प्रतापगड ( Pratapgad )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
16 Nov 2020 - 7:30 pm

किल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासातील एक सुवर्णपान ! महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा बुलंद किल्ला बांधला.सह्याद्रीच्या सपाट माथ्यावर ठाई-ठाई दुर्ग वसलेले आहेत. जगात कुठल्याही पर्वतावर एवढ्या संख्येने दुर्ग नाहीत. सह्याद्रीच मस्तक या दुर्गांनी नटलेली असल्यामुळे या परिसरातील क्षितीज रेषा चित्रकार झाल्या आहेत. सह्याद्री हिमालायाएवढा विस्तीर्ण व उत्तुंग नसला तरी वयाने वडील आहे. त्याचा भेद मजबूत आहे. संपूर्ण दक्षिणापथापर्यंत पसरलेला म्हणजेच संपूर्ण दक्षिण भारतापर्यंत पसरलेला हा सह्याद्री त्याचा उल्लेखसंस्कृत वाड्:मयामध्ये अपरांत म्हणजे ‘कोकण’ व दक्षिणपथ म्हणजे "दख्खन' यातील सह्य प्रदेश असा आहे. या सह्याचेच पुढे सह्याद्री झाले.

दूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणा यांचा एकत्रित मिलाफ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याच्या सीमा विस्तारतांना शिवरायांना विरोध करणार्‍या जावळीच्या मोर्‍यांनी उर्मटपणा करून स्वत:चा सर्वनाश ओढावून घेतला. शिवरायांनी वाघांची जावळी ऊर्फ मोर्‍यांची जावळी ऊर्फ जयवल्ली सुनियोजित हल्ला करून जावळी जिंकली. महाबळेश्‍वर ते रायगड असा विस्तृत भूभाग या विजयाने शिवरायांच्या ताब्यात आला. स्वराज्याची सीमा समुद्राला भिडली. शिवरायांची दृष्टी कोयनेच्या खोर्‍यात असलेल्या पार गांवाजवळ असलेल्या एका डोंगरावर गेली. त्या डोंगराचे मूळ नाव 'रान आडवा गौर' असे आहे. तसेच "ढोळपाळाचा डोंगर" असाही उल्लेख आढळतो. लोक त्यास 'भोरप्याचा डोंगर' म्हणत या भागाचे महत्व ओळखून पारघाटांवर नजर ठेवण्यासाठी या डोंगरावर एक भक्कम दुर्ग बांधला तो म्हणजे प्रतापगड होय. प्रतापगडाचे बांधकाम हे मोरोपंत पिंगळे यांनी केले. महाराजांनी स्वत: बांधलेला हा दुसरा दुर्ग. प्रतापगडाने उभ्या आयुष्यात एक महत्वाचे कार्य मात्र केले ते म्हणजे अफजलखानाचा वध. प्रतापगडाने आपले नाव सार्थक केलेल. शिवरायांनी आपल्या राज्य साधनेच्या प्रयत्नात जी काही युध्दे केली त्यामध्ये प्रतापगडाच्या युध्दाचे महत्व अनन्यसाधारण आहे.

या प्रसंगात स्वराज्य आणि त्याचा जनक या दोघांचे जिवीत पणाला लागले होते. या लढाईमध्ये शिवरायांनी निवडलेले युध्द क्षेत्र, तहाची बोलणी चालवून आपल्या हेतूची पुसटशीही कल्पना न येऊ देता चालवलेले मंत्रयुध्द, जावळीच्या जंगलात लपवलेले सैन्य व त्यांच्या सुनियोजित हालचाली, भेटीची जागा, वेळ, दिवस या गोष्टींचा बारकाईने विचार केला तर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे महाराजांची असामान्य प्रज्ञा. ज्ञात इतिहासामध्ये आतापर्यंतच्या अग्रगण्य लढाया लढल्या गेल्या त्यामध्ये प्रतापगडाची लढाई अव्वल दर्जाची आहे, असे सर्व लष्करी तज्ञांचे, जाणकारांचे आणि देशाच्या सेनानींचे ही मत आहे. पाच पातशाह्याच्या अंगणात स्वराज्याचे रोपटे लावणारे शिवराय. देव, देश, धर्म, भोसले वंशाचा कट्टर शत्रू बलाढ्य मातब्बर सरदार अफजलखान आणि दुसर्‍या बाजूला रूद्रभिषण प्रतापगडाची जावळी. या खोर्‍याच्या दक्षिणेला व उत्तरेला उंच उंच पर्वत व पश्‍चिमेला खोल दर्‍या. सह्याद्रीच्या मगरमिठीत प्रतापगडावर येण्याची चूक केली अफजलखानाने. त्याची किंमत त्यास मोजावी लागली. पसरणीचा घाट, रडतोंडीचा घाट, पारघाट, जावळी उर्फ जयवल्लीच्या जंगलात अफजलखानाचा पुरता बिमोड झाला. प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोंव्हेंबर १६५९ रोजी भोसले व्देष्टा अफजलखान ठार मारून धुळीस मिळविला. आदिलशाही सैन्याचा फार मोठ्या प्रमाणावर पराभव झाला आणि नवनिर्मित स्वराज्याचा आत्मविश्‍वास गगनाला भिडला गेला.

विमानातून पाहिल्यास किल्ल्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो.

प्रतापगडाच्या इतिहासात डोकावल्यास १६५६ मध्ये चंद्रराव मोऱ्याचा पराभव करुन महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यावर तिथले किल्लेही महाराजांनी जिंकले. त्यावेळी जावळीच्या खोऱ्यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर भोरप्या डोंगर एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. शिवाजीमहाराजांनी जावळी खोरे जिंकल्या नंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांनी २४ सप्टेंबर १६५६ मध्ये भोरप्या डोंगरावर हा बुलंद व अभेदय किल्ला बांधून पुर्ण केला असे चिटणीसाची बखर माहिती देते. यातील उल्लेख असा आहे, 'प्रतापगडी मेट मेढा बांधीले होते.ते जागा फार चांगली पाहून किला वसविला, त्याचे नाव प्रतापगड ठेविले.' ( पृष्ट क्रमांक- ५५) पण जुन्,जुलै, ऑगस्ट या कालावधीत या परिसरात पड्णारा पाउस लक्षात घेता हि माहिती योग्य वाटत नाही. याकाळात ईथे बांधकाम करणे अशक्य वाटते. कदाचित २४ सप्टेंबर रोजी येडका बुरुजाकडून किल्ला बांधण्यास सुरवात केली आणि १६५८-५९ रोजी बांधकाम पुर्ण झाले असावे.शिवाजीमहाराजांनी गडाच्या उभारणीमध्ये विशेष लक्ष दिले होते. नदीच्या परिसरातील प्रदेशाचे संरक्षण करता यावे आणि येथील घाटमार्गांवरून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण असावे, हा मुख्य उद्देश समोर ठेवून गडाची उभारणी करण्यात आली होती.
प्रतापगडचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव ह्यांची नेमणूक केली. इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. चढे घोडियानिशी त्या डोंगरातल्या उंदराला पकडून आणीन ! जिंदा या मुर्दा !' अशा वल्गना करीत निघालेला अफजलखान, तुळजापूरच्या भवानीला अन् पंढरपूरच्या विठ्ठलाला उपद्रव देत, स्वराज्याकडे धावला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोऱ्यात आणले. १० नोव्हेंबर १६५९ म्हणजे मार्गशीर्ष शु.७ शके १५८१ रोजी शिवरायांची फत्ते झाली. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केल्यावर महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली पण जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. दूपारी २ वाजता शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून दिला. स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. जगाच्या इतिहासात जी अनेक युद्ध झाली त्यातील एक अप्रतीम युद्ध इथे झाले. भौगोलिक परिस्थितीचा फायदा स्वतःच्या बाजूने करुन घेऊन शिवाजीराजांनी त्याच्यापेक्षा काही पटीने बलाढ्य अशा आदिलशाही सेनेचा पूर्ण पराभव केला. प्रतिस्पर्ध्याला काही सुगावा लागु न देता काही तासांच्या लढाईत सगळे संपवले गेले. ह्यावेळी शिवाजीराजाकडे अंदाजे सात हजारांचे सैन्य असेल. ह्या युद्धाने आदिलशाहीला खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर राजांनी आदिलशाहीवर केलेल्या चौफेर आक्रमणाने उलटवार करण्याचे त्यांचे बळच खचले. प्रतापगड हा शिवशाहीचा भाग्यमणी ठरला. अफझलखानवधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. इ.स. १६६१ मध्ये महाराजांनी गडावर मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली. छत्रपती राजारामसुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडास आले. पेशवाईत नाना फडणीसाने येथे सखाराम बापूस काही दिवस नजरकैदेत ठेवले होते (१७७८). पुढे ज्यावेळी नाना फडणीसाविरुद्ध दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे चालून आले तेव्हा नानाने १७९६ मध्ये काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घेतला. १८१८ च्या ब्रिटिश-मराठे युद्धानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. सन १६५७ मधे हा गड बांधल्यापासून ते सन १८१८ मधे इंग्रजांनी तो जिंकेपर्यंत तो अजिंक्य राहिला. ह्याला एकच अपवाद होता तो म्हणजे १६८९ साली काही महिने तो मुघलांकडे गेला होता. पण त्यावेळीही तो जिंकून घेतला नव्हता व लगेच परत मराठ्यांनी इ.स. १६९० मध्ये सातारा येथे मोंघलांचा दणदणीत पराभव करुन रामचंद्रपंत व शंकराजीपंत यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तो जिंकुन घेतला.
इ.स. १८६२ मध्ये ईंग्रज सरकारने डोंगरी किल्ल्याचा जो तक्ता तयार केला त्यात असे लिहीले आहे कि, 'प्रतापगड किल्ला अतिशय बळकट असून, आत पाणी विपुल आहे व आत सातार्‍याच्या पोलिस खात्यापैकी १० शिपायांचे एक ठाणे आहे. '
स्वातंत्र्योत्तर काळात या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ मी. उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केले. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने येथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे.

बिकट वाट, दाट गर्दझाडी, उंच कडे, खोल-खोल दर्‍या अशा नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीने प्रतापगड नटला आहे. समसुद्रसपाटीपासून सुमारे 1080 मीटरवर हा किल्ला महाबळेश्‍वर पासून अवघ्या 21 कि.मी. अंतरावर आहे. गडावर महादरवाजा, भवानी मातेचे मंदिर, अफजल्या बुरूज, तलावाचा बुरूज, रहाट तलाव, महाव्दार माची, केदारेश्‍वर मंदिर, श्री शिवरायंचा पुतळा इ.वास्तू आहेत. सर्व बाजूंनी तटबंदिने बंदिस्त असलेला प्रतापगड शिवरायांच्या दुर्ग रचनेचे उत्तम उदाहरण आहे.
कसे जाल :-
रस्त्याने
1) पुणे - महाबळेश्वर हे अंतर १२० किमी आहे.
महाबळेश्वर - प्रतापगड : 22 किमी आहे
2) मुंबई - पुणे - महाबळेश्वर हे अंतर २६० किमी आहे.
महाबळेश्वर - प्रतापगड : 22 किमी आहे
3) मुंबई - प्रतापगड ( मार्गे गोवा महामार्ग - पोलादपूर) २१८ किमी आहे.
रेल्वेने
सातारा हे महाबळेश्वरला जवळचे रेल्वेस्टेशन आहे. सातारा - महाबळेश्वर ५७ किमी आहे.
प्रतापगड सातारा जिल्यातील गिरीदुर्ग आहे. सह्याद्रीच्या रांगेत जावळीच्या खोऱ्यात दाट जंगलामध्ये प्रतापगड किल्ला बांधलेला आहे.बिकट वाट, दाट गर्दझाडी, उंच कडे, खोल-खोल दर्‍या अशा नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीने प्रतापगड नटला आहे. समसुद्रसपाटीपासून सुमारे 1080 मीटरवर हा किल्ला महाबळेश्‍वर पासून अवघ्या २२ कि.मी. अंतरावर आहे. प्रतापगडाच्या पूर्वेस महाबळेश्वर पठार आणि घनदाट जंगल आहे. पश्चिमेकडे पार घाट आणि कोकण परिसर आहे.
महाबळेश्वर येथुन महाडला जाणारी गाडी कुंभरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. प्रतापगडावर असणाऱ्या सोयीसुविधा यामुळे किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. महाबळेश्वरवरुन सुटणारी पर्यटन स्थळांचे दर्शन घडवणारी बस आपल्याला थेट प्रतापगडावर सोडते.महाबळेश्वर बस स्थानकातून सकाळी ९.१५,९.३० व ९.४५ अश्या आहेत. अर्थात पर्यटकांना सोडून या बस लगेच परत येत असल्यामुळे सोयीच्या नाहीत, येताना तंगडतोड करत कुंभरोशीपर्यंत परत यावे लागते. महाबळेश्वर बस स्थानकाचा संपर्क क्रमांक- ( 02168 ) 260485.
दुसरा पर्याय म्हणजे महाबळेश्वरहून पोलादपूरला जाणारी एस.टी. (बस) कुंभरोशी म्हणजे वाडा गावाजवळ आपल्याला सोडते. तेथून प्रतापगडला जाता येते. आपले स्वतःचे वाहन घेवून गेल्यानंतर आपण गडाच्या पायथ्यापर्यंत जावू शकतो. गडाच्या पायथ्याजवळ वाहनतळ आणि इतर व्यवस्था आहेत. किल्ल्याची चढाई जास्त अवघड नसून, पायथ्यापर्यंत आपण वाहन घेऊन जावू शकतो. एकुण गड निवांत आणि व्यवस्थित बघायचा असला तर स्वताच्या वाहनाने गेलेलेच उत्तम.

नकाशा सौजन्य श्री. साईप्रसाद बेलसरे

अर्थात या वाटा झाल्या पर्यटकांसाठी. अस्सल डोंगरभटक्यांसाठी काही अंगातील रग जिरवणार्‍या, जावळीच्या अजूनही घनदाट जंगलाचे दर्शन घडवणार्‍या डोंगरवाटा आहेत.
१) रडतोंडीचा घाट- महाबळेश्वरवरुन मुंबईकडे जाणार्‍या डांबरी रस्त्याने निघाले की आंबेनळी घाटाच्या एका वळणावर एक वाट सुळकन खाली उतरुन प्रतापगडाकडे दाट झाडीतून जाते.हाच एतिहासिक रडतोंडीचा घाट.
२) निसणीची वाट- महाबळेश्वरच्या लॅडविक पॉईंटवरुन एक वाट दरे गावात उतरते , त्या वाटेने किंवा बरोबर एखादा स्थानिक जाणकार असेल तर निसणीच्या वाटेने कोयनेच्या खोर्‍यात उतरुन चंद्रराव मोर्‍यांचे जावळी गाव पाहून प्रतापगड गाठता येतो.
३) प्रतापगडाच्या दक्षिण पायथ्याशी पार नावाचे गाव आहे. तिथे रामवरदायीनी देवीचे मंदिर आहे. ईथून झाडीभरल्या डोंगरवाटेने आपण थेट अफझलखानाच्या थडग्यापाशी पोहचू शकतो.
४) पोलादपुरला उतरुन किनेश्वर गावातून पार घाटाने पार गावात जायचे आणि तिथून प्रतापगड असाही एक पर्याय आहे.

कोणत्याही मार्गाने प्रतापगडावर पोहचलो कि आधी डाव्या हाताला दिसते अफझलखानाची कबर. गडाच्या खाली डाव्या हाताला दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गाशरीफ म्हणजे अफजलखानाची कबर.अर्थात गेली काही वर्षे येथे प्रवेश बंद केला आहे.
गडाची माहिती घेण्यापुर्वी आपण या अफझलखानाच्या कबरीची माहिती घेउया. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी अर्थात १० नोव्हेंबर १६५९ हा दिवस अफझल खानाच्या भेटीसाठी महाराजांनी मुक्रर केला. अंगरख्याखाली चिलखत, पागोट्याखाली शिरस्त्राण आणि हातात वाघनखे घालून प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाचा कोथळा बाहेर काढला. दगाबाज खानासह त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा आणि वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचाही खातमा केला. पण शत्रूच्या मृत्यूनंतर वैर संपते असे मानणाऱ्या महाराजांनी अफझलखानाचा दफनविधी करून त्याची कबर बांधली. इतकच नाही तर कबरीच्या देखभालीसाठी तरतूदही करून ठेवली. ती कबर आजही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जे महत्वाचे प्रसंग घडले त्यातला सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे अफझलखानाचा शेवट. जर कोणी पराक्रमाचा पुरावा विचारला तर या कबरीच पराक्रमाच्या प्रतिक आहेत. पण हाच पराक्रम उद्धवस्त करण्याचा कोणाचा डाव तर नाही ना ? अशी शंका आजही येते. कारण या कबरीचा आकारच महाराजांच्या भव्य पराक्रमाची साक्ष देतो.
सन १८८३.तत्कालिन ब्रिटीश अधिकारी ग्रँड डफ याने महाबळेश्वर परिसरात फिरतानां प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफझल खानाच्या कबरीची दखल घेतली, त्याला या कबरींचे महत्व लक्षात आले. त्याने १९०५ साली छत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतिक बनलेल्या या कबरींचे संवर्धन करण्याची अधिसूचना काढली. या कबरीची नासधूस करणाऱ्यास पाच हजार रूपये दंड आणि तीन महिन्याची शिक्षा करणारा कायदाच केला. पुढे १९१८ साली तत्कालीन कलेक्टर बी ए ब्रॅडन यांनी वनखात्याच्या मालकीची २७ गुंठे जमीन “अफझल खान टोंब” या नांवाने वर्ग केली. पण ती जमीन नेमकी कोणाला केली याची नोंद आढळत नाही. ब्रिटीश सरकारने पुढे २३ नोव्हेंबर १९२३ रोजी “अफझल तुर्बत फंड ” स्थापन केला. त्यामार्फत कबरीची देखभाल होऊ लागली. त्यामध्ये महालकरी (तहसिलदार) आणि पोलिस अधिकाऱ्यांसह चार-पाच ट्रस्टींची नेमणूक करण्यात आली.
१९५२ साली “अफझल तुर्बत ट्रस्ट” स्थापन करण्यात आला. तो पुढे १९५९ ला रद्दही करण्यात आला. या ट्रस्टमधला एक ट्रस्टी गुलाम जैतुल आबेदिन इमामत हा पाकिस्तानात गेला. पण या घडामोडी सुरू असतानाच २० ऑक्टोबर १९६२ साली “ हजरत मोहमद अफझल खान मेमोरियल सोसायटी” या नवीन संस्थेला मुंबईच्या धर्मदाय आयुक्तानी परवानगी दिली. ७३, मेमनवाडा, मुंबई या पत्यावर नोंदणी झालेल्या संस्थेत महमद हुसेन हे सेक्रेटरी तर इम्तियाज कादर, सलिम पटेल, सलिम भाई, आणि युसुफ पटेल हे ट्रस्टी म्हणून कार्यरत होते. या संस्थेने कबरीभोवती अनेक बांधकामे सुरू केली. या ठिकाणी गँगस्टर हाजी मस्तान यानेसुद्धा इथल्या बांधकामानां देणगी दिल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे त्या त्या सरकारच्या काळात जमीनी आणि बांधकामानां परवानग्या मिळत गेल्या. पण पुढे खऱ्या अर्थाने वादाला सुरूवात झाली ती बाबरी मशिद पाडल्यानंतर. कबरीच्या भोवती झालेल्या बांधकामाना हिंदुत्ववादी संघटनानी आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. कबरीचे उदात्तीकऱण रोखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनाची आंदोलने सुरू झाली. त्यातूनच २००४ साली सातारा जिल्ह्यातील पाचवड इथं मोठी दंगल झाली होती. त्यावेळेच्या विधानसभा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड सुरू होती. हिंदूत्ववादी संघटनानी विजयोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर प्रचंड मोठी दंगल आणिँ लाठीचार्ज झाला होता. हा अगाऊपणा कऱणाऱ्या नेत्यानां पोलिसानी चांगलेच सोलटून काढले होते. त्यानंतर या आंदोलनाने आजअखेर पुन्हा डोके वर काढले नाही.

तत्कालिन प्रशासनाने अफझल खानाच्या कबरीच्या वादाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींची एकदा सहलही घडवून आणली होती. त्यानंतर माध्यमांतून वस्तूस्थिती सांगणाऱ्या बातम्या येवू लागल्या. त्यामुळे हिंदूत्ववादी संघटनांची गोची झाली होती. पण पाचवडच्या दंगलीवेळी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी पत्रकारांवर वचपा काढायचा प्रयत्नही केला होता.
खर तर संबधित ट्रस्टीने या कबरीचे उदात्तीकरण केल यात शंका नाही. संस्थेची स्थापना करतानाच ट्रस्टीनी चालूपणा केला होता. हजरत म्हणजे ‘संत’ आणि ‘मोहमद’ म्हणजे इस्लामचे अंतिम प्रेषित...या दोन शब्दांचा खोडसाळपणे आणि जाणिवपूर्वक वापर केला. जेणेकरून त्याला धार्मिक भावनां जोडल्या जातील, मुळात १०० वर्षापूर्वीची कागदपत्रे तपासली की कांहि हिंदू धर्मीय लोक मुलगा व्हावा म्हणून देवाला नवस बोलतात तसा या कबरीला कागदी पाळणा वाहण्याची प्रथा होती. तसेच खानाचा उरूस साजरा केला जायचा. त्यामुळे इतिहासापेक्षा वर्तमान वेगळाच होता. याचाच फायदा उठवत कबरीचे उदातीकरण सुरू झाले होते. त्यामध्ये वन विभागा इतकाच पुरातत्व विभागसुद्धा याला दोषी आहे. खरा इतिहास काय आहे हे ज्यांनी सांगायचे ते या वादापासून पळ काढत आहेत.

अफझलखानाच्या मुळ कबरीचे स्वरुप

द ब पारसनीस यांनी १९१६ मध्ये लिहलेल्या महाबळेश्वर या इंग्रजी पुस्तकात कबरींवर कौलारू छप्पर असल्याचे छायाचित्र आहे. इतिहासतल्या नोंदी आणि संशोधनांची सांगड घालून कबरीं संदर्भात सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. पण याबाबत कोणी गांभिर्याने घेताना दिसत नाही. त्यासंबधी सरकारने एकदा माहिती मागविली होती. पण पुरातत्व खात्याने स्पष्टपणे अहवाल न देता चालढकल केली आहे.
दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी या कबरीच्या उदात्तीकरणाबरोबर या परिसरात अतिरेक्यानां प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप सुरू केला होता. त्याबरोबर कबर उद्धस्त करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे सातारा पोलिस प्रशासनाला २४ तास बंदोबस्त नेमावा लागला. गेल्या अनेक वर्षापासून ८-१० पोलिस या कबरीच्या संरक्षणासाठी तैनात असतात. आजही ऊन, वारा आणि पावसात पोलिसांना जागता पहारा करावा लागत आहे. राज्यातला उच्चांकी पाऊस आणि अंग गोठवणारी बोचरी थंडी यामध्ये पोलिसांचे आतोनात हाल होत आहेत. पण त्यांची दखल घ्यायला कोणी तयार नाही. कबर उद्धवस्त करण्याच्या धमक्या देणाऱ्यानीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून समजून घेतला पाहिजे. कबरीचे उदात्तीकरण रोखलेत पाहिजे. त्यासाठी कबरच उद्ध्वस्त करण्याचा इशाराही गैरच आहे. विशेषतः २००४ पासून कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आला.

PHOTO_20161024_125440.jpg

या कबरीच्या परिसरात अनेक इमारती अतिक्रमण करून बांधण्यात आल्या. त्यामुळे वन जमीनीवर बेकायदेशीरपणे उभारलेली बांधकामे हटविण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. पण वन विभागाने कोणताही कारवाई केली नव्हती. त्याविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली होती. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ही अतिक्रमणे तत्काळ न हटविण्यात आल्यास तेथील वन अधिकाऱ्यांना वनात पाठवू, असा इशारा दिला आहे. आता या इशाऱ्यामुळे वन विभागाला आता कारवाई करावीच लागेल, आणि ती गरजेचीसुद्धा आहे. कारण या अतिक्रमणांच्या विळख्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही झाकला जातोय. गेल्या १५-१६ वर्षापासून या परिसराला १४४ कलम लागू केल्यामुळे कबरीच्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे. त्यामुळे नव्या पिढिला हा इतिहास सांगायचा तरी कसा असा प्रश्न आहे.
सरकारने ही सर्व मालमत्ता ताब्यात घेतली पाहिजे. तसेच अतिरिक्त बांधकामे पाडून अफझलखानाची कबर पाहण्यासाठी खुली केली पाहिजे. त्याठिकाणी सरकारने अधिकृत इतिहास सांगणारे एक दालन उभे केले पाहिजे.

विमानातून अथवा हेलिकॉप्टरमधून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार पंख पसरलेल्या फुलपाखरासारखा दिसतो. महाराष्ट्रातील इतर गडांपेक्षा प्रतापगडास भक्कम आणि आज ही चांगल्या अवस्थेत असलेली तटबंदी आहे. मुख्य किल्ला, माची आणि बालेकिल्ला असे या किल्ल्याचे तीन भाग होतात. मुख्य किल्ला व बालेकिल्ला भागांत तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ३,६६० चौ. मी., तर मुख्य किल्ल्याचे ३,८८५ चौ. मी असून दक्षिणेकडील बुरूज १० ते १५ मी. उंचीचे आहेत. त्यांपैकी अफझल, रेडका, राजपहारा, केदार इ. बुरुजांचे अवशेष टिकून आहेत. अफझल बुरूज हा वैशिष्ट्यपूर्ण असून तो निमुळत्या डोंगर धारेच्या शेवटी आहे. या भागाला माची म्हणतात. कारण अशाच स्वरूपाचे बांधकाम राजगड (सुवेळा व संजीवनी), तोरणा ( झुंजार) या किल्ल्यांवरील माच्यांना आहे.

 

किल्याचा दरवाजा जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. दरवाजा दोन बुरूजा मध्ये लपवला आहे. शत्रू पासून दरवाजा सुरक्षित करण्यासाठी सुरक्षा चोख आहे. त्या काळी जर शत्रू दरवाज्याजवळ पोहोचलो तर त्यांना थोपवण्यासाठी आतील बाजूस तोफ, किल्याच्या वरच्या बाजूने बाणांचा मारा आणि त्या सोबत बुरूजातून तेल सोडण्यासाठी चिरे सोडले आहेत. किल्ल्यावरचा बाजूला एक चौकट आहे. जर शत्रू दरवाजा जवळ आलाच तर तेथून अग्निबाणाचा मारा करता येतो. आजही दरवाजा मजबूत स्थितीत आहे. शिवकालीन परंपरेप्रमाणे आजही किल्ल्याचा दरवाजा रात्री आठ वाजता बंद होतो. दरवाजा वर दोन्ही बाजुला सिंहाचे चित्र कोरलेले आहे.

 

किल्ल्याचा सुप्रसिद्ध टेहळणी बुरूज लांबलचक पसरलेला आहे त्याचे शेवटचे टोक आकाशात घुसल्यासारखे वाटते. पावसाळ्यात पूर्ण गड धुक्यात नाहुन निघतो. त्यावर झेंडा मानाने फडकत आहे.

 

याच बुरूजा खाली आता वहानांच्या पार्किंगची सोय आहे.

या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरूज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो.

प्रतापगडाचा नकाशा

प्रतापगडाचा नकाशा

येथून गडावर जाताना उजव्या बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे. वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. प्रतापगडाचे एक वैशिष्ट्य म्हणजे शिवकालाप्रमाणे आजही महादरवाजा सूर्यास्तानंतर बंद केला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. या महाद्वाराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये. जमिनीपासून उंचावर असल्यामुळे व दरवाजासमोर पायऱ्या असल्याने हत्ती किंवा ओंडक्यांनी धडका देवून दरवाजा तोडता येत नसे. महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत.

प्रचंड तोफ

यातील उजव्या बाजूच्या देवडीत एक तोफ ठेवलेली आहे. महाद्वारातून आत आल्यावर समोरच लांबवर पसरलेली माची आणि चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो.

टेहळणी बुरुजावरुन प्रतापगडाच्या माथ्याचे दृष्य

टेहळणी बुरुजावरुन प्रतापगडाच्या माथ्याचे दृष्य
टेहळणी बुरुज : गडाच्या पायथ्याकडून महादरवाजाकडे जात असताना एक वाट टेहळणी बुरुजाकडे जाते. टेहळणी बुरुजावरून जावळीच्या खोऱ्यातील निसर्ग सौंदर्य पाहता येते. याठिकाणी असलेला ‘भगवा ध्वज’ परिसरात दुरूनच दिसतो.
ह्या टेहळणी बुरुजाला चिलखती तटबंदी आहे म्हणजे मुख्य बुरुजाच्या भोवती आणखी एक चर्या बांधली आहे.तिथे जायला दरवाजे आहेत.इथे अधिकच्या संरक्षणात सैन्य तैनात करणे शक्य होत असे.जरुर जाउन पहावे असे हे दुर्गवैशिष्ट्य आहे.

 

या माचीवरील वाट टेहळणी बूरुजावर जाते. या बुरुजावर ध्वजस्तंभ असुन या बुरुजाखालीच वहानतळ आहे. बुरुजावरून प्रतापगडाचा बालेकिल्ला, जावळीचे खोरे व उजव्या बाजूला एका उंचवट्यावर असलेली अफजलखानाची कबर दृष्टीपथात येते.

इ.स. २०११ साली जिवा महाल बुरुजाच्या ( टेहळणी बुरुज) जवळ तट्बंदीच्या खाली ४० फुटावर चोर दरवाजा सापडला. पुण्याच्या मायभवानी संस्थेच्या श्री. आनंद उतेकर यांच्या नेतॄत्वाखाली उत्खनन केल्यावर ५ फुट उंच आणि ३ फुट र्रुंदीचा हा दरवाजा महादरवाज्यानंतर लगेचच दिसून आला. या दरवाज्या शेजारी अडीच फुट ऊंचीचे हनुमानाचे शिल्प दिसून आले.
टेहळणी बुरुज पाहून परत किल्ल्याच्या महाद्वारापाशी यावे. येथून पायऱ्याची वाट गडावर गेली आहे.

या वाटेच्या डाव्या बाजूस सध्या वापरात नसलेली वाट, दूसरा आणि तिसरा दरवाजा आहे.

 
दोन्ही दरवाजांवर शरभाच्या प्रतिमा दिसतात.

हा तिसरा दरवाजा ओलांडून आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो.

पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण श्रीभवानी मंदिरात पोहोचतो. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे.

प्रतापगडावरील शिवाजी महराजांनी स्थापन केलेली तुळजाभवानीची मुर्ती व समोर काचपेटीत स्फटीकाचे शिवलिंग

अतिभंग अवस्थेतील हि अष्टभुजा महिषासुरमर्दानीची अतिशय देखणी मुर्ती आहे.देवीच्या उजव्या बाजुस सुर्य, डाव्या बाजुस चंद्र आणि मस्तकी शिवलिंग आहे. डाव्या हातात शंख, ढाल, धनुष्य आहे व एका हाताने महिषासुराची शेंडी पकडली आहे. देवीच्या उजवीकडील हातात खडग, बाण व चक्र आहे. एका हातातील त्रिशुळ महिषासुराच्या शरीरात खुपसले आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. भवानीची मूर्ती घडवण्यासाठी लागणारा दगड आणायला मंबाजी नाईक पानसरेना नेपाळ नरेश राजा लीलासेनकडे पाठवले होते. या मुर्तीचे प्रथम राजगडी आगमन झाले व नंतर तिची प्रतिष्ठापना मोरोपंताच्या हस्ते प्रतापगडी करण्यात आली. मोरोपंत पेशवे याने ललित पंचमीचा सुमुहूर्त गाठून देवीची स्थापना केली. या मूर्तीशेजारीच शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग आहे. जर उजेडात शिवलिंग किंवा बाण नीट निरखला तर त्यात बेलाचे व निरगुडीचे पान व शांळूखेतील गंगा दिसते. भवानी देवीच्या डाव्या हाताला एंद्रीय भवानीची प्राचीन मुर्ती दिसते.सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. मंदिरात असलेल्या हंबीरराव मोहितेंच्या तलवारीवर सहा ठिपके आहेत. त्या तलवारीने सेनापतींनी युद्धात सहाशे लोकांचा खात्मा केला होता अशी आख्यायिका आहे. भवानी देवीचे मूळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्याचे होते. १८२० साली सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी इ.स.१८१८-३९ तेथे लाकडी मंडप बांधला. औरंगजेब दक्षिणेत आला असता या मंदिरास उपद्रव झाला आणि हा मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना असुन यांचा १९३५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला.

मुर्तीची स्थापना होऊन जेव्हा ३६५ वर्ष झाली आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने ३६५ मशालीने पुर्ण प्रतापगड रात्रीच्या वेळेस उजळून निघाला होता. त्यावेळेस इतिहास प्रेमींनी गर्दी केली होती .

 
पाण्याचे घंगाळ व दगडी समई

श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा पाहायला मिळतात. गडावर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या तोफा या मंदिरात आणून ठेवल्या आहेत. त्यात वाहून नेता येणारी तोफ आहे. त्यात खडक फोडणारी कुदळ सुद्धा दिसते.
 

मंदिरासमोर दगडी दिपमाळा आहेत. देवळाबाहेर मोठी दीपमाळही पाहण्यासारखी आहे. ह्या दीपमाळेवरच्या खुंट्या हत्तीच्या डोक्याच्या आकाराच्या आहेत. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. त्यानंतर सन १६७४ मध्ये राज्याभिषेकासमयी शिवरायांनी देवीला सोन्याची छत्री अर्पण केली होती. दुर्भाग्यवश सन १९२९ मध्ये देवीचे दागिने व ही सोन्याची छत्री चोरीला गेली.

 

प्रतापगडाचा दक्षिण बुरुज

दक्षीण बुरुजच्या आत असलेले तळे.

मंदिरामागील पायवाटेने आपण गडाच्या टोकावर असलेल्या तळे व तटबंदीत असलेला चोर दरवाजा पाहू शकतो.या तलावातील पाणी गडावरच्या देवताच्या स्नानासाठी राखून ठेवले आहे.

ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते. मंदिरापासून शे-दोनशे पायऱ्या चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथून बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या दरवाज्यावर 'श्रीराम' अशी अक्षरे दिसतात.
बालेकिल्ल्याच्या दरवाज्यावर 'श्रीराम' अशी अक्षरे दिसतात.

या दरवाजावर देखील शरभाच्या प्रतिमा आहेत. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. हा किल्ला बांधला जात असताना जाईच्या मांडवाखाली एक शिवलिंग सापडले व त्याची स्थापना ह्या मंदिरात केली गेली. गडाच्या उत्तरेकडील तटबंदीमध्ये आणि केदारेश्वर मंदिरामागील तटबंदीमध्ये चोर दरवाजे आहेत.
नैऋत्य तलाव

नैऋत्य तलाव
माथ्यावर देवळासाठी व पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी लहानसा बांधीव तलाव आहे. असे आणखी काही पाणीसाठेही गडावर आहेत. तेथूनच किल्ल्यात राहणार्‍या लोकांना पाणी पुरवठा होतो. किल्याला किती जरी महिने वेढा पडला तरी पाण्याचा कमी होणार नाही याची दूरदृष्टी महाराजांना होती हे दिसून येते.

राजसदरेची जागा

राजसदरेची जागा

या मंदिरासमोरील पडीक चौथरा प्रशस्त सदरेचा असून कित्येक महत्वाचे निर्णय, न्यायनिवाडे, मसलती या सदरेतच झाल्या. केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस वाड्याचे अवशेष आहेत. बालेकिल्ल्यावर एक शाळा असुन त्याच्याजवळ वेताळाचे मंदिर आहे.

येथे उजवीकडे बागेच्या मधोमध शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५ मी. उंचीच्या भव्य अश्वारूढ पुतळयाची उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी केले. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने तेथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे. या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. स्मारकाची देखरेख सातारा जिल्हा परिषद करते आणि बगीच्याची देखरेख वन विभाग करते. महाबळेश्वर मध्ये जे प्रवेश शुल्क घेतात त्यातील काही हिस्सा इथे वापरला जातो.
शिवाजी महाराज आरूढ असलेल्या घोड्याचा एक पाय हवेत आहे. त्याचा अर्थ अश्वारुढ योद्धा आजारपणात मृत्यु पावला असा होतो. घोड्याचे दोन पाय वरती असतील तर शहीद आणि चारही पाय जमिनीला टेकले असतील तर वार्धक्या मुळे मृत्यु पावला असा होतो.या पुतळ्याच्या कोरीवकामात एक चुक झालेली दिसते. शिवाजी महाराजांच्या हातात जी तलवार आहे ती बाकदार आहे तर कंबरेला जे म्यान आहे, ते सरळ आहे.अर्थात त्यात तलवार बसणे शक्यच नाही.
या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे.

रेडका बुरुज

गडाच्या वायव्येला तटबंदीमध्ये बांधलेला रेडका बुरूज दिसतो.

यशवंत बुरुज

गडाच्या ईशान्य टोकाला अनुक्रमे दुपदरी बांधणीचा रेडका बुरुज आहे.

यशवंत बुरुज व रेडका बुरुज या दोन बुरुजांमध्ये नासके तळे व गोडे तळे आहे. त्याच्यापुढे सूर्य बुरूज आहे.

तसेच प्रतापगडाला महादरवाज्याशिवाय घोरपडीचे चित्र असणारा चोर दरवाजा देखील आहे. या दरवाज्यास राजपहाऱ्याचा दरवाजा असे ही म्हणतात.
तसेच प्रतापगडाला महादरवाज्याशिवाय घोरपडीचे चित्र असणारा चोर दरवाजा देखील आहे. या दरवाज्यास राजपहाऱ्याचा दरवाजा असे ही म्हणतात. 

चोर दरवाज्याच्याजवळच रेडका बुरूज, त्यापुढे यशवंत बुरूज आणि सूर्य बुरूज आहेत. प्रतापगडावर कडेलोट करण्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी दोषी आरोपींना कडेलोटाची शिक्षा देण्यात येत असे.

 PHOTO_20161024_114652.jpg

प्रतापगडावरुन दक्षिणेला दिसणारा मधुमकरंदगड

प्रतापगडावरुन पश्चिम दिशेस असलेला रायगड आणि दक्षिण दिशेस असलेला मकरंदगड हवा स्वच्छ असल्यास दिसतो.

परंतु हिवाळ्यामध्ये याठिकाणी भरपूर थंडी आणि धुके असते. त्यामुळे परिसरातील प्रदेश दिसत नाही.

 

प्रतापगडावर दुर्गप्रेमींनी हिवाळ्यामध्ये जाणे आणि गडाचा परिसर पाहणे योग्य आहे. प्रतापगडावर गेलेल्या दुर्गप्रेमींना येथे खवय्येगिरीची मेजवानी देखील मिळते. गडावरील हॉटेल्समध्ये झुणका भाकरीसह ग्रामीण पद्धतीचे खास जेवण उपलब्ध आहे.
प्रतापगड येथील संपर्क क्रमांकः-
१) श्री. श्रीकांत फडनीसः- 9822215933
२) श्री. सुदीप फडानीस- 9850794633, 9405253173
या गडावरुन उत्तरेला रायगड तर दक्षिणेला मकरंद गड दिसतो. त्याच्या पूर्वेला महाबळेश्वरचे विस्तृत पठार, आजूबाजूला घनदाट जंगल, खाली पार घाट व पश्चिमेकडे कोकण आहे. येथे आपली ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते. प्रतापगडावर शिवनिर्मित गडांची सर्व वैशिष्ट्ये एकत्र पहाता येतात.
इथेच घुमली युद्धाची आरोळी
इथेच उलटले पेचावर डावपेच
इथेच झाली होती ऐतिहासिक लढाई
तोच गड खुणावतो, बोलावतो आहे. अफजलखानाला ठार मारलेला गड पाहण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यास यावे.

( तळटीप- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

व्हिडीओतून प्रतापगडाची सैर

माझे सर्व लिखाण आपण येथे एकत्र वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
३) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
४) www.trekshitiz,com हि वेबसाईट
५) www.durgbharari.com हि वेबसाईट
६) शोध शिवछत्रपंतीच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
७) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामणी गोगटे
८) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
९) http://chandrakantspatil.blogspot.com/2017/02/blog-post.html

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

16 Nov 2020 - 11:18 pm | प्रसाद गोडबोले

संपुर्ण लेख उत्तम , प्रकाशचित्रे ही सुंदर

पण

अफजलखानाच्या कबरीवरुन हिंदुत्ववादी लोकांवर केलेली टिप्पण्णी अनाकलनीय आणि निराशाजनक आहे . :(

मुळातच अफजलखानाच्या कबरीचे वाढीव बांधकाम हे कायद्याला धाब्यावर बसवुन झाले आहे , वनविभाव , पुरातत्त्व विभाग वगैरे सर्वांचीच रीतसर ठासुन सगळ्यांच्या नाकावर टिच्चुन झालेले बांधकाम हे ! मुळात सरकारनेच उध्वस्त करणे अपेक्षित आहे. पण लांगुलचालन करत चाटुन मते मागण्याची सवय लागलेल्यां पुरोगामी सेक्युलर लोकांनी ते केले नाही ही फॅक्ट आहे. आणि भविष्यातही त्यांच्याकडुन हे होणार नाही ह्यावर मी पैज लावायला तयार आहे !
हिंदुत्ववादी लोकांनी केवळ कबरीचे वाढीव बांधकाम हटवावे एवढेच म्हणले आहे , मुळ कबरच उध्वस्त करावी असे कोणीही म्हणल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही . ती अफजलखानाची कबर आहे , नजीबाची नाही !

पण तरीही न्यायाची मागणी करणार्‍या हिंदुत्ववादी लोकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न केवीलवाणा अनाकलनीय आणि निराशाजनक आहे.

लहानपणी १९९८ साली प्रतापगडावर गेल्याचे अन कबर जवळुन पाहिल्याचे स्मरते. तेव्हाच कबरीचे उद्दत्तीकरण पाहुन डोक्यात तिडीक गेली होती. पण असो आम्ही कोण बोलणार ? गेल्या दोन दशकात महाराष्ट्रातील महापुरुषांची वाटणी झाली , त्यात आमच्या वाटणीत ज्ञानेश्वर माऊली , रामदास स्वामी, पेशवे, टिळक , सावरकर वगैरे लोकं आले आहेत , दुर्दैवाने महाराज आमच्या वाटणीत न आल्याने आम्ही काहीच बोलणे योग्य नाही . चालु दे अफजलखान कबर उदात्तीकरण . आमची काहीही हरकत नाही आता .
असो . आमच्या वाटणीत न आलेल्या तुकोबांचे एक वचन उधृत करुन थांबतो - " तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||"

श्रीगुरुजी's picture

16 Nov 2020 - 11:38 pm | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

16 Nov 2020 - 11:39 pm | श्रीगुरुजी

उत्कृष्ट लेख, माहिती व प्रकाशचित्रे!

प्रतापगडावर तीन वेळा जाण्याचा योग आला आहे. परंतु इतकी सविस्तर माहिती मिळाली नव्हती.

अक्षय देपोलकर's picture

17 Nov 2020 - 8:51 am | अक्षय देपोलकर

प्रतापगडावर काय आहे असं म्हणणाऱ्या लोकांना ह्यातल्या काहीच गोष्ट माहीत नसतात..

बेकार तरुण's picture

17 Nov 2020 - 1:50 pm | बेकार तरुण

सुंदर लेख... खूप आवडला....

गोरगावलेकर's picture

17 Nov 2020 - 3:35 pm | गोरगावलेकर

प्रतापगडावर तीन वेळा जाणे झाले आहे पण इतक्या बारकाईने कधीच पाहिले नाही. परत जाणे झाले तर या माहितीचा खूप उपयोग होईल

तुषार काळभोर's picture

17 Nov 2020 - 10:52 pm | तुषार काळभोर

प्रत्येक वेळी महाबळेश्वर ल गेल्यावर प्रतापगडावर जाणं झालंय, पण आता नव्या दृष्टीने गड पाहता येईल.
अवांतर : कबरीच्या बाबतीत जे झालंय किंवा घडतंय, साला आपणच कपाळकरंटे आहोत, याचं वैषम्य वाटतं.

मार्कस ऑरेलियस,

तुमच्या इथल्या संदेशाशी शंभर टक्के सहमत आहे. विशेषत: हे विधान महत्त्वाचं आहे :

हिंदुत्ववादी लोकांनी केवळ कबरीचे वाढीव बांधकाम हटवावे एवढेच म्हणले आहे , मुळ कबरच उध्वस्त करावी असे कोणीही म्हणल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही . ती अफजलखानाची कबर आहे , नजीबाची नाही !

महत्त्वाचं का ते सांगतो. जर कोणी हिंदुत्ववादी गटाने वाढीव बांधकाम उद्ध्वस्त केलं तर ते फार काही काटेकोरपणे नियोजित केलेलं कार्य नसेल. धसमुसळेपणा होणारंच आणि त्यामुळे मूळ अधिकृत कबरीची हानी होण्याची दाट शक्यता आहे. याचं पाप दांभिक सेक्युलरांच्या बोडक्यावर बसेल. ते जबाबदार असणारेत, हिंदुत्ववादी नव्हेत! एक कट्टर हिंदू म्हणून मला हे ठासून सांगावंसं वाटलं. माझ्या विचारचक्रास चालना दिल्याबद्दल आभार! :-)

आ.न.,
-गा.पै.

इतका प्रसिद्ध किल्ला असूनही माहित नसलेल्या कित्येक गोष्टी/वास्तू तुमच्या लेखामुळे जाणून घेता आल्या यातच तुमच्या लेखणीचे यश आहे असे मला वाटते.
धन्यवाद इतक्या तपशीलवार माहितीबद्द्ल.

दुर्गविहारी's picture

27 Nov 2020 - 12:46 pm | दुर्गविहारी

मार्कस ऑरेलियस, श्रीगुरुजी,अक्षय देपोलक, बेकार तरुण,गोरगावलेकर,पैलवान,गामा पैलवान ,प्रचेतस आणि असंख्य वाचक यांचे मनापासून आभार ! _/\_