१ मे म्हणजे आज महाराष्ट्र राज्य ५१वा वर्धापनदिन साजरा करत आहे. ही अर्धशतकोत्तर वाटचाल करतांना राज्याने काय कमावले आणि काय गमावले, यांविषयीचा परामर्श घेणार्या आमच्या संग्रहातील काही गोष्टी पुढे दिल्या आहेत. मराठी भाषिकांनी त्यांचा यथायोग्य अभ्यास केला, तर राज्याच्या प्रतिष्ठेसाठी बर्याच गोष्टी करायच्या शिल्लक आहेत, हे लक्षात येईल आणि त्यासाठी मराठी माणसाला स्वतःचा सहभाग वाढवण्याची स्फूर्ती मिळेल.
१. मराठी माणसांचे सद्गुण !
१ अ. मराठी माणसामुळे राजकारणात, विद्वत्तेत आणि त्यागात महाराष्ट्रीय आघाडीवर असणे : ‘महाराष्ट्रीय लोक इतर कोणापेक्षाही अधिक प्रामाणिक, राष्ट्राविषयी अधिक जागरूक आणि राष्ट्रकार्यासाठी अधिक त्याग करावयास सदैव सिद्ध असतात. राजकारणात, विद्वत्तेत आणि त्यागात महाराष्ट्रीय आघाडीवर आहेत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे !’
१ आ. महाराष्ट्रीय लोकांना पैशाचा सोस नाही, हा त्यांचा मोठ्यातील मोठा सद्गुण ! : ‘महाराष्ट्रीय लोकांना पैशाचा सोस नाही आणि हा त्यांचा मोठ्यातील मोठा सद्गुण आहे. धन हे महाराष्ट्रीय लोकांचे कधीही दैवत नव्हते. तो त्यांच्या संस्कृतीचाही गुणधर्म नव्हे. नाहीतर त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरून येणार्या इतर समाजांना उद्योगधंद्यांची मक्तेदारी बळकावून घेण्याची संधी दिली नसती !’
१ इ. मराठी माणूस आणि हिंदुत्व ! : ‘मराठी माणसाचा भूतकाळ अत्यंत प्रतिभाशाली आणि सामर्थ्यवान आहे. उर्वरित भारतातील सर्व हिंदूंना मराठी माणसाने जीवनदान दिले आहे. देशावरील इस्लामी आक्रमणासमोर दंड थोपटून प्रामुख्याने मराठी माणूस उभा राहिला आहे. त्याचा भूतकाळ हिंदुत्वाशी निगडित आहे. हिंदुत्वाचा त्याला अभिमान आहे. हिंदुत्व म्हणजे काय हे त्यानेच अन्य भारतियांना उक्तीने आणि कृतीने समजावून सांगितले आहे. आपले मराठीपण आणि आपले हिंदूपण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असे त्याला कधीही वाटले नाही. आपण मराठी आहोत म्हणूनच आपण हिंदुत्वाच्या संग्रामात आघाडीवर राहिले पाहिजे आणि प्राणपणाला लावून लढले पाहिजे, असेच तो सहज स्वभावधर्म म्हणून मानीत राहिला. ‘आपण हिंदु आहोत’, म्हणूनच आपले मराठीपण कोणालाही न बोचता न टोचता सर्वांना आश्वासक वाटले पाहिजे, असे बंधन त्याने आपणहून स्वत:वर घालून घेतले आहे. मोठा मुलगा आघाडीवर राहून समर्थपणे संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण करत असतो आणि हे तो उपकाराच्या भावनेने करत नाही, तर निरपेक्ष कर्तव्यभावनेने करत असतो, तसे मराठी माणसाचे हिंदुत्वाचे नाते आहे.’
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
१ ई. देशप्रेमी मराठी माणूस ! : ‘जय महाराष्ट्र’ म्हणणारी प्रत्येक व्यक्ती पुढे ‘जय हिंद’ जोडतेच. देशप्रेम म्हणजे काय, त्याचे पाठ मराठी माणसाला द्यावे लागत नाहीत. - श्री. श्री. भट (मासिक धनुर्धारी, एप्रिल २००८)
२. महाराष्ट्राने राष्ट्रासाठी दिलेले ऐतिहासिक योगदान !
अ. मुसलमान आक्रमणाला कोणी रोखले त्याची साक्ष औरंगजेबाचे महाराष्ट्रातील थडगे देत आहे.
आ. अब्दालीला पिटाळून लावण्यासाठी भीमथडीची तट्टे अटकेपर्यंत गेली. पानिपतच्या शेवटच्या लढाईत मराठे रक्त सांडत होते, तेव्हा गंगा-यमुनेचे पुत्र कोठे होते ?
इ. इंग्रजांची शेवटची लढाई महाराष्ट्रात झाली.
ई. १८५७ चे स्वातंत्र्यसमर मराठ्यांनीच पुकारले.
उ. अंदमानच्या काळ्या पाण्यात हुतात्मा झालेल्यांमध्ये निम्मे स्वातंत्र्यवीर ‘मराठी’ आहेत.
ऊ. काँग्रेस पक्ष वगळता सर्व राजकीय पक्षांचे संस्थापक नेते मराठी आहेत.
ए. हिंदुस्थानातील बहुतेक सर्व प्रांतांतील राजकीय किंवा इतर क्षेत्रांतील पुढार्यांचे शिक्षण पुण्या-मुंबईत झाले.’
- श्री. श्री. भट (मासिक धनुर्धारी, एप्रिल २००८)
ऐ. लोकमान्य टिळकांमुळे महाराष्ट्र आणि बंगाल एकजीव होऊन वंगभंगाच्या राष्ट्रीय चळवळीत महाराष्ट्राने बंगाल्यांइतकाच भाग घेतला ! : ‘हिंदूंनी आपल्या धर्माचे स्तोम माजवू नये आणि मुसलमानांनी मात्र सदासर्वदा धर्माखेरीज बोलू नये’, हा न्याय टिळकांना मान्य नव्हता. इंग्रज सरकार आपले राज्य टिकवण्याचा एक मार्ग म्हणून हे मोहरे सतत पुढे आणणार, हे ओळखून त्यांनी मुसलमानांच्या अन्यायी मागणीला ‘जशास तसे’ या रीतीने तोंड देण्याची तयारी चालवली होती. यासाठी शिवजयंती, गणेशोत्सव, गोरक्षण यांसारखे मार्ग त्यांनी शोधून काढले आणि प्रचलित केले. एल्फिन्स्टन प्रभुती इंग्रज इतिहासकारांनी फारसी तवारिखांचे भाषांतर करून तोच हिंदुस्थानचा इतिहास म्हणून प्रचलित केल्यामुळे मुसलमानी राजवटीला जी फुगवट आली होती, ती ओसरण्यासाठी महाराष्ट्र इतिहासाचे संशोधन त्यांनी पुरस्कारले. शिवजयंती उत्सव हा अखिल भारतीय व्हावा, अशी त्यांची खटपट होती आणि त्याप्रमाणे बंगालमध्ये तो चालू होऊन छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांची चरित्रेही बंगालीत लिहिली गेली. यामुळे महाराष्ट्र आणि बंगाल यांचा एकजीव होऊन वंगभंगाच्या राष्ट्रीय चळवळीत महाराष्ट्राने बंगाल्यांइतकाच भाग घेतला.
ओ. रा.स्व. संघाच्या हिंदुत्वाच्या कार्यात मराठी माणसाचे लक्षणीय योगदान असल्याने संघकार्यात महाराष्ट्राकडे थोरलेपण असल्याचे सर्र्वांनी मान्य करणे : ‘१९४० मधे जेव्हा हिंदुत्वाच्या प्रचारासाठी संघाने भारतभर प्रचारक पाठवायचे ठरवले, तेव्हा घरदार सोडून ज्यांनी दुसर्या प्रांतात आश्रय घेतला, ते प्रचारक प्रामुख्याने मराठी होते. संघाच्या कामात महाराष्ट्राकडे थोरलेपण आहे आणि ते सगळे मान्य करतात.’ - सुघोष (‘दैनिक सनातन प्रभात’,(४.३.२०१०))
औ. ‘भारतातील इतर राज्यांना भूगोल आहे. केवळ महाराष्ट्राला इतिहास आहे !’ - र.वि. जोगळेकर (लोकमत ९.११.२०१०)
अं. पाकिस्तानात ढकललेल्या सिंधू नदीला एकटा महाराष्ट्र मुक्त करेल, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारताला दिलेले वचन ! : ‘दैनंदिन स्नानाच्या वेळी आपल्याकडून म्हटल्या जाणार्या मंत्रात ज्या गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या सप्तनद्यांचा तीर्थ म्हणून आपण उल्लेख करतो, त्यांतील पाकिस्तानात ढकललेल्या सिंधू नदीला सगळे जग जरी विरुद्ध गेले, तरी एकटा महाराष्ट्र मुक्त करील.’ - स्वातंत्र्यवीर सावरकर (दैनिक सनातन प्रभात, (७.३.२०१०))
३. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी केलेली महाराष्ट्राची अधोगती !
३ अ. महाराष्ट्र आणि इतर राज्ये यांची तुलना
३ अ १. देशाची आर्थिक राजधानी राज्यात असूनही छोट्या गुजरात इतकेही राष्ट्रीय उत्पन्न मिळवू न शकणारा महाराष्ट्र ! : ‘देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात असल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे महत्त्व अनन्यसाधारण असेच राहिले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे १३ टक्के उत्पन्न महाराष्ट्राचे आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरातला मुंबई मिळाली नाही, तरीही त्याचे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण १९.८ टक्के अर्थात महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. एकट्या गुजरातमध्ये गेल्या वर्षी देशातील २५ टक्के गुंतवणूक झाली.’ (दैनिक सनातन प्रभात, वैशाख शु. दशमी, कलियुग वर्ष ५१११ (४.५.२००९))
३ अ २. अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये सर्वोच्च असलेल्या पंजाबच्या तुलनेत दहापटीने मागे असलेला महाराष्ट्र ! : ‘महाराष्ट्रात २००५ ते २००८ या काळात २० लक्ष लोकांच्या नोकर्या गेल्या, म्हणजेच १ कोटी मराठी जनता होरपळली गेली. मंदीनंतरच्या तीन-चार महिन्यांत १५ लक्ष जणांच्या नोकर्या गेल्याचे वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे. अन्नधान्याविषयी देशात सर्वोच्च दरडोई उत्पादन पंजाबचे ९८५ किलो, तर कर्नाटकमध्ये १८६ किलो आणि गोव्यात १०४ किलो असतांना महाराष्ट्रात मात्र केवळ १०० किलो इतकेच आहे. भारतातील दुसर्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न ४७ सहस्त्र रुपये एवढे महाराष्ट्रात असले, तरी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येविषयी महाराष्ट्र तिसर्या क्रमांकावर आहे.’ - पी. साईनाथ, संपादक (ग्रामीण विकास), द हिंदु. (दैनिक सनातन प्रभात, ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११२ (२७.६.२०१०))
३ अ ३. सर्वांत असुरक्षित रेल्वेप्रवास असलेले राज्य अशी ख्याती मिळवून अपराधात बिहारलाही पिछाडीवर टाकणारा पुरोगामी महाराष्ट्र ! : ‘सर्वांत असुरक्षित रेल्वेप्रवास महाराष्ट्रात आहे. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश आणि बिहार यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २००४ मध्ये धावत्या गाडीतील गुन्ह्यांची संख्या १ सहस्त्र ३१४ होती. ती सातत्याने वाढतच गेली आणि २००८ पर्यंत १ सहस्त्र ७९५ पर्यंत पोहोचली. मध्यप्रदेश येथे २००४ मध्ये रेल्वेत घडलेल्या गुन्ह्यांची संख्या १ सहस्त्र ३५९ एवढी होती. त्यांत महाराष्ट्राच्या तुलनेत सातत्याने घट झाल्याचे दिसून येते. बिहारमध्ये अशा प्रकारच्या १ सहस्त्र १८४ घटनांची नोंद झाली आहे. शासकीय अभ्यासातील आकडेवारीनेच ही गोष्ट प्रकाशात आणली आहे.’ (दैनिक सनातन प्रभात, श्रावण शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५१११ (२३.७.२००९))
३ आ. सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणार्या महाराष्ट्राची झालेली दुःस्थिती !
१. महाराष्ट्रावर ३ लाख १० हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. व्याजापोटी शासनाला २६ सहस्त्र कोटी रुपये द्यावे लागत आहेत.
२. तोट्यातील महामंडळे आणि साखर कारखाने यांच्या हमीपोटी शासनाला सहस्त्रो कोटी रुपये द्यावे लागत आहेत.
३. शेतकर्यांची कर्जमाफी, तोट्यातील महामंडळाची कर्जमाफी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आदींसाठी घोषित केलेल्या सहस्त्रो कोटी रुपयांच्या पॅकेजचे नेमके काय झाले, हा प्रश्नच आहे.
४. झोपडपट्ट्यांमध्ये रहाणार्यांपैकी २५ टक्के लोकांनाही शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. ६० लाख लोक झोपडपट्टीत रहात असून ‘८१ लोकांमागे एक शौचालय’, अशी दयनीय अवस्था आहे.
- श्री. उद्धव ठाकरे, कार्याध्यक्ष, शिवसेना (लोकसत्ता, १२.७.२०१०)
४. महाराष्ट्राचे वैरी !
४ अ. पूर्वीपासूनच मराठ्यांची एकजूट होऊ न देण्याची काळजी घेणारे दिल्लीचे राज्यकर्ते ! : ‘महाराष्ट्रातील राज्य मुख्यत्वे मराठ्यांचे ! ते एकत्र येणार नाहीत, इतकी काळजी दिल्ली घेते. शिवकालातही मराठे एकत्र आले नाहीत. आता तर नाहीच ! होळकर पानिपतावर गेले नाहीत, तसे आताही चालते.’ - श्री. माधव गडकरी (सामना, दसरा-दिवाळी विशेषांक २००३ )
४ आ. गांधीजींच्या खुनाचे निमित्त करून लांगूलचालन करणार्यांनी मराठी माणसांचे पानिपत घडवून आणणे : ‘शिवाजीच्या काळापासून ते आजवर महाराष्ट्राचा स्वाभिमान सर्वांना नडत आहे. प्रथम तो मुसलमानांना आणि त्यांना पाठिंबा देणार्या स्थानिक मराठा सरदारांना नडला. नंतर तो राजपूत, जाट आणि शीख यांना नडला. दिल्लीचे तख्त मराठ्यांनी हालविले. त्यांना वाटले, मराठे फार दूर दख्खनमध्ये रहातात. दिल्लीच्या सिंहासनाचे खरे मालक आपणच. त्यानंतर इंग्रज, पोर्तुगीज आणि फ्रेंच यांना ‘दिल्लीवर सत्ता गाजवावी’, अशी स्वप्ने पडू लागली. मराठे त्यांनाही नडू लागले. स्वातंत्र्य १८५७ सालीच मिळाले असते; पण शीख, गुरखे आणि राजेरजवाडे त्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या आड आले अन् नानासाहेब पेशवे ‘युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया’चे पहिले पंतप्रधान व्हायचे राहून गेले. मग क्रांतीकारकांची मोठी फौज उभी राहिली; पण वासुदेव बळवंत फडक्यांपासून ते हॉटसन गोगट्यांपर्यंत बिनीचे शिलेदार मराठी होते. ज्यांना प्रथम मुसलमान व नंतर इंग्रजी सत्तेजी हुजरेगिरी एवढाच अनुभव पाठीशी होता, असे राज्यकर्ते झाले. त्यांच्या मनात कोठेतरी खुपत होते, ‘आम्ही या पदाला लायक नाही, गादीचे खरे मालक मराठेच आहेत.’ एवढ्यात गांधीजींच्या खुनाचे निमित्त करून त्यांनी मराठ्यांचे दुसरे पानिपत घडवून आणले.’
४ इ. महाराष्ट्राची अवहेलना करणारे यशवंतराव ! : ‘देशापेक्षा नेहरू मोठे’, असे लाचार शब्द उच्चारणार्या यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सत्ता आली. त्यांनी महाराष्ट्राची जेवढी म्हणून अवहेलना करायची, तेवढी करून घेतली.’ - दादूमिया (मासिक धर्मभास्कर, जानेवारी २००९)
४ ई. महाराष्ट्राच्या राष्ट्राभिमानावर अविश्वास दाखवणारे काँग्रेसचे राजीव गांधी आणि अस्मिताहीन शरद पवार अन् मुरली देवरा ! : ‘राजीव गांधींनी १९९० च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबईत केलेले
भाषण महाराष्ट्राच्या जिव्हारी लागणारे झाले होते. दक्षिण मुंबईत मुसलमानबहुल वस्तीत मस्तान तलाव येथे रात्री २.३० वाजता त्यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी काश्मीरच्या राज्यपालपदावरून जगमोहन यांची हकालपट्टी केलेल्या निर्णयाचे समर्थन केले. ‘‘जगमोहन यांनी बाहेरच्या राज्यातील सनदी नोकर काश्मीरमध्ये सेवेत रुजू केल्याने काश्मीरचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्या राज्यात फुटीरतावादाला प्रोत्साहन मिळाले’’, असे सांगून राजीवजींनी ‘‘मुंबईच्या मंत्रालयात बाहेरून सनदी अधिकारी आणून ठेवले, तर दुसर्या क्षणाला महाराष्ट्र भारतातून फुटून निघण्याची मागणी केल्यावाचून रहाणार नाही’’, असे उद्गार काढले. त्या वेळी व्यासपिठावर शरद पवार आणि मुरली देवरा उपस्थित होते !’
४ उ. काँग्रेसला असलेले मराठी माणसाचे वावडे ! : ‘दिल्लीत अर्जुन सिंग यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारून काही गोष्टींची निश्चिती करून घेत होतो. तेव्हा ते मला म्हणाले की, ‘एखादा राजकारणी मराठी असेल, तर तो काँग्रेसी असला, तरीही तो मराठी आहे, हे दिल्ली कधीही विसरत नाही. त्यामुळे दिल्ली कधीही शरद पवारांना पंतप्रधान बनू देणार नाही.’
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई. (दैनिक सनातन प्रभात, ज्येष्ठ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१११ (७.६.२००९))
प्रतिक्रिया
1 May 2011 - 4:44 pm | विनायक प्रभू
कळ्ळा.
1 May 2011 - 5:06 pm | मन१
अपेक्षित वाटला.
--मनोबा.
1 May 2011 - 7:13 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त..अभ्यास पुर्ण लेख..खुप मेहनत घेतली असेल लिहिताना असे जाणवते.. ..छान..
1 May 2011 - 11:55 pm | पंगा
या वाक्यात विरोधाभास आहे, की केवळ मलाच तसे भासत आहे?
2 May 2011 - 8:47 am | नितिन थत्ते
>>पण शीख, गुरखे आणि राजेरजवाडे त्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या आड आले अन् नानासाहेब पेशवे ‘युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया’चे पहिले पंतप्रधान व्हायचे राहून गेले.
मनोराज्य चांगले आहे. पण स्वातंत्र्यप्राप्तीच्या आड येणार्यां राजेरजवाड्यांमध्ये मराठी राजे किती होते याची माहिती काढली आहे का?
मराठी नेते स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्राला विसरतात असे लेखकाचे मत असले तरी अर्जुनसिंगांचे मत अगदी उलट दिसते (आपण मराठी आहोत हे ते कधीही विसरत नाहीत).
2 May 2011 - 12:04 pm | योगप्रभू
अनेक लोकांनी मराठीपणाबाबत कुठेतरी लिहिलेली अवतरणे एकत्र करुन लिहिलेला लेख हा ठिगळे जोडून केलेली गोधडी वाटतो.
बर्याच गोष्टी गोंधळात पाडतात. इतक्या मुद्द्यांची सरमिसळ झालीय, की प्रतिक्रियाही लेख होऊ शकेल. असो.
महाराष्ट्राने मोगलांचे आक्रमण रोखलेले नाही. औरंगजेबाने दक्षिणेतील त्याचे उपद्रवक्षम शत्रू म्हणजे मराठे + आदिलशाही + कुतुबशाही यांना पार उद्द्धस्त केले आहे आणि मुलखावर वरवंटा फिरवला आहे. मराठ्यांना अशा आक्रमणांची सवय असल्याने आणि ते गनिमी काव्याने लढत असल्याने ते याही स्थितीत अस्तित्व टिकवून राहिले. आदिलशाही आणि कुतुबशाही मात्र इथेच खालसा झाल्या. मराठ्यांनी औरंगजेबाचे थडगे बांधले वगैरे ढोल किती पिटणार? १६८१ ला महाराष्ट्रात उतरलेला आलमगीर चक्क १७०७ पर्यंत महाराष्ट्रातच जिवंत होता. तो वृद्धापकाळाने मेला. त्याला कुठल्याही लढाईत धरुन मारलेला नाही. मराठ्यांनी औरंगजेबाला उत्तरेत परत जाऊ दिले नाही, हे म्हणणे पण गंमतीचे आहे. तो दिल्लीला परत गेला असता तर त्याला कोण अडवणार होते?
पानिपतच्या लढाईत मराठे रक्त सांडत होते तेव्हा गंगा-यमुनेचे पुत्र कुठे होते?
मराठ्यांनी दिल्लीच्या बादशाहीचे रक्षण करण्याचा करार करुन त्या बदल्यात गंगा-यमुनेच्या दुआबात खंडणी व चौथाया वसूल करण्याचा हक्क घेतला होता. कराराप्रमाणे त्यांना अब्दालीशी युद्ध करणे भाग होते. त्यात इतरांचा काय संबंध. पानिपतच्या लढाईपूर्वी मराठ्यांनी रजपूत/शीख/जाट यांच्याशी संबंध बिघडवून घेतले होते. ते लोक अलिप्त राहिले, पण पुढे मराठ्यांचा पराभव झाल्यावर त्यांनी धर्माचे भाऊ म्हणून मदतही बरीच केली आहे. सूरजमल जाट आणि रजपुतांनी पराभूत मराठा सैन्याला आपल्या मूळ मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्यास, तसेच उपचारांची मदत केली आहे. पानिपतचा पराभव आपल्या चुकांमुळे झाला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध मराठ्यांनी सुरु केले असेल तर मंगल पांडेने गोळी झाडली आणि बंडाला सुरवात झाली, हा इतिहास आपण कशासाठी शिकलो? नानासाहेब पेशव्याप्रमाणेच या स्वातंत्र्ययुद्धात अवधच्या बेगमेचा आणि इतरांचाही महत्त्वाचा वाटा होता.
बाकी अनेक मुद्दे आहेत, पण प्रतिक्रियेचाच लेख होईल म्हणून विस्तारभयास्तव थांबतो.