मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकूणच स्वत:च्या स्वार्थाकरता जनतेला वेठीला धरणार्या समस्त राजकारण्यांविरुद्ध जनतेत खास करून तरूण वर्गात असंतोष पसरला आहे. त्यातच येत्या काही महिन्यात सार्वत्रिक निवडणूका येऊ घातल्या गेल्या आहेत. राजकारण्यांच्या निष्क्रिय वृत्तीमुळे बर्याच जणांना आपण निदान मत द्यायला तरी जिंवत राहू का अशी एक भिती वाटून राहिली आहे. पण यदा कदाचित जगलोच तर असलेला सगळा राजकारणी वर्ग बदलून नव्या रक्ताच्या तरूणांना संधी मिळावी असे वाटते. जागोरे या संकेतस्थळाने तर जास्तीत जास्त तरूणांना मतदानाकरता जागरूक करायचा यत्न आरंभलाय.
मत तर द्यायचंय पण कोणाला ? कोणाबद्दलही विश्वास वाटत नाही. एकदा सत्ता हातात आली की राजका्रणी सामान्य जनतेच्या वार्यालाही उभे रहात नाहीत.
तुम्हाला कोणालाही मत न द्यायची मुभा दिली तर ? निवडणूक आयोगाचा सेक्शन ४९ मतदाराला अशी मुभा देतो. पण त्याकरता प्रत्यक्ष मतदान करताना एक प्रक्रिया पार पाडावी लागते. ज्या मतदार राजाकरता असलेली ही सोय खुद्द मतदारालाच माहीत नाही तर मतदानाच्या ठिकाणी
नेमलेले अधिकारी याबद्दल काय कप्पाळ सांगणार !. त्यामुळे नेटसेव्ही असलेल्या तरूणांमध्ये सध्या वरील नियमाचा एक ईमेल फिरत आहे. पण सेंट झेवियर्स कॉलेजच्या प्राजक्ता कुवळेकरच्या मते ब्लॅंक मत हे मतदानाला उपाय ठरू शकत नाही. तर लीना मेहेंदळे यांच्या मते अश्या प्रकारे केलेले मतदान निवडणूक आयोग खिजगणतीतच धरत नाही. एकूण काय तर जनक्षोभाची दखलच घेतली जाणार नाही.
सध्या तर अशी परिस्थिती आहे की, मतदान इलेक्ट्रीक पद्धतीने होते. एक बटण फक्त दाबायचा अवकाश की तुमचं मत मतपेटीत बंद. पण त्यातही यापैकी कोणीही नकोय असा पर्याय उपलब्ध नाही. तो जर असता तर बहुतेकांनी तोच पर्याय पसंत केला असता. मी इलेक्ट्रॉनीक मतदान यायच्या पुर्वी माझं मत कोणाच्याही पदरात टाकायच्या ऐवजी मतपत्रिकेवर दोन ठिकाणी थप्पा मारयचे. त्यामुळे व्हायचं काय की मतपत्रिका आपोआप बाद व्हायची पण मतदानाचा हक्कही बजावला जायचा. पण आता इलेक्ट्रॉनीक मतपत्रिकेमुळे मात्र ते शक्य नाही. इलेक्ट्रॉनिक मतपत्रिकेतही असा पर्याय असावा, त्या पर्यायाचीही मतमोजणी व्हायला हवी आणि ती जाहीरही व्हायला हवी. निवडणूक आयोग यावर काही विचार करेल का ?
निवडणूक नियम ४९-०
गाभा:
प्रतिक्रिया
12 Dec 2008 - 5:26 pm | लिखाळ
यावर मिपावर आधीसुद्धा चर्चा झालेली दिसते. तसेच ४९-० असे काही सध्या अस्थित्वात नाही असा ही सूर दिसतो. ते असो.
या सर्व चर्चांत एक मह्त्वाचा भाग दिसतो तो म्हणजे 'मतदानाला जाऊन मत कुणालाच न देणे'. आपले मत दोन शिक्के मारुन वाया घालवणे हा त्यावर काढलेला उपाय. सर्व राजकारणी वाईट म्हणून तुम्ही मत देणार नाही. मग मतदान केंद्रात जाऊन मत वाया घालवणे आणि मतदानाला न जाणे यात अंतर ते काय? दोन्ही एकच.
या उलट अमुक अमुक उमेदवार लायक नाही म्हणून मी तो उमेदवार नको असे मत नोंदवले तर ते योग्य मतदान ठरेल. आणि ४९-० या धर्तीवर आहे अशी अपेक्षा दिसते.
४९-० अस्तित्वातच नाही असे गृहीत धरता -
मतदानाला जाणे आणि त्यातल्यात्यात बर्या उमेदवाराला मत देणे हाच ठीक पर्याय वाटतो.
-- लिखाळ.
12 Dec 2008 - 6:00 pm | सुनील
मतदानाला जाणे आणि त्यातल्यात्यात बर्या उमेदवाराला मत देणे हाच ठीक पर्याय वाटतो.
सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Dec 2008 - 8:44 pm | केदार
अहो मी इथेच लिहीले आहे की ही नुसती भंकस आहे. ४९-० घटनेतले कलम नाही. (त्या वाहिदांचा पानावर)
आणि कूठलाही उमेदवार मान्य नाही म्हणून मत वाय घालविने पळपुटे पणाचे लक्षन आहे. जर हिम्मत असेल तर स्वत: राजकारणात पडावे व निवडनूकीला उभे राहावे.
1 Feb 2009 - 6:32 am | विकास
आज म.टा. मधे खालील बातमी वाचनात आली आणि या धाग्याची परत एकदा आठवण झाली. एका वाक्यात सांगायचे तर जेंव्हा "राजकारण विरुद्ध जनता" असा लढा चालू होतो/होऊ शकतो तेंव्हा तमाम राजकारणी, एकदम सर्व "वैचारीक" मतभेद बाजूस ठेवून जनतेच्या विरोधात जाऊ शकतात...
राजकीय पक्षांनाच नको मतदारांचा 'नकाराधिकार'
(संपूर्ण बातमी या दुव्यावर. खाली फक्त मुद्याची गोष्ट ;) )
1 Feb 2009 - 8:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजकीय पक्षांना नकाराधिकार नको आहे. निवडणूक आयोगाने विविध पक्षांशी चर्चा करुन नकाराधिकाराबाबत निर्णय घेऊ असे नुकत्याच 'नकाराधिकाराबाबत'च्या एका प्रकरणात उच्च न्यायालयात सांगितल्याची बातमी नुकतीच वाचनात आली होती.
कोणत्या दैनिकात बातमी होती आता काही आठवेना ?
-दिलीप बिरुटे