१८९३–१९१९ । संगीत नाटकांच्या लेखकाचं जग

आदूबाळ's picture
आदूबाळ in लेखमाला
4 Sep 2019 - 6:00 am

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
} h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}

१८९३–१९१९ । संगीत नाटकांच्या लेखकाचं जग

प्रस्तावना

“ऐक माझं, या धंद्यात पंधरा वर्षं काढली. आतून-बाहेरून माझ्याइतका धंदा कोणालाच समजला नाही…”

आजकाल असलं वाक्य ऐकलं की मनातल्या मनात हसू येतं. व्यवसायधंद्यात अनेक वर्षं राहून अनुभव येतो ही गोष्ट खरी आहे, पण ‘आपल्याला समजलेला धंदा हाच खरा, आणि बाकी काही असूच शकत नाही’ या आत्मविश्वासाची गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. आयुष्याच्या एखाद्या वळणावर ‘अनुभवी’ म्हणून सल्ला घ्यायला चार लोकांकडे जावं आणि एकाच व्यवसायधंद्याबद्दल त्या चौघांनी परस्परविरोधी अशी पाच मतं सांगावी हा अनुभव पुरेसा प्रातिनिधिक आहे.

प्रत्येकाचं मत वेगळं, कारण प्रत्येकाला आलेले अनुभव वेगळे. कोणताही व्यवसाय हा सात आंधळ्यांच्या गोष्टीतल्या हत्तीसारखा असतो. आपापल्या मगदुराप्रमाणे त्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला वेगळाच दिसतो. भोसरीतल्या वर्कशॉपमध्ये यंत्र चालवणाऱ्याचं आणि रतन टाटांचं वाहननिर्मिती व्यवसायाबद्दलचं मत वेगळं असणं स्वाभाविक आहे.

“मराठी माणूस नाटकवेडा आहे” आणि “संगीत नाटकं हा मराठी रंगभूमीचा देदीप्यमान इतिहास आहे” वगैरे वाक्यं आता झिजून गुळगुळीत झाली. Cliches are there for a reason या न्यायाने त्यात तथ्य आहेच. पण संगीत नाटक हा धंदा होता, त्यावर बालगंधर्व या नटापासून ते जनार्दन नारो शिंगणापूरकर या (काल्पनिक) बोलटापर्यंत अनेकांची चूल पेटत होती, ही जाणीवही असणं गरजेचं आहे. मराठी संगीत नाटकाच्या ‘धंद्यावर’ नेमका झोत टाकणारं सुघड असं लेखन (माझ्या तरी) पाहण्यात नाही. कच्चा माल भरपूर आहे : अनेकांनी आपल्या आठवणी, आत्मचरित्रं लिहून ठेवली आहेत, त्या काळची वर्तमानपत्रं (बर्‍याच अंशी) सुस्थितीत आहेत, काही पत्रव्यवहार आहे, समीक्षाग्रंथ आहेत. योजकत्व घेणारा कोणी पाहिजे.

संगीत नाटकाचा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रत्यक्ष नाटकाची संहिता. ते लिहिणार्‍या नाटककाराच्या दृष्टीने हा धंदा कसा होता? त्याच्या जगात काय चालत असे? त्याची कामं नेमकी काय होती आणि त्याला जोखमी कोणत्या घ्याव्या लागत? श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या ‘आत्मवृत्ता’च्या बरोबर या प्रश्नांचा वेध घ्यायचा प्रयत्न या लेखात करू.

कोल्हटकर : बाहेरून आत

ShreeKruKo
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठी संगीत नाटकांतले आघाडीचे नाटककार. गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी यांना समकालीन. किंबहुना गडकरी आणि भार्गवराम वरेरकर यांच्यासारखे त्यांच्याहून वयाने लहान असलेले लेखक त्यांना गुरुस्थानी मानत. पण ‘नाटककाराच्या धंद्या’कडे बघण्यासाठी कोल्हटकरांना निवडण्याचं कारण त्यांची वाङमयीन थोरवी एवढंच नाही.

मराठी संगीत नाटक मंडळींचा सुवर्णकाळ साधारणपणे १८९० ते १९३२ असा ढोबळमानाने धरू. कोल्हटकरांचा लेखनकाळ १८९६ ते १९३४. त्यांनी आपलं पहिलं नाटक वयाच्या बारा-तेराव्या वर्षी लिहिलं, म्हणजे १८८३च्या सुमारास. त्यांचं मंचस्थ झालेलं पहिलं नाटक 'वीरतनय' १८९३ साली किर्लोस्कर मंडळीने केलं. म्हणजे, संगीत नाटकांच्या या सुवर्णकाळात कोल्हटकर सक्रिय होते, आणि त्यामुळे या धंद्यातले चढउतार, उदयास्त या ना त्या प्रकारे त्यांना भोगावे लागले. जेव्हा एखादा व्यवसायधंदा स्टार्ट अप स्वरूपात असतो, तेव्हा माणसाच्या गुणवत्तेपेक्षा being in the right place at right time हे महत्त्वाचं ठरतं. (नव्वदीच्या सुरुवातीला आयटीमध्ये गेलेले लोक आठवा!) दुसऱ्या बाजूने - व्यवसायधंदा उतरणीला लागलेली असतो, तेव्हा चांगल्या माणसाचं / वस्तूचं / कर्तबगारीचं पुरेसं कौतुक होत नाही. त्यामुळे इंडस्ट्री सपाटीवर असते (plateau) तेव्हा कर्तबगार व्यक्तींचं खरं चीज होतं. किंबहुना ती व्यक्ती कर्तबगार असेल तरच अशा सपाटीच्या काळात तग धरू शकते. त्यामुळे ‘सिंहावलोकन’ या अर्थी ‘आत्मवृत्ता’ची निवड योग्य वाटते.

दुसरं म्हणजे, कोल्हटकर त्या काळचे उच्चभ्रू (elite) होते. ते पदवीधर होते, प्रयत्नांती वकील झाले. ‘पदवीधरां’नी कसं वागावं याच्या काही अपेक्षा तत्कालीन समाज करत असावा अशा अर्थाचे उल्लेख ‘आत्मवृत्ता’त येतात आणि तत्कालीन पदवीधरांनी पादाक्रांत केलेली क्षेत्रं पाहता ती अपेक्षा गैरवाजवीही नाही. पण ‘पदवीधर नाटककार’ असण्याचे काही भलतेच फायदे-तोटे कोल्हटकरांना नाटककार म्हणून झाले :

  • शिक्षणाने - विशेषत: इंग्लिश शिक्षणाने - दिसणारं भारतीय संस्कृतीच्या पल्याडचं विश्व कोल्हटकरांच्या लेखनात आलं. त्यांच्या नाटकांची संविधानकं (plots) ही पारंपरिक पोथ्यापुराणांच्या आधारावर टेकून उभी न राहता स्वतंत्र आहेत. त्या काळी ‘पदवीधरा’ने ‘सुधारक’ असणं फॅशनेबल असावं, त्यामुळे कोल्हटकरांच्या नाटकांतही समाजसुधारणेचा अंत:प्रवाह आहे.
  • समकालीन लेखकांनी केलेल्या कोल्हटकरांच्या मूल्यमापनात ‘पदवीधर’ असण्याला महत्त्व आहे. महादेव गोविंद रानड्यांनी मराठी वाङ्मयावर १८९७ साली लिहिलेल्या लेखात कोल्हटकरांचा उल्लेख ‘पदवीधर लेखक’ म्हणून केला आहे. ‘भावबंधन’ लिहितेवेळी सर्जकतेच्या शिखरावर असलेले गडकरी ‘तुम्ही एलएल.बी. म्हणून तुम्हांस इतके रुपये कबूल करितात, आणि मी नाही म्हणून मला कर्तव्याच्या गोष्टी सांगतात’ असा त्रागा करतात.
  • नाटकं लिहिणं हा कोल्हटकरांचा पोटापाण्याचा व्यवसाय नव्हता. ते व्यवसायाने वकील होते आणि घर-संसार सुरळीत चालावा एवढी प्राप्ती या व्यवसायातून त्यांना होत असे. ‘माझा वकिलीचा धंदा चांगला चालला असून माझा कटाक्ष द्रव्यप्राप्तीपेक्षां कीर्तिलाभावरच विशेष होता’ असं ते ‘आत्मवृत्ता’त म्हणतात. पण याचा अर्थ नाट्यलेखनातून मिळणार्‍या पैशाबद्दल ते उदासीन होते असं नाही - किंबहुना त्यांचं राहतं घर, शेतीबितीतली गुंतवणूक, बहिणींच्या लग्नासारखे मोठे खर्च हे नाटकांतून मिळालेल्या उत्पन्नातून झाले होते.

यावरून असं दिसतं, की कोल्हटकर नाटकधंद्याचा भाग असले, तरी ते परके (outsider) होते. वेगळे, उच्चभ्रू आणि नाटकधंद्यावर आर्थिक अवलंबित्व नसलेले. त्यांच्या परकं असण्यामुळे नाटकधंद्याविषयी त्यांनी केलेल्या निरीक्षणांना आपोआप त्रयस्थतेची धार येते.

त्या काळी पुणे-मुंबई ही संगीत नाटकांची केंद्रस्थानं होती. पण मधला शिक्षणाचा पुण्या-मुंबईतला काळ सोडला, तर कोल्हटकर कायम अकोला, खामगाव, तेल्हारा, आणि शेवटी जळगाव अशा ठिकाणी राहिल्याने पुणे-मुंबईजवळच्यांना सहजी मिळणारा लागेबांध्यांचा फायदा त्यांना झाला नाही.

कोल्हटकरांचं लेखन हे नाटकं लिहिण्यापुरतं मर्यादित नव्हतं. किंबहुना आज त्यांची ओळख टिकून आहे ती ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’ हे ‘महाराष्ट्रगीत’ लिहिणारे कवी म्हणून. त्याव्यतिरिक्त त्यांनी (अन्य नाटकांची) समीक्षा, लघुनिबंध, कादंबर्‍या, कथा असे अनेक साहित्यप्रकार हाताळले.

सर्वात शेवटी येतो ‘आत्मवृत्ता’तून दिसणारा कोल्हटकरांचा स्वभाव. ‘विनोदी लेखक’ म्हणून कोल्हटकरांची ख्याती असली, तरी आपल्या विनोदी लेखनाबद्दल ते ‘आत्मवृत्ता’त लिहितात की त्यांचा कल अप्रासंगिक विनोद टाळण्याकडे होता. म्हणजे विनोदाजागी विनोद, अन्य ठिकाणी नाही. ‘आत्मवृत्त’ ही विनोद करायची जागा त्यांना वाटत नसावी. ‘आत्मवृत्ता’त विनोद जवळपास नाहीच. विनोदाचं अंग वजा करून कोल्हटकरांचा स्वभाव बघायला मिळतो. त्यांचा स्वभाव मानी, ताठर, वावदूक (belligerent) असल्याचं दिसतं. कोल्हटकरांचे समकालीन लेखकांशी असलेले संबंध हा त्या स्वभावाचा आरसा म्हणता येईल. गोविंद बल्लाळ देवलांशी त्यांचे ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ प्रकारचे संबंध (love-hate relationship) होते. गडकरी कोल्हटकरांना गुरू मानत. शेवटच्या भ्रमाच्या झटक्यातही ‘नाहीं. हे मला मारणार नाहीत. यांनी मला लिहावयास शिकवलें’ असं म्हणणार्‍या गडकर्‍यांशीही कोल्हटकरांचे वाद झाले होते. लेखक-संपादक वि.सी. गुर्जर यांच्याशी अत्यंत प्रेमाचे संबंध विस्कटून पराकोटीच्या द्वेषाचे झाले. नाटक कंपन्यांच्या मालकांशी झालेल्या खडाजंग्या ‘आत्मवृत्ता’त पानोपानी आहेत. असा हा माणूस ‘न ब्रूयात सत्यमप्रियम’वालं गुळमुळीत आत्मचरित्र लिहिणं शक्य नाही. ‘हाही चांगला, तोही चांगला’या नानापाटेकरी गोडीगुलाबीपेक्षा वादांच्या, भांडणांच्या वर्णनांतून तो काळ, ती व्यक्तिमत्त्वं अधिक उठावदार दिसतात. मग त्या वादाभांडणांची वर्णनं लेखकाच्या नजरेतून एकतर्फी का असेनात.

लेखाच्या पुढच्या भागात कोल्हटकरांना लेखक म्हणून दिसलेला संगीत नाटकांचा धंदा नेमका कसा होता ते बघू. लेखक म्हणून अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांचं / कराव्या लागलेल्या कामांचं (functionsचं) आणि घ्याव्या लागलेल्या जोखमींचं (risksचं) वर्णन पुढच्या भागात आहे.

लेखकाची कामं

आजच्या तुलनेत कोल्हटकरांच्या काळी (१८९६ व पुढे) नाटक करणं हे जाम कटकटीचं होतं. सुसज्ज नाट्यगृहांचा अभाव वगैरे ‘इन्फ्रास्ट्रक्चरल’ कारणांबरोबर तत्कालीन अभिरुची हाही एक महत्त्वाचा घटक होता. ‘नाटकाला जाणं’ हे प्रमुख मनोरंजनापैकी एक होतं, त्यामुळे ‘नाटकाने बेदम मनोरंजन करावं’ अशी प्रेक्षकाची अपेक्षा असल्यास नवल नाही. हे ‘बेदम मनोरंजन’ कसं असावं याचा कित्ता पौराणिक नाटक मंडळ्यांनी घालून दिला होता. नाटकांना जाणार्‍या अभिजन वर्गाचा संस्कृत नाटकांशीही परिचय होता. त्यामुळे नाटकं दीर्घकाळ चालणारी, अनेक पात्रं असलेली, संगीतमय आणि भरजरी असण्यात काहीच नवल नाही. यात पैशाची गुंतवणूक आणि मनुष्यबळही चिकार लागणार. म्हणून आपले इतर उद्योगधंदे सांभाळून नाटक करणारे ‘हौशी’ लोक तेव्हा नव्हते. असायच्या त्या व्यावसायिक ‘नाटक मंडळ्या’.

इथे नाटक मंडळ्यांच्या संस्थात्मक रचनेबद्दल (organisational structure) थोडं लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे लेखकाचं त्यातलं स्थान स्पष्ट होईल. हे प्रातिनिधिक चित्र आहे : प्रत्येक नाटक मंडळींत थोडाथोडा फरक असायचा.

उतरंडीच्या सर्वात वर असायचे ‘मालक’ किंवा ‘भागीदार’. हे बर्‍याचदा प्रमुख नटमंडळींपैकी असायचे. उदा. लक्ष्मण बापूजी उर्फ भाऊराव कोल्हटकर उर्फ ‘भावड्या’ अनेक वर्षं किर्लोस्कर मंडळीचे भागीदार होते. हे सीईओ-टाइप लोक, पण सीईओ+मालक, अर्थात active investors. आदल्या पिढीतल्या अण्णासाहेब किर्लोस्करांना कोल्हटकर ‘उत्पादक’ म्हणतात! क्वचित प्रसंगी चांगल्या परताव्याच्या इच्छेने पैसे गुंतवणारे शुद्ध गुंतवणूकदार (investors), आणि नाटक मंडळ्यांना आश्रय देणारे राजेरजवाडे/संस्थानिक (patrons) असेही असत. हे सहसा नाटकमंडळीच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करत नसत (passive investors).

दैनंदिन गाडा हाकायची कामगिरी सीओओ-टाइप मनुष्यावर असे. त्याला ‘मॅनेजर’ असं संबोधलं जाई. त्याखालोखाल येतात ती प्रमुख नटमंडळी, दिग्दर्शक (अथवा ‘तालीममास्तर’), स्टेज लावणं (नेपथ्य), बाजारमास्तर, हिशोबनीस वगैरे खात्यांची जबाबदारी असलेले लोक, चिल्लर भूमिका करणारी नटमंडळी (पुलंचा शब्द उसना घ्यायचा तर ‘बोलट’), वादक आणि सगळ्यात तळाशी कामगार.१० याव्यतिरिक्त ‘एजंट’, मांडववाले वगैरे कंत्राटी, भाडोत्री, आणि हंगामी प्रकारही असत, पण ते नाटक मंडळ्यांसाठी पूर्णवेळ काम करत नसत.

यात दोन प्रमुख भूमिका दिसत नाहीत - लेखक आणि संगीत दिग्दर्शक. याचं कारण म्हणजे या दोन्ही भूमिका ‘संगीत नाटकाचा लेखक’ या व्यक्तीमध्ये एकवटलेल्या असत! वर लिहिलेल्यांपैकी गुंतवणूकदार/आश्रयदाते वगळता सीईओ आणि त्याखालचे लोक हे नाटक मंडळीत ‘पूर्णवेळ पगारी’ असत. पण लेखक पूर्णवेळ पगारी असण्याची गरज नव्हती. त्याचं पहिलं कारण म्हणजे एकदा नाटक बसलं, चाली बसल्या की ‘प्रयोग’ ही पुनरावृत्ती. त्यात काम करणार्‍या नटांचा, इतर कामगारांचा, मॅनेजरचा पूर्ण दिवस (आणि अर्ध्याहून अधिक रात्र) जाणार. पण नाटकाच्या संहितेत, चालींत रोजरोज बदल होणार नाही. त्यामुळे नाटककाराला तिथे पूर्णवेळ असायची गरज नाही. दुसरं, आणि त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे नाटककारालाच नाटक मंडळीत पूर्णवेळ पगारी असणं रुचलं नसतं!

कोल्हटकरांच्या काळापर्यंत नाटकधंद्याला असलेलं छचोरपणाचं वलय कमी झालं होतं. किंबहुना त्याला आलेल्या ग्लॅमरमुळेच कोल्हटकर नाट्यलेखनाकडे वळले (‘मराठी पांचव्या इयत्तेत असतां माझ्या कानीं किर्लोस्करांच्या “शाकुंतला”ची कीर्ति आलीं”’). किंबहुना कोल्हटकरांची नाटकं करणारी ‘किर्लोस्कर मंडळी’ ही समाजमान्य होती.११ पण तरीही नाटकधंदा हा अन्य व्यवसायांच्या (विशेषत: कोल्हटकर करत त्या वकिली व्यवसायाच्या) तुलनेत हलक्या दर्जाचा समजला जात असे. कोणत्याही प्रकारचं लेखन हे सुशिक्षित सुबुद्धांचं काम. त्यात कोल्हटकर पदवीधर, ग्रंथकार! अशा अभिजन माणसाच्या एलिटत्वाला नाटकं लिहिणं हे पूरक असावं, पण पूर्णवेळ या हलक्या धंद्यात गुंतवून घेणं कोल्हटकरांच्या पचनी पडण्यासारखं नव्हतं.

नाटककाराच्या जबाबदार्‍या कोणत्या होत्या?

संविधानक : म्हणजे सोप्या भाषेत नाटकाचं कथानक (plot). नाटकात पैशाची आणि माणसांची गुंतवणूक करणार्‍या लोकांना (पक्षी : गुंतवणूकदार/आश्रयदाते आणि सीईओ) संविधानक आवडलं, तरच ते नाटक रंगमंचावर येऊ शकणार.१२ हे संविधानक शोधा-घडवायची जबाबदारी पूर्णत: नाटककाराची. मग ते संविधानक सरळ पौराणिक असे (उदा. सौभद्र), संस्कृत नाटकांवर बेतलेलं असे (उदा. मृच्छकटिक), किंवा सरळ भाषांतर असे (उदा. हॅम्लेट). कोल्हटकरांच्या सगळ्या नाटकांची संविधानकं स्वतंत्र आहेत. त्यात सुधारकी अंग आहे. उदा. मतिविकार (१९०६) हे ‘(विधवा) पुनर्विवाहासारख्या अप्रिय विषयावरील नाटक 'किर्लोस्कर मंडळी'सारख्या साधारण सोवळ्या कंपनीने आवडीने बसवावयास घ्यावे ही गोष्ट मला फारच समाधानकारक आणि उत्तेजक वाटली’ असं ते नोंदवतात. मूकनायक (१८९७) या त्यांच्या सुरुवातीच्या नाटकाचा विषय ‘दारूचे दुष्परिणाम’ हा आहे आणि ‘तथापि नायकाचा विषय सुरापान हा असल्यामुळें भाऊराव यांस नाटक घेणें कितपत आवडेल याची मला त्यांच्या चर्येवरून शंका [आली]’ अशी तिरकस टिप्पणी ते करतात. (हा टोमणा भाऊराव कोल्हटकरांच्या दारूच्या व्यसनाबद्दल आहे!)

आपल्या संविधानकांच्या प्रेरणांवर कोल्हटकर आपल्या ‘आत्मवृत्ता’त क्वचितच लिहितात. प्रेमशोधन (१९०८) या नाटकाचं संविधानक सुचायला अलेक्सांद्र द्युमा आणि मार्क ट्वेन यांच्या जुळ्या भावंडांवरच्या कादंबर्‍या कारणीभूत होत्या. सहचारिणी (१९१८) या नाटकामधली पात्रं पॉल डीकॉक या फ्रेंच कादंबरीकाराच्या लेखनातून सुचली, असं ते नोंदवतात.

सहसा नाटक पूर्ण झाल्यावर नाटक मंडळींच्या मालका-मॅनेजरांना वाचून दाखवायची पद्धत होती. पण अनेक प्रसंगी कोल्हटकरांनी नाटक लिहिलेलं नसताना फक्त संविधानक सांगितल्याची उदाहरणं आहेत. उदा. गुप्तमंजूष (१८९९) आणि परिवर्तन (१९१८). अर्थात साधारण १९०० सालनंतर कोल्हटकर प्रस्थापित नाटककार झाले होते. त्यामुळे संपूर्ण नाटक न लिहिता फक्त संविधानक सांगून नाटकाची ‘ऑर्डर’ मिळवणं त्यांना शक्य झालं होतं.

प्रत्यक्ष लेखन

अ. गद्य : नाटककाराच्या जबाबदार्‍यांपैकी ही अगदी कळीची म्हणता येईल अशी जबाबदारी. याबद्दल आणखी काही लिहायची गरज नाही. सुरुवातीची दोन नाटकं लिहिताना कोल्हटकर लेखक म्हणून चाचपडत होते असं दिसतं. पण गुप्तमंजूष (१८९९)पासून त्यांना आपल्या लेखनाची लय सापडली. साधारण पाच ते पंधरा दिवसांच्या काळात ते अनेक अंक आणि त्यात अनेक प्रवेश असलेलं संपूर्ण नाटक लिहून काढत!१३ कोर्टाला उन्हाळी आणि हिवाळी सुट्टी असे, त्यामुळे वकिलीचा धंदा त्या काळात बंद असे. या काळात सलग रट्टा मारून नाटक लिहिणं त्यांच्या मुख्य व्यवसायाच्या आडही येत नसावं. त्यातही कुठेतरी बाहेरगावी निवांत बैठक मारून लिखाणकाम करण्याकडे त्यांचा कल दिसतो. त्यांच्या या सवयीची माहिती असलेल्या नाटक मंडळ्याही प्रसंगी त्यांना अशी निवांत सोय उपलब्ध करून देत. अपवाद म्हणायचा तर परिवर्तन (१९१८) हे मात्र २०-२५ दिवस आपलं कोर्टातलं काम सांभाळून लिहिलं गेलं आहे.

ब. पद्य : नाटकातली गाणी लिहिणं ही संगीत नाटककाराच्या महत्त्वाच्या जबाबदार्‍यांपैकी एक. क्वचित प्रसंगी गद्य एक नाटककार लिही आणि पद्ये कोणी दुसराच लिहीत असे. प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मृत्युशय्येवर असताना गडकर्‍यांनी कोल्हटकरांना ‘भावबंधना’तली शेवटची पदं लिहायची विनंती केली आणि त्यांनीही मित्रऋण म्हणून ती लिहिली.

पद्यलेखनाचे अनेक उल्लेख ‘आत्मवृत्ता’त येतात. जवळपास सगळेच ‘कमी वेळात अमुक एवढी पदं लिहिली बघा!’ असे स्वाभिनंदक (self-congratulatory) आहेत. प्रेमशोधन (१९०८) या नाटकाच्या बाबतीत ते लिहितात : ‘मीं दहा दिवसांतच नाटकांतील पदें तयार केलीं. कचेरीचें रोजचें काम साधून रोज आठ-दहा पदें रचीत असें’. यावरून पदं लिहिणं यात कवित्त्वाचा भाग कमी आणि वृत्तछंदमात्रांच्या बोथाट्या कौशल्याने फिरवणं हा जास्त वाटतो.

पद्यलेखनाची साधारण प्रक्रिया म्हणजे आगोदर चाल ठरवणं (ती नेमकी कशी ठरवत असत याबद्दल पुढे विस्ताराने लिहिलं आहे), आणि मग त्यामापाने शब्द त्या चालीवर बसवणं. आता या उलट्या गंगेमुळे गाणं सुश्राव्य झालं तरी कविता कठीण होत असे. त्याबद्दल ते लिहितात : ‘नाटकांतील पदें ज्या चालींवर केलेलीं आहेत त्या चालींस र्हस्व अक्षरांचें बरेंच मोठें प्रमाण व अक्षरांची विशेष मांडणी आवश्यक असल्यामुळें त्यांत संस्कृत शब्दांची योजना करावी लागली व यामुळें त्यांची रचना बरीच दुर्बोध झाली.’ कोल्हटकरांसारख्या कवीचं कौशल्य म्हणजे या अडचणींतून मार्ग काढून नाट्यपद हे कविता म्हणून सुघड करणं. हे कोल्हटकरांना साधल्याचा दाखला मृत्युशय्येवरचे गडकरी देतात : ‘[भावबंधनांतील उरलेली] पदें 'मतिविकारां'तील पदांच्या धर्तीवर, म्हणजे कल्पनामय असावींत; 'जन्मरहस्यां'तील पदांच्या मासल्यांची म्हणजे केवळ रसात्मक नसावींत, अशीं त्यांनी आपली विशेष इच्छा दर्शविली’.

गद्य आणि पद्य मिळून तयार होते ती नाटकाची संहिता (script). प्रयोगासाठी ही संहिता लिखित स्वरूपात असली, तरी तोपर्यंत ती छापलेली नसायची. त्याच्या वेगवेगळ्या हस्तलिखित प्रती करून (नक्कल / कॉपी) त्यावरून तालमी होत. हे प्रती करण्याचं काम ‘हलकं’, कारकुनाने करण्याचं. नाटककाराने नव्हे! मतिविकार (१९०६) या नाटकाच्या प्रती करण्यासाठी कुलकर्णी, देवळे या होतकरू नाटककारांना बसवल्यामुळे कोल्हटकरांचा तिळपापड झाल्याचा किस्सा ते ‘आत्मवृत्ता’त नोंदवतात. ‘पुढें गडकरी यशस्वी नाटककार होऊन कंपन्यांस छळूं लागलें, तेव्हा या छळाचें एक कारण ते नाटकमंडळ्या नाटककारांस अत्यंत वाईट रीतीनें वागवितात हें देऊं लागलें’ असंही निरीक्षण त्यांनी केलं आहे.

आधी लिहिल्याप्रमाणे नटांवर आणि अन्य कामगारांवर नाटक मंडळीचा एकाधिकार (exclusivity) असला, तरी नाटककारावर मात्र नसे. किंबहुना नाटककार आपलं नाटक एकापेक्षा जास्त नाटक मंडळींना देत असे. एकाधिकाराला कोल्हटकर ‘अव्यभिचारी किंवा असाधारण अधिकार (मोनोपॉली)’ म्हणतात आणि त्यासाठी (साहजिकच) जास्त पैसे लावतात!

चाली ठरवणं आणि ‘देणं’ : आजच्या चश्म्यातून पाहिलं, तर ही जबाबदारी नाटककारावर टाकणं अन्यायकारक वाटेल. कोल्हटकर मात्र आपल्या पद्यांच्या चाली ठरवण्यावर बराच वेळ घालवत, असं ‘आत्मवृत्ता’तून जाणवतं. त्यांना संगीताचा ‘कान’ होता, पण त्यांनी किती चाली स्वत: तयार केल्या असतील याबद्दल शंका वाटते. कुठूनतरी रेडीमेड चाली ‘उचलण्या’वर त्यांचा भर होता. त्या काळी अशा अन्नूमलिकपणाला समाजमान्यता असावी! वीरतनय (१८९३) या सुरुवातीच्या नाटकातल्या पदांच्या चाली कोल्हटकरांनी पारशी नाटकांतून उचलल्या होत्या. त्याबद्दल मुंबईच्या एका प्रयोगात प्रेक्षकांनी ‘गिल्ला करून’ प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्नही केला. किंबहुना चाली चोरायची ‘मोडस ऑपरेंडी’ही ते देतात!

पुढेपुढे या चाली नेमक्या कुठून उचलल्या आहेत याचे उल्लेख ‘आत्मवृत्ता’त नाहीत. पण भास्करबोवा बखल्यांकडून, हिराबाई पेडणेकरांकडून,१४ ‘इतर एकदोघां इसमांकडून’ काही चाली घेतल्याचे तुरळक उल्लेख आहेत. आपल्या समव्यावसायिकांना प्रसंगी मदतही करत असत. देवलमास्तरांशी कितीही झक्काझक्की झाली, तरी त्यांच्या ‘शारदा’ नाटकातल्या काही पदांच्या चाली कोल्हटकरांनी दिल्या आहेत.

स्वत: चाली ठरवण्याचे फायदेही दिसतात. आधी चाल ठरवायची, ती चाल पेलू शकेल अशा नटासाठी त्याची योजना करायची, मग त्या हिशोबाने शब्द बेतायचे असाही प्रकार ते करत असत. जन्मरहस्य (१९१८) या नाटकाच्या मूळ पात्रयोजनेनुसार जी भूमिका मा. दीनानाथ करणार होते, त्या पदांना कोल्हटकरांनी रागदारीच्या चाली दिल्या. पण बलवंत मंडळींतल्या काही भांडणांमुळे मा. दीनानाथांना वेगळीच भूमिका करावी लागली आणि त्याला नेमक्या साध्या चाली होत्या!

चाली ‘देणं’ हा मात्र भारी प्रकार होता. ‘देणं’ म्हणजे एकाने दुसर्‍याला देणं अशा अर्थी कोल्हटकर हा शब्द योजतात. म्हणजे कोल्हटकरांनी चाल+शब्द ठरवायचे आणि त्या नटाला समोर बसवून त्याकडून ते पद आत्मसात होईपर्यंत घोटून घ्यायचं, असा प्रकार! आता कोल्हटकरांनी कितीही प्रयत्न केले, तरी त्या नटाला चाल झेपली पाहिजे ना! इथेच वर लिहिलेली युक्ती उपयोगी पडे : कोल्हटकरांसारख्या लेखकाला नटही माहीत असत आणि कोणाला कोणती चाल झेपेल याची कल्पनाही असे.

काही वेळा नट वेगळ्या प्रयोगात गुंतलेले असत. शिवाय जोडधंदा म्हणून नाटक लिहिणार्‍या कोल्हटकरांकडे वेळही मर्यादित असे. अशा प्रसंगी नाटक मंडळी कोणा एकाची कोल्हटकरांकडून ‘चाली घ्यायला’ नेमणूक करत असे. मूकनायक (१८९७) या नाटकाच्या चाली कोल्हटकरांनी प्रथम मिरजकरांना दिल्या. मग काही दिवसांनी गोर्‍यांना दिल्या. मिरजकर-गोरे हे किर्लोस्कर मंडळींतले तुलनेने दुय्यम नट होते.‘पण यापेक्षां विशेष आंच कोणामध्येंच दिसली नाहीं’ अशी तक्रार ते करतात.

तालमी घेणं : वास्तविक हे काम नाटककाराचं नाही. त्यासाठी ‘तालीममास्तर’ ही वेगळी व्यक्ती असे. अर्थात तालीममास्तर + लेखक असा जोडव्यवसाय असलेले लोकही होतेच. उदा. खुद्द अण्णासाहेब किर्लोस्करांनी नेमलेले गोविंद बल्लाळ देवल. दूरगावातला वकिली व्यवसाय सांभाळून रोजच्या रोज तालमी घेणं कोल्हटकरांना शक्यही नव्हतं. पण आपल्या नाटकाच्या तालमीत आपला थोडा तरी सहभाग असावा अशी कोल्हटकरांची अपेक्षा दिसते. कदाचित आपल्या संहितेला न्याय मिळतो आहे याची खातरजमा करणं हा उद्देश असावा. वीरतनय (१८९३) या पहिल्या नाटकांच्या तालमी घेण्यात कोल्हटकरांचा सहभाग दिसतो. अर्थात ते त्या वेळेला विद्यार्थिदशेत आणि पुण्या-मुंबईत असल्याने त्यांना वेळही असावा. पुढे सहचारिणी (१९१८) या नाटकापर्यंत त्यांना तालमी घ्यायला जमलं नाही. जन्मरहस्य (१९१८) या नाटकाच्या मात्र त्यांनी बलवंत मंडळीसाठी तालमी घेतल्या. एकंदरीत कोल्हटकर अपवाद होते - नाटककाराने नाटक बसवावं अशी त्या काळची प्रथाच असावी.

क्वचित प्रसंगी पहिल्या काही प्रयोगानंतर संहितेत काही कमीजास्त असल्यास फेरफार करणं ही नाटककाराची जबाबदारी होती. जन्मरहस्य (१९१८) या नाटकाबाबत आधी उल्लेख केलेला पात्रयोजनेचा गोंधळ झाला, शिवाय ‘नाटकांच्या गद्यांत कापाकापी करितांना मंडळीनें ढोबळ चुका केलेल्या दिसल्या’. यामुळे कोल्हटकर चिडले नाहीत याचं नाही म्हटलं तरी आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

नाटककाराच्या या मुख्य जबाबदार्‍या. याबरोबर कोल्हटकरांच्या नाट्यसंहिता छापील स्वरूपात प्रकाशितही होत असत. त्याही सहसा नाटकाचे प्रयोग सुरू असतानाच. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या नियतकालिकांत अन्य नाटकांची परीक्षणं / समीक्षा / टीका लिहिणं हाही नाट्यधंद्याशी संलग्न उद्योग कोल्हटकर करत असत.

नाटककार म्हणून कोल्हटकरांना काही जोखमी (risks) घ्याव्या लागत.

‘बाजारजोखीम’ (market risk) ही प्रमुख जोखीम. बाजाराने आपलं नाटक नाकारायची, अर्थात नाटक अयशस्वी होण्याची, ‘आपटण्या’ची भीती. नाटक हे मुळातच टीमवर्क आहे. Any team is as strong as its weakest member या न्यायाने नाटक पडण्यासाठी लेखक (+संगीतकार), दिग्दर्शक (/तालीममास्तर), नट, सहकलाकार यांपैकी कोणीही जबाबदार असू शकतं. किंवा कदाचित कोणाच्याच कह्यांत नसलेली बाह्य परिस्थितीही नाटकाच्या यशाला घातक ठरू शकते. वीरतनय (१८९३) हे नाटक मुंबईत गाजत असतानाच प्लेगमुळे गर्दी कशी आटली आणि प्रयोगांचं कंत्राट घेणार्‍या एका ‘श्रीमान कोळ्या’ला कसा घाटा आला याचं वर्णन कोल्हटकर करतात. ते काहीही असलं तरी अपयश ते अपयश, आणि इतर कोणाहीप्रमाणे नाटककाराला ते अपयश भोवतंच.

‘आत्मवृत्त’ लिहितेवेळीपर्यंत (१९१९) कोल्हटकरांच्या नऊ नाटकांपैकी सहचारिणी (१९१८) आणि परिवर्तन (१९१८) ही नाटकं अपयशी झाल्याचं स्वत: कोल्हटकर - आडवळणाने का होईना, पण - कबूल करतात. गंधर्व मंडळीसाठी ही नाटकं सहा हजार रुपये देऊन घेणारे गणपतराव बोडस ‘आम्ही रुपये देऊन विद्वानांचा परामर्श घेतला’ असं निराशेने म्हणतात. नेमक्या याच दोन नाटकांबाबत कोल्हटकरांना आपली रुळलेली, अंगवळणी पडलेली लेखनपद्धत मोडावी लागली होती. सहचारिणी (१९१८) लिहितेवेळी ‘ज्यां दिवाणखान्यांत मी लिहावयास बसत असें त्यांत माझ्या भोंवती घरांतील मुलाबाळांची सारखी वर्दळ असे. अशा परिस्थितींत नाटक लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग होता’ असं ते म्हणतात. आधी लिहिल्याप्रमाणे परिवर्तन (१९१८) लिहायला कोर्टातलं काम सांभाळून २०-२५ दिवस लागले. अशा परिस्थितीत लेखनात काही त्रुटी राहिल्या असण्याची शक्यता वाटते. पण गमतीचा भाग असा, की ‘आपण वाईट लिहिल्याने / कमी पडल्याने नाटक अयशस्वी झालं’ या शक्यतेचा ते विचारही करत नाहीत! उलट ‘सरकारी प्रयोग असल्याने फिका पडला’ वगैरे कारणं देतात. कोल्हटकरांच्या स्वभावविशेषावर प्रकाश टाकणारी ही गोष्ट आहे.

नाटककारांची आपसांतली ‘स्पर्धा’ ही दुसरी जोखीम. नाटककाराच्या दृष्टीने पाहायचं तर स्पर्धा ही काळाप्रमाणे वाढतच जाणार. कारण नवी नाटकं आली तरी जुनी जात नाहीत. त्यांच्या संहिता शिल्लक राहतात, आणि पुरेशी लोकप्रिय असली तर परतपरत प्रयोगही होतात. (किर्लोस्कर कंपनीत बालगंधर्व आल्यावर ‘सौभद्र’चं पुनरुज्जीवन करण्यात आलं. ते त्या काळी चालू नाटक नव्हतं.) हा भाग जरी वगळला, तरी कोल्हटकरांचा नाट्यलेखनकाळ हा मराठी संगीत नाटकांच्या ऐन उमेदीचा काळ. देवल-खाडिलकर-गडकरी हे समकालीन लेखक कोल्हटकरांचे हेवीवेट स्पर्धक. (त्यांच्या आपसांतल्या संबंधांविषयी लेखात आधी लिहिलं आहे.) त्याव्यतिरिक्त अन्य लेखकांकडून स्पर्धाही होतीच.

सुरुवातीच्या काळात कोल्हटकरांना स्पर्धेचा विशेष उपद्रव झालेला दिसत नाही. एक तर पहिली नाटकं बर्‍यापैकी लोकप्रिय झाली. त्या काळातली संगीत नाटकांची वर्धिष्णू बाजारपेठ (expanding market) हेही कारण असावं.

वि.सी. गुर्जर आणि गडकरी विरुद्ध कोल्हटकर या भांडणाचा इथे थोडक्यात उल्लेख करायला पाहिजे. कोल्हटकरांनी जन्मरहस्य (१९१८) हे नाटक लिहिलं, तेव्हा गडकर्‍यांचं ‘भावबंधन’ आणि गुर्जरांचं एक नाटक ही बलवंत नाटक मंडळींत आगोदरच रांगेत होती. त्यामुळे आधी भावबंधन, मग गुर्जरांचं नाटक, आणि मग जन्मरहस्य असा क्रम असावा असं सगळ्यांचं मत होतं. पण चावी अशी फिरली१५ की या दोघांना मागे टाकून बलवंत मंडळीने जन्मरहस्यच आधी बसवायला घेतलं!१६ पत्ता काटला गेल्याने गुर्जर-कोल्हटकरांत वितुष्ट आलं. गडकरी-कोल्हटकरांतही कुरबुरी झाल्या, पण आपल्या आराध्य दैवतावर जास्त रुसून बसणं गडकर्‍यांना शक्य नव्हतं. शिवाय नियतीनेही अशी संधी दिली नाही. काही महिन्यांतच गडकरी निवर्तले.

स्पर्धेचा दुसरा आयाम म्हणजे नाटक मंडळींमधली स्पर्धा, हेवेदावे, मतभेद आणि मारामार्‍या. मालकांच्या गैरव्यवस्थापनामुळे किर्लोस्कर मंडळी फुटून गंधर्व मंडळी स्थापन झाली, ही प्रसिद्ध घटना आहे. तशी फुटल्यावर देवलांच्या ‘मानापमाना’च्या हक्कांबद्दल कोर्टबाजी झाली होती. नाटककाराचा वेळ नाट्यबाह्य गोष्टींवर वाया जाणं ही तिसरी जोखीम. पण कोल्हटकरांनी स्वत:ला जाणीवपूर्वक या गोष्टींपासून दूर ठेवलेलं दिसतं. किंबहुना स्वत: वकील असूनही, आणि नाटक मंडळ्य़ांचे हेवेदावे कोर्टापर्यंत जायची उज्ज्वल (?) परंपरा असूनही कोल्हटकरांनी मात्र कोणावर दावे ठोकले नाहीत आणि कोणी त्यांच्यावरही ठोकले नाहीत.

नाट्यबाह्य गोष्टींवर बोलताना कोल्हटकरांच्या स्वभावावर प्रकाशझोत टाकणारी एक गोष्ट आवर्जून नोंदली पाहिजे : मानपान. कोल्हटकरांचा स्वभाव मानी असल्याचं जाणवतं. (कदाचित तो त्या काळाचाही गुण असू शकेल.) क्षुल्लक मानपान नीट झाला नाही की लगेच पापड मोडत असे. वीरतनय (१८९३) नाटकाच्या तालमीला बरोबर आलेल्या सोबत्यांचा किर्लोस्कर कंपनीने नीट आदरसत्कार केला नाही, म्हणून ते कंपनीचं बिर्‍हाड सोडून दुसरीकडेच राहिले. भाऊराव कोल्हटकरांनी मग मध्यस्थी केली. तरी पहिल्या प्रयोगाचं आमंत्रण ‘संध्याकाळीं दिवे लागण्याच्या सुमारास एका किरकोळ मनुष्याच्या हातीं पाठविल्यामुळें’ त्यांचा पापड मोडलाच. (याच प्रयोगात मागे उल्लेख आला आहे तो ‘चाली चोरण्यामुळे’ घडलेला राडा झाला.)

जेवायच्या पंगतीत नाटककाराचं पान पहिलं असे. ते मॅनेजरने बळकावून कोल्हटकरांना दुसर्‍या पानावर बसवण्याचा प्रसंग कोल्हटकरांना इतका झोंबतो की त्या घटनेनंतर दहा वर्षांनी लिहिलेल्या ‘आत्मवृत्ता’त ते आवर्जून नोंद करतात. तो संपूर्ण उताराच मुळापासून वाचण्यासारखा आहे!

सर्वात मोठी जोखीम - आणि त्यावर कोल्हटकरांनी भरपूर लिहिलं आहे - ती म्हणजे ठरलेले पैसे वसूल न होणं (credit risk). आता याबद्दल कोणालाच आश्चर्य वाटायचं कारण नाही. आज शंभर वर्षांनंतरही या विषयावर नाटक-सिनेमांतली मंडळी फेसबुकवर पोस्ट टाकून एकमेकांचा उद्धार करत असतात.

याची उदाहरणं ‘आत्मवृत्ता’त अक्षरश: जागोजागी आहेत. एकच प्रातिनिधिक किस्सा बघू.

मूकनायक (१८९७) आणि गुप्तमंजूष (१८९९) ही किर्लोस्कर मंडळीला १६०० रु. किमतीत कोल्हटकरांनी विकली. त्यापैकी ६७५ रु. ताबडतोब रोखीत मिळाले. उरले (१६००-६७५ = ) ९२५ रु. सन १९०२ हा किर्लोस्कर कंपनीच्या उतरणीच्या सुरुवातीचा हा काळ होता. एक भागीदार भाऊराव कोल्हटकर वारले होते. दुसरे भागीदार मोरोबा वाघोलीकर निवृत्त झाले होते. मूळ मालकांपैकी रामभाऊ किंजवडेकर उरले होते आणि जोडीला टिळकांच्या आज्ञेवरून किर्लोस्कर मंडळींत प्रमुख नट म्हणून आलेले नारायणराव जोगळेकर हेही मालक होते. त्यामुळे हे ९२५ रु. द्यायची जबाबदारी या दोघांची होती. पण जोगळेकर आणि शंकरराव मुजुमदार (मॅनेजर) यांनी किंजवडेकरांकडून या रकमेचा हवाला घ्यायची गळ घातली. (म्हणजे रक्कम द्यायची जबाबदारी एकट्या किंजवडेकरांची, भागीदारांची joint and several liability नव्हे!) जुन्या दोस्तीमुळे कोल्हटकरांना किंजवडेकरांची भीड पडली आणि त्यांनी हवाला घेतला, पण भिडेखातर एकदम त्यातले ४०० रु. माफ करून टाकले! उरले (९२५-४०० = ) ५७५ रु. तरी शेवटपर्यंत यातले निम्मेच वसूल झाले, असं कोल्हटकर लिहितात!

हे काहीही असलं तरी थकबाक्या आहेत म्हणून कोल्हटकरांनी या नाटक मंडळींना नाटकं देणं थांबवलं नाही. वरच्या किश्शानंतर काही महिन्यांतच मुजुमदारांनी कोल्हटकरांकडे नवीन नाटक मागितलं आणि कोल्हटकरांनी ते दिलंही! त्या काळी संगीत नाटकांना न्याय देऊ शकतील अशी मंडळी थोडीच असावीत (oligopsony), आणि म्हणून कोल्हटकरांना झक मारत त्यांच्याकडेच जावं लागत असावं!

समारोप

या लेखाचा उद्देश श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या ‘आत्मवृत्ता’च्या मदतीने संगीत नाटकांच्या लेखकाचं जग उलगडून दाखवावं एवढ्यापुरता मर्यादित आहे. साहाजिकच काही रोचक मुद्द्यांना जाणीवपूर्वक बगल दिली आहे. तरी त्यांची नोंद करून ठेवतो.

काही मुद्दे ‘आत्मवृत्ता’त आहेत, पण त्याचा संगीत नाटकांच्या लेखकाच्या जगाशी संबंध नाही. त्यात हिराबाई पेडणेकर आणि नारायणराव जोगळेकर यांच्या रोमान्सचा किस्सा आहे, गडकरी आणि कोल्हटकर यांच्या गुरुशिष्यमैत्री नात्याचा हृद्य प्रवास आहे, तत्कालीन लेखिकांना कोल्हटकरांनी दिलेल्या ‘मेंटॉरिंग’चे उल्लेख आहेत, कोल्हटकरांची लेखनमोहिनी (muse) समलिंगी आकर्षणातून आलेली असावी का? अशी (मला आलेली) शंका आहे आणि साहित्य संमेलनांच्या उपयोगाबद्दल कोल्हटकरांचं एक चमकदार निरीक्षण आहे.

काही मुद्दे संगीत नाटकांच्या जगाशी संबंधित आहेत, पण ‘आत्मवृत्ता’त नसल्याने त्याचा अंतर्भाव या लेखात केला नाही. यातला मुख्य मुद्दा आहे संगीत नाटकांचं अर्थकारण. संदर्भग्रंथ भरपूर आहेत, आणि बर्‍याच अंशी ते उपलब्धही आहेत. यावर आणखी अभ्यास करून लिहायला मला आवडेल.

कोल्हटकरांनी हे ‘आत्मवृत्त’ १९१९ साली लिहिलं. या वेळेपर्यंत त्यांची नऊ नाटकं आली होती. त्यांचा मृत्यू १९३४ साली झाला. नाट्यलेखनाचा आपला सरासरी वेग (३ वर्षं) त्यांनी कायम राखलेला दिसतो. मधल्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी आणखी तीन नाटकं लिहिली (शिवपावित्र्य, श्रमसाफल्य, आणि मायाविवाह). ‘आत्मवृत्त’ लिहिताना त्यांची मन:स्थिती चमत्कारिक होती. घरामुलाबाळांपासून दूर जळगावात ते व्यवसायानिमित्त येऊन राहिले होते. ‘जिवाचा सखा’ म्हणावे असे शिष्यमित्र गडकरी अवघ्या दीड महिन्यापूर्वी वारले होते. गंधर्व मंडळींशी दोन फ़्लॉप नाटकांमुळे ‘आतां विशेष सख्य राहिले नाही’, आणि थकबाक्यांमुळे अन्य मंडळींबाबत ‘मनें शुद्ध नाहींत’. का.र. मित्रांसारख्या संपादकांशी काही ना काही व्यवहारिक गोष्टींमुळे भांडण आहे. ‘अशा मन:स्थितींत या सर्वांच्या संपर्कापासून दूरगांवी राहाणेंच त्यांच्या व माझ्या स्वस्थतेच्या दृष्टीनें श्रेयस्कर आहे’ अशी विषण्ण टिप्पणी ते ‘आत्मवृत्ता’च्या शेवटी करतात. तरी अंगवळणी पडलेली लेखनाची सवय सुटत नाही. म्हणूनच आघाडीच्या नियतकालिकांनी गडकर्‍यांवर मृत्युलेख लिहायची विनंती ते झिडकारतात, पण कोण्या अप्रसिद्ध अध्यापकाने केलेली ‘आत्मवृत्त’ लिहायची विनंती मात्र स्वीकारतात! तरी, हे काम दहा एक वर्षं पुढे ढकललं असतं तरी चाललं असतं असं वाटल्याशिवाय राहात नाही.

(समाप्त)

तळटिपा:

  1. इथे ’व्यवसायधंदा’ हा शब्द “व्यावसायिक क्षेत्र” (industry sector) या अर्थी वापरला आहे. उदा. सॉफ्टवेअर इंड्रस्ट्री. 

  2. हाच सुवर्णकाळ का? यामागची भूमिका विस्ताराने मांडणं विषयांतर होईल. विष्णुदास भाव्यांनी पायंडा पाडून दिलेली ‘पौराणिक’ नाटकं १८८० साली किर्लोस्कर कंपनीच्या उदयानंतर उतरणीला लागली, आणि १८९० सालपर्यंत पूर्णपणे लयाला गेली. आपण ज्याला ‘संगीत नाटक' म्हणून सामान्यतः ओळखतो, अशा अण्णासाहेब किर्लोस्कर-प्रणीत नाटकांची उर्जितावस्था तिथपासून सुरू झाली असं ढोबळमानाने म्हणता येईल. १९३२ साली 'अयोध्येचा राजा' प्रदर्शित झाला आणि सिनेमामुळे नाटकांचे वाईट दिवस सुरू झाले. खुद्द बालगंधर्वांनी १९३६मध्ये 'धर्मात्मा' नावाच्या टुकारोत्तम सिनेमात काम करून ‘शवपेटीला शेवटचा खिळा’ ठोकला! 

  3. कोल्हटकर खरोखरच पुरोगामी सुधारक होते का? हा प्रश्न मात्र थोडा गंमतशीर आहे. एकीकडे ‘सुदाम्याच्या पोह्या’तून केलेली धर्मटीका, दुसरीकडे ज्योतिषाचा नाद आणि दैवावर, शकुनावर प्रगाढ विश्वास असा परस्परविरोधी प्रकार कोल्हटकरांच्या ‘आत्मवृत्ता’त आढळतो. 

  4. यावर दत्तो वामन पोतदारांच्या ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार’मध्ये एक रोचक थियरी आहे. अर्थात ते विषयांतर होईल म्हणून थांबतो. 

  5. ज्या ‘नीट वठल्या नाहीत’ अशी स्पष्ट कबुली ते देतात! 

  6. अगदी अपवाद म्हणून खास कोल्हटकरी नर्मविनोद आहे. एक मासला द्यायचा मोह आवरत नाही. ‘[सुमंत कवि] यांची प्रथम पत्नी वारल्यावर तिच्या निधनानें त्यांस झालेले दु:ख 'विरहगीति'च्या द्वारें बाहेर पडलें. त्याबरोबर त्या दु:खाचे अवतारकृत्यहि समाप्त झालें असेल अशी मला त्यावेळीं शंकाहि आली नाहीं. परंतु त्यानंतर लवकरच सुमंतांचें पत्र आलें, त्यांत त्यांनीं त्यांच्या नूतन विवाहास मदत म्हणून खामगांव येथें वर्गणी गोळा करण्याची मला विनंति केली होती. ती विनंति मीं साफ अमान्य केलीं हें मुद्दाम सांगण्याचें कारण नाहीं.’ 

  7. अर्थात यावरून ‘कोल्हटकरांचा स्वभाव विनोदी नव्हताच’ असं म्हणता येणार नाही. कोल्हटकर-गडकरी यांच्या प्रथमभेटीत ‘कोट्या-प्रतिकोट्यांचे भुईनळे फुटत होते’ असं काहीसं वर्णन गणपतराव बोडस करतात. 

  8. आजही व्यावसायिक नाट्यसंस्था असतात, पण त्यांत आणि ‘नाटक मंडळीं’मध्ये असलेला मूलभूत फरक म्हणजे नाटक मंडळींमध्ये मालकीबंधनं (exclusivity) असायची. एका मंडळीतल्या नटाला दुसर्‍या मंडळींच्या नाटकात काम करायला बंदी असायची. अगदी अपवादात्मक परिस्थितीत दोन नाटक मंडळी एकत्र येऊन एक नाटक करायच्या. ‘संयुक्त मानापमान’ हे सुप्रसिद्ध उदाहरण. तेही नाटकापेक्षा नाट्यबाह्य गोष्टींमुळेच आतोनात गाजलं! 

  9. काही गुंतवणूकदारांनी / आश्रयदात्यांनी आपल्या स्थानाचा गैरवापर केल्याची उदाहरणं आहेत, पण ते विषयांतर होईल. 

  10. या उतरंडीतल्या भूमिका कधीकधी एकमेकांत मिसळून जात - म्हणजे एकच व्यक्ती एकापेक्षा अधिक भूमिका करत असे. दुसरं म्हणजे, ही उतरंड परस्परसापेक्ष असली तरी कधीकधी उतरंडीतल्या खालच्या स्थानावरचा व्यक्ती स्वकर्तृत्वाने जास्त लोकप्रिय व्हायचा. उदा. अहमदजान थिरकवा या तबलजींचा मान बालगंधर्व आणि केशवराव भोसल्यांसारख्या स्टारच्या तोडीचा होता! उतरंडीतून वर चढल्याचीही उदाहरणं आहेत. किरकोळ भूमिका करणारे नट म्हणून किर्लोस्कर कंपनीत लागलेले गणपतराव बोडस वीस वर्षांनी भागीदार झाले, तेव्हा ‘गणू मालकींत गेला’ म्हणून त्यांच्या हितशत्रूंच्या पोटात दुखलं होतं. 

  11. गणपतराव बोडसांच्या आत्मचरित्रात यावर एक बोलका किस्सा आला आहे. नाटक मंडळीत पळून गेल्याबद्दल निर्भर्त्सना करणारे बोडसांचे मास्तर ‘गणू किर्लोस्कर मंडळींत आहे’ हे कळताच नरम होतात, आणि मान देतात! 

  12. आज हे काम चॅनल्सचे ‘क्रिएटिव्ह हेड्स’ करतात. त्यांच्या बर्‍यावाईट कहाण्या प्रसिद्ध आहेतच. 

  13. गुप्तमंजूष (१८९९) ८-१० दिवस, मतिविकार (१९०६) ७ दिवस, प्रेमशोधन (१९०८) ५.५ दिवस, वधुपरीक्षा (१९१२) ८ दिवस, सहचारिणी (१९१८) ७ दिवस, जन्मरहस्य (१९१८) ९ दिवस. 

  14. या हिराबाई पेडणेकर म्हणजे मराठीतल्या पहिल्या स्त्री-नाटककार. त्यांच्या आणि कोल्हटकरांच्या अशारीरी (platonic) स्नेहसंबंधांची हकीकत मुळातूनच वाचण्यासारखी आहे. 

  15. ही चावी कशी फिरली याबद्दल कोल्हटकरांची बाजू ‘आत्मवृत्ता’त लिहिली आहे. त्यात अर्थातच कोल्हटकर निर्दोष आहेत. पण हीच हकीगत गडकर्‍यांच्या किंवा गुर्जरांच्या बाजूने ऐकली तर वेगळा पैलू दिसेल. असो. 

  16. आता इतर सगळी नाटक मंडळी सोडून हे तिघेही आघाडीचे नाटककार बलवंत मंडळीच्याच दारी एकत्र का तडफडले, याचं समाधानकारक उत्तर मला तरी अजून मिळालेलं नाही! 

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

4 Sep 2019 - 7:43 am | यशोधरा

वेगळा विषय. रोचक माहिती.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Sep 2019 - 8:46 am | ज्ञानोबाचे पैजार

लेखाची एकंदर मांडणी आवडली.
ज्ञानकोषातल्या लेखांची मांडणी साधारण अशी केलेली असते.
पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

4 Sep 2019 - 1:49 pm | टर्मीनेटर

एकदम सहमत!
तळटीपांसाठी केलेला सुपरस्क्रिप्टचा वापर आणि एकंदरीत माहितीच्या संकलनावर घेतलेली मेहनत भावली.
नाटक / नाट्य लेखक हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय नसूनही उत्तम मांडणीमुळे हा लेख आवडला 👍

प्रचेतस's picture

5 Sep 2019 - 8:10 am | प्रचेतस

अगदी हेच म्हणतो.

अनिंद्य's picture

4 Sep 2019 - 11:03 am | अनिंद्य

@ आदूबाळ,

उत्तम साक्षेपी आढावा घेतलाय.

पहिली काही वाक्ये वाचली आणि एकदम हसायला आलं - माहितीत अशी स्वप्रकाशित स्वनामधन्य मंडळी असल्यामुळे :-)

लेखन आवडले, पु ले शु,

अनिंद्य

पद्मावति's picture

4 Sep 2019 - 1:06 pm | पद्मावति

रोचक. लेख आवडला.

नेहमीप्रमाणे भारी लेखन हो आबा..

जालिम लोशन's picture

4 Sep 2019 - 2:14 pm | जालिम लोशन

रोचक.

अमर विश्वास's picture

4 Sep 2019 - 2:38 pm | अमर विश्वास

अभ्यासपूर्ण लेख

नाट्यगीतांच्या चालींबद्दल वाचून वसंतरावांचे "मराठी नाट्यसंगीताची वाटचाल" आठवले

अलकनंदा's picture

4 Sep 2019 - 3:27 pm | अलकनंदा

लेख विषयाची मांडणी उत्तम जमली आहे.

जेम्स वांड's picture

4 Sep 2019 - 9:29 pm | जेम्स वांड

अभ्यास म्हणायचं का काय!!

आदूबाळ तुम्ही निव्वळ ज ब र द स्त लिहिलेत, अशक्य भारी लेखन. अतिशय वेगळा विषय आणि अतिशय व्यवस्थित लेखन. त्याला विशेषांकमंडळाने केलेली कलाकुसर तर चेरी ऑन द टॉप.

तुफान आहे एकदम, तुमची गारपाऱ्यातील गहनकथा वाचून मी इतर मराठी संस्थळे सोडून मिपावर सदस्यत्व पहिले घ्यायचे ठरवले होते. तुमचे अजून लेखन वाचायला आवडेल, कृपया व्यावसायिक कमिटमेंट्स मधून वेळ काढून नक्की रेग्युलर लेखन करा ही एक विनंती.

यावर आणखी अभ्यास करून लिहायला मला आवडेल.

लिहाच!

खिलजि's picture

5 Sep 2019 - 4:21 pm | खिलजि

आबा , दोनदा वाचून काढला .. विषय जरा कठीण आहे पण आपलं लिखाण एक नंबर .. मला स्वतःला फारसे काही या क्षेत्राबद्दल माहित नसूनही आपला लेख दोनदा वाचून काढणे , हि म्हणजे तुमच्या सादरीकरणाला मिळालेली पोचपावतीच म्हणा .. आबा , मी मात्र आपलं लिखाण वेगळ्या संदर्भातून घेतलं .. ते म्हणजे धंदा कसा करावा यासाठी एक ऐतिहासिक आणि अभ्यासपूर्ण उदाहरण म्हणून चपखल बसेल असा हा लेख झालाय ..

अनुप ढेरे's picture

5 Sep 2019 - 4:25 pm | अनुप ढेरे

लेख आवडला!

सुमीत भातखंडे's picture

5 Sep 2019 - 9:40 pm | सुमीत भातखंडे

पु. श्री. काळ्यांचं एक पुस्तक नुकतच वाचनात आलं - "ललितकलेच्या सहवासात". पुश्रींचा नेपथ्यकार म्हणून ललितकलादर्श मंडळीशी बरीच वर्षं संबंध आला.ह्या सर्व काळात आधी केशवराव भोसले आणि मग बापूराव पेंढारकर ह्यांनी कंपनीची धुरा कशा प्रकारे सांभाळली, काय-काय अडचणी आल्या इत्यादी माहिती पुस्तकात आहे.

हा लेख पण मस्त झालाय. नाट्य संगीत हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे लेखन अधिकच भावलं.

जयंत कुलकर्णी's picture

5 Sep 2019 - 10:14 pm | जयंत कुलकर्णी

मस्तच पण नाटकांवर अवलंबून नसल्यामुळे त्यांना परके म्हणून संबोधणे मला जरा खटकले. कदाचित त्यांच्या वकीलीच्या व्यवसायामुळे ते त्रयस्थासारखा विचार करू शकले असतील. पण लेख उत्तमच आहे... मी आपला एक विचार मांडला. त्याकडे फार लक्ष देऊ नये...

तुषार काळभोर's picture

7 Sep 2019 - 6:35 pm | तुषार काळभोर

लेख इतक्या अभ्यासाने, सफाईने आणि सुगम लेखनशैलीने लिहिला आहे की, इतका प्रदीर्घ असूनही सलग वाचून काढला.

शंभर वर्षांपूर्वीच्या आत्मवृत्तातुन तत्कालीन परिस्थिचा विस्तृत परामर्श घेतलाय.

धन्यवाद!!

मित्रहो's picture

8 Sep 2019 - 12:07 pm | मित्रहो

वेगळया विषयावरील लेख आवडला. बरीच माहीती मिळाली.

धर्मराजमुटके's picture

8 Sep 2019 - 12:42 pm | धर्मराजमुटके

मस्त लेख ! खुप आवडला.

नंदन's picture

8 Sep 2019 - 2:53 pm | नंदन

लेख अतिशय आवडला. गोडसे भटजींवरचा लेख काय किंवा हा संगीत नाटकांवरचा लेख, त्याकडे पाहण्याचा हा निराळा दृष्टिकोण अतिशय मोलाचा आहे. (लेखनाव्यतिरिक्त लेखकाच्या अंगावर येऊन पडणार्‍या कामांची यादी पाहून अंमळ 'द किंग्ज मेन' ह्या शेक्सपिअरच्या नाटककंपनीच्या कारभाराची आठवण झाली.) विस्तारभयास्तव न लिहिलेल्या मुद्द्यांबद्दलही यथावकाश वाचायला आवडेल.

>>> सर्जकतेच्या शिखरावर असलेले गडकरी ‘तुम्ही एलएल.बी. म्हणून तुम्हांस इतके रुपये... असा त्रागा करतात.
--- निराळ्या अर्थाने, हेही एक 'भाव'बंधन! :)

प्राची अश्विनी's picture

10 Sep 2019 - 8:03 am | प्राची अश्विनी

अभ्यासपूर्ण लेख आवडला.

सिरुसेरि's picture

12 Sep 2019 - 10:31 pm | सिरुसेरि

मस्त लेख ! सखोल व्यासंग .

श्वेता२४'s picture

13 Sep 2019 - 11:12 am | श्वेता२४

संगीत नाटक म्हणले तर त्यातील नट व त्यातील पदे यांवरच जास्त लिखाण वाचायला मिळते. पण संगीत नाटककारांचा नाट्यलेखनाचा व्यवसाय या दृष्टीतून तुम्ही अतीशय विस्तृत पण अभ्यासपूर्ण लेख लिहीला आहे. अतीशय वेगळी माहिती वाचावयास मिळाली. धन्यवाद.

गामा पैलवान's picture

13 Sep 2019 - 5:31 pm | गामा पैलवान

आदूबाळ,

चाकोरीबाह्य व वैविध्ययुक्त लेख! जमल्यास कृपया अधिक लिहावे ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

चित्रगुप्त's picture

13 Sep 2019 - 7:35 pm | चित्रगुप्त

अतिशय अभ्यासपूर्ण, उत्कृष्ट, वाचनीय, माहितीपूर्ण लेखासाठी अनेक आभार.
'चूल पेटणे', 'टुकारोत्तम', 'नानापाटेकरीय गोडीगुलाबी', 'अन्नूमलिकपणा', 'बेदम मनोरंजन' वगैरे शब्दप्रयोगांतून लेखाची खुमारी आणखीनच वृद्धिंगत झालेली आहे.
.
.

१८७० च्या दशकातले वरील फोटो कोणकोणत्या नाटकातले असावेत ?

.
सं. 'सौभद्र' मधे सुभद्रा (बालगंधर्व) आणि अर्जुन (गोविंदराव टेंबे)

तुषार काळभोर's picture

13 Sep 2019 - 10:42 pm | तुषार काळभोर

१. पहिला फोटो शाकुंतल असावा.
२. दुसरा फोटो कदाचित जरा अलीकडचा असावा. इ.स. १९००च्या जवळपास. दुसऱ्या फोटोत मागील भिंतीवरच्या वॉलपेपरचं डिजाईनएकदम स्पष्ट दिसतंय. छायाचित्रणाचा इतका दर्जा साधारण कधी असावा?
३. दुसऱ्या फोटोत सर्व पुरुष पात्रांच्या डोळ्यांभोवती पांढरा मेकअप दिसतोय. हे त्या नाटकाच्या गरजेनुसार असावे (पात्रनिर्मिती) की डोळे उठून दिसण्याचे त्या काळातील तंत्र?

ताजा कलम : जरा अजून बारकाईने पाहिल्यावर दुसऱ्या फोटोतील उजवीकडील स्त्री पार्टी पहिल्या फोटोतील उजवीकडील स्त्रीपार्टीसारखाच आहे. अगदी टोप, त्यावरील दागिने, कर्णभूषणं, हातातील बांगड्या, साडीचा काठ, सर्व सारखं आहे. दोन्ही फोटो एकाच नाटकातील दोन प्रवेश असू शकतील.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

13 Sep 2019 - 11:01 pm | हणमंतअण्णा शंकर...

निव्वळ अप्रतिम. संगीत नाटकं हा पुणेकरांचा लाडका नॉस्टॅल्जिक डिल्डो आहे. संगीत नाटकं, त्यातली पदं, संगीत नटांवरची बायोपीकं आणि त्यात असलेली झी-मराठी-छाप निरागस सुरांची गाणी ह्या सगळ्यांचा वीट येईल एवढं वाचायला मिळतं. त्यात संगीत नटागायकांच्या नातवंडांनी सेल्फ्या काढत रात्री लकडी पुलावर हिंडत म्हंटलेली त्यांच्या पदं मुळा-मुठेच्या निर्मळ Sewer gas मध्ये विरून नाहीशी होतात अशा तक्रारी सुद्धा व्हॉट्सॅपातून वाहताहेत.
पण तुम्ही हा एक वेगळाच आर्थिक चश्मा घालून मस्त लेख लिहिला आणि माझे रॅण्ट्स सात प्रतिध्वनी येऊन कुठल्याकुठे विरून गेले.
मस्तंच.
छत्रे सर्कशीवर दैनिक तरुण भारतच्या बुधवारच्या छोट्या पुस्तिकेत एक मस्त लेखमाला सहावी-सातवीत वाचली होती. तसलं काहीतरी वाचायला मिळाल्याचं समाधान मिळालं. तेही बंडलबोर न होता!
धन्यवाद आदूबाळ. खूप शुभेच्छा.

चित्रगुप्त's picture

14 Sep 2019 - 7:45 pm | चित्रगुप्त

पुणेकरांचा लाडका नॉस्टॅल्जिक डिल्डो

बने, तू अजून लहान आहेस, तुला 'पुणेकरांचा लाडका नॉस्टॅल्जिक डिल्डो'तील गंमत कळणार नाही.... तिकडे बघ, ते महाग्रु खांसाहब कसे टोपी लावून गम्मतशीर हातवारे करत 'दिल की तपिश' म्हणत आहेत...
----- ठणठणगुप्त.

लाडका नॉस्टॅल्जिक डिल्डो

लोल. अनेक धन्यवाद, हणमंतअण्णा. या डिल्डोच्या पुणेकरांनी चालवलेल्या उपयोगाकडे न पाहता त्याच्या आजूबाजूला पाहिलं तर वेगळंच जग दिसतं.

माझे एक मित्र 'मी शंभर-दीडशे वर्षांपूर्वी जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं' असे सुस्कारे सोडतात. बिलीव्ह मी - शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचा मराठी समाज अत्यंत भयानक होता. आपलं नशीब थोर म्हणून आपण समाज म्हणून इथवर पोचलो आहोत.

----
बादवे : मी तुमचा फ्याण आहे हे मी कधी सांगितलं आहे का हणमंतअण्णा?

संगीत नाटके , नाटककारांच्या घरातील आर्थिक ओढाताण याबद्दल थोर नाटककर गोविंद बल्लाळ देवल यांनी त्यांच्या "संगीत शारदा" नाटकामधे सुरेल भाष्य केले आहे . त्यामधे नटी सुत्रधाराच्या नाटकवेडाला कंटाळुन म्हणते -
" अजुनी खुळा हा नाद पुरेसा कैसा होइना
नाटक झाले जन्माचे , मनी का हो येइना "

विजुभाऊ's picture

17 Sep 2019 - 12:53 pm | विजुभाऊ

खूप सखोल आणि सुंदर माहिती

गामा पैलवान's picture

17 Sep 2019 - 1:22 pm | गामा पैलवान

अवांतर :

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर,

पुणेकरांचा लाडका नॉस्टॅल्जिक डिल्डो हा वाक्प्रयोग फारंच आवडला आहे. मोहनदास गांधी जसा काँग्रेसकरांचा स्मृतीरंजक शिश्नपर्याय आहे अगदी तस्साच!

आता कृपया नाशिककर आणि बारामतीकरांसमोरील पर्याय काय आहेत यांची चर्चा इथे नको.

धन्यवाद ! ;-)

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

18 Sep 2019 - 10:45 am | जॉनविक्क

मोहनदास गांधी जसा काँग्रेसकरांचा...

वा स्वतः नाटकात राजकारण घुसडायचे आणी इतरांना मात्र मनाई.... कयसे कयसे ? ;)