नमस्कार,
आज म.टा वर हा लेख वाचला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4504512.cms
एका शिक्षकाची कैफियत यात मांडली आहे. घरी अडचण असुनही ह्या शिक्षकाला जबरदस्तीने निवडणुकीच्या कामाला जुंपले गेले. भरीस भर म्हणून जेथे त्याची ड्युटी होती तेथे काहिही सोयी सुविधा नव्हत्या. हा लेख वाचा म्हणजे तुम्हाला जास्त कल्पना येईल. मनात विचार आला कि शिक्षक काही बोलु शकत नाहित म्हणून त्यांना वाट्टेल ते काम द्यावे, त्यांचे पगार थकवावेत हा काय प्रकार ? बाकी सरकारी कर्मचारी जसे सचिवालयातील अथवा मंत्रालयातील अथवा एस.टी ई. लोकांचे पगार थकलेले कधी ऐकले नाहित. त्यांची युनियन मजबूत आहे म्हणून असेल कदाचित........ पण मुलांना एक चांगला नागरिक बनवायची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना अशी वागणुक ? अशी अपमानकारक वागणुक मिळाल्यावर तो शिक्षक कशावरुन मुलांना उत्साहाने शिकवेल .......... शिक्षकांनाच ही ड्युटी असते का ? मधे एकदा वाचले होते कि जनगणनेच्या कामातही शिक्षकांनाच जुंपले होते. हा लेख वाचुन वाटलेल्या भावना तुमच्याशी शेअर कराव्याश्या वाटल्या म्हणून हा लेख. जर हा लेख कोणा आय.ए.एस माणसाने वाचला आणि त्याला पटून त्याने शिक्षकांचे होणारे हाल थांबवले तर देव पावला.
प्रतिक्रिया
10 May 2009 - 10:45 am | अनंता
शिक्षकांना उन्हाळी व हिवाळी सुटीत अशी थोडीफार कामे द्यायला हरकत नाही.
माझ्या मते शिक्षकांएवढी रजा इतर कुणालाही मिळत नसावी. त्यामुळे त्यातील
अर्धी रजा राष्ट्रीय कार्यासाठी लागली तर त्यात गैर ते काय?
10 May 2009 - 10:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अजिबात हरकत नसावी. एकूण लेखातून एकच अपेक्षा व्यक्त झाली आहे, माणसांना माणसांसारखीच वागणूक द्या, धोंडे समजू नका! आणि ही अपेक्षा अतिशय रास्त आहे.
माझे आई-वडील निवडणूकींच्या कामाला जायचे त्यामुळे अनेक "मूलभूत सुखसोयीं"विषयी उदासीन लोकही या ड्यूटीला का वैतागतात याची मला पूर्ण कल्पना आहे. आईतर बर्याचदा निवडणूकीनंतर आजारी पडायची, कारणं अनंत असायची कधी पाणी, कधी अन्न, कधी धूळ, तर कधी पाठ धरायची.
साधारणतः हाताखालच्या माणसाला माणूस म्हणून वागवण्याची पद्धत आपल्या देशात नाहीच की काय असा कधीकधी संशय येतो.
10 May 2009 - 11:04 am | कुंदन
मुलभुत सोयी सुविधा पुरवा आणि मग द्या अशी थोडीफार कामे.
>>माझ्या मते शिक्षकांएवढी रजा इतर कुणालाही मिळत नसावी.
रजा की सुट्टी? नक्की ठरवा.
10 May 2009 - 10:23 pm | टारझन
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
मस्त रे कुंद्या ...
बाकी "माणसाला आयुष्यात दुसरं काही करता आलं नाही की त्यानं सरळ शिक्षक व्हावं" .. असं कॉलेजात असताना आम्ही एकसूरात म्हणायचो .. .आणि ते बरोबरही होतं म्हणा ...
'बहुतांश' शिक्षक लोकं तर रोज शाळेत जाणे .. पाट्या टाकणे ,.. घरी येणे .. वर्षातल्या २-३ महिने पगारी सुट्ट्या ... आणिक सणवाराच्या सुट्ट्या ... एवढ्यात खुष होउन जातात ... बाकी शिक्षक हे जॉब प्रोफाईल कसं आहे ह्यावर आपली नो कमेंट .. पण शिक्षकांना असली कामं करायला लावली तर त्याचा बाऊ होण्यासारखं काही नाही .. सुविधा दिल्या पाहिजेत हे खरंय ... लेखात बरंच काही लिहीलंय .. खरं खोटं पडताळून पहायला पाहिजे बॉ ...
बाकी सक्ती केली नाही तर शिक्षक लोकं ती ही कामं टाळतील असं वाटतं .. का कोणास ठाऊक .. पहाण्यात आलेले बरेच शिक्षक लोकं जाम कामचूकार होते ..
आणि पगार तुंबवणे ... पैसे कापणे इत्यादी गोष्टी अत्यंत संतापजनक आहेत .. असे कामं करणार्यांचा पँट्स खाली करून त्यांचा "इतिहास" ताशाच्या काड्यांनी चोपून काढला पाहिजे
10 May 2009 - 10:35 pm | कुंदन
>>>>माझ्या मते शिक्षकांएवढी रजा इतर कुणालाही मिळत नसावी.
हे आधी च का नाही सांगितलत , शिक्षक झालो असतो मी.
च्यामारी आम्हाला ना रजा मिळते ना सुट्टी ?
11 May 2009 - 10:56 am | विजुभाऊ
एखादा कामगार आणि शिक्षक यांच्या पेशात मूलभूत फरक आहे की कामगार घरी जाताना मशीन बंद करुन जातो. शिक्षकाला घरी उद्याच्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. ( मी असे शिक्षक पाहिले आहेत)
शिक्षक पिढी घडवतो.
शिक्षकाला जी सुट्टी मिळते ती त्याला आवश्यक असतेच. त्याचा मेंदु ही त्या सुट्टीमुळे ताजातवना होतो.
अवांतरः न्यायाधीशांच्या सुट्टीबद्दल कोणीच का केंव्हा बोलत नाही.
शिक्षकाने मे महिन्यात सुट्टी घेतल्यामुळे कामे तुम्बुन रहात नाहीत.
न्यायालये महिनाभर बंद असतात तेंव्हा किती खटले निकालात काढता येउ शकतात याचा कोणी विचार केलाय?
10 May 2009 - 10:45 am | हेरंब
ही कैफियत आजची नसून गेल्या अनेक वर्षांची आहे. खाजगीत अशा प्रकारच्या तक्रारी पूर्वीपासून ऐकून आहे. पण कोणी आय्.ए.एस. अधिकारी यावर काही करेल हा तुमचा भाबडा आशावाद आहे. ज्यांना बारीक सारीक कामासाठी सुध्दा सरकारने नोकर पुरवले असतात ते सामान्य माणसाची दखल कशाला घेतील?
10 May 2009 - 11:03 am | विनायक प्रभू
ओझ्याच्या गाढवानी तक्रार करु नये.
11 May 2009 - 1:27 am | हरकाम्या
आपण तुमच्या मतांशी पुर्ण सहमत.( कारण मीही त्या गाढवांपैकी एक आहे पण मी शिक्षक नाही. )
11 May 2009 - 9:07 am | Nile
जो ओझ्याचा गाढव असतो नो करतही नाही, जो असतो पण ज्याला त्याची चिड असते तो अशा प्रकारची तक्रार करतो, इतर ओझ्याच्या गाढ्वांना त्यात काय नविन? पण विचित्र वाटतं ते साध्या सरळ मानवाला!
11 May 2009 - 9:09 am | विनायक प्रभू
हाँ
10 May 2009 - 11:12 am | सँडी
उच्चशिक्षित प्राध्यापकांना बोटाला शाई लावायला बसवू नका.
ओळखपत्रांच्या तपासणीसाठी सेट-नेट, एम.फिल., पीएच.डी., बँकांच्या परीक्षा पास झालेले लोकच हवेत का?
या लोकांना कामं जरूर द्या, पण त्यांच्या लायकीची कामं द्या. बौद्धिक सवेर्क्षणाची-संख्याशास्त्रीय अशी... पण आता दिल्या जात असलेल्या कामांमुळे त्यांच्या क्रयशक्तीचं काय होत असेल?
उद्या पेट्या उचलणाऱ्या प्राध्यापकांचे फोटो द्याल.
मटा लेखातलं वरील एक एक वाक्य हास्यास्पद. कसली ही पदव्यांची मग्रुरी? आरे तुम्हाला रस्ते तर साफ करायला नाही लावले ना? देशासाठीच काम करतोय ना आपण? यांच्या लायकीची ? कामं म्हणजे 'बौद्धिक सवेर्क्षणाची-संख्याशास्त्रीय' या पुरतीच मर्यादित आहेत का?
आम्ही नाही केली बुवा आमच्या उच्चशिक्षणाची, पदव्यांची, पगारांची मग्रुरी. पुण्यात असताना मोकळ्या वेळेत वाहतुक पोलिसांना नियंत्रणात मदत करताना आम्हाला नाही कधी लाज वाटली. अजुनही नाही वाटणार. तुम्हाला तर इथे कामाचा मोबदला पण मिळतोय ना? मग कशाला करताय हा माज?
नका करु अशी हलकी? कामं, लाज वाटत असेल तर!
-संदीप.
काय'द्याच बोला.
10 May 2009 - 12:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कशाला पाहिजेत पोरांना शिकवायला सुद्धा पदवीधर लोकं! फार माजुर्डे होतात हे लोकं दोन कागदाचे तुकडे मिळाले की! उगाच आपण बुद्धीवादी आहोत असा कांगावा करत बसतात. सगळी कामं सारखीच, आणि सगळे लोकही सारखेच, कॉम्रेड अथवा साथी.
तेव्हा पोरांना शिकवायला, त्यांच्या परीक्षा घ्यायला, ते पेपर तपासायला आतापासून पदवीधर लोकांना पगार देऊ नये. (तसाही कुठे पगार मिळतो, मजूरीच मिळते बर्याचशा नव्या शिक्षकांना!) सरळ न शिकलेले, किंवा कमीतकमी शिकलेले लोकं बसवावीत तिथे.
सॉफ्टवरमधले बरेच लोकं नाहीतरी बोंबलत फिरतातच, आम्हाला आमची डोकी लावून करण्याची कामं मिळत नाहीतच. इथेही थोडी समानता येईल.
10 May 2009 - 8:28 pm | सँडी
अगदी बरोबर.
उगाच आपण बुद्धीवादी आहोत असा कांगावा करत बसतात.
हे धाग्याला अनुसरुन असलेले वाक्य अगदी बरोबर! आपली बुद्धी जर शिकविण्यापुरतीच मर्यादित असेल तर तेच करा ना! सरळ सांगा अशी 'हलकी' कामं आमच्या अवाक्याबाहेरची आहेत. आम्ही फक्त दिलेले ओझेच वाहणार. कशाला हवेत बाकीचे रिकामटेकडे धंदे? :)
बाकी,
तेव्हा पोरांना शिकवायला, त्यांच्या परीक्षा घ्यायला, ते पेपर तपासायला आतापासून पदवीधर लोकांना पगार देऊ नये.
कमी शिकलेल्यांना शिकवण्यासारखी 'हलकी' काम आवडतील की नाही हाही एक संशोधनाचा विषय ठरेल. पेपर तपासणी बाबतचे किस्से तर वरचेवर ऐकायला मिळतच असतात. :)
सॉफ्टवरमधले बरेच लोकं नाहीतरी बोंबलत फिरतातच, आम्हाला आमची डोकी लावून करण्याची कामं मिळत नाहीतच.
इतर क्षेत्रातही हिच बोंब आहे. :)
-संदीप.
काय'द्याच बोला.
10 May 2009 - 10:39 pm | ब्रिटिश टिंग्या
>>इतर क्षेत्रातही हिच बोंब आहे.
असेच म्हणतो!
काहीही झालं तरी केवळ सॉफ्टवेअरच्या लोकांना शिव्या देण्यात काही हशील नाही!
सॉफ्टवेअरच्या व्यतिरीक्त "रयतेच्या श्राद्धाच्या जिलेब्या" खाणारीदेखील बरीच क्षेत्रे आपल्याकडे आहेतच की ;)
10 May 2009 - 12:02 pm | क्रान्ति
'शिक्षक होऊन काय पोलिओसाठी लेकरं गोळा करणार आहेस दारोदार फिरून?' ही शिक्षक व्हायचं ध्येय जपणा-या मुलाला एका शिक्षकानंच दिलेली कानपिचकी होती!
वरच्या लेखातला निवडणूक केंदांवर सर्व तऱ्हेच्या सुविधा उपलब्ध करा आणि एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधल्या असंख्य बेरोजगारांना प्रशिक्षण द्या. जे काही साडेपाचशे-सातशे-आठशे-नऊशे रुपये द्यावयाचे असतील, दिवसाचे ते त्यांना मिळू द्यात...
हा पर्याय योग्य वाटतो. क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com
10 May 2009 - 12:22 pm | स्वामि
सदर लेख हा पूर्णपणे एकांगी आणी स्वतःला झालेल्या कष्टाचा बाउ करणारा वाटतो.तीन वर्ष बेकारीत काढल्यावर या प्राध्यापक महोदयांना 'नौकरीचे कष्ट ,प्रिंसिपलचा त्रास' होतो.दोन दीवस काय ग्रामीण भागात काढले तर यांना नरक यातना झाल्या.याच महाशयांची १तासाची बडबड ऐकण्यासाठी बिचारी खेड्यातली मुलं काय दीव्य करुन येतात याची यांना जाणीव आहे का?आणी हे शिक्षक रिकाम्या वेळात काय'धंदे'करतात ते तरी कळू द्या की जरा.
10 May 2009 - 3:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निवडणूकीची डिवटी आम्हीही पार पाडली. प्रेसेडींग ऑफीसर (केंद्राध्यक्ष ) म्हणून पहिल्यांदाच मला काम मिळाले होते. आणि मी काम इंजॉय केले. केवळ मी केंद्राध्यक्षाचा रोल करतांना बॉस सारखा बसलो नाही. मी माझ्या सहकार्याला सुटी द्यायचो तेव्हा क्रमांक एकच्या अधिकार्याचे ओळखपत्र तपासण्याचे काम केले. नंतर क्र दोनच्या अधिकार्याचे नोंदवहीत नोंदी करुन बोटाला शाइ लावली क्र. तीनच्या अधिकार्याचे बॅलेट देण्याचे कामही केले. त्याचबरोबर सायंकाळी सर्व रिपोर्ट्स भरुन व्यवस्थीत सपूर्द केले. आणि हे काम करत असतांना आपण प्रा.डॉ. आहोत असा विचार एकदाही मनात डोकावला नाही. त्याचदिवशी पैसेही नगदी मिळाल्याने बरं वाटले. हो, त्रास झाला तोही नियोजनाचा अभावामुळेच. सर्व मतदानाचे सामान घेतांना आणि देतांना ! ( मात्र हे समजून घेता येते ) इथे लैच कचरा केला बेट्यांनी !!! रांगेत या ! नाही तर अमूक-अमूक कलमाने कार्यवाही करु. धक्काबूक्की, त्याचबरोबर...कै च्या कै बोलत होता एक अधिकारी. अर्थात एकाने सुनावलं त्यालाही की, 'आम्ही काही तुझ्या कार्यालयातले चपराशी नै म्हणून, जरा व्यवस्थीत बोला ! इतका प्रसंग सोडला तर एक चांगल्या कामाचा आनंद मिळाला.
>>भरीस भर म्हणून जेथे त्याची ड्युटी होती तेथे काहिही सोयी सुविधा नव्हत्या.
मलाही एक असेच भयान ,उदास गाव होते. पण तालूक्यापासून फार दूर नव्हते. पण मला मिळालेले सहकारी दोन शिक्षक आणि पशूसंवर्धन कार्यालयातील एक ऑफीस सुप्रीडेंट चांगले लाभले होते. सर, हे असेच असते म्हणून माझा उत्साह टीकून ठेवला. आम्ही ज्या गावात होतो त्या गावात तलाठ्याचा पत्ताच नव्हता . एका निवृत्त कोतवालाने शाळा उघडून दिली. त्याला सांगितले 'बाबा रे ! फक्त सायंकाळी पोळ्या चांगल्या शेकलेल्या आन पीठलं आणून दे. बाकी काही करु नको. सायंकाळी काही कार्यकर्त्यानं काही सेवा बिवा लागली तर सांगा म्हटल्यावर आमच्या एका शिक्षकानं नैंटीची व्यवस्था करुन घेतली . मात्र शाळेच्या ओट्यावर झोपणे, डासांची भीती , (आमच्या नशिबानं नव्हते म्हणा ) आणि उन्हाळ्यात पंख्याची सोय नसल्यामुळे घामाघुम...अशा अवस्थेत झोप काय आली नाय राव ! आम्हाला अंघोळीसाठी एका हौदात पाणी भरुन ठेवले होते. गावकर्यांनी रात्री हौद रिकामा करुन टाकला. उन्हाळ्यात पाणीच नै गावात वापरायला ते तरी काय करतीन बिचारे . खरडून-खुरडून उरलेल्या पाण्याने सकाळचे सर्व विधीं आटपून ( बरं झालं शाळेत मुलांच्यासाठी संडास बांधलेला होता. मला असे वाटते त्याचे उद्घाटन आम्हीच केले. नाय तर वावरात बांधाला जायची तयारी केलीच होती. ) स्वच्छ कपडे घालून...मतदानाच्या प्रक्रियेला प्रसन्न मनाने आणि हसर्या चेहर्याने कामाला सुरुवात केली.
असो, खरं तर जिथे तिथे (प्रत्येकाला) काम चुकवायची सवय असल्यामुळे तलाठ्यानं जर व्यवस्था केली तर उत्तम सोय होऊ शकते, पण त्यालाही दोन-दोन तीन-तीन गावे दिल्यावर तो तरी काय करणार, असो, सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशात निवडणूकीचे कामकाज व्यवस्थितपणे चालवणार्या निवडणूक आयोगाच्या कामातील एवढ्या तेवढ्या त्रूटी चालायच्याच नै का ?
-दिलीप बिरुटे
10 May 2009 - 3:57 pm | अवलिया
प्रतिसाद आवडला.
आमच्या मित्राने भारतातील लोकशाही जिवंत ठेवण्याच्या प्रक्रियेत जो आपला सक्रिय सहभाग घेतला त्याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे.
दिलीपशेट ! जियो !!
--अवलिया
10 May 2009 - 3:59 pm | सहज
हेच म्हणतो.
10 May 2009 - 8:37 pm | सँडी
प्रतिसाद आवडला.
कसल्याही प्रकारचा संकोच न बाळगता आपण मनापासुन आणि प्रसन्नतेने केलेले कार्य स्फुर्तीदायक असेच म्हणेल.
म.टा. लेखातील संकुचित वॄत्ती हा अशा सेवाभावी मानसिकतेचा अभाव असावा का असे वाटुन गेले.
-संदीप.
काय'द्याच बोला.
10 May 2009 - 11:13 pm | कुंदन
निवडणुकीचे काम आणि सेवाभावी मानसिकतेचा काय संबंध?
(निवडणुकीचे काम टाळण्यासाठी ) काय'द्याच बोला?;-)
11 May 2009 - 5:31 am | सँडी
एकच काम दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या पद्ध्तीने(विचाराने) केल्याने इथे काम करण्याविषयीची मानसिकता महत्वाची वाटली.
-संदीप.
काय'द्याच बोला.
10 May 2009 - 3:48 pm | कपिल काळे
मूलभूत सुविधा पुरवल्या तर कामाला कोणीच नाही म्हणणार नाही.
आमच्या ओळखीच्यांचा किस्सा..
पुण्याजवळ एका खेडयात ड्यूटी लागली होती. ते गाव हागंदारीमुक्त आहे . उघड्यावर बसल्यास १०० र दंड. दाखवून देणारयास ५० रु बक्षीस!!.
आमचे स्नेही रात्री मुक्कमाला मतदान केंद्रातच होते. मतदान सातला सुरु म्हणून सकाळी पाचला उठून आवराआवरी करताना "सोय" नाही हे कळल्यावर शेजारी शेतात गेले.
तिकडून गावकरयांचे "भरारी पथक" आले.
विधी उरकल्यावर १०० र दंड झाला.
त्यातील ५० रु ह्यांच्यासमोर दाखवून देणारयास बक्षीस दिले गेले.
नंतर चौकशी करता आणखी दोघा निवडणूक अधिकारयांचेही १०० रु गेले होते अशी माहिती समजली.
दिवसभर "एकी" ला ही जाण्याचे धाडस त्यांनी केले नाही.
10 May 2009 - 3:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशावेळी शंभर दिले तरी परवडतात...:)
11 May 2009 - 8:06 am | प्रकाश घाटपांडे
अगोदर सोय करा. ती उपलब्ध पाहिजे. उपयुक्त पाहिजे. मगच दंड घेण्याचा अधिकार. लईच घान आसल्यावर ओपन एअर परवडते. हागंदारी मुक्त गाव असल्यावर मतदान केंद्राच्या आवारात अथवा जवळ सोय पाहिजेच.
एका ने अशीच मटाच्या लेखासारखी तक्रार केली होती. त्यावर अधिकारी म्हणाले कि मान्य आहे परंतु यानिमित्ताने तुम्हाला समजले कि येथील लोक कसे राहतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 May 2009 - 8:26 am | सँडी
अगोदर सोय करा. ती उपलब्ध पाहिजे. उपयुक्त पाहिजे. मगच दंड घेण्याचा अधिकार.
अगदी बरोबर! हागणदारी मुक्त गावासाठी पहिल्यांदा ती गाव टँकरमुक्त करणे गरजेचे. पाण्याचीच मारामार असेल तर संडास बांधण्यास अनुदान देऊनही कशी होणार हागणदारी मुक्त गावं?
-संदीप.
काय'द्याच बोला.
11 May 2009 - 10:48 am | Suhas Narane
तुम्ही चुक केली.
तुम्ही कोणीतरी जाय्चे आणि, तुम्च्या पेकी कोणालातरी दाखवयला लावायचे.
५० रुपयात काम झाले असते.
५०% बचत
10 May 2009 - 7:54 pm | प्राजु
अवघड आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 May 2009 - 9:27 pm | ऍडीजोशी (not verified)
शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी, श्रावणी सोमवार अर्धा दिवस, संक्रांत, दिवाळी ह्या ज्या शेकडो सुट्ट्या मिळतात त्या भरपगारी असतात का?
19 May 2009 - 2:23 pm | कुंदन
तर मग करा ना अशा सणांच्या फुटकळ सुट्ट्या बंद.....
आणि बंद केल्या तर लगेच तथा कथित संस्कृति रक्षक "सण वारांच्या सुट्या बंद केल्या" या नावाखाली धिंगाणा घालायला मोकळे....
11 May 2009 - 12:58 am | मस्त कलंदर
माझी आई प्राथमिक शिक्षिका आहे. त्यामुळे त्यांना काय काय करावे लागते या कामांची यादी:
१. जण्गणना
२. साक्षरता अभियान ( सायंकाळी दोन तास.. आलटून पालटून..आठवड्यातून प्रत्येकी दोनदा)
३. अप्रगत मुलांसाथी रोज सकाळी शाळेच्या आधी जादा तास... अगदी रविवारी सुद्धा.. यात जर रजा घ्यायची असेल.. तर जाऊन तास घ्या.. नि शाळेच्या वेळाची रजा घ्या.. अथवा.. स्वखर्चाने त्या दोनतासा च्या पदवीधर शिक्षकाची सोय करा...
४.निवड्णूक
५. मतदार याद्या बनवणे... यात बर्याचदा शिक्षक त्या गावातला नसतो.. त्यामुले.घरे माहीत नसतात... दोन-तीन फेर्या होतात... वर हे काम शाळेच्या वेळात करायचे नाही.. सकाळी वा सायंकाळी..
६. छोट्या गावात... कुणी ही उठ तो.. अन.. शाळेत जाऊन तपासनीसाचे काम करतो.. अशा लोकांना तोंड देणे..
६. नि कळस म्हणजे.. गुड मॉर्निंग पथक...( हातात गुलाबाची फुले घेऊन परसाकडे निघालेल्या.. अथवा येणार्या लोकांने देणे.. सुदैवाने.. माझ्या आईच्या साळेत खुपच कडादून विरोध झाला... पण ईतर ठिकानी.. ही कामे शि. नी केली आहेत... तीही नोकरीच्या गावी... सकाळी.. ६:३० पासून हजर राहून...)
आता तुम्ही म्हणाल.. ही सारी कामे नेहेमी चालु असतात? तर हो... फक्त... गरजेनुसार.. एखादे काम त्या त्या वेळी कमी वा जास्त प्राधान्याने केले जाते..
आणि एवढे करुन.. घरात्ले... नि बाहेरचे सगळेच म्हण्तात... "काम काय असते तुम्हाला?? वर्षभार सुट्ट्या... खुर्चीवर बसण्याचा फुकट पगार.. मग दिले थोदे काम तर काय बिघडले??"
नि अधिकार्यांचे मत आहे की.. प्रा. शि. ना काम दिले.. की बिन्चूक होते... त्यामुळे.. त्यानांच द्या..
तेव्हा मंड्ळी... काम सगळेच लोक करतात... आणी एखाद्या अनुभवावरून पूर्ण समाजाबद्द्ल मत बनवणे बरोबर नाही..
ह. घ्या.सां. न. ल.
मस्त कलंदर
http://picasaweb.google.com/swatsurmy/MyHandmadeBookmarks
11 May 2009 - 3:28 am | अडाणि
प्रा. शिक्षकांना फार पिळ्वटून घेतात... ते सरकार चे हक्कचे नोकर असल्यासारखे वागवतात...
-
अफाट जगातील एक अडाणि.
11 May 2009 - 11:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त कलंदर, तुमचा प्रतिसाद खरोखर पटला. माझेही पालक शिक्षक होते त्यामुळे दोघांना काय काय कामं करायला लागायची हे मलाही माहित आहे.
दिवाळी, ख्रिसमस, उन्हाळी सुट्ट्या शिक्षकांनाही असतात. त्यात ख्रिसमसचीच काय ते सुट्टी मिळाली तर! बाकी दिवाळीत आणि उन्हाळ्यात पेपर तपासणे (हा कामाचाच भाग असतो), दहावीचे पेपर आले की अगदीच काटेकोरपणे शिस्त पाळून ते करणे, मॉडरेटर असलेच तर मग घरातल्यांनी आई-बाबांना विसरूनच जायचं, शाळेतल्याच दहावीच्या मुलांना एकही जादा दिडकी न घेता शिकवणे इ.इ. अनेक कामं माझे आई-बाबा बिनतक्रार करायचे. कॉलेजमधल्या 'एक्झामिनेशन कमिटी'वर असल्यामुळे बाबांनी परिक्षांच्या दिड महिना आधी ते निकाल लागेपर्यंत रविवारीही सुट्टी घेतल्याचं पाहिलं नव्हतं, तेव्हा दिवाळीची आणि उन्हाळ्याची सुट्टी विसराच. पण तरीही निवडणूकीचं काम आलं की थोडी कुरबूर व्हायची, कारण शाळकरी मुलांना घरात एकटं टाकून दोन्ही पालक बाहेर जात आहेत, हे सुजाण पालक नाही मान्य करू शकत. त्यावर परत आले की अन्नातून, पाण्यातून विषबाधा, पाठदुखी, असले त्रास सहन करायचे!
शाळा/कॉलेजमधे तास 'भरून' नंतर कोचिंग क्लासेसमधे पैसे छापणारे, शिकवण्याची कला अवगत नसलेले शिक्षकही मी पाहिले आहेत. पण त्याबरोबर असेही शिक्षक पाहिले आहेत जे पेशाशी इमान राखायचं म्हणून, पटत नाही म्हणून क्लासेसमधे शिकवत नाही. कामाव्यतिरिक्त शिकवतात ते फक्त अगदी ओळखीच्याच मुलांना, तेसुद्धा पैसे न घेता!
अगदी सहमत. सगळेच लोक शिक्षकी पेशात सेवाभावी वृत्तीने आलेले असतात असं नाही, पण या लोकांवरून मत बनवून अनेक प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय होतो आहे याचीही जरा आठवण ठेवा.
मलाही माझ्या शाळेत, कॉलेजमधे सगळे शिक्षक 'गुरुर्देवो भव' या उक्तीला साजेसे मिळाले नव्हते, पण अशा लोकांमुळे खरोखर आदर करावा अशा शिक्षकांवर अन्याय का करावा?
बिरुटेसर, तुमच्यासारखेच लोकच लोकशाही मजबूत करायला मदत करतात. पण खरंच मनापासून वाईट वाटतं तुम्हां लोकांसाठी, जे खरोखरचे कष्ट करतात, त्यांना पिळवटून घेऊन असली कामं करवून घेतली जातात आणि मूलभूत सुविधाही दिल्या जात नाहीत. गावातल्या लोकांना काय काय सहन करावं लागतं हा अनुभव फक्त तुम्हां शिक्षकांनाच का मिळावा? बाकी सगळ्या लोकांना एवढीच तुम्ही शिक्षकांनी 'शिकावं' असं वाटतं, तर स्वतः का नाही येत तिथे पाणी आणि इतर महत्त्वाच्या सोयी पुरवायला?? इतरांच्या सुट्ट्या पहाणं आणि त्यांना बोल लावणं फार सोपं असतं, "वाह बिरुटेसर" म्हणणंही सोपं असतं, पण प्रत्यक्षात ते करणं फार कठीण असतं. राग याचा येतो की हे निवडणूक आयोगाचे लोकं वातानुकुलित खोल्यांत बसून हे सगळं मॉनिटर करत बसतात आणि सर, तुमच्यासारखे प्रामाणिक लोकं सगळ्या गैरसोयी, असुविधांना तोंड देत म्हणतात, "भारतमाता की जय"!
11 May 2009 - 11:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>प्रामाणिक लोकं सगळ्या गैरसोयी, असुविधांना तोंड देत म्हणतात, "भारतमाता की जय"!
खरं आहे ! माझे जाऊ द्या. पण अनेक लोक असेही होते जे कामाची /सुविधांची कुरकुर न करता आहे त्या परिस्थितीत काम करतात, इतकेच मला सांगायचे होते. (शिव्या देणारेही खूप भेटतात )अर्थात वैताग आणनार्या गोष्टी तिथे नाहीच असे नाही. असो, निवडणूकीच्या कामाशिवाय शिक्षकांच्या पिळवणूकीचे मात्र समर्थन करताच येत नाही.
-दिलीप बिरुटे
11 May 2009 - 11:48 am | विजुभाऊ
कॉलेजचे शिक्षक खूप चांगल्या परिस्थितीत असतात. माध्यमीक शिक्षकांची अवस्था भयानक आहे.
बर्याच जणाना नवे ज्ञान मिळु शकत नाही आणि बरेच जणाना ते घेण्याची लाज वाटते.
एखादाच पाम्डुरंग सांगवीकर ;एखादा चांगदेव पाटील ....बीचारा व्यवस्थेची लक्तरे मनात मोजत असतो आणि वीझुन जातो
बाकीचे नुसते भ्रामक मान सन्मानाच्या गुलामगिरीचे ओझे बाळगत जगणे पुढे ढकलत असतात
11 May 2009 - 1:55 pm | जागु
शिक्षकांचे हे हाल खुप आधी पासुनच चालू आहेत. माझी आई आणि सासू दोन्ही प्रार्थमिक शिक्षिका होत्या. आता दोघीही रिटायर्ड आहेत. पण मला आठवते. आईला रोज धावपळ करावी लागत असे. कधी गट संमेलन, कधी मिटिंग, कधी जनगणना, कधी पोलिओ डोस. तेंव्हा कुटुंबनियोजनाच्या २ ते ३ केसेस एका वर्षात मिळवायला लागायच्या नाहीतर बदली हा नियम होता. त्यासाठी आई अगदी तळागाळात जायची मी एकदा तिच्याबरोबर ठाकर वाडीतही गेलेले आठवते.
घरीही शाळेची काम चालू असतात. टाचण, पेपर तपासणे, वह्या तपासणे. खरच खुप हाल होतात शिक्षकांचे.
12 May 2009 - 12:40 am | हुप्प्या
शिक्षक हा पेशा असा आहे की ज्यात शिक्षक पुढची पिढी घडवतात. हे काम व्यवस्थित व्हायला हवे असेल तर शिक्षकांना असली असंबद्ध कामे देऊ नयेत. निवडणूका, जनगणना, कुटुंबनियोजन वगैरे कामे अन्य लोकांना द्यावीत ज्यांचे काम केवळ कचेरीतच असते.
शिक्षकांनी वाचन, अध्ययन, अध्यापन वगैरे केले पाहिजे. आपण जे शिकवतो आहोत त्यात काय बदल केले पाहिजेत, नव्या गोष्टी कशा सामावून घ्याव्यात याकरता वेगवेगळी पुस्तके, मासिके वाचणे, जिल्हा, तालुका, राज्य पातळीवर परिसंवाद आयोजित करणे आणि त्यात भाग घेणे असले उपक्रम शिक्षकांकडून करवून घेतले पाहिजेत. तरच हा वर्ग समाजाच्या उपयोगी पडेल. त्यांच्या सुट्ट्या पेपर तपासण्याव्यतिरिक्त अशा कामात घालवल्या तर जास्त बरे.
सरकारी नोकर आहेत म्हणूण वाट्टेल ती कामे ह्यांच्या माथी मारणे म्हणजे एखाद्या प्रकांड पंडिताला गुरे हाकायला लावण्यापैकी आहे.