तुमचे असे होते का माहिती नाही, पण माझ्या बाबतीत कधीतरी असे होते की काहीतरी महत्त्वाचे आठवायचे असते, पण काही केल्या त्याक्षणी तरी आठवत नाही. मागून कधीतरी गरज नसताना आठवूनही जाते, पण त्याक्षणी जी माहिती हवी असते ती काही मिळत नाही. अशाच प्रसंगांमधून गेलेल्या दोन सॉफ्टवेअर संशोधकांनी समोर ठेवलेल्या पर्यायाबद्दल ऐकण्याचा प्रसंग आताच मागील काही दिवसांमध्ये आला. यांची नावे आहेत - गॉर्डन बेल आणि जिम गेमेल. हे दोघे मायक्रोसॉफ्टमध्ये कामाला आहेत. त्यांच्या संशोधनाची दिशा ही आपल्या (म्हणजे मानवी आयुष्याबाबतीत) अनेक मूलभूत असे प्रश्न उपस्थित करेल अशी वाटली.
खरे तर आजकाल अनेक शहरी माणसांची आयुष्ये (किंवा आयुष्याचे मोठे भाग) हे एका अर्थाने इंटरनेटावर असतात. त्याखेरीज कामाव्यतिरिक्त आपल्यापैकी बरेच जण ब्लॉग लिहीतात. त्यातून आपले अनुभव, आपली माहिती, फोटो, कविता आणि गाणी, हे सर्व इतरांपर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न असतो. त्या अर्थाने याला एक सोशल - सामाजिक मिती (डायमेन्शन) आहे. जे आपल्या अगदी नजिक उपलब्ध नसते, म्हणजे समविचारी वाचकवर्ग, आणि कधी मित्र-मैत्रिणीसुद्धा या आपण अशा माध्यमांमधून मिळवीत असतो. त्याअर्थाने आपल्या शारीर अस्तित्त्वाचाच हा एक जरा सांधलेला, वाढवलेला भाग असतो. जरी ह्या गाठी-भेटी प्रत्यक्ष दिसत नसल्या, तरी त्यातून आपल्याला आवश्यक अशी सहानुभूतीची किंवा स्विकारण्याची, समाजाचाच एक भाग असण्याची भावना जागरूक होत असते.
पण गॉर्डन बेल आणि जिम गेमेल ह्यांचा हा प्रयोग त्या अर्थाने सामाजिक नाही, वैयक्तिक आहे. आयुष्यातील लहानात लहान घटनांच्या नोंदी ठेवण्याचा हा प्रयोग आहे. गॉर्डन आणि जिम याला "लाईफ ब्लॉगिंग" म्हणतात. नेहमीच्या ब्लॉगिंग मधील आणि यातील फरक असा की हे लाईफ-ब्लॉगिंग हे स्वतःच्या आठवणींसाठी ठेवलेले आहे; वाचक, मित्र, सुहृद यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी नाही. या आठवणींत तुमचे व्हिडिओ, लेखन, उद्या तुमच्या मेंदूने आठवणींच्या बाबतीत दगा दिला, तर त्या आठवणींच्या नोंदी - असे सर्व तुम्हाला हव्या त्या क्षणी "रीकॉल" करण्याची, उतरवून घेण्याची, ही सोय आहे. जिम गेमेल याचे उदाहरण देताना म्हणतात - काहीसे धक्कादायक वाक्य आहे - की जसे मी आयुष्यात फ्लश टॉयलेटची अपेक्षा करतो, तसेच आयुष्यातील आठवणींचे आहे, त्याही माझ्यापुढे हवे तेव्हा उपलब्ध असल्या पाहिजेत.
गॉर्डन यांनी आपल्या आयुष्यातील अशा सर्व लहानमोठ्या घटनांच्या नोंदी "माय लाईफ बिट्स" म्हणून ठेवल्या आहेत. आणि जेव्हा ते अशा त्या ठेवू लागले तेव्हा जमलेल्या सगळ्या विद्याचे (डेटाचे) वर्गीकरण करणे हे त्यांना कठीण होऊ लागले. यासाठी त्यांनी जिम गेमेल यांची मदत घेतली. गॉर्डन म्हणतात की "ह्या नोंदींचा एक फायदा असा की ती तुमच्या आयुष्यातील नको तो पसारा दूर करते - त्याला गॉर्डन डिजीटल फेंगशुई म्हणतात! - क्लीन लिव्हिंग. तुम्ही "पोर्टेबल" /"चलत" बनाल, तुमच्या आठवणी, तुमच्या सर्व नोंदी एका प्रकारे तुमच्या सतत सांगाती राहतील. इतकेच नाही, मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे तुमचा भूतकाळ तुम्हाला हवा तेव्हा समोर हजर असू शकतो - आठवणींच्या रूपात, वेगवेगळ्या पद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक विद्याच्या (डेट्याच्या) रूपात.
ही (इंग्रजी) मुलाखत एनपीआर रेडिओवरील "ऑन पॉइंट" कार्यक्रमाचे संचालक टॉम अॅशब्रूक यांनी घेतली आहे. ऐकण्यासारखी आहे.
http://www.onpointradio.org/stand-alone-player?fileUrl=http%3A%2F%2Fwww....
हे ऐकताना प्रश्न दोन प्रकारचे पडले -
१. ही अशी इ-मेमरी असणे आपल्यापैकी किती जणांना खरेच आवडेल? आवडल्यास का, आणि नावडल्यास का नाही?
२. या सर्व विद्याची (डेट्याची) नोंद कोण करणार? तो पूर्णपणे सुरक्षित असेल का? उद्या तुमच्या इ-मेमरीत ढवळाढवळ करणे कोणाला शक्य होईल का?
३. ह्या सर्व प्रकारात जर अनेक देशातील अनेकजण अशा आयुष्यभराच्या इलेक्ट्रॉनिक नोंदी ठेवत गेले, तर नक्की अशा सर्व संगणकीय "पसार्या"ला इ-जागा तरी किती लागेल?
हे प्रश्न जरी सध्या काहीसे शंका असल्याप्रमाणे वाटले, तरी फेसबुक, ट्विटर यांचे जसे सार्वत्रिकीकरण चटकन झाले, तसेच याही कल्पनेचे होऊ शकते असे वाटले. म्हणून म्हटले विचारून पाहू, तुमचे मत काय आहे?
प्रतिक्रिया
24 Sep 2009 - 8:45 am | प्राजु
आजच एकेठीकाणी ललिता सहस्त्रनाम पठणासाठी गेले होते.. तिथे पूजे नंतर श्रीसूक्त म्हणायला मला सांगितले.. एरवी मी ते झोपेतही म्हणू शकते पण आज ऐनवेळी एका ठराविक ओळीनंतर मला पुढची ओळ काही केल्या आठवेना... शेवटी "सॉरी! " म्हणून वेळ काढली.
जर अशी विद्याच्या रूपात आठवणींना साठवणं शक्य असेल तर ते काही वेळेला चांगलेही ठरेल तर काही वेळेला नको असलेल्या आठवणीसुद्धा त्यात नोंद होत राहतील. सध्या तरी मत इतकेच. बाकी काही मुद्दे राखून ठेवत आहे.
चित्रा ताई, नवी माहिती मिळाली लेखातून. धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Sep 2009 - 8:46 am | सहज
सिलेक्टीव्ह मेमरी ओन्ली प्लीज!
बाकी इ-वेस्ट जास्त न होण्याची म्हणजे ब्लॉग, फेसबुक , ऑर्कूट इ इ ठिकाणचा फाफटपसारा न वाढवण्याची, अर्थात "ग्रीन इ-लिव्हिंगचे" मी समर्थन करतो!
बर्याच लोकांचे आवडते पुरुष जॉर्ज क्लूनी यांचे एक वचन लिहतो, काहीसे धक्कादायक वाक्य आहे.
“I would rather have a prostate exam on live television by a guy with very cold hands than have a Facebook page.”
24 Sep 2009 - 8:53 am | पाषाणभेद
"गॉर्डन म्हणतात की "ह्या नोंदींचा एक फायदा असा की ती तुमच्या आयुष्यातील नको तो पसारा दूर करते"
पण मेंदूत एंबेड असलेल्या आठवणींचा 'पसारा ??' कसा काय दुर होवू शकतो? काहीतरी आपले दोन पदार्थांची भेसळ करायची व त्याला नवीन नाव द्यायची फॅशन आहे. मान्य आहे की आपण मायक्रो नोंदी ठेवू शकू, पण हे वेगळे संशोधन कसे? याला नोबेल मिळेल काय?
माणसाला रोबो बनवण्याचे पालथे धंदे दुसर काय?
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
24 Sep 2009 - 9:27 am | विंजिनेर
धक्कादायक मतप्रवाह. माझ्या मते, विचार किंवा स्मरणशक्ती हे कुठल्याही एका ठोकताळ्यात बसवू शकत नाही.
म्हणजे असे की आता एखादी गोष्ट आपल्याला घोकंपट्टी केल्याशिवाय लक्षात "राहात" नाही (जसे २९ चा पाढा ...) पण काही गोष्टी कुठल्याश्या आठवणी/वास/चव इ. शी निगडीत असल्याने आपोआप लक्षात राहतात. दुसरा पदर म्हणजे काही गोष्टी नजिकच्या भविष्यकाळापुरत्याच स्मरणात राहतात तर काही दीर्घकाळ.
हे झाले लक्षात "ठेवण्या"पुरते.
दुसरे असे की दरवेळी त्याची नोंद कशी करणार/करणार का?(उदा, तुम्ही मन लावून वाफाळत्या भाताबरोबर कोळंबीच्या हुमणाचे भुरके मारता आहात आणि तुम्हाला आठवले की वीजेचे बील आजच भरले पाहिजे तर त्याची नोंद कशी करणार ;) असो. )? त्याला लागणारा वेळ अनेक पटींनी जास्त असतो. तो वेळ खर्ची पाडणे आपल्याला पटेल काय?
तिसरे असे की कुठल्याही नोंदीशी निगडीत असलेल्या भावना - त्यांची अचूक/नेमकी नोंद कशी करणार/का करावी?
शिवाय वर सांगितल्याप्रमाणे विद्याची सुरक्षितता वगैरे नंतरच्या गोष्टीही आहेत पण त्या माझ्यामते गौण आहेत.
एकूण काय - मत विरोधी आहे..
24 Sep 2009 - 1:26 pm | JAGOMOHANPYARE
कोणत्याही दुखा:वर काळासारखे औषध नाही , अशी एक म्हण आहे.. विस्मरण हा या औषधाचा गाभा आहे... असली मेमरि आली तर ही म्हण कुचकामी होऊन जाईल का ?
24 Sep 2009 - 1:47 pm | अमोल केळकर
खूप नवीन माहिती मिळाली . धन्यवाद
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
24 Sep 2009 - 6:39 pm | चित्रा
प्रतिसादांबद्दल सर्वांची आभारी आहे.
>काही वेळेला नको असलेल्या आठवणीसुद्धा त्यात नोंद होत राहतील.
>कोणत्याही दुखा:वर काळासारखे औषध नाही , अशी एक म्हण आहे..
खरेच आहे. मुलाखतीच्या वेळी एका बाईने फोन केला, तीही हेच म्हणाली - की काही गोष्टी या विसरण्यासाठीच असतात, त्याही अशा प्रकारे जिवंत राहतील. (एका अर्थाने मला हे पटले).
>मेंदूत एंबेड असलेल्या आठवणींचा 'पसारा ??'
हो, ना. पसारा म्हणजे सटरफटर गोष्टी, नको तेव्हा मध्ये मध्ये पायात येऊन अडकवणार्या गोष्टी. (अर्थात मानवी मेंदू राहणारच, तेव्हा हा पसारा आपण इमेमरीत ढकलून दिलेला आहे असे वाटणे वेगळे, आणि तो खरेच आठवणीतून
काढून मेंदूतला 'पसारा' आवरणे हे वेगळे)..
पण मुख्य मुद्दा असा की यामुळे सटरफटर गोष्टींत अधिक वेळ जाऊ न देणे, हवे तेव्हा हवी ती आठवण समोर उभी करणे. इ. शक्य होईल.
टॉम अॅशब्रुक यांनी घेतलेल्या वर उल्लेख केलेल्या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे अशा अनेक गोष्टी, जसे जन्माचे दाखले (बर्थ सर्टिफिकीटे) हवे तेव्हा कुठे ठेवले आहेत तेथून काढता येणे. (हे सर्व इ-मेमरी असल्याने कदाचित लायब्ररीत वापरतात तसा "मेटा-डेटा" वापरून "सर्च", शोध घेता येणे शक्य होईल. - म्हणजे झाले "टोटल रीकॉल".)
>बाकी इ-वेस्ट जास्त न होण्याची म्हणजे ब्लॉग, फेसबुक , ऑर्कूट इ इ ठिकाणचा फाफटपसारा न वाढवण्याची, अर्थात "ग्रीन इ-लिव्हिंगचे" मी समर्थन करतो!
'ग्रीन इ-लिव्हिंग' छान शब्द आहे. कॉईन करण्यासारखा. पण जॉर्ज क्लूनी यांच्या वाक्याला काय अर्थ आहे? त्यांना मिळवण्याची प्रसिद्धी, हवे ते मित्र-मैत्रिणी मिळवून झाली/झाले आहे, एवढाच. माझा तर अनुभव असा आहे की मुले फेसबुकवर आहेत म्हणून आज मोठे झालेले आई-बापही फेसबुकचा अकाउंट काढून लिहीताना दिसतात.
त्याचे समर्थन करते आहे असे नाही, किंबहुना अनेकदा मी स्वतः ग्रीन इ-लिव्हिंगचा वापर करते : म्हणजे जेव्हा दुसर्याच्या प्रतिसादाला +१ लिहीते तेव्हा! :) किंवा अजूनच चांगले म्हणजे प्रतिसादच देत नाही, किंवा लेखच लिहीत नाही तेव्हा! पण असे फार ताणू नको या, नाहीतर सगळी संकेतस्थळे बंद करण्याची वेळ येईल आणि ते कोणाला परवडेल?!
>तुम्ही मन लावून वाफाळत्या भाताबरोबर कोळंबीच्या हुमणाचे भुरके मारता आहात आणि तुम्हाला आठवले की वीजेचे बील आजच भरले पाहिजे तर त्याची नोंद कशी करणार Wink असो. )?
अगदी. असाच प्रश्न मला पडला. शिवाय या नोंदी कोण करणार आणि कशा, आणि त्यात किती वेळ जाणार? हे प्रश्न सध्यासाठी तरी अनुत्तरित राहिले. या दोघांचे पुस्तक अजून वाचलेले नाही, कदाचित त्यात ही उत्तरे मिळतील.
24 Sep 2009 - 9:49 pm | श्रावण मोडक
या नोंदी कोण करणार आणि कशा, आणि त्यात किती वेळ जाणार? हे प्रश्न सध्यासाठी तरी अनुत्तरित राहिले. या दोघांचे पुस्तक अजून वाचलेले नाही, कदाचित त्यात ही उत्तरे मिळतील.
हेच. वाचून जरूर कळवा. या विषयात रस आहे. आत्ता या घडीला मात्र या प्रश्नांची उत्तरे ही गोष्ट शक्य नाही अशीच येतात. कारण त्या अर्थाने आज तरी आपण तंत्रज्ञानाचा वेळोवेळी स्मृतीकोष म्हणून वापर करतोच. मोबाईलमध्ये क्रमांक साठवणे, इलेक्ट्रॉनिक डायरीत पत्ते साठवणे हे बाहेरचे. घरच्या संगणकावरही असे बरेच काही असते. यासाठी ब्लॉगींगची काय गरज आहे हे कळत नाही. कारण हे काम तसेही अगदी साध्या स्वरूपातही करता येतेच संगणकावर. त्यामुळं या कल्पनेतील नावीन्य असे काय हे कळत नाही.
24 Sep 2009 - 10:21 pm | चित्रा
नाविन्य असे नाही, आपण ते करतोच. पण फरक असा असेल की आपले सर्वच आयुष्य डिजीटाईज्ड असेल. तुमचे फोटो, व्हिडिओ, पेपर, फोन, चॅट, तुमची रोजची (फुटकळही) संभाषणे, तुमच्या ट्रिपांची रेकॉर्डस, असे सगळेच, सगळ्या संवेदना या एका सरोगेट मेमरीत दाखल व्हाव्या आणि कायमच्या राहाव्यात. तुम्ही ज्या खोलीत बसला आहात समजा तेथे डिजीटल व्हिडिओने कोणी खोलीचे चित्रण करून ठेवले, तर खिडकीतून कसा प्रकाश येत आहे इथपासून ते तुम्ही प्रत्येक मिनिटाला काय केले त्याचे, किंबहुना अशा प्रकारे तुमच्या आयुष्याचे पूर्ण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार व्हावे असे हे आहे. हे येथून स्पष्ट व्हावे -
http://www.cnn.com/2006/TECH/10/16/explorers.memory/
बाकी पुस्तक वाचल्यावर अभिप्राय कळवीनच.
24 Sep 2009 - 10:30 pm | मदनबाण
आपले सर्वच आयुष्य डिजीटाईज्ड असेल.
त्याचा त्रास होऊ शकेल काय? समजा तुमचे चित्रीत केलेले काही खाजगी क्षण कोणी डेटा चोराने चोरले किंवा सगळेच साठवलेले सामान कोणी डिलीटवले तर टाळक्याला मुंग्या येतील काय ?
(सामान्य आयुष्य जगणे सोपे की डिजीटाईज्ड ? :?)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
यांची मैत्री पहा...
http://eng.chinamil.com.cn/news-channels/2009-09/24/content_4046764.htm
http://eng.chinamil.com.cn/special-reports/2008hjdjhd/indexg.htm
24 Sep 2009 - 10:38 pm | श्रावण मोडक
बातमी वाचली. एकदम '१९८४' ची आठवण झाली. बिग ब्रदर इज वॉचिंग यू. असो.
आता फक्त तुमच्या अभिप्रायाची आणि जमल्यास वरील प्रश्नांची उत्तरे पुस्तकातून मिळत असल्यास त्या माहितीची प्रतीक्षा.
24 Sep 2009 - 10:48 pm | चेतन
थोडा वेगळा आहे पण
विल स्मिथच्या एनिमी ऑफ दी स्टेट ची आठवण झाली.
चेतन
24 Sep 2009 - 10:46 pm | स्वाती२
नविनच माहिती चित्रा. मला नाही आवडणार असे डिजीटाईज्ड आयुष्य. दुसरे म्हणजे आपली नैसर्गिक स्मरणशक्ती कमी वापरल्याने एकंदरीतच मेंदूच्या कार्यक्षमतेचा र्हास होईल का?
24 Sep 2009 - 10:56 pm | श्रावण मोडक
आपली नैसर्गिक स्मरणशक्ती कमी वापरल्याने एकंदरीतच मेंदूच्या कार्यक्षमतेचा र्हास होईल का?
हे खरंच शक्य असतं का? आपण ठरवूनही कोणतीही गोष्ट विसरू शकत नसतो. विस्मृतीत जाणं ही अशी प्रक्रिया आहे की जी माणसाला ठरवून करता येत नाही. त्यामुळे ती डिजिटाईज्ड मेमरी ही फक्त आपल्यासाठी विस्मृतीत गेलेल्या गोष्टी पुन्हा स्मृतीकोषात आणण्याचे साधन ठरते.
24 Sep 2009 - 10:58 pm | अवलिया
डोकं भणभणलं. चित्राताईंचा हा धागा परत क्लिक करायचा नाही ही नोंद पटकन सापडेल अशी करुन ठेवावी लागेल.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
24 Sep 2009 - 11:30 pm | चतुरंग
सोडून हे सगळे साठवून वगैरे ठेवणे बरेच अनैसर्गिक वाटते. आपल्याला मेंदू दिलाय त्याचा वापर तसाही अब्जावधी गोष्टी साठवून ठेवत करत असतो. पाहिजे त्या वेळी पाहिजे ती गोष्ट हवीच ह्या सदरात ज्या गोष्टी येतात त्या दुसरीकडे विदा स्वरुपात साठवण्याची काळजी घेतली जातेच. (उदा. बँकेसंबंधी डीटेल्स, हिशोब, कामासंबंधीचा विदा इ.)
आपले आयुष्य म्हणजे फक्त विदा नव्हे. ती अनेक जिवंत व्यक्तींची कथा असते. त्यात अंदाज आहेत, आडाखे आहेत, चूक-बरोबर आहे, सगळ्या ज्ञानेंद्रियांनी घेतलेले अनुभव आहेत, यशापयश आहे, संगीत, नृत्य, गायन, वादन, मैफिली, पुस्तके, तसेच निवांत पडून रहाणे, निरुद्देश भटकंती, मैलोनमैल ताणून केलेले ड्रायविंग, पावसात चढलेले डोंगरदर्या असं सगळं सगळं आहे आणि ते तसंच आठवणीतून झिरपलेलंच छान वाटतं. कित्येक दु:खाच्या आठवणी हळूहळू पुसट होत जातात, त्याच्या जखमा भरुन येतात, व्रण राहतात पण ते तितकेसे त्रास देत नाहीत फक्त 'अमुक तमुक झालं होतं' इतकीच याद देतात. या ऐवजी सगळेच सतत ताजेतवाने राहिले तर आपल्या मनाचा क्षोभ होत राहील. अशा आठवणी मेंदूत साठून त्रास होऊ नये म्हणून निसर्गाने केलेली व्यवस्था आपण इ-विदा साठवून मोडीत काढू कारण दु:खद आठवणी सुद्धा सतत ताज्याच!
"ह्या नोंदींचा एक फायदा असा की ती तुमच्या आयुष्यातील नको तो पसारा दूर करते - त्याला गॉर्डन डिजीटल फेंगशुई म्हणतात! - क्लीन लिव्हिंग. तुम्ही "पोर्टेबल" /"चलत" बनाल, तुमच्या आठवणी, तुमच्या सर्व नोंदी एका प्रकारे तुमच्या सतत सांगाती राहतील.
अधोरेखित वाक्ये एकमेका विरोधी वाटतात. एकीकडे 'कचरा' काढून टाकणे आहे आणि दुसरीकडे तोच 'कचरा' ई-विदा स्वरुपात व्यवस्थित साठवून ठेवणे आहे, सतत तुमच्याबरोबर! ;)
एकूणच प्रथम वाचनात तरी हा प्रकार फारसा रुचला नाहीये! :(
कदाचित काही विचारांती उपयोगाचेही मुद्दे सुचू शकतील पण सध्या इतकेच.
चतुरंग
25 Sep 2009 - 12:43 am | प्रभाकर पेठकर
ह्यातून मेंदूच्या स्मरण विभागाची निष्क्रियता वाढीस लागेल. जसे कॅलक्यूलेटरच्या वापरापासून पाढे विस्मृतीत गेले, मोबाईलच्या 'काँटॅक्ट लिस्ट' मुळे फोन नंबर लक्षात (कधीकधी अगदी स्वतःच्या घरचाही) राहात नाहीत. मोबाईलच्या विविध अलार्म सेवांमुळे आवश्यक अशा अपॉइन्ट्मेंट्स, दूसर्यांचे वाढदिवस लक्षात राहात नाहीत तसे, सर्व विदा 'बाहेर' साठवून ठेवण्यास सुरुवात केली तर मेंदू इतर महत्वाचे विदाही साठवणे, हाताळणे विसरू लागेल.
तरूण वयातच अल्झमेर व्याधीला आमंत्रण दिल्यासारखे होईल.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
25 Sep 2009 - 8:54 am | दशानन
+१
अगदी खरं बोललात काका !
हा असा अनुभव मला आला आहे खुपदा...
मला माझाच नंबर आठवत नाही :(
डिस्कटॉप स्टिकी वापरण्याची जास्त सवय होती... पण जरा शोधा शोध केल्यावर कळाले की आपली बुध्दी गंजत आहे डिजिटल गोष्टीवर जास्त अवलंबून राहिल्यामुळे !
मग तेव्हा पासून मोबाईल रिमांडर / स्टिकी / ऑनलाईन रिमांडर हे सगळे बंद करुन टाकले... !
***
बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस व भाच्यांचा वाढदिवस दोन्ही ह्या वर्षी विसरल्यामुळे.... घरी फोन केला की शिव्याच पडत आहेत [(
***
राज दरबार.....
25 Sep 2009 - 12:54 am | चित्रा
सर्वांनाच धन्यवाद, एक मोठा प्रतिसाद सर्वांना लिहीत होते तो काही कारणाने पुसला गेला. जर याचवेळी माझ्या कीबोर्डाच्या कळीचा प्रत्येक स्ट्रोक जर काँप्युटरने कायमचा साठवून ठेवला असता तर बहुदा मला हा प्रतिसाद परत लिहीण्याची वेळ आली नसती! तेव्हा चतुरंग, हा घ्या हे संशोधन उपयुक्त असू शकण्याचा पुरावा.
गंमत असो. पण खरेच लिहीलेले सगळे पुसले गेले!
>कोणी डेटा चोराने चोरले किंवा सगळेच साठवलेले सामान कोणी डिलीटवले तर टाळक्याला मुंग्या येतील काय ?
नक्कीच याव्यात!
> न वापरल्याने कार्यक्षमतेचा नाश होईल का?
कदाचित नाही. कार्यक्षमता म्हणण्यापेक्षा मेंदूला लागणार्या ट्रेनिंगचा/शि़क्षणाचा लय होईल. पण हे माझ्यापेक्षा इतर या विषयाचा अभ्यास असलेलीच व्यक्ती सांगू शकते.
>अधोरेखित वाक्ये एकमेका विरोधी वाटतात.
वाटतात खरी. पण मला वाटते त्यांना कचरा म्हणजे अशा गोष्टींना म्हणायचे आहे की जे तुम्हाला या क्षणी नको आहे. तुम्हाला नंतर कधी वाटले की या कचर्यात तुमची महत्त्वाची आठवण हरवली आहे, तर असा कचरा हवे तर शोधायला परत असेलच.
>आपले आयुष्य म्हणजे फक्त विदा नव्हे.
अगदी बरोबर. म्हणूनच नक्की हे लोक विदा कशाला म्हणतात, तो कसा मिळवतात त्याची उत्सुकता आहे.
>आता फक्त तुमच्या अभिप्रायाची आणि जमल्यास वरील प्रश्नांची उत्तरे पुस्तकातून मिळत असल्यास त्या माहितीची प्रतीक्षा.
बापरे, कामाला लावलेत की. हे पुस्तक तसे माझ्या यादीत मागे आहे. आत्ता इतर काही वाचते आहे. पण वाचून झाल्यावर लगेच कळवीन.
>चित्राताईंचा हा धागा परत क्लिक करायचा नाही ही नोंद पटकन सापडेल अशी करुन ठेवावी लागेल.
त्यासाठी आत्ता तरी डोकेच वापरले पाहिजे. बरे का भाऊ?!
25 Sep 2009 - 9:36 am | अवलिया
>>>>त्यासाठी आत्ता तरी डोकेच वापरले पाहिजे. बरे का भाऊ?!
नेमके तेच नसल्याने परत क्लिक केलीच बघा ताई! ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
25 Sep 2009 - 5:34 am | अनिला
दिन दर्शिका, चित्रे, हार्ड ड्राईव्ह, रोजनिशी अन वाण्याची यादी, सामानाची यादी, फोटो सग्ग्ळ एकातच!! अन सगणक उघडायला सकेताक्श् र कुठुन आणणार? कारण तो विसरला तर?