✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धूसर असेल तर ती स्पष्ट केली पाहिजे!

ग
गुंडोपंत यांनी
Mon, 10/11/2010 - 11:07  ·  लेख
लेख
वैधानिक इशारा - धोका पुढे दीर्घ आणि काही लोकांच्या मते वैचारिक प्रश्न मांडणारे लेखन आहे. आपापल्या जबाबदारीवर वाचावे. डोक्याला त्रास झाल्यास गुंडोपंत जबाबदार नाहीत! सध्या मिसळपाव वरील सिद्धहस्त लेखक आणि अभ्यासक धनंजय यांचे लेखन येत का नाही, असा प्रश्न पडला. थत्ते यांच्या कृपेने धनंजयच्या खरडवहीत त्याचे उत्तरही मिळाले. ते पुढील प्रमाणे - सध्या संपादनाबद्दल आचारसंहिता फारच धूसर आहे. काही प्रमाणात तरी ती स्पष्ट झाली तर बरे. सध्या कुठले लेख संयत असून अप्रकाशित होतील, कुठल्या ठिकाणी फक्त प्रतिसादच अप्रकाशित होतील, ते मला समजत नाही. उगाच लांबलचक लेखा-प्रतिसादाच्या लिहिण्याची जोखीम का घ्या? म्हणून फक्त "अतिसुरक्षित" विषयांवरच येथे चर्चा करेन. तूर्तास "प्रेमकविता", "कवितांच्या वृत्ताबद्दल चर्चा" या विषयांवरचे लेख/प्रतिसाद उडणार नाहीत, याबद्दल खात्री वाटते आहे. पुढे कधी धोरणांबद्दल आंतरिक ओळख होऊ लागली, तर राजकारण, संस्कृती, वगैरे विषयांना हात घालेन. हे वाचून मी चाट पडलो आणि वाईटही वाटले. मिपा इतके उघडे वागडे (ओपन या अर्थाने) स्थळ जालावर नाही. असे असतांना धनंजय सारख्या संयत लेखकाला लेखनाला मुरड घालावी लागावी? मला हे आश्चर्यजनक वा टते! संपादनाबद्दल आचारसंहिता धूसर असेल तर ती स्पष्ट केली पाहिजे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच संकोच नाही का? संपादकांच्या संपादनात किंवा सदस्यांच्या वावरात अशी कोणती कमी आहे? धोरणात स्पष्टपणा आणणे इतके अवघड आहे का? मी मागे उपक्रमावरही हा विषय काढला होता तेथे हे उपाय मी लिहिले होते आणि उत्तम प्रतिसादही आले होते. मराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय एखादा लेख नाकारल्यावर तो पारदर्शक रितीने नाकारला आहे ही लेखकाला पटावे आणि एकूणच व्यवस्थापन पारदर्शक रितीने व्हावे यासाठी मला खालचे नियम नि मुद्दे सुचले. सर्व लेख संपादन मंडळाच्या नजरेखालूनच प्रकाशनास जातील. आवश्यक असल्यास मंडळ लेख संपादित/अप्रकाशित करेल. लेखाचे संपादन झाल्यास, आपले म्हणणे मांडण्याचा लेखकाला हक्क आणि संधी दिली जाईल. यासाठी लेखकाला लेख कसा योग्य आहे हे मंडळाला पटवून द्यावे लागेल. मंडळाच निर्णय अमान्य झाल्यास लेखकाला निरीक्षक समितीकडे जाता येईल. यासाठी लेखाच्या समर्थनासहित संपादकांच्या निर्णयाचे खंडन करणाऱ्या लेखासह अर्ज करावा लागेल. निरीक्षक समितीचाही निर्णय मान्य नसल्यास प्रशासकांकडे जाता येईल. मात्र त्यांचा निर्णय अंतिम असेल. संपादन मंडळ मुख्य संपादक, सहसंपादक, लेखनिक, सचिव (आपण नाय बाबा लेखनिक होणार हा) या मंडळामध्ये मध्ये ३/७/९/११ असे विषम सभासद असावेत. याच्या ऑनलाईन बैठका व्हायला हरकत नसावी. मंडळाचे कामकाज सदस्यांना बैठका झाल्यावर खुले असेल. संपादन मंडळाचे सदस्य होण्यासाठी पात्रता- किमान ३ महिने सदस्यत्वाचे झालेले असावेत. ७५० शब्दांचे किमान ५ लेख प्रसिद्ध केलेले असावेत. किमान १० चर्चां मध्ये साधक बाधक असा सहभाग दिसावा. मंडळाचा कार्यकाळ ६ महिने (की एक वर्ष?) असा असावा. (किती असावा बरं?) संपादना साठी वेळ देण्याची तयारी असावी. (कसा म्हणे?) संगणकीय लिखाणाची सवय असावी. (हे कसे सिद्ध करणार बुवा?) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही ग्राहक सौजन्याचे नियम माहीत असणे आवश्यक. (पाहू का रे गुंड्या तुझ्याकडे आं?) या संपादक मंडळाच्या वर निरीक्षक समिती असावी. संपादक मंडळात वाद झाल्यास किंवा लेखकांस संपादक मंडळाचा निर्णय मान्य नसल्यास निरीक्षक समिती काम सुरू करेल. तोवर हस्तक्षेप करणार नाही. (म्हणजे तोवर मुकाट गंमत पाहावी) यात किती सदस्य असावेत? निरीक्षक समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी पात्रता किमान ३ महिने सदस्यत्वाचे झालेले असावेत. १००० शब्दांचे किमान ५ लेख "संदर्भांसहित" प्रसिद्ध केलेले असावेत. किमान १० चर्चां मध्ये साधक बाधक असा सहभाग दिसावा. संपादनासाठी वेळ देण्याची तयारी असावी. संगणकीय लिखाणाची सवय असावी. यांनाही ग्राहक सौजन्याचे नियम माहीत असणे आवश्यक आहे. (परत तेच?) सर्व लेखनावर अंतिम निर्णय प्रशासकांचा राहील. (झालं! हे आहेच का वर अजून?) सर्व मंडळांची निवड निवडणूकीने व्हावी. (हे ठीक आहे) निवडणूकीचा जाहीरनामा आपापल्या खरडवही वर लावता येईल.सभासदाच्या सहमतीशिवाय व्यनिचा वापर करत येणार नाही. (किंवा करता येईल अशी सोय सभासदस्यत्व देतानाच करता येईल का?) याविषयी आपल्याला काय वाटते? यातून पारदर्शकता साधली जाईल का? यात काय भर घालणी आवश्यक राहील? (हे अती होते आहे का? पण मग इतर मार्ग काय?) आपला (नियमीत) गुंडोपंत ------------------ या लेखावर साती यांनी कल्पना मांडली होती की, "www.sureshbhat.in इथे केलेल्या प्रयोगाप्रमाणे काही (विवादास्पद) लेख "विचाराधीन" या नावाखाली साठवून सदस्यांना आणि व्यवस्थापकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात यावी. हा लेख साधारणतः एक ते दोन दिवस तेथे असावा आणि नंतरच त्याचे भवितव्य ठरवावे. या कालावधीत मूळ लेखकालाही 'हा लेख उडू शकतो त्यामुळे दुसरीकडे जपून ठेवावा' याची कल्पना येईल. " तर शशांकरावांनी उत्तर दिले होते, "माझ्यामते ३ किंवा ५ सदस्यांची एक "संचालन समिती" असावी. संचालन समितीत जाळ्यावर आणि विविध संस्थळांवर वावरण्याचा प्रदीर्घ अनुभव असणार्‍या सदस्यांचा समावेश असावा. संस्थळाचे सर्व धोरणात्मक निर्णय या समितीने विचारांती आणि सर्वानुमते घ्यावेत. ५ ते ७ सदस्यांचे "संपादन मंडळ" असावे. यात जाळ्यावर आणि विविध संस्थळांवर वावरण्याचा अनुभव असलेले (शक्यतो वेगवेगळ्या टाइमझोन मधील) सदस्य असावेत. (संपादनासाठी वेळ, इच्छा आणि जाळ्याची जोडणी या गोष्टी गृहीत धरल्या आहेत.) दोन्ही समित्यांतील लोकांनी संपादनाचे धोरण निश्चित करावे. संपादनाचे सर्वाधिकार संपादन समितीकडे असतील आणि संचालन समिती त्यात हस्तक्षेप करणार नाही. आता हे मोठे चित्र ("बिग पिक्चर":)) झाले. पण काही प्रश्न अनुत्तरित आहेत. उपरोल्लिखित सदस्यांची नेमणूक कशी करावी? (मराठी संस्थळांवर वावरणारे आणि ह्या जबाबदार्‍या पार पाडू शकणारे लोक संख्येने मर्यादित असल्याने ही निवड फारशी अवघड असणार नाही पण तरीही) संपादन मंडळाच्या सदस्यांनी (जे वेगवेगळ्या ठिकाणी आणि टाइमझोनमध्ये आहेत) परस्पर संवाद कसा साधावा आणि निर्णय कसे घ्यावेत? इ. इ. (अर्थात ही फक्त कल्पना आहे यावर अधिक विचार होणे आवश्यक आहे.) हे सर्व झाले संस्थळ चालवणार्‍यांसाठी, सदस्यांनी काय करावे? मला वाटते, आपण सदस्यांनी तारत्म्याने आणि स्वयंस्फूर्तीने कोणत्या संकेतस्थळावर कोणत्या स्वरूपाचे लेखन प्रकाशित करावे याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे वागणे हा योग्य उपाय आहे. अमुक एक लेखनप्रकार 'क' संस्थळाच्या धोरणाशी सुसंगत नाही पण 'ख' संस्थळावर प्रकाशित करता येतो हे माहीत असेल तर असे लेखन 'ख' संस्थळावरच प्रकाशित केले तर 'नरका'ची गरज भासणार नाही. तसेच लेख, चर्चाविषय आणि प्रतिसादात व्यक्तिगत संदर्भ, टीका इ. येणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घेतल्यास 'आपापसात'ची गरज भासणार नाही. असे झाल्यास योगेशरावांनी म्हटल्याप्रमाणे कालांतराने संपादन मंडळाचीच गरज राहणार नाही :) अवांतर - बराच विचार करूनही 'गुंडोपाय' सारखा शब्द सुचला नाही म्हणून प्रतिसादाला "विचार करण्यासारखे" असे म्हणावे लागले :)" या उत्तरा प्रमाणेच मिसळपावावरील सध्याची रचना असावी असे दिसते. मग तरीही घोळ कुठे आहे? संपादकीय पारदर्शकता ही गोष्ट इतकी मोठी का बनते आहे की लेखकाला लिहावेसे वाटू नये? ------------------------------------------------------- संपादक मंडळाने काय करावे, कसे करावे ह्याबद्दल सदस्यांनी विनाकारण टिप्पण्या करणारे लेखन करु नये हे धोरणात स्पष्ट लिहिलेले असतानाही हे लेखन इथे आले. संपादक मंडळाची भूमिका खाली प्रतिसादात मांडली आहे (चित्राताईंचा प्रतिसाद पाहावा.) सर्व सदस्यांना धोरणांची कल्पना यावी म्हणून हे लेखन वाचनमात्र करुन ठेवण्यात येत आहे. परंतु अशाच पद्धतीचा धागा यानंतर आल्यास तो तात्काळ अप्रकाशित करण्यात येईल. संपादकीय धोरण पुरेसे स्पष्ट झाले असावे अशी आशा आहे! धन्यवाद! -संपादक मंडळ
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6445 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

संपादकीय पारदर्शकता ही गोष्ट

अवलिया
Mon, 10/11/2010 - 11:26 नवीन
संपादकीय पारदर्शकता ही गोष्ट इतकी मोठी का बनते आहे की लेखकाला लिहावेसे वाटू नये? लेख वाचला, कदाचित माझ्या मनात येणारे तुरळक विचार लेखात मधुन मधुन डोकावतांना दिसले. बरे वाटले. बरेच दिवसांपासुन मिपावर लिहावेसे वाटत नव्हते याचे कारण समजले असे वाटते. गुंडोपंतांना धन्यवाद. माझ्यापाशी माझ्या मनातले विचार मांडण्याचे कसब नाही, हे काम हलके केले त्याबद्दल आभार. लेखावरील चर्चा वाचण्यास उत्सुक पण त्यापुर्वी हा लेख संपादित होऊ नये अशी परमेश्वरापाशी प्रार्थना !
  • Log in or register to post comments

सर्व लेख संपादन मंडळाच्या

विजुभाऊ
Mon, 10/11/2010 - 14:44 नवीन
सर्व लेख संपादन मंडळाच्या नजरेखालूनच प्रकाशनास जातील. ही अट अवघड आहे. संपादकाना दुसरा काहीच उद्योग नाहीय्ये का? आणि मिपा ज्या नियमावलींच्या विरोधात अस्तित्वात आले त्याच तत्वाना सुरुंग लागतोय. १००० शब्दांचे किमान पाच लेख ही अट फारच अवघड आहे, ती अगदी काटेकोरपणे अमलात आणली तर ब्रीटीश टिंग्यासारख्या खट्याळ वाचक मित्रांचे कसे काय होणार? संपादकांवर टीका करायची नाही हे योग्य आहे.पण त्याच वेळेस एखादे संपादक एखाद्या सदस्याविरुद्ध आकसाने काही करणार नाहीत याची कोणतेच संपादक खात्री देऊ शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

चला म्हणाजे मिपाचे लवकरच भारत

इंटरनेटस्नेही
Mon, 10/11/2010 - 12:56 नवीन
चला म्हणाजे मिपाचे लवकरच भारत सरकार होणार तर! :(
  • Log in or register to post comments

धन्यु ...

छोटा डॉन
Mon, 10/11/2010 - 14:54 नवीन
श्री. गुंडोपंत एवढ्या सविस्तर लेखाबद्दल आणि चिंतनाबद्दल आभार. आपल्या लेखातले अनेक मुद्दे रोचक वाटले. असो, ह्याबरोबरच मी आपल्याला समान पातळीवर "आंतरजालीय सामान्य सदस्याचे वर्तन, समज आणि स्वतःला घालुन घेणे आवश्यक असेल अशी आचारसंहिता" ह्या बाबतीवरही असेच चिंतन करुन भाष्य करावे ही विनंती करतो. आपल्या गहन चिंतनाच्या पश्चात जो दिर्घ आणि परखड लेख येईल व त्यानंतर सामान्य लेखकांचे किंवा सदस्याम्चे जे "प्रबोधन" होईल त्यानंतर आंतरजालावर "संपादक" ह्या पदाची गरज राहणार नाही असे वाटते, काय म्हणता ? संपादक पदाच्या निवडणुकांची किंवा पात्रतेची नियमावली बनवण्यापेक्षा ते पद असण्याचीच गरज राहणार नाही अशी परिस्थिती बनवायला का मदत करु नये ? पटतेय का ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

डिस्क्लेमर

नितिन थत्ते
Mon, 10/11/2010 - 15:11 नवीन
धनंजय का लिहित नाहीत या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी गुंडोपंतांना धनंजय यांच्या खरडवहीचा हेडर मजकूर वाचण्याचा सल्ला दिला असला तरी सदर लेख, त्यातील विचार आणि असा लेख लिहिण्याची आवश्यकता आहे/नाही या विषयी माझा कोणताही विचारविनिमय गुंडोपंतांशी झालेला नाही. (सावध)
  • Log in or register to post comments

जाऊ द्या हो ...

छोटा डॉन
Mon, 10/11/2010 - 15:15 नवीन
जाऊ द्या हो थत्तेचाचा, विचारविनिमय होवो अगर न होवो, ते एवढे महत्वाचे नाही. मी वर मांडलेल्या "स्वतःला घालुन घ्यायच्या आचारसंहितेबद्दल" तुम्हाला काय वाटते ? आपण डायरेक्ट मुळावरच घाव घालु की ! - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

-१००

नितिन थत्ते
Mon, 10/11/2010 - 15:32 नवीन
धाग्यावर चर्चा करायची नाही असे वेळोवेळी बजावण्यात आहे त्यामुळे इथे चर्चा करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

पंतआजोबा काय झाले ?

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/11/2010 - 15:17 नवीन
पंतआजोबा काय झाले ?
  • Log in or register to post comments

धुसर

प्रकाश घाटपांडे
Mon, 10/11/2010 - 17:22 नवीन
धुसर प्रतिमांचे हवे तसे आकार / अर्थ काढता येतात. स्पष्ट दिसल्यास त्यातली मजा जाते.
  • Log in or register to post comments

+१

ज्ञानेश...
Mon, 10/11/2010 - 17:47 नवीन
यावरून चित्तरंजन यांचा एक शेर आठवला- "दिसू लागले स्पष्ट जेवढे, स्पष्टपणाने धूसर झाले, ठार आंधळा झालो तेव्हा, दृष्य खरे दृग्गोचर झाले !"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हम्म

चित्रा
Mon, 10/11/2010 - 19:10 नवीन
वरील लेखन खरे तर मिपावर ठेवण्याचे कारण नाही. मध्यंतरी नीलकांत यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना किंवा संपादक मंडळाला मिपावर काय कार्यपद्धती असावी, यासंबंधी निरोप पाठवला असता तर ते अधिक योग्य ठरले असते. तरीही एक स्पष्ट करू इच्छिते- येथे कोणी काय, कधी, किती लिहावे यासंबंधीचे निर्णय हे त्या लेखकावर सोपवावे. संपादक मंडळाने काय करावे यासंबंधीचे निर्णय त्या संपादक मंडळावर. कोणाला संपादक मंडळावर काम करण्याची इच्छा असली तर ती इच्छा त्यांनी नीलकांत यांना बोलून दाखवावी. संपादक आणि लेखकांना आपली आपली आयुष्ये असतात, त्यातून वेळ मिळेल तसे संपादन/लेखन ते करीत असतात. संकेतस्थळांचे चालक अधिक लिहू शकत नाहीत/लिहीत नाहीत, म्हणून त्यांनी चालकत्व सोडून द्यावे असला कोणी आग्रह केल्याचे मला आठवत नाही. संपादक म्हणून कोणाला ठेवावे, हा निर्णय चालकांचा असतानाही त्यासंबंधी सूचना करायच्या असल्या तर त्या व्यनितून कराव्यात हे योग्य झाले असते, त्यासंबंधाने संपादक मंडळापैकी सदस्य लिहीत आहेत का नाही, किती अक्षरांचे किती लेख लिहीत आहेत ही चर्चा हवी असली तर ती तशी वेगळी करावी. "मराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय" चांगले आहेत, आणि ते संपादक मंडळाने बर्‍यापैकी स्विकारलेले आहेत, असे माझे मत आहे (एक्स्टर्नल निरीक्षक सोडून). लेख का अप्रकाशित केला याबद्दल संपादक एकमेकांचे मत जाणून घेत असतात. त्यात प्रत्येकाची मते वेगळी असल्याने वादही होत असतात. शक्यतोवर एकदा काही संपादक सदस्यांनी मिळून एकमताने निर्णय घेऊन अंमलात आणला तर अगदीच चुकीचे असल्याशिवाय इतर संपादक त्यात परत दखलअंदाजी करीत नाहीत. काही बाबतीत निर्णय पटला नाही, तर तेही मोकळेपणाने लिहीले जाते. पुढच्या वेळी असे होऊ नये म्हणूनही चर्चा होते, संपादक आपली मते मांडतात, हे मी पाहिले आहे. मिपा इतके उघडे वागडे (ओपन या अर्थाने) स्थळ जालावर नाही. असे असतांना धनंजय सारख्या संयत लेखकाला लेखनाला मुरड घालावी लागावी? याचे उत्तर धनंजय यांनीच द्यावे. माझ्या मते मिपावर येणारे बरेचसे विविध प्रकारचे लेखन हे अनेक वेळा स्विकारले गेले आहे. धनंजय यांचे कुठचेही प्रतिसाद अप्रकाशित झालेले मला दिसले नाहीत. झाले असले तर एकच लेख अप्रकाशित झाला असावा (त्याचे विशिष्ट कारण संपल्यानंतर लेख अप्रकाशित झाला असावा, ते आठवत असेलच. तेही तेव्हा माझ्या आठवणीप्रमाणे संपादक मंडळ सध्या आहे त्याप्रकारे अस्तित्वात नव्हते), किंवा लेख अप्रकाशित केल्यानंतर दिला प्रतिसादही त्याच्याचबरोबर अप्रकाशित झाला असावा). धनंजय यांचा स्वत: दिलेला एकही प्रतिसाद कधी अप्रकाशित झाला नाही. हे काही धनंजय ह्यांना वेगळी वागणूक आणि इतरांना वेगळी असे म्हणून झालेले नाही, तर धनंजय यांच्या लेखनामुळे असे करण्याची वेळच कधी आलेली नाही. असे असले तरी धनंजय यांची मते संपादक मंडळातील सदस्यांपेक्षा वेगळी आहेत ना? तरी त्यांच्या मतांचा आदर होत असला, आणि बाकी काही सदस्यांचे प्रतिसाद अप्रकाशित करावे लागत असतील तर याचे कारण संपादक मंडळ धनंजय यांना घाबरून आहे आणि बाकीच्यांवर अरेरावी करते असे नसून काही वेगळे असावे याचा विचारही व्हावा. असो. याहून अधिक अशी माझ्याशी चर्चा करायची असल्यास व्यनिमधून करावी.
  • Log in or register to post comments

अतिशय संयत

प्राजु
Mon, 10/11/2010 - 20:35 नवीन
अतिशय संयत प्रतिसाद.. यापेक्षा चांगला प्रतिसाद संपादक मंडळाकडून काय असू शकेल? खूप आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

तसा थोडा जुना मथळा आहे

धनंजय
Mon, 10/11/2010 - 21:23 नवीन
खरडवहीत तसा थोडा जुना मथळा आहे. त्यावेळी काही संयत लेख अप्रकाशित झाले होते असे आठवते. (माझे नव्हते). सध्या त्या प्रकारचा अनुभव येत नाही. पण पुन्हा कधी असा काही प्रकार होईलही. खूप सदस्य कुठल्यातरी बाबतीत संतापतील, आणि संपादकांना स्थळ चालू ठेवण्यासाठी पुन्हा अनियमित कारवाई करावी लागेल. तेव्हा पुन्हा आग लागल्यावर विहीर खणण्याऐवजी, आताच्या शांत काळात अशा प्रकारची धोरणे (आचारसंहिता) संपादकांनी स्वतःसाठी बनवावी. ती "धोरणे" लाथाळीसाठी धागा म्हणून नव्हे, तर संकेतस्थळाच्या व्यवस्थापकीय माहितीत प्रसिद्ध करावीत, असे मला राहूनराहून वाटते. म्हणून खरडवहीवरील ते वाक्य काढून टाकलेले नाही. संपादक मंडळ सेवाभावी आहे, त्यांना नसत्या प्रक्रिया करण्यास वेळ नाही, या सगळ्या गोष्टी मला समजतात. माझी त्याबद्दल सहानुभूती आहे. तरीही आता थोडीशी पूर्वतयारी केली, तर तातडीच्या वेळेसाठी खूप मदत होईल, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा