आपण पहिलेछूट सांगतो,की झी टीव्ही, सारेगमप कार्यक्रम, त्यावरचे सगळे छोटे-मोठे स्टार, कार्यक्रमाचे अमाप आणि अफाट चाहते, यांच्याबद्दल आपल्या मनात जराही वैरभाव नाही. कार्यक्रमाच्या, कलाकारांच्या दर्जाविषयी, प्रेक्षकांच्या आकलनशक्तीविषयी मनात जराही किंतु नाही. तरीही काही प्रश्न पडतात. ते या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न...
स्पर्धेत राहिलेले सगळेच लिट्ल चॅम्प्स आता अंतिम (महामहा की काय ती) फेरीत गाणार आहेत. सारेगमपच्या विश्वात इतिहास घडविणारा निर्णय म्हणून परीक्षकांचा निकालही यावेळी 50 टक्के निर्णायक आहे. सगळीच क्रांती एका कार्यक्रमातून होत आहे.
तरी पण खरं सांगा दोस्तहो, मुग्धा, आर्या, प्रथमेश, कार्तिकी आणि रोहित सगळे अप्रतिम, अफाट, चाबूक वगैरे गातात, एवढ्या वयात त्यांची प्रतिभा, तयारी म्हणजे पायाचं तीर्थ घ्यावं इतकी आहे, हे सगळं कबूल. पण खरंच, जुन्या अत्युच्च उंचीच्या गायकांची गाणी त्यांच्या बालवयीन आवाजातून ऐकायला किती काळ बरी वाटतात हो? ते वयाच्या मानानं अप्रतिम गात असतीलही, पण जे गाणंच वयस्कर किंवा प्रौढ व्यक्तीचं आहे, ते या लहानग्यांच्या आवाजात ऐकायला खरंच गोड वाटतं? आणि किती काळ? बरं, त्यांना त्यांच्या पद्धतीनं गाणं गायचीही परीक्षकांची परवानगी नाही. अभिषेकीबुवांनी अमूक ठिकाणी तमूक हरकत, तान घेतली आहे, म्हणून त्यांनी पण तसंच गायचं. किंवा जयश्रीबाई अमूक गाण्यावर ढमूक ठिकाणी मुरका घेतात, म्हणून मुग्धा किंवा आर्यानंही तिथे तसाच घ्यायचा! (जयश्री गडकर गायिका नव्हत्या आणि आशा भोसले त्या गाण्यात पडद्यावर नाहीत, याचा बहुधा परीक्षकांना सोयीस्कर विसर पडत असावा!!)
आणखी किती गाणी गायली की या लिट्ल चॅम्प्सला अढळपद मिळणार आहे? किंवा प्रेक्षकांचं, झी टीव्हीचं, परीक्षकांचं आणि या स्पर्धकांच्या आईवडिलांचं समाधान होणार आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे, सारेगमप संपल्यानंतर त्यांना पुढची दहा-बारा वर्षं कोण विचारणार आहे आणि कशाच्या जोरावर?
लिट्ल चॅम्प्स आणि `बिग' प्रश्न...
गाभा:
प्रतिक्रिया
14 Jan 2009 - 1:27 am | संदीप चित्रे
योग्य लेख आहे अभिजीत...
>> प्रेक्षकांचं, झी टीव्हीचं, परीक्षकांचं आणि या स्पर्धकांच्या आईवडिलांचं समाधान होणार आहे?
ह्यातलं 'स्पर्धकांच्या आईवडिलांचं' हे शब्द तर खूपच महत्वाचे..
मध्यंतरी रीडिफ.कॉमवर एक सुरेख लेख होता... लहान मुलांना असं ताबडवलं जातं त्याबद्दल. त्यात तारें जमीन परच्या दर्शील सफारीचे उदाहरण दिलं होतं की त्या बिचार्याला आता त्याचं बालपण किती मनमुराद उपभोगता येतंय कळतच नाही.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
14 Jan 2009 - 1:30 am | विसोबा खेचर
पण खरंच, जुन्या अत्युच्च उंचीच्या गायकांची गाणी त्यांच्या बालवयीन आवाजातून ऐकायला किती काळ बरी वाटतात हो? ते वयाच्या मानानं अप्रतिम गात असतीलही, पण जे गाणंच वयस्कर किंवा प्रौढ व्यक्तीचं आहे, ते या लहानग्यांच्या आवाजात ऐकायला खरंच गोड वाटतं? आणि किती काळ? बरं, त्यांना त्यांच्या पद्धतीनं गाणं गायचीही परीक्षकांची परवानगी नाही. अभिषेकीबुवांनी अमूक ठिकाणी तमूक हरकत, तान घेतली आहे, म्हणून त्यांनी पण तसंच गायचं. किंवा जयश्रीबाई अमूक गाण्यावर ढमूक ठिकाणी मुरका घेतात, म्हणून मुग्धा किंवा आर्यानंही तिथे तसाच घ्यायचा!
कंप्लीट सहमत...!
मला गाण्यातले फारसे काही कळत नाही पण काही बुजूर्गांसोबत उठबस केली आहे आणि त्यांच्याकडून थोडेफार शिकलो आहे, त्या आधारावर खालील निवेदन करू इच्छितो -
१) सर्व मुलं अत्यंत गुणी आहेत, वयाच्या मानाने सुरेखच गात आहेत.
२) परंतु झी मराठीने त्याचे एकंदरीत जे काही बाजारीकरण चालवले आहे आणि त्यामुळे त्या मुलांना जी अफाट लोकप्रियता मिळते आहे ती त्या मुलांची वयं पाहता भविष्यात त्यांच्याच संगीतकलेला घातक ठरू शकते असे मला वाटते!
आणखी किती गाणी गायली की या लिट्ल चॅम्प्सला अढळपद मिळणार आहे? किंवा प्रेक्षकांचं, झी टीव्हीचं, परीक्षकांचं आणि या स्पर्धकांच्या आईवडिलांचं समाधान होणार आहे?
अभिजितराव, प्रश्न समाधानाचा किंवा अढळपदाचा नसून झी मराठीच्या हाती लागलेल्या चलनी नाण्याचा आहे! मग त्याकरता लांबवलेले एपिसोड, प्रेक्षकात निरनिराळ्या सेलिब्रिटीजाना बोलावणे, सापशिडी आणि इतर नाट्यमयता, ये सब कुछ करना पडता है!
धंदे की बात है मिष्टर! समझा करो..! :)
असो..
त्या सर्व छोट्यांना फक्त या स्पर्धे पुरत्याच नव्हे, तर त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण सांगितिक वाटचालीला माझ्या मनापासून शुभेच्छा!
आपला,
(अजून षड्ज कशाला म्हणतात याचा नीटसा अंदाज न आलेला संगीताचा एक विद्यार्थी) तात्या.
14 Jan 2009 - 8:49 am | अमोल केळकर
आपल्या विचारांशी पुर्ण सहमत
या सगळ्यांनी इतकी गाणी गायली आहेत की आता अंतीन फेरीत ही कुठली गाणी सादर करणार आहेत असा ही प्रश्न पडत आहे.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
14 Jan 2009 - 10:36 am | अविनाशकुलकर्णी
आणि महत्त्वाचं म्हणजे, सारेगमप संपल्यानंतर त्यांना पुढची दहा-बारा वर्षं कोण विचारणार आहे आणि कशाच्या जोरावर?..
हे मात्र खरे आहे.आधिच्या सा रे ग म चे जे स्पर्धक होते ते आज क्ठे आहेत्?ते सारे वि स्म्रुतित गेले आहेत..लिंबेकर्/वर्त्क्/चितळे यांचि नावे पण आठवत नाहित..
उदंड ़झाल्या स्पर्धा..उदंड ़आले गायक अन गायकि...
अविनाश..मि.पा चॅम्प