परवाच एका साखरपुड्याच्या समारंभाला जाण्याचा योग आला. तेव्हा लांब बसून
त्रयस्थपणे गुरुजी करवून घेत असलेले विधी पहात व ऐकत होतो. मी अमुक गोत्राचा
तमुक कुलोत्पन्न असा-असा संकल्प सोडतो या अर्थाची संस्कृत वाक्ये गुरुजी
उच्चारत होते. संपूर्ण विधीमध्ये या घोषणे पलिकडे गोत्राला काही स्थान नव्हते.
मग गोत्राशिवाय संकल्प करता येत नाही असे मानयचे का? तसं असेल तर ते कोणत्याही
विवेकी बुद्धीला पटणारे नाही. पण गोत्रामुळे या उपवर मुलाच्या लग्नात आलेल्या
अडचणी मी डोळ्यादेखत पाहिल्या होत्या. हजारो वर्षांपूर्वी आमच्या काही रानटी
ऋषिपूर्वजांचे (इतिहासाचार्य राजवड्यांचा शब्द्प्रयोग) आपापसात पटले नाही
म्हणून त्यांनी रोटी-बेटी व्यवहार टाळले. आणि म्हणूनच काही गोत्रे जुळत नाहीत
अशा समजुती प्रचारात आल्या. आजही खेड्यापाड्यात ज्या घराण्यांत वंशपरंपरागत
भांडणे असतात तिथे, तसेच काही वैमनस्य असणार्या काही पंथांमध्ये (उदा. शैव व
वैष्णव) रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत.
पण अजूनही वधूवरसूचक मंडळे वधूवरांच्या माहितीची रजिस्टरं तयार करताना
गोत्राच्या अनावश्यक माहितीची मागणी करतात. गोत्र आणि वंशशुद्धीच्या वेडगळ
कल्पना लोक अजूनही घट्ट्पणे उराशी बाळगतात तेव्हा गोत्र संकल्पनेतील पोकळपणा
सर्वांसमोर आणल्याशिवाय राहवत नाही.
गोत्र संकल्पनेतील काही मला उमगलेल्या त्रुटी अशा आहेत -
० गोत्रे कशी निर्माण झाली याचा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. वेदांच्या
वेगवेगळ्या शाखांचे अध्ययन करणारे गोत्रांचे जनक मानले जातात. पण
सूक्ते रचणार्या अनेक ऋषींना गोत्रे नाहीत. ते गोत्रांचे जनकही मानले जात
नाहीत.
० गोत्राना कायदेशीर मान्यता पण नाही. विवाह कायदेशीर ठरण्यास गोत्र अनिवार्य
नाही. फारच काय सगोत्र विवाहाला कायदेशीर मान्यता आहे.
० ब्राह्मणांची अनेक गोत्रे त्यांच्या उपशाखांमध्ये समान आहेत. उदा. अत्रि,
कश्यप, गार्ग्य, वत्स इत्यादि. आता जी गोत्रे समान आहेत त्यांचे वंशज एकाच
पिंडसूत्राचे (bloodlineचे) सदस्य मानले तर अत्रि (कर्हाडे) किंवा अत्रि
(चित्पावन) यांच्यात भेद कसा मानायचा? दूसर्या शब्दात असेही विचारता येईल की
हे अत्रि, कश्यप, गर्ग , वत्स वेगवेगळे ऋषि की एकच?
० याशिवाय बर्याच जणांची झोप उडेल अशा दोन मुद्दयांचा विचार मला करायचा आहे.
भारतामध्ये नियोगाची प्रथा अनेक वर्षे प्रचलित होती. नियोगात जेव्हा पतिकडून
शक्य नसेल तेव्हा स्त्रीला हव्या त्या पुरूषाकडून संतती प्राप्त करून घेता येत
असे. परवापरवा पर्यंत म्हणजे स्पर्मबॅंका, टेस्टट्युब बेबीचे तंत्रज्ञान
अस्तित्वात येइपर्यत एखाद्या आध्यात्मिक गुरूच्या 'प्रसादाने' संतती प्राप्त
झाल्याची उदाहरणे अधूनमधून ऐकू येत असत. ज्यांनी शबाना आझमी आणि श्रीराम लागू
यांचा Immaculate Conception हा चित्रपट बघितला आहे, त्यांना आध्यात्मिक
गुरू कसा प्रसाद देत ते सहज लक्षात येईल. अशा प्रसादोद्भव संततीचे गोत्र कोणते?
सध्याच्या काळात ज्यांना अपत्य नाही ते अनाथालयातून बालकाला दत्तक घेतात. अशा
दत्तक बालकाचे गोत्र कोणते?
तात्पर्य, ज्या गोत्रांना आपण अजून घट्ट्पणे कवटाळले आहे ती संकल्पना किती
पोखरली गेली आहे हे आपल्या लक्षात येईल. असो...
संदर्भ - http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/12/blog-post_11.html
प्रतिक्रिया
29 Aug 2009 - 3:04 pm | ए.चंद्रशेखर
सुमारे सात ते आठ हजार वर्षांपूर्वी भारतात रहाणारे लोक छोट्ट्या टोळ्यांच्या स्वरूपात वसती करून होते. या छोट्ट्या टोळ्यांच्यात आपल्या आपल्याच्यातच स्त्री पुरुष संबंध झाल्यास(ईन ब्रीडीन्ग) पुढची पिढी नित्कृष्ट उपजेल हे मानववंश शास्त्रातील सत्य या लोकांना चांगले माहिती असावे. त्यामुळे एका टोळीचे लोक म्हणजे एका गोत्राचे लोक असे समजण्यास हरकत नाही. सगोत्र विवाह करू नयेत ही समजूत यामुळे सुरू झाली असावी.
आता आपण टोळ्या करूनही रहात नाही आणि एकाच गोत्राचे लोक जवळचे नातेवाईकही नसतात. त्यामुळे असल्या जुन्या समजूती डोक्यातून काढून टाकणे आवश्यक आहे. अर्थात बरेच लोक या गोत्र पद्धतीचा मुलाला किंवा मुलीला नकार देण्यासाठी वापर करतात. त्याला काय करणार?
चंद्रशेखर
29 Aug 2009 - 4:26 pm | ऋषिकेश
अत्यंत योग्य मुद्दा..
गोत्रच काय पण जर मुलाला मुलगी व मुलीला मुलगा पसंत असेल तर पत्रिका, जात, धर्म, राष्ट्रीयत्त्व, वर्ण काहिच बघु नये असे माझे मत आहे.
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ४ वाजून २५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "प्यार किया तो डरना क्या...."
29 Aug 2009 - 4:33 pm | सुनील
....... पण मुलगी जबाबदार आहे की महत्वाकांक्षी ते मात्र जरूर पहावे! ;)
(जबाबदार महत्वाकांक्षी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Aug 2009 - 8:28 pm | सखाराम_गटणे™
>>....... पण मुलगी जबाबदार आहे की महत्वाकांक्षी ते मात्र जरूर पहावे!
जब्रा
29 Aug 2009 - 11:43 pm | पक्या
>>गोत्रच काय पण जर मुलाला मुलगी व मुलीला मुलगा पसंत असेल तर पत्रिका, जात, धर्म, राष्ट्रीयत्त्व, वर्ण काहिच बघु नये असे माझे मत आहे.
बरोबर . पसंती असेल तर वरील गोष्टी नाही बघितल्या तरी काही फरक पडत नाही. मात्र बधू वरांची ब्लड टेस्ट होणे आवश्यक आहे. जेणे करुन काही संसर्गजन्य आजार / रोग (एकमेकांपासून होणारे ..एडस वगैरे) आणी अनुवांशिक आजार (उदा. थालसेमिया) पुढच्या पिढीत संक्रमित होणे टाळू शकते.
माझ्या नात्यातील एका लांबच्या भावाचा पहिला मुलगा ७-८ वर्षाचा झाल्यावर थालसेमियाने गेला. आणि आता त्याचा दुसरा मुलगा साधारण ह्याच वयाचा झाल्यावर त्याच्यातही मोठ्या अपत्याच्या आजारासारखीच लक्षणे दिसू लागली आहेत. वारंवार त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागत आहे . शाळा तर कधीची बंद झाली आहे. आई वडील अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. दोघांच्याही रक्तगटातील एक कुठलातरी रक्तघटक समान आहे.
थालसेमिया (Thalassemia) मेजर आणी थालसेमिया मायनर असलेल्या व्यक्तिंचे मूल अपंग जन्मू शकते. आणि थालसेमिया मेजर असलेल्या व्यक्तींचे मूल जगतच नाहि असे वाचले आहे. आपल्याला थालसेमिया आहे की नाही हे तरूण वयात कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने ब्लड टेस्ट शिवाय कळत नाही.
29 Aug 2009 - 11:58 pm | नीधप
बरोबर . पसंती असेल तर वरील गोष्टी नाही बघितल्या तरी काही फरक पडत नाही. मात्र बधू वरांची ब्लड टेस्ट होणे आवश्यक आहे. जेणे करुन काही संसर्गजन्य आजार / रोग (एकमेकांपासून होणारे ..एडस वगैरे) आणी अनुवांशिक आजार (उदा. थालसेमिया) पुढच्या पिढीत संक्रमित होणे टाळू शकते. <<
बरोबर आहे.
परंतु खरंच एकमेकांच्या प्रेमात असलेली जोडपी या टेस्टचे निकाल कितीही वाईट आले तरी त्यासाठी नातं तोडतील की त्यावर मात करायचा मार्ग शोधतील असा एक प्रश्न पडला. उत्तर माहीत नाही.
मात करणे हे पुढच्या पिढीत संक्रमित होणारे अथवा बरे होऊ शकणारे संसर्गजन्य आजार यांच्या बाबतीत आहे.
एडस हा परत वेगळाच मुद्दा होऊन बसतो. कारण तिथे पहिली ठोकर बसते ती विश्वासाला. अयोग्य रक्त दिले जाणे, वापरलेली सुई परत वापरली जाणे या शक्यतांच्या आधी 'शेण खाल्लेलं असण्याची' शक्यता मनात पहिली येते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
30 Aug 2009 - 11:47 am | ऋषिकेश
बरोब्बर. पूर्ण सहमत
काहि थॅलिसिमिया बद्दल ऐकीव माहिती:
आई/वडील/दोघांपैकी कोणालाही थॅलेसिमिया मायनर असेल तर गर्भप्राप्ती झाल्यानंतर पंधरवड्यात एक लस आईला टोचायची असते ज्यामुळे मुलाला थॅलेसेमिया मेजर होत नाहि.तेव्हा लग्नाआधी ही टेस्ट करून ह्या गोष्टीची माहिती असणे उत्तम म्हणजे संभाव्य धोका टाळता येतो.
तसेच एच आय व्ही चे. याची टेस्ट करावी मात्र निर्णय प्रत्येकाने घेताना 'एचायव्ही पॉसिटीव्ह म्हणजे एड्स नव्हे" हे लक्षात ठेऊन घ्यावा. केवळ एचायव्ही पॉसिटीव्ह बरा होतो. इतकेच नाहि तर आता अपत्याला त्याची लागण न करण्यासंबंधी औषधे आहेत
बाकी माझे म्हणणे केवळ लव्ह मॅरेज मधे नसून अरेंज्ड मॅरेजमधेही मुलाला मुलगी व मुलीला मुलगा पसंत असेल तर पत्रिका, जात, धर्म, राष्ट्रीयत्त्व, वर्ण काहिच बघु नये असे माझे मत आहे. मात्र तुम्ही म्हणता तशी ब्लड टेस्ट होणे, मुलीला मुलाची व मुलाला मुलीची पूर्ण आर्थिक माहिती असणे, (मुला व मुलीच्या) सासरकडच्या कुटुंबामधील कायदेशीर बाबी (जसे कोर्टात काहि केस असणे, घरातल्यांवर एखादा गुन्हा दाखल असणे वगैरे) आणि वैद्यकीय इतिहास (जसे काहि ऑपरेशन झाली आहेत का? कसला आजार आहे का?)यावर सांगोपांग चर्चा करून निर्णय घ्यावा असे वाटते.
ऋषिकेश
30 Aug 2009 - 11:53 am | युयुत्सु
ART therapy ने viral load नियंत्रित होते एवढेच माहित होते. केवळ एचायव्ही पॉसिटीव्ह बरा होतो ही नवीन माहिती आहे. कृपया या माहितीचा अधिक खुलासा करावा...
30 Aug 2009 - 4:58 pm | ऋषिकेश
एचायव्ही पॉसिटीव्ह ही रोगाची पहिली पायरी. हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. एचायव्ही पॉसिटीव्ह असलेल्या व्यक्तीला एड्स होईलच याची गॅरेंटी नसते. एखादी व्यक्ती एचायव्ही पॉसिटीव्ह आहे हे लक्षात आल्या आल्या जर उपचार केले तर त्याचे एड्स मधे रुपांतर होणे थांबवता येते (अर्थात तरीही शरीरातील विषाणू जिवंत असतो व संसर्गजन्य असु शकतो, मात्र त्याचा शरीरावरील अधिक प्रादुर्भाव रोखता येतो)
या बाबत एक छान लेख (बहुदा 'टाईम'मधे)वाचला होता मात्र त्याचा दुवा मिळाला नाहि. तूर्तास, या स्थळावरच्या शेवटचा परिच्छेद बघा काय म्हणतो
तेव्हा हा घातक रोग आहेच मात्र तो कोणत्या स्टेजला आहे हे बघणे गरजेचे आहे इतकेच. (अर्थात बर्या होण्याच्या स्टेजला डिटेक्ट होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे कारण तेव्हा बाह्य लक्षणे काहिहि नसतात)
ऋषिकेश
29 Aug 2009 - 7:36 pm | प्रकाश घाटपांडे
लेखाशी सहमत आहे.
एकच गोत्र असले कि वधुवरांच्य अंगावर गोमुत्र टाकले झाले. हाय काय आन नाई काय?
एकच गोत्र असले संततीत दोष आढळतात या अंधश्रद्धेत याचा उगम आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
29 Aug 2009 - 11:21 pm | विजुभाऊ
गोत्र आणि वंश सातत्य ही एक खुळचट कल्पना आहे. आज आचरला जाणारा धर्म ही देखील तितकीच खुळचट्कल्पन आहे
दत्तक गेलेल्याचे गोत्र बदलते हे म्हणजे अतीच झाले.
माझ्या एका जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात वराकडची मंडळी केवळ नवर्यामुलाच्या मूर्ख आईचा अट्टहास म्हणून दधूचे प्रथम रूईच्या झाडाशी लग्न लावले गेले आणि त्या पासून फारकत घेऊन नन्तर मफ नवर्यामुलाशी लग्न लागले गेले. विषेश म्हणजे नवरा नवरी दोघेही एम बी बी एस एम डी आहेत.
त्या एका खुळचट मूर्ख बाई मुळे एका चांगल्या प्रसंगाशी एक मूर्ख आठवण जोडली गेली.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
30 Aug 2009 - 1:04 am | दादा कोंडके
=))
प्रचंड सहमत!
माझ्या एका मित्राच्या ग्रहशांती साठी त्याला बाराहजार वेळा राहू की अशाच कुठल्या ग्रहाचा जप करायला त्यांच्या गुरूजीनी सांगितलं होतं. पण त्याला दुसर्याच दिवशी अमेरीकेत जायचं होतं म्हणून त्याच्या वतीनं बारा ब्राम्हणां कडून (च का?) जप म्हणून घेतले. :))
अगदी मनातलं कुणीतरी पोटतिडकीनं लिहिल्यावर बरं वाटतं.
30 Aug 2009 - 4:46 am | निमीत्त मात्र
विजुभाऊंशी सहमत आहे. असले खुळचट हट्ट, 'जाऊ द्या हो! निदान त्यात काही नुकसान तरी नाही ना' अश्या भावनेने पुरवले तरी एका चांगल्या प्रसंगाशी मूर्ख आठवण जोडली जातेच.
30 Aug 2009 - 4:09 am | संदीप चित्रे
सांगू शकणारा माई का लाल आहे का इथे?
आत्तापर्यंत सगळी चर्चा एकांगी आहे.
मला ह्या विषयातले काही कळत नाही पण दोन्ही बाजू वाचायला आवडेल.
30 Aug 2009 - 4:43 am | निमीत्त मात्र
धीर धरा..विचारांना ट्रेडमिलवर टाकणारे येतीलच दुसरी बाजू सांगायला. ह.घ्या.
30 Aug 2009 - 9:20 am | विसोबा खेचर
हम्म! मुद्दे पटण्याजोगे आहेत..
आपला,
(वासिठ्यगोत्री) तात्या.
30 Aug 2009 - 9:55 am | युयुत्सु
गोत्र सोडायला तुम्ही तयार नाहीत...
30 Aug 2009 - 10:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोत्रे कशी निर्माण झाली याचा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही.
हा निष्कर्ष कोणत्या प्राचिन किंवा आधुनिक ग्रंथाच्या अभ्यासाद्वार काढला आहे. काही संदर्भ पुस्तके, उतारे, वाचायला मिळतील का ?
गोत्राना कायदेशीर मान्यता पण नाही.
गोत्रांना कायदेशीर मान्यता आहे, असे कोणी म्हटले आहे ?
-दिलीप बिरुटे
(कश्यप गोत्री)
अवांतर : ज्याला कोणाला आपले गोत्र सांगता येत नसेल त्यांनी कश्यप गोत्री म्हणावे असे काही वाचल्याचे आठवते.
30 Aug 2009 - 11:55 am | युयुत्सु
मला काहीही problem नाही... ;)
30 Aug 2009 - 12:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला काहीही problem नाही...
अच्छा ! मग ठीक आहे. मला वाटलं तुम्हाला कोणाला गोत्र सांगायचे असेल तेव्हा गोत्र विसरला की काय ? :)
-दिलीप गोत्री
[अभिनेत्यांना शिक्षण,वाचन,लेखन आणि अभिनय कंपलसरी केला पाहिजे- प्रा.डॉ.]
30 Aug 2009 - 4:43 pm | युयुत्सु
मी एक पाखंडी असल्यामूळे धर्माला आणि तज्जन्य कल्पनाना माझ्या आयुष्यात थारा नाही. सप्तपदीला त्याहून नाही... ;)
30 Aug 2009 - 11:08 am | युयुत्सु
The Position of Women in Hindu Civilization - A. S. Altekar, Motilala Banarasidas
30 Aug 2009 - 11:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुस्तकात काय म्हटले आहे ते मराठी भाषेत इथे लिहा ना ? पुस्तकाचे नाव दिले म्हणजे तो विचार स्पष्ट केला आहे असे होत नाही. असे वाटते.
गोत्राबद्दल त्यात काय म्हटले आहे, ते एक वाचक म्हणून वाचण्यास उत्सूक आहे.
पुस्तकाचे नाव इथे दिल्याबद्दल धन्यू...!
-दिलीप बिरुटे
30 Aug 2009 - 6:16 pm | सुबक ठेंगणी
युयुत्सुंचे मुद्दे पटले. दत्तक मुलांच्या गोत्रांचा मुद्दा तर जबरी...
एखाद्या व्यक्तीचे अनुवंशिक गुण हे त्याच्या दोन्ही पालकांकडून येत असतात. पण पितृवंशिक पद्धतीमुळे गोत्र सांगताना पित्याचेच सांगितले जाते. एखाद्याच्या आईचे गोत्र काश्यप आणि वडिलांचे नैधृव असेल आणि जर त्याचा विवाह काश्यप गोत्राच्या व्यक्तीशी झाला तर तो सगोत्र समजावा का? असा प्रश्न मला नेहमी पडतो.