हणून काही जास्त कलमे-उपकलमे जोडली आहेत. ती बघू.
काही कर्मे मागील ज्न्मांतील असतात. त्यांची फळे अजून भोगावयास सुरवात करावयाची असते.त्या पैकी काहींची सुरवात सुरू झालेली असते. काही चालू जन्मातील असतात.यांना निरनिराळी नावे दिली आहेत. यातील काही स्पष्ट अर्थ माहीत नसला तरी गोळाबेरिज अर्थ व्यवहारात नेहमी वापरले जातात.
(१) संचित : कोण्याही मनुष्याने सांप्रतच्या क्षणापर्यंत केलेले कर्म म्हणजे संचित. ते मागच्या जन्मातील व या जन्मातील केलेया कर्मांची बेरीज.
याला अदृष्ट किंवा अपूर्व असेही म्हणतात. अदृष्ट म्हणावयाचे कारण करतेवेळी कर्म दृश्य असते पण नंतर ते केवळ परिणाम रूपाने शिल्लक राहते.
(२) प्रारब्ध : संचित कर्मांची फळे एकदम भोगता येत नाहीत. ती परस्पर विरोधीही असतात. बरीवाईट फळे एकाचवेळी कशी भोगणार ? जी कर्मे फलोन्मुख झालेली असतात म्हणजे ज्यांची फळे मिळावयास सुरवात झालेली असते त्यांना प्रारब्ध म्हणतात.
(३) क्रियमाण : प्रारब्ध भोगत असतांना तुम्ही या जन्मीही कर्मे करत असताच. अशा कर्मांना क्रियमाण वा वर्तमान कर्मे म्हणतात. वर सांगितल्याप्रमाणे या कर्माचे फळ तात्काळ मिळाले तर भो्ग तेथेच संपतो. पण तसे झाले नाही तर पुढी्ल जन्माकरिता तो तुमच्या खात्यात जमा होतो.
असा हा चक्रव्युह आहे. मागील जन्मांची फळे आज भोगा व या जन्माची फळे भोगावयास पुढचा जन्म घ्या. यातून सुटका कधीच नाही कां ? नसेल तर सगळेच निरर्थक ठरेल. आहे. सुटकेचा मार्ग आहे. कर्म करूच नका. फळ नाही, पुनर्जन्म नाही. अर्जुनाने हाच मुद्दा मांडला. भगवान म्हणाले " मुर्ख आहेस. कर्मे चुकत नाहीत. जगतो आहेस तोवर कर्मे करावीच लागतात." हा ही मार्ग खुंटल्यावर भगवान दिलासा देतात. तेच गीतेचे मर्म म्हणावयास हरकत नाही. फळे कर्म केले म्हणून मिळत नाहीत. त्या कर्मामागे तुमची जी वासना आहे, कामना आहे त्यामुळे फळे मिळतात. कामना नसेल तर कर्म करूनही फळ मिळणार नाही. तेव्हा भगवंतांचे सांगणे असे की निष्काम बुद्धीने, फळे मला अर्पण करून युद्ध कर, या कर्माची बरीवाईट फळे तुला भोगावी लागणार नाहीत.
परमेश्वराने एकदा ही सृष्टी निर्माण केली व त्याचे नियम लागू केले की मग तो यात ढवळाढवळ करत नाही.विस्तवाने हात भाजतो हा नियम.
मग तो सर्वांना सर्वकाळ लागू होतो.( दुर्जनांना तसेच सज्जनांनाही) तसेच एकदा तुम्हाला बुद्धीस्वातंत्र्य दिले की ते कसे वापरावे ही तुमची जबाबदारी. तुम्ही ती चुकीच्या मार्गाने वापरली व त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागले तर मग ईश्वराला दोष देणे बरोबर नाही. कर्माचे फळ नेमून दिले की मग तो उदासिन राहतो.त्याला विषमता व निर्दयता हे दोष लागत नाहीत.(वे.सू.२.१.३४. "पेरलेलेच उगवते व पेराल तेच उगवेल " हा सृष्टीनियम असल्याने तुम्ही आपल्या विपदांबद्दल ईश्वराला जबाबदार धरू शकत नाही.
तुमची फळे तुम्हालाच भोगावयाची असतात. ती दुसर्याला देता येत नाहीत व दुसयाला ती घेता येत नाहीत. एका दुष्कृत्याचे फळ दुसर्या सत्कृत्याने नाहीसे होत नाही. सत्कृत्याचे फळ मिळेल पण दुष्कृत्याचे भोगावेच लागेल. कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य यांचा संबंध असा की या स्वातंत्र्याने आज फक्त सत्कृत्ये करा व पुढील जन्म सुखात घालवा ; त्याच वेळी ( मागील दुष्कृत्यांची ) प्रारब्धाची फळे भोगतांना विवेकाने ती सुसह्य होतात याकडे लक्ष द्या.
तुम्ही एखाद्याला मदत केली व त्याची दु :खे कमी केलीत म्हणजे काय झाले ? त्याच्या प्रारब्धातील सत्कृत्यामुळे तुम्हाला तशी बुद्धी झाली व त्याची दु:खे कमी झाली व त्याच वेळी तुमच्या यादीत सत्कृत्याची भर पडली. बायकोने " हा पती मला सात जन्म मिळावा " असे व्रत केल्याने नवर्याच्या नशिबात ढीम काही फरक पडत नाही.
एक मोठा विषय थोडक्यात लिहावयाचा असल्याने बर्याच गोष्टी राहिल्या आहेत. नाइलाज अहे.
शरद
प्रतिक्रिया
21 Sep 2011 - 5:36 pm | ऋषिकेश
माहिती म्हणून वाचली
शंका आहेच.
हे वाचले आहे तरीही दोन शंका विचारायचा मोह आवरत नाही.
शंका १:
१. कर्म केले व वासना ठेवली तर फळ मिळतेच
२अ. चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते
२ब. वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळते.
३. फळे कर्म केले म्हणून मिळत नाहीत. त्या कर्मामागे तुमची जी वासना आहे, कामना आहे त्यामुळे फळे मिळतात
४. चांगले कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा / वासना न धरता केले तर फळ मिळत नाही .. व शेवटी मुक्ती मिळते
मग वाईट कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा / वासना न धरता केले तरीहि फळ मिळायला नकोच म्हणजेच कोणत्याही फळाची अपेक्षा न करता वाईट कृत्ये केली तर मोक्ष नक्की! बरोबर का?
शंका २:
जर फळ हे कर्माशी निगडीत नसून इच्छेशी निगडीत आहे तर चांगल्या फळाची इच्छा धरून वाईट कृत्य केल्यास फळ असे असेल?
21 Sep 2011 - 7:41 pm | विकास
१. कर्म केले व वासना ठेवली तर फळ मिळतेच
फळ हे प्रत्येक कर्माने मिळतेच, फक्त काय मिळेल हे सांगता येत नाही. साध्या भाषेत, रस्त्याच्या एका बाजूस माणूस उभा आहे, दुसर्या बाजूस नेहमीची बस येताना दिसली, म्हणून (फळाच्या अपेक्षेने म्हणजे) बस मिळवण्यासाठी तो पळत जाऊ लागला तर त्या पळण्याचे फळ म्हणून (१) बस मिळू शकते, अथवा (२) बस तरी देखील चुकू शकते, अथवा (३) रस्ता क्रॉस करताना गडबडीत न बघितल्याने कुठल्या तरी वाहनाखाली येऊ शकतो, अथवा (४) अगदी क्रॉस करताना नीट बघून करत असला तरी येणार्या वाहनास न समजल्याने,ब्रेक न लागल्याने वगैरे काही, गाडी खाली येऊ शकतो, अथवा वगैरे वगैरे... पण फळ मिळणारच आहे. तेच कुठल्याही कर्माच्या बाबतीत लागू आहे.
२अ. चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते २ब. वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळते.
असे नेहमीच होत नाही. "योजीले ते ना घडे, ना योजीले ते का घडे?" असे पण अनुभव आदर्श कर्मे करणार्यास येतात. मग असे का व्हावे याला उत्तर जेंव्हा मिळत नाही, तेंव्हा काय? (एखाद्या चांगल्या चर्चेस चारच प्रतिसाद तर आयटम चर्चेस १००! ;) ) याचा विचार करत असताना बाकी काही उत्तर नाही, म्हणून मग पूर्वजांनी त्यांना पटणारे उत्तर शोधले - पुर्नजन्म आणि कर्मविपाक...
३. फळे कर्म केले म्हणून मिळत नाहीत. त्या कर्मामागे तुमची जी वासना आहे, कामना आहे त्यामुळे फळे मिळतात
वरती (मला वाटणारे) उत्तर दिले आहेच - कर्माला फळ चिकटलेले रहाणारच... सहज-प्राप्त ते कर्म न सोडावे सदोष हि । दोष सर्व चि कर्मांत राहे अग्नींत धूर तो ॥१८ - ४८ ॥
४. चांगले कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा / वासना न धरता केले तर फळ मिळत नाही .. व शेवटी मुक्ती मिळते
फळ मिळेलच पण त्याला वासना चिकटणार नाही.
कर्मात चि तुझा भाग तो फळात नसो कधी । नको कर्म-फळी हेतु अकर्मी वासना नको ॥ २-४७ ॥
याचाच अतिरेक होऊन वासना नको म्हणून कर्मच नको (अर्थात स्वत:च्या पोटापाण्याचा स्वार्थ सोडून) मग मुक्ती मिळेल, अशी भारतीय स्वार्थी आणि निद्रीस्त वृत्ती झाल्यानेच, त्यापासून जागे करण्यासाठी टिळकांनी कर्मयोगावर भर दिला.
मग वाईट कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा / वासना न धरता केले
उदाहरण देता येईल का? :-)
21 Sep 2011 - 6:18 pm | यकु
कर्मविपाक उर्फ प्र.का.टा.आ.
21 Sep 2011 - 6:15 pm | यकु
मग सध्याचा चालू असणारा जन्म मागच्या जन्मीचा कर्मविपाक साठून तयार झालेला मुरंबा आहे आणि या मुरंब्यातून पुन्हा पुढच्या जन्मी विपाक होणार आहे.. आणि मग पुन्हा मुरंबा.. एकूणच परमेश्वर त्याचा पाक, मुरंब्या लोणच्याचा कारखाना कधीच बंद पडू न देणारा चतुर कारखानदार आहे !
21 Sep 2011 - 10:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कृत्याच्या आणि कर्माच्या फळाबद्दल भगवतं नेमके काय बोलतात ते आपल्याला काही सांगता येणार नाही. कर्म, विकर्म आणि अकर्माबद्दल वाचावं लागेल (गुगलावं लागेल) पण, भगवंतानं म्हटलं आहे की ’तुझा कर्मावर अधिकार आहे, फळावर नाही’ कर्म करण्यात आत्मसुख आहे, तेव्हा आपण आत्मसुखाचा विचार करावा असे वाटते. पुनर्जन्म होईल आणि आपल्याला हिशोब चुकता करावा लागेल याचा विचार कशाला करायचा.
बाकी, शरदकाका मिपावर पुन्हा एकदा स्वागत आहे.
-दिलीप बिरुटे
22 Sep 2011 - 1:20 pm | विटेकर
मग सध्याचा चालू असणारा जन्म मागच्या जन्मीचा कर्मविपाक साठून तयार झालेला मुरंबा आहे आणि या मुरंब्यातून पुन्हा पुढच्या जन्मी विपाक होणार आहे.. आणि मग पुन्हा मुरंबा.. एकूणच परमेश्वर त्याचा पाक, मुरंब्या लोणच्याचा कारखाना कधीच बंद पडू न देणारा चतुर कारखानदार आहे !
महाराजा... असे नाही !
लोणचे/ पाक होण्यासाठी अन्गाला मीठ/ सा़खर ( कर्माची फळे ) लाउन घ्यायचे की नाही हा तुमचा पर्याय आहे. परमेश्वर त्यात काहीही ढवळाढवळ करत नाही.!
आणि ब्रह्माचा दिवस सम्पला की प्रलय होणारच !
कल्पांती निजवी भुते | मी माझ्या प्रकृतीमध्ये |
कल्पारंभी पुन्हा सारी | मी चि जागवितो स्वये || अध्याय ९ / ७ वी ||
( थान्कु विनोबाजी, तुम्ही गीताई लिहिलि म्हणून काही कळ्तयं तरी)
तेव्हा ही सारी सरुष्टी लय पावणारच आहे , तेव्हा शिल्लक असेल ते केवळ ब्रहम! ज्याचा आपण सर्व भाग असू.
21 Sep 2011 - 7:21 pm | विकास
आपल्या पुर्वजांनी कशा प्रकारे विचार केला आणि तो वाढवत नेला याचे थोडक्यात पण समर्पक वर्णन आवडले.
पुनर्जन्म मानावा का न मानावा हा एक भाग झाला, पण त्या अनुषंगाने केलेला कर्मविपाकाचा सिद्धांत हा "चुकीच्या कर्माची फळे पुढच्या जन्मात भोगायला लागू नयेत" म्हणूनच नाही तरी, याच जन्मात "मानवतेच्या कारणावरून" देखील योग्य वाटतो असे वाटते. पहील्या प्रकारात मुक्तीचा ध्यास असेल तर दुसर्या प्रकारात या जन्मातील सार्थकतेचाच ध्यास असू शकतो..
21 Sep 2011 - 10:48 pm | अर्धवटराव
शरदरावांचा आढावा अणि आपला प्रतिसाद, दोन्ही आवडले
अर्धवटराव
23 Sep 2011 - 5:06 am | राघव
असेच म्हणतो.
राघव
21 Sep 2011 - 7:47 pm | नगरीनिरंजन
यातच तर आलं सगळं. "देवानं सगळ्याना सारखंच दिलं. मग हे कसं झालं?" असे अडचणीचे प्रश्न कसे टाळणार? सोपं आहे. तुम्हाला काही मिळालं नाही? दोष तुमचाच आहे.
21 Sep 2011 - 8:51 pm | मन१
माझ्या सुमार आकलनशक्ती मुळे काहीही समज्ले नाही.
माझ्य्या शंका :- देव असलाच तर कम्युनिस्ट असेल का? देवाचा मुळात देवावर विश्वास असेल का?
देव नास्तिक असू शकेल का? देवाचा देव कुणी असेल का?
21 Sep 2011 - 9:00 pm | विकास
मला वाटते मूळ लेखात "देव" हा शब्द देखील आलेला नाही. :-)
21 Sep 2011 - 9:50 pm | मन१
म्हणुनच म्हणतोय, मला समजलेले नाही. काहीतरी अध्यात्माशी निगडित आहे एवढे समजले. अध्यात्मातल्या खूपच थोड्या प्रवाहात ईश्वरहीन चर्चा दिसलेली आहे.
21 Sep 2011 - 9:43 pm | राही
कम्यूनिस्ट म्हणतात, देव नाही.
देव म्हणतो...............कम्यूनिस्टच नाहीत!
(नीत्शे ला स्मरून)
22 Sep 2011 - 1:25 pm | विटेकर
जय जय रघुवीर समर्थ !
विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी।
परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥
हरू जाळितो लोक संहारकाळी।
परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥
( मनाचे श्लोक )
ऊत्तर -
तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले।
तया देवरायासि कोणी न बोले॥
जगीं थोरला देव तो चोरलासे।
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे॥१७९॥
22 Sep 2011 - 6:58 pm | शुचि
>> परी शेवटी शंकरा कोण जाळी >>
शंकरास कोण जाळणार?
विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम|
वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा
महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६||
महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो. इंद्र त्याच्या समस्त देवगणांसमवेत या संहार समयी डोळे मीटतो. परंतु हे सती अशा महासंहार काळी तुझा केवळ तुझा पती (सदाशिव) विहार करतो, क्रीडा करतो.
कवीने पार्वतीच्या सौभाग्याची स्तुती वरील कडव्यात गायली आहे.
21 Sep 2011 - 10:26 pm | नेत्रेश
सुंदर विवेचन
22 Sep 2011 - 12:46 am | सुहास..
पुनर्जन्म हिन्दू,बौद्ध व जैनांनी स्विकारला आहे. मुसलमान व ख्रिश्चन धर्मांनी नाही >>>
धाग्यातील वरील वाक्याला बोल्ड करुन तीव्र आक्षेप नोंदवितो आहे, कृपया काही माहीती असल्यास नोंदवावी !!
बाकी आता वेळ नाही रे माझ्याकडे , आपण वाक्य तसेच ठेवुन बघावे , बाकीची काळजी मी घेईनच
धन्यवाद
नाव सांगायची गरज नाही .
अवांतर : धर्म-जात या विषयी लिहायची बंदी होती म्हणे या साईटवर , मग सरळ सांगायचे न की ब्राम्हणी चालेल म्हणुन , उगा ताकाला जातान भांडे तरी लपवायचे नव्हते ब्वा !!
22 Sep 2011 - 9:58 am | अत्रुप्त आत्मा
@--- चांगल्या कर्माची शुभ फळे व वाईट कर्माची अशुभ. कर्माच्या जातीप्रमाणे (Gradation) फळाची जात. हा झाला सिद्धांत.----
हिन्दू विचारसरणी प्रमाणे- चांगली कर्म कोणती?तसेच वाइट कर्म कोणती?
धर्मनिरपेक्ष मानवतावादी नैतिकते नुसार चोरी,खून,बलात्कार,दरोडा अश्या प्रकारची कर्मे दु:ष्कर्म सदरात मोडतात...
तर,अनाथांची सेवा,रुग्णांची निस्वार्थी पणे केलेली सेवा,सामाजीक दःषप्रव्रुत्तीं विरुद्ध लढा, मानवता विरोधी-जुलमी राजवटी विरोधात सशस्त्र बंड, अशी अनेक कर्मे सतकर्मात मोडतात....जगातला कुठलाच धर्म या मुल्यांच्या हिशोबात बसत नाही.म्हणुनच वरती हिंदू विचारसरणी प्रमाणे मत काय?...हे मागीतलय....ते क्रुपया सांगावे...
22 Sep 2011 - 10:29 am | गवि
उपप्रश्न १. हेतुपुरस्सर केलेले वाईट कर्म आणि नकळत घडलेले वाईट कर्म यात काही फरक आहे का? (हिशेबाच्या दृष्टीने). काही पुराणकथांच्या दाखल्यात मागील जन्मी चुकून लागलेल्या आगीत कोणातरी पक्ष्याचे घरटे जळले किंवा चुकीने मुंगी चिरडली गेली म्हणून यंदा यातना भोगणे नशिबी आले असे उल्लेख दिसतात.
उपप्रश्न २. दुष्कृत्य हे बॅलन्स करता येते का? म्हणजे एकाचा खून करुन त्याबदल्यात एका कॅन्सरग्रस्त मुलाच्या उपचाराचा खर्च उचलून त्याला जीवदान देणे, अशाने मूळ खुनाचा गोल साध्य झाला आणि हिशेब चुकता झाला अशी अनिष्ट प्रथा येऊ शकते का? (अनिष्ट आहे का? हा वेगळा मुद्दा) काही प्रमाणात अशी प्रथा सगळीकडे दिसते. उदा. काळा धंदा करुन मग साईबाबा किंवा सिद्धिविनायकाला सोन्याचा मुगुट चढवणे. इ. इ.
22 Sep 2011 - 10:46 am | नितिन थत्ते
उपप्रश्न २ चे उत्तर:
ही सोय असते असे वाटते. पुण्य समजले जाणारे कृत्य केल्याने पापांचे काही प्रमाणात क्षालन होते. तसे पापांचे क्षालन नुसते गंगास्नान केल्यानेही होते असे म्हणतात.
सध्याच्या अर्थव्यवस्थेतही असे पापक्षालन करण्याची सोय अधिकृतपणे निर्माण केली जात आहे. त्यानुसार या दुष्क्रूत्यांचे ट्रेडिंग करण्याचे प्रपोझल मी एकदा मांडले होते.
22 Sep 2011 - 10:54 am | गवि
धन्यवाद.
गंगास्नान वगैरे म्हटलं तर अतार्किक पुण्यकर्म आहे. काहीही आणि कुठेही झालं तरी कैलास जीवन लावा असा प्रकार असतो. मग खून असो, चोरी असो, बलात्कार असो.. गंगास्नान हा अक्सीर उतारा..
तसली पुण्यं बाजूला ठेवून मी म्हणतोय की तर्कनिष्ठ, एकास एक, आय फॉर आय न्यायाने तसेच पण विरुद्ध कर्म करुन ते कॅन्सल करण्याची सवय तर्कनिष्ठ पण पापभीरु मनुष्याला लागू शकते.
नुसतेच तर्ककर्कश आणि विज्ञाननिष्ठ असणार्यांचा इथे प्रश्नच नाही.
22 Sep 2011 - 11:30 am | सामान्य वाचक
असे होत नाही.
+२ ची फळे ही भोगावी लागतात आणी -२ ची फळे ही भोगावी लागतात.
म्हणून पुण्य मिळवण्यासाठी कमे केली , तर त्या फळांसाठी परत जन्म घेणे अले.
माझ्या वाचनानुसार, बौध्द धर्मामधीत सम्जुतीनुसार २-२+० असे असावे.
22 Sep 2011 - 11:00 am | प्यारे१
गविंच्या प्रश्नाला उत्तरः
उपौत्तर १: मी चुकून सिग्नल तोडला अथवा जाणूनबुजून सिग्नल तोडला,
किंवा मी चुकून नो एन्ट्री मध्ये घुसलो अथवा जाणूनबुजून नो एन्ट्री मध्ये घुसलो,
मी सौदी मधे चुकून, जाणून बुजून दारु प्यायलो, अनैतिक गोष्टी केल्या तर दंड मिळणारच आहे. कमी अधिक प्रमाणात तो गुन्ह्याच्या तीव्रतेच्या अनुषंगाने असेल. काहीसे तसेच असते.
उपौत्तर २: आंब्याची कोय चोखून चुकून टाकून दिली तरी आंब्याचंच झाड येणार आणि गोड फळं देणार आणि चुकून गांजा लावला तर गांजाच. याचं अकाऊंट त्याच्याशी सेटल करता येत नाही. लोकांना काळे धंदे करुन येणारी अपराधीपणाची भावना साईबाबांशी देव घेव करुन कमी करण्याचा प्रयत्न 'लोक करतात'. असे करता येणे शक्य नाही.
22 Sep 2011 - 11:20 am | Nile
सिग्नल तोडून पोलिसाला सांगून पहा बरं मी चुकून तोडला म्हणून. अनाकलनीय दैवी संबंधांचे रोजच्या जीवनातील गोष्टींशी संबंध लावायचे आणि पुन्हा हे दैवी आहे म्हणायचं आणि तरीही त्याचे मानवी-तार्किक अर्थ लावायचे हे सगळं विनोदी आहे आणि चाईल्डिशही आहे. असं खोटं बोलून स्वतःची तरी समजूत तरी लोक कशी घालतात तो त्यांचा देवच जाणे.
22 Sep 2011 - 11:40 am | प्यारे१
नायल्या राजा,
मला काय म्हणायचे आहे ते तुला कळत नसेल तर का तोंड घालतो मध्ये?
सिग्नल चुकून तोडला अथवा जाणूनबुजून तोडला तर होणारा परिणाम वेगळा असणार आहे का? तू राहतोस तिथे सिग्नलवर पोलिस उभा असतो का? कॅमेरे लावलेले असतात तेव्हा काय करता येऊ शकते हे सांगू शकतो का तू? पावती फाडली जाते ना?
पोलिसाचा काय संबंध आला इथे?
आणि समजा सिग्नल चुकून अथवा जाणून्बुजून कसाही तोडला गेला (शब्दशः नाही, तुला सांगावे लागते बाबा सगळे.) आणि लगेच पुढे अपघात झाला तर काय म्हणशील? तसे किस्से आहेत ना?
बाकी माझी स्वाक्षरी मुद्दाम बदलून घेतलेली आहेच... अधिक बोलत नाही.
22 Sep 2011 - 11:48 am | Nile
मी कुठे तोंड घालायचे ह्याचे कुठे नियम लिहलेले आहेत का? असेल तर सांगा म्हणजे जिथे घालायचे नाही असे लिहलेय तिथे न चुकता घालीन.
वरच्या प्रतिसादातील या वाक्यानुसार उत्तर दिले होते.
पाँईट काय आहे? चुकुन तोडला तर कमी आणि मुद्दाम तोडला तर अधिक तीव्रतेने परिणाम भोगावे लागतील?
एवढा लांबलचक प्रतिसाद लिहूनही लोकांना नीट कळत नाहीए काय लिहलंय तिथे स्वाक्षरीत अजून लिहून काय होणार? तिकडे मेहनत करा जरा. ;-)
22 Sep 2011 - 12:00 pm | प्यारे१
>>>>मी कुठे तोंड घालायचे ह्याचे कुठे नियम लिहलेले आहेत का? असेल तर सांगा म्हणजे जिथे घालायचे नाही असे लिहलेय तिथे न चुकता घालीन.
तुझ्याकडून वेगळी अपेक्षा नाही. आवेशात येऊन नेहमीप्रमाणे लिहीलेस. असो. चालायचेच.
>>>>दंड मिळणारच आहे. कमी अधिक प्रमाणात तो गुन्ह्याच्या तीव्रतेच्या अनुषंगाने असेल. काहीसे तसेच असते.<<<
असे पूर्ण वाक्य आहे.
गुन्ह्याची तीव्रता म्हणजे त्या आधी दिलेले सिग्नल तोडणे, नो एन्ट्री मध्ये घुसणे आणि अनैतिक वर्तन करणे या वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तीव्रता. मिळणारा दंड गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार असेल. ना की चुकून केले अथवा जाणूनबुजून केले या निकषावर .
१०० ची तर १००चीच पावती फाटणार, चुकून कर अथवा जाणीवपूर्वक. पोलिसाला कोपर्यात घेऊन सेटलमेंट करता येत नाही असे सांगायचे होते. कळाले का? ;)
>>>>एवढा लांबलचक प्रतिसाद लिहूनही लोकांना नीट कळत नाहीए काय लिहलंय तिथे स्वाक्षरीत अजून लिहून काय होणार? तिकडे मेहनत करा जरा.
बाकी स्वतःला कळत नसेल तर स्वतःपुरते बोला, खरड करा, व्यनि करा. सांगू की आम्ही.
लोकांच्या नावावर का खपवता? ;)
22 Sep 2011 - 12:07 pm | Nile
आवेशात आणल्याबद्दल धन्यवाद.
आधी नाही असे लिहले असते तर गोंधळ झाला नसता. उदा. खून करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्याची तीव्रता म्हणजे काय? पण खूनाचा उद्देश नसताना आणि उद्देश असताना या दोन केसेस मध्ये शिक्षा वेगळी असते. म्हणून मला वाटले की तुमचं म्हणणं या सदृश आहे.
सांगायचा उद्देश इतकाच की या दोन गोष्टींची तुलनाच (एक अर्थातच अस्तित्वातच नाही, माझे मत) चूक आहे, ती करू नका.
22 Sep 2011 - 12:13 pm | प्यारे१
>>>(एक अर्थातच अस्तित्वातच नाही, माझे मत)
आपली ओळख? मराठीत तू कोण टिक्कोजीराव? (वैयक्तिक घेऊ नका. सगळ्या नास्तिकांसाठी) बाकी हा प्रश्न तू देखील विचारु शकतोसच.
घोडं इथंच पेंड खातं. असो.
आम्ही 'टैमप्लीज' आहोत.
22 Sep 2011 - 12:18 pm | Nile
मी कोणीतरी टिक्कोजीराव असल्याशिवाय मला काही कळणार नाही ही गुलामगिरीची मानसिकताच तुमच्या अंधश्रद्धांना कारणीभुत असावी. बाकी तुम्ही मतं देताय म्हणजे तुम्ही स्वतःला कोणी मोठे टिक्कोजीरावच समजत असाल ना?
बाकी उगाच कोणीतरी मारलेल्या आध्यात्मिक पातळीवरच्या थापा लगावण्यापेक्षा माझे मत माझ्या, मग ते मर्यादित का असेना, ज्ञानावर देणे कधीही उत्तम. तुमच्या चालूंदे पोथीतल्या गप्पा.
22 Sep 2011 - 1:53 pm | प्यारे१
आम्ही टिक्कोजी नाही. राव तर मुळीच नाही.
बाकी आमच्या त्या अंधश्रद्धा आणि तुमच्या???? कोण कुठला डार्विन नाहीतर कोण हॉकिंग्ज सांगतो आणि तुम्ही गुलामासारखे त्याच्या गोष्टी ऐकता? पुरावे द्या की जरा.
तुम्ही करता ती काय गुलामगिरी नाही? तुम्हाला वाटतात तेवढ्याच गोष्टी तर्कसंगत ना?
बाकी उगाच कोणीतरी मारलेल्या वैज्ञानिक पातळीवरच्या थापा लगावण्यापेक्षा माझे मत माझ्या, मग ते मर्यादित का ज्ञानावर देणे कधीही उत्तम. तुमच्या चालूंदे सायन्स आर्टिकल्स मधल्या गप्पा.
;) ;)
22 Sep 2011 - 8:29 pm | Nile
>>बाकी आमच्या त्या अंधश्रद्धा आणि तुमच्या???? कोण कुठला डार्विन नाहीतर कोण हॉकिंग्ज सांगतो आणि तुम्ही गुलामासारखे त्याच्या गोष्टी ऐकता? पुरावे द्या की जरा.
तुम्ही करता ती काय गुलामगिरी नाही? तुम्हाला वाटतात तेवढ्याच गोष्टी तर्कसंगत ना?
ह्याचे उत्तर हजारदा आधी दिले आहे. तुमच्या अध्यात्मातल्या सवयीप्रमाने गोष्टी गृहीत धरण्यापेक्षा डोळे उघडे ठेऊन वाचत चला अन त्यावर विचार करत चला म्हणजे तेच ते पुन्हा विचारायची गरज पडणार नाही. आम्हाला तुमच्या सारखी पारायणं करण्याची हौसही नसल्याने पुन्हा पुन्हा तेच ते सांगितले जाणार नाही.
23 Sep 2011 - 9:24 am | प्यारे१
डार्विन आणि हॉकिंग्ज आपलं भलं करोत.
बाकी हजारो प्रकाशवर्षं दूर तार्याचा शोध घेण्यापेक्षा स्वतःच्या आजूबाजूला पाहणे आणि त्यातल्या लोकांच्या दु:खांचा शोध घेऊन ती कमी करणे जास्त इष्ट असे आमचे आपले मत...
सृष्टी कशी निर्माण झाली याच्याशी देणंघेणं का असावं? कर्मविपाकाचा विचार थोतांड मान्य करु एकवेळ, मग तुमच्या सगळ्या थिअरीज कशाच्याही/ किमान एका तरी 'अझम्शन्स' वर आधारलेल्या नाहीत, त्यांना पक्का आधार आहे असे सांगू शकता का? 'असे असू शकते' असे म्हणूनच थिअरी सुरु होतात ना? न्यूटनच्या तीन नियमांच्या आधारावर २००-२५० वर्षे काढल्यावर आईनस्टाईनने अणूचे विभाजन होऊ शकते म्हटल्यावर न्यूटनचे नियम कोलमडतात, पण म्हणून आम्ही न्यूटनलाच मानू असे म्हणता का काय तुम्ही? स्थिर वाटणार्या वस्तूच्या अणूंमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉनची संगती कशी लावता तुम्ही? न्यूटनचा लॉ ऑफ मोशन लागू पडतो का याला?
संत सांगतात ते चूक मान्य एक वेळ. पण तुमचे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आज सांगतात ते आणि तेच खरे कशावरुन?
धर्म ही अफूची गोळी असेल पण तुमच्यासारख्या लोकांचा विज्ञान हाच धर्म बनलेला आहे आणि ह्या गोळीशिवाय तुम्हाला देखील चैन पडत नाही ते देखील तितकेच खरे आहे. मानो या ना मानो. चिकित्सा हा जर विज्ञानाचा पाया असेल तर समोरचा म्हणतो त्यात काही तथ्य असू शकते हे मान्य करायला नकार का? झापडे लावणं कोण करतंय? समोरचा अंधश्रद्ध आहे हा शिक्का कोणी मारला आधी? वर लिहिलेल्या विधानांमध्ये तर्कविसंगत काय होते हे कळेल का?
समजा नायल्याचा एक हात, एक पाय अंगापासून वेगळा काढला तरी नायल्या हा नायल्याच असेल तर मग दिसणारं शरीर म्हणजे नायल्या का? तसे नसेल तर नायल्या कोण याचे उत्तर नायल्या देऊ शकतो का? ;)
23 Sep 2011 - 11:12 am | स्पा
जियो प्यारे.. सर्व प्रतिसाद आवडले
23 Sep 2011 - 11:36 am | Nile
ज्याचा त्याचा प्रश्न. जी संकल्पना अस्तित्वातच नाही तिचा शोध आणि तिची भक्ती करण्यापेक्षाही गरजूंना मदत करणं जास्त महत्त्वाचं आहे.
पुन्हा तेच. याची उत्तरं हजारदा देऊन झालेली आहेत. (संदर्भाकरता एक धागा, असे अजून अनेक आहेत. http://mimarathi.net/node/1211 ) त्या धाग्यांपैकी एका धाग्यातच बहुतेक तुम्हीच न्युटनचा तिसरा नियम आणि पुर्नजन्माचा संबंध जोडला होता हे तुम्हाला आठवत असेलच. त्यावरुन तुम्हाला न्युटनच्या नियमाबद्दल फारसे कळते असे मला वाटत नाही. तेव्हा त्यावर तुमच्याशी चर्चा करणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे.
तुमचे प्रतिसाद आज पहिल्यांदा नाही वाचले. चिकित्सा म्हणजे काय हे तुम्हाला कळालेले नाही असे दिसते. असो. इथुन पुढे तुमच्याशी वाद घालून फूकट घालवण्यासाठी वेळ नाही. तूमचं चालूद्या.
23 Sep 2011 - 11:56 am | प्यारे१
>>>>तुमच्याशी चर्चा करणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे.
>>>>इथुन पुढे तुमच्याशी वाद घालून फूकट घालवण्यासाठी वेळ नाही.
बसवला टेम्पोत तिज्यायला, आपण दोघे पण मूर्ख किमान पढतमूर्ख आहोत हे सिद्ध झालं की रे...!
अर्थात तू मानत नसलास तरी बाकीचे ओळखतातच. दोघे चर्चा करताना मध्ये तोंड घालणारा कोण ते का सांगायला हवे? गवि ला प्रतिसाद देत होतो ना रे? आणि आधीच्याच धाग्यावर (असे अजून अनेक आहेत) तुला ज्या गावी जायचे नाही त्याचा पत्ता मी सांगू पाहतो तर मी पण मूर्खच ठरतो.
बाकी, सर्वसामान्यांना कळणार नाही म्हणून समजावणं सोडून त्यांना दगड म्हणणार्या नायल्याचा णिषेढ. आणि प्रत्येक क्रियेला त्या क्रियेएवढी पण विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते ह्या नियमाचे एक्स्टेन्शन 'मी केलेल्या चांगल्या गोष्टीचा परिणाम म्हणून दुसरी चांगली प्रतिक्रिया आणि वाईट गोष्टीचा परिणाम म्हणून वाईट प्रतिक्रिया मिळते' असा केला तर मी दगड होत असेन तर मी दहा वेळा दगड बनायला तयार आहे.....!
24 Sep 2011 - 7:13 am | आत्मशून्य
हॉकिंग्ज वरून आठवलं तो दिड शाहणा दर दोन - चार वर्षांनी एक नवीन पूस्तक लिहतो आणी त्यात अधी सांगीतलेले स्वतःचेच मत खोडून काढतो.....
24 Sep 2011 - 12:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
केवढा 'आत्म'विश्वास .... !
धर्मच नव्हे, विज्ञान ही पण अफूची गोळी आहे असं विधान सुचतं आहे? कोणी एजन्सी घेणार का या विधानाची?
१. अणूचं विभाजन होऊ शकतं हे आईनस्टाईन म्हणाला नाही. हा शोध इतर अनेकांनी लावला.
२. न्यूटनचा एकही नियम अणूविभाजनामुळे कोलमडत नाही.*
३. स्थिर वाटणार्या वस्तू स्थिर दिसतात कारण ती आपल्या मोजमापनाची मर्यादा असते. अमर्यादित अॅक्युरसी (मराठी शब्द?) असणारी उपकरणं बनवणं शक्य नाही. शक्य झालं तरीही स्थिर वस्तूंच्या 'स्थिरते'च्या मोजमापनावर हायजेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपलमुळे नैसर्गिक मर्यादा येतील.
४. न्यूटनचा गतिसिद्धांत सर्व जड+ वस्तूंना लागू पडतो. फक्त "कधीमधी" वस्तूमानाच्या जोडीला विद्युतभार, चुंबकीय क्षेत्र स्ट्राँग आणि वीक बल, इत्यादी गोष्टींचाही समावेश करून गणितं करावी लागतात. न्यूटनचे गतिविषयक नियम तिथेही तेवढेच लागू पडतात.
* न्यूटनचे सांगितलेला गुरूत्वाकर्षणाचा नियम कधीमधी दुर्लक्षित होतो कारण तिथे विद्युतचुंबकीय बल (गुरूत्वाकर्षणापेक्षा १०३६ पट बलशाली) आणि स्ट्राँग आणि वीक बलं (गुरूत्वाकर्षणापेक्षा अनुक्रमे १०३८ आणि १०२५ पट बलशाली) असली की "बिच्चारं" गुरूत्वाकर्षण थोडं अशक्त पडतं.
+ जड वस्तू म्हणजे ज्यांना वस्तूमान आहे अशा सर्व वस्तू.
शास्त्रज्ञ, वैज्ञानिक सांगतात तेच आणि तेच खरं असं मानण्याची काही गरज नाही; ते स्वतःच अनेक गोष्टी अनेकदा तपासून घेतात. अलिकडच्या काळात खगोलशास्त्रात प्रसिद्ध होणार्या अनेक संशोधनपर लिखाणांचं शीर्षक "Was Einstein correct? ...." असं काहीसं असतं. आईनस्टाईनने प्रसिद्ध केलेल्या शोधांची सत्यासत्यता पडताळून बघण्यासाठी आज असंख्य प्रयोग सुरू आहेत. त्यात आईनस्टाईनचा सिद्धांत काही मर्यादेत चुकीचा ठरला (जसा अणूगर्भात गुरूत्वाकर्षणाचा नियम पाळला जातो असं दिसत नाही.) तर तो ही प्रयोग आणि निष्कर्षांची रिपीटेबिलिटी मान्य झाल्यास, नवा सिद्धांत पुढे येईल. आईनस्टाईन म्हणाला तेच संतवाक्य असं कोणीही वैज्ञानिक मानत नाही.
'Origin of species'मधे डार्विनने दिलेल्या उत्क्रांतीवादात आज चिक्कार बदल झालेले आहेत. आणि मजेची गोष्ट अशी की डार्विनच्या उत्क्रांतीवादामुळे तार्यामधल्या इंधनाचा शोध लागला. तोपर्यंत अनेक चुकीचे सिद्धांत मान्य झालेले होते.
निळ्या, त्या लेखाची लिंक कधीची शोधत होते, तिथे चांगली चर्चा झाल्याचं स्मरतं. त्याबद्दल आभार.
24 Sep 2011 - 10:19 am | नितिन थत्ते
>>अलिकडच्या काळात खगोलशास्त्रात प्रसिद्ध होणार्या अनेक संशोधनपर लिखाणांचं शीर्षक "Was Einstein correct? ...." असं काहीसं असतं. आईनस्टाईनने प्रसिद्ध केलेल्या शोधांची सत्यासत्यता पडताळून बघण्यासाठी आज असंख्य प्रयोग सुरू आहेत.
सहमत आहे.
येथे पहा.
25 Sep 2011 - 4:46 am | अर्धवटराव
आध्यात्म्याच्या अभ्यासात देखील बुद्धी/विवेकप्रामाण्य असल्याशिवाय गत्यंतर नसतं. बुद्ध, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, कपिलमुनी... यु नेम इट, या सगळ्यांचे सिद्धांत एकमेकांपेक्षा भिन्न आहेत, किंबहुना एकमेकांचे सिद्धांत खोडत त्यांनी आपले मार्ग आखले. इन फॅक्ट कुठलाहि रेफरन्स न घेता स्वतःचा मार्ग स्वतः आखण्यात अनेकजण धन्यता मानतात. मग काँट्रॅडिक्शन येते कुठे??
राहिला भाग धर्माच्या/पंथाच्या हटवादीपणाचा... तर हा (अव)गुण प्रत्येक क्षेत्रात दिसुन येईल. हा मानवी गुण आहे, आहे धर्म असो वा राजकारण, आध्यात्म असो वा विज्ञान, असे नग सर्वत्र सापडतील... अगदी मिपावर देखील ;)
अर्धवटराव
27 Sep 2011 - 10:43 am | प्यारे१
@ अदिती,
तपशीलाबद्दल आभारी आहे. तपशीलातल्या माझ्याकडून झालेल्या 'महान' चुकीबद्दल क्षमस्व. एकदम माघार.
बाकी 'नेहमीप्रमाणे'च सांगण्याचा उद्देश लक्षात 'घेतला जात नाहीये', असो.
काल दिलेला प्रतिसाद तसाच ठेवून,
माझ्या प्रतिसादातील मूळ मुद्दा असा होता की तुम्ही विज्ञानवादी म्हणवणारे फक्त आणि फक्त प्रयोगांद्वारे सिद्ध होणार्या गोष्टींनाच मानता तर मग तुम्ही ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गाने सुद्धा काही घडू शकते यावर का विश्वास ठेवू शकत नाही? ग्रंथ जुने आणि वेगळ्या भाषेत आहेत म्हणून? की ग्रंथांनी सांगितलेल्या प्रयोगाचे उपकरण वेगळे म्हणजे स्वतःचे शरीर, मन, बुद्धी हे आहेत म्हणून....!!!
अर्थात, विज्ञानामध्ये -प्रयोगशाळेमध्ये- प्रयोग करणार्या व्यक्तीच्या बुद्धीमध्ये, इंद्रियांमध्ये असलेल्या
limitation of senses
illusion
committing mistakes
& cheating propensity
ह्या दोषांचा विचार करता का? हे दोष जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही व्यक्तीच्या बुद्धीमध्ये, इंद्रियांमध्ये असतातच.
हे प्रयोग तुम्हाला अचूक निष्कर्ष देऊ शकतील? जरी व्यक्तीनिरपेक्ष उपकरणे असली तरी एका मर्यादेपलिकडे यश मिळणे अशक्य आहे.
बाकी 'नेहमीप्रमाणे'च सांगण्याचा उद्देश लक्षात 'घेतला जात नाहीये', जाणार नाही याची खात्री आतापर्यंतच्या अनुभवावरुन आहे.
नायल्याला विचारलेला प्रश्न तुम्हाला ही विचारतो.
अदिती म्हणजे जर आरशात दिसणारे (तिचे तिला) शरीर नसेल तर अदिती कोण आहे?
तुम्ही म्हणताना म्हणत असाल ना माझा पेन, घड्याळ, फोन, पर्स त्याच धर्तीवर माझा हात, पाय, डोके इ.इ. म्हणजे मी म्हणजे कुणी वेगळा/ळी असणार ना? बघा विचार करुन....
कार्बन, सिलिकॉन च्या रेणूंमधून प्रत्येक वस्तू आली असली तरी त्यामध्ये आलेले चैतन्य (consciousness) कुठून आले याचा विचार कसा करता तुम्ही?
26 Sep 2011 - 11:35 pm | आत्मशून्य
या मूळ मूद्याचं उत्तर द्यायचं राहीलच की ? याची संगती जरा सूसंगत पणे स्पश्ट कराल काय ? म्हणजे हे फिरणारे इलेक्ट्रोन्स जे आहेत त्याच्या पोझीशनची माहीती (काळ वेग व अंतर व जागा) गणीतीय अचूकतेने काढायचा नेमका फॉर्म्यूला कोणता आहे जो कधीच वरील माहीती चूकवत नाही उदा.. (काळ, वेग, अंतर व जागा) ?
To be precise, what I want you or any person having similarity in practicing communist attitude of mind on the internet AS WELL AS especially on misalpav.com to do is, please provide the exact mathematical formula/equation to calculate the exact momentum and the accurate position of the electron traveling around the nucleus inside atomic structure.
हे जमलं तर नंतर आपण हॅरी पॉटरच्या लहान मूलांच्या जादूच्या गोश्टीमधे दाखवलेलं टाइम टर्नर (वर्कींग टाइम मशीन) प्रत्यक्षात काम कसं करू शकतं याचा पोकळ बालीश व अंधश्रध्देने बरबटलेला मूर्ख दावा जे संशोधक दर दोन चार वर्षांनी स्व्तःचेच मत खोडत असतात व केवळ थीअरीने कागदावर करतात त्यांना शहाणे मानणार्या व स्वतःला फार अक्कल आहे असे समजून लोकांच्या श्रध्दा व भवनांचा उपमर्द करणार्या मूर्खांचा मूद्देसूद (हसू नका, होय अशा भामट्यांशी मूद्यानं बोलणं खरतर विनोद आहे माहीत आहेच पण तरीही) समाचार घेतल्या जाइल.. तूर्तास त्याआधी आपणास स्पश्ट केलेले गणीत सोडवावे ही प्रार्थना....
अवांतरः अरे "कर्मा"! ह्या शब्दाने सूरूवात करून आपण खरोखर भावीक व आस्तीक आहात याचा जो पूरावा दिला आहे त्यामूळेच आपल्याशी मी वैज्ञानीक शंका विचारण्यास धजावू शकलो आहे, योग्य उत्तर देणं शक्य असेल तर कृपया आपला प्रतीसाद उभट होणार नाही याची काळजी घेतली तर सर्वांनाच वाचायला सोपा जाइल असं नमूद करतो. तसचं प्रतीसाद दीला नाहीत तरी तूम्हाला हे जमणारच न्हवतं हा माझा समज खरा ठरला असा माझा अजिबात समज असणार नाही हे नम्रपणे नमूद करतो.
27 Sep 2011 - 4:25 am | राजेश घासकडवी
कालचा गोंधळ बरा होता...
27 Sep 2011 - 4:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी गीतापठण करणार नाही. केलं तरी त्याची जाहिरात नक्कीच करणार नाही.
27 Sep 2011 - 7:31 am | आत्मशून्य
सरळ शब्दात विचारलेल्या भौतीक शास्त्रातल्या गणिताला गूर्जीनी वा काकूंनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या समजू का ? जर हो असेल तर या कृतीचा निषेध.
बाकी चालूदे....
27 Sep 2011 - 7:59 am | राजेश घासकडवी
तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर 'पृथ्वीवर असताना हातातून दगड सोडून तो गुरुत्वाकर्षणाने वर जाईल अशी व्यवस्था करून दाखवा पाहू' अशा स्वरूपाचा तुमचा प्रश्न आहे. भौतिकीचे नियम आपल्याला हवे तसे नसतात, ते जसे आहेत ते स्वीकारावे लागतात, इतकंच आत्ता म्हणतो.
या विषयावर कधीतरी सखोल लेखन करण्याची इच्छा आहे. तोपर्यंत तुम्हाला जर वाटाण्याच्या अक्षता वगैरे बरळायचं असेल तर ते स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.
27 Sep 2011 - 8:20 am | आत्मशून्य
सहमत, आपल्या लेखाची प्रतीक्षा ही आहे, अर्थात आपण त्या (दीडशाहण्या) स्टीफन सारख वागणार नाही अशी खात्री ही आहेच म्हणूनच ही प्रतीक्षा बरं का. बाकी मी तर भौतेकीचे ते नीयम जे आहेत याचा जो अभ्यास आहे त्याबाबतच जे उदाहरण समोर आणलं होतं त्याबाबतच तर शंका विचारलीय... आणी तूम्ही नियम वाकवू शकणार नाही याची खात्री माझ्या सारख्या मूर्खालाच काय तर माझ्या पेक्षही मूर्ख अशा शेंबड्या पोरालाही आहेच.. मग ते तूम्ही जसे आहेत तसे स्विकारा अथवा नाकारा.... याबाबतही माझं आपल्याशी दूमत नाही हे ही आपल्या नजरेसमोर ठेवू म्हणतो. सो, वि आर ओन सेम साइड सारं.. व्हाय आर वी अर्ग्यूइंग हीर ... ?
पण एक महत्वाचं, सांगण आणी बरळनं यातला फरक जेव्हां समजायला लागेल ना त्या नंतरच हव्या त्या लेखाचे प्रयोजन करा अर्थात घाइ असेल तर तूम्हालाही जे बरळायचं असेल तर ते स्वातंत्र्य आहेच पण आम्ही मात्र तूमचं सांगण मनावर घेऊ, बरळणं न्हवे म्हणून तर. "कालचा गोधंळ बरा होता हे आपलं विधान" योग्य जागी मारण्यात आलय :)
- Peace.
27 Sep 2011 - 8:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
गुर्जी, भौतिकशास्त्राचे वर्ग इथे का भरवणार आहात? उद्या निरीक्षणान्ती मॉन्डवर विश्वास ठेवणार्यांची संख्या वाढली तर तुम्ही खोटं बोलत होतात, मूर्ख न्यूटन खोटारडा होता म्हणून आरडाओरडा होईल. त्यापेक्षा तुम्ही कवितकाचे वर्ग घ्या, भौतिकशास्त्र शिकणार्यांसाठी चिक्कार चांगली पाठ्यपुस्तकं, अगदी मराठीतसुद्धा आणि संस्थळं आहेत. अगदी विकीपिडीयासुद्धा आहे.
27 Sep 2011 - 8:43 am | आत्मशून्य
हे विधान काय, अथवा
हे अस्तिंकांच विधान काय, अथवा
ओशन ट्वेल्व्ह मधे जेव्हा मॅट डेमन टेस चा विषय काढतो तेव्हा घडलेला पूढील संवाद असो...
Brad pitt :- Ooh, don't ever ask that. Ever. Seriously. Not to anyone, especially not to her.
Matt Damon Wait, why not?
Brad pitt :- Look, it's not in my nature to be mysterious. But I can't talk about it and I can't talk about why.
कीती साम्य दीसतं नाही ... वरील तिन्ही संवादात ? साहेब आणी मी एकाच बाजूला आहोत हे उगाच का म्हटलय ? मग....?
27 Sep 2011 - 8:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या या गांधीवादी आणि सनदशीर निषेधामुळे माझं मतपरिवर्तन झालेलं आहे. गुर्जींनी लवकरात लवकर लेख लिहावा. मी त्यांना सहाय्य करण्यास तयार आहे. आत्मशून्य, तुमच्या या कृतीबद्दल मी तुमचे आभार मानते.
27 Sep 2011 - 9:17 am | आत्मशून्य
माझी आपल्याशी चर्चा चालू होतीच पण राजेश साहेबांसोबत संवाद हा अपघातामूळेच झाला.. असो जे होतं ते भल्यासाठीच आता त्यांचा लेखही वाचायला मीळेल...
मला मात्र आपल्या सोबत याच धाग्यतील चर्चेच्या अनूशंगाने आपल्यासोबत Planck Uncertainty principle वरती काही चांगली चर्चा घडेल असं जे वाटत होतं ती संधी हूकली याचा मनापासून खेद राहील... :( राजेश साहेबांनी त्यांच्या लेखात यावरही प्रकाश टाकला तर बरं होइल एव्हडच म्हणतो.
27 Sep 2011 - 11:15 am | मदनबाण
लेख वाचण्यास उत्सुक...
शरद काकांनी देखील उत्तम अश्या दुसर्या लेखाची सांगता करावी... तेव्हढीच आमच्या ज्ञानात भर पडेल.
बाकी स्टीफन बाबा बर्याच वेळेला बरचं काही म्हणतात म्हणे.! ;)
त्यातलच एक खालील विधान :---
So Einstein was wrong when he said, "God does not play dice." Consideration of black holes suggests, not only that God does play dice, but that he sometimes confuses us by throwing them where they can't be seen.
असो... सध्या तरी हेन्री बाबाचे (Henry David Thoreau) इचार वाचतोय, त्यातलाच एक विचार :---
In the morning I bathe my intellect in the stupendous philosophy of the Bhagavad Gita... in comparison with which... our modern world and its literature seems puny and trivial."
अरेच्च्या ती गाढववाली सही गायबली वाट्ट ! ती वाचुन मला ही म्हण आठवली व्हती बरं...गाढवा समोर वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता' ;)
असो...
जाता जाता :--- मी रसल सध्या तरी वाचत नाही आणि सायकल ऐवजी डुगडुगी चालवतो. ! ;)
27 Sep 2011 - 11:19 am | नितिन थत्ते
पुरे......
कर्मविपाकाचा पिळून पाक निघाला अगदी.
आणि प्रतिसादाची शेवई झाली.
27 Sep 2011 - 11:21 am | मदनबाण
चाचा परत डोक आपटायचा विचार आलाय वाट्ट ! ;)
(विनोदी) ;)
22 Sep 2011 - 4:08 am | धनंजय
(अन्यत्र दिलेला प्रतिसाद येथे पुन्हा)
चांगला आढावा.
ऋग्वेदात याविषयाबाबत फारसे नाही, असे ऐकले होते. वरील ऋचांचे संदर्भ चांगले आहेत. पण त्या ऋचा वाचून सकृद्दर्शनी पुनर्जन्माबाबत संकेत मिळाला नाही. नीट वाचून बघतो.
माहिती हिंदू धर्माबाबत आहे, हे स्पष्टच केले आहे, पण आधी यादीत बौद्ध धर्माचा उल्लेख केला आहे, त्याअनुषंगाने... पुढील वाक्य हिंदू धर्माबाबत नव्हे, तर व्यापक वाटले :
बौद्ध धर्म अनात्मवादी आहे, तरी पुनर्जन्म स्वीकार करतो. आत्मा नसलेल्या कर्माच्या भेंडोळीचा पुनर्जन्म होतो. (नाहीतरी त्या धर्माच्या मते एकच जिवंत पिंड एका क्षणापासून दुसर्या क्षणापर्यंत टिकते, म्हणजे काय? म्हणजे आत्मा नसलेली कर्माची-जडतत्त्वांची-वगैरे भेंडोळीच टिकते.) म्हणजे आत्मा मानल्याशिवायही पुनर्जन्म मानणे शक्य आहे, उद्धृत वाक्याप्रमाणे व्यापक स्वयंस्पष्ट विधान नाही.
कर्माचे मूलभूत तत्त्व (म्हणजे जडवस्तूंमधील रचना आणि हालचाल क्षणापासून पुढच्या क्षणापर्यंत चालू राहाणे) ठीक वाटते. मला वाटते, की तीनही धर्मात "कर्म म्हणजे काय" हे मुळात समजावताना जडवस्तूंचे उदाहरण देतात. हे निरीक्षणाने ठीक वाटते. त्या तत्त्वापासून जीवांबाबत केलेला विस्तार मात्र कल्पनारम्य आहे.
यातील मुख्य दोष म्हणजे हिशोबाचा ताळा जमण्याचा आहे. "एक जीवित-पिंड" संपल्याचे दिसल्यावर त्यातील जडपदार्थ आणि जडपदार्थांच्या जीवजंतूंमध्ये खास दिसणार्या चलनवलनाचा हिशोब नंतरच्या काळातल्या काही जीवित-पिंडांमध्ये दिसतो. मात्र यांत गणिताचा ताळा जमत नाही. त्यामुळे जीवितपिंडांची संख्या (स्वनिरीक्षणाचे सामान्यीकरण करून प्रत्येक जीवितपिंडाला आत्मा असावा, असे, म्हणजे आत्म्यांची) कालक्रमाने कमी-अधिक होण्याचे निरीक्षण व्हायला हवे होते. त्यामुळे कालक्रमाने तोच आत्मा कुठला हे सांगणे हिशोबाच्या दृष्टीने ठीक नाही. बौद्धांनी तरी या हिशोबाच्या मुद्द्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे होते, असे राहून-राहून वाटते. त्यांना कर्माच्या भेंडोळ्या तुटून एकाच्या अनेक होणे, किंवा मिसळून अनेकांच्या एक होणे, हे मानण्यात काहीच मूलभूत विरोध नाही.
मात्र हिशोबाकडे दुर्लक्ष हे इतिहासाच्या दृष्टीने ठीकच आहे. हिशोबाचा ताळा जमण्यासाठी निरीक्षण सूक्ष्म असावे लागते. ते नसल्यास हिशोबाबाबत कल्पनाविलास करण्याशिवाय गत्यंतर नाही. तरी "लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ आत्मा-संख्या" हा कल्पनाविलास म्हणजे जरा निष्काळजीच वाटतो.
22 Sep 2011 - 11:10 am | विसुनाना
(अन्यत्र दिलेला प्रतिसाद येथे पुन्हा) ;)
सांख्यिकीचा विदा गोळा करणे कठिण काम आहे. तरीही जगातल्या समस्त पशुपक्षीवनस्पतीकीटकमत्स्यादि जीवांची संख्या कॉन्स्टंट रहात असते असे विधान कुणाकडून आल्यास नवल नाही. शिवाय हिशोब चुकला तर बिरबलाप्रमाणे - "कमी भरले तर अन्य ग्रहावर गेले असतील, जास्त भरले तर अन्य ग्रहावरून आले असतील" असे विधान करता येईलच. ('एलियन्स आहेत/नाहीत' हेही असेच एक विधान आहे.) ;)
22 Sep 2011 - 11:23 am | गवि
मनुष्यांची संख्याच फक्त इतक्या झपाट्याने वाढत आहे की म्हणे आत्ता जगात जितके मनुष्य जिवंत आहेत ते पहिल्या मानवापासून आत्तापर्यंत जन्मून मेलेल्या सर्वांच्या एकूण संख्येहून जास्त आहेत. (हे गणितानेही कदाचित म्हणता येईल..)
एकूण जीवसंख्या स्थिर राहते असे मानले तर याचाच अर्थ असा होतो की अनेक अन्य योनीतले जीव मनुष्यजन्मात येत आहेत.
म्हणजे मनुष्यजन्म मिळणे ही शिक्षा आहे का?
की प्राणी असेही निष्पाप असतात* आणि त्यांना प्रत्येकाला रिवॉर्ड म्हणून एकेकदा मनुष्यजन्म देणे जरुरी आहे म्हणून वेटिंग लिस्ट क्लिअर केली जात आहे?
*प्राणी निष्पाप असतात हे विधान प्यारे यांच्या खालील एका प्रतिसादानुसार चुकीचे ठरेल कारण अजाणता, निरुद्देश पापे तर प्राण्यांकडूनही होतच असतात. वाघाकडून अनेक हरिणांची "क्रूर" हत्या, हरिणांच्या पायाखाली तुडवल्या गेलेल्या मुंग्या इ इ.
22 Sep 2011 - 5:16 am | शिल्पा ब
काय?
22 Sep 2011 - 8:45 am | धन्या
हा लेख हीराभाई ठक्कर यांच्या कर्माचा सिद्धांत या पुस्तकाची ओळख आहे असं वाटतंय. परंतू मस्त लिहिलंय.
22 Sep 2011 - 9:13 am | रणजित चितळे
आपले लेख नेहमीच आवडतात. त्यात कर्मविपाक मला आवडणारा विषय. पण सध्या वेळे अभावी, सविस्तर प्रतिसाद देता येत नाही. मनातून इच्छा आहे. बघू. हा प्रतिसाद ह्या साठी की आपले लेख आवडतात हे सांगायला.
मागे एकदा मी एक धागा काढला होता संचित म्हणून
http://www.misalpav.com/node/15899
ह्याच विषयावर चर्चेचा प्रस्ताव आपल्याला दिसेल.
22 Sep 2011 - 10:16 am | सामान्य वाचक
छान जमला आहे लेख.
22 Sep 2011 - 10:24 am | मदनबाण
ह्म्म्म... चांगले लेखन. वेळ मिळताच शांतपणे बसुन परत हा लेख पुन्हा वाचीन.
पुनर्जन्म ही कल्पना स्विकारावयाची असेल तर "आत्मा " ही कल्पना प्रथम स्विकारावीच लागते.कारण नाशवंत शरीर दुसरे रूप धारण करू शकणार नाही. पण आत्म्याला अविनाशत्व दिलेले असल्याने तो कुठल्याही शरीरात स्थलकालाबाधित प्रवेश करू शकतो.
अगदी हेच वाटतं...
म्हणजे माणसाचा आत्मा कुत्र्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो व तो कुत्रा मेल्यावर परत माणूसही होऊ शकतो. एक गंम त म्हणजे फक्त मानवच आपली प्रगती करून घेऊन "मोक्ष " मिळवू शकतो, या चक्राच्या बंधनातून सुटका करून घेऊ शकतो.
यावरुन जड भरताची कथा आठवली.त्यांनाही मॄत्युच्या क्षणी हरणाच्या पाडसात जीव गुंतल्यामुळे हरणाचा जन्म घ्यावा लागला होता. !
आत्म्याचा आकारमान (साईझ) काय असावी असा प्रश्न गेले अनेक वर्ष माझ्या मनात होता, म्हणजे तो सुक्ष्म आहे म्हणजे किती सुक्ष्म असेल असा प्रश्न मला पडला होता,म्हणजे याचे थोडे फार तरी वर्णन कुठेतरी वाचायला मिळावे असे वाटत होते.
हल्लीच त्याचा गीतेमुळे तो संदर्भ मला वाचायला मिळाला ! :)
श्वेताश्वतर उपनिषद :---
बालाग्रशतभागस्य शतधा कल्पितस्य च | भागो जीवः स विज्ञेय स चानन्त्याय कल्पते |
संदर्भ :--- http://sanskritdocuments.org/all_pdf/shveta.pdf (५.९)
मांडुक्य उपनिषादतला हा भाग सुद्धा बरेच काही सांगुन जातो...
esho'nuratma cetasa veditavyo. yasmin pranah pancadha samvivesha |.
pranaishcittam sarvamotam prajanam. yasmin vishuddhe vibhavatyesha atma ||
9|| (Mundaka Upanisad (3.1.9) )
सध्या Aitareya Upanishad समजण्याचा प्रयत्न करतो आहे.
वाचकांसाठी (भाषांतरीत केलेले) साहित्य :---
http://www.ancienttexts.org/library/indian/upanishads/aitar.html
http://www.celextel.org/108upanishads/aitareya.html
22 Sep 2011 - 12:04 pm | अविनाशकुलकर्णी
हा लेख हीराभाई ठक्कर यांच्या कर्माचा सिद्धांत या पुस्तकाची ओळख आहे असं वाटतंय.
.......
नक्किच...हिराभाईची मास्टरी होति या विषयावर...मुळ पुस्तक वाचले कि बरएच काहि कळते..
कर्माचा कायदा असे काहिसे नाव आहे पुस्तकाचे..
यावर मला वाटते जब जब जो जो होना है तब तब वो होता हि है..
मनुष्याच्या हातात काहिच नाहि..
पराधिन आहे जगति पुत्र मानवाचा..
22 Sep 2011 - 12:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आम्हाला यात काडीचीही गती नाही त्यामुळे काही न बोललेलच बरं!
पण बिकाच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा आहे.
22 Sep 2011 - 2:46 pm | सुप्रिया
मलाही या विषयात काही गती नाही. पण लेख आवडला.
22 Sep 2011 - 7:00 pm | शुचि
"गीता रहस्य" या पुस्तकामध्ये टिळकांनी या विषयावर फार सुरेख विवेचन केले आहे.
22 Sep 2011 - 10:10 pm | JAGOMOHANPYARE
कधी पटते.. कधी पटत नाही.. असा हा विषय आहे.
23 Sep 2011 - 2:24 am | पान्डू हवालदार
लेख आवडला
23 Sep 2011 - 6:17 am | राघव
संपूर्ण सिद्धांताचं विवेचन खूप छान मांडलंय.
तेव्हा भगवंतांचे सांगणे असे की निष्काम बुद्धीने, फळे मला अर्पण करून युद्ध कर, या कर्माची बरीवाईट फळे तुला भोगावी लागणार नाहीत.
याचाच अर्थ संपूर्ण, काया-वाचा-मने, शरणागती.
शरणागती प्रेमाशिवाय येऊ शकत नाही. प्रेमानं भगवंतावर संपूर्ण भरवसा टाकणं म्हणजे शरणागती.
काया-वाचा-मने असे करणे म्हणजे जे काही भगवंताला आवडेल तेच करणे झाले.
म्हणजे स्वतःची वेगळी 'ईच्छा'च नसणे झाले. तसा साधा विचारही मनात न येणे झाले.
अशावेळी जे कर्म तुमच्या हातून 'घडतंय' त्याचं एकमेव प्रयोजन म्हणजे भगवंताला ते आवडतं म्हणून.
म्हणजे तोच तुमच्या सर्व कर्मांचा कर्ता झाला.
तसे झाले तर सर्व कर्माची फळे त्यालाच जातील, तुम्हाला चिकटणार नाहीत.
पण भगवंत तर स्वतः उपाधीरहित आहे. त्यामुळे ते कर्मफळ नष्ट होतं. फक्त याच एका बाबतीत असं घडतं की कर्मफळ नष्ट होतं. म्हणून हा मुक्तीचा मार्ग सांगीतला आहे.
आता प्रश्न असा पडतो की भगवंताची ईच्छा काय ते मला कसे समजणार? इथं गुरू मदत करतात. आता हा गुरू शोधायचा कसा? ज्यावर संपूर्ण भरवसा ठेवावा लागेल ती व्यक्तीसुद्धा त्या योग्यतेची असायला हवी ना?
काय स्थिती झालीये - स्वतःची ईच्छा ठेवायची नाही, भगवंतांची ईच्छा उमजत नाही अन् गुरू कोणता असावा ते समजत नाही.. ही झाली व्याकूळ अवस्था. सर्व बाजूंनी हतबल. मग येते भगवंताची प्रार्थना, आर्तता. याचा अर्थ तुम्हाला काय हवे ते तुम्हाला उमजले. म्हणजे तुमची झोळी तयार झाली. तसे झाले की मदत येते.
अर्थात् वरील सिद्धांत मानताना काही गोष्टी मान्य कराव्या लागतात - भगवंताचं अस्तित्व, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, गुरू या त्यातल्याच काही.
तुमची फळे तुम्हालाच भोगावयाची असतात. ती दुसर्याला देता येत नाहीत व दुसयाला ती घेता येत नाहीत.
गुरूच्या स्वाधीन झाल्यावर कधी कधी गुरू हे भोग स्वतः भोगून संपवतात अशी उदाहरणे आहेत. भगवंताला कठोर न्यायी म्हणतात. पण गुरू, संत हे दुसर्यांच्या दु:खानं व्याकूळ होतात, ते त्यांना बघवत नाही. अन् मग ते भोग ते स्वत: भोगून संपवतात. अर्थात् असे केल्यानं त्या जीवाच्या अध्यात्मिक प्रगतीला मदत होईल असेच ते बघतात. याहून अधिक कोणते कारण असेल तर कल्पना नाही.
राघव
23 Sep 2011 - 12:00 pm | विटेकर
- अगदी योग्य !
गुरु हाच यातून मार्ग काढून बाहेर नेउ शकतो.
माझ्या माहितीप्रमाणे गुरु प्रारब्धात ढवळाढवळ करु शकतो..पण अनन्यता ( शिष्याची) आणि योग्यता ( गुरुची) असयला हवी. कदाचित याचा अन्वयार्थ असाही असेल की गुरुपाशी अनन्यभावाने शरण गेल्याने क्षुद्र शरिरिक अथवा मानसिक दु:खाची तमा वाटत नाही..कोणत्याही अवस्थेत चित्ताची समतोलता रहात असल्याने दु:खाची जाणीवच नाहीशी होते. ( ईन्सुलेशन ) पण प्रत्यक्ष दु: ख भोगावेच लागते.... .. कारण कर्माचा सिद्धांत !
सुयोग्य गुरु हाच खरा प्रश्न आहे आणि आपली अनन्यता हा त्याहीपेक्षा महाकठीण प्रश्न आहे!
23 Sep 2011 - 10:23 pm | मदनबाण
वाचकांसाठी काही दुवे :---
http://en.wikipedia.org/wiki/Reincarnation
http://www.youtube.com/watch?v=hZhMDU9GcVg&feature=related
http://www.youtube.com/watch?v=lB_j-chZvR0
जाता जाता :---
ही चित्रे माझ्यावर बराच प्रभाव टाकुन गेली आहेत.


24 Sep 2011 - 1:08 am | शिल्पा ब
चित्रं आवडली.
26 Sep 2011 - 12:54 pm | वपाडाव
मला पण.........